भारतीय भाषांचे भवितव्य काय? (भाग १)

लेख क्र. १६

२०/६/२०२५

संत्रिकेच्या कामाची त्रिसूत्री हळूहळू स्पष्ट होत गेली. संस्कृत भाषेचे संवर्धन, संस्कृतीचे संवर्धन व त्यासाठी आवश्यक संशोधन सुरु झाले. विविध विषयांवरील अभ्यास, संशोधन, व्याख्यानमाला, कालानुरूप संस्कारविधींची निर्मिती व प्रसार असे काम फुलत गेले. प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर, प्रा. यशवंत लेले, डॉ. म. अ. मेहेंदळे (भांडारकर संस्था), पं. महादेवशास्त्री जोशी, डॉ. सरोजा भाटे, डॉ. श्रीकांत बहुलकर, डॉ. रा. चिं. ढेरे, प्रा. राम डिंबळे, डॉ. संभाजीराव भावसार, अशा व्यक्तींच्या येण्याने विभाग समृद्ध होत गेला. यातील प्रा. यशवंत लेले व प्रा. राम डिंबळे यांचे संत्रिकेशी अतूट नाते जुळले आहे.
प्रा. यशवंतराव लेले यांनी संत्रिकेचे विभाग प्रमुख म्हणून पद स्वीकारले. त्यांनी स्वतः सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे धागे जोडत अनेक व्यक्तींना व विषयांना संत्रिकेशी जोडले. ते स्वतः अखंड अभ्यास करतात व अनेकांना अभ्यासाची प्रेरणा देतात. आतापर्यंत आपण संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठीचे प्रयत्न वाचले. तसेच मराठी भाषा विभागात रुजविण्यासाठी यशवंतरावांनी अनेक शब्द प्रचलित केले. मातृभाषा व भारतीय भाषांवर होणारे इंग्रजीचे अतिक्रमण त्यांना कधीच आवडले नाही. सध्या हिंदी भाषा विद्यार्थ्यांना सक्तीची करावी की नाही यावरती बाहेर सुरु असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आणि २०११ साली केंद्रिय हिंदी समितीने पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक परिपत्रक काढले होते, त्यात हिंदी भाषा सोपी केली जावी असे म्हटले होते. हिंदी सह अन्य भारतीय भाषांमध्ये झालेली इंग्रजीची सरमिसळ, एकूणच भाषांची झालेली दयनीय स्थिती आणि त्यातून निघालेले केंद्राचे परिपत्रक पाहून श्री. यशवंतराव लेले यांनी त्यांचे विचार लेखाच्या रूपात प्रकट केले. ते आजही वाचनीय आहे.
अलीकडे केंद्रीय हिंदी समितीची एक बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होऊन असे परिपत्रक काढण्यात आले आहे की ‘राजभाषा आता सरल आणि सुगम करण्यात यावी. वृत्तपत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिंदी भाषेस कठीण आणि क्लिष्ट ठरवून उदाहरणे कोणती दिली आहेत ते पहाण्यासारखे आहे.
भोजन शब्दाऐवजी लंच, क्षेत्र ऐवजी एरिया, ‘महाविद्यालया’पेक्षा कॉलेज, ‘वर्षाजल’च्या जागी रेन वॉटर, नियमित ऐवजी रेग्युलर, श्रेष्ठतमच्या ऐवजी बेस्ट फाइव, आवेदन ऐवजी अ‍ॅप्लाई, छात्र पेक्षा स्टुडंट्स, उच्च शिक्षण म्हणण्याऐवजी हायर एज्युकेशन, हे शब्द वापरण्यास सुचविले आहे. भोजन हा शब्द क्लिष्ट? ‘रेन वॉटर’ हा शब्द प्रयोग काय वर्षाजलापेक्षा सुलभ आहे? आता संस्कृतनिष्ठ शब्दांऐवजी इंग्रजी शब्दप्रयोग करण्याची ही शिफारस म्हणजे हिंदीचा प्रवास इंग्रजीच्या दिशेने व्हावा असे सरकारने सूचित केले आहे, यात काही संदेह नाही.
खरोखरी अस्मितेची चक्रे उलटी फिरवण्याचे हे काम केंद्रशासन करते आहे. मात्र याचा आरंभ पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळीच झाला आहे. हिंदी भाषेत सारी शास्त्रे, कला इ. विषय सार्थपणे शिकता शिकवता यावेत यादृष्टीने डॉ. रघुवीर यांच्याकडे बृहत् हिंदीकोश रचण्याचे अशक्य वाटणारे काम देण्यात आले होते. ते त्यांनी प्रचंड मेहनतीने पूर्णही केले होते. पण आज हा ‘बृहत् हिंदी कोश’ कुणाच्या तरी पाहण्यात आहे का? ऐकण्यातही नसेल, तर वापरात असण्याचा प्रश्नच येत नाही. हे असे का घडले? स्वत: नेहरूंनीच या कोशातील काही पारिभाषिक शब्द घेऊन सर्व कोशाची टर उडवल्यानंतर जो संदेश समाजापर्यंत जायला नको तो सहजच गेला व नवी हिंदी परिभाषा बनण्याऐवजी इंग्रजी शब्द वापरण्यास प्रोत्साहन मिळाले!
मराठी भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी माधव ज्यूलियन, आणि त्याही आधीचे विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक इत्यादींनी दैनंदिन व्यवहारातील अनेक नवनवीन इंग्रजी शब्द घडवले व ते नियतकालिकांमधून सामान्यजनांपर्यंत पोचवले असल्याने हिंदीच्या केंद्रीय समितीने कठीण आणि क्लिष्ट म्हणून अव्हेरलेले असले तरी ते हिंदी व मराठी माणसास परिचित आहेतच. जुन्या पिढीच्या वापरातही ते आहेत. पण मराठीतही इंग्रजीची भर अ-पारिभाषिक शब्दांसाठीही वेगाने पडत चालली आहे हे आपण पाहतोच. गत शतकाभरात संगणक आला, चलभाष आला, नाना नवी शास्त्रे आली. पर्यावरणशास्त्र अभ्यासक्रमात बसवण्यात आले. व्यक्तिमत्वविकसन हा अभ्यासक्रमाचा एक विषय ठरला, मूल्य शिक्षण आवश्यक ठरले. आजही विज्ञान, तंत्रज्ञानाची प्रचंड घोडदौड वेगात चालू आहे. मराठी माणसाने परम हा महासंगणक स्व-प्रज्ञेने बनवला, संगणक, दूरध्वनी, चलभाष अथवा भ्रमणभाष हे अन्वर्थक शब्दही बनले… पण संगणकीय शास्त्रास आवश्यक ती सारी शब्दावली इंग्रजीच राहिली।
परिणामी इंग्रजीचा महिमा इतका वाढत गेला की त्या मेकॉलने स्वप्नातही त्याची कल्पना केली नसेल! त्याने प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावे व नंतर इंग्रजीचा आरंभ व्हावा असे सुचवले होते. आज आपण मात्र पहिली पासून इंग्रजी एक विषय सुरु करून आता आपण जगाबरोबर प्रगत होत राहणार असा विश्वास बाळगून आहोत.
पटपडताळणीतून शिक्षणसम्राटाच्या साम्राज्यातून किती सुरस आणि चमत्कारिक गोष्टी घडत आहेत याचे विश्वरूप दर्शन घडले आहे! आता गुणवत्ता पडताळणी होणार असे ऐकतो. त्यातून काय चमत्कार पुढे येतील त्याचा तर्क करण्याची जरूर नाही. एम्. ए. इग्रजी विषयात उत्तीर्ण झालेल्या युवकांना दोन वाक्ये इंग्रजीतून बोलणे शक्य होत नाही हा प्रत्यक्ष अनुभव आहे! अशा स्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनी पहिलीपासून इंग्रजी शिकवून तयार केलेल्या पिढीच ज्ञान किती ‘अफाट’ असेल याची कल्पना सहज येऊ शकते!
पालकांचीच हौस अशी आहे की बालवाडीपासूनच इंग्रजी माध्यम सुरू होऊन आपले पाल्य लवकरात लवकर साहेब व्हायला हवेत! हे उच्चभ्रूंसाठीचे प्रयोग सुरु असून नेकटाय – सुटबुट चढवून ती अजाण बालकं ‘गुडमार्निंग’, ‘हाय’, ‘टाटा’, ‘प्लीज’, ‘सॉरी’ इत्यादी आपल्या बोबड्या बोलांनी मम्मी-डॅडींना धन्य धन्य करताहेत! ग्रामीण भागातील कृषिकार्यातील पालकांनाही मग सहजच वाटते, ‘हे पुढे चालले, आपण मागे राहून कसे चालेल?’ मग ते परवडो न परवडो, पण मुलांना ‘अप् टु डेट’ पोशाख चढवून इंग्रजीची दीक्षा देण्याची ते सुरुवात करत आहेत!
देशी भाषा, देशी वेष, देशी संस्कृती या साऱ्याच गोष्टींना ‘चले जाव’ म्हणणे चालले आहे. इतिहासासारखे विषय इंग्रजी माध्यमातून समजावून घेणे हे किती दुर्घट आहे ते पालकांनी स्वत: तो विषय इंग्रजीतून मुलांना सांगून पाहावा म्हणजे त्यांना काहीशी कल्पना यईल!
इंग्रजी वृत्तपत्रांनीही हिंदीच्या इंग्रजी-करणाचे कौतुक चालवले आहे. त्या वृत्तपत्रांमध्ये ‘हिंग्लिश गेन्स रिस्पेक्टेबिलिटी’, ‘हिंग्लिश गेन्स ग्राउंड इन इंडिया’, ‘हिंग्लिश विल बी व ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया’ अशी हर्षोत्फुल्ल शीर्षके वाचायास मिळत आहेत. याचा अर्थ हाच की हिंदीचं भवितव्य अंधकारमय आहे, इंग्रजी हीच राजभाषा बनण्याचा हा सारा खटाटोप आहे. हिंग्लिशच्या टप्प्यानंतर यायची इंग्लिश! पण हिंदी पुरता हा प्रश्न मर्यादित नाही, तिकडे संस्कृतनिष्ठ हिंदीची मुस्कटदाबी करून इंग्रजी प्रचुर हिंग्लिश शासकीय भाषा बनू पाहात आहे आणि तिला शासना बरोबर सामान्य माणसांचाही पाठिंबा दिसतो आहे कारण इंग्रजी ही ज्ञानभाषा महणून आम्हाला हवी, सर्व माध्यमे त्यासाठी कटिबद्ध आहेत.
हिंदी हिंग्लिश बनून ‘प्रगती’ चे गाजर दाखवते आहे तर मग मराठी तरी मागे का राहावी? मराठीची मिंग्लिश बनवण्याची घाई सर्वत्र चालूच आहे. मराठी माणसे इंग्रजी ही ‘जगाची’ भाषा म्हणून तिची भक्ती करू लागली आहेत आपल्याला अमेरिकेत जाऊन तेथील समृद्ध जीवनाचा उपभोग घेण्याचे स्वप्न साकार व्हावं असं जर वाटत असेल तर बाकी सारे सोडून आधी इंग्रजीचा वसा घ्यायलाच हवा. त्याचा मार्ग मिंग्लिशच्या उपासनेपासूनच सुरू होतो. आपली गावरान मराठी सोडून आधी अधिकाधिक इंग्रजी शब्द वापरून प्रतिष्ठित झाल्याचा अनुभव घेत प्रगत होऊया. म्हणजे मिंग्लिश भाषी होऊ या व मग पुढची पायरी शुद्ध इंग्रजीची! ती काही दूर नाही! अशा प्रकारे उत्तम इंग्रजी शिकून आम्ही जग जिंकू! एखादा शेक्सपिअर देखील त्यातून उत्पन्न होईल! प्रत्यक्ष इंग्लंड मध्येही आजवर दुसर्‍या शेक्सपिअरचा जन्म झालेला नाही. अमेरिका, कॅनडा इ. आंग्लभाषी देशांनाही ते भाग्य लाभले नाही. त्या भाग्याची हिंग्लिशच्या वाटेने जाऊन आपण वाट पहात राहणे हे केवढे तरी आश्चर्य नव्हे का?
पण विदेशी भांडवलांसाठी अधीर झालेल्या शासनास ही अघोषित शर्त मान्य करावी लागते आहे. असे दिसते की ज्यामध्ये इंग्रजी भाषा व पाश्चात्य संस्कृतीचा मुक्त संचार या देशात होत राहील असे धोरण आपण स्वीकारले आहे. असा इंग्रजीचा मुक्तसंचार हाच हिंदुस्थानभर झाला तर काय बिघडलं? असा प्रश्नही काही आंग्लविद्याविभूषित, विदेशस्थ भारतीय, मिशनरी शाळा व शासकीय पदाधिकारी अवश्य विचारतील. कारण त्यांना त्यामुळे हिंदीसारखी वा अन्य कोणतीही देशी भाषा शिकण्यांचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत. आफ्रिकेसारख्या खंडातील असंख्य देशांच्या अनंत भाषा होत्या पण इंग्रजीने त्यांचा अंत घडवून आणण्यात विसाव्या शतकात यश मिळवले आहे. बहुभाषिकतेची घोर शिक्षा म्हणून आफ्रिकेने आपल्या साऱ्या भाषांचा बळी देऊन इंग्रजीस स्वीकारले आहे.

क्रमशः