विद्या हर्डीकर – सप्रे
ऐतिहासिकतेपासून वास्तवापर्यंत :
जवळ जवळ साडे तीनशे वर्षे झाली! पुण्याहून पंचवीस एक मैलांवरची सह्याद्रीची गावरान कूस. रांगड्या आडदांड पहाडांच्या पायांशी वसलेली मूठ मूठ झोपड्यांची खेडी. कोरभर भाकरी आणि कांदा हे तिथले ऐश्वर्य! सुलतानी जुलुमामुळे हैराण झालेली तिथली मावळी माणसं. त्यांच्या मनाच्या तळापर्यंत जाण्याचं धाडस केलं ते एका शिवरायानं आणि एका रामदासानं ! ‘आनंदवन भुवने उभवू या येथे’ अशा ध्यासानं मग ही मावळी मंडळी उभी राहिली आणि त्यांनी थेट दिल्लीपर्यंत घबराट निर्माण केली !
जवळ जवळ चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सिंहगडाच्या माथ्यावर एक तडफदार तरुण उभा होता. त्याचं नाव आप्पा पेंडसे ! तीनशे वर्षांत उलटलेले पावसाळे मावळच्या मूठ मूठ झोपड्यांच्या खेड्यांपर्यंत पोहोचलेसे वाटत नव्हते. तिथले कांदा भाकरीच्या पलीकडे ऐश्वर्य वाढलेले दिसत नव्हते. महाराष्ट्र परिवहन मंडळाची बस दिसत होती. ‘दोन किंवा तीन पुरेत’ चा लाल त्रिकोण पोहोचला होता. गावपुढाऱ्यांच्या जीपा तिथे पोहोचल्या होत्या. हातभट्ट्या पोहोचल्या होत्या. गरीब मजुरांच्या पैशांवर फटफट्या उडवणारे गावगुड पोहोचले होते. पोहोचली नव्हती ती माणुसकी!
त्या तरुणाच्या मनात संकल्प उमटले, ‘हो उदंड ‘ हातात येथे नीतिमंत श्रीमंती । या घराघरातून वसो क्षेम सुख शांती ।। आनंद भुवने उभवू या येथे. पैसा, सत्ता, माणसं यातलं काही नव्हतं. पण रक्तात नवी सळसळ आणि मनात संकल्पाचं पाथेय घेऊन तो तरुण कल्याण दरवाज्यानं पाय उतार होऊ लागला…
त्यानंतरच्या पंचवीस वर्षांत शिवगंगा आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांतल्या दोनशे खेड्यांच्या विकासाचं काम उभं राहिलं. ते काम उभं रहात असलेलं पाहता-पाहता मी लहानाची मोठी झाले. त्या कामाचा लहानसा भाग उचलतांनाच मी त्या भव्य स्वप्नाचे काही कवडसे पाहिले, आपलेसे केले आणि त्या स्वप्नातल्या दगडमातीचा जिव्हाळा घेऊन अमेरिकेत आले.
स्वप्नाचा ध्यास :
माझं स्वप्न अमेरिकेतल्या मराठी लोकांना सांगावं आणि त्यांच्याही डोळ्यांत फुलवावं, असं वाटत होतं. तेव्हा संगणकाचं महाजाल नव्हतं. गुगलवर जाऊन माहिती काढण्याची सुविधा नव्हती.
‘आपल्या भारत देशाचं रूप पालटायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी लढायचं’ हे पक्क झालं. म्हणजे आता नक्की काय करायचं ते कोणाला माहिती ? मग जस जशा ओळखी होत होत्या, तसा मी आसपासच्या लोकांशी हा विषय काढू लागले. चारूला, माझ्या शेजारणीला विचारलं. ती म्हणाली, ‘तू एक काम कर. माझ्याकडे हा एक फोन नंबर आहे यशवंत कानिटकरांचा. ते अमेरिकेत देणग्या मिळवतात आणि महाराष्ट्रातल्या चांगल्या संस्थांना पाठवतात, ते तुला मार्गदर्शन करतील.’
श्री. यशवंत कानिटकर यांनी ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ ही संस्था सुरू केली होती. त्यांना माझं स्वप्न समजलं. त्यांनी काही सूचना केल्या आणि म्हणाले, ‘इथे तुम्हाला लोकशिक्षण बरंच करावं लागेल. पण घेतला वसा टाकू नका.’ त्यांच्याच विनंतीवरून मी महाराष्ट्र फाउंडेशनच्या कार्यकारिणीवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांची नव्या कल्पनांबद्दलची स्वागतशीलता, ध्येयवाद, दूरदृष्टी यातून मला पुष्कळच शिकायला मिळालं. कार्यकारिणीवर आणि नंतर वितरण समितीवर काम केल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक सेवाकार्यांची माहिती मिळाली.
खेडे दत्तक योजनेची कल्पना :
दोन तीन वर्षाच्या चिकाटीनंतर १९८६ मध्ये मी प्रथम एका मराठी मंडळासमोर एका गावाच्या विकासाची कल्पना मांडली – ‘खेडे दत्तक योजना’. इथे प्रत्येक मराठी मंडळानं एक खेडं दत्तक घेतलं तर महाराष्ट्रातल्या ४० खेड्यांचे किमान गरजांचे काही प्रश्न सुटतील, असं छोटंसं स्वप्नरंजन मी लोकांपुढे मांडलं. एकता मासिकामध्ये ‘खेडे दत्तक योजना’ हा लेख लिहून माझी कल्पना मी आणखी तीन-चारशे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अखेर आणखी तीन वर्षांच्या ‘लोकशिक्षणा’ नंतर १९८९ मध्ये माझं हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली.
निधी जमवायचा असेल तर आपली गर्दी पाहिजे, हे पहिल्या दोन अधिवेशनांचेवेळी लक्षात आले होते. त्यामुळे कोणत्याही मराठी कार्यक्रमांवर अवलंबून न राहता महाराष्ट्र फाऊंडेशनसाठी निधिसंकलनाचा स्वतंत्र कार्यक्रम करावा असं ठरलं. एक चांगला मनोरंजनाचा कार्यक्रम, सुग्रास भोजन आणि लोकांना यावंसं वाटेल अशी वातावरणनिर्मिती असं काहीसं स्वरूप. कार्यक्रमाच्या मध्यंतरात सेवाकार्याची माहिती सांगून, खेडे दत्तक योजनेची माहिती सांगून देणग्यांसाठी आवाहन केल्यावर देणग्यांची आश्वासने आणि नंतर त्याचा पाठपुरावा करून प्रत्यक्षात पैसे अशा या निधिसंकलन कार्यक्रमाची योजना झाली.
गावाची निवड :
कार्यकारिणीतल्या काही लोकांना ‘भारतातलं खेडं’ हा प्रकार सर्वस्वी अज्ञात होता. अमेरिकेतून पैसे पाठवायचे एवढे मान्य होते. पण ग्रामविकसनाचं काम करण्यासाठी महाराष्ट्रातीलच सामाजिक कार्य करणारी संस्था हवी. त्या संस्थेचे खेड्याशी आणि अमेरिकेतल्या फाऊंडेशनशी ग्रह जुळायला हवेत. अशा बऱ्याच अटीतटीच्या घडामोडींनंतर शिवगंगा खोऱ्यातलं ‘सणसवाडी’ हे ५०० घरांचं गाव निवडलं आणि ज्ञान प्रबोधिनीने आपले कार्यकर्ते आणि यंत्रणा यांचं योगदान करून या ऐतिहासिक प्रयोगाला प्रारंभ झाला.
ज्या प्रतिसादाची अपेक्षा मी १९८२ मध्ये रंगमंचावर केली तो प्रतिसाद मिळायला १९८९ साल उजाडलं होतं ! रंगमंचावर विठ्ठल रखुमाईच्या भव्य मूर्ती होत्या. त्या पंढरीच्या साक्षीनं माझी छोटीशी ओंजळ सुवर्णाची झाली आणि एका व्रतस्थ धुंदीनं मला भारून टाकलं. सिंहगडाच्या माथ्यावरून कल्याणकडे पाहताना आप्पांना तशाच धुंदीनं भारून टाकलं होतं का? त्या व्रतस्थ योग्याने माझ्या मस्तकावर ठेवलेल्या हाताचा मनाला स्पर्श झाला. तो माझ्या ‘दत्तक खेड्याच्या’ व्रताचा आरंभ होता. कार्यक्रम संपल्यावर मला रात्रभर झोप लागली नाही आणि त्या कार्यक्रमाचं वर्णन करणारी लांबलचक पत्रं मी पुण्याला प्रबोधिनीत लिहिली होती, ती आठवण अजून ताजी आहे.
दोन जगांमधील फरक :
ज्ञान प्रबोधिनीचे कार्यकर्ते सणसवाडीच्या योजनांना आकार देऊ लागले. त्यांचा ग्रामविकसनाचा अनुभव दांडगा असला तरी फाऊं डे शनच्या कार्यकारिणीच्या अपेक्षा कॉर्पोरेट ऑफिससारख्या होत्या. त्यांचे वेगाचे आडाखे अमेरिकन होते. भारतात पत्र पाठवलं की एखाद्या दिवसात फॅक्स यावा अशी अपेक्षा ते करत. दर तीन महिन्यांनी कामाचा अहवाल हवा! आर्थिक अहवाल हवा! बंधारा घातला की त्याची जाडी किती इंच होती असे तपशील अपेक्षित असत. प्रत्यक्ष कामाचं स्वरूप आणि आवाका समजून घ्यायला मात्र आमच्या फास्ट फॉरवर्ड अमेरिकन आयुष्यात कोणाला फुरसत नसे !
पुण्याहून सोळा मैल जायला दोन तास लागतात. तिथे अमेरिकेसारखं १६ मिनिटात जाता येत नाही. पैसा टाकला की पटकन शाळेची भिंत उभी राहात नाही. भराभर विहिरी खोदून, धरणं बांधून गावाचं रूप बदलता येत नाही. कारण लोकांच्या मनाची मशागत करण्याचं काम चिकाटीचं आणि दुस्तर असतं. कोणत्याही चिरस्थायी विकासाच्या कामाला यश येण्यासाठी गावकऱ्यांकडून सहकार्य मिळवणं सर्वात महत्त्वाचं आणि तितकंच अवघड ! या सर्व गोष्टी फाऊंडेशनच्या कार्यकारिणीला समजावून सांगणं हे सणसवाडीच्या विकासापेक्षा जिकिरीचं होतं.
कामाला शुभारंभ :
महाराष्ट्र फाऊंडेशनने १५-२० हजार डॉलर्स दिले. तेही हप्त्यानं. ते गावच्या अपेक्षित सर्वांगीण विकासाला अपुरे होते! शिवाय केवळ परदेशी पैशांवर अवलंबून न राहता काम करता आलं पाहिजे यावर ज्ञान प्रबोधिनीचा कटाक्ष होता. लोकांनाही ऐतखाऊपणाची सवय लावून चालणार नव्हतं. त्यामुळे फाऊंडेशनने पैसे दिले तरी गावाने श्रमदान करावं, काय सुधारणा हव्यात हे गावानं ठरवावं, यावर प्रबोधिनीने भर दिला. त्यासाठी गावकऱ्यांची समिती ठरवली. गावकीचं राजकारण, लोकांच्या जुन्या सवयी, कामाचा वेग आणि पांवसाळे अशा अनेक अडचणींतून वाट काढत काम चाललं होतं.
दुर्दैवाने, या प्रकल्पाची प्रगती पाहण्यापूर्वीच यशवंत कानिटकर निधन पावले. गावाने या प्रयोगाला कै. कानिटकरांच्या नावाची पाटी लावली. त्यांच्या पत्नी विजयाबाई सणसवाडीला जाऊन थोडे दिवस राहिल्या गावाला हुरूप आला.
सणसवाडी भेट :
१९९२ मध्ये मी आणि माझा नवरा अशोक यांनी सणसवाडीला अचानक भेट दिली. पूर्वीच गाव आणि आताचं यात खूप फरक जाणवत होता. देवळाबाहेर महाराष्ट्र फाऊंडेशनची पाटी होती. ‘ही पाटी कसली हो? ‘असा प्रश्न विचारल्यावर त्या गृहस्थांनी मला सगळी योजना व्यवस्थित समजावून सांगितली एक-दोघांनी गावातल्या विहिरी दाखवल्या. बंधारा दाखवला. पूर्वी बायकांना पाच मैलांवरून पाणी आणावं लागे. आता पाण्याचा प्रश्न कमी झाला होता. प्राथमिक शाळेचं काम सुरू होतं. दहा घरातल्या परसात संडास आले होते. काही घरांत धूरविरहित चुली दिसत होत्या. एका घरात बाईनी चूल दाखवली. मी छायाचित्रण करत होते. पण माझ्या हातातला तळहाताएवढा कॅमेरा त्यांनी पूर्वी पाहिला नसल्याने ते त्यांना समजलं नाही. मला त्यांनी धीटपणे, मोकळेपणे माहिती सांगितली.
मग गावाची मंदिरात सभा झाली. तेव्हा या पावण्याबाई कोण? याचा मी उलगडा केला. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या बाई म्हटल्यावर लोकांना आनंद वाटला… ‘घार आकाशात असली तरी तिचं लक्ष पिलाकडे असतं ना? तसं तुमचं आमच्याकडे लक्ष असू दे…’ अशा शब्दांत एका म्हातारबाबांनी फाऊंडेशनकडून गावाच्या काय अपेक्षा आहेत ते अगदी मार्मिकपणे सांगितलं!
सणसवाडीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढायला या मदतीचा खूप उपयोग झाला. आजूबाजूच्या गावकऱ्यांचं या कामाकडे लक्ष वेधलं आणि त्यांनी त्यापासून स्फूर्ती घेतली. प्रत्येक लहान-मोठ्या प्रकल्पातून जनजागृती झाली.
दत्तक योजनेचा दुसरा प्रयोग :
सणसवाडीच्या कामाच्या स्लाईडस दाखवून मी तिकडे सॅन होजे व लॉस एन्जेलिसच्या लोकांना आवाहने केली. त्यातून सॅन होजेच्या बे एरिया मंडळाने लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान ‘चिखलगाव’ दत्तक घ्यावे असे ठरवले. योगायोगाने १९९३ च्या कार्यकारिणीवर कै. यशवंत कानिटकरांचे चिरंजीव राजन कानिटकर होते. चिखलगावाचे काम श्री. राजा व रेणू दांडेकर करीत आहेत. न्यू जर्सीच्या सविता गोखले यांनी त्यांना अमेरिकेस बोलावले. त्यांचा छोटा कार्यक्रम आम्ही लॉस एन्जेलिसला आमच्या घरीच केला आणि दहाबारा मराठी मित्रांनी तिथल्या तिथे चर्चा करून मुलींच्या वसतिगृहाच्या प्रकल्पाचे पैसे उभे केले !
१९८२ साली मी लोकांना प्रथम आवाहन केले तेव्हा मार्ग फार दुष्कर वाटला. तो आता सोपा झाला होता. स्वप्न दृष्टीपथात येण्याची चिन्हं दिसू लगली. प्रसंगी बिनपगारी रजा घेऊन, प्रसंगी व्यक्तिगत प्रश्न बाजूला ठेवून, प्रसंगी नातेवाईकांचा रोष ओढवून चालू ठेवलेल्या माझ्या ‘दत्तक खेड्याच्या’ व्रताचे सार्थक झाल्याचे समाधान मला त्या दिवशी वाटले.
व्रताचरणाची पुण्याई :
माझं ‘दत्तक गावाचं’ स्वप्न असं विशाल आहे. समोर दिसतो एकच तारा तसा या स्वप्नाचा विचार आमच्या दोघांच्या मनांत सतत असतो. त्याबद्दल आम्ही जिथे जातो तिथे बोलतो. आम्ही ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हाही मराठी लोकांसमोर ही कल्पना मांडली. मेलबर्नच्या त्या मित्रमंडळींनी त्या वर्षीच्या दिवाळीला माझ्याकडे एक चेक या कामासाठी पाठवला! एवढंच नव्हे तर डॉ. जयंत बापट यांचेसारखे मित्र त्यानंतरही प्रकल्पांना पैसे पाठवत आहेत.
असाच एकदा जर्मनीतून एका जर्मन गृहस्थांचा माझ्या नावे भला मोठ्ठा चेक आला. बरोबर दोन ओळीत आशय असा, ‘मी डॉ. पेंडसे यांना ओळखतो, तुम्ही काहीतरी खेड्याचं काम करता असं समजलं; त्यासाठी हे पैसे!’ एका नाव, गाव, देश, भाषा सर्वच बाबतीत परक्या अज्ञात माणसाने एवढ्या विश्वासाने माझ्या नावे चेक पाठवला. मला सर्व भरून पावलं ! सणसवाडीचं जीपचं काम झालं.
‘जनता जनार्दन’ नावाचं परमेश्वराचं एक रूप मला ठाऊक होतं. हे दुसरं रूप पहायला मिळालं.
आत्मचिंतनाचे बोल :
कोणतंही चांगलं काम केवळ सदिच्छा, केवळ पैसे किंवा केवळ कार्यकर्ते यातून उभं राहू शकत नाही. त्या सर्वांचा मेळ जमावा लागतो आणि मग ‘जनता जनार्दन’ म्हणजे ज्यांच्यासाठी हे काम करायचं त्यांची कृपाही लागते. थोडक्यात, कोणत्याही ग्राम विकासाची योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी तीन महत्त्वाचे बिंदू लागतात.
- ज्या गावासाठी विकास योजना राबवायच्या, त्या गावातील गावकऱ्यांची इच्छा आणि सहकार्य.
- गावाच्या विकासासाठी निधी जमवणारे आणि देणारे देणगीदार. (गावातले आणि गावाबाहेरचे)
- विकास योजना यशस्वी करण्यासाठी गाव आणि देणगीदार यांचा समन्वय घालणारे, दोहोंबरोबर काम करणारे स्वयंसेवयक किंवा स्वयंसेवी संस्था.
या सर्वांना या खेड्यांसाठी हातात हात घालून काम करावं लागतं.
सणसवाडीची दुसरी भेट :
त्यानंतर पुन्हा मी १९९८ मध्ये सणसवाडीत आले. फाऊंडेशनची पाटी तीच होती. पण गावाचं स्वरूप आणखी बदलेलं होतं. गावाचं नाव ‘नरवीर तानाजी नगर’ असं गावकऱ्यांनी ठरवलं आहे. गेल्या पाच वर्षांत आणखी दोन विहिरी आणि एक बंधारा झाला. शाळा सुबकपणे उभी राहिली. मधल्या मोकळ्या जागी व्यायामशाळा आणि आंगणवाडीच्या टुमदार इमारती उभ्या राहिल्या. ग्रामीण विद्यार्थी-विकास योजना सुरू झाली. भूकंपात गावातल्या लोकांनी लातूरला जाऊन मदत केली. गावात महिलांची बचतपेढी सुरू झाली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावर्षीच्या गावाच्या सरपंचही एक महिला होत्या.
मा. अण्णा हजारेंच्या पंक्तीचा अलभ्य लाभ :
आम्ही गेलो त्या दिवशी मा. आण्णा हजारे गावाला भेट देणार होते. दुपारच्या रणरणत्या उन्हात सगळा गाव मंदिरापाशी जमा झाला. सगळेजण आतुरतेने आण्णा हजारेंची वाट पाहू लागले. ‘अण्णा हजारे’ झपझप चालत आले. त्यांचं आयुष्य म्हणजे एक जिवंत व्रतोत्सव आहे. राळेगणसिद्धीला प्रथम त्यांनी आदर्श गावाचा प्रयोग केला आणि ग्रामविकसनाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या आदर्श गावाच्या कल्पनेतलंच हे नरवीर तानाजी नगर, म्हणून ते मुद्दाम गावात आले होते. आण्णांचं मंदिरात भाषण झालं. गावाच्या भाषेत, तुकाराम, चोख्याचे अभंग पेरत ते बघता बघता लोकांच्या मनात शिरले. गावकऱ्यांशी चर्चा करून दुधाच्या व्यवसायाची योजना तयार झाली. मग गावचे एक म्होरके पुढे आले. त्यांनी माझी ओळख करून दिली आणि गाव दत्तक योजनेची माहिती आण्णांना सांगितली. सरपंचबाईंनी आण्णांना आणि मला नारळ दिला.
अंगणवाडीच्या खोलीवजा इमारतीत आमची पंगत मांडली होती. पत्रावळीवर भात, कालवण आणि द्रोणात गव्हाची खीर असा बेत!. आण्णांबरोबर पंगतीला बसायची आणि गप्पा मारण्याची संधी मिळणं हा माझा मोठाच सन्मान मला वाटला. गेल्या दहा वर्षांचा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर सरकत होता… गेली दहा वर्षं मीही या गावाबरोबर स्वप्नांच्या साक्षीने प्रवास केला होता.
व्रताची सांगता :
ना. धों. महानोरांच्या शब्दात सांगायचं तर ।
‘या गावाने लळा लावला असा की
परस्परांच्या सुखदुःखांशी हसलो रडलो
आता तर जीवच हा अवघा असा वरखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो ‘
……….असा तो प्रवास. या गावाबद्दलची रेखाटनं मी अमेरिकेत केली. आप्पा पेंडसे यांची भव्य स्वप्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला. तो ध्येयप्रवास तेव्हा आणि तिथे सुरू झाला. त्याचा हा एक टप्पा आज गाठला होता. आदर्श गावाचे मेरूदंड आण्णा हजारे, त्यांचं बोट धरून निघालेले प्रबोधिनीचे माझ्या पिढीतील कार्यकर्ते आणि आमच्या मागे येणारे नवीन युवक-युवती, अशा तीन पिढ्या एका पंगतीला बसून ‘सहना… ववतु’ म्हणत होत्या. मला तो दिवस फार ऐतिहासिक वाटला… १९८९ मध्ये पंढरीच्या साक्षीने माझे इवले हात सोन्याचे झाले, त्या दिवशी वाटलं होतं हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस. पण पंगतीचा दिवस तर त्याहीपेक्षा आनंदाचा होता, कारण ती एका व्रताची सांगता होती.
*******************************************************************************************************************