पाणलोट क्षेत्र विकासातील विविध उपचार

विवेक गिरिधारी

गावातील ओढ्यास ज्या क्षेत्रातील पाणी गोळा होऊन मिळते त्या क्षेत्रास त्या ओढ्याचे पाणलोट क्षेत्र म्हणतात. गावातील ओढ्याचे पाणलोट क्षेत्र कधी गावापुरते मर्यादित असू शकते तर एखाद्या नदीच्या पाणलोट क्षेत्रात नदीखोऱ्यातील अनेक गावे असू शकतात. प्रबोधिनीने पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर आणि वेल्हे तालुक्यांतील शिवगंगा व गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यातील विविध गावे टप्प्याटप्प्यात पाणलोट क्षेत्र विकासासाठी निवडून तेथील कामे पूर्ण केली आहेत.

पाणलोट क्षेत्र विकासाची गरज :

पाणलोट क्षेत्र विकासात माती अडविण्याची व पाणी साठविण्याची विविध कामे एकत्रितपणे केली जातात. सुरुवातीला जमिनीची धूप थांबवून माती अडविण्याचे उपचार प्राधान्याने केले जातात. पाणी साठविण्याचे उपचार मागाहून केले जातात. पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत –

  • जमिनीची धूप थांबवून जमिनीच्या वरच्या थरातील पोषक अन्नद्रव्यांचे रक्षण करणे.
  • जमिनीवरील अति धुपेमुळे पडलेल्या जुन्या ओघळींची बांधबंदिस्ती करणे.
  • पावसाचे पाणी जागेवरच अडवून मुरविणे.
  • खालावत जाणारी भूजलाची पातळी वाढविणे.
  • पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणे.
  • पडीक जमीन लागवडीखाली आणणे.
  • जिरायती शेतीसाठी किमान संरक्षित सिंचन उपलब्ध करणे.
  • कृषी उत्पादन वाढविणे.

(अ) मृद संधारण उपचार :

हे उपचार प्रामुख्याने जमिनीची धूप थांबविण्यासाठी केले जातात.

(१) सलग समपातळी चर :

कमी पाऊसमानाच्या, अवर्षणप्रवण, दुष्काळी भागात या उपचाराचा प्रभावी परिणाम दिसून येतो. प्रामुख्याने बिगर वहिती अथवा पडीक डोंगर जमिनीवर हे चर समपातळीत खणण्यात येतात. समपातळी ठरविण्यासाठी दुर्बीण व अन्य सर्वेक्षण साहित्यासह प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्यावी लागते.

या चराची रुंदी दोन फूट तर खोली एक फूट असते. चराची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठरविली जाते. पश्चिम घाट व डोंगराळ प्रदेशात जमिनीचा उतार तीव्र असतो त्यामुळे चराची लांबी किमान पाच मी. ते जास्तीत जास्त वीस मी. पर्यंत ठेवली जाते. सपाट प्रदेशात स्थानिक परिस्थितीनुसार हे चर सलगपणे ५०० ते १००० मीटर पर्यंत देखील घेता येऊ शकतात. कारण सपाट प्रदेशात जमिनीचा उतार हा मंद असतो.

डोंगर माथ्यावरून वेगाने वाहत जाणाऱ्या पावसाच्या पाण्याची गती कमी करणे तसेच या चरातील खड्ड्यांध्ये पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे हा या चरांचा प्रमुख हेतू आहे. पावसाच्या पडणाऱ्या प्रत्येक सरीबरोबर लाखो लिटर पाणी जमिनीत मुरविणे या उपचारामुळे अत्यंत कमी खर्चात शक्य होते. भूगर्भातील खडकांची रचना अनुकूल असलेल्या गावांमध्ये तर केवळ या एकमेव उपचारामुळे विहिरींची पातळी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. धुळे जिल्ह्यातील लामकानी, नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार व राळेगणसिद्धी, मराठवाड्यातील आडगाव ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.

(२) अनघड दगडी बांध :

पाणलोट क्षेत्राच्या वरच्या टप्प्यात ओघळीमधील 10 अथवा घळीमधील धूप थांबविण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. यात ओघळीवर आडवे असे अनघड दगडांचे बांध घालून वेगाने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वेग कमी केला जातो. त्यामुळे जमिनीच्या होणाऱ्या धुपीस प्रतिबंध होतो. बांधात गाळ येऊन साठल्यामुळे क्षेत्र सम पातळीत तयार होऊन अधिक क्षेत्र वृक्ष लागवडीखाली येऊ शकते.

यात लहान स्वरूपाच्या दगडी बांधाची लांबी सुमारे ५ मी. व उंची १ मी. तर मोठ्या स्वरूपाच्या दगडी बांधाची लांबी १० ते १२ मी. व उंची १ मी. इतकी असते. २ ते ७.५ मी. या दगडी बांधाच्या बांधकामासाठी घळीच्या आजूबाजूच्या दगडांचा उपयोग केला जातो. दगडी बांधाच्या बांधकामासाठी कुशल मजुरांची गरज असते. बेलदार समाजाकडे हे पारंपरिक कौशल्य असून जेमतेम शिक्षण झालेले या समाजातील पुरुष व महिला जोडीने सफाईदारपणे हे बांध घालतात. सांधेमोड पध्दतीने दगड रचून हे दगडाचे बांध घातले जातात.

(३) वनीकरण व कुरणविकास :

पडीक जमिनीवर सलग सम पातळीचराच्या बरोबरीने वनीकरण केले जाते. प्रामुख्याने पाणलोटाच्या वरच्या भागात वनीकरण केले जाते. यात चर खणून निघालेल्या मातीच्या ढिगावर स्थानिक कृषी हवामान परिस्थितीनुसार विविध प्रकारच्या झाडांची रोपे, झुडुपे व गवतही लावण्यात येते. स्थानिक ग्रामस्थांच्या गरजा, त्या परिसरात नैसर्गिकरीत्या चांगल्या वनस्पती, ज्या वनस्पतींना गुरे खात नाहीत अशा वनस्पतींची निवड प्रामुख्याने करण्यात येते.

पडीक जमिनीवर नैसर्गिक झाडोरा निर्माण करणे, वाहत येणारे पाणी चरामुळे, गवत व झाडोऱ्यामुळे अडून राहून जमिनीमध्ये जास्तीतजास्त पाणी मुरवणे हा या वनीकरणाचा उद्देश असतो. यामुळे पडीक जमीन उत्पादनक्षम बनवून अंशतः ती वहितीखाली अथवा लागवडीखाली आणणे शक्य होते. पडीक जमीन विकासाचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.

या सलग सम पातळी चरासह वनीकरणाच्या उपचारासाठी लाभार्थी शेतकऱ्याने जमीन उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वनीकरणाच्या निमित्ताने लावलेल्या झाडांचे संगोपन व राखण करण्याची जबाबदारी स्वीकारणेही गरजेचे आहे. आग-वणव्यापासून, गुरेचराईपासून, तोडीपासून ही झाडे वाचविणे मोठे कसोटीचे असते.

वनीकरणाच्या तुलनेत फळबाग लागवडीला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद हा अधिक उत्स्फूर्त असतो. बांधावरील फळबाग अथवा शेतातील फळबागेसाठी शेतकरी श्रमदानातून खड्डे खणतात. वेळोवेळी पाणी घालून रोपे जागवतात.

(ब) जलसंधारण उपचार :

हे उपचार प्रामुख्याने पावसाचे पाणी अडवून साठविण्यासाठी केले जातात. आत साठवलेले पाणी भूगर्भात मुरून, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढणे अपेक्षित असते. यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

(१) शेततळे व माती बंधारा :

डोंगर उतारावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीच्या खोलगट भागात खोदलेल्या शेततळ्यात साठविले जाते. ओलावा टिकून जमिनीतील शेततळ्यामध्ये साठविलेले पाणी जमिनीच्या पोटात मुरून शेततळ्याखालील जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते.

शेततळे अथवा माती बंधाऱ्यामुळे होणारे फायदे अनेक आहेत.

  • भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होण्याचा महत्त्वपूर्ण फायदा. त्यामुळे गाव पातळीवरील पिण्याचे स्रोत बळकट करण्याचा प्रभावी मार्ग.
  • दोन पावसातील अनियमिततेमुळे होणारी पिकांची हानी टळते. पावसाअभावी सुकलेल्या पिकांना यामुळे अंशतः जीवदान देणे शक्य.
  • पिकाच्या वाढीच्या वेळी जमिनीतील ओलाव्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ.
  • शेततळे अथवा माती बंधाऱ्याखालील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे सिंचन क्षमतेत वाढ.
  • अतिवृष्टीच्या काळात डोंगरावरचे पाणी वेगाने खाली येऊन शेतबांधांची फुटाफूट होऊन पिकाचे नुकसान होते. अशा वेळेस पुराचे पाणी शांतपणे व शिस्तबद्धरीतीने सांडव्याद्वयारे बाहेर पडल्यामुळे नुकसानीपासून बचाव.
  • जनावरांसाठी हंगामी स्वरुपात पाणी उपलब्धता,

(२) साठवण पद्धतीचे सिमेंट बंधारे :

गावातील ओढ्यात खडक असलेल्या जागी सिमेंट बंधारे घेण्यात येतात. ओढ्यात मंद उतार असलेली जागा बंधाऱ्यासाठी निवडली जाते. यामुळे बंधाऱ्यात अडलेल्या पाण्याचे प्रमाण अधिक असते. साठवण बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी हे बांधावरून वाहून जाते. कोल्हापूर पद्धतीच्या साठवण बंधाऱ्यात पावसाळ्यात ढापे काढलेले असल्यामुळे ओढ्याच्या पात्रातून पाणी थेट वाहून जाते, तर पावसाळा संपल्यानंतर ओढ्याचा प्रवाह लोखंडी ढापे घालून अडविला जातो.

साठवण बंधाऱ्यामुळे पाणी उचलून देणे शक्य झाल्यामुळे नव्याने सिंचनाचे क्षेत्र निर्माण होते. बंधाऱ्याखालील विहिरींची पातळी वाढल्याने सिंचन क्षमतेत वाढ होते. भूगर्भातील पाण्याची पातळीही हमखास वाढते. यामुळे गावातील पिण्याचे पाण्याचे स्रोत बळकट करण्यास या प्रकारचे साठवण बंधारे अधिक उपयुक्त ठरू शकतात.

(३) गॅबियन बंधारे :

या प्रकारच्या बंधाऱ्यात गॅल्व्हनाइज्ड् जाळीमध्ये दगडी बांध घालून त्यावर जाळी घट्ट आवळून बसविली जाते. ओढ्यामध्ये ज्या ठिकाणी खडक अथवा कठीण मुरूम नाही अशा जागी हे बांध घातले जातात. शक्यतो सिमेंट बंधाऱ्याच्या वरच्या जागेत हे बांध घातल्यामुळे ओढ्यात वाहून येणारा गाळ अडला जातो.

(४) वळण बंधारे :

ओढ्याच्या पात्रात पाणी फार साठण्याची जेथे शक्यता नसते, तेथे मीटरभर उंचीची दगडी भिंत बांधून त्या पातळीवरून सांडव्याने पाणी उताराच्या दिशेने खाली वळविले जाते.

गावाच्या ओढ्यातून पावसाळ्यात पावसाने ताण दिल्यास अथवा रब्बी पिकांसाठी एक ते दोन पाळ्या या बंधाऱ्यामुळे देणे शक्य होते.

बंधाऱ्यामुळे होणारे विशेष फायदे :

  • सिंचन क्षेत्रात नव्याने वाढ
  • विजेच्या वापराविना लांबपर्यंत पाणी देणे शक्य. यामुळे इंजिन अथवा मोटार खर्चात बचत. विजेवरचा खर्च नाही.
  • संरक्षित सिंचनामुळे भातपिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ
  • मर्यादित क्षेत्रात रब्बी पिकाला पाण्याची हमी मिळाल्यामुळे गहू व हरभरा या पिकांच्या उत्पादनात वाढ.