वा. लताताई भिशीकर
कृषी विद्यालयाची सुरुवात
फेब्रुवारी २००४ मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वि. मो. पवार हराळीची शेती पाहायला नि शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करायला आले होते. तेव्हा चर्चेत आपण कृषी पदविका विद्यालय सुरू करावं असं बोलणं झालं. त्यानुसार आपण सर्व पूर्तता करून विद्यापीठाकडे अर्ज पाठविला. पदविका विद्यालय सुरू करण्यासाठी संस्थेकडे ५० एकर जमीन लागते. ती सिद्धता आपण केली. दक्षिण मराठवाड्यात कृषी पदविका विद्यालय सुरू करण्यात अनेक राजकीय पक्षांना रस होता. १६ मे २००५ ला मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु मा. कृष्णा भोगे यांना भेटायला आम्ही औरंगाबादला गेलो. त्यांनी आश्वासन दिलं की राजकारण निरपेक्ष, केवळ गुणवत्तेवर संस्थेची निवड होईल. त्यानंतर महाराष्ट्राचे कृषी राज्य मंत्री राणा जगजितसिंह यांना भेटलो. त्यांनी स्वच्छ सांगितलं, ‘कृषी पदविका विद्यालय आम्हांला हवं आहे. तुम्ही हवं तर माळी प्रशिक्षणाचे वर्ग चालवा’. ५ मार्च २००५ ला डॉ. एस. डी. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची एक परीक्षण समिती हराळीला भेट देऊन गेली. हराळीतील काम समितीला खूप आवडलं. तिचा कौल असूनही खात्री वाटत नव्हती. विद्वत सभेने प्रबोधिनीची शिफारस केली पण विद्यापीठ कार्यकारी परिषदेत याविरुद्ध मत असणारे काही लोक होते, पण दोन कर्तृत्ववान नि सज्जन सदस्यांनी पक्षनिरपेक्ष भूमिका घेऊन ठराव पारित करण्याचा आग्रह धरला. १६ मे २००६ ला ही शुभवार्ता हराळीत आली. २९ जुलै २००६ ला कृषी पदविका विद्यालय सुरू झालं.
संकल्पाला शुभ चिंतकांची साथ :
विद्यालयाची वास्तू उत्तम झाली आहे. त्यासाठी कॅनेडियन इन्टरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी (सीडा), महाराष्ट्र सेवा समिती ऑर्गनायझेशन (कॅनडा) आणि दत्तप्रभाकर नि सौ. आशाताई गोखले (यू. एस. ए.) यांनी मोठी मदत केली आहे. वास्तूचं उद्घाटन २५ फेब्रुवारी २००८ ला झालं. तिचं नामकरण ‘प्राचार्य वि. गो. गोखले कृषी पदविका विद्यालय’ असं केलं आहे. डॉ. गोखले यांनी ३० लक्षांचे योगदान विद्यालयासाठी दिले आहे. सीडा संस्थेची मदत कॅनडातील डॉ. जगन्नाथ वाणी यांच्या अनमोल साहाय्यामुळे व मार्गदर्शनामुळे प्राप्त झाली. या दोघांचे आपण ऋणी आहोत.
स्वतः शेती करण्याची प्रेरणा :
जुलै २०१२ ला कृषी विद्यालयाला सहा वर्षे पूर्ण झाली. समृद्ध शेती शिक्षणाबरोबरच महत्त्वाची जीवनमूल्ये, शिस्त, संस्कार हे सारं घेऊन आता पाच तुकड्यांचे विद्यार्थी बाहेर पडले आहेत. अभ्याक्रम दोन वर्षांचा आहे. हे विद्यार्थी कृषी अधिकारी, ग्रामसेवक, मॉल्ससाठी खरेदी अधिकारी, बी-बियाणे विक्रेता कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. यात प्राधान्याने मागासवर्गामधले विद्यार्थी आहेत. प्रतिवर्षी ते दोन तरी कृषी विद्यापीठांना भेटी देतात. जवळपासचे शेतीचे, सहकाराचे प्रयोग पाहतात. प्रबोधिनीतील सिंचन, ऊर्जा, सेंद्रिय खत इ. उपक्रमात काम करतात, फळशेतीत काम करतात. परंतु आपण आपली वैयक्तिक शेती उत्तम आणि किफायतशीर करावी अशी प्रेरणा कमी विद्यार्थ्यांमध्ये आहे. मुलींची संख्या कृषी विद्यालयात हळूहळू वाढत आहे. परंतु झडझडून काम करणं, मैदानावर मोकळं खेळणं हे मुलींना अवघड वाटतं. रोपवाटिका सारखे उपक्रम त्या सासरी गेल्या तरी करू शकतात. आपल्या विद्यालयाला मराठवाडा कृषी विद्यापीठाने ‘अ’ दर्जा दिला आहे. काढणी पश्चात तंत्रज्ञान, फलप्रक्रिया विभाग आणि सामाजिक संस्कार ही आपल्या विद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.
ग्रामीण सवयींशी संघर्ष :
आपण वसतिगृहाची व्यवस्था केली आहे. पण दर बेताचे असूनही काही विद्यार्थ्यांना ते परवडत नाहीत. सकाळच्या उपासनेचा आपला आग्रह काही जणांना आवडत नाही. गावात खोली करायची, गावाकडून धान्य आणायचं, स्वतः स्वयंपाक करून जेवायचं असे काही विद्यार्थी – विद्यार्थिनी करतात. गावात शौचगृहे नाहीत. बाहेर जावं लागतं. ते त्यांना चालतं. कमवा आणि शिका योजना सुरू केली, पण तिला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही. गावात पेईंग गेस्ट मुळे काही गावकऱ्यांचे उत्पन्न वाढलं आहे. हे युवा विद्यार्थी येताना गुटखा आणि तंबाखू ही व्यसनं घेऊन येतात. त्यातून त्यांना सोडवणं अवघड आहे. एका विद्यार्थ्याबाबत तोंडाच्या कर्करोगाची शक्यता येथील आरोग्य शिबिरात ध्यानी आली.
शेतीला पूरक जोड-धंद्यांचंही शिक्षण कृषी पदविका अभ्यासक्रमात देणं अपेक्षित असतं. आपल्याकडे शेळीपालन, गाई-म्हशींचं पालन, खत निर्मिती, रोपवाटिका आणि फळप्रक्रिया असे पाच शेतीपूरक उद्योग उत्तम रीतीने चाललेले आहेत. ते शिक्षण विद्यार्थ्यांना फार लाभदायक आहे. ग्रंथालय आहे पण वाचनाची सवय मुलांना नाही. त्यापेक्षा शेतीवरच्या डीव्हीडीज् ते आनंदाने पाहातात. वर्गातच टिपणं घेण्यापेक्षा त्यांना तयार प्रश्नोत्तरांच्या कॉपीज हव्या असतात. या सवयीमधून त्यांना बाहेर काढायचं हे मोठं आह्वान आहे.
2
मनुष्य बळाची चणचण :
कृषी विज्ञान केंद्र म्हणून हराळीला मान्यता मिळावी असा प्रयत्न चालू आहे. त्या दिशेने पावलं टाकणंही चालू आहे. माती-पाणी परीक्षणाची प्रयोगशाळा आहे. पण कुशल अनुभवी व्यक्ती मिळाल्यावर हा उपक्रम यशस्वी होईल.
रूप पालटायची जिद्द :
गणेशोत्सव मिरवणुकीत कृषी पदविकेच्या विद्यार्थ्यांचा उत्तम सहभाग असतो. ते बर्चा चांगल्या खेळतात. व्हॉलीबॉल आवडीने खेळतात. शेतीविषयक परिसंवादात भाग घेतात आणि स्पर्धा परीक्षांसाठीही काही जण तयारी करतात.
परंतु काळ्या मातीशी जिवंत संबंध निर्माण व्हायला पाहिजे, तो अजून झालेला नाही. प्रार्थनेच्या वेळी आपण सर्वांशी एकत्र बोलतो. सामाजिक परिस्थितीविषयी, युवकांच्या जीवनाविषयी बोलतो. पहिल्या वर्षाच्या ६० नि दुसऱ्या वर्षाच्या ६० युवक-युवतींनी अधिक चांगल्या प्रकारे काम करावं, दक्षिण मराठवाड्याचं रूटप पालटायची प्रेरणा-जिद्द त्यांच्यात जागी व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत.
*************************************************************************************************************