लेख क्र. ११

१५/६/२०२५
लेखाच्या पहिल्या भागात प्राचीन वर्णव्यवस्था कशी होती ते सांगितले. या भागात ‘स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणिसाव्या शतकारंभी नवशिक्षितांची पिढी समाज सुधारणांचा विचार करू लागली व त्यातून भारतभर सुधारणावादी चळवळी उभ्या राहिल्या. यांचा थोडक्यात आढावा मा. श्री. यशवंतराव लेले यांनी घेतला आहे.
समाज-सुधारणा – इंग्रजी राजवटीत आगगाडीसारखी परिवहन साधने आली. जातपात न पाहता प्रवासी म्हणून एकमेकांपाशी बसण्यास सुरवात झाली. सार्वजनिक ठिकाणची अस्पृश्यता ढिली होऊ लागली. शासकीय सेवेत असतानाही जातिभेदाची उग्रता सौम्य होत गेली. सैन्यामध्ये जातिनिहाय पलटणी असल्या तरी सारे साहेबांचे गुलाम म्हणून एकाच प्रकारची सुखदुःखे अनुभवू लागले. अशात एकोणिसाव्या शतकारंभी नवशिक्षितांची पिढी समाज सुधारणांचा विचार करू लागली. भारतीय विद्येचे पुनरुज्जीवन होऊ लागले. मग केरळात नारायणगुरू हे दलित समाजातील सुधारक पुढे आले. त्यांनी संस्कृतमध्ये व मल्याळममध्ये ग्रंथलेखन केले. ते संस्कृतज्ञ होते इतकेच नाही तर त्यांची पत्नीही संस्कृत बोलू शकत होती. नारायणगुरू यांनी शेकडो मंदिरे उभारली व समाजात भक्तीचा एक प्रागतिक संप्रदायच उभा राहिला.
कर्नाटकात डोंगरे गुरूजींनी आपल्या पत्नीला संस्कृतज्ञ केले इतकेच नव्हे तर स्त्रियांचा संस्कृत शिकण्याचा अधिकार शास्त्रचर्चेत सिद्ध करून शेकडो सनातनी ब्राह्मणांना आपले म्हणणे मान्य करण्यास भाग पाडले. या अनंतशास्त्री डोंगरे यांची सुकन्या म्हणजे रमा. तीही लहानपणी वडलांच्या मांडीवर बसून शास्त्रचर्चा ऐकता ऐकता स्त्रियांच्या अधिकाराची जबरदस्त पुरस्कर्ती बनली. डोंगरे कुटुंबाचे जीवनच संस्कृतमय झाले होते. त्यामुळे कुठल्याच शाळेत दाखल न झालेली रमा कलकत्ता विद्यापीठाकडून, तिच्या समस्यापूर्तीतील चमत्कारांमुळे ‘पंडिता’ ही पदवी घेऊन आली.
दयानंद सरस्वतींनी वेदांना प्रमाण मानत आर्यसमाजाची स्थापना केली (१८७५). सर्ववर्णीयांना उपनयन संस्काराची द्वारे खुली करून ते थांबले नाहीत तर मुलींसाठीही त्यांनी हा संस्कार सुरू केला. मुलींना विद्याव्रताची दीक्षा देण्याचा अधिकार त्यांनी महिलांनाच दिला व दोन महिलांना दीक्षा देऊन त्यासाठी अधिकारी बनविले (हंसा ठकुराणी व माई भगवती). मूर्तिपूजेला विरोध करणारे दयानंद पाश्चात्य प्रभावाने नव्हे तर वेदांच्या सखोल अध्ययनामुळेच या साऱ्या समाजसुधारणांना प्रवृत्त झाले हे विशेष! यानंतर स्वामी विवेकानंद यांनी बंगालमध्ये भगवान रामकृष्ण यांच्या स्मृतिदिनी सर्व वर्णीयांना यज्ञोपवीत दीक्षा देण्यास प्रारंभ करून राजाराममोहन रॉय यांनी सुरू केलेले समाजसुधारणेचे कार्य प्रभावीपणे पुढे नेले. वेदांचा अधिकार कोणाला आहे हे वेद कोठेच कोणाला सांगत नाहीत. पुराणे ते सांगतात, असे विवेकानंद म्हणतात.
निषिद्ध संयोगातून जन्मास आलेले वसिष्ठ, कोळीणपुत्र व्यास, दासीपुत्र नारद हे आम्हाला वंद्य कसे झाले? असा प्रश्न करून स्वामींनी श्रेष्ठत्व हे जन्माधिष्ठित नव्हे तर कर्माधिष्ठित असल्याचे ठासून सांगितले. ऋष्यशृंग व अगस्ती यांचे जन्मही असेच, सांगू नयेते असे ! त्यामुळे ऋषींचे कूळ शोधू नये असे म्हणतात. रवीन्द्रनाथ ठाकूर हे महाकवी. त्यांचे घर ब्राह्मो समाजाचे केंद्र! पण चैत्र शु. पंचमीला त्यांनी ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना केली व सर्ववर्णीयांना गायत्री मंत्राची दीक्षा दिली. ते म्हणाले, “तुम्ही व्रतधारी झालात. गुरू हाच देव माना. तनमनधनाने पवित्र राहा.” काशीच्या हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक आणि काँग्रेसचे एकेकाळचे अध्यक्ष महामना पंडित मदन मोहन मालवीय यांनी गंगेच्या काठी अनेक बटूंना त्यांच्या जातींचा विचार न करता यज्ञोपवीत दिले.
धर्मनिर्णय मंडळाच्या म.म.पां. वा. काणे इ. धर्मपंडितांनी सूर्योपासना, गायत्री व गीता ही त्रयी हिंदू सांस्कृतिक एकतेसाठी समाजात लोकप्रिय करावी असे म्हटले. मुलींसाठी उपनयनाचा अधिकारही त्यांनी स्पष्टपणे घोषित केला. आधुनिक धर्मपरिवर्तनवादी पांडुरंगशास्त्री आठवले यांनी मुंजीसाठी नवी परिभाषा वापरली. ते म्हणतात, “ध्येय देण्यासाठी यज्ञोपवीत संस्कार आहे. ध्येय म्हणजे व्रत घेण्याची इच्छा होत नाही तोवर जानवे व्यर्थ होय”.
विविध संस्कारांमधून विविध गुणधर्म व्यक्तीचे ठिकाणी निर्माण होत जावेत व तिची माणुसकी शुध्द होत जावी ही वास्तव अपेक्षा असावी. प्रत्येक संस्कारामागे काहीना काही जीवनोद्दिष्ट असते ते आपण शोधावे अशी प्रबोधिनीची भूमिका असते. संत्रिकेतील संस्कार (पौरोहित्य) उपक्रम याच विचारातून विकसित होत गेला.
संस्कारांचे महत्त्व – धर्मसंस्कार ही संकल्पना वेदकालाइतकी जुनी आहे. सम म्हणजे योग्य व कृ (कार) म्हणजे कृती करणे. योग्य कृती हा या संस्कार शब्दाचा अर्थ झाला. ‘संस्कार’ शब्दाची व्याख्या अनेक प्रकारे केलेली आहे. अगदी संक्षिप्त व्याख्या अशी आहे – ‘संस्कार-शब्द: इष्टरूपान्तरकरणे प्रयुक्त:।’ – याचा अर्थ ‘आपल्याला हवा असणारा असा चांगला बदल घडवणे म्हणजे ‘संस्कार’. यापेक्षा अधिक स्पष्टीकरण देणारी व्याख्याही आहे. ती अशी – संस्कार: स्यात् गुणाधानेन वा दोषापनयनेन वा। याचा अर्थही सोपा आहे – काही सद्गुण निर्माण केल्याने अथवा काही उणीव दूर केल्यामुळे संस्कार झाला असे म्हणता येईल म्हणजे सद्गुण संवर्धन आणि दोषनिवारणाने संस्कार झाला असे म्हणता येते. व्यक्तीचा, माणूस म्हणून जो विकास व्हायला हवा असतो त्यासाठी भारतीयांमध्ये नाना संस्कार रूढ झाले आहेत. जीवनात अत्यावश्यक असणारे जल प्रसंगी गाळून घ्यावे लागते. हा एक संस्कारच आपण पाण्यावर करतो. पाणी उकळून घेणे, त्यात तुरटी फिरवणे हे सारे, सहजपणे उपलब्ध पाणी, हवेतसे ‘संस्कार’ करून घेणे असे म्हणता येते. हे इष्टरूपान्तरकरण म्हणता येते आणि दोषापनयनही!
संस्कार केल्याने काय होते? या प्रश्नाचे एक उत्तर आहे. ते असे – संस्कारात् द्विज उच्यते। – संस्कार केल्यामुळे व्यक्तीस द्विज म्हणता येते. द्विज म्हणजे काय? दोनदा जन्मतो तो द्विज. पण म्हणजे तरी का? मातेच्या उदरातून जन्माला येणे हा एक जन्म आणि विद्याविनय संपन्नता प्राप्त होणे हा जणू माणसाचा दुसरा जन्म! माणुसकीने युक्त तोच खरा माणूस म्हणवून घेण्यास पात्र. या सर्व चर्चेने हे स्पष्ट होते की मूल जन्माला आले की ते आईवडिलांचे काही गुणधर्म घेऊन जन्मास येते. पण भाषा शिकणे, चालायला शिकणे, माणसे व आसपासची सृष्टी ओळखायला शिकणे, याशिवाय माणुसकी येणार कशी? जन्माला येणाऱ्यास कौटुंबिक वातावरण, सामाजिक वातावरण मिळाले नाही तर काय होईल?
शूद्र शब्द ‘श्वि आणि द्रा’ या दोन धातूंपासून बनलेला आहे. ‘श्वि’ धातूचा संस्कृत मध्ये अर्थ आहे ‘वाढणे’. ‘द्रा’ धातूचा अर्थ चालणे, धावणे असा आहे. जो नुसता वेगाने वाढत जातो. त्यावर काही संस्कार गुणवर्धनासाठी होत नाहीत असा माणूस शूद्र होय. या अर्थाने ‘शूद्र’ म्हणजे ‘संस्काररहित’ हाच अर्थ समजतो, त्यामुळे ‘जन्मना जायते शूद्र:’, जन्माने कोणतीही व्यक्ती शूद्र असते आणि संस्कार झालेली व्यक्ती द्विज बनते हे म्हणणे रास्त वाटते. म्हणजे रूढ अर्थाने व्यक्ती ब्राह्मण असो क्षत्रिय वा वैश्य असो संस्कार होईपर्यंत ती शूद्रच ठरते. समाजात बाहेरून कोणी व्यक्ती आली असता व ती संस्काररहित असल्यास ती संस्कार होऊन आपल्यात यावी अशी अपेक्षा सहजच भारतीय समाजात असणार. त्यामुळे अशा तीन वर्णांपलिकडे असणारी व्यक्ती शूद्र अथवा पंचजन अथवा म्लेंच्छ मानली जात होती असे दिसते. शिवाय समाजातील एखाद्या व्यक्तीस काहीही कारणाने संस्कार व्हायचे राहिले असल्यास तिला व्रात्य मानत. व्रात्यास राहिलेले संस्कार करून समाजात दाखल करून घेण्यासाठी यज्ञ करत, त्याला व्रात्यस्तोम म्हणत. शक, हूण इ. अनेक जाती याच समाजाने पचवल्या म्हणजेच आपल्यात सामावून घेतले. संस्कारशून्य व्यक्ती समाजातून बहिष्कृत केली जाण्याचाही एक काळ होता असे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक संस्कारापूर्वी त्यांचेवर मुंजीपासून सारे संस्कार करून मग राज्याभिषेक संस्कार करण्यात आला, हे आपण जाणतोच. मुळात परदेशात, परधर्मात जन्मास आलेली व्यक्तीदेखील संस्कारपूर्वकसमाजात दाखल होऊ शकते, ही भारतीयांची स्वीकारशीलता इतिहासावरून दिसते.
सद्यस्थिती – आता आपल्या समोरचा मुख्य प्रश्न हा आहे की चार वर्ण सोडून दिले तरी ४ हजाराहून अधिक जाती जमाती आज आपल्या समाजात दिसतात. त्याचे मूळ कशात आहे. तांब्याची भांडी बनवणारे तांबट झाले. तांबूल म्हणजे विड्याचे पान, त्याचा व्यवसाय करणारे तांबोळी झाले. प्राण्या-पक्ष्यांची पारध करणारे पारधी झाले. चामड्याच्या वस्तू करणारे ते चमार वा चांभार! अशा प्रकारे उद्योग व्यवसायामुळे जाती वाढत गेल्या आहेत. आज सैन्यात नोकरी करणारा सैनिक असतो. मग तो ब्राह्मण असो की वैश्य वा शूद्र असो. शैक्षणिक क्षेत्रात असणारी व्यक्ती ही शिक्षक म्हणावी. त्याप्रमाणे धर्मसंस्काराच्या क्षेत्रात काम करणारा पुरोहित म्हणावा. त्याची जात पहाण्याची जरूर नाही. स्त्री-पुरुष हा भेदही या बाबतीत पाहात राहणे कालबाह्य ठरायला हवे.
मध्यंतरी सोलापुरात विविध जातीतील युवकयुवतींनी पौरोहित्याचे शिक्षण घेतल्याचे वाचनात आहे. त्यातीलच काही पंढरपूरच्या पांडुरंगाची पूजा करण्यासाठी गुणवत्ता पाहून, परीक्षा घेऊन, नेमण्यात आल्याचे सर्व जाणताताच. हे सर्व जातीनिर्मूलन कार्यच आहे. त्यामुळे संस्कार कार्य करणारी व्यक्ती, स्वच्छ वाणी असलेली, संस्कार कार्याचे मर्म जाणणारी, शुर्चिभूत अशा वर्तनाची असावी इतकीच अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही.
एकविसाव्या शतकासाठी जाती-पंथ विरहित समाज ही एक आदर्श व्यवस्था आहे. मात्र त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आधी मना-मनातील भेदभाव नष्ट व्हायला हवेत तरच हे स्वप्न सत्यात येऊ शकते.
समाप्त