स्त्री शक्ती प्रबोधन

मागे वळून बघताना २ – एकल महिला

गेल्या लेखात आपण एकल महिलांची अभिव्यक्ती असा विषय पाहिला. एकदा विषय लक्षात आल्यावर मग स्वस्थ बसू देईना. एकल बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली… काही विधवा असतात, काही परित्यक्ता, तर काहींचे काही कारणाने लग्नच झालेले नसते…मग अपंगत्व असेल किंवा मतिमंदत्व! जेवढा भाग अविकसित, शिक्षण कमी तेवढं महिलांना जास्त फसवलं जातं याचे अनेक किस्से या बचत गटाच्या बैठकीमधून समजले. असं वाटायला लागलं की आता फक्त एकल महिलांच्या कल्याणासाठी काहीतरी भरीव करूया. नक्की सुरुवात कुठून करायची हे लक्षात येईना म्हणून प्रश्न निट समजून घेण्याच्या दृष्टीने एकल महिलांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. जरी त्या एकल असल्या हे सगळ्यांना माहिती असलं, तरीही मनात त्यांना कुठेतरी संकोच होता की ‘मी एकल आहे हे कुठे जाहीर करू नये’ स्वाभाविक होतं कारण सामाजिक सुरक्षा ही त्याच्याशी निगडित होती. मेळाव्यात १५०-२०० जणींशी बोलल्यावर, त्यांनी माहिती दिली म्हणून शासकीय योजनांचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की शासन या एकल महिलांचं जगणं सुसह्य होण्यासाठी खूप सोयी/ सवलती देतं.मग मात्र असं ठरवलं की सर्व एकल महिलांचा डेटा गोळा करायचा. गेल्या आठ वर्षात जवळजवळ साडेचारशे महिलांची वैयक्तीक माहिती गोळा झाली. ही माहिती गोळा करताना गटाच्या लक्षात येत होतं की कुठल्या वयाला महिला एकल झाली त्यावरही उत्तर वेगवेगळी होती. जर एकल महिलेला फक्त मुली असतील तर अनेकदा ते माहेरी येते पण जर मुलगा असेल, म्हणजेच वंशाचा दिवा असेल, ज्याचं उद्या शेताच्या सातबाऱ्यावर त्याचं नाव लागू शकेल असा असेल तर अनेकदा ती सासरी राहते. एकल महिलांचा मुख्य प्रश्न म्हणजे अस्तित्वाचा आहे. शासकीय सवलती मिळंत असल्या तरीही महिला त्या सवलती घेत नव्हत्या कारण अस्तित्वाचे पुरावे नाहीत, बँकेत खाते नाही….. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शासकीय कार्यालयातल्या पुरुष अधिकाऱ्याशी संवाद करण्याची धास्ती! मेळाव्यामध्ये शासकीय योजनांच्या सर्व सवलतींची माहिती द्यायला सुरुवात केली. योजनेच्या लाभार्थी होण्यासाठी अर्ज करण्याचं धाडस कोणाचंही होत नव्हतं, मग प्रबोधिनीच्या ताईलाच हे काम सांगितलं…. सांगितले म्हणण्यापेक्षा तिनेच करायचं ठरवलं. एकेकीचे कागदपत्र तहसील कचेरीत द्यायला सुरुवात केली. मग पुढच्या प्रश्नांना सुरुवात झाली म्हणजे काय झालं तर एकल महिलेला शासन मदत करतं जर तिचं रेशन कार्ड स्वतंत्र असेल तर! पण जर एकल महिला सासरी रहात असेल आणि कुटुंबप्रमुख म्हणून रेशन कार्डवर सासऱ्याचं नाव असेलं तर ती कुठल्या तोंडाने सासर्‍याला सांगणार असते की मला माझं मुलांच्या सकट रेशन कार्ड वेगळे करून द्या? …… फक्त नियम करून आणि योजना करून पुरंत नाही हे आपल्याला समजलं. मग अशा सासरच्या मंडळींना आपल्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन पटवलं की ‘दादा तुमच्या घरात फूट पाडायची किंवा तुम्ही सांभाळत नाही म्हणून एकल महिलेचे वेगळे रेशन कार्ड नकोय पण हे वेगळे रेशन कार्ड केलं तर सरकार तिला काही मदत करेल तुमच्यावरचा भार थोडा कमी होईल’…. 2024 मध्ये एकल महिलेला शासन पेंशन म्हणून महिन्याला १३००/-₹ आणि दोन मुलांना प्रत्येकी १३००/-₹ (१८ वर्षापर्यंत) देते. असे ३९००/-₹ दरमहा मिळाले तर गावातल्या किमान गरजा भागतातच… मग कोणाचं मिंधेपण येत नाही… अगदी सासऱ्याचं नाही तर भावाचं सुध्दा!‘ती’च्या आत्मसन्मानासाठी असं पेंशन मिळवून देण्याचे काम हळूहळू एकेकी सोबत केले. अनेक विनापत्य वृद्ध दांपत्यही अशा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी होण्यासाठी आली… त्यांना ही आपण मदत केली. आज सांगायला अतिशय आनंद होतो की शासनाच्या या योजनांमधून आपण केलेल्या कामांमधून गेल्या काही वर्षात साधारण ७२ लाख रुपयाची आर्थिक मदत जिच्या तिच्या खात्यात पोहोचवली आहे. शासनाकडे अर्ज केल्यानंतर आपला अर्ज केराच्या टोपलीत जाऊ नये म्हणून त्याला इनवर्ड नंबर घातला जातो आहे ना याची खातर जमा करायची असते, इथपासून आपल्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. हे सर्व काम तालुक्यामधल्या तहसील कचेरी मधून केले. कचेरीतील सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय मनापासून मदत केली. एकदा मेळाव्यात २०-२५ एकल महिलांची कागदपत्र जमा झाली तर पुढच्या कामासाठी आपली ताई अधिकारी ऑफिसमध्ये आहेत ना? हे बघायला गेली तर साहेब स्वतः म्हणाले, ‘एवढ्या सगळ्या जणींनी माझ्याकडे येण्यापेक्षा इनवर्ड रजिस्टर आणि शिक्का घेऊनच मी तुमच्या कार्यालयात येतो’ आणि त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यालयात बसून आलेल्या सगळ्या एकल महिलांचे काम पूर्ण केले. एरवी शासनाकडे दिरंगाई होण्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकतो पण एकल महिला विषयात एकही अशी तक्रार करायला आम्हाला जागा नाही, हे सांगायला आनंद होत आहे. तर अशा रितीने आपण गेली ९वर्ष एकल महिलांसाठी काम सुरू केले. कधी खेळत्या भांडवलातून भांडवल देऊन उद्योग सुरु करायला मदत केली तर कधी एकल मातेच्या मुलीला शिक्षणासाठी स्कॉलरशीप दिली. कधी त्यांचीच फक्त अनुभव समृद्ध करणारी सहल सुध्दा काढली. या कामातून एकल महिलेलाही ‘व्यक्ती’ म्हणून सन्मानाने जगता येते अशी अनेक उदाहरणेग्रामीण समाजात तयार झाली. त्यामुळे आता गावातील मेळाव्यातही उजळ माथ्याने यांचा वावर सुरु झाला. कोणी वाटी नसणारी काळी पोत गळ्यात घालायला लागली तर कोणाच्या कपाळावर पुन्हा टिकली दिसायला लागली. सहज घडत गेलं…… आता अशा अनेक एकल महिला, इतर एकल महिलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे अशा स्त्री शक्ती प्रबोधननाच्या कामाला लागल्या आहेत….

मागे वळून बघताना २ – एकल महिला Read More »

मागे वळून बघताना भाग १ – ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली

ज्ञान प्रबोधिनी: स्त्री शक्ती प्रबोधनत्रिदशकपूर्तीचे वर्ष! म्हणता म्हणता बचत गटाच्या कामाला 30 वर्ष पूर्ण झाली. हे त्रिदशकपूर्तीचे वर्ष या निमित्ताने बचत गट उपक्रमाने नक्की काय केले हे समजण्यासाठी या खटाटोपाला सुरुवात करत आहे आणि म्हणून त्याला नाव देत आहे मागे वळून बघताना आज आपण बघूया: मागे वळून बघताना भाग १ ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली….मुभा दिली जगभरातल्या महिला जरी एक असल्या तरी अभिव्यक्ती, समज, अनुभव, सामाजिक दडपणाखाली झालेली वाढ यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये पुणे शहरापासून  ७०-८० किलोमीटर अंतर असले तरी जमिन आसमानाचा फरक असतो तो मी अनुभवला. ‘मला कोणीतरी समजून घेतंय’ असं वाटले तरी नात्यातला दुरावा विरघळून जातो. मग होणाऱ्या मोकळ्या संवादाने खूप काही घडते… घडवता येते. असा विश्वास मला गेल्या अनेक वर्षाच्या कामातून मिळाला. एखाद्या परिस्थितीला ‘ती’ जबाबदार नाही, हे तिला माहिती असले, तरी जणू आपणच जबाबदार आहोत, असं आजूबाजूच्यांना वाटतंय, याचं ओझं आयुष्यभर बाळगणं सोपं नसतं. एखादी महिला ‘एकल’ असते, म्हणजे नवऱ्याशिवाय एकटी रहात असते…… का बरं? …तर ती सांगते, ‘काळी आहे ना….. नवऱ्याला आवडले नाही!’ ….लग्नाआधी चार चौघात बघितले होते, त्याने रीतसर ‘हो’ म्हंटल्यावरंच थाटामाटात लग्न लावले होते. पण ती जेव्हा पहिल्या बाळंतपणाला माहेरी येते त्यानंतर सासरी गेलेलीच नसते अशी ‘ती’ जेव्हा नवऱ्याचं हे उत्तर ‘ती’च्या एकलेपणाचे कारण सांगते ….. आणि तरीही समाज तिच्या ‘एकल’ असण्याला केवळ तिलाच दोशी धरतो, तेव्हा तिचं बोलणं समजतंच नाही. ‘आवडली नाहीस’ या दोन शब्दाने तिचे आणि मुलाचे सगळे आयुष्य पणाला लागलेले असते… जर तिला मुलगी असेल तर तिच्या मुलीच्या लग्नाला सुध्दा वडील नसल्याने आईच्या ‘चारित्र्याची’ मनोकल्पित अडचण येते. हे सगळं ‘समजल्यावर’ मला प्रश्न पडतो की तिची काहीच चूक नसताना एकल म्हणून जगलेल्या ‘ती’ला कशी शिकवायची लोकशाही?  कसे सांगायचे संविधानाने समानतेचा मूलभूत अधिकार दिला आहे तो लिंगाधारित नाही? अजून समाज म्हणून आपल्याला खूप शिकायचंय हेच खरं… स्त्री शक्ती प्रबोधन विभागाचे गावातले काम महिलांसाठी, महिलांनी केलेले असल्याने, कार्यक्रमाला महिलाच उपस्थित असायच्या. एकल महिला सुद्धा हक्काने यायच्या. एखादी महिला भाषण सुरु झाले की ५-१० मिनिटातच बसल्या बसल्या झोपून जायची. पण कार्यक्रम संपला की आवर्जून सांगायला यायची की कार्यक्रम चांगला झाला. मला अश्चर्य वाटायचं! मग मी तिच्या घरी सवडीने जायची.  कधी कधी आधी सांगून… कारण माझं तिच्या घरी जाणं तिला जर साजरं करायचं असलं तर संधी मिळावी म्हणून…. मग एखाद्या घरी स्वागताला भजी मिळायची तर कधी तिने लावलेल्या परड्यातल्या आळूची वडी, कधी अचानक गेले तर खास आलं घालून केलेला किंवा लिंबाचं पान टाकून केलेला चहा मिळायचा! ….. कारण ‘ती’ ला तिच्याच स्वयंपाकघरात, तिला हवे म्हणून केले असं करण्याची मुभा संस्कारामुळे तिनेच तिला दिलेली नाही. म्हणून ‘ती’च्या साजरं करण्याला माझं निमित्त लागतं!! मग गप्पागप्पात कळायचं भाषण कळलं नाही तरी त्या भाषणाला यायचा निर्णय ‘ती’ने केला. कदाचित असं काहीतरी ठरवण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या कार्यक्रमा निमित्ताने तिच्या रोजच्या कामाला तिनेच सुट्टी घेतली. तिच्याच शब्दात सांगायचे तर ‘दिवसाचा विसावा घेतला बरं वाटलं!’ त्यानिमित्ताने तिने तिला आवडणारी ठेवणीतली साडी आवर्जून नेसली….. ‘ती’ने हौस केली… सुरक्षित वातावरणात, तिला वाटणाऱ्या सर्व मर्यादा सांभाळून…. बदल खूप बारीक असतात … पण जाणीवेतून केलेला प्रत्येक बारीकसा बदल सुद्धा, एखादीचं आयुष्य बदलायला दिशादर्शक ठरु शकतो. बचत गटाने ‘बचत करणे’ ‘कर्ज देणे’ अशी रचनाच फक्त बसवली नाही तर ग्रामीण भागातील सर्वच महिलांना एक व्यक्ती म्हणून, वेगवेगळ्या प्रकारच्या संधी घेण्याची मुभा दिली, मर्यादित, सुरक्षित स्वातंत्र्य अनुभवण्याचीही संधी दिली!  

मागे वळून बघताना भाग १ – ‘ती’ला ‘मोकळीक’ दिली Read More »