श्राद्ध व गणेशपूजन या विधींचे वर्णन

लातूर येथे सेवाभावाने, संघटनवृत्तीने श्री विवेकानंद रुग्णालय चालविणार्‍या डॉ. अ. ल. कुकडे यांच्या वडिलांचे निधन १९७७ मध्ये झाले. तेव्हा त्यांनी संत्रिका विभाग, ज्ञान प्रबोधिनी प्रणीत श्राद्धविधी केला होता. तसेच, रुग्णालयातील मंदिरात गणेश प्रतिष्ठापना सुद्धा त्यांनी ज्ञान प्रबोधिनीकडून केली होती. तेव्हा त्यांनी या दोन्ही विधींचे वर्णन केले होते. संत्रिका विभाग सुवर्ण-महोत्सव साजरा करीत आहे. त्या निमित्ताने त्यांनी केलेले वर्णन येथे देत आहोत.

श्राद्ध विधीचे नवे रूप – ज्ञान प्रबोधिनीच्या व्यवहारातून निमित्ता-निमित्ताने होणार्‍या अनेक धार्मिक संस्कारांचे स्वरूप बदलून ते अधिक अर्थपूर्ण झाले आहे. बदलत्या कालानुरुप या संस्कारात नवा आशय आणणारे तसेच व्यक्तीस अधिक समाधान देणारे असे या संस्कारांचे रूपांतर करण्यात आले आहे. विविध धार्मिक संस्कारांचे महत्त्व अत्यंत आहे. परंतु त्यातील अनेक संस्कार केवळ अवडंबर या स्वरूपात शिल्लक राहिले आहेत याचे दुःख होते. या संस्कारांत सहभागी होणाऱ्यांना त्यांचा अर्थही कळत नाही व प्रत्यक्ष संस्कार पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या इतर व्यक्तींचा या संस्कार विधीत काहीच सहभाग नसतो. ज्ञान प्रबोधिनीने या संस्कारांच्या बाबतीत दोन महत्त्वाचे बदल केले आहेत आणि या महत्त्वाच्या बदलांमुळे त्या संस्कारांचे स्वरूपच बदलून गेलेले जाणवते. ते स्वरूप अधिक भावस्पर्शी व त्यामुळे अधिक उपयुक्त झाले आहे. पूर्वीच्या संस्कारातील अनेक श्लोक वा वचने तशीच घेऊन पाठोपाठ त्याचे मराठी गद्य-पद्य विवरण आणि अध्वर्यूच्या पाठोपाठ सर्व उपस्थितांनी पठण करणे या दोन बदलांमुळे एक आगळेच वातावरण उभे राहाते. या आगळ्या वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभवच सर्वांनी घेतला पाहिजे. ज्ञानप्रबोधिनीने अनेक संस्कार लिहिले आहेत, पैकी दोन संस्कारांचा अनुभव या ठिकाणी विशद करीत आहे.

मरणोत्तर श्राद्धविधी – दि. २० ऑगस्ट १९७७ रोजी माझे वडील डॉ. ल. दि. कुकडे यांचे आकस्मिक निधन झाले. दहन पारंपरिक पद्धतीनेच परंतु विद्युत दाहिनीमध्ये केले. नंतर ९-१०-११-१२-१३ या दिवसांचे विधी करण्याचा प्रश्न आला. ज्ञान प्रबोधिनीने या विधींची एक पोथी तयार केली आहे. पाच दिवस विधी करण्याऐवजी ११ व्या दिवशी सर्व विधी एकदमच, घरीच करता येतील अशी त्यात योजना आहे. हे ‘एकोद्दिष्ट श्राद्ध’ करण्यासाठी नदीच्या काठी जावे लागत नाही. आपल्या घरीच ते जागा असल्यास करता येते. त्यासाठी नातेवाईकांनी, मित्रांनी सकाळी शुचिर्भूत होऊन एकत्र बसणे व पोथीप्रमाणे सर्व संस्कार करणे अपेक्षित आहे. उपाध्याय असले तर चांगलेच, पण ते नसले तर कोणीही शुचिर्भूत व्यक्तीने अध्वर्यू म्हणून पोथी वाचन करण्याची यात सोय आहे. प्रथम संस्कृत श्लोक, पाठोपाठ मराठी विवरण आणि मराठीतून तोच संस्कार करणे अशी पद्धत येथे असल्याने कोणता विधी कशासाठी, काय व कसा चाललाय याची सर्वांना योग्य जाण येते. त्यामुळे सर्वांचा या विधीत सहभाग होतो. आप्ताच्या वा मित्राच्या मृत्यूचे दुःख असले तरी त्याचे उचित स्मरण करीत असल्याचे समाधान सर्वांना मिळते. हा विधी सुमारे १ तासाचा असतो. सर्वच दृष्टीने सुटसुटीत !!

संध्याकाळची श्राद्धसभा – सायंकाळी सर्व आप्तेष्ट, मित्र पुन्हा शोकसभेसाठी एकत्र येतात. सुमारे एक तास भजनाचा अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रम असतो. मृत व्यक्तीच्या प्रतिमेसमोर सर्व कार्यक्रम त्यामुळे त्या व्यक्तीचे स्मरण स्वाभाविकतःच प्रत्येक क्षणी होते. नंतर काही व्यक्तींची छोटी छोटी भाषणे असतात. भजनात सर्वांचा सहभाग तर भाषणात काहींचा. परंतु त्यामुळे उपस्थितांतील सर्वांनाच समाधान मिळते. श्रद्धेने केलेल्या या श्राद्धाचीही अनुभूती आगळीच आहे. शेवटी प्रसाद वाटप. असा एकूण कार्यक्रम असतो. व्यक्तीच्या सामाजिक, कौटुंबिक स्थानानुसार या कार्यक्रमात थोडाफार बदल होऊ शकतो. माझ्या वडिलांचे एकोद्दिष्ट श्राद्ध आम्ही या प्रकारे केले. त्यामुळे खऱ्या अर्थाने श्राद्ध, श्रद्धापूर्वक स्मरण केल्याचा आनंद आम्हाला मिळाला.

गणेश संस्थापना – अशा प्रकारे संस्कार करण्याचा पण अगदी वेगळ्या प्रकारचा अनुभव दुसऱ्या एका कार्यक्रमात आला. आमच्या लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात आम्ही एक छोटे गणेश मंदिर बांधले आहे. मानवी प्रयत्नांची शर्थ करीत असतानाच तेथे भगवंताचे अधिष्ठान असलेच पाहिजे या भावनेने या मंदिरात आम्ही गणेश प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले. ही प्रतिष्ठापना ज्ञान प्रबोधिनीने गणपती स्थापनेची जी पोथी केली आहे तिच्यानुसार करावयाची ठरविली. पारंपरिक पूजेतील काही ऋचा, अथर्वशीर्षातील श्लोक, अन्य काही निवडक श्लोक यांची मिळून ही पोथी करण्यात आलेली आहे. श्लोकापाठोपाठ मराठी विवरण आहेच. तेही अध्वर्यूनी समजावून सांगावयाचे असते. पोथीतील मंत्रांना गेय चाली लावलेल्या आहेत. अध्वर्यू संगीत मंत्र म्हणतात. पाठोपाठ सर्व उपस्थित ते अनुसरतात व त्याचे अर्थ विवरण मराठीत. पुन्हा याच पद्धतीने पुढील मंत्र. असे सगळ्या वास्तूत ते मंत्र वातावरण भारून टाकतात. खर्‍याखुर्‍या अर्थाने ती प्राणप्रतिष्ठा होते. आपल्या धार्मिक विधीत असलेल्या संस्कारक्षमतेचा प्रत्यय येतो. संस्कार कार्यक्रमात सामाजिक आशय भरला जातो. ज्यासाठी या सर्व कार्यक्रमांची योजना असते, तो हेतू साध्य होतो. या सर्वांची अनुभूतीच घेतली पाहिजे.

हे विविध प्रयोग अद्याप नवीन आहेत. तथापि आतासुद्धा त्यांचा प्रभाव जाणवतो. यांचा अधिक प्रसार व्हावयास पाहिजे, म्हणजे अनुभवांती काही बदल करता येतील. हे संस्कार अधिक अर्थवाही करता येतील. कदाचित आणखी काही नवीन गोष्टींची भरती करता येईल, काहींना रजा देता येईल. सर्वच संस्कारांच्या नूतनीकरणाची कल्पना यातून पुरी होऊ शकेल.