लेख क्र. १०
१४/६/२०२५

मागील लेखात आपण वाचले की धर्मनिर्णय मंडळाचे कार्यवाह पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांंचे ‘जातीवाद नष्ट व्हावा, आंतरजातीय विवाह व्हावेत’ असे मत होते. त्याच अनुषंगाने मा. श्री. यशवंतराव लेले (माजी विभाग प्रमुख, संत्रिका विभाग) यांनी २०१४ मध्ये लिहिलेला ‘समताधिष्ठित सत्ययुगाकडे जाताना..’ लेख दोन भागांमध्ये येथे सादर करीत आहोत. मा. श्री. यशवंतराव ज्ञान प्रबोधिनीतील समता श्रावणी, समाज ऐक्य समिती, हिंदु-बौद्ध एकता अभियान यांसारख्या उपक्रमांचे/चळवळींचे अध्वर्यू. संत्रिकेतील कामातून सर्व समाजगट जोडले जावेत अशी तळमळ त्यांना नेहमीच वाटते. प्राचीन समाजव्यवस्था व सद्यस्थिती यांवर त्यांनी या लेखात विवेचन केले आहे.
स्वर्णयुगीन समाज – आपला समाज एकेकाळी एकरस, एकजीव आणि एकात्मतासंपन्न होता असे दिसते. त्या समाजाचे वर्णन भागवतात ‘हंसवर्णीय’ असे केले आहे (स्कंध ११). हंस हे विवेकबुद्धीचे प्रतीक म्हणून, निर्मलतेचे द्योतक म्हणून आणि ज्ञानदेवतेचे वाहन म्हणून भारतीय जीवनात सर्वमान्य झालेले आहेत. त्यामुळे त्या आद्य समताधिष्ठित युगास सत्ययुग अथवा कृतयुग ही संज्ञा दिलेली दिसते. यालाच स्वर्णयुग म्हणतात !
ज्ञान संपन्न समाज ज्ञानदेवाच्या, सरस्वतीच्या उपासनेवाचून निर्माण होत नसतो. प्रत्येक व्यक्तीला संचित ज्ञान धारण करणे व पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणे हे शक्य होत नसते. ज्ञाननिधी उत्पन्न होणे हे समाजाचे ऐश्वर्य असते, मग त्या निधीचे पिढ्यापिढ्यांपर्यंत संक्रमण अन् संरक्षण करणे हे महत्त्वाचे कार्य ज्ञानोपासकावर येते. व्यवहारात नवे ज्ञान मिळवणे, त्याचा संग्रह करणे आणि ते पुढच्या पिढीकडे सुपूर्त करणे इ. काम एकाच व्यक्तीने अथवा गटाने चालू ठेवावे अशी आवश्यकता उत्पन्न होते तेव्हा त्या ज्ञानोपासकाच्या कामाचे महत्त्व ओळखून त्याच्या रक्षणाचे काम घेणारा एक समाज घटक उत्पन्न व्हावा लागतो. मग ज्ञानधनात काही क्षती निर्माण होऊ नये, त्याचे रक्षण व संवर्धन होत रहावे यासाठी व्यक्ती व व्यक्तिसमूह ते काम अंगावर घेतो तेव्हा ज्ञान निर्माण करणारा आणि त्याला रक्षण देणारा असे दोन वर्ग तयार होत गेले असावेत. शेवटी ज्ञानाचा आनंद महत्त्वाचा असतो, त्याचे रक्षण ज्याच्यासाठी कर्तव्य ठरते असे ज्ञान एकूण समाजाच्या सुखांसाठी वापरण्यात यावे म्हणून आपल्यापाशी नसणारी सुखसाधने मिळवणारा, त्याचे वितरण करणारा व त्यायोगे सुखी होणारा समाजाचा एक वर्ग उत्पन्न होत गेला असावा. ज्ञानार्जन, त्याचे संरक्षण व सुखसाधन-निर्मिती अशी सारी समाजास हवी-हवीशी वाटणारी कामे करत असताना तीनही प्रकारच्या कामात मग्न राहणाऱ्यांसाठी तांत्रिक सोयी सुविधा पुरवणारा व नानाविध सेवा देऊ शकणारा एक वर्ग उभा राहिला आणि ४ भिन्न कामे करणारे चार समाजघटक अस्तित्वात आले असावेत.
याकाळी वेदाचेही चार प्रकार नव्हते. ‘एक एव पुरा वेदः प्रणवः सर्ववाङ्मयः। देव नारायणो नान्यः एकोऽग्निर्वर्ण एव च ।। (स्कंध ९/१४ भागवत) चार प्रकारची कामे करणारे चार घटक तयार होत गेले. हे समाजाच्या हिताचे व म्हणून इष्ट ते घडले. त्यात उच्चनीचत्व भाव मात्र नव्हता. स्वर्णयुगात ओंकारामध्ये सर्व साहित्याचे सार होते. जलाधारे जीवन व्यापणारा नारायण हा एकच देव होता आणि प्राणिमात्रांना अभयदायक एक अग्नीच होता व वर्णही एकच. उलट ज्ञानानंद घेण्याचा, आत्मिक सुख मिळवण्याचा, अधिकार सर्वांनाच होता. म्हणून ब्रह्मविद्येचा अधिकार संपादन करण्यासाठी वैदिक कर्मानुष्ठानाची गरज उपनिषदात कुठेही सांगितलेली नाही. उलट आत्मतत्त्व ज्ञानाच्या योगाने प्राणी मुक्त होतो आणि अमृतत्त्व पावतो असा उल्लेख कठोपनिषदात येतो (पहा. २.३.८).
महाभारतकालीन वर्णव्यवस्था – साऱ्या उपनिषदांचे सार असे जिचे वर्णन केले जाते त्या गीतेमध्ये “साऱ्या प्राणिमात्रांच्या हृदयात निवास करणारा परमात्मा एकच असल्याने त्याचे संपादन करण्याचा अधिकार मानवमात्रास आहे, मग ती स्त्री असो वा पुरुष तो ज्ञानार्जन करणारा असो वा नाना सेवा उपलब्ध करून देणारा असो” (गीता १८.६१) असे म्हटले आहे. उदाहरणार्थ हनुमंत अथवा विदुर यांपैकी कोणीही उच्चवर्णीय नाही. त्यापैकी कोणीच वैदिक कर्मानुष्ठान पाळणारा नव्हता. पण तरीही त्यांनी आपले जीवन कृतार्थ केलेच, विदुर व हनुमान हे तर चिरंजीव झाले आहेत! सप्तचिरंजीवांमध्ये त्याचा अंतर्भाव झाला आहे. गीतेतच स्वतः श्रीकृष्णाने सांगितलेले दिसते की “गुण आणि कार्यभेदानुसार मी चार वर्ण निर्माण केले आहेत (चातुर्वर्ण्यं मया सृष्टम् गुणकर्मविभागश:।) येथे चातुर्वर्ण्य असा शब्द वापरलेला आहे. चार वर्णांची निर्मिती चार कामांप्रमाणे स्वतः परमेश्वराने, श्रीकृष्णाने केली आहे असा या श्लोकाचा अर्थ होतो. पण गुणकर्म बाजूस ठेवून कर्णाला क्षत्रियत्व नाकारणारी द्रौपदी मात्र वर्ण जन्माधिष्ठित ठरवते आहे. याचा अर्थ महाभारतकाळातच वर्ण हे जन्मानुसार ठरू लागले होते असे मानले पाहिजे. कृष्णाच्या वचनावरून कळते ते येवढेच की केव्हा एकेकाळी वर्ण हे कामानुसार ठरत असावेत. पण महाभारतकाळी, एकलव्याला विद्या नाकारणाऱ्या द्रोणाचार्यांनाही वर्ण जन्माधिष्ठित वाटतो आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वात मात्र म्हटले आहे. शूद्रोऽपि ज्ञानसंपन्नो द्विजो भवति संस्कृतः (१४३) म्हणजे शूद्रवर्णातील कोणी ज्ञानसंपन्न होईल तर ती व्यक्तीही द्विज होऊ शकते. वयोवृद्ध शूद्रास लहान आर्याने वंदन केले पाहिजे (गौतमधर्मसूत्र). द्विज म्हणजे कोण? तर ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य अशा कोणत्याही वर्णातली संस्कारसंपन्न व्यक्ती ।
द्विज म्हणजे कोण? – द्विजत्वाची व्याख्या करतांना जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते। विद्यया याति विप्रत्वं, त्रिभिः श्रोत्रिय उच्यते ।। असे वचन दिले आहे. कोणीही व्यक्ती जन्माला येते तेव्हा शूद्र असते. तिच्यावर सुयोग्य संस्कार होत गेले की तिला द्विजत्व येते आणि विद्याध्ययन-संपन्न अशा द्विजास श्रोत्रिय ही पदवी प्राप्त होते. श्रोत्रिय हा शब्द विद्वान अथवा पंडित अशा अर्थाने रूढ आहे. चातुर्वर्ण्य रूढ झाल्यानंतर पुढे कधीतरी ‘जन्मना ब्राह्मणो ज्ञेयः’ असा द्विजत्वाचा अर्थ मर्यादित झालेला दिसतो आणि शूद्रत्व हे त्रैवर्णिकांच्या पलिकडचे ठरले असावे! पण महाभारतातच (वनपर्व ३१३) सदाचार हे द्विजत्व लक्षण म्हटलेले आहे – श्रुणु यक्ष कुले तात न स्वाध्यायो न च श्रुतम्। कारणं हि द्विजत्वस्य वृत्तमेव न संशयः ।
रामदास म्हणतात – ‘नर तोचि नारायण। जरी प्रत्यये करी श्रवण ।’ पुढे ते म्हणतात,’चिंतनशील असावे, अनुभव घेत घेत नित्य चिंतन चालू राहावे.’ ‘मननशील अंतःकरण। सर्वकाळ। समजले आणि वर्तले। तेचि भाग्य पुरुष जाले।’ (दासबोध), ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले।’ असा आशय अनेक संतांनी त्यांच्या त्यांच्या काळात सोपा करून सांगितला आहे.
मातंग व ब्राह्मणीपुत्र इंद्राच्या कृपेने छंदोदेव झाला. तो खरा चांडाळ, पण त्याला कोणी तपाचरणापासून परावृत्त केलेले नाही. इंद्रकन्या जयंती, तिचे अनेक पुत्र वेदज्ञ, पण ते पुण्यकर्मामुळे ब्राह्मण झाले (भागवत पंचम स्कंध, खंड १ अ-३). राजसूय यज्ञानंतर धर्मराजाने शूद्रांसह सर्वांचे यथाविधी पूजन करून त्यांची पाठवणी केल्याचा उल्लेख भागवतात येतो (भागवत ३.७५). अशा उल्लेखावरून शूद्र हे त्रैवर्णिकांपलीकडचे तरी कसे म्हणावेत असा प्रश्न येतो! शूद्रास वेद ऐकण्याचा अधिकार नसल्याचा उल्लेख वेदात कुठेच नाही. गौतमधर्मसूत्रकाराने पुढे तसे बंधन घातले असावे. स्वतः मनू तर म्हणतो, ‘श्रद्दधानः शुभां विद्यामाददीतावरादपि। अन्त्यादपि परं धर्मं, स्त्रीरत्नं दुष्कुलादपि।’ (२.२३८) म्हणजेच एखादी चांगली विद्या कनिष्ठाजवळ असली तरी ती श्रद्धापूर्वक त्याचेकडून शिकून घ्यावी. हितकर धर्म शूद्रापासूनही स्वीकारावा. अनेक चांगल्या गुणांनी युक्त अशी स्त्री दुष्कुलातील (स्वतःच्या वर्णातील कमी अधिक प्रतीची कुळे) असली तरी ती स्वीकारावी.
वर्णव्यवस्थेतील शिथिलता – अगदी कोणत्याही व्यक्तीकडून कल्याणकारी विद्या घ्यावी. जसे, असुर मानल्या गेलेल्या शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या घेण्यास कच केवढा धडपडला! कामिनी कांतेच्या मोहात न पडता, त्यांना अव्हेरून तो विद्या तेवढी ग्रहण करतो ! भृगुकृपेने वीतहव्य हा द्विज होतो. तो दिवोदास व माधवी(ययातीची कन्या) यांचा पुत्र (म्हणजे शूद्र व क्षत्रिय). धृष्टाचे पुत्र धार्ष्ट हे खरे क्षत्रिय! पण त्याच जन्मात ते ब्राह्मण झाल्याचा उल्लेख आहे. गार्ग्य हे क्षत्रिय! पण त्याच्यापासून ब्राह्मण वंश सुरू झाला (२/२१ भागवत). मनू हा क्षत्रिय. त्याचा पुत्र करुष होय. याच्यापासून कारूष ही क्षत्रियांची एक जात निर्माण झाली आहे. गोरक्षण करताना, चालून आलेल्या वाघास मारताना मनुपुत्र पृषध्राकडून चुकून गाय मारली गेली व त्यामुळे तो शूद्र झाला ! विश्वामित्रांचा मधुच्छंदा हा मुलगा होता. शुनःशेप त्याचा मोठा भाऊ, पण त्याला मधुच्छंदा ‘दादा’ म्हणेना! त्यावर विश्वामित्र रागावले व त्यांनी मधुच्छंदास ‘जा म्लेंच्छ व्हा’ असा शाप दिला! शुनःशेपास मात्र विश्वामित्र हे गोत्र प्राप्त झाले ! मुळात विश्वामित्र हा क्षत्रिय. खूप तपाचरणाने त्याने ब्रह्मपद प्राप्त केले, म्हणजे क्षत्रियास ब्राह्मणत्व मिळाल्याची ही कथा. असे कितीतरी पुरावे देणे शक्य आहे.
हजारो वर्षांच्या कालखंडात समाज बदलत गेला. परकीय आक्रमणांमुळे मुळातील समाजव्यवस्था आमूलाग्र बदलत गेली. ब्रिटिशांच्या आगमनानंतर एकोणिसाव्या शतकारंभी नवशिक्षितांची पिढी समाज सुधारणांचा विचार करू लागली व त्यातून भारतभर सुधारणावादी चळवळी उभ्या राहिल्या ते पुढील लेखात पाहू.