योगी अरविंद यांचे महाकाव्य ‘सावित्री’

१० जून २०२५

लेख क्र. ६

  • योगी अरविंद हे ज्ञान प्रबोधिनीच्या चार पथदर्शकातील एक आहेत. श्री अरविंद हे भारतीय राष्ट्रवादी, भारतीय तत्त्वज्ञ, योगी आणि महर्षी होते. त्यांचे साहित्य अनेकांना गूढ वाटते. यातील काही साहित्यात  प्रतीकात्मकता आहे जी त्यांचे सखोल चिंतन दर्शविते. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर काल आपण वडाचे महत्त्व वाचले. आजच्या या व्हिडीओमध्ये वटपौर्णिमेच्या व्रताच्या कथेतील प्रमुख पात्रे सावित्री, सत्यवान, द्युमत्सेन (सत्यवानाचे वडील) व यम यांचे तत्त्चज्ञानात्मक  रूप अरविंद यांनी  उलगडले आहे.

मुळात महाभारतातील या कथेचा विस्तार लहान आहे. पण श्री अरविंदांचा असा विश्वास होता की सावित्रीच्या कथेमध्ये एक गहन अर्थ दडलेला आहे, जो कालांतराने हरवला आहे. त्यांनी हा अर्थ शोधण्यासाठी आणि मांडण्यासाठी सुमारे ४० ते ५० वर्षे मनन चिंतन केले व त्यांच्या या प्रदीर्घ चिंतनातून  ‘ ‘Savitri: A legend and a Symbol’ या महाकाव्याची निर्मिती झाली. Blank-verse (verse without rhyme, especially that which uses iambic pentameters. -oxford dictionary) मध्ये लिहिलेल्या या काव्याची  एकूण १२ पुस्तके (Books) आणि अंदाजे २४,००० ओळी (Lines) आहेत. मूळ महाभारतातील ही कथा संस्कृत ग्रंथामध्ये सुमारे ७०० ओळींची आहे.

या कथेमागील गहन अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला की समजते अरविंदांची सावित्री ही महाभारतातील सावित्रीपेक्षा पूर्ण वेगळी आहे :

सावित्रीची निवड: त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले की महाभारतात इतर अनेक स्त्री पात्रे असताना त्यांनी सावित्रीची निवड का केली? यावर श्री अरविंद  म्हणाले की सावित्री हे एकमेव पात्र आहे जे आयुष्यात कधीही रडले नाही. ती कोणत्याही परिस्थितीत अत्यंत दृढनिश्चयी आणि परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होती, म्हणूनच त्यांनी सावित्रीची निवड केली.

कथेतील प्रतीकात्मकता (Symbolism): श्री अरविंद यांनी या कथेला केवळ दंतकथा (Legend) न मानता एक प्रतीक (Symbol) म्हणून पाहिले आणि त्यामागील गहन प्रतीकात्मक अर्थ स्पष्ट केला.

सावित्री: ती सर्जनशील निर्मात्याची  कन्या आहे, मानवी स्वरूपातील दैवी कृपा   (Divine Grace) आहे. ती आत्म्याची  ईश्वराशी एकरूप होण्याची आकांक्षा आणि प्रेम व भक्तीची परिवर्तनीय शक्ती (Transformative Power) दर्शवते. तिच्या प्रेमाने आणि समर्पणाने सत्यवानाचे आयुष्य वाढवले.

सत्यवान: तो जन्म आणि मृत्यूच्या चक्रात (Cycle of Birth and Death) अडकलेला मानवी आत्मा दर्शवतो. सत्यवान नावाचा अर्थ ‘जो सत्याचा स्वामी आहे’ (The one who possesses the Truth) असा आहे. हे सत्य म्हणजे प्रत्येक मानवी अस्तित्वात असलेले ‘शाश्वत सत्य’ (Eternal Truth) ते म्हणजे आत्मा अमर आहे. परंतु जीवनात भौतिक गोष्टींच्या मागे लागून आपण हे सत्य विसरतो आणि त्यामुळे जन्म-मृत्यूच्या चक्रात फिरतो.

द्युमत्सेन (सत्यवानाचे वडील) : ते मानवी दुःखे (Human Suffering) आणि मुक्तीची शक्यता (Possibility of Redemption) दर्शवतात. त्यांची दृष्टी जाणे म्हणजे आपण आपले शाश्वत सत्य विसरल्यामुळे अंध होणे, ज्यामुळे आपल्याला अनेक दुःख भोगावी लागतात. त्यांची दृष्टी परत येणे हे अंधकारावर प्रकाशाचा विजय आणि हरवलेले वैभव (Lost Glory) परत मिळवणे दर्शवते. हे आत्मसाक्षात्कारामुळे (Self-realization) शक्य होते, जेव्हा माणूस ‘अहं ब्रह्मास्मि’ (I am the God) याची जाणीव करून घेतो.

यम (मृत्यूची देवता): ती मृत्यूची अटळता (Inevitability of Death) आणि आध्यात्मिक मार्गावरील आव्हाने (Challenges on Spiritual Journey) दर्शविते.

सावित्रीने यमाचा पाठलाग करणे, हे मानवी आत्म्याचा अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास दर्शवतो, ज्यामुळे त्याला मृत्यूपासून मुक्ती मिळू शकते.

आध्यात्मिक विकास आणि साक्षात्कार: श्री अरविंद यांच्या सावित्रीतील प्रतीकात्मकता मानवी आत्म्याच्या मुक्तीची आणि उन्नतीची शक्यता दर्शवते. त्यांनी या प्राचीन कथेला एक नवीन आणि गहन आध्यात्मिक परिमाण दिले, जे मानवी जीवनातील संघर्ष, आध्यात्मिक प्रवास आणि अंतिम मुक्तीची शक्यता यावर प्रकाश टाकते.