कृषी तांत्रिक विद्यालय, शिवापूर

संजीव तागडे

रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतर :

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील ७०% जनता खेड्यांमध्ये राहते. खेड्यांमध्ये बहुसंख्य लोक शेती आणि शेतीवर आधारित व्यवसायावर अवलबून आहेत. खरीपाच्या हंगामात पावसाने कृपा केली तर वर्षाचं अन्नधान्य तरी मिळतं; पण उरलेल्या वर्षात उद्योग काय करणार? मग चला वाहतूक व्यवसायात ड्रायव्हर म्हणून! नाही तर शहरात मिळेल ते काम करायला. त्यामुळे शहरातल्या मोकळ्या जागांवर झोपडपट्ट्या वाढतात. शहरातील झोपडपटटीचे वाढते प्रमाण व त्या अनुषंगाने त्यांचे विविध प्रश्न जर कमी करायचे असतील तर गावातच पुरेसे अर्थोत्पादन करणे गरजेचे आहे, असे प्रबोधिनीला वाटले.

रोजगार निर्मिती आणि पुरेसं अर्थोत्पादन शहरात मिळते ते मुख्यत्वे उद्योगधंद्यांमुळे. यातील काही उद्योग खेडोपाडी नेले तर शेती सांभाळून उद्योगातही काम करता येईल; या विचारातून १९७१ च्या सुमारास शिवापूरच्या माळावर प्रबोधिनीने ‘कोटिभास्कर स्मृति उद्योग’ सुरू केला. खोऱ्यातल्या सुमारे ३० गावांहून मोठ्या संख्येने तरुण येथे कामासाठी येऊ लागले. या सर्वांना कोणत्याही प्रकारची तांत्रिक पार्श्वभूमी नव्हती. त्यांना यंत्रावर उभे करण्यासाठी सुरुवातीला बरेच कष्ट घ्यावे लागले. उत्पादन करताना प्रशिक्षणासाठी विद्यार्थिसंख्येवर मर्यादा येतात. यावर उपाय म्हणून माध्यमिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक विषय आणि त्या जोडीला शेतीतल्या माती परीक्षणापासून ते ऊती संवर्धनासारखे आधुनिक तंत्रज्ञान शिकवावे, असा विचार पुढे आला. परिसरात यामुळे उद्योग निर्मिती होईल व त्यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उभे राहील, हा यामागील मुख्य उद्देश होता. शेतमाल प्रक्रिया म्हणून करंजावणे येथे खांडसरी उद्योग सुरू होता. या उद्योगाच्या उत्पन्नातून तांत्रिक प्रशिक्षणाचा खर्च भागवता येईल अशी कल्पना होती. सन १९७५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांच्या भेटीतून उद्योग व तांत्रिक प्रशिक्षणासाठी शिवापूर येथे १० एकर जागा प्रबोधिनीला मिळाली.

कृषि तांत्रिक विद्यालयाची सुरुवात :

दरम्यानच्या काळात या भागात प्रबोधिनीची क्रमिक शिक्षणाची शाळा काढा, असा स्थानिक ग्रामस्थांनी आग्रह धरला. म्हणून महाराष्ट्र बोर्डाची मान्यता मिळवून जून १९८१ मध्ये देशपांडे वाड्यातील राम मंदिरात एक-एक वर्ग सुरू केला. इयत्ता ८ वी ते १०वी च्या वर्गासाठी क्रमिक शिक्षणाच्या तासिकांसोबत तंत्र शिक्षणाचे दोन तास घेतले जात होते. त्यासाठी यंत्रशाळेतील काही निवडक यंत्रे कृषितांत्रिक विद्यालयाला देण्यात आली. दहा एकराच्या जागेत या कृषि तांत्रिक विद्यालयाची वास्तू उभी करण्याचे ठरले. परंतु वास्तू उभारणीसाठी पैसा नसल्यामुळे बेल्जियमच्या एका संस्थेकडून निधी मिळवला. प्रशिक्षणाचा भाग म्हणून कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वीट भट्टीवर जाऊन विटा तयार करण्याचा अनुभव घेतला आणि वास्तू उभारण्यासाठी अंशतः काही विटा तयार केल्या. प्रशिक्षणार्थीनी लोखंडी कैच्या तयार केल्या. अशाप्रकारे १९८३ पर्यंत कृषितांत्रिक विद्यालयाची ५,००० चौ. फू. ची वास्तू तयार झाली.

नवजीवन वर्गाची सुरुवात :

सन १९८४ ला विद्यालयाची दहावीची पहिली तुकडी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला बसली. या परीक्षेत नाउमेद झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने दाखवत जून १९८४ मध्ये नवजीवन वर्गाची सुरुवात केली. उद्योगांना विविध प्रकारचे काम कौशल्याने करणारे (multi skilled) कारागीर तयार करणे, हा या ‘नवजीवन’ वर्गामागील मुख्य हेतू होता. म्हणूनच ‘Jack of all trades and master in atleast one’

हे या वर्गाचे सूत्र होते. टर्निंग, फिटिंग, वायरिंग या मुख्य व्यवसायांच्या जोडीला वेल्डिंग, प्लंबिंग हे तर होतेच, शिवाय झेंडू विक्री, फटाके विक्री, औद्योगिक भेटी अशा उद्योजकाला आवश्यक असणाऱ्या अनेक विषयांचे ज्ञान ही मुले मिळवत होती. वयाच्या १६ व्या वर्षीच ही मुले परिसरातील उद्योगात स्थिरावू लागली. १३ मुलांची पहिली तुकडी सीमोल्लंघन करती झाली. दरम्यानच्या काळात जवळपासच्या गावांमध्ये शाळांची संख्या वाढली होती. म्हणून शाळांचा दर्जा वाढवण्यास प्रबोधिनीने मदत करावी व प्रत्यक्ष तंत्र शिक्षणावर भर द्यावा असे ठरवून १९८७ ला क्रमिक शिक्षणाची प्रबोधिनीची शाळा रीतसर बंद केली. त्यानंतर पूर्ण लक्ष तंत्र शिक्षणावर दिले. विविध चाचण्या व निरीक्षणे या आधारावर विद्यार्थ्यांमध्ये उद्योग करण्याची क्षमता आहे का, हे पाहून त्यातील निवडक विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता वर्गाची जोड देण्याचे प्रयोग दोन वर्ष केले गेले. हा नवजीवन वर्ग १९८४ ते १९९४ या कालावधीत चालवला गेला.

ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना (ट्रायसेम) :

सन १९८७ च्या ऑक्टोबर महिन्यात केंद्र शासनाच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (D. R. D. A.) योजनेतून दारिद्र्य रेषेखालील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेद्वारे (ट्रायसेम) संधी दिली गेली. या योजनेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनातर्फे दरमहा ठराविक विद्यावेतन दिले जात असे. १९८७ ते १९९५ अखेर विद्युत तारतंत्री (इलेक्ट्रिक वायरमन), चलित्र पुनर्गुडाळक (मोटर रिवाईंडर), संधाता (वेल्डर) असे वर्ग चालविले गेले. मुदतीअंती विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना कौशल्य प्रमाणपत्र दिले जात असे. पुढे ही योजना शासनाने बंद केली.

अ.क्र.अभ्यासक्रम कालावधी अभ्यासक्रमाची मुदत एकूण विद्यार्थी
१.नवजीवन वर्ग १९८४ ते १९९४ १ वर्ष १३३
२.ट्रायसेम योजना १९८७ ते १९९५ ६ महिने ३६४
३.महारष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मान्यता प१९९५ ते २०१२ ६ महिने ७८६
४.सी,एन.सी २००६ ते २०१२ ६ महिने ९३
एकूण १३७६

शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता :

शिवगंगा खोऱ्याबरोबरच शिवापूरच्या कृषि तांत्रिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा भौगोलिक क्षेत्रात विस्तृत संचार चंदगड ते जळगाव आणि भिलई ते बारामती सारख्या गावांमध्ये झाला होता. ज्ञान प्रबोधिनीच्या गुणवत्तेबाबतही खात्री होती. पण दूरवरच्या गावात आय. टी. आय. आणि शासकीय प्रमाणपत्रांनाच मान्यता होती. यावर उपाय म्हणून आपण करत असलेल्या कामावर शासनमान्यतेची मोहोर उमटवायची. असे ठरले. त्यासाठी विविध प्रकारच्या अटी आणि कागदपत्रांची पूर्तता आणि पाठपुरावा केला. अखेर १९९५ च्या मे महिन्यातं विनाअनुदान तत्त्वावर यंत्रचालक (लेथ मशिन ऑपेरेटर), विद्युत तारतंत्री (इलेक्ट्रिक वायरमन), संधाता जोडणीकार (वेल्डर अँड जॉइंटर) आणि संगणक परिचालक (कम्प्यूटर ऑपरेटर) या चार प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता मिळाली. यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यालयात येऊ लागले.”

हातपंप दुरुस्तीचे अवजार :

पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात हातपंप बसविल्यापासून वापर सुरू असताना त्यात बिघाड होऊ शकतात. असे बिघाड झालेले भाग दुरुस्त करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी बाएफ संस्थेमध्ये एक स्वतंत्र विभाग आहे. यापैकी गुजराथ मधील वासदा या नवसारी जिल्ह्यातील केंद्रासाठी हातपंपाच्या जमिनीखाली बोअरमध्ये तुटून पडलेल्या भागांना बाहेर काढणे आणि दुरुस्त करणे हे जिकिरीचे व आह्वानात्मक काम त्यांच्याकडून प्रबोधिनीकडे आले.

या कामासाठी ‘पाईप लाईन कॅचर’ व ‘रॉड लिफ्टर’ अशी दोन उपकरणे कृषि तांत्रिक विद्यालयात जून २००१ मध्ये पूर्णतः नव्याने विकसित केली गेली. विविध प्रकाराच्या २३ सुट्या भागांपासून ही उपकरणे तयार केली. ड्रॉईंग तयार करण्यापासून ते फॅब्रिकेट करणे आणि तयार केलेल्या गॅझेटची प्रत्यक्ष चाचणी घेणे अशा कामामध्ये श्री. संजीवभाई तागडे आणि श्री. रवी खासबागे या दोघांनी उत्तम प्रकारे काम केले.

या कामासाठी ‘हातपंप रचना व दुरुस्ती’ या पुस्तकाचे लेखक श्री. शरद महाजन तसेच श्री. विनायक कांबळे, श्री. गमनभाई पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले होते.

C. N. C. मशिन्सची जोड :

सन २००० च्या सुमाराला इंजिनिअरिंग उद्योगात कॉम्प्युटराईज्ड अँड न्यूमरिकली कंट्रोल्ड (सी.एन्.सी.) मशिन्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यावर काम करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ फारसे उपलब्ध नव्हते. सी.एन्.सी. लेथ यंत्रांची किंमतही जास्त असल्याने त्यावर काम करण्यास किमान पदविका धारक व्यक्ती लागे व उद्योगांमध्ये त्यांची पळवापळवी चालू असे.

आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मोठा आर्थिक फटका न बसता तरुणांना देता यावे, या उद्देशाने प्रबोधिनीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी चालविलेल्या टेक्नोफोर प्रा. लि. यांनी सी. एन्. सी. ट्रेनर्स लेथ नावाचे टेबल टॉप पण वर्किंग मॉडेल विकसित केले आहे, एवढी माहिती मिळाली होती. तेथील उद्योजकांशी चर्चा केल्यावर लक्षात आले, की हे यंत्र ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण देण्यास योग्य आहे, पण तरीही त्याची किंमत विद्यालयाच्या आवाक्याबाहेरची आहे. उद्योजक श्री. प्रवीण ढोले यांनी मार्ग सुचविला, की प्रबोधिनीने यासाठी रोटरी क्लबशी संपर्क साधावा.

विविध प्रयत्नांमधून रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन यांच्याशी संपर्क झाला. तेथे त्या वर्षी श्री. धनंजय केसकर हे व्यवस्थापन तज्ज्ञ प्रमुख होते. तेही प्रबोधिनीच्या प्रबोधशाळेचे माजी विद्यार्थी होते. २००२ मध्ये एक रीतसर प्रस्ताव त्यांना दिला. त्यांनी रोटरी इंटरनॅशनलकडे चिकाटीने पाठपुरावा केला. २००५ मध्ये त्यास यश येऊन दोन यंत्रे प्रबोधिनीस देणगी देण्याचे ठरले. एक सहमतनामा करून एकूण रु. १०.७० लक्ष किंमतीपैकी रु. १.६० लक्ष प्रबोधिनीने गुंतवायचे ठरवले. रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन त अमेरिकेतील एक रोटरी क्लब यांच्या मिळून झालेल्या निधिसंकलनात रोटरी इंटरनॅशनलने मॅचिंग ग्रँटची भर घालून रु. ९.१० लक्ष रोटरीने देणगी द्यायची, असे ठरले. जानेवारी २००६ मध्ये CNC-2LX:T100 हे टर्निंग सेंटर व CNC-Mill Trainer MT200 अशी दोन यंत्रे शिवापूरला तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात पोहोचली.

औपचारिक कार्यक्रम १४ जून २००६ रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध क्रिकेटपटू श्री. चंदू बोर्डे होते. २००६-०७ या शैक्षणिक वर्षापासून या यंत्रांवर ४ ते ६ महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू झाला. २०११ मध्ये रोटरी क्लब डाऊनटाऊन यांचेकडून शिवाय एका लेथसाठी देणगी मिळाली.

नातू फाऊंडेशनची मदत :

आधुनिक तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ रचण्यास आणखी एका न्यासाने विद्यालयाला मदत केली. तो म्हणजे नातू फाऊंडेशन. श्रीमती कमलाताई नातू यांनी शिवापूरला संगणक प्रशिक्षण चालू व्हावे, यासाठी प्रथम देणगी दिली. त्यांच्याच मदतीतून वेल्ह्याला एक प्रशिक्षण सभागृह बांधले. ब्रिगेडिअर प्रतापराव जोशी या प्रमुख विश्वस्तांनी कार्यकर्त्यांना उत्तेजन दिले. अलीकडे श्री. दत्ता टोळ प्रमुख विश्वस्त झाल्यावरही २०१३ मध्ये शिवापूरला एका मिलिंग मशिनसाठी रु. ७५ सहस्र देणगी मिळाली. अशा त-हेने तांत्रिक प्रशिक्षण हा ग्रामविकसन कार्याचा एक महत्त्वाचा पैलू ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रबोधिनीत चालू आहे.

कृषि तांत्रिक विद्यालयाची फलनिष्पत्ती म्हणजे यातील एक देखील विद्यार्थी सध्या बेरोजगार नाही. परीक्षा सुरू असतानाच त्यांना अनेक कंपन्यांमधून नोकरीसाठी मागणी येऊ लागते. अनेक विद्यार्थी परिसरातील उद्योगांमध्ये स्थिरावले गेले. काहींनी गावातच स्वतःचे उद्योग सुरू केले. आज ते परिसरातील यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत.

सोल्डरिंग स्कूल :

पुण्यामध्ये तांत्रिक प्रशिक्षणाचा एक उपक्रम नोव्हेंबर १९८४ पासून चालू झाला. त्रिवेंद्रमच्या ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ ने विकसित केलेले सोल्डरिंगचे तंत्रज्ञान अन्य क्षेत्रांना उपयोगी पडणार होते. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन ते आत्मसात केले व पुण्यात आल्यावर इलेक्ट्रॉनिक्स व ऑटो-वायरिंग च्या क्षेत्रातील उद्योगांना त्याची माहिती दिली.

उद्योगातील तंत्रज्ञांना हे ‘स्पेस क्वालिटी सोल्डरिंग’ अत्यंत उपयुक्त वाटल्याने प्रशिक्षण वर्गांची मागणी सातत्याने होत राहिली. प्रबोधिनीचे एक स्नेही श्री. माधवराव पाध्ये यांनी या सोल्डरिंग स्कूलची धुरा समर्थपणे सांभाळली. सन १९८४ ते २००० या कालावधीत एकूण ६१ वर्ग झाले. त्यात ४३४ प्रशिक्षणार्थीनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेतला. ६१ पैकी २७ वर्ग मे. बजाज ऑटोसारख्या प्रख्यात कंपनीच्या सदस्यांसाठी चालविण्यात आले, हे विशेष.

या वार्गची उपयुक्तता पाहून सातारा, औरंगाबाद व लखनौ येथे मिळून चार वर्गाची योजना झाली. प्रत्येक वर्ग दहा दिवसांचा झाला. जे प्रशिक्षणार्थी समाधानकारक कौशल्य मिळवीत, अशांनाच प्रशस्तिपत्रके दिली जात. एकूण ३३२ जणांनी अशी प्रशस्तिपत्रके मिळविली, याचा आनंद वाटतो.

******************************************************************************************************************