हरिभजनावीण काळ घालवू नको रे
हरिभजनावीण काळ घालवू नको रे । ज्ञानार्जनावीण काळ घालवू नको रे ।।धृ।।
दोरीच्या सापा भिउनि भवा, भेटि न होती जीवा शिवा । अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ।।१।।
विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे की बोल । अपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ।।२।।
संतसंगतीने उमज पाडुनि मनि उरते समज । अनुभवावीण मान डोलवू नको रे ।।३।।
सोहिरा म्हणे ज्ञानज्योति तेथे कैची दिवसराती । तयेवीण नेत्रपाती हालवू नको रे ।।४।।
वर्षारंभ उपासनेची पोथी मी पहिल्यांदा जेव्हा ऐकली तेव्हा त्यातला
व्यसनानि सन्ति बहूनि, व्यसनद्वयमेव केवलं व्यसनम् ।
विद्याभ्यसनं व्यसनं अथवा हरिपादसेवनं व्यसनम् ।।
हा श्लोकच माझ्या लक्षात राहिला. तो ही त्याच्या अर्थापेक्षा उपासनेत देखील व्यसन हा शब्द येऊ शकतो या कल्पनेमुळे. त्यावर्षी वर्षान्ताच्या उपासनेमध्ये ‘हरिभजनावीण काळ …’ हा अभंग ऐकला. श्लोकातल्या दुसऱ्या ओळीचा अर्थ या अभंगाच्या धृपदामुळे चांगला लक्षात आला. ‘विद्याभ्यासनं व्यसनं’ म्हणजे ‘ज्ञानार्जनावीण काळ घालवू नको रे’ आणि ‘हरिपादसेवनं व्यसनं’ म्हणजे ‘हरिभजनावीण काळ घालवू नको रे’ हे चांगले लक्षात आले. वर्षान्त उपासनेच्या पोथीमध्ये या अभंगाच्या आधी ‘परमेश्वर स्मरण, ज्ञानार्जन आणि राष्ट्रपूजन हाच आमचा स्थायीभाव होवो’ असे वाक्य अध्वर्यूच्या तोंडी आलेले आहे. अभंगामध्ये राष्ट्रपूजनाचा उल्लेख कुठेही आलेला नाही. पण हिंदू राष्ट्राच्या बाबतीत ज्ञानार्जनाबरोबर परमेश्वरस्मरणही राष्ट्रपूजनाचा अविभाज्य भाग आहे ही दिशा त्यामुळे विचारांना मिळाली.
धृपदापुढची अभंगातली चारही कडवी पहिल्या म्हणण्यामध्ये समजणे अवघडच होते. व्यसन या शब्दामुळे आधीचा श्लोक लक्षात राहिला. त्याचप्रमाणे या अभंगातील ‘दोरीचा साप’, ‘चिखल कालवू नको’ आणि ‘मान डोलवू नको’ या शब्दप्रतिमांच्या वेगळेपणामुळे हा अभंगही कायमचा लक्षात राहिला. या प्रतिमांचा अर्थ हळूहळू लक्षात येत गेला.
अपुऱ्या प्रकाशामध्ये आपल्या पासून थोड्याश्या अंतरावर एखादी जाड दोरी पडली असेल तर त्या ठिकाणी साप आहे असे आपल्याला वाटू शकते. डोळ्यांना दोरीच दिसत असते. पण आपल्या मनातली सापाची भीती दोरीवरती टाकते आणि मनातल्या भितीचा पुन्हा एकदा अनुभव घेते. दोरीच्या जागी साप दिसणे आणि काळोख्या रात्री दूरवरच्या झाडाचा बुंधा माणसासारखा वाटणे ही उदाहरणे भारतीय तत्त्वज्ञानात अनेक वेळा वापरलेली आहेत. प्रत्यक्षात दोरी असूनही सापाचा भास होतो, तसेच प्रत्यक्ष शिव असून भवाचा भास होतो. भव म्हणजे सतत बदल होत असणारे, ज्यात काहीतरी घडते आहे आणि काहीतरी बिघडते आहे, ज्यात रचना आणि संहार सतत सुरू आहे, असे विश्व. दोरीच्या जागी साप पाहून मन जसा भितीचा अनुभव घेते तसे चिदानंदरूपी शिवाच्या ठिकाणी भवाचा भास होऊन जीव घाबरून जातो. खरे तर जीव वेगळा नसून शिवाचाच भाग आहे. परंतु ते माहीत नसल्यामुळे जीव स्वतःला भवामध्ये म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला समजतो. मनाच्या अगदी आतल्या भागातील हे अज्ञान जाऊन ज्ञानरूपी दिवा लागला की भवाच्या जागी शिवच दिसायला लागतो आणि आपण भव पाहणारा, अनुभवणारा जीव नसून शिवच आहोत याचीही खात्री पटते. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ असे म्हटले असले तरी ते जीव आणि शिव एकच असल्याचा अनुभव घेतलेल्यांसाठी म्हटलेले आहे. हा अनुभव न घेतलेल्या अज्ञानी लोकांसाठी ‘ज्ञानदिवा मालवू नको’ याचा अर्थ सतत हरिभजन करत लवकरात लवकर ज्ञानदिवा उजळून टाक असा आहे. दोरी आणि सापाच्या अगदी साध्या उदाहरणावरून तत्त्वज्ञानातली एक अवघड गोष्ट सांगितली आहे.
अंतरीचा ज्ञानदिवा पेटविण्यासाठी सतत हरिभजन करायला हवे. तसेच वास्तव आणि भास यातला फरक ओळखण्यासाठी ज्ञानार्जनाने विवेकशक्ती जागृत करायची असते. कै. आप्पा अनेक वेळा सांगायचे की ज्याला न सांगता समजते तो शहाणा. शहाणा होण्यासाठी जी मेहनत करायला लागते तिलाच धृपदामध्ये ज्ञानार्जन असे म्हटले आहे. शहाणपण येण्यासाठी प्रथम रास्त माहितीचा साठा आपल्याकडे तयार व्हावा लागतो. मग विचार करून, विश्लेषण करून, माहितीवर प्रक्रिया करून, त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होते. ते ज्ञान अनुभवाशी ताडून पाहिल्यानंतर त्याचे शहाणपणात रूपांतर होते. अर्धवट किंवा ऐकीव माहितीच्या आधारे फार विचार न करता, विश्लेषण न करता, प्रत्यक्ष अनुभवाशी ताडून न पहाता, एखाद्या संवादामध्ये, संभाषणामध्ये किंवा सभेमध्ये आपले मत मांडले म्हणजे लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. यालाच मतामतांचा चिखल कालवणे म्हटले आहे. धुळीने भरलेल्या अंगणामध्ये कसेही पाणी टाकले की चिखल होतो. योग्य रितीने सडा टाकला की धूळ खाली बसते. मातामतांचा गोंधळ शांत होईल, लोकांच्या मनातील संशय दूर होईल असे आणि एवढेच बोलणे म्हणजे विवेकाची ओल पुरविणे. सर्व परिस्थितीत आपल्याला ही विवेकाची ओल पुरवता यावी म्हणून माहितीचे ज्ञानात आणि ज्ञाानचे शहाणपणात रूपांतर करण्यासाठी सतत ज्ञानार्जन केले पाहिजे.
शहाण्या लोकांच्या संगतीत शहाणपण लवकर येते. व्यवहारातील दोरी आणि सापातील विवेक आणि तत्त्वज्ञानातील शिव आणि भवाचा विवेक करणे हा संतांचा स्वभाव झालेला असतो. या दोन्ही प्रकारचा विवेक जो करू शकतो तोच खरा संत. अशा संतांच्या संगतीत राहिले, त्यांचा सहवास सतत लाभला की आपल्यासाठी विवेक कसा करायचा हे अनुभवातून कळल्यामुळे खात्री पटते. त्याला ‘उमजणे’ असे म्हणतात. आणि अनुभव न घेता केवळ शाब्दिक ज्ञान झाल्यामुळे जे आपल्याला कळले असे वाटते त्याला ‘समजणे’ असे म्हणतात. एखादी गोष्ट समजून उमजून कर असे आपण बोलताना म्हणतो म्हणजे सिद्धांत समजून घे आणि अनुभवही घे. समजून उमजून साठीच इथे ‘पुरते समज’ असे शब्द वापरले आहेत. संत आपल्याला सिद्धांतही सांगू शकतात आणि प्रात्यक्षिकही दाखवू शकतात. म्हणून त्यांच्या संगतीत राहून पुरते समजून घ्यायचे असते. एखादे भाषण ऐकताना वक्त्याचे शब्द ऐकल्यावर त्यावेळी श्रोत्यांना समजल्यासारखे वाटते आणि ते मान डोलावतात. पण ते श्रोत्यांना झालेले केवळ शब्दज्ञान असते. त्यांना अनुभव नसतो. वक्त्याचे भाषण ऐकून समजल्यासारखी मान डोलवू नको. संतांच्या संगतीमध्ये स्वतः अनुभव घे आणि पुरते समजून घे. गुरूचे सांगणे किंवा दाखविणे, स्वतःचा अनुभव आणि इतर अनेकांच्या अनुभवातून तयार झालेले सिद्धांत हे सर्व एकमेकांशी जुळले की पुरते समजले असे म्हणतात.
तीन सोप्या उदाहरणांच्या साहाय्याने तत्त्वज्ञानातल्या गहन गोष्टी संत सोहिरोबा यांनी इथे सांगितल्या आहेत. संत सोहिरोबा हे पेशवाईच्या काळातील कोकणातील संत होते. ह्या अभंगातील तीन कडव्यांमधील गहन गोष्टी म्हणजे जीवाशिवाचे ऐक्य अनुभवणे, व्यवहारात विवेकाने लोकांमधील मतभेद संपवता येणे आणि अनुभवासहित सिद्धांत समजून घेणे. या तीन्ही गोष्टी प्रयत्नाने साध्य करायच्या आहेत. अखंड हरिभजन आणि ज्ञानार्जन ही त्या साध्य करण्याची साधने आहेत. आपण साधनाकडे लक्ष द्यावे. साध्यापर्यंत एक दिवस आपण पोहोचणारच आहोत. तिथे पोहोचण्याची खूण सोहिरोबा शेवटच्या कडव्यात सांगतात. ज्याच्या अंतरीचा ज्ञानदिवा सतत तेवतो आहे, त्याला कुठे अंधार दिसतच नाही. म्हणजे त्याला कधी भ्रम होतच नाही. त्याला व्यवहारातील वास्तवच नेहमी कळते. आणि तत्त्वज्ञानातील वास्तव अनुभवाला येते. त्याच्या दृष्टीने सर्व ज्ञानाच्या प्रकाशात म्हणजे दिवसाउजेडीच होते. चोवीस तास उजेडच असल्यामुळे त्याच्या दृष्टीने दिवस रात्र असा भेदच नसतो. तो दोरीला साप मानत नाही. मतामतांचा चिखल कालवत नाही आणि अनुभवाशिवाय उगीच समजल्यासारखी मान डोलवत नाही. इतकेच काय त्याच्या पापण्यांची उघड-झापही अनवधानाने होत नाही. तो सर्वकाळ सावधान राहून साध्य गाठले असले तरी साधन करत असल्यासारखे आपले सर्व व्यवहार इतर साधकांच्यासाठी उदाहरण म्हणून करत असतो.
गिरीश श्री. बापट