स्त्री शक्ती प्रबोधन

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी !

बचत गटाच्या कामाने जेव्हा ग्रामीण स्त्री शक्तीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा साधारण ३५-४० वयाच्या महिला बचत गटात यायच्या. त्यांचे सरासरी शिक्षण ४थी पर्यंत झालेले असायचे .. सरासरी म्हंटले आहे म्हणजे ४थी पेक्षा कमी शिक्षण असणाऱ्या, शाळाही न पाहिलेल्याही असायच्या. जसजसे काम सुरू झाले तेव्हा शिक्षणाचे महत्व समजायला लागले. आधी महिला विचारायच्या, ‘शिकायचे कशासाठी? शेवटी भाकरीच तर करायची आहे ना?’ पण बचत गटमुळे समाजात वावरायला सुरुवात झाली तेव्हा कमी शिक्षणाने येणारा न्यूनगंड उठून दिसायचा.. अनुभवांनी महिलेला जसजसे शहाणपण येत गेले तसतशी ‘ती’ची शिकायची उर्मी वाढली .. थोडेसे वाचता येत होते त्या काहीतरी नियमित वाचायला लागल्या, आपल्या पोरी शाळेत जात आहेत ना? त्यावर लक्ष ठेवायला लागल्या. त्याकाळात प्रत्येक कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद असायचा. महिन्याच्या बैठकीला वर्षभरात एकही दांडी मारली नाही अशा अनेक असायच्या! पुस्तका पलीकडच्या शिक्षणाची त्यांना भूक होती, प्रबोधिनीच्या बचत गटांमुळे घराबाहेर पडायला मिळणे एवढा एकच विरंगुळा अनेकींच्या आयुष्यात होता…पण २-३ वर्षांतच तिच्या लक्षात यायला लागले की मोठ्या वयात शिकायला मर्यादा आहेत, तेव्हा अनेकींनी ८ वी- ९ वीत असणाऱ्या मुलींची हिशोब ठेवायला मदत घेतली. मग या नव्या दमाच्या खेळाडूंनी मनापासून कामाला मदत केली. अशी स्वेछेने नियमित मदत करण्यामुळे या छोट्या मुलींचाही आत्मविश्वास वाढला, मग तीला पुढे शिकावेसे वाटायला लागले. तेव्हा आपण या वयोगटांसाठी किशोरी विकास सुरू केला. अनेक किशोरींच्या ताई शिक्षणात रस नसल्याने शाळा सोडून घरीच होत्या आणि तेव्हा आत्तासारखे सदासर्वकाळ चालू असणारे रंगीत टि व्ही घरोघरी पोचले नव्हते, मग आपण युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले, नर्सिंग, शिवण, पार्लर असे वर्ग सुरू केले. असे काही काही शिकून ज्यांनी लग्नापूर्वी नोकरी करून पैसे मिळवले, त्यांचे भविष्य बदलून गेले. युवती विकास उपक्रमातून अशी छोटी छोटी यशस्वी उदाहरणे गावागावात दिसायला लागली. मग मात्र गावातले वातावरण सुद्धा बदलले …. या युवतींच्या वर्गांसाठी प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून गावागावांतून युवतींना आणायची-पोचवायची व्यवस्था केली, त्यानिमित्ताने आपला गावोगावचा संचार वाढला. आपले काम पारावरच्या पुरुष मंडळींसाठीही दाखलपात्र झाले. त्यामुळे महिलांना बैठकीला/ कार्यक्रमांना परवानगी काढणे सोपे होऊ लागले. आपण एवढी वर्ष युवतीसाठी काम करत असलो तरी आपल्यानावाने ‘भलतेच शिकून’, पळून गेलेली एकही युवती नाही अशी घटना नाही.. आपला शिक्षण विचार गावकऱ्यांना असाही समजतो! कामाच्या साधारण १५वर्षांच्या टप्प्यावर आपलेही बळ वाढले, कामाची गावे ७-८ वरून २५-३० पर्यंत पोचली. बचत गटांसोबत आरोग्याचे काम सुरू केले, महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे, त्यांनी उत्पादन केलेल्या मालाची विक्री करणे असे केले, नाबार्ड सोबत काम करून महिलांना बँकेपर्यंत पोचवले. आपणच बँक व्हायचे नाही आपले काम जनजागृती व लोकशिक्षण करायचे हे सगळ्या गटाला स्पष्ट होते. त्यामुळे लोकांना बँकेबद्दल शहाणे करायच्या कार्यक्रमात आपण सहभाग घेतला व रिजर्व्ह बँकेच्या कॉलेज सोबत आर्थिक साक्षरता विषयात महत्वाचा टप्पा गाठला! शिवापूर केंद्रात सुरू झालेले काम १० वर्षात एका टप्प्याला पोचले, तोच टप्पा अनुभवांमुळे वेल्हयाच्या कामाला ५ वर्षांतच आला, त्यांचे सूत्र लक्षात आल्यामुळे ३ वर्षात आंबवण्याला गट उभा राहिला.. जमले! द्विदशक पूर्ती झाल्यावर मात्र रोजच्या कामातले मनुष्यबळासाठी पुण्यावरचे अवलंबूनत्व जवळ जवळ संपले! तोपर्यन्त कामाला हाताशी आलेल्या युवतींना ‘मागणी’ येऊन त्या पुण्यात संसारी जात होत्या असे लक्षात आले मग सासूबाईच्या भरवशावर ‘भागात आलेल्या सूनांसाठी हिरकणी सुरु केले. त्या उपक्रमाची दशकपूर्ती झाली.. १० वर्षात ८२ गावातल्या ९८२ जणींपर्यंत पोचलो तर अकराव्या एका वर्षात २७ ठिकाणच्या ४६० जणींपर्यंत पोचलो.. मग त्याला नवी उमेद जोडले! या निमित्ताने नवमातेची सासरी गेल्यामुळे बदलावी लागणारी कागदपत्रे या वर काम सुरू झाले ते सुद्धा ‘ती’ने कागदोपत्री अस्तित्वात येण्यासाठी! आत्मविश्वासाची सुरुवातच अस्तित्वात येण्यापासून होते म्हणून.. काम जसजसे वाढत गेले तसतसे ‘ग्रामीण महिला’ हा गट सुद्धा एकसंध नाही, त्यात अनेक गट येतात जसे एकल, किशोरी, युवती, ज्येष्ठ महिला असे.. आणि त्या त्या गटांना त्यांचे त्यांचे दुर्लक्षित प्रश्न आहेत असे लक्षात आल्यावर आपण त्या त्या प्रश्नावर कामाला सुरुवात केली. सगळ्यात ज्येष्ठ महिलांचा वयोगट आपण पहिल्यांदा हाताळला तो मोतीबिंदूच्या ऑपरेशन निमित्ताने. आयुष्यभर घरासाठी खस्ता खाणारीच्या डोळ्यांचे जेव्हा फुकट ऑपरेशन होणार असते त्याला नेण्यासाठी घरच्यांना वेळ नसतो.. या वास्तव दर्शनाने काम सुरू केले, मग गर्भाशयासंबंधी उतार वयातल्या तक्रारी तर सांगायच्या कोणाला? असे प्रश्न ऐकून त्याची मासिक तपासणी सुरू केली, आपत्य सांभाळत नाही अशांना श्रावणबाळ निराधार योजनेचे लाभार्थी होण्यास मदत केली. या सगळ्या संपर्काचा उपयोग करोना काळात आधी ज्येष्ठ नागरिकांना केलेल्या लासिकरणात झाला. आपल्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे १००% लसीकरण करून बक्षीस मिळवले कारण एरवीही त्या संपर्कात होत्या!तर गरोदरपणाची आरोग्य तपासणी गेली १८-१९ वर्ष दरमहा अखंडपणे चालू आहे. कोणी सोनोग्राफी करून ‘मुलगी आहे’ म्हणून ‘ती’च्या जन्माचा कोणताही निर्णय बदलू नका हे तर सांगतो आहोतच आपले बाळ सुरक्षित जन्मले पाहिजे, बाळ-बाळंतीण सुखरूप हवीत म्हणून गरोदरपणात औषधे घेतली पाहिजेत पासून आपले काम सुरू होते, म्हणजे मुलीचाही गर्भ जगावा हा आरंभ बिंदू !मुलीचा गर्भ जगावा असे ‘ती’ ने अस्तित्वात येण्याच्या उपक्रमाने सुरू होणारा स्त्री शक्ती प्रबोधनाचा प्रवास पुढे हिरकणी मातेने ०-६ वयोगटातील मुला-मुलींवर समानतेचे संस्कार करावेत मग ७-१२ या वयोगटात त्यांची गावोगावी खेळाची दले चालतील, मग किशोर-किशोरी विकास, मग युवती विकास, लग्नानंतर हिरकणी- नवी उमेद, बचत गट-स्वयंरोजगार तर आहेतच, नंतरच्या टप्प्यात गाव प्रतिनिधींत्व करायला नेतृत्व विकास, आणि ज्येष्ठ महिलांसाठी आरोग्य! या टप्प्यावर पोचतो. ग्रामीण महिलेच्या कुठल्याही वयोगटासाठी त्या त्या वयाला साजेशा उपक्रमाची साखळी आपण तयार केली, ती केवळ ‘ती’चा आत्मसन्मान वाढावा तिला माणूस म्हणून सन्मानाने जागता यावे म्हणून! आता त्रिदशकपूर्तीच्या या टप्प्यावर आपले काम भोर-वेल्हे-हवेली तालुक्याच्या ८२ गावात साधारण ६७००० लोकवस्ती पर्यन्त पोचले आहे! आता या कामाची धुरा स्त्री शक्ती प्रबोधनाच्या उपक्रमातून तयार झालेल्या कार्यकर्त्या, रूढार्थाने म्हणायचे तर आधी ज्या ‘लाभार्थी’ होत्या त्याच जबाबदारी घेऊन सांभाळत आहेत. जेव्हा स्थानिक कार्यकर्त्या त्यांनी अनुभवलेल्या प्रश्नावर काम करतात तेव्हा त्यांची कार्यपद्धती व परिनामकारकता वेगळीच असते .. काल जिच्यासाठी ‘एकल’ आहे म्हणून काम केले, तीच जेव्हा अन्य एकल महिलांसाठी काम करते तेव्हा तीला भाषण करता येते का? बोलताना प्रस्तावना-समारोप नीट करता येतो का? निवेदन करता येते का? हे अगदीच गौण होते.. जीच्यासाठी ती कामाला उभी राहिली ‘ती’ला उपयोगी पडणारे, नेमके, ‘ती’च्या आयुष्याला कलाटणी देणारे काम होते ना? एवढेच महत्वाचे उरते.. असे झाले की एखाद्या गावातल्या लग्नातच रक्त तपासणी जेवण्याआधी- नंतर करता येते.. तर गावच्या वरमाईला सुचते की आहेराच्या देण्या-घेण्याच्या एकसारख्या साड्या देऊन गावातल्या गटातल्या महिलांचा गणवेश करूया.. असे ‘बाहेरून येणाऱ्या माणसाला कधीच सुचणार नाही’ अशी कामात सहजता येते! त्यामुळे काम चालू रहाणार का अशी शंका सुद्धा मनात येत नाही! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २९ स्त्री शक्ती प्रबोधन सर्व वयोगटांसाठी ! Read More »

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण!

समाजात वावरायला लागणारे ज्ञान किंवा माहिती ग्रामीण महिलेला सहज उपलब्ध नसते. त्यामुळे स्वतःकडे कायमच दुय्यमत्व घेतले जाते. ‘ती’नेच स्वतःला दुय्यम ठरवले की इतरांकडूनही तशीच वागणूक मिळणे वावगे ठरत नाही. किमान माहिती कशी मिळवायची हे सुद्धा माहित नसते. त्यामुळे लहान मोठ्ठा निर्णय करायला जो आत्मविश्वास लागतो तो नसतो. निर्णय करायच्या विषयात ‘मी या विषयात माहितगार आहे!’ किंवा या विषयातले ‘मला कळते!’ असा जर स्वसंवाद झाला तर आत्मविश्वास येतो. ‘मला माहिती मिळवण्याचा मार्ग माहिती आहे!’ अशा जाणिवेतून सुद्धा ग्रामीण महिलांची स्वतःकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे. जिची स्वतःकडे बघायची दृष्टी बदलली आहे ‘ती’ची समाजात दाखल घेतली जाते. त्यामुळे जर महिलेचा आत्मविश्वास वाढायला हवा असेल तर विविध प्रकारची योग्य माहिती उपलब्ध करण्याच्या सुरक्षित रचना उभ्या केल्या पाहिजेत ज्या अनौपचारिक शिक्षण देत राहातील; असे या ३० वर्षांचे फलित आहे असे लक्षात आले.‘मला ‘मुलीला’ शिकवायचे आहे, मुलीचे आयुष्य बदलायचे आहे, माझ्यासारखे तिने भरडले जायला नको!’ असे वाटणाऱ्या खूप आया असतात पण त्या स्वतः कधी शाळेत गेलेल्या नसतात किंवा उच्च शिक्षित नसतात त्यामुळे ‘मुलीचे शिक्षण!’ या वियशयावर त्या निर्णय करायला धजावत नाहीत .. पण मुलगी कुठे कुठे शिकू शकते, जवळ/ परवडणारी कॉलेज कुठली आहेत, कुठल्या अभ्यासक्रमाला साधारण किती शुल्क असते असे कळले की मग मुलीच्या शिक्षणाचे सर्व निर्णय गरज पडली तर कर्ज काढून शिकवायचा निर्णयाही ‘आई’ करू शकते!आरोग्याचेही तसेच आहे. दवाखान्यात गेले तरी समोर बसलेल्या डॉक्टरला स्वतःच्या आजारपणाची सर्व लक्षणे सांगितली तरी औषध घेण्यापूर्वी ‘मला काय झाले आहे?’ असे विचारण्याची हिम्मत होत नाही, अशी हिम्मत येण्यासाठी कधीतरी दवाखान्यात आजारी नसताना कोणासोबत तरी गेले पाहिजे, हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले पाहिजे, कुठल्या तपासण्या कशासाठी करतात ते माहिती करून घेतले पाहिजे ‘सगळेच आरोग्य महाग नसते!’ असे समजले की गावातली जाणकार म्हणून गावातल्या २-४ जणांना दवाखान्यात नेण्याची जबाबदारी तिच्यावर आपसूकच येते.. यालाच म्हणायचे तिची सामाजिक प्रतिष्ठा वाढली …. कारण कालपर्यन्त ‘तुला काय कळतंय’ असे तिने ऐकले, अनुभवले असते .. थोड्याशा माहिती घेण्याने तिची घेतली जाणारी दाखल बदलते.. पहिल्या टप्प्याला एवढेही पुरते!बचत गट दर महिन्याला घेऊन, नियमित व्यवहार करणाऱ्या महिला, जमा झालेली रक्कम मोजताना नोटा चोख मोजत आहेतच पण भराभरा मोजत आहेत असे गावातल्या पुरुषांनी नोट बंदीच्या कामांमध्ये पाहिले. गावातल्या ताईचे बँकेत जाणे येणे असल्याने तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कामे गावातच झाली असेही चित्र गावागावात होते.. त्यानेही आर्थिक बाबतीत महिलांना ‘कळते’ अशी गावात सार्वत्रिक पावती मिळाली.. एका दादाने तर मला सांगितले, ‘गावच्या अण्णासाहेबापेक्षा आमची बायडी शहाणी झाली! आता तिलाच सरपंच केले पाहिजे!’ लगेच ती सरपंच होईल असे नाही पण तिच्याबद्दलचे बदललेले मत मांडण्याचा कौतुकाचा तो प्रकार आहे.ग्रामीण महिलांच्या तालुक्याच्या शासकीय कार्यालयात काढलेल्या सहली असतील किंवा कार्यकर्त्यां सोबत त्यांनी व्यक्तीगत दिलेल्या भेटी असतील, त्यामुळे कुठले काम करणारे शासकीय कार्यालय कुठे आहे? अशी माहिती होते. बाजाराच्या दिवशी साधारणतः सगळे अधिकारी भेटलात, वेगवेगळी कार्यालयात वेगवेगळी कामे होतात. चालू योजनांचे बॅनर बहुतेक कार्यालयात लावलेले असतात. पुरुष पुढाऱ्यांनाही अशा मुळेच योजनांची माहिती होते. अशा किरकोळ माहितीने सुद्धा ग्रामीण महिला समृद्ध होते. त्यातून तीला व्यावहारीक शहाणपण येते. मग ‘पुढारी आपली कामे करायला असतात!’ असाही काहींना साक्षात्कार होतो.. मग मात्र राजकीय पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ‘ती’ यायला लागते. केवळ महिला म्हणून मिळणारी संधी या टप्प्यानंतर ‘ती’ला गरजेची वाटत नाही एवढी ‘ती’ची भीड चेपते.ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाने इतक्या विविध विषयावर काम केले त्याचे कारण एकच होते.. काम केलेला प्रत्येक विषय ग्रामीण महिलेच्या प्रबोधनाचे ‘माध्यम’ होता. प्रत्येक माध्यमातून ‘ती’चा स्वतःवरचा विश्वास दुणावला, त्या त्या विषयात ‘ती’ला गावात सन्मान मिळाला. यामुळे घरातले तिचे स्थान बदलले, तिची घरात दाखल घेतली जायला लागली, घरातल्या /गावातल्या निर्णयाचे कर्तेपण सुद्धा तिच्याकडे येण्याची रचना बसली असे या कामाचे स्वरूप होते. प्रत्येक गावातली, घरातली परिस्थिती वेगळी होती त्यामुळे याची छोटी मोठी दिशादर्शक / पथदर्शक उदाहरणे तयार करणे असे काम या काळात झाले.एखादी नवीन गोष्ट म्हणजे ज्याची कल्पनाच कोणी केली नाही अशा कामाला सुरुवात करायची तर पहिल्या टप्प्याला कोणीतरी आधार देणारे लागते .. खरी माहिती देणारे लागते .. काम करताना पडेलच असे नाही पण पडले तर सावरायला कोणीतरी लागते. ‘मैं हू ना.. ‘ असा भरवसा देणारे लागते.कामाच्या त्रिदशकपूर्तीच्या टप्प्यावर असे म्हणावेसे वाटते की या सगळ्या प्रयत्नातून १५०-२०० जणी तरी अशा जाग्या झाल्या, स्वतः पुरत्या नाही तर इतरांनाही आधार देणाऱ्या तयार झाल्या. यातल्या प्रत्येकीच्या आयुष्यात ‘ती’ने कल्पनाही केली नव्हती असे स्वतः करून दाखवले! कधी आरोग्यासाठी ठाम उभी राहीली तर कधी बँकेची कामे लीलया केली, कोणी मुलीचे आयुष्य बदलले तर कोणी गावचे नेतृत्व ‘स्वच्छ’ असू शकते असे दाखवून दिले. अशा कायमच घेतलेल्या कर्ते पणानेही दमायला होते.. पण अशा आयुष्याच्या टप्प्यावर, आत्मविश्वास वाढल्यावर जर ती एखाद्या संधीला ‘नको’ म्हणाली तर ‘ती’चा नकार जमत नाही म्हणून नसतो तर त्या संधी सोबत येणारी जबाबदारी समजून ती जबाबदारी निभावायची तीची आता तयारी नाही म्हणून तिला खरंच ‘नकोय’ .. आता प्रश्न क्षमतेचा नाही .. ही भूमिका आपणही समजून घेऊ शकतो.अशी एखादी प्रबोधिका गावात असली, जरी रोजच्या कामात नसली तरी ‘गरज पडल्यावर’ ‘ती’चाच आधार पुढच्या पिढीला असतो हे पुन्हा पुन्हा दिसून येते. त्यामुळे वेल्हयात निवास काढला तर उरावर दगड ठेऊन पोरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलीला निवासात राहायला पाठवणारी पहिली ‘ती’च असते आणि ‘आता माझं ऱ्हाऊ द्या सुनेला शिकवा!’ म्हणणारीही ‘ती’च असते.. आता पुढच्या पिढीसाठी काम या सगळ्या करत आहेत असे नक्की म्हणावेसे वाटते! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना२८: काही अनौपचारिक शिक्षण! Read More »

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात आरोग्याचे काम करताना दूषित पाण्यामुळे होणारे आजार यावर अनेकदा चर्चा व्हायची त्यासाठी काय करावे याचे प्रशिक्षण महिलांना दिले जायचे. कारण पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अनेकदा बचत गटातून कर्ज घेऊन दवाखाना करावा लागायचा. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आपण टाटांनी ज्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहेत असे सुजल फिल्टर दिले. हा फिल्टर म्हणजे स्टीलच्या पिंपाचे झाकट कापून तिथे प्लॅस्टिक भांडे बसवलेले असायचे ज्यांच्या तळाला फिल्टर बेड असायचा. ५-१० नाही तर भागात आपण ३०० पेक्षा जास्त फिल्टर वाटप केले. वेल्ह्यातील वरोती या दुर्गम गावातल्या प्रत्येक घराला सुजल फिल्टर दिला, एवढेच नाही तर फिल्टरचा वापर होत आहे ना हे तपासणारी यंत्रणा बसवली. दुर्दैवाने त्यावर्षीही पावसाळ्यात पूलावरून पाणी गेल्यामुळे अनेक दिवस गाव शासकीय संपर्कात नव्हते तरीही जेव्हा साथीच्या आजाराच्या उपचाराला प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर पूरानंतर पहिल्यांदा गावात पोचले तेव्हा त्यांना दूषित पाण्यामुळे आजारी पडलेला एकही रुग्ण आढळला नाही …. काही बदलाच्या गोष्टी महिलांना नीट समजून सांगितल्या की जमतात!      सुजल फिल्टर उत्पादन: सुजल फिल्टरचा मुख्य भाग म्हणजे फिल्टर बेड! हा बेड भाताचे तूस जाळून तयार होणाराय कोळसा व विविध आकाराच्या वाळू या पासून बनवलेला होता. या गोष्टी स्थानिक पातळीवर उपलब्ध होत्या. वेगवेगळ्या गावातील २ महिला गटांना फिल्टर बेड बनवायला शिकवले त्यानिमित्ताने भांड्याला ड्रिल करण्यापासून सगळी कामे महिला शिकल्या व ३ वर्ष दोन्ही गटांनी मिळून ३००-३५० फिल्टरचे फिल्टर बेड बदलण्यासाठी नवीन फिल्टर बेडचे उत्पादन केले. एखाद्या योजनेतून फिल्टर दिल्यावर वापरल्यामुळे बेड साधारण ८-९ महिन्याने बदलावा लागायचा, तो फिल्टर बेड या प्रशिक्षित २ बचत गटातील महिलांनी बनवले. आणि गावकऱ्यांनी पैसे देऊन विकत घेतले. त्यानंतर साधारण त्याच किमतीत मिळणारा फिल्टर सारखा दिसणारा, व्यावसायिक तत्वावर उत्पादन केलेला ‘स्वछ’ फिल्टर टाटांनी बाजारात आणल्यावर आपण उत्पादन थांबवले …. तो पर्यन्त ‘शुद्ध’ पाण्याचे आरोग्याच्या दृष्टीकोनातून असणारे महत्व महिलांपर्यंत पोचले होते.      असाच दुसरा एक प्रयोग: ज्येष्ठ नागरीकांसाठी केलेले काम: वेल्हे तालुका अविकसित! म्हणजे काय तर तर नवीन पिढी गावात राहायला तयार नाही. बरीच गावे अशी आहेत की ज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या राहात्या लोकसंखेच्या ७५%-८०% किंवा त्याही पेक्षा जास्त आहे. ‘रहात्या’ असा वेगळा उल्लेख केला कारण ही नोंद शासकीय आकडेवारीत कधीही येत नाही. गावची लोकसंख्या म्हणजे रेशन मिळणारी किंवा मतदानासाठीची लोकसंख्या असते. अशी ज्येष्ठांची संख्या गावात जास्त असल्यामुळे काही प्रश्नांना मिळणारी कलाटणीच वेगळी असते. एका गावात ज्येष्ठ माहिलांचे प्रश्न काय आहेत ही समजून घेण्यासाठी बैठक घेतली तर पुरुष सुद्धा जमा झाले. आमचेही ऐकून घ्या असा आग्रह धरला. त्यात मुंबईहून नोकरी करून रिटायर्ड होऊन गावाकडे आलेला एक जण सांगत होता. स्वकमाईने हौसेनी गावाकडे बंगला बांधून राहायला आलो कारण गाव सोडले तेव्हाच ठरवले होते तसा तर माझ्या बरोबरीचे गावात कोणीच नाही! मी साठी उलटलेला. मग चर्चा सुरू झाली गावात त्याचे चुळते/ चुलत्या शेजारी सगळे आधीच्या पिढीचे फक्त रहात होते. हा राहायला आल्यामुळे त्यांच्या मुलांची सोय झाली कारण यांची शहरातली पोरे त्यांनाच फोन करायची, त्यांच्या आई वडिलांची चौकशी करायला.. कारण सत्तरी-पंच्याहत्तरी उलटलेल्या गावातल्या माणसाला मोबाईल कसा वापरायचा हे कसे शिकवणार? काहींना तर ऐकू सुद्धा येत नाही, काहींना नीट दिसत नाहीत…. तो संगत होता.. एखाद्याला काही झाले म्हणून उचलायची वेळ आली तर मला एकट्याला या वयात कसे जमणार?.. गाडीत घालून न्यायचे ठरवले तर गाडीवाल्याला फोन करताना तो आधीच सांगायचा २ पोरं मदतीला घेऊन ये.. इतकी गंभीर परिस्थिती. एखाद्याला शेवटचा खांदा द्यायची वेळ आली तर कधी कधी ४ जण जमायची वाट पहावी लागेल.. शासनाने महिन्याला १२०० रुपये दिले तरी पैसे खाता येत नाही त्यासाठी म्हातारीलाच राबावे लागते. बैठकीत चर्चा झालेल्या गावाच्या भाषेत बोलायचे झाले तर म्हातारी आधी देवाघरी गेली तर म्हाताऱ्याचे करणार कोण? मग म्हाताराही लगेचच जातो कारण एकट्याला त्याला राहाताच येत नाही. …. कधी कधी थकलेल्या म्हातारीला हळूहळू काम करताना बघवत नाही. गावामध्ये हॉटेल नाही.. गावात ‘बनवलेले ताजे अन्न’ पैसे असले तरी विकत मिळत नाही! असेच कोणी कधी जेऊ घालेल तर.. पण पैसे घेऊन नाही. असे कधीच विचारही न केलेले सगळे प्रश्न समजले.    गावातली ज्येष्ठ नागरिक महिला घरी स्वयंपाक करणार म्हणजे पारंपारिक चुलीवर स्वयंपाक करणार.. त्यासाठी लाकडे आणणार.. अनेक गावात नळपाणी पुरवठा नाही मग लांबून उचलता येईल असे थोडे थोडे पाणी आणणार .. कितीही वय झाले तरी यातून ‘ती’ची सुटका नाही! एवढाच प्रश्न वाटत होता पान चर्चे नंतर प्रश्नाचे वेगळेच गांभीर्य लक्षात आले.   बैठकीनंतर एक उपाय म्हणून एका गावात प्रयोग करायचा ठरवला. सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा बैठक घेतली व त्यांना सांगितले की एकांना ‘अन्नदान’ करायचे होते म्हणून त्यांनी संस्थेला काही देणगी दिली आहे तर त्यातून संस्थेने ज्येष्ठ नागरिकांची २ महीने एकत्र जेवायची व्यवस्था करायची ठरवली आहे. उपयोगी वाटले तर चालू ठेऊ! मनात होते वेगळा वृद्धाश्रम काढण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न जरा वेगळ्या प्रकारे हाताळून बघू. त्या निमित्ताने सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचे एकत्र येणे होईल, सगळ्यांची आपोआप हजेरी घेतली जाईल, कोणी आजारी नाही ना ते रोजचे रोज तपासले जाईल, औषध घेणारे औषध घेतात ना? असे तपासले जाईल .. असेही काही मनात होतेच! या प्रयोगामुळे गावातलीच गरजू महिला सगळ्यांचा स्वयंपाक एकत्र करेल. त्यासाठीच्या लाकडाची व्यवस्थाही करेल आणि जेवणानंतर भांडीही धुवेल त्याच्यासाठी प्यायचे पाणीही भरेल. तिलाही गावातच रोजगार मिळेल! ज्या गावात प्रयोग केला त्या छोट्याशा गावात २२ ज्येष्ठ नागरिक होते. पहिल्या दिवशी १० आले. त्यांचा अनुभव म्हणजे स्वयंपाकाची चव काय होती, कुठला तांदूळ वापरला असे बघून हळूहळू संख्या वाढली सर्वच्या सर्व २२ जण यायला लागले .. आणि एक दिवस एकदम संख्या कमी झाली कारण काय तर या आनंदी ज्येष्ठांनी या योजनेची माहिती शहरातल्या मुलाला दिली. आणि तो म्हणाला ‘मी काय जेवण देऊ शकत नाही का?’ बास याचे येणे बंद! गावात साधे २ माणसांचे जेवण करायचे तरी त्यासाठी लाकूड आणण्यापासून भांडी घासे पर्यन्तची सर्व कामे ‘थकलेल्या बाईने’ करायची.. कारण ती कामे तिने आयुष्यभर केली आहेत! मुलगा महिन्यातून एकदाही गावाकडे येईल असे नाही पण ‘नाही’ म्हणायचं अधिकार पालकांनी त्याला दिला आहे! अशी प्रतिक्रिया एकाच गावात आली असे नाही तर आपण ३-४ गावात हा प्रयोग केला .. सर्व ठिकाणी ज्येष्ठांना असणारी मुलांची दहशत लक्षात आली! आपण प्रयोग थांबवला कारण गावात न राहाणाऱ्या मुलांचे प्रबोधन आधी करायची गरज आहे अशा निष्कर्षावर पोचलो! थांबवायला लागलेल्या या प्रयोगाबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की वय वाढल्यामुळे ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांचे निर्माण होणारे प्रश्न मग आरोग्याचे म्हणजे वेळेवर औषध घेण्याचे असोत किंवा जवळच्या गावाला जाऊन औषध आणायचे असोत, आर्थिकअसोत किंवा एकटेपणाचे असोत, ताकदीने करायच्या कामाचे असोत कुठलेही असोत हे प्रश्न आता कौटुंबिक राहिलेले नाहीत हे आता सामाजिक प्रश्न आहेत असे अजून समाज म्हणून आपण शिकलेलो नाही यांची खंत आहे! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २७  काही वेगळे प्रयोग! Read More »

मागे वळून बघताना: २६ काही वेगळे प्रयोग!

ग्रामीण भागात काम करायचे तर ते फक्त त्या व्यक्ती सोबत कधीच नसते, त्यांच्या कुटुंबा सोबतचे समाजासोबतचे, गावासोबतचे काम असते. शहरातली सगळीच माणसे जेवढी स्वयंपूर्ण असतात त्यामुळे एकटी असतात तेवढी गावातली नसतात. त्यामुळे ‘विकास’ कामात आलेल्या अनेक अडचणी या समाजिक बंधनामुळेही असतात. रूढार्थाने म्हणायचे तर ‘लोक काय म्हणतील?’ यामुळेही असतात. या सगळ्यांचा विचार करत आपल्या भागात केलेले २ वेगळे प्रयत्न.. बांबूपासून वस्तू उत्पादन : वेल्हे तालुक्यात बांबू मुबलक मिळत असल्यामुळे बांबू पासून विविध गोष्टी बनवायला शिकवण्याचे वर्ग १९९६ पासून आपण घेतले; जेणे करून बांबूमुळे स्वयंरोजगार संधी निर्माण होईल. केंद्र सरकारच्यावतीने त्रिपूरामध्ये बांबू पासून वस्तू निर्मिती करायला शिकवणारा त्याकाळी एकमेव वर्ग चालवला जायचा. वर्ग ६ महिने कालावधीचा असायचा. १९९६-२००० या काळात ३ युवकांना त्या वर्गाला पाठवले. या वर्गाला जाणे म्हणजे महा कठीण कारण तिथली भाषा कळणे अवघड आणि एकदा वर्गाला गेले की ६ महिन्यांनी परत यायचे मध्ये घरी येणे नाही! त्यासाठी जाणाऱ्याची व घरच्यांच्या मनाची तयारी करून घेणे फारच अवघड होते. कारण वर्ग होता ते गाव नकाशावर दाखवले तरी म्हणजे कुठे? ही कळणे अवघड.. आणि ‘तिथे काही झाले तर आम्ही कसे पोचायचे?’ हा प्रश्न मलाच निरुत्तरीत करायचा पण प्रबोधिनीवरच्या विश्वासाने आपण जमवले! वर्गाला शुल्क नसले तरी एकट्याने त्रिपुरात ठरलेल्या ठिकाणी त्याकाळी (गुगल मॅप नसताना) पोचणे धाडसाचेच होते. ३ जणांनी वेगवेगळ्या वेळेला जाऊन वेगवेगळ्या तुकड्यांत हा वर्ग यशस्वीरीत्या पूर्ण केला. वेल्हयात बांबूवर काम करताना येणारी अडचण अजूनच वेगळी होती कारण बांबूसंबंधी काम हे ‘बुरूड’ किंवा ‘कैकाडी’ जाती/जमातीचे काम समजले जाई, त्याला अन्य समाजातील मुलांना पैसे मिळणारी रोजगार संधी असली तरी प्रशिक्षणाला तयार करणे खूपच अवघड होते. तरीही आपण करत राहिलो. वर्ग घेत राहिलो. बांबूपासून वस्तू उत्पादन करणे म्हणजे फक्त पारंपारिक सुपे, टोप बनवणे नसून अनेक सुंदर भेटवस्तू असू शकतात किंवा अगदी घरही बांधणी असू शकते हे आपण शिकवले. सगळ्यांनी रोजगाराचा हा मार्ग स्वीकारला नाही पण वर्गाला आलेल्यांच्या जाणीव जागृतीतून उद्योग करणाऱ्यांचे बळ वाढत गेले. आजही त्यातला एक जण, निवृत्ती वेल्हयात बांबू उद्योगातून अर्थार्जन करत आहे. तालुक्यातंच काय पण निमंत्रण आले तर महाराष्ट्रभरही प्रशिक्षक म्हणून जात आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे, मोठी ऑर्डर मिळवून भागातल्या महिला-युवकांना रोजगार संधी देत आहे!.. सर्व अडचणींवर मात करून आजही स्वतःच्या हिमतीवर बांबू उद्योगात टिकून आहे. अस एखादं उदाहरण टिकलं तरी समाधान वाटते!! होम नर्सिंग वर्ग चालवण्याचा प्रयोग : एकूणच आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत. सुपर स्पेशालिटी जशी वाढते आहे तशी थोडेसे शिकून नर्सिंग संबंधी कामाची संधीही वाढते आहे. मोठ्या हॉस्पिटल सोबत छोट्या हॉस्पिटल मधली नर्सिंग संबंधी मनुष्यबळाची मागणी सुद्धा प्रचंड संख्येने वाढते आहे. नर्सिंगच्या शिक्षणामुळे खात्रीने रोजगार मिळेल. अगदी ८ वी झालेल्या गावातल्या मुलीला सुद्धा एरवी कधीच मिळणार नाही अशी या शिक्षणामुळे नोकरीची संधी मिळेल, या हेतूने आपण युवतींसाठी होम नर्सिंग/ असिस्टंट नर्सिंगचे प्रशिक्षण देण्याची योजना केली. पहिला वर्ग सुरू करताना एकत्र माहिती सांगितली तरी फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मुलींना गावागावांतून आणायची सोय केली, वर्ग संपल्यावर पुन्हा पोचवण्याची सोय केली. वर्ग पूर्णतः निशुक्ल केला तरीही थंड प्रतिसाद.. मग ज्या गावात वर्गाला येऊ शकतील अशा वयातल्या मुली होत्या त्या एकेकीच्या घरी जाऊन बागेश्रीताई असे शिक्षण मिळाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सन्मानाने कसे काम करता येईल असे सांगितले. हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मावशींच्या कामापेक्षा हे वेगळे आहे असेही पटवले. मग एक एक करत पहिल्या वर्गांसाठी १३ जणी जमल्या आणि स्व-रूप वर्धिनी सोबत पहिला वर्ग सुरू झाला. ६ महिन्यांची एक बॅच असायची. मुलींना विषयात रुळायलाच त्यातला महिना लागायचा. कोणाला रक्त बघून चक्कर यायची तर कोणाला अभ्यासातले शब्द पाठ करणे अवघड जायचे, कोणाला हॉस्पिटलची भीती वाटायची तर कोणाला इंजेक्शनची! या सगळ्या दिव्यातून पार होणे अवघड .. त्यात ‘घरी नुसती बसेन पण असे ‘सेवे’ची काम करणार नाही’ अशी सामाजिक मनोवृत्ती! या वर मात करणे फार अवघड गेले. प्रत्येक तुकडीसाठी मुली मिळवणे ही जणू आपलीच जबाबदारी होती. हा वर्ग पूर्ण केलेली एकही जण वर्ग संपल्यावर घरी बसली नाही, ६ महिन्यांचा वर्ग करून परीक्षा दिली की निकाल लागायच्या आधीच नोकरी लागलेली असायची तरीही प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. जसजशा लग्ना आधी मुली कामावत्या व्हायला लागल्या तसतसा हळूहळू बदल घडायला लागला. आपण प्रयत्नपूर्वक वेगवेगळ्या गावात प्रवेश अभियान करून पहिल्या ६ तुकड्या १०० पेक्षा जास्त संखेच्या यशस्वी रित्या पूर्ण केल्या. मग आपण आंबावण्याच्या स्टरलाईट कंपनीने चालवलेल्या जीवन ज्योती महिला प्रशिक्षण केंद्रात काम केले तेव्हा हा वर्ग त्या संस्थेच्या अभ्यासक्रमाचा भाग केल्यावर हा विषय तेथे सुपूर्द केला. आपण केल्यामुळे नर्सिंग या विषयाचे जनजागरण एवढे झाले की १२ वी शास्त्र शाखेत शिकलेल्या ५-६ जणींनी नर्सिंगचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातल्या बहुतेक जणी पुण्यातल्या उत्तम हॉस्पिटलमध्ये नोकरी करत आहेत. आज पर्यंत त्यांच्या घरात शिक्षण घेऊन नोकरी करायला लागल्यावर मिळालेला सगळ्यात जास्त पगार या मुलींना आहे ! ज्ञान प्रबोधिनीच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणामुळे अनेकांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली, आपल्या प्रयत्नांमुळे नवीन विषयातल्या रोजगार संधी लक्षात आल्या असे नक्की झाले.. एखादी गोष्ट पहिल्यांदाच करताना आपले सगळे पणाला लागते कारण आपण बोलतो/ सांगतो/पटवतो ते यापूर्वी कधी त्या गटाने ऐकलेले नसते ना अनुभवलेले, असे केलेल् कोणीसुद्धा परिचयातले नसते. अशा वेळी ‘पटण्याला’ उपयोगी पडतो तो प्रशिक्षणार्थीचा आपल्यावर असणारा विश्वास! .. एकदा जमले की अनुकरण करणे तुलनेने सोपे असते. अशा प्रकारचे एक-एक उदाहरण तयार करताना समाज शिक्षण करावे लागते. सहभागी प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण करता करता त्यांच्या कुटुंबाचे, नातेवाईकांचे, जवळच्यांचेही शिक्षण करावे लागते. आपण अनेक वर्ष त्याच कार्यकर्त्यासंचाच्या मदतीने भागात काम करत असल्यामुळे जो विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे आपले असे पहिले प्रयत्नही यशस्वी होतात यांचे समाधान आहे! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २६ काही वेगळे प्रयोग! Read More »

मागे वळून बघताना: २५  – गुंतवणूक वाढत जाते!

ग्रामीण महिलांसोबत काम करायला लागल्यावर, पहिल्यांदा कुठली गोष्ट लक्षात आली तर तिच्या आयुष्यातली एकही गोष्ट ‘ती’च्या मार्जिने झालेली नसते, लग्न तर सोडाच पण जन्म घेऊनही जणू ‘ती’ने काहीतरी चूकच केली आहे. त्यामुळे ‘ती’च्या मनासारखे होण्याची ‘ती’ची अपेक्षाही नसते. कारण संस्कार! त्याकाळात बचत गटातील महिलांची नावे पाहिली तर दगडाबाई, धोंडाबाई, नकोशी अशी एखाद-दुसरी गटात असायचीच! आता काळ बदलला आहे. पण तेव्हा जी गटात आली ती, ‘मी निर्णय करू शकते!’ या  कल्पनेचा कधीही विचार केलेला नाही अशी होती, त्यामुळे नेतृत्वाचे काम एकदम सुरू करता आले नाही.. आधी व्यक्ती विकासाचे काम करावे लागले. अनेक जणी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाच्या कामासाठी जो मानसिक प्रवास करावा लागला त्याने सुद्धा दमून गेल्या. ‘ती’ला जबाबदारी घेण्याबद्दल स्वाभाविकच अडचण नसायची पण ‘अधिकार’ समजायला थोडा वेळ लागायचा. हा नेतृत्वाचा पहिला टप्पा होता! प्रबोधिनी गावातच गावातल्याच महिलांच्या मदतीने काम करत असल्यामुळे उपक्रमाची कमी नव्हती. भरपूर उपक्रमाची योजना आखलेली असायची. उपक्रम कुठलाही असला तरी महिलांच्या मानसिकतेत हळूहळू बदल घडत होते. अनेक उपक्रमांनी पहिल्यांदाच सहभागी होऊन घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे भावविश्व विस्तारण्याचे काम केले. भावविश्व समृद्ध झाल्याशिवाय विकासाची गरज निर्माण होत नाही. विकासाची गरज निर्माण होणे ही ‘महिलांनी विकास कामात स्वेच्छेने येण्यासाठीची प्राथमिक गरज’ आहे ही बाब आधी समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपण गेल्या भागात जो ‘सहल’ उपक्रम पाहिला तो महिलांचे भावविश्व समृद्ध करायला कशी मदत करणारा ठरू शकतो हे समजून घेतले.    बाह्य पेहेराव जरी बदलला, नऊवारी जाऊन पंचवारी आली.. क्वचित प्रसंगी पंजाबी ड्रेस आला तरी विचार करायची पद्धती कालानुरूप बदललेली असेलच असे नाही. आता ‘नकोशी’, दगडा.. धोंडा या सापडत नाहीत. आता मुलींची नावे कोमल, अपेक्षा, आकांक्षा असतात.. या बदललेल्या नावाचे सुद्धा त्यामुळे मला महत्व वाटते. हे जरी खरे असले तरी जिने ही नावे ठेवली त्या सविता/ कविता/ सुरेखा यांच्यांशी ‘कुटुंबामधले महिलेचे स्थान काय असावे?’ यावर चर्चा करताना संस्काराने घालून दिलेली ‘कुटुंबाची’ मर्यादा लक्षात आली. घरातल्या ‘बाई’च्या स्थानाचे त्यांचे वेगवेगळे विचार ऐकायला मिळाले. कौटुंबिक हिंसाचार हा खूपच मोठा विषय आहे, पोलिस स्टेशन सोबत महिला दक्षता समितीची स्थापना करून आपण हे काम करायला बचत गटाच्या महिलांसाठी सुरुवात केली. जी कौटुंबिक हिंसाचाराची बळी असते ती या विषयावर बोलायला सुद्धा पहिल्यांदा तयार नसते. याचे नक्की कारण काय असावे अशी खात्री करायला आपण करोना नंतर एक छोटेसे सर्वेक्षण केले. त्यात अनेक प्रश्न होते. त्यापैकी एक प्रश्न होता की नवऱ्याने बायकोला मारले तर.. अ) शिस्त लागण्यासाठी मारले तर ठीक ब) चूक झाली म्हणून मारले तर हरकत नाही आणि शेवटचा क) पर्याय होता मारता कामा नये. अजूनही लग्न झालेल्या तिशी ओलांडलेल्या ८०% महिलांना अ/ब पर्याय योग्य वाटतात. मुलांसामोर मारू नये असा अनेकींचा सूर होता. पूर्वी नवऱ्याची ओळख ‘मालक’ म्हणून करून दिली जायची, आता जरा शिकलेली ‘मालक’ म्हणत नाही मिस्टर म्हणते पण आजही ‘ती’ने स्वीकारलेली त्यांची ‘मालकी’ मनातून पूर्ण गेलेली नाही. जरा खोलात जाऊन चर्चा केली तर त्या ‘वाटण्यात’ सुरक्षितता दडलेली आहे असे लक्षात येते. सर्व सिध्द्धीस नेण्यात ‘तो’ समर्थ आहे.. ही भावना आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचारांच्या प्रश्नाचे उत्तर बादलायचे असेल तर मनातला ‘स्वीकार’ बदलण्याची गरज आहे, ‘ती’ची मानसिकता बदलायला हवी. मानसिकता क्रांती केल्यासारखी कमी काळात बदलत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, या पिढीसाठी काम केले तर पुढच्या पिढीमध्ये दिसून येते.       बचत गट हे निमित्त आहे हे त्यासाठीच! त्यामुळे असा वेगळा विचार करायची संधी मिळते. कधी गटात कर्ज मागणी जास्त झाली तर गटाशी बोलावे लागते, कोणाला कर्ज हवंय त्यांच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवून कर्ज वाटप करावे लागते तर कधी एखादीची सहलीला येण्याची परवानगी काढण्यासाठी तिच्या घरी जाऊन सासू-सासरा किंवा नवऱ्याशी बोलावे लागते, कधी कधीच न गेलेल्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करावे लागते तर कधी स्वतःच्या घरी पाहुणे असले तरी बँक कर्जाचा हप्ता वेळेत गेला पाहिजे म्हणून बँकेत जावे लागते. बचत गटाच्या बैठकीनंतर उगाचच रेंगळणारे गटात कोण-कोण आहे, त्या काय बोलतात त्यावर खरेतर गटाचा परिणाम अवलंबून असतो. एरवी अशा क्षुल्लक वाटणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी ‘ती’चे अस्तित्व, ‘ती’ची स्वकल्पना तयार करायला उपयोगी पडतात. ‘मी माझ्या वेळाचा निर्णय घेऊ शकते’ असे वाटल्या शिवाय ‘मी माझे निर्णय करू शकते’ असे वाटत नाही .. मग गावासंबंधी निर्णय करण्याचा टप्पा येतो. गटाचे आर्थिक काम झाले तरी मैत्रिणींसोबत रेंगाळण्यासाठी जिच्याकडे वेळ आहे ती स्वतः पलीकडे पाहू शकते. पण स्वतःच्या किरकोळ वेळेचा सुद्धा निर्णय सुद्धा जी करू शकत नाही ‘ती’ गावाचे निर्णयही करू शकत नाही असे सार्वत्रिक चित्र आपण बघतो.   त्यामुळे ‘ती’ची स्वतः पलीकडच्या कामात गुंतवणूक जसजशी वाढत जाते तसतसा ‘ती’चा आत्मविश्वास वाढला आहे असे इतरांच्याही लक्षात यायला लागते. आणि ‘ती’चा नेतृत्वाकडे प्रवास सुरू होतो. नेतृत्व करण्यासाठी फक्त राखीव जागा दिल्या पण असे प्रयत्न झाले नाहीत तर त्या पदावर जाऊनही हक्क बाजावता येत नाही मानसिकता आड येते. असा आत्मविश्वासाचा प्रवास झाला असला की पद मिळाले नाही तरी ‘गावच्या महिला राखीव पदासाठी कोणाला उभे करूया?’ यावर चर्चा करण्याच्या बैठकीचे सन्मानाचे निमंत्रण नक्की येते. लोकांना दिसेल अशी समाजाभिमुख वेळेची गुंतवणूक वाढत गेली की नेतृत्वाला व्यापाकता येते. बचत गट अशी स्वतः ठरवून स्वतःच्या वाढीची संधी देतो त्यामुळे समाधानकारक असते!    सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २५  – गुंतवणूक वाढत जाते! Read More »

मागे वळून बघताना: २४ – अभ्यास दौरा!

ग्रामीण महिलांचा अभ्यास दौरा हा जरा वेगळाच! अभ्यास हा साधारणतः पाठ्यपुस्तकांशी संबंधीत विषय वाटतो पण दौरा म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायला घर सोडून गटाने बाहेर पडायचे. बाहेर पडताना ‘पर्यटन’ दृष्टीकोन ठेवायचा नाही तर काहीतरी शिकायचा अनुभवायचा असा दृष्टीकोन ठेवायचा. पहिला दौरा ‘दिल्ली राजधानी अभ्यास दौरा’ १९९८ साली झाला. त्या काळात नुकतेच महिलांना आरक्षण मिळाले होते. अनेक जणी सरपंच/ उपसरपंच/ ग्राम पंचायत सदस्य झाल्या होत्या, काही जणी गावातील शिक्षण समितीच्या किंवा पाणलोट कामाच्या पदाधिकारी झाल्या होत्या, काही बचत गटाच्या अध्यक्ष, खजिनदार होत्या. ही पदे खूप मोठी होती अशातला भाग नव्हता पण महिला अशा पदावर जबाबदारी घेऊन प्रथमच विराजमान होत होत्या. त्यामुळे ‘आपल्याला अशी जबाबरीची कामे जमतील का?’ अशी धास्ती वाटत होती. एखादीलाच नाही तर ‘ग्रामीण महिला’ म्हणून संगळ्यांनाच आत्मविश्वासाचा प्रश्न होता. पहिला दिल्ली दौरा अशा २५ जणींसाठी योजला होता की जिच्याकडे स्वतःच्या पदाचा शिक्का आहे! पण साधारण ६५ जणींनी नावे दिली. ४ महीने दौऱ्याची तयारी चालू होती. दर १५ दिवसांनी प्रशिक्षणे होत होती. गटाला पूर्वतयारीची व्याख्याने, माहिती सांगणे चालू होते. अगदी नकाशा दाखवून रेल्वे कशी जाणार ही सुद्धा दाखवले गेले. अनेकींनी आयुष्यात नकाशा सुद्धा प्रथमच पाहिला होता. एक छोटा प्रसंग सांगते महिलांना प्रवासाची अजिबात सवय नव्हती, साधा कात्रजचा घाट चढताना सुद्धा उलटी येत होती. नकाशात दिल्ली किती ‘वर’ आहे असे सांगितले तर घाट किती मोठ्ठा असेल असे वाटून काही नावे कमी झाली होती. इतक्या प्राथमिक गोष्टींपासून सुरुवात होती. गटाच्या कानावर हिंदी भाषा पडण्याची व्यवस्था केली होती कारण तो पर्यन्त टिव्ही घराघरात पोचले नव्हते. हे प्रशिक्षण बघून दौरा झेपणार नाही असे वाटणाऱ्या १० जणी गळल्या. ५५ जणींचा ८ दिवसांचा दौरा झाला. संसद भवन पाहिले, खासदार शरद पवार, विठ्ठलराव गाडगीळ, निर्मला देशपांडे यांची दिल्लीतल्या घरी भेट घेतली, आकाशवाणीच्या दिल्ली-वार्तापत्र सादर करणाऱ्यांची भेट घेतली, महाराष्ट्र सदन पाहिले, महिला आरक्षणावर काम करणाऱ्या  IIPA (इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिसट्रेशन) येथे जाऊन आलो. मग प्रेक्षणीय स्थळ म्हणून राजघाट पाहिले कारण बातम्यात परदेशी पाहुणे तिथे जातात असे दिसले, मग लाल किल्ला, मथुरेचे कृष्ण मंदिर, ताजमहाल सगळे पाहिले. परत आल्यावर लक्षात आले दौरा अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झाला. दौऱ्यात सहभागी अनेकजणी ९ वारी साडी नेसणाऱ्या होत्या.. त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला कारण प्रत्येकीला वाटत होते की ‘इतरांनी जे पाहण्याची कल्पनाही केली नव्हती ते मी प्रत्यक्ष पाहून आले!’ राजधानी सहलीच्या परिणामामुळे महिलांमध्ये झालेला बदल इतका उठून दिसणारा होता की “आम्हालाही ‘त्यांच्या’ सारखे व्हायचंय, चला पुन्हा दिल्लीला जाऊ..” या आग्रहाने पुन्हा दिल्ली दौरा झाला या दौऱ्यात पहिल्या सारख्या अनेक गोष्टी दौऱ्यात होत्याच पण सोबत राष्ट्रपती भवन बघण्यापासून परतीचा प्रवास विमानाचा करण्यापर्यन्त भर होती. हा दौरा साधारण १० वर्षाने झाला तो पर्यन्त ग्रामीण महिलेची ‘मला नेतृत्व करायचे आहे’ असे म्हणण्याची भीड चेपली होती. त्यामुळे कमी पूर्वतयारीने दौरा झाला. पूर्णतः स्वखर्चाने झालेल्या या दौऱ्यात चकाचक दिल्लीचे दर्शन होते तसेच दिल्लीतील वस्तीचेही दर्शन होते..  पहिल्या दौऱ्यात येणाऱ्या महिलांना हिन्दी बोलणे तर सोडाच पण समजणेही अवघड होते म्हणून बहुतेक भेटी मराठीत होतील असे पाहिले होते. दुसऱ्या दौऱ्यात असे लक्षात आले की सिनेमा बघून बघून निदान गटाला हिन्दी बोलता येत नसले तरी समजत होते! त्यामुळे अवघड वाटले नाही. दौऱ्याचा परिणाम चांगला झाला. दिल्ली दौरा जास्त दिवसांचा काढावा लागतो म्हणून सगळ्यांना इच्छा असूनही जमत नाही मग ‘मुंबई दौरा’ काढला! अनेक गट मुंबई बघून आले अगदी समुद्र दर्शन, गेट वे ऑफ इंडिया, मोनो रेल प्रवासापासून ते थेट भुलेश्वरच्या घाऊक बाजारपेठेपर्यंतचे दर्शन ! मुंबई ही आर्थिक राजधानी आहे म्हणजे काय यांचे ही दर्शन घेतले! असे दौरे फक्त महिलांचेच नव्हते तर युवती सुद्धा मुंबईला जाऊन आल्या. विधान भवन, विधान परिषदही बघून आल्या. मग त्या सोबत तारांगण, मत्स्यालय असेही बघणे झाले. कार्यकर्त्यांचे दौरे वेगळेच! एकदा दक्षिण भारत बघायला तिरूअनंतपूरम मधून देवदर्शन करून विवेकानंद केंद्राचे काम व शिलास्मारक बघायला कन्याकुमारीला मुक्काम केला. संस्था कार्यकर्त्यांच्या भेटी तर होत्याच आणि मग बंगलोर वरून परत! कार्यकर्त्यांचा पुढचा दौरा अरुणाचलला काढला! हा दौरा पश्चिम बंगालची राजधानी कलकत्यापासून सुरू झाला. गंगेतीरी असणाऱ्या रामकृष्ण मठाच्या बेलूर मठात राहून नावेने गंगापार करून कालीमातेचे दर्शन घेतले, छट पूजा पाहिली. तेथून थेट अरुणाचलच्या चीन-तिबेट टोकाला तवांगला गेलो. बर्फाछादित प्रदेश पाहिला, सीमेवर सैन्य कसे काम करते ते पाहून आसाममध्ये गुवाहाटी कामाख्या मंदिर पाहून परतीचा प्रवास सुरू केला. प्रदेश बदलला की भौगोलिक परिस्थिती बदलते तसेच लोकांची विचार करायची पद्धतही कशी बदलते यांचा तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीतून अनुभव घेतला. करोंना काळात आणि नंतर राजस्थानला २ दौरे गेले. जयपूर जवळचे तिलोनीया येथिल रॉय यांचे ग्रामीण महिलांसोबत चालू असणारे सौर ऊर्जा व अन्य काम पाहिले त्यातून प्रेरणा घेतली नंतर उदयपूर.. चितोड, हळदीघाटी सगळे पाहिले! पर्यटना पासून संस्कृती दर्शन बघताना पद्मिनी आणि हजारो महिलांच्या ‘जौहार’चा सल घेऊन स्त्री शक्ती प्रबोधनचा गट परतला. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचे काम म्हणजे नक्की काय केले हे या दौऱ्याला गेल्यामुळे शिवप्रदेशात राहाणाऱ्या महिलांना नेमके कळले असे नंतरच्या निवेदनात समजत होते. त्यामुळे राजस्थानात महिलांचा रस्त्यावर वावर कमी होता..आम्ही मोठ्यांदा हसलो तरी लोक बघत होते अशी बारीक निरीक्षणे महिला शोधबोध बैठकीत सांगत होत्या. आपला समाज महिलांना खूपच स्वतंत्र देतो. तिथल्या गावातल्या घराच्या भीती सुद्धा खूप उंच इतक्या की आतले काहीच दिसत नाही.. जणू त्यात महिला कोंडल्या होत्या. आम्ही एकट्या ‘महिला’ आलो यांचे त्यांना खूपच आश्चर्य वाटले. असे दौऱ्याला जाऊन आल्यावर समजणे महत्वाचे फिरले की अशी समज वाढते, ‘यात्रा कंपनीतून’ गेल्यावर असे काही समजेलच याची खात्री नाही म्हणून याला दौरा म्हणायचे! मग बाजारात गुलाबांचे पाणी, तेल, अत्तर बघून मागे असणारे गुलाब फुलावर प्रक्रिया करणारे केंद्र पहावेसे वाटणे म्हणजे दौरा यशस्वी होणे!     त्यामुळे दौऱ्याची योजना म्हणजे फक्त प्रवास, निवासाची व्यवस्था करणे एवढेच मर्यादीत नसते ते तर काय यात्रा कंपनी सुद्धा करतात. दौरा म्हणजे सोबत येणाऱ्या महिलांनी काय पाहायला हवे ते आधी ठरवणे, त्याचे नियोजन करणे असते. प्रवासात समविचारी संस्था-कार्यकर्त्यांच्या भेटी होतील असे बघणे म्हणजे कन्याकुमारीला गेले तर ग्रामीण प्रकल्पात तिथल्या कार्यकर्त्यांनी कमी खर्चात घर बांधायचे तंत्र कसे विकसित केले आहे ते बघायचे तर गुवाहाटीला कार्यकर्त्यांशी बोलताना शिक्षणाचे महत्व कसे पटवून द्यावे लागते हे समजून घ्यायचे, बेलूर मठात गेल्यावर एका आध्यात्मिक संघटनेचा परिचय करून घ्यायचा तर तिलोनीयाला रॉय यांच्या भेटीत आंतरराष्ट्रीय काम समर्पण वृत्तेने लोकाभिमुख कसे उभे करता येते ते बघायचे. असे सगळे बघितले की रोज रात्री गटाने एकत्र बसून त्यावर चर्चा करायची, प्रत्येकीच्या वहीत या सगळ्या नोंदी होत आहेत ना? याची खात्री करायची. परत आल्यावर दौऱ्याचे प्रत्येकीने वृत्त लिहायचे त्यात नवीन काय अनुभवले, काय भावले पासून काय शिकले असे सगळे लिहायचे. त्याचे गटागटात जाऊन अनुभव कथन करायचे मग दौरा ‘संपतो’ बहुतेकदा दौरा संपतो तो पुढच्या वेळी कुठे जायचे असे ठरवूनच!      सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना: २४ – अभ्यास दौरा! Read More »

मागे वळून बघताना – २३ भावविश्व विस्तारताना!

आपल्या कामात महिलेचे भावविश्व विस्तारण्यासाठी ‘अनुभव सहलीं’चा खूप मोठा वाटा आहे. एखादी गोष्ट शब्दामध्ये समजावून देण्यात येणाऱ्या मर्यादा, डोळ्याने पाहिले की नाहीशा होतात या अनुभवासाठी सहल हा जणू एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. वयाने मोठे झाल्यावर एखादी गोष्ट शिकायला सुरुवात करायची तर ती गोष्ट शिकणे रंजकही असावे लागते. अनुभव सहली अशी शिक्षण संधी देतात.  ज्ञान प्रबोधिनीच्या शैक्षणिक विभागात लहान वयोगटातील सहाध्याय दिन हा उपक्रम अशाच प्रकारे चालतो त्यावरून कल्पना घेऊन ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आपण अनुभव सहली काढल्या, अभ्यास दौरे काढले. आधी कार्यकर्त्या शहाण्या झाल्या पाहिजेत म्हणून त्यांचे अभ्यास दौरे काढले आपल्या सारखे काम अजून कुठली संस्था करते ही बघणे हा सुद्धा प्रशिक्षणाचाच भाग होता. उदाहरण द्यायचे तर श्रावण महिन्यात भीमाशंकरला भोळेनाथ दर्शनाची सहल काढली की सोबत त्याभागात काम करणाऱ्या चैतन्य संस्थेच्या एखाद्या बचत गटाला भेट द्यायची असे आवर्जून वेळापत्रकात घातलेले असायचे.   बचत गटातील महिलांनी फक्त महिला-महिलांच्या सहली काढल्या कारण घरातल्या बजेटमध्ये महिलेला घराबाहेर पडण्यासाठी कधी पैसे नसतात. सुरुवातीला फक्त ‘एकट्या’ महिलांच्या सहली काढणे इतके अशक्य वाटत होते की महिलांनी सहलेला जाण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रकल्पातून निधी उभा करायला लागत होता. वेगवेगळ्या सहलींना नेल्यानंतर सामाजिक काम बघत असताना लक्षात आले की किमान फिरणे सुद्धा झाले नसल्यामुळे एकदम सामाजिक काम बघण्याची मनोभूमिका तयार होत नाही  त्यामुळे आधी देवदर्शनासारख्या त्यांच्या आवडीच्या ठिकाणी सहली काढण्याची गरज आहे. त्यासाठी प्रकल्पातून खर्च उभा करण्याऐवजी त्यांनीच स्वतः खर्च केला पाहिजे पण जोपर्यंत फिरल्याने ‘नवीन बघायला मिळतं’, यांची गोडी लागत नाही तोपर्यंत तरी मदत करावीच लागते. असा अगदी या वर्षाचा सुद्धा अनुभव आहे या अनुभवाचा विचार करून लक्षात आले की देवदर्शनाच्या सहली काढल्या तर मात्र त्यासाठी घरातून रक्कम मिळते किंवा दोन-चार रुपये बाजूला टाकून गुपचूप सहली इतके पैसे ‘ती’ आवडीने जमा करते. कधी कर्ज घेऊन सहल करते मग हप्त्याहप्त्यात फेडते. अशा खूप सहली गेल्या की ज्या सहलीचा पूर्ण खर्च बचत गटाने केला म्हणजे सभासदाच्या व्याजातून.. उद्या मिळणाऱ्या व्याजाची रक्कम आजच सहलीसाठी खर्च केली तरी हरकत नाही असा निर्णय घ्यायला गटामुळे महिला शिकल्या. आता दरवर्षी अशा हौसेच्या किमान दहा-पंधरा सहली तरी सहज निघतात. आता सहली इतक्या अंगवळणी पडल्या की भागातले वाहनचालक सुद्धा तयार झाले. १-२ दिवसात जाऊन येण्याच्या सहलींचे पॅकेज ते गावातल्या महिलांसोबत बोलू लागले. शंभर टक्के महिला सहभागी आहेत अशा सहलींचे आयोजन अनुभवाच्या आधारावर ते सुद्धा करू शकले.   आपले काम शिवप्रदेशात राजगड तोरणा पुरंदर या किल्ल्यांच्या परिसरात चालते तरी महिला कधी गडावर गेल्या नव्हत्या. लाकूड फाटा आणायला आणायला गडावर जाणे वेगळे आणि तोरण गड म्हणजेच प्रचंडगडाचा इतिहास ऐकत गडावर जाणे वेगळे यातला फरक त्यांनी सहलीमुळे अनुभवला. अशा स्थानिक ठिकाणांच्या सहली पासून पराराज्यातील सहली सुद्धा अनुभवल्या! गावाबाहेरच्या कार्यकर्तीने गावात जाऊन सहलीसाठी महिलांना तयार करणे वेगळे. गावातल्याच एखाद्या गट प्रमुख महिलेने आग्रहाने, हौसेने कधीच घराबाहेर पडलेली नाही अशा ‘ती’ला घराबाहेर पडण्याचा अनुभव देण्यासाठी सहल काढणे वेगळे.  सहलीसाठी एका दिवसात सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणे अशी जेजुरी, भीमाशंकरची देवदर्शनाची सहल काढण्यापासून सुरुवात होते ते थेट बालाजी दर्शनाची ६ दिवसाची सहल! सहलीत विविधता असते जेव्हा हंडाभर पाण्यासाठी २-४ तास वणवण करणाऱ्या महिला मुंबईला राज्याची राजधानी बघताना, अथांग समुद्राचे दर्शन घेतात तेव्हा सहलीहून परतल्यावरही अनेक दिवस समुद्राचे दृश्य डोळ्यांसामोरून हालतच नाही असे सांगतात .. हा अनुभवच घ्यावा लागतो. तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जाणे हा एक वेगळाच अनुभव कारण या सहली मधला ३ दिवसाचा काळ ‘आउट ऑफ रेंज’ असायचा. गेल्या २५ वर्षात बालाजी दर्शनाच्या अशा १८ सहली काढल्या ज्यात किमान ६०० जणी स्वखर्चाने केल्या. ६ दिवस ५ रात्रीच्या या सहलीला स्वतःची परवानगी काढणे हेच मोठे आव्हान असते अशी शिकवण या सहलींनी दिली. एका पुढाऱ्याने आर्थिक मदत केल्यामुळे ३७ गावातल्या ८०० महिला एकाच दिवशी १६ गाड्यांमधून एकाच वेळी जेव्हा कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनाला गेल्या तेव्हा सर्व आर्थिक, सामाजिक सीमांचे भान कसे विरघळून गेले असे सहभागी महिलांनी अनुभवले, तेव्हा करता गट सहलींचे विक्रमही सहज करू शकतो असा विश्वास आला.  २००९ पासून आपल्या प्रयत्नांने प्रकल्पातून निधी उभा करून वेगवेगळ्या गावातील महिलांच्या ३१ ठिकाणी ४२ सहली काढल्या ज्यात १७३६ जणी सहभागी झाल्या, प्रकल्पासाठी यांची नोंद केली आहे. कधी पावस पाहिले तर कधी कोल्हापूर, कधी तुळजापूर तर कधी पंढरपूर सगळी ठिकाणे आली. यातली प्रत्येक सहल ‘पहिली’ होती! समुद्र बघायला कोकणात गेले तर मुंबईपेक्षा खर्च कमी होतो, देवस्थानच्या निवासात राहिले तर निवास खर्च कमी होतो, अनेकदा प्रसादाच्या वेळेत पोचले तर जेवणाचीही सोय होते. बघण्याचा अनुभव तोच असला तरी खर्चाच्या या छटांच्या माहितीची देवाण घेवाण होत होती. एकदा प्रमुखाने बघितले की जायचे कुठे, तिथे काय बघायचे आणि सहलीच्या ठिकाणचे संपर्क मिळाले की मग या सहलीला आलेल्या प्रमुखांनी पुढच्या गावपातळीच्या सहली काढायच्या, असे नियोजन होते. सहलीतले अनुभव म्हणजे अगदी पोटभर खरेदी करणे असेल किंवा प्रेक्षणीय ठिकाणी ‘ती’चा काढलेला फोटो असेल, अशातून आयुष्याच्या सुखद आठवणी तयार करायच्या हा छुपा हेतू तर होताच. असे सगळे केले ते केवळ बचत गटाने दिलेल्या विश्वासाने, गटाच्या ताकदीमुळे! जेव्हा असे सहज करता येते तेव्हा संघटनेचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरजच भासत नाही. मग याच संघटनेचा उपयोग घरातील महिलेचा सन्मान वाढण्यात होतो.  बचत गटाचे काम सुरू केले तेव्हा कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणाऱ्या अनेक महिला होत्या पण जशी बचत गटाच्या संघटनेची ताकद लक्षात यायला लागली, महिलांचे अनुभव विश्व समृद्ध व्हायला लागले तसतसा या परिस्थितीत विधायक फरक पडायला लागला. जग बघितल्यावर विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. ‘पूर्वी माझ्या बाबतीतही सांगू नये असे काही घडत होते पण तसे घडणारच असे वाटायचे!’ पण  परिस्थिती बदलल्यावर पूर्वीची परिस्थिती मोकळेपणाने मान्य करायला लागल्या. मनातून एखादी गोष्ट पटत नसली तरीही अगतिकतेमुळे ती स्वीकारावी लागते असा अनुभव पदोपदी यायचा. घरातून ‘बाहेर’ पडल्यानंतर नवीन गावं बघताना नव्याने खूप काही कळतंच कळतं पण त्याच बरोबर कळतं ते, ‘माझ्या वाचून घर चालू शकतं!’ हे समजणं खूप महत्त्वाचं असतं. स्वयंपाक घरात अडकून पडलेल्या बाईला हे शब्दाने पटवून देणं केवळ अशक्य असते!  अशा सहलीत आपण कोणाशी बोलतोय हे बघायला सुद्धा कोणी जवळपास नाही असा स्वातंत्र्याचा अनुभवही खूप काही शिकवून जातो. गप्पागप्पात समजते की ‘माझ्यासारखीच परिस्थिती इतरांच्याही घरात असते!’ याची समज वाढली की आयुष्याचा एकटेपणा जातो. त्यामुळे सुखद आठवणी सोबत सहलीतून मिळतात त्या जिवाभावाच्या मैत्रिणी! एरवी जसे ‘सहल’ म्हंटले की ‘मज्जा करायला बाहेर जाणे’ अशी जणू व्याख्याच बनली आहे, पण ग्रामीण महिलांच्या सहली जरा वेगळ्याच .. या सहली महिलांची समज वाढवायला, दृष्टी व्यापक करायला उपयोगी पडणाऱ्या असतात हे नक्की!  सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना – २३ भावविश्व विस्तारताना! Read More »

मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी!

स्वयंरोजगार करून किंवा बचत गटातून बाईच्या हातात पैसा का यायला पाहिजे तर जर ‘ती’ने मिळवलेला पैसा असेल तरच ‘ती’ला तो पैसा ‘ती’चा वाटतो. नाहीतर एरवी ‘ती’च्या आरोग्यासाठी केलेला खर्च ‘ती’च्यासाठी जरी गरजेचा असला तरी तिच्या कुटुंबाच्या दृष्टीने वायफळ वाटतो. ‘ती’ कमावती झाली तर स्वतःच्या आरोग्यासाठी खर्च करणे, स्वतःकडे लक्ष देणे ‘ती’ला परवडते! भारतातल्या गावागावात ‘आशा’ आरोग्य सेविकांची नेमणूक होण्यापूर्वी जो पथदर्शी प्रकल्प निवडक ठिकाणी झाला त्यात ज्ञान प्रबोधिनी होती, तेव्हा आपण वेल्हे तालुक्यातील पासली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गावात आरोग्य सेवेची योजना, स्थानिक ग्रामीण महिलांच्या मदतीने राबवली होती व गावपातळीवर आरोग्य सेविकेची परिणामकारकता दाखवून दिली होती.  १९९६ पासून वेलहयातील महिलांसाठी सातत्याने केलेल्या आरोग्य कामाचा परिणाम असा होता की ‘मागच्याचे ऱ्हाऊद्या म्होरचे सुधारा!’ या न्यायाने पुढची पिढी आरोग्याबद्दल जास्त जागरूक झालेली दिसते आहे. या ‘आरोग्य’ विषयाच्या भांडवलावर २०१९ पासून आपण बजाजच्या CSRअर्थसहाय्यामुळे ५० गावासाठी आरोग्य जागृती करणारा ‘आरोग्य सखी’ असा प्रकल्प केला. वर्षभरात जाणीव जागृती व डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी करून तालुका पिंजून काढला. त्यातच करोना आला आपले नेटवर्क गावोगावी तयार असल्याने करोना काळात किती महत्वाचे काम करू शकलो त्याबद्दल आधी लिहिलेच आहे. ही गावागावात आरोग्याची जी रचना उभी राहिली ती ‘आरोग्य सखी’या प्रकल्पामुळे! पहिल्या वर्षीचा नियोजनाप्रमाणे काम केल्याचा चांगला परिणाम पाहून पुढील वर्षी बजाजने ५० गावांऐवजी  ८० गावात काम करायचा प्रस्ताव मंजूर केला. गावागावात ‘आशा’ आरोग्य कार्यकर्ती शिवाय प्रशिक्षण देऊन अशी एक-एक कार्यकर्ती उभी राहिली जी स्थानिक भाषेत, स्थानिक संदर्भासह बोलेल! हिला आपण ‘आरोग्य सखी’ म्हणायचे ठरवले.  ही ‘आरोग्य सखी’ गावात जाऊन प्रकल्पात जाणीव जागृती करण्यासाठी कशाकशावर बोलत होती तर नव मातांसोबत आपले बाळ सुधृढ होण्यासाठी बाळाला सकस आहार काय द्यावा यावर बोलत होती, किशोरींसोबत मासिक पाळीचे चक्र समजावून देउन अगदी सॅनिटरी पॅड कसे वापरून त्याची विल्हेवाट कशी लावायची या नाजूक विषयावर बोलत होती. गृहीणींसोबत दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जंत संसर्गाची माहिती देउन जंत निर्मूलन करायची गोळी सगळ्यांनी जाणीव जागृती सत्रातच एकत्र घेतली जाईल असे पहात होती तर व्यसन म्हणून तंबाखू खाणाऱ्यांशी त्याचे गंभीर परिणाम सांगून सावध करत होती अगदी महिलांनी मेशरी मुक्त होण्यासाठी आवाहन करत होती.  लहान मुलांसाठी ‘चांगला-वाईट स्पर्श’ यावर गोष्ट सांगून माहिती देत होती तर गावातल्या सगळ्यात दुर्लक्षित घटक असणाऱ्या ज्येष्ठ महिलांसाठी ‘रजोनिवृत्ती नंतर घ्यायची काळजी’ काय असते हे सांगताना त्रास होत असेल तर डॉक्टर कधी येणार आहेत ते सांगून फुकट काम होईल असेही सांगत होती! गावातल्या महिलांवर येणारे मानसिक ताण कुठले यावर चर्चा घेउन उपचाराचे गरज कोणाला आहे का याचा अंदाज घेत होती. जाणीव जागृतीच्या या सत्रात जे विषय हाताळले जात होते ते सगळे विषय असे होते की जे एरवी कधीही बोलले जात नाहीत पण महत्वाचे आहेत!  या संवादात लक्षात असे आले की यासाठी फक्त आरोग्य विषयी माहिती देवाण-घेवाण पुरेशी नव्हती तर बोलणारी वरचा विश्वास महत्वाचा होता. ८० गावात काम करणाऱ्या सगळ्या मिळून आम्ही ६३ जणी होतो, यापैकी ४०-४५ जणी तरी असे आरोग्यकाम प्रथमच करत होत्या तरी कुठेही बिघडले नाही कारण त्या त्याच परिसरात रहात होत्या. आरोग्य जागृतीची माहिती ५-७ जणींच्या किंवा मुलांच्या गटात खाजगी बोलल्यासारखी बोलल्यामुळे नेमके बोलता येत होते. छोट्या गटामुळे मोकळेपणाने  शंका सुद्धा विचारल्या जात होत्या. अगदी, ‘त्रास होतोय पण गावात नको दुसऱ्या गावात तपासणी असेल तर सांग… उगाच गावात बोभाटा नको!’ असे सुरक्षित संवादही व्हायचे. या मोकळ्या संवादातून काही रुग्ण लक्षात यायचे जे पूढे डॉक्टरांच्या तपासणीला यायचे. डॉक्टर आणि उपचार जरी काही पैसे न देता होणार असले तरी विश्वास किती महत्वाचा हे या प्रकल्पातून शिकायला मिळाले.  आरोग्य विषयी सगळे सांगू शकणारी, सहज बोलता येईल अशी (resourceful) ताई गावात असल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत धरून आपण पहिल्या वर्षी २५८ प्रशिक्षणातून ६४५६ लोकांपर्यंत पोचलो तर दुसऱ्या वर्षी गावे व मनुष्यबळ वाढल्यामुळे २४३४ प्रशिक्षणे/ तपासणीतून २१०७१ जणांपर्यंत पोचलो. एकूण २७,५२७ अशा विक्रमी संख्येपर्यंत पोचलो. यात अनेकांनी एका पेक्षा जास्त उपचार घेतल्याची गाव-वय अशी १२००० पेक्षा जास्त जणांची नोंद आहे! या आरोग्य जाणीव जागृती सोबत केलेल्या तपासणींमुळे तालुक्यातला पहिला दातांचा दवाखाना मार्गी लागला. ‘दात दुखला तर painkiller खायची’ या सवयीतून दवाखान्यात जायची सवय लावणे सोपे नव्हते, अनेकांना तर दाताचा वेगळा दवाखाना असतो हे सुद्धा यामुळे प्रथमच कळले. माता-पालिकांच्या मागणीमुळे बालआरोग्य तपासणी गावोगावी जाऊन नियमित करणे शक्य झाले ज्याचा परिणाम शासनाचा लहान मुलांच्या लसिकरणाचा प्रतिसाद वाढण्यात झाला. ‘लसीकरण या शासनाच्या कार्यक्रमात आपला सहभाग’ असे नसून ‘आपल्या बाळाची शासन काळजी घेते म्हणून हजर राहायचे’ असे माता पालिका शिकल्या. प्रश्न असला तरी यौनीमुखाच्या कर्करोगा बद्दल आतून तपासणीला तयार होणे फारच अवघड होते. आधी मनाची तयारी करून तपासणी करायला  टप्प्याटप्यात गावोगावच्या शेकडो महिला आल्या. अनेकींनी उपचारासाठी आवश्यक ती ऑपरेशनस दीनानाथ रुग्णालयातून करून घेतली. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा अजून एक प्रश्न म्हणजे मोतीबिंदू! त्याचे रुग्ण शोधून त्यांना दवाखान्या पर्यंत नेउन ऑपरेशन करून परत गावात सोडायची सोय प्रकल्पात केली होती तरी धिटाईने गाडीत बसणारे ‘आज्जी / आजोबा’ तयार करणे सोपे काम नव्हते …. ‘माझे मेलीचे असे आता किती दिवस राहिले?’ या प्रश्ना पलीकडे जिला जिला नेउन तिच्यावर उपचार करून घेतले त्या प्रत्येकीची जीवन गुणवत्ता सुधारली होती. अनेकींची आयुष्य आरोग्य सखी प्रकल्पामुळे सुखकर झाली, काहींची आयुष्य काही वर्षाने का होईना नक्कीच वाढली, जगण्याला हुरूप आला!  जागतिक पातळीवर HDI (human development index) मध्ये ‘मागास’ असणाऱ्या भारत देशाला पुढे न्यायचे तर ज्या ज्या घटकामुळे ‘बाई’ची आयुर्मर्यादा कमी होते त्या त्या घटकावर काम करायला हवे होते  आजही हवे आहे. गावातील आरोग्य सखींनी प्रकल्पात ते काम कसे करायचे हे शिकले आणि आजही त्या ते काम वसा घेतल्या सारखे करत आहेत याचा अतिशय आनंद वाटतो.  सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना- २२ आरोग्य सखी! Read More »

मागे वळून बघताना – २१ स्वयंरोजगार हेच विकासाचे माध्यम !

स्वयंरोजगार केल्याशिवाय बाईच्या हातात पैसे खेळते रहाणार नाहीत त्यामुळे स्वयंरोजगारासाठी गेली ३० वर्ष सातत्याने काम चालू आहे. स्वयंरोजगार प्रशिक्षण वेगवेगळ्या गावातील, वेगवेगळ्या गटातील महिलांसाठी घेतले म्हणजे सहभागी महिलांचा गट जरी बदलत गेला तरी आपले काम चालू राहिले. ग्रामीण महिलेसाठी घरातील स्थान उंचावणे, घरातल्या माणसांनी तिची दाखल घेणे असे कुटुंब पातळीवर ‘ती’ कमावती झाल्यामुळे होणारे बदल इतके महत्वाचे असतात की बचत गटाच्या उपक्रमातून आपल्या संपर्कात आलेली महिला काही काळ तरी या उत्पादकतेच्या गटात काम करतेच करते. ‘ती’ला ‘ती’च्या मनासारखे घरात स्थान मिळाले की हट्ट करून पुढे जात रहातेच असेही नाही पण सहभागी होते ही मात्र नक्की! प्रबोधनाच्या कामासाठी हे फार गरजेचे आहे असे वाटून आपण स्वयंरोजगाराचे काम करत आहोत. अनेक वर्ष सातत्याने काम केल्यामुळे आता थोडक्या दिवसांत काय कसे करायचे याचे शास्त्र बसले. भारतीताईंनी ते नवीन गावात करून बघायचे ठरवले. सायबेज कंपनीने असे करण्याची संधी दिली. आणि डिसेंबर २०२२ पासून सायबेजच्या आर्थिक मदतीने ‘सायबेज संपदा’ प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात मार्च २०२४ पर्यंत काय करू शकलो त्यातल्या काही निवडक गोष्टींचा हा आढावा.  एखादी गोष्ट सिद्ध झाली असे म्हणायचे तर आधी ठरवून तसे करून दाखवले पाहिजे, म्हणून वेल्हे तालुक्यातील पण प्रबोधिनीच्या संपर्कात अजिबात नाहीत अशा ९ गावात हा प्रकल्प करायची संधी घेतली. ही सगळी गावे इतकी छोटी होती की कुठल्याही गावाची लोकसंख्या ५०० पेक्षा जास्त नव्हती, गावात एस टी येत नाही, ९ गावात मिळून १० वीची एकंच शाळा, ११ वी शिकायचे तर किमान रोज १०-१२ किलोमीटर चालत जावे लागेल अशी परिस्थिती. जेवढे गाव दुर्गम तेवढा विकास संथगतीने होतो ही लक्षात यावे म्हणून ही माहिती मुद्दाम नोंदवली.  तर कामाला सुरुवात कराची तर अर्थातच बचत गटापासून! म्हणून प्रत्येक गावात १ गट करायचा ठरवला होता, पण महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला ९ गावात १३ गट तयार झाले. मग त्या १३ गटांचा मिळून एक गट ज्याला आपण विभाग म्हणतो असा तयार केला. त्या विभागाला ‘संपदा’ असे नाव ठेवले. त्या विभागाचे बँकेत खाते काढले; सर्व व्यवहार बचत गट प्रमुखांद्वारे होतील असे पाहिले. बँकेत जाणे, चेकने व्यवहार करणे अशा वरवर किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा पहिल्यांदाच जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांना ‘करण्याचा वेगळाच आनंद’ मिळतो.. तशी संधी योजावी लागते. प्रकल्पानिमित्ताने असे सगळे नियोजनपूर्वक केले.     गावातील बाईमध्ये बदल घडायला हवा असेल तर ‘ती’ने उंबरा ओलांडायला हवा. अगदी गावातल्या गावात जरी घराबाहेर पडली तरीही बदल घडायला सुरुवात होतात. संपदा प्रकल्पात ९ गावात स्वयंरोजगारांच्या २०-२२ प्रकारची २५१ प्रशिक्षणे या कालावधीत घेतली. प्रशिक्षणाची संख्या खूपच जास्त असली तरी छोट्या गावात गावपातळीवर ५-७ जणींसाठीच्या प्रशिक्षणाच्या या अभिनव कल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला. गावातल्या गावात सुद्धा प्रतिसादी होणं सोप्पं नसतं! सर्व वर्गांची मिळून सहभागी संख्या ८०० होती. अनेक जणी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वर्गांना आल्या. त्याच धडपड्या आहेत असे लक्षात आले त्यांनी भरीव काम स्वयंरोजगारात केले, कोणी स्टॉलची जबाबदारी घेतली तर कोणी वैयक्तीक पातळीवर गुंतवणूक करून शेवई मशीन घेतली, गिरणी घेतली..  असे गावागावात जाऊन कमी उपस्थितीच्या महिलांचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षक महिलाही जवळपासच्या गावातीलच होत्या. प्रशिक्षक म्हणूनही अनेकींचा हा पहिला अनुभव होता. या निमित्ताने येणाऱ्यांनी व घेणाऱ्यांनी ‘घराबाहेर पडायची’ संधी घेतली. आता त्यातल्या अनेक जणी त्यांना आवडलेले गाणे आवडीने गुणगुणताना दिसतात ..’आता पुरे झाले घरात बसून, उठ हक्कासाठी कंबर कसून!’  एकदा का महिला घराबाहेर पडली की तिला पुन्हा पुन्हा घराबाहेर पडावे असे वाटायला लागते हे आपल्याला अनुभवाने माहिती होते. त्यामुळे सायबेजला सादर केलेल्या प्रकल्पातच असे नियोजन केले होते! अशा घराबाहेर पडणाऱ्या महिलांची दृष्टी जरा विशाल व्हावी म्हणून आपण प्रकल्प काळात ठरवून १९ अनुभव सहली काढल्या. अगदी पुण्यातल्या रविवार पेठेतील घाऊक दुकाने दाखवण्यापासून मुंबईची घाऊक बाजारपेठ दाखवणे असेल किंवा प्रकल्पात भरतकाम शिकवले म्हणून गुजरातमधल्या कच्छ भागात हाताने भरतकाम करून ४ लाख किमतीची साडी कशी बनते असे बघणे असे सुद्धा योजले होते, अशा सहलीला साधारण २०० जणी सहभागी झाल्या.  सायबेजला दिलेला प्रकल्प स्वयंरोजगाराचा होता त्यामुळे उत्पादन करणे व विकणे हा  त्याचा अविभाज्य घटक होता. प्रकल्प काळात ४३ स्टॉल लावले, ज्यावर ८.५ लाख रुपयांपेक्षा जास्त विक्री झाली. स्टॉलशिवायसुद्धा साधारण २० लाख रुपयांचे उत्पादन ७५ महिलांनी केले. गावातच काढलेल्या ३९ शेतसहलीतून २.५ लाख रुपयांची उलाढाल २०-२५ महिलांनी केली. बहुतेकींच्या आयुष्यातला अशा प्रकारच्या पाहुणचाराचा हा पहिलाच अनुभव होता. या शिवाय स्वतंत्र व्यवसाय करायचा म्हणून एका गटाने डाएट-किट बनवून ४ लाखांपेक्षा जास्त उलाढाल केली तर दुसऱ्या गटाने ३ लाख रुपयांचा दिवाळी फराळ उत्पादन करून विकला. सायबेज कंपनीने फक्त आर्थिक मदत दिली नाही तर कंपनीत वर्षभर साप्ताहिक स्टॉल लाऊन विक्रीसाठी सुद्धा मदत केली. त्यामुळे थेट ग्राहकांशी संवाद कसा करायचा याचेही प्रशिक्षण झाले.  प्रकल्पानिमित्ताने स्वयंरोजगाराचे काम प्रथमच करणाऱ्या ८१महिलांनी या कालावधीत  १३ लाखांपेक्षा जास्त उत्पादन केले. यामुळे अशी धडपड करणाऱ्या महिला आर्थिक प्रवाहात आल्या. मग लक्षात आले की कोणाचे आधार कार्ड अपडेट करायला हवे होते तर कोणाला PAN काढायला हवे होते. कोणाला पोस्टाच्या बचत खात्यांची माहिती हवी होती तर कोणाला बँकेत स्वतःचे खाते काढावे वाटत होते. अशी १६१ कामे अर्थसखीच्या मदतीने केली.   प्रकल्पासाठी केलेल्या १३ बचत गटाच्या रचनेतून जवळ जवळ २२ लाख रुपये माफक दरातले सुरक्षित कर्ज ६४ महिलांनी घेतले. व्यवस्थित व्याजासह होणारी परतफेड बघून सायबेज कंपनीने त्यात ९ लाख रुपयांच्या खेळत्या भांडवलाची भर घातली. ‘कर्ज माफी’ मिळवण्याच्या राजकीय खेळाच्या या जमान्यात, सन्मानाने कर्ज घेऊन व्याजाने फेडायला शिकवणे हे आव्हानच होते पण ‘विकास’ स्वतःच्या हिमतीवर होतो ‘अनुदानावर’ नाही हे मूल्य समजावून द्यायला आपण काही अंशी यशस्वी झालो. मला खात्री आहे अशा आर्थिक ‘इंजेक्शन’मुळे अनेकींच्या घरातली परिस्थिती सुधारली आहे. हे काम जरी महिलांच्या माध्यमातून केले असले तरी नेमक्या प्रयत्नाने अनेक कुटुंबात थोड्याशा काळात बदल झाला आहे.  प्रकल्पामुळे ‘करणारा’ गट काय शिकला तर वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक उपक्रमातून  सुद्धा ‘सुरक्षित संधी’ची योजना केली तर अगदी कमी कालावधीत ग्रामीण बाईचे आयुष्य बदलायला सुरुवात होऊ शकते! प्रबोधनाची ही पहिली पायरी! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना – २१ स्वयंरोजगार हेच विकासाचे माध्यम ! Read More »

मागे वळून बघताना २०:ग्रामीण महिलांची नेतृत्व विकासाची शाळा!

एकदा बचत गटाची घडी बसल्यावर गेले पंचवीस वर्ष आपण दर एप्रिल महिन्यामध्ये आर्थिक वर्ष संपल्यावर वार्षिक हिशोब करून गाव पातळीवर गटाच्या हिशोबयचे जाहीर वाचन करतो. या निमित्ताने गटातून कोणी किती कर्ज घेतले, कोणाचे किती देणे बाकी आहे, बचत किती आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचते. एखादी महिला आपण शिकवल्याप्रमाणे जरी वागत नसली तरी ज्ञान प्रबोधिनी आर्थिक विषयातही पारदर्शक व्यवहाराचा आग्रह धरते हे गावातल्या सभासद महिलांपर्यंतच काय दूरून ऐकणाऱ्या पुरुषांपर्यंतही पोहोचते. असे पोचल्याचा सगळ्यात मोठा परिणाम गटाचे सामाजिक बळ वाढण्यात झाला होता. एखादीच्या कुटुंबाने किती मोठे आर्थिक निर्णय घेतले, त्याला बचत गट नेमका कसा आणि किती सहाय्यभूत झाला हे सुद्धा या निमित्ताने गावभर जाहीर होत होते. गटाच्या निमित्ताने ग्रामीण महिलांचा बँकांशी होणारा संवाद हा सुद्धा ‘ती’ची गावपातळीवरची निर्णय क्षमता वाढण्यासाठी उपयोगी पडला आहे असे मेळाव्या निमित्ताने गावाला दिसायचा. नेतृत्व विकासाचा जाणीवपूर्वक विचार करायला लागल्यावर अशा गावपातळीवर काम करणाऱ्या माहिलांसाठी कार्यक्रमाची आखणी केली. तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात केली. किती छोट्या गोष्टी तर गावातच २०-२५ जणींचा दोन-तीन तास चालणारा मेळावा घ्यायचा अशा उपक्रमाची सुरुवात केली. शेती कामे उरकल्यावर नवरात्रात या मेळाव्याची योजना केली. गेली १० वर्ष असे मेळावे योजनापूर्वक घेतले तेव्हा असे लक्षात आले की रोजंच गावात भेटणाऱ्या गावातल्याच महिलांसाठी मेळावा योजला तर मेळाव्याचे काम पैशाच्या हिशोबा पलीकडे असल्यामुळे एरवी पुढाकार न घेणाऱ्या चार जणी पुढाकार घ्यायला तयार होतात. बचत गटाच्या कामामुळे आर्थिक घडी तर बसली होती पण सामाजिक परिणाम घडवण्यासाठी अशा पद्धतीच्या कामांचा खूपच उपयोग झाला. गाव पातळीवर घेतले जाणारे असे मेळावे गावातल्याच महिलांसाठी, गावातल्याच महिलांनी घेतलेले असायचे, नवरात्रीच्या ठरावीक दिवसांत एकाच वेळी ३०-४० गावांमध्ये जाण्यापासून सुरुवात झाली एक वर्ष हा आकडा ८२ गावापर्यंत पोचला. या जवळपासच्या गावांमध्ये जबाबदारी घेऊन, नियोजनपूर्वक जाण्यामुळे गटाचा आत्मविश्वास उल्लेखनीय वाढला. असाच एक कामाचा मैलाचा दगड म्हणजे द्विदशक पूर्ती निमित्त घेतलेला महामेळावा! हा जवळजवळ चार-साडेचार हजार महिलांचा होता या मेळाव्याने कार्यकर्त्या गटाचा आत्मविश्वास दुणावला. त्याचा अधिक तपशील स्वतंत्र लेखात दिला आहे.   ग्रामीण महिला एकत्रितपणे अनुभव किंवा सराव नसल्याने फार दूरचे नियोजन करू शकत नव्हत्या तरी चालू कामांमध्ये बारकावे लक्षात घेऊन, नेटकेपणाने मन लाऊन काम करतात. अशा कामामुळे त्या गावात उठून दिसायला लागतात. शासनाने जरी महिला आरक्षण दिले असले तरी त्यासाठी पात्र होण्यासाठीची प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली नाही. बचत गट अशी संधी देतो. असे नेतृत्व संधी देणारे मेळावे, महिलांना मुख्य प्रवाहात आणायला मदत करतात. ‘कोणाला तरी महिलेला ५०% महिला आरक्षणामुळे संधी मिळणार आहे मग मी का नको?’ असे वाटणारी महिला गावासाठी धडपडून काहीतरी करताना दिसते मग गावातील महत्त्वाच्या पदांवर अशा महिलांची वर्णी लागायला सुरुवात होते. कोणी पाण्याच्या गाव पातळीवरच्या समितीची सभासद होते तर कोणी शाळेच्या शिक्षण समितीची सदस्य होते. कोणी पालक संघासाठी काम करू लागते तर कोणी बालवाडी ताईला मदत करू लागते.   हळदीकुंकवासाठी जमणे वेगळे आणि गाव विकासासाठी आपणच पुढाकार घेऊन काहीतरी करणे वेगळे. एकदा का सामाजात उतरून अशी नेतृत्व संधी घ्यायची ठरवली तर खूप शिकावे लागणार होते. अनुभवाने अनेकींच्या ही गोष्ट लक्षात आली. मग बैठकीचे विषय बदलले. छोटे भाषण गटांसामोर उभे राहून कसे करायचे या पासून अधिकाऱ्यांशी बोलायचे कसे ही अनुभवाने शिकायला तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या, कुठली कामे कोण करते यांचे माहिती घेतली. गंमत म्हणजे ‘पुरुष’ पुढारी ‘शहरात’ जाऊन काय काय करतात यांचा महिलांनी बारकाईने अभ्यास केला. मग थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहाण्या पासून हॉटेलमध्ये जाऊन पंजाबी जेवण कसे मागवायचे यांचाही अनुभव स्वखर्चाने सुरक्षित छोट्या गटात महिलांनी घेतला. एकीकडे असे अनुभव घेताना आपण आपल्या प्रयत्नाने अनेक गावात महिला ग्रामसभा घेतल्या. गटातील महिला सरपंच नंतर होऊ देत पण आधी गावगाडा कसा चालतो ते समजले पाहिजे. रचनेचा भाग व्हायचे असेल तर रचना आधी नीट समजून घेतली पाहिजे असा साधा हेतू त्यात होता. ज्यांना पुढे जायचे होते त्यांनी अशा गटकार्यात हिरीरीने भाग घेतला. त्यामुळे नेतृत्व करण्याची उर्मी एकेकीच्या मनात जागी व्हायला लागली आहे असे लक्षात आले. ज्ञान प्रबोधिनी म्हणून आपण सोबत आहोतच पण आता बचत गटाला फक्त मार्गदर्शन करूया असे ठरवले. या प्रशिक्षणातून तयार झालेल्या काही जणींनी ‘जिजामाता प्रबोधन केंद्र’ अशा स्वतंत्र न्यासाची सुरुवात केली. गटाची जबाबदारी या न्यासाने घेतली. तरीही गटांची संख्या कमी करून, गट स्वयंपूर्ण होऊन आपापला आर्थिक व्यवहार बघेल असे बघतो आहोत. मग शासनाच्या योजनांना गाव प्रतिनिधी म्हणून त्या आपल्या मार्गदर्शनाने अर्ज करत आहेत. अगदी परवाच्या लोकसभेच्या निवडणूकीला ‘मला पटते त्या उमेदवाराचा प्रचार मी करते आहे!’ असे म्हणणाऱ्या सर्व पक्षात असणाऱ्या आपल्याच कार्यक्रमातून तयार झालेल्या महिला आहेत यांचे समाधान आहे. सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना २०:ग्रामीण महिलांची नेतृत्व विकासाची शाळा! Read More »