सौर दिव्यांचा प्रचार
विवेक गिरिधारी
पार्श्वभूमी :
संपूर्ण महाराष्ट्रात वर्ष २००८ व २००९ मध्ये विजेच्या भारनियमनाने उच्चांक गाठला होता. मुंबई-पुण्यात जरी भारनियमन नसले तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मात्र किमान ८ तास ते कमाल १२ तास इतके जीवघेणे भारनियमन होत होते. एकीकडे ग्रामीण जनता अनिर्बंध व निरंकुश भारनियमनाला वैतागली होती तर दुसरीकडे पुढारी मात्र जनतेला स्वावलंबी व भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे दिवास्वप्न दाखवीत होते. विदर्भ-मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात भारनियमनाची परिस्थिती बरी होती. पुणे जिल्ह्यातही ग्रामीण भागात ८ तास सलगपणे तर काही ठिकाणी दोन वेळा विभागून भारनियमन चालूच होते.
याच कालावधीत प्रबोधिनीचे भोर व वेल्हे तालुक्यात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम वेगात सुरू होते. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचा या दरम्यान गावात अनेकदा सलगपणे महिनाभर मुक्काम होत असे. यावेळी भारनियमनाची तीव्रता व रॉकेल वेळेवर न मिळण्यामुळे होणारे लोकांचे हाल लक्षात आले. रॉकेलचा अपुरा कोटा हे देखील एक प्रमुख कारण होते. शासनाने प्रति कुटुंब ठरवून दिलेला अडीच लिटरचा कोटा फारच तोकडा पडत होता. त्यामुळे प्रत्येकाला कुटुंबातील संख्येनुसार किमान एक ते दीड लिटर रॉकेल हे खुल्या दराने किमान ३० रुपये प्रति लिटर या दराने खरेदी करावे लागे. अंशदान प्राप्त रॉकेलचा दर फक्त रु.१५ प्रति लिटर इतका आहे. याशिवाय गावातल्या रॉकेलला पाय फुटून त्याचा शहरातील डीजेलमध्ये भेसळ करणाऱ्या माफियांपर्यंतचा प्रवास तर जगजाहीरच आहे.
योगायोगाने यादरम्यान चालू असणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण जागृती कार्यक्रमांतर्गत पाच विविध प्रकारच्या सौर दिव्यांची प्रात्यक्षिकांसाठी खरेदी करण्यात आली. हे दिवे वेल्ह्यातील कोळवडी गावातील ग्रामस्थांना दाखविण्यात आले. भोर तालुक्यातील करंदी गावातही हे दिवे ग्रामस्थांच्या बैठकीत दाखविण्यात आले. याबाबत ग्रामस्थांशी एकत्रित चर्चा करताना असे जाणवले, की जर भारनियमनाला सक्षम पर्याय मिळाला तर लोकांना तो नक्की हवा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी लोकांची आर्थिक भार उचलण्याची तयारी आहे. कोळवडी या गावात याबाबत अनेक ग्रामस्थांशी वेळोवेळी चर्चा झाली व पाणलोटाच्या बैठकीत चक्क संपूर्ण पैसे भरून सौर दिवे खरेदी करणाऱ्या पहिल्या १० जणांची यादीदेखील तयार झाली.
जेव्हा सौर दिव्याच्या कंपनीकडे याबाबत मागणी नोंदवली तेव्हा त्यांनी किमान २४ दिवे घेण्याची प्रेमळ अट घातली. आत्तापर्यंत ग्रामस्थांशी वेळोवेळी चर्चा झाल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावला होताच, त्यामुळे धाडस करून पूर्ण २४ दिव्यांची मागणी नोंदवली. दिल्लीवरून नगरमार्गे हे दिवे पुण्यात पोहोचले. आलेल्या दिव्यांचे आठवडाभरात वाटप होऊन महिनाभरात दिव्यांच्या रकमेची संपूर्ण वसुलीही झाली. पाठोपाठ नवीन दिव्यांची मागणी यादीही तयार झाली. प्रश्न निर्माण झाला तो ग्रामस्थांकडून रक्कम परत येईपर्यंत दिव्यांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या हातउचलीचा. दरवर्षी मदत करणाऱ्या प्रबोधिनीच्या १९९९ च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवला. त्यांनी वेळोवेळी देऊ केलेल्या मदतीतून उभी राहिलेली रचना आजतागायत चालू आहे.
सौर दिवे : रॉकेलच्या दिव्याला एक सक्षम पर्याय :
सुरुवातीला दिवे दिलेल्या कुटुंबातून आढावा घेतला तेव्हा असे लक्षात आले की सौर दिव्यांमुळे लोकांच्या घरातील रॉकेलचा दिवा त्यांनी प्रथम हद्दपार केला. त्यामुळे दिव्यासाठी लागणारे किमान दीड ते दोन लीटर रॉकेल वाचले. रॉकेलच्या खुल्या बाजारभावातील किमतीनुसार लोकांचे सुमारे दरमहा ५० रुपये वाचले. याशिवाय खुल्या बाजारातील रॉकेल मिळण्यासाठी रेशन दुकानदाराची खुशामत करणेही वाचले. आधीच हक्काचे रॉकेल वेळेवर मिळण्याची मारामार त्यात जास्तीचे रॉकेल मिळणे मुश्कीलच! या तुलनेत सौर दिव्याचे बटन दाबले की तो विजेच्या दिव्यासारखा चालू, याचे ग्रामीण महिला-पुरुषांना वाटणारे अप्रूपही काही औरच! याशिवाय रॉकेलच्या गुदमरवणाऱ्या धुरापासून होणारी सुटका वेगळीच. है सर्व लक्षात आल्यामुळेच कोळवडीतील एका महिला बचत गटाने एकदम एक डझन दिवे घेतले अन् पुढच्या महिन्यात एक रकमी पैसेसुद्धा दिले. यातून हळूहळू गावातील सौर दिव्यांची संख्या वाढू लागली. भारनियमनाच्या काळात तर हे दिवे उठून दिसू लागले. सौर दिव्यांचे अस्तित्व हेच जणू प्रचाराचे कारण ठरले. सौर दिवे वापरणारे ग्रामस्थ फुशारकीने आपापल्या शैलीत इतरांना दिव्याची माहिती सांगू लागले, जणू काही सौर दिव्याचा शोध यांनीच लावला! सौर दिवे या शहरी तोंडवळा असणाऱ्या शब्दाचे त्यांनी सूर्य दिवे असे नेमक्या ग्रामीण शब्दात रूपांतर करून टाकले होते. सोलर पॅनेल चे भाषांतर सूर्य तबकडी असे केले.
सौर दिव्याची पदोपदी जाणवणारी उपयुक्तता हे खरे तर या पाठीमागचे कारण होते. अंधाराच्या वेळेस महिलांना स्वयंपाक करताना, शाळकरी मुलांना अभ्यास करताना तर पुरुषांना पहाटे व संध्याकाळी दुधाच्या धारा काढताना याचा होणारा उपयोग जाणवत होता. मोठ्या सौर दिव्यांचा तर काही ग्रामस्थांनी भात झोडणी व भात मळणीसाठीही उपयोग केला. यासाठी पारंपरिक टेंभ्यांना त्यांनी फाटा दिला. सौर दिव्याचा एवढा दररोज वापर करूनही कुठेही त्याचे बिल भरावयाचे नाही याची ग्रामस्थांना गंमत वाटत असे. सौर दिव्याचा दररोजचा फुकट वापर हा ग्रामस्थांना सुखावणारा होता. यातून एक एक करीत सौर दिव्यांची मागणी वाढत गेली. कोळवडीसह आता वेल्हे तालुक्यातील अन्य गावात सौर दिवे पोहचू लागले. भोर तालुक्यातील करंदी गावातही त्याचा मोठा प्रसार झाला. वसुलीसाठी ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांचा अंत पाहिला असला तरी पूर्ण रकमेत लोकांनी दिवे घेतले हे खरोखरीच विशेष होते !
सौर दिव्यांची निवड :
कमी किमतीत व सर्वांना परवडेल, आपल्या आवाक्याच्या टप्प्यात वाटतील अशा सौर दिव्यांची निवड ही देखील महत्त्वाची गोष्ट होती. यासाठी पुण्यात विविध निमित्तांनी भरणाऱ्या अनेकविध प्रदर्शनांचा धांडोळा प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यातून गावातील प्रत्येकाला परवडू शकेल व प्रामुख्याने जिरायत शेतकरी डोळ्यापुढे ठेऊन ५०० ते ७५० रुपये किमतीचा प्राथमिक टप्प्यातील सौर दिवा निवडण्यावर भर दिला. दुसरा १५०० ते २००० रुपये किमतीचा सौर दिवा हा आर्थिकदृष्ट्या मध्यमस्थिती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवडण्याचे ठरवले. यात गावातील एकूण लोकसंख्येच्या ३० ते ३५ टक्के लक्ष्यगट डोळ्यापुढे ठेवण्यात आला होता. वा यासाठी बागायती शेतकरी व दुधाचा जोडधंदा असणारा शेतकरी गृहीत धरला होता. अशा तन्हेने प्रामुख्याने दोन प्रकारच्या सौर दिव्यांची निवड करण्यात आली. आकर्षकता, गुणवत्ता व वॉरंटी दरम्यान सेवा पुरवण्याची हमी या निकषांवर प्रत्यक्ष दोन कंपन्यांचे दिवे निवडण्यात आले. वॉरंटी पश्चात सेवेसाठी मात्र अजून तपशिलात अभ्यासाची व प्रशिक्षित यंत्रणा उभारणे बाकी आहे.
वेळेस मुलांना याकाळी जाणवत वस्थांनी केला. ना. सौर त्याचे वाटत पर हा करीत आता पोहचू त्याचा थांनी कमेत !
यांची यात नांचा तून पाने
아 देवा चे ते
विजया सौर प्रकल्प व पर्सिस्टंट फाऊंडेशन प्रकल्प :
सुरुवातीच्या टप्प्यात कोणतेही अंशदान (सबसिडी) न देता सौर दिव्यांचा प्रसार करण्यात आला. त्याला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन या विषयाची गरज अधोरेखित झाली. तरीपण मागास व अविकसित भागात मात्र सौर दिव्यांच्या या किमतीही लोकांना जास्त वाटत होत्या. वेल्हे तालुक्यातील डोंगराळ भागातील गावात लोकांना दिवे हे कमी किमतीत अपेक्षित होते. या परिसरात कोणतीही उत्पन्नाची साधने नाहीत. पावसावर अवलंबून असलेली भातशेती हेच काय ते उत्पन्नाचे एकमेव साधन! दळणवळणाच्या अपुऱ्या साधनांमुळे दूध व्यवसायासही फारशी संधी नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के सवलतीत सौर दिवे देण्याचे ठरविण्यात आले. प्रामुख्याने धनगर समाजातील लोकांना याचा लाभ झाला. या धनगर कुटुंबांपर्यंत तर शासकीय वीज अधिकृतपणे पोहोचलेलीच नव्हती ! सवलतीच्या दरात सौर दिवे देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाह्य अनुदानाची गरज होती. यासाठी नंदा काळे फाऊंडेशन व पर्सिस्टंट फाऊंडेशन यांची मोठी मदत झाली. सौ. नंदा काळे यांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने देऊ केलेल्या देणगीतून ‘विजया सौर प्रकल्प’ या नावाने महिला बचत गटांच्या माध्यमातून सौर दिवे सवलतीच्या दरात देण्यात आले. यास उत्तम प्रतिसाद मिळाला.
स्वयंसेवी संस्थांमार्फत अन्य जिल्ह्यात प्रसार :
वेगवेगळ्या निमित्ताने प्रबोधिनीच्या संपर्कात अनेक ठिकाणच्या स्वयंसेवी संस्था येत असतात. प्रबोधिनी ही नवनवीन प्रयोग करून बघणारी संस्था म्हणूनही अनेकांना परिचित असल्यामुळे अशा संस्था मधूनमधून प्रबोधिनीच्या संपर्कात असतात. अशांपैकी काही संस्थांनी सवलतीच्या दरात सौर दिवे गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याची तयारी दर्शविली व पन्नास टक्के लोकसहभाग गोळा करण्याची जबाबदारी प्रबोधिनीने स्वीकारली. अशा काही निवडक संस्थांद्वारे विदर्भातील यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यातील बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबांपर्यंत सौर दिवे सवलतीत देण्यात आले. लातूर जिल्ह्यातील मातंग समाजातील शेतमजूर गरीब कुटुंबांपर्यंत तेथील स्थानिक स्वयंसेवी संस्थेमार्फत सौर दिवे सवलतीच्या दरात देण्यात आले.
विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण भागात भारनियमनाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे तिथे सौर दिव्यांची खऱ्या अर्थाने गरज होती. छत्तीसगड प्रांतातील बस्तर परिसरातील दंतेवाडा जिल्ह्यात विजेपासून वंचित असणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. या परिसरातही गरजू कुटुंबांपर्यंत स्थानिक स्वयंसेवी संस्थेमार्फत सवलतीच्या दरात सौर दिवे देण्यात आले. पन्नास टक्के सवलतीच्या दरात सौर दिवे देण्यासाठीचा आर्थिक भार पुण्यातील कृतज्ञता ट्रस्ट या संस्थेने उचलला आहे. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा मदत देऊ केली होती.
सौर पॅनेल निर्मितीचा नवीन प्रयोग :
जपानमधील श्री. ताजिमा तोशिओ यांचा मार्च २०१२ च्या सुमारास प्रबोधिनीचे एक हितचिंतक श्री. अशोक सराफ यांच्या माध्यमातून परिचय झाला. श्री. तोशिओ हे जपानमधील सामाजिक शास्त्रे शिकविणारे सेवानिवृत्त शिक्षक असून ते गेली २-३ वर्षे दरवर्षी काही महिन्यांसाठी भारतात येत असतात. पुण्यातील झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधणे हे त्यांचे आवडीचे काम. पुण्यातील खेळघर संस्थेमार्फत ते विविध नागरी वस्त्यांशी परिचित झाले होते.
श्री. तोशिओ जपानमध्ये सोलर लॅमिनेटर यंत्राच्या मदतीने सौर पॅनेल बनविण्याचे प्रशिक्षण देत असत. भारतात अशा स्वरूपाचे प्रशिक्षण देण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते योग्य संस्थेच्या शोधात होते. त्यांनी शिवापूर येथील कृषी तांत्रिक विद्यालयाला भेट दिली, तसेच वेल्हे तालुक्यातील मांगदरी परिसरातील ग्रामीण विकासाचे काम बघितले. त्यानंतर त्यांनी प्रबोधिनीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले.
श्री. तोशिओ यांनी सोलर लॅमिनेटर यंत्र प्रबोधिनीस उपलब्ध करून दिले. हे यंत्र जपान वरून आणविण्याचा खर्चच मुळी एक लक्ष रुपये आला. बऱ्याच प्रशासकीय अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर अखेर हे यंत्र प्रबोधिनीत जानेवारी २०१३ मध्ये दाखल झाले. या यंत्राच्या आधारे जास्तीत जास्त ४० वॅट क्षमतेचे सौर पॅनेल बनविणे शक्य होते.
यंत्र पुण्यात आल्यावर तीन प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. यात सौर पॅनेल बनविण्याचे प्रशिक्षण श्री. ताजिमा तोशिओ यांनी स्वतः दिले. त्यात ३० व्यक्तींनी सहभाग घेतला. ज्येष्ठ सौरऊर्जा तज्ज्ञ व ज्ञान प्रबोधिनी शिवप्रदेश न्यासाचे अध्यक्ष श्री. सुरेश रानडे यांनीही या वर्गास भेट दिली. पुढील टप्प्यात घरगुती उजेडासाठी २ व ३ वॅट क्षमतेचे छोटे सौर पॅनेल बनविण्याचे प्रशिक्षण योजण्यात येणार आहे. याच प्रकल्पाचा भाग म्हणून लक्ष्मीनगर नागरीवस्ती मधील दोन युवतींना विशेष प्रशिक्षणासाठी तीन आठवडे जपानला पाठविण्यात येणार आहे.