
दिनांक ८ जून २०२५
लेख क्र. ५
प्रा.अर्जुनवाडकर यांच्या संस्कृत विषयी प्रेम व आस्था दर्शविणारे संस्कृत मधील अभिनव वंदे मातरम् प्रमाणे त्यांनी विविध प्रसंगी देण्यासाठी केलेल्या संस्कृत शुभेच्छा पण सुंदर आहेत. अर्थात संत्रिकेच्या नावातील संस्कृत विषयाचे काही छोटे मोठे उपक्रम त्यांच्या काळात झाले . संत्रिका सुरू झाली तेव्हा तिला स्वतःची जागा नव्हती.दोन वर्ष हे काम प्रा.अर्जुनवाडकर यांच्या घरूनच व्हायचे.
या कामातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘धर्म निर्णय मंडळाच्या’ कामाचा ज्ञान प्रबोधिनीने केलेला स्वीकार. प्रबोधिनी पद्धतीने होणाऱ्या संस्कारानी आता भारतात व भारता बाहेर चांगलेच मूळ धरले आहे. याच्या मागे असलेल्या तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेचा परिचय आपण करून घेणारच आहोत.
प्रा. अर्जुनवाडकर यांच्या संत्रिकेच्या कामात सुरवातीला असलेल्या दोन मदतनीस म्हणजे वीणा गद्रे व त्यानंतर वीणा करमरकर यातील वीणा करमरकर ताईंनी त्यांच्या त्या काळातील आठवणी येथे पाठवल्या आहेत त्याबद्दल,
“🙏मी पूर्वाश्रमीची वीणा करमरकर. १९७८ ते १९८० या दोन वर्षात मी मा. कृ. श्री. अर्जुनवाडकर संत्रिकेचे प्रमुख , यांच्या हाताखाली काम केले आहे. त्या विभागात मी एकटीच मदतनीस होते . माझ्या आधी ‘वीणा गद्रे’ ही मदतनीस होती. लेखात उल्लेख केलेल्या लोणावळा येथील पं. कोकजे शास्त्रींची, ‘धर्म निर्णय मंडळा’ ची ‘उपनयन संस्कार’, ‘विवाह विधी’, ‘श्राद्ध विधी’ इ. पुस्तके पुण्यात ‘प्रबोधिनी’त आणण्याचे काम वीणा गद्रेने केले आहे., तर नंतर त्याच्या पुनर्मुद्रणाची व्यवस्था मी बघितली आहे. प्रभात रोड वरील ‘मा. गोडबोले’ यांच्या अफाट संग्रहातील पुस्तकांच्या नोंदी करून तीही संत्रिकेच्या ‘ग्रंथालयात आणण्याचे काम मी केले आहे.
याच काळात मा.अर्जुनवाडकर सरांनी ‘वाग्विमर्शिनी’, हा दुकानांची नावे ‘शुद्ध’ मराठीत लिहिण्यासाठी आग्रह धरणारा एक उपक्रम केला होता. “त्रिंबक मोरेश्वर” नको, “त्र्यंबक मोरेश्वर” हवे …पण दुकाने याच नावाने ‘रजिस्टर’ झाली असल्याने, नावे बदलता येणार नाहीत, म्हणून तो उपक्रम बारगळला.
खरे, प्रत्यक्ष मकर संक्रमण….. सध्या २२ डिसेंबर ला होत आहे, काही वर्षांनी ते २१ डिसेंबरलाच होईल आणि आपण ‘मकर संक्रांत’ १४ ऐवजी १५ जाने.ला साजरी करू….हा विरोधाभास आहे. प्रत्यक्ष ‘खगोलशास्त्रा’ला अनुसरून हे का नाही, कसे नाही याचा अभ्यास करण्यासाठी १०० वर्षांच्या जुन्या पंचांगांचे ‘वाचन’ केले, नोंदी केल्या..आणि मा. आप्पांनी ज्ञानप्रबोधिनीत २२डिसेंबरला ‘संक्रात’ साजरी करण्याची पद्धत सुरू केली.(सध्या ती पद्धत चालू आहे का कल्पना नाही)….थंडीची तीव्रता तेव्हाच असल्याने तेव्हाच तीळ-गूळ खाणे आरोग्यदायी आहे.
“कालदर्शिका” काढावी असे ठरले., तेव्हा त्यासाठीचा ‘आराखडा’, खगोलशास्त्रीय माहितीचे संकलन, मजकूराचे लेखन, छपाई, नंतर विक्री व्यवस्था अशा अनेक गोष्टी मी हाताळल्या आहेत. या कामात ज्योतिषी पं वि.धों.गोरेशास्त्री, हवामानखात्यातील निवृत्त अधिकारी मा.वि.वि. मोडक, यांची खूप मदत झाली.
लक्षात रहाणारी महत्त्वाची घटना म्हणजे “१६ फेब्रुवारी १९८०” चे “खग्रास सूर्यग्रहण” मा. वि.वि. मोडक यांनी त्याचे नियोजन केले होते. कर्नाटकातील ‘शिरहट्टी’ या गावातील एका मठाच्या विस्तृत मोठ्या मोकळ्या मैदानावर ज्ञानप्रबोधिनीचे काही विद्यार्थी, शिक्षिका आणि आम्ही गेलो होतो. ग्रहण बघण्यासाठी विशेष चष्मे दिले होते. विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोग करून घेतले, त्यांना दाखवले. ग्रहणस्पर्श , पूर्ण ‘खग्रास’ग्रहण, ‘करोना’, पूर्ण ग्रहण सुटणे म्हणजे काय, त्या वेळेस हवेत होणारे बदल, पक्ष्यांचे आवाज कमी होत जाणे, थांबणे आणि नंतर एकदम किलबिलाट सुरू होणे, हे सर्वांनीच अनुभवले.
आज ‘ग्रहण बघणे’ हा ‘टूरिझम’चा एक ‘इव्हेंट’ झाला असला तरी ४५ वर्षांपूर्वी असे प्रयोग करणे, याचे महत्त्व वेगळेच होते.”