पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५
पतितपावना जानकीजीवना । वेगी माझ्या मना पालटावें ॥ धृ ॥भक्तीची आवडी नाही निरंतर । कोरडें अंतर भावेंविण ॥ १ ॥माझे मीतूंपण गेले नाही देवा । काय करूं ठेवा संचिताचा ॥ २ ॥रामदास म्हणे पतिताचें उणें । पतितपावनें सांभाळावे ॥ ३ ॥ ‘रामदास काय म्हणाले?’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९९९ साली प्रकाशित झाली. पण त्यासाठी समर्थ रामदासांच्या साहित्याचे वाचन आणि या पुस्तकासाठी वेच्यांची निवड १९९३ ते १९९६ या काळात झाली. त्या काळात समर्थांनी रचलेली पदे आणि अभंगही वाचनात आले. त्यावेळी ‘पतितपावना जानकीजीवना’ या चरणाने सुरू होणारे पाच अभंग नजरेत भरले. पण पुस्तकात फक्त दासबोधातल्या ओव्या घेणे शेवटी पुरेसे वाटले. ते अभंग पुस्तकात घ्यायचे नसल्याने तसेच बाजूला राहिले. १९९९ सालापासून पुण्याच्या प्रशालेतील आठवीच्या विद्यार्थ्यांचे विद्याव्रत पूर्वतयारी शिबिर सज्जनगडावर घ्यायला सुरुवात झाली. तीन दिवसांच्या शिबिरात रोज एक तास भजन असायचे. तोपर्यंत रामदासांचे दोन-तीनच अभंग प्रबोधिनीत म्हटले जात. शिबिरातील रोजच्या भजनात, रामदासांचे आणखी काही अभंग असावेत असे वाटले. तेव्हा ‘पतितपावना जानकीजीवना’ अशी सुरुवात असणारे पाच अभंग पुन्हा आठवले. हे अभंग विद्याव्रत पूर्वतयारी शिबिरात २००२ ते २०१४ पर्यंत नियमितपणे म्हटले जात. त्या पाच अभंगांपैकी पहिला अभंग आज निरूपणासाठी निवडला आहे. पतित म्हणजे खाली पडलेला. ज्याचे नैतिक आचरण समाजाच्या दृष्टीने निंदनीय आहे, त्याला पतित म्हणतात. पण इथे जो आपली शिवस्वरूपाची ओळख विसरला आहे, आणि जो स्वतःला एक असहाय्य किंवा अगतिक जीव मानतो, तो पतित असा अर्थ घेणे जास्त योग्य आहे. पतिताला जो पावन करतो, म्हणजे शुद्ध करून घेतो, किंवा पडलेल्या स्थितीतून पुन्हा मूळ स्थितीला आणून ठेवतो, तो पतितपावन. हे विशेषण किंवा संबोधन श्रीरामाला म्हणजेच परमेश्वराला लावले जाते. तो परमेश्वर श्रीराम या मानवी अवतारात जानकीच्या म्हणजे सीतेच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारा आहे. म्हणून त्यालाच जानकीजीवना असेही संबोधन वापरले आहे. त्याला प्रार्थना केली आहे, की माझे मन स्वतःला निराधार जीव मानते. त्याला पुन्हा त्याच्या शिवस्वरूपाची आठवण करून दे. समर्थांनी इतर ठिकाणी वापरलेले शब्द म्हणजे स्वतःला जीव मानणे, किंवा मी म्हणजे हा देहच आहे असे मानणे, ही देहबुद्धी. आणि स्वतः शिव आहोत हे ओळखणे, म्हणजे आत्मबुद्धी. माझी देहबुद्धी तू आत्मबुद्धीमध्ये पालटून टाक. आणि हा बदल सुद्धा वेगाने म्हणजे लवकरात लवकर कर. ही या अभंगातली मुख्य प्रार्थना आहे. अभंगाच्या पुढच्या दोन कडव्यांमध्ये मी किती प्रकारांनी पतित आहे, त्याचे वर्णन केले आहे. या निरूपणमालेत तुकाराम महाराजांचा ‘माझे मज कळो येती अवगुण’ हा अभंग पाहिला होता. त्यासारखाच हा अभंग आहे. जो साक्षात्काराच्या जवळ गेलेला आहे त्याला आपल्यातील छोटे-छोटे दोष सुद्धा मोठे वाटायला लागतात. त्यामुळे ‘तुझ्या भक्तीची आवड मला निरंतर, म्हणजे सर्वकाळ राहत नाही’, म्हणून समर्थ स्वतःला पतित समजतात. भक्ताची साधना चालू असते, तेव्हा एकदा कधीतरी त्याला सहज ईश्वरदर्शन होऊन जाते. पण त्यात ईश्वराच्या कृपेचा भाग जास्त असतो. त्यानंतर भक्ताला सतत ईश्वरदर्शन होत राहावे असे वाटते, ते मात्र होत नाही. माझे प्रयत्न कुठे कमी पडतात? भक्तीमध्ये मी कुठे कमी पडतो? असे त्याला वाटायला लागते. मला सतत ईश्वरदर्शन होत नाही, मला पाहिजे तेव्हा ईश्वरदर्शन होत नाही, म्हणजे माझ्या भक्तीतच काहीतरी कमी पडते, असे त्याला वाटते. ईश्वराच्या भक्तीऐवजी जगातल्या व्यावहारिक गोष्टींंचे विचार मनामध्ये येतात. ईश्वरच सर्वकाही आहे, यावरचा आपला विश्वास, म्हणजे भाव, कमी आहे असे त्याला वाटायला लागते. ज्याच्या अंगाला काहीच चिकटत नाही तो कायम कोरडा राहतो. ज्याचे मन, म्हणजे अंतःकरण, म्हणजेच अंतर, कायम ईश्वराला जोडलेले नाही ते अर्थातच कोरडे असले पाहिजे. सर्वत्र ईश्वर आहे असा विश्वास असला तर तुम्ही व्यवहारात असा किंवा साधना करत असा, ईश्वराशीच जोडलेले असाल. पण ईश्वरावर पूर्ण विश्वास नसला, तर व्यवहार करताना आपोआपच ईश्वरावरचे लक्ष बाजूला होते. कमळाचे पान पाण्यात असते. पण पाण्याबाहेर काढले की सर्व पाणी निथळून जाते. पानाला एक थेंब चिकटलेला नसतो. एरवी हे उदाहरण मन एवढे ईश्वरात बुडालेले असते की व्यवहार मनाला चिकटत नाही असे कर्मयोग्याचे वर्णन करण्यासाठी देतात. पण तेच उदाहरण मला इथे उलट अर्थाने घ्यावेसे वाटते. मन व्यवहारात एवढे गुंतून जाते की ईश्वर स्मरण केले पाहिजे हे माहीत असले तरी त्याची आठवण राहत नाही. कमळाचे पान जसे पाण्याबाहेर काढल्यावर कोरडेच राहते, तसे ईश्वर आहे हे बुद्धीला कळले तरी मनाला त्याची खात्री वाटत नाही. ही खात्री किंवा विश्वास नाही म्हणजेच भाव नाही म्हणून मन किंवा अंतर कोरडे आहे असे म्हटले आहे. हा कोरडेपणा कसा असतो याचे आप्पांनी छान वर्णन केले आहे. त्याची सुरुवात ‘मला काय मिळाले?’ किंवा ‘माझे काय आहे’ या ‘मी-केंद्रित’ विचाराने होते. हा विचार जास्त होत राहिला की ‘इतरांचे काय आहे?’ आणि ‘इतरांना काय मिळाले?’ याबाबतीत ‘मला काय त्याचे’ अशी बेफिकिरीची किंवा बेपर्वा वृत्ती होते. त्याला आप्पांनी अनास्था असे म्हटले आहे. ‘मी-केंद्रित वृत्ती’ आणि इतरांविषयी अनास्था यातून, सर्व काही, सर्व वेळ माझ्यासाठीच, या स्वार्थी वृत्तीचा जन्म होतो. आणि जे काही सर्व वेळ मलाच मिळायला पाहिजे, ते आज, आत्ता, लगेच मिळणार असेल, तरच ते उपयोगाचे अशा उपयुक्ततावादी वृत्तीचा जन्म होतो. मी-केंद्रितता, अनास्था, स्वार्थ आणि उपयुक्ततावाद, हे सगळे मनात भरलेले असेल, तर ईश्वरप्रीती काय, मानवप्रीती आणि राष्ट्रप्रीतीलाही मनात स्थान असत नाही. अशा कोरड्या अंतःकरणाला आप्पांनी भावनाकोश रिता असणे असे म्हटले आहे. अंतःकरणामध्ये ईश्वरप्रीतीची ओल निर्माण होण्यासाठी नियमित दैनंदिन उपासना केल्याचा उपयोग होतो, असे आप्पांनी म्हटले आहे. उपासनेने माझे कोरडेपण थोडेफार कमी झाल्याचा अनुभव, मीही घेतला आहे. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ हा मंत्र म्हणत गेल्याने मी-केंद्रित विचार कमी होऊन मीे हळूहळू इतरांना मधून मधून विचाराच्या केंद्रस्थानी आणू लागलो. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो प्रबोधिनीमध्ये’ हा मंत्र म्हणत गेल्याने माझी अनास्था कमी होऊन संघटनेशी दूरान्वयाने संबंध असलेल्या व्यक्तींंविषयीही आस्था, म्हणजेच आपलेपणाने दखल घेण्याची वृत्ती, वाढायला लागली. शुद्धिमंत्रांपैकी ‘ॐ मनो-वाक्-काय-कर्माणि मे शुद्ध्यन्ताम्’ हा मंत्र म्हणत गेल्याने स्वार्थ साधण्याचा विचार कमी होऊ लागला. इतरांच्या हिताचा विचार वाढू लागला. शुद्धिमंत्रांपैकी पुढचा पंचकोशांच्या शुद्धीचा मंत्र म्हणत गेल्यावर उपयुक्ततावाद कमी होऊन, दीर्घकालीन ध्येयासाठी लगेच परताव्याची अपेक्षा न करता, निरपेक्ष कृती होऊ लागली. आणि मग स्वगत चिंतन करताना आपण राष्ट्राचा, मानवतेचा आणि ईश्वरशक्तीचा भाग आहोत याची जाणीव वाढत जाऊन त्यांच्याबद्दलचे प्रेम आणि त्यांच्यासाठी जगण्याचा संकल्प मनात स्फुरू लागला. हे प्रेम वाढणे म्हणजेच आपले आत्मबळ वाढणे. हा संकल्प पूर्ण होण्यासाठी, केवळ माझ्याच नाही तर, आमच्या सर्वांच्या ‘बुद्धीला प्रचोदना मिळो’ ही गायत्री मंत्रातील प्रार्थनाही मग मनःपूर्वक होऊ लागली. आपण इतके प्रयत्न केले की तो पतितपावन जानकीजीवन आपले मन वेगाने पालटायला येईलच, असा विश्वास वाटू लागला, म्हणजे आपले कोरडे असलेले अंतर ईश्वरी प्रेमाने ओले होऊ लागले किंवा भावनाकोश भरू लागला. एवढे सगळे कळले तरी माझे ‘मी-तू’पण संपत नाही. जोपर्यंत मी-केंद्रितता पूर्ण जात नाही, तोपर्यंत मी वर्तुळाच्या मध्यभागी आणि बाकीचे सगळे परिघावरचे ‘तू’, ज्यांना मी माझ्याऐवजी विचाराच्या केंद्रस्थानी आणायचा प्रयत्न करतो, अशी विभागणी होतच राहते. आपले मन पूर्णपणे पालटण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नांमध्ये आपण टिकवलेली किंवा मिळवलेली शारीरिक शक्ती, आपल्याकडे असलेले किंवा मिळवलेले धन, आपण गोळा केलेले विविध
पतितपावना जानकीजीवना – अभंग क्रमांक – १५ Read More »