लेख क्र. ८
१२/०६/२०२५

संत ज्ञानेश्वरांनी प्रथम परिवर्तनाचा पाया घातला. पुढे अनेक संतांनी हे परिवर्तनाचे काम चालू ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनासाठी आणखी पुढचे पाऊल टाकले. त्याप्रमाणे धर्मनिर्णय मंडळातील अनेक विद्वानांनी धर्मपरिवर्तनाचा एक टप्पा म्हणून विवाह, उपनयन इ. संस्कारांच्या छोट्या पुस्तिका प्रकाशित केल्या हे आपण पहिल्या भागात बघितले. धर्मनिर्णय मंडळाच्या विविध अधिवेशनांमध्ये अस्पृश्यता निर्मूलन, उपनयनाला अधिकारी व्यक्ती, स्त्री-पुरुष समानता इ. बाबतीत विद्वान व विचारी लोकांनी शास्त्रचर्चा करून निर्णय घेतले आणि पुढे ज्ञान प्रबोधिनीने व १९७५ पासून प्रबोधिनीच्या संत्रिका विभागाने हे परिवर्तनाचे काम जोमाने वाढवले ते या भागात सांगितले आहे.
१९३४-१९४१ या कालावधीतील तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेच्या अधिवेशनांमधील काही निर्णय पुढे दिले आहेत. ते वाचले की हे मंडळाचे सभासद किती द्रष्टे होते हे समजते –
- मानव्य, राष्ट्रहित व हिंदू समाजसंघटना अशा तिन्ही दृष्टींनी विचार करता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांची जन्मनिमित्तक अस्पृश्यता अतिशीघ्र नष्ट झाली पाहिजे असे या सभेचे मत आहे. विविध स्मृतींचा ऐतिहासिकदृष्ट्या कालानुक्रम पाहता परिस्थित्यनुरूप काही स्मृतीकार अस्पृश्यता निवारणास आनुकूल्य दर्शवीत गेले असे दिसते. तेव्हा त्याच धोरणास अनुसरून आज विद्यमान असलेल्या अस्पृश्य वर्गाची अस्पृश्यता सर्वथैव नष्ट व्हावी असे या परिषदेचे मत आहे. कोणतीही जात जन्मतः श्रेष्ठ अथवा कनिष्ठ समजू नये असेही या सभेत ठरविले गेले.
- समाजाची धारणा व उत्कर्ष व्हावा यासाठी श्रुती, स्मृती व शिष्टाचार यांच्या साहाय्याने आपल्या आचारात परिवर्तन करणे हे या परिषदेचे धोरण राहील.
- अनुभव व तर्क मिळून मनुष्याची बुद्धी बनते. ही बुद्धीच धर्माचे प्रमाण होय. धर्म हा श्रुती, स्मृती, शिष्टांचा आचार व विचार यांच्या साहाय्याने शिष्ट परिषदेने करावा.
- धर्मनिर्णयात सध्या रूढ असलेली समन्वय पद्धती मान्य करू नये. ऐतिहासिक पद्धतीनेच धर्मनिर्णय केला पाहिजे. ऐतिहासिक पद्धती म्हणजे मागील अनुभव लक्षात घेऊन कालानुरूप परिवर्तन करण्याचा मार्ग. या ऐतिहासिक पद्धतीची मूलतत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत –
- ऐहिक कल्याणाच्या साधनांमधे पारलौकिक कल्याणाच्या साधनांचा अंतर्भाव होतो.
- आचारधर्मात वेळोवेळी परिवर्तन होत असते.
- हे परिवर्तन पूर्वीच्या शिष्टांनी वेळोवेळी केले आहे.
- आजच्या शिष्टांना आजच्या परिस्थितीला अनुसरून परिवर्तनाचा अधिकार आहे. ही तत्त्वे विशेषतः आचारधर्मास लागू करून आचारधर्मासंबंधीचा विचार प्रस्तुत परिषद करेल.
- ‘द्विजत्व’ विषयी नियम पुढीलप्रमाणे –
- प्रत्येक हिंदूला द्विजत्वाचा अधिकार आहे. चारही वर्णांच्या व्यक्तींना संस्कार करून घेऊन द्विज बनण्याचा अधिकार आहे.
- द्विजत्वसिद्ध्यर्थ वैदिक पद्धतीने उपनयन संस्कार प्रत्येक हिंदूने तज्ज्ञांच्या साहाय्याने करावा.
- तज्ज्ञाने सर्व हिंदूंकडे हा संस्कार करण्यासाठी बोलावल्यास अवश्य जावे अशी या परिषदेची आग्रहाची विनंती आहे.
- सकेशा विधवांना विवाहादि मंगल कार्यात आणि धार्मिक कृत्यात कोणत्याही प्रकारे अनधिकारी, अशुभ, अपवित्र किंवा हीन समजण्यात येऊ नये असे या परिषदेचे मत आहे.
- स्त्रियांचे धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील अधिकार पुरुषांच्या बरोबरीचे आहेत. स्त्रियांची आर्थिक उन्नती देखील करणे आवश्यक आहे. या दृष्टीने हल्ली स्त्रियांना वारसा, वाटप इ. विषयात जे अधिकार आहेत त्यात योग्य परिवर्तन आणि वाढ करावी.
- दहनक्रिया झाल्यावर पहिल्या तीन दिवसात अस्थिसंचयन (अस्थि गोळा करणे) आणि अकराव्या दिवशी एकोद्दिष्ट व सपिंडीकरण ही श्राद्धे करावीत. एवढे केले म्हणजे मृतात्म्यासाठी आवश्यक तेवढा क्रियाकलाप झाला असे समजण्यास प्रत्यवाय नाही.
धर्मनिर्णय मंडळाच्या काही अधिवेशनातील निर्णय नमुन्यादाखल वर दिले आहेत. हे निर्णय घेणारे कोणी सर्वसामान्य लोक नव्हते. भारतरत्न म्हणून गौरविले गेलेले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून गाजलेले, प्रख्यात अधिवक्ता म्हणून मुंबई उच्च न्यायालयात नाव कमावलेले व आपल्या ‘हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र’ या असामान्य ग्रंथनिर्मितीसाठी चिरस्मरणीय ठरलेले भारतरत्न महामहोपाध्याय पां. वा. काणे हे धर्मनिर्णयमंडळाचे प्रवक्ते होते. याशिवाय विद्वद्रत्न कृ. ल. दप्तरी (नागपूर), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वाई), हिंदुत्वदीपक महादेवशास्त्री दिवेकर (मिरज), महामहोपाध्याय पाठकशास्त्री (धुळे), तर्कसांख्यतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे (लोणावळा), या व अशा अनेक विद्वान व विचारी मंडळींच्या विचारमंथनाचे फलित म्हणून हे निर्णय आपल्यासमोर आले. धर्मनिर्णय मंडळाच्या मतांचा प्रसार करणारे ग्रंथलेखन या मंडळींनी विपुल केले. विवाह, उपनयन, अन्त्येष्टी यांसारख्या पोथ्या छापून प्रसिद्ध केल्या. धर्मनिर्णय मंडळाच्या अधिवेशनांमधून विद्वान लोकांची शास्त्रचर्चा व त्या चर्चेचा निर्णय सामान्य माणसांसमोर ठेवणे अशा दोन्ही प्रकारचे काम करण्यात आले.
अशा प्रकारे धर्मनिर्णय मंडळाचे काम चालू असताना १९६२ मधे पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना झाली. त्यावेळी धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांचे पुण्यात येणे जाणे होत असे. ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. वाच. वि. वि. पेंडसे यांच्याशी त्यांची अनेक विषयांवर चर्चा होत असे. त्यामधे ‘अर्थ न समजता, औचित्य-अनौचित्य याचा विचार न करता, स्थलकालसापेक्षता दुर्लक्षून जे धर्मविधी होतात ते बदलणे आवश्यक आहे’ हा विचार असे. यातूनच १९६४ मध्ये सामूहिक समता श्रावणीची योजना प्रबोधिनीच्या वास्तूमध्येच केली गेली. श्रावणी म्हणजे जानवे बदलण्याचा विधी म्हणजेच नवीन अध्ययन वर्षाचा शुभारंभ. प्राचीन काळी गुरुकुल शिक्षण पद्धतीत श्रावण महिन्यात हा विधी करून नंतर पुढील नव्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवायला प्रारंभ होत असे. या प्राचीन विधीला आधुनिक विचारांची जोड देऊन ‘श्रावणी’ संस्कार प्रबोधिनीत प्रतिवर्षी केला जातो. त्याला ‘वर्षारंभ’ असे म्हटले जाते.
पुढे १९७५ मधे ज्ञान प्रबोधिनीचा ‘संस्कृत संस्कृति संशोधिका’ हा विभाग अस्तित्वात आल्यानंतर धर्मनिर्णय मंडळाने घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे धर्मविधींच्या पोथ्या तयार करणे, त्यांचे प्रशिक्षण देणे व ते प्रत्यक्ष करणे हे काम सुरू झाले व ते अजूनही चालू आहे.
आपण धर्मविधींमधे परिवर्तन आणले पाहिजे. हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेले सर्वच्या सर्व संस्कार आजही केलेच पाहिजेत असे नाही. एकतर ते शक्यही नाही व त्यातील बरेचसे संस्कार स्थलकालसापेक्षतेच्या तत्त्वानुसार संस्कार या स्वरूपात समाजात शिल्लक राहिलेलेच नाहीत. ते पुन्हा रूढ करण्याची आवश्यकता नाही. मात्र नामकरण, उपनयन, विवाह, अन्त्येष्टी हे संस्कार परिवर्तनीयतेच्या कसोटीवर तपासून ‘संस्कार’ या स्वरूपात समाजातील सर्व जातींसाठी टिकवले पाहिजेत. याशिवाय कालसंगत अशा संस्कारांची भरही घातली पाहिजे.