प्रबोधिनीची ग्रामविकास संकल्पना, भूमिका आणि कार्यपद्धती

वा. गिरीश श्री. बापट

सदर लेख मा. गिरीशराव बापट यांच्या ‘राष्ट्रधर्माचे आचरण : विवेकानंद, महात्मा गांधी आणि ज्ञान प्रबोधिनीतील प्रयोग’ या पुस्तिकेतून घेण्यात आला आहे.

खोरं हे नैसर्गिक एकक :

प्रबोधिनीने, विकासाचं नैसर्गिक एकक हे खोरं असू शकेल का असा विचार केला. भारताच्या काही भागात खोऱ्यांच्या ऐवजी नद्यांचा दुआब-दोन नद्यांच्या मधला प्रदेश असा विचार करावा लागेल. काही ठिकाणी पंचक्रोशीचा विचार करावा लागेल. आता खोरं म्हणण्या ऐवजी पाणलोट क्षेत्र म्हणावं म्हणजे ते सगळ्या भारतभर लागू होईल असाही विचार सुरू आहे. खोरं असेल किंवा पाणलोट क्षेत्र असेल, त्याचा अर्थ असा की, एका गावाचा विचार करून चालत नाही. एका गावाचं पाणी दुसऱ्या गावात जातं, ते तिसऱ्या गावात जातं, त्याला अनेक ठिकाणचे ओहोळ आणि उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे कदाचित ५-६-१० गावांचा एकत्र विचार करावा लागेल. ती पर्यावरणाच्या दृष्टीने एकमेकांशी जोडली आहेत, दळणवळणाच्या दृष्टीने एकमेकांशी जोडली आहेत, नातेसंबंधांच्या दृष्टीने एकमेकांशी जोडली आहेत. त्यांच्यातील एखादं मोठं बाजाराचं गाव असतं. त्यामुळे अर्थकारणाच्या दृष्टीने एकमेकांशी जोडलेली आहेत .

त्यामुळे सगळ्या बाजूंनी विचार करायचा असेल तर गावा ऐवजी खोरं हा घटक आपण निवडू या, असं प्रबोधिनीने ठरवलं आणि अनुभवाने असं लक्षात आलं की खोऱ्यांचा विचार करायचा असेल तरी काही बाबतीत गावांचाही विचार करावा लागतो. आणखी काही बाबतीत कुटुंबांचाही. त्यामुळे दिल्लीपासून गावापर्यंत असा विचार न करता खोऱ्यापासून गावापर्यंत असा विचार प्रबोधिनीला करावा लागला आहे. त्यामुळे गांधीजींची जी सूत्रं आहेत की आपल्याला तळापासून वरपर्यंत जायचं आहे, त्या सूत्रानुसार विचार करायची आवश्यकता निर्माण झाली आहे.

आता खोऱ्यांच्या पातळ्यांवर गावांचा आणि कुटुंबांचा विचार करून ग्रामविकसन कसं करायचं? १९९६ साली प्रबोधिनीची ग्रामविकसन संकल्पना पुस्तिका म्हणून ३५ वर्षाच्या अनुभवातून आपण एक पुस्तिका केली होती. आपण करतो आहोत त्या गोष्टींचा अर्थ काय? हे कशासाठी करतो आहोत? कुठल्या गोष्टी बदलत नाहीत, कुठल्या बदलत आहेत, त्या दृष्टीने ग्राम विकसनाची संकल्पना ही सर्वंकष योजना असली पाहिजे. या आधी आपण पाहिलं की रचनात्मक कार्यक्रम म्हणजे १८ गोष्टी. एकोणिसावी पशुधनसेवा या कामाची भर घालायला हवी. आणखीही भर घालता येईल, असं गांधीजींनी नंतर म्हटलं होतं.

प्रबोधिनीची ग्रामविकास-संकल्पना

१. सर्वंकष योजना

२. स्थलांतर-प्रतिबंध

३. आध्यात्मिक जीवनदृष्टी

४. आधुनिक मूल्यांची पेरणी

५. स्वावलंबन मुख्य. बाहेरून अर्थसाहाय्य वर्ज्य नाही

६. तरुण गावकरी व नवोदित स्त्री-नेतृत्वावर भिस्त

७. पक्षीय राजकारणापासून अलिप्तता. सर्वांशी संवाद

८. समूहाच्या लाभाचे उपक्रम

९. प्रेरणा प्रबोधिनीची – सहभाग लोकांचा

१०. पुढील बदलाची प्रेरणा गावातून – साहाय्य प्रबोधिनीचे.

सर्वंकष योजना :

सर्वकष योजना म्हणजे ज्या गावांचा विचार करतो आहोत त्यांच्या विकासाचा सर्व बाजूंनी एकत्र विचार करायचा. मला आठवतं आहे, ८४-८५ साली रंगीत दूरदर्शन भारतात आल्यावर रोज एका गावात दूरदर्शनचा मनोरा उभा राहिला आणि त्याचं उद्घाटन झालं अशा बातम्या वर्षभर चालू होत्या. म्हणजे गावांत जाऊन दूरदर्शन मनोरा उभारणं हा एक कलमी कार्यक्रम होता. तसंच गावात जाऊन सुकडीचं वाटप करणं हा एक कलमी कार्यक्रम होतो. गावात जाऊन रक्तदानाचा कार्यक्रम करणं हा एक कलमी कार्यक्रम होतो. तसंच गावात जाऊन गुरांना लस टोचून येणं हा सुद्धा एक कलमी कार्यक्रम. हे कार्यक्रम म्हणजे गावाच्या विकासाच्या एकाच पैलूचा विचार करणे. हे सगळेच कार्यक्रम आवश्यक आहेत आणि प्रबोधिनीमध्ये गावाच्या विकासासाठी जे आवश्यक आहे आणि जे आपल्याला करणं शक्य आहे, त्याचा विचार करून एकत्रित योजना करूया, असं म्हणून हा सर्वंकष कार्यक्रम प्रबोधिनीत सुरू असतो.

स्थलांतर-प्रतिबंध :

याचा मुख्य हेतू असा असतो की गावातच राहाण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हावी आणि त्यामुळे गाव सोडून कामासाठी शहरात गेलं पाहिजे आणि तिथल्या झोपडपट्टीत राहिलं पाहिजे अशी वेळ कोणावरही येऊ नये. प्रबोधिनीने एक प्रयोग केला. एक यंत्रशाळा उभारली. त्यामुळे गावातच रोजगार मिळत -असेल तर शहरात कशाला जायचं असं म्हणून लोक गावात परत आले. म्हणून आज गावात असलेल्या लोकांना वर्षभर गावातच रोजगार मिळाला पाहिजे, अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची योजना करूया. गांधीजींनी स्थलांतराचा विषय काढला नसला तरी सगळ्यांना पुरेसं काम मिळालं पाहिजे असं म्हटलं आहे.

आध्यात्मिक जीवनदृष्टी :

आध्यात्मिक जीवन दृष्टी असली पाहिजे म्हणजे काय ? तर, “मी म्हणतो हे जितकं खरं तितकंच तूझ म्हणतोस तेही खरं आहे, मी माझी रीतभात सांभाळीन, तू तुझी सांभाळायला माझी काही हरकत नाही, “असं वाटणं. जुन्यातील जुनी रीत आम्हाला सांभाळून ठेवायची आहे. पण आम्ही खळखळ न करता नव्या रीतीचाही अंगीकार करतो. प्रपंच यशस्वी करायची धडपड करायची पण प्रपंच म्हणजे सर्वस्व नाही याचीही जाणीव ठेवायची. दगड-माती, झाड-पाला, किडा-मुंगी, मानव-प्राणी हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत याची जाणीव ठेवायची. हे सगळं सांगितलं याच्यात काय अध्यात्म आहे? कुठलाही लोकशाहीवादी, पर्यावरणवादी, मानवतावादी माणूस हेच म्हणेल. कुठलाही विवेकी माणूस, स्वतःची बुद्धी वापरून विचार करणारा माणूस हेच म्हणेल. दगड-माती, झाड-पाला, किडा-मुंगी, मानव-प्राणी हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्यांच्यात ईश्वरी तत्त्व आहे अशी श्रद्धा असणं म्हणजेच आध्यात्मिक जीवन दृष्टी झाली.

गांधीजींनी ‘हिंद स्वराज्य’ मध्ये म्हटलं होतं, “भारतीय सभ्यता, भारतीय सुधारणा हीच खरी सुधारणा. दोष असतील. कारण ती सुधारणा सगळ्यांपर्यंत पोचलेली नाही. संतांचा उपदेश गावागावात, घराघरात पोचलेला असल्यामुळे खेड्यातील सर्वसाधारण माणूस ज्या पद्धतीने वागतो, ईश्वर आहे की नाही ही शंका त्याला कधी येत नाही. पण त्याचं पूर्ण परिवर्तन झालेलं नसतं. तिथे अस्पृश्यता असते, जातिभेद असतात. स्त्रियांचं दमन होतं. अंधश्रद्धा असतात. तर आक्रस्ताळेपणा न करता याही दुरुस्त्या करत जाणं म्हणजे आध्यात्मिक जीवन दृष्टी.”

आधुनिक मूल्यांची पेरणी :

हे करत असताना आधुनिक मूल्यांची वेगळी पेरणीही करावी लागते. आधुनिक मूल्ये कोणती ? कुठलंही काम करायचं असेल तर स्वच्छता केली पाहिजे. स्वाइन फ्लूच्या निमित्ताने पुन्हा सांगावं लागलं की बाहेरून आल्यावर हात धुवा. सगळे पुन्हा हात धुवायला लागले. म्हणजे ते आपलं मूल्य झालेलं नाही. आपण ते भीतीने करतो आहोत. मूल्य म्हणजे कायम, म्हणजे सर्व वेळ, सर्व ठिकाणी एखादी गोष्ट पाळणं.

नियोजन असलं पाहिजे. कार्यक्षमता-म्हणजे कमीत कमी शक्तीत जास्तीत जास्त परिणाम घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अचूक मोजमाप केलं पाहिजे. गावात अचूक मोजमाप माहीतच नसतं. आपले शेत किती एकराचं आहे तेही पुष्कळदा माहिती नसतं. इथून तिथपर्यंत अंतर माहिती नसतं. एखाद्या पोत्याचं वजन किती ते माहिती नसतं. समोरच्या बादलीत किती पाणी मावेल ते सांगता येत नाही. आधुनिक दृष्टिकोन म्हणजे या प्रत्येकाचं अचूक मोजमाप करता यायला पाहिजे. वेळेचं व्यवस्थापन करता येतं आणि करायचं असतं. भौतिक समृद्धीची इच्छा असण्यात चूक काही नाही, ती मिळवली पाहिजे. ‘जग जिंकुनी घर सजवावे’ असं म्हणण्यात काही चूक नाही. बुद्धिनिष्ठा असली पाहिजे. बुद्धी वापरता येते तिथे बुद्धी वापरली पाहिजे.

व्यक्तीलासुद्धा प्रतिष्ठा आहे. गांधीजींचं म्हणणं होतं की, देशाला घडवण्यात गरिबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा देश घडवण्याबद्दल ‘मी काहीतरी म्हणू शकतो’ असा आत्मविश्वास आला पाहिजे, तर तिला प्रतिष्ठा मिळेल. प्रयोगशीलता असली पाहिजे. ‘आमच्या बापाने हेच केलं म्हणून मी हेच करणार’ ही झाली स्थितिशीलता आणि ‘मी जरा काही वेगळं करून पाहातो’ म्हणजे प्रयोगशीलता. वस्तुनिष्ठ निरीक्षण केलं पाहिजे. तो असं म्हणतो म्हणून मी असं करतो. अरे पण प्रत्यक्ष पाहा ना तिथे काय आहे ! त्याचं निरीक्षण कर आणि ठरव काय आहे ते.

ही सगळी आधुनिक मूल्ये गांधीजींनी सांगितलेल्या यादीतील आहेत आणि त्यांची पेरणी ही र कामं करता करता केली पाहिजे, अशी आपली देखील ग्रामविकसनाची संकल्पना आहे.

स्वावलंबन :

गांधीजींचं म्हणणं होतं की १००% स्वावलंबन असलं पाहिजे. आपण म्हणतो आवश्यक तेथे परस्परावलंबन काय हरकत आहे? शहरं जर गावांच्या जिवावर जगतात तर गावांनी शहरांची मदत घ्यायला काय हरकत आहे? अगदी परकीय मदत घ्यायला तरी काय हरकत आहे? हे सगळं वर्ज्य नाही, अशीच भूमिका असली पाहिजे. परंतु स्वावलंबन हे मुख्यतः हवं. जुन्या पद्धतीचे लोक साधारणपणे बदलायला तयार नसतात. त्यामुळे काही काम करायचं असेल तर तरुण गावकरी किंवा अलीकडचा, गेल्या दहा वर्षातला ताजा अनुभव म्हणजे गावातील स्त्रीनेतृत्व जिथे जिथे पुढे येईल त्यांना संधी द्यायची आणि त्यांच्या करवी हे बदल घडवायचे. कारण ते त्यांना पुढे आणखी वीस-पंचवीस वर्षं चालवता येतात. पक्षीय राजकारणापासून अलिप्त, पण आम्ही कोणाशी बोलणारच नाही असं नाही. सगळ्या पक्षांच्या लोकांशी संवाद असला पाहिजे. फक्त तुमच्या राजकीय प्रचार सभांना आम्ही येणार नाही. तुमच्या प्रचाराचा नारळ फोडायला येणार नाही किंवा तुम्हाला मत द्या असं आम्ही इतरांना सांगणार नाही. तुम्हाला शेवटी याच भागाचा विचार करायचा आहे. आपला संवाद असू शकतो. उपक्रम समूहाकरता योजायचे. एका व्यक्तीला फायदा होतो आहे यापेक्षा अनेकांना उपयोग होईल, संपूर्ण गावाला फायदा होत असेल तर तसं करणं चांगलं.

प्रेरणा आणि लोकसहभाग :

हे सगळं करत असताना बरेच नवीन विषय गावात घेऊन जायला लागतात. प्रेरणाही अनेक वेळा प्रबोधिनीतून जाते. आपण प्रेरणाच द्यायची. लोकांना तो विषय महत्त्वाचा वाटेल, आपलासा वाटेल तेव्हाच तो विषय सुरू करायचा अशी भूमिका असते. पण आपल्याला काम करायची, पुढे जायची घाई असते. आपल्याला पुरेसं कौशल्य नाही असा त्याचा अर्थ आहे. खरं ते असलं पाहिजे, काय बदल झाला पाहिजे हे गावातल्याच लोकांना सुचलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे-आम्हाला ‘हे’ करायचं आहे. त्यात जे तांत्रिक साहाय्य लागेल ते तुम्ही करा. या दिशेकडे जाणं ही प्रबोधिनीची ग्रामविकसनाची संकल्पना आहे.

रचनात्मक काम कसं केलं पाहिजे याबद्दलची गांधीजींची संकल्पना पाहिली तर त्याच्याशी मिळती जुळती, काळानुसार त्यात थोडे काही बदल केलेले, भर घातलेली अशी प्रबोधिनीची संकल्पना आहे. आधुनिक मूल्यांची पेरणी म्हणून जी यादी येथे वाचली, त्यातलं सगळं आपण करत नाही. गांधीजींच्या चरित्रातून ती यादी घेतली आहे. गांधीजींनी म्हटलं आहे की, पाश्चात्त्य सुधारणांना मी खूप नावं ठेवलेली असली तरी ही त्यांची गोष्ट घेण्यासारखी आहे. उसनवारी करायची ती सव्याज परत करण्यासाठी.

प्रबोधिनीची ग्रामविकसन कार्यपद्धती :

१. विधायक आणि संघर्षात्मक

२. विकास प्रक्रियेतील द्वंद्वांचा समन्वय

३. स्थानिक नेतृत्व

४. आधुनिकातील आधुनिक आणि समुचित तंत्रज्ञान

विधायक आणि संघर्षात्मक :

अशी संकल्पना घेऊन जेव्हा आपण ग्रामीण भागात काही काम सुरू करतो, मग ते कुठल्याही पद्धतीचं असो, विधायक आणि संघर्षात्मक दोन्ही पाहिजे. संघर्षात्मक काम आपण चाळीस वर्षांत कदाचित चार वर्ष केलं असेल. गरज पडली तर ते आणखी करायची तयारी ठेवली पाहिजे. विधायक काम करता करता, रचनात्मक काम करता करता, संघर्षात्मक काम करायचीही तयारी ठेवली पाहिजे. उभं करायची शक्ती पाहिजे आणि मोडायचीही शक्ती पाहिजे. फक्त मोडायची शक्ती असून उपयोगी नाही. असलेलं तुम्हाला साफच करता येत नाही. तुम्ही तसंच उभं करता आहात हेही चालणार नाही. गरज पडेल तेव्हा दोन्ही करायची तयारी ठेवली पाहिजे. हे संकल्पनेच्या स्तरावर प्रबोधिनीत ठेवलं आहे. चार-पाच वेळा असं करायला लागलं आहे.

समन्वयाची भूमिका :

प्रबोधिनीने विकास प्रक्रियेतील द्वंद्वांचा समन्वय करायची भूमिका ठेवली आहे. रासायनिक खतांची एजन्सी पूर्वी प्रबोधिनीने घेतली होती. त्याचवेळी सेंद्रिय खतांचा प्रचारही सुरू होता. रासायनिक खतांशिवाय अन्न-धान्याचं उत्पादन पुरेसं होणारच नाही. पण रासायनिक खतांनी शेतीचा कस जातो म्हणून सेंद्रिय खतंही वापरली पाहिजेत. दोन टोकाच्या भूमिका असतील तर आम्ही कुठल्याच एका पारड्यात सगळी शक्ती टाकणार नाही. आमचा कशाचाच अद्याप पूर्ण अभ्यास नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारे शेती करून पाहू.

मोठी धरणं की छोटी धरणं? फायदे-तोटे आम्ही ऐकून आहोत ! अभ्यास करू आणि ठरवू, पण हे मात्र आम्ही आमच्या विचाराने करणार. जुन्या रूढी टाका असंही आम्ही म्हणणार नाही. सगळ्याच नवीन गोष्टी करा असंही आम्ही म्हणत नाही. आम्ही संस्कारांची पुनर्मांडणी करायचा प्रयत्न करू. शहरांमध्ये आपण संस्कारांची पुनर्मांडणी करतो आहोत, त्यातील काही संस्कार-विवाहासारखे संस्कार-सामुदायिक आणि व्यक्तिगत कौटुंबिक कार्यक्रमात ग्रामीण भागात वापरून पाहिले. अंत्येष्टी संस्कार तुरळक प्रमाणात गावात वापरून पाहिला आहे. मातृभूमीपूजन अनेक गावांमध्ये झालेलं आहे. वटपौर्णिमा, हरितालिकेच्या पूजा, खंडेनवमी कशी साजरी करायची याच्या रूढ पोथ्यांना प्रबोधिनी नवा अर्थ देते आहे, करत आहे ते चांगलंच आहे. इतरांना त्रास होत नाही ना? तुम्हाला समाधान मिळत आहे ना? करायचं ते अर्थ समजून करा अशी आपली भूमिका आहे.

विकास वरून खाली होतो की खालून वर होतो? वरून योजना झाली, वरून पैसा आला आणि आता फक्त कार्यवाही खाली करायची आहे-यामुळे गावाचा विकास होतो की गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे विकास खालून वर होतो? गांधीजी जीव तोडून सांगत होते, तरी त्यांचे सगळे सहकारी विकास वरून खाली होतो अशा मताचे होते. त्यातही काही तथ्य असेल कदाचित. तपासून पाहू. विकास खालून वर होतो हे आम्ही राळेगण सिद्धीला गेलो तेव्हा पटलं. वाटलं खालून वर विकास होतो बरं का, पण आम्ही कोणत्याही एका बाजूला लगेच मत टाकणार नाही. दोन्ही बाजूला प्रयोग करत राहू.

नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे की श्रीमंतीशी आमचं भांडण आहे? नीतिमंत श्रीमंत कोणी असेल तर त्याचंही स्वागत आहे. साधेपणा असलेला माणूस हेकट असेल तर आम्हाला चालेल का? नाही. स्वाभिमान आहे आणि साधेपणा आहे हे आम्हाला कसं करता येईल? साधेपणामुळे, गरिबीमुळे अगतिकता आणि अजीजी, दीनता यायला नको. श्रीमंताचा ताठा जावा आणि त्याने नीती आचरावी अशा दोन्ही गोष्टी असाव्यात. शिवगंगा खोऱ्यात तर प्रबोधिनीचा असा कटाक्ष होता की कुठलाही कार्यकर्ता आला की त्याने आधी हरिजन वस्तीत जायचं. म्हणजे गावातील श्रीमंत शेतकऱ्यांकडे, बागाइतदाराकडे जायचंच नाही का? तर अवश्य नंतर जायचं. त्यालाही म्हटलं पाहिजे, तुझ्याकडे इतकी संपत्ती आहे, तिचा गावाला काहीतरी उपयोग होऊ दे. कुठलीही टोकाची भूमिका घ्यायची नाही, समन्वयाची भूमिका घ्यायची. सगळ्या द्वंद्वांचा समन्वय करायचा.

स्थानिक नेतृत्व आणि समुचित तंत्रज्ञान :

तो करताना स्थानिक नेतृत्वाला, तरुण आणि स्त्रियांच्या नेतृत्वाला, प्राधान्य द्यायचं हे तर चांगलंच. पण समजा एखाद्या ठिकाणी तसं नाही घडलं, काही प्रौढ समंजस सदस्य ४०, ५०, ६० वयाचे पण गावाचं नेतृत्व करताना दिसतात, जे स्थानिक आहेत त्यांना आपण महत्त्व देणार. आधुनिकातले आधुनिक आणि समुचित तंत्रज्ञान हे पुनः एक द्वंद्वच आहे. समुचित म्हणजे आधुनिक असू नये असं काही नाही. कदाचित हा प्रश्न सोडवण्यासाठी आधुनिकातील आधुनिक तंत्रज्ञान उपयोगाचं असेल तर चांगलंच आहे.

आम्हाला पाणलोट क्षेत्र विकासाचं काम करायचं आहे. त्या गावातील जमिनीखालील पाणी आम्हाला सॅटेलाईटने रिमोट सेन्सिंगने कळलं तर चांगलंच आहे. गावातल्या कुणी पाणाड्या म्हणाला, ‘माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. इथे पाणी आहे’, तर सॅटेलाईट जोपर्यंत उपलब्ध नाही तोपर्यंत तेही प्रमाण मानून आम्ही काम करू.

तोच दृष्टिकोन पिण्याचे पाणी शुद्ध करण्याच्या फिल्टरबाबत घेता येईल. फिल्टर कुठला वापरायचा? आपलेच एक मित्र एन्सीएल्मध्ये शोधून काढलेले आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार झालेला फिल्टर विकत आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल कलामांनी त्याची प्रशस्ती केली आहे. तेही तंत्रज्ञान आपण वापरू. पण स्थानिक भाताचं तूस जाळून त्यात थोडी वाळू घालून फिल्टर तयार करता आले तर तेही आम्ही तयार करू आणि लोकांना वापरायला शिकवू. गावाच्या प्रत्येक घरात जर हे दिलं तर गावातली गॅस्ट्रोची साथ नाहीशी होऊ शकते हे आपण पाहिलं आहे.

ग्रामविकसनाची आपली ही कार्यशैली गांधीजींचा अभ्यास करून आपण करतो आहोत असं नाही. पण ती त्याला समांतर जाते.

प्रबोधिनीने केलेली कामे :

कुठल्या पद्धतीचे उपक्रम आपण करू शकतो? जशी रचनात्मक कामांची यादी मोठी आहे, तशी प्रबोधिनीने केलेल्या कामांची यादीही मोठी आहे. १९८५ ते २००० पर्यंत कोल्हापूर आणि धुळे जिल्ह्यात गोबर गॅस प्लांटस् आपण शेकडोंच्या संख्येने बांधली. एकूण संख्या हजाराच्या वर आहे. ऊर्जा हा विषय मी इथे घेतलेला नाही. अन्य अनेक विषयांचा ऊहापोह करता येईल.

गेल्या दोन-तीन वर्षांत ज्याच्यावर सातत्याने काम चालू आहे, असे विषय कोणकोणते? पाणी आणि ऊर्जा. हे दोन्ही विषय त्यावेळी गांधीजींना आग्रहाने मांडावेसे वाटले नाहीत. लोकसंख्या कमी होती. एकूण यांत्रिकता फार आलेली नव्हती. त्यामुळे ते प्रश्न गंभीर नव्हते. दुष्काळ, अवर्षण असायचं. पण पाण्याचा प्रश्न सोडवायला पाहिजे अशी तेव्हा काही जाणीव नसावी. आज मात्र गावात काहीही करायचं झालं तरी तेथील पाण्याचे, ऊर्जेचे प्रश्न सोडवावे लागतात. आरोग्य शिक्षण, आरोग्य सेवा आपण करतो, स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि नेतृत्व प्रशिक्षण हेही मोठ्या प्रमाणावर सध्या करतो आहोत. नंतर विविध प्रकारांनी तंत्रज्ञानाचा प्रसार करायला हवा. जैविक तंत्रज्ञानाचा प्रसार प्रकल्प आपण तीन वर्ष साळुंब्रे परिसरात करून पाहिला. त्याबरोबर औपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण दिले पाहिजे हेही आपण करतो. शिवापूर, वेल्हे, शिरवळ, हराळी, साळुंब्रे अशी केंद्रे धरून प्रत्येक गावाच्या आसपासची ५, १०, १५, २० गावे धरून त्यामध्ये अशाप्रकारे ग्रामविकसनाचे उपक्रम चालू आहेत. पण मी म्हटलं तसं महाराष्ट्रात ५०% टक्केच लोकसंख्या गावात आहे. गावापासून देशापर्यंत जायचं म्हटलं तर शहरांमधल्या लोकांच्या मोठमोठ्या समूहांमध्ये काम केले पाहिजे.