धर्मविधींच्या अंतरंगात

आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न

१) अस्थी आणण्यास कोणी जावे ? मृताच्या पत्नीसहित घरच्या ५ महिलांनी अस्थिसंकलनास जावे असे सांगितले आहे. घरी पाच जणी नसल्यास शेजारच्या महिला बरोबर घ्याव्यात. अलीकडील काळात  सोईनुसार असे निर्णय करावेत. २) श्राद्ध म्हणजे काय ? देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत् | पितृन्‌‍ उद्दिश्य विप्रेभ्यः दत्तं श्राद्धं उदाहृतम्‌॥ (ब्रह्मपुराण)        योग्य स्थळी, सुयोग्य काळी, श्रद्धेने आणि विधिपूर्वक आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ जे काही गरजू अशा विद्यासंपन्नांना देण्यात येते त्यास श्राद्ध म्हणतात. दिवंगताच्या स्मृत्यर्थ श्रद्धापूर्वक जो त्याग करण्यात येतो त्यास श्राद्ध म्हणतात.                                          (मिताक्षरा गौतम धर्मसूत्रावरील टीका  १/२१७)        अमावास्येस वायुरूपातील पितर गृहद्वारी येऊन श्राद्ध व्हावे यासाठी सूर्यास्तापर्यंत वाट पाहून (ते न केले गेल्यास) दुःखाने परत जाताना शाप देतात.                   (कूर्मपुराण)        हे वचन शब्दशः घ्यावयाचे नसते. अशा प्रकारची वचने अनेक प्रकारच्या स्तोत्रांच्या अखेरीस फलश्रुतीच्या रूपात आपण पाहतो. थोड्या अतिशयोक्त स्वरूपात विशिष्ट गोष्ट केल्यास होणारे लाभ व  न केल्यास होणारे वाईट परिणाम सांगणाऱ्या अशा वचनांना अर्थवाद म्हणतात. अर्थवादात वचनांचा अर्थ तारतम्याने घ्यावयाचा असतो. आपल्या दिवंगत आप्तांचे स्मरण आपण अवश्य करावे व दिवंगताच्या स्मरणार्थ काही दानधर्म म्हणजेच निरपेक्षपणे काही समाजोपयोगी कार्य  करावे एवढीच अपेक्षा येथे असते. देवलस्मृतीने अश्रद्ध माणसाने श्राद्ध करण्याची आवश्यकता नाही असे म्हटलेले आहे. ‌              ‘नास्ति हि अश्रद्दधानस्य धर्मकृत्ये प्रयोजनम्‌‍ ॥‌’ ३) श्राद्ध कोणी करावे ? पुत्राभावे तु पत्नी स्यात‍ पत्न्याभावे तु सोदरः |  (शंखस्मृती) मुलगा नसेल तर बायकोने उत्तरक्रिया करावी. बायकोच्या अभावी भावाने करावी. पुत्रः पौत्रः प्रपौत्रो वा तद्वद्वा भ्रातृसंततिः | मुलगा, नातू, पणतू किंवा भावाची संतती यासाठी चालते. बौद्धायन *, वृद्धशातातप * म्हणतात की ज्यांच्याविषयी आपल्या मनात स्नेह आहे त्यांचे श्राद्ध आपण अवश्य करावे. श्राद्ध करणाराने शक्यतो तो होईपर्यंत काही खाऊ नये. ४) श्राद्ध कधी करावे ? सामान्यपणे दुपारी श्राद्ध करावे. कितीही उशीर झाला तरी चालेल. पण रात्री श्राद्ध करू नये. सकाळीही मुख्यतः संध्या म्हणजे उपासना, देवपूजा यांसाठी वेळ द्यावयाचा असल्याने या नित्यकर्मानंतरच श्राद्ध करावे.  आधुनिक काळात सर्वांच्या सोयीचा विचार करता सकाळच्यावेळी नित्यकर्मे आटोपल्यावरही श्राद्ध करण्यास हरकत नाही. ५) श्राद्धे किती करावीत ? वर्षात एकूण 96 श्राद्धे सांगितली आहेत. पण हे व्यवहार्य नाही. म्हणून देवलऋषींनी  वर्षात एकच श्राद्ध मृत्युतिथीस करावयास सांगितले आहे. ६) श्राद्धप्रसंगी कोणास जेवू घालावे ? वेदवेदांग जाणणाऱ्यांना, तत्त्वज्ञ व्यक्तींना श्राद्ध प्रसंगी भोजन द्यावे असे सांगितले आहे.  प्रत्यक्षात अशा व्यक्ती सापडतील पण त्या भोजनास येतील हे अवघडच आहे. जाणकार व गुणी अशा अधिकारी व्यक्तींच्या अभावी विद्यार्थ्यांना (कष्ट करून शिकणाऱ्या), आपल्या आप्तेष्टांना श्राद्धप्रसंगी भोजनास बोलवावे असे आपस्तंब *धर्मसूत्रात म्हटले आहे. (२/७/१७/५-६) वडिलांच्या श्राद्धास तरुणांना भोजनास बोलवावे असे त्यात सांगितले आहे. (२/७/१७) एकाग्रपणे शिवपूजा करणाऱ्यास भोजन  द्यावे असे सौरपुराण सांगते. (१९/२-३)        * बौधायन – हा इ.स. पूर्व काळात होऊन गेलेला स्मृतिकार असून त्याने श्रौतसूत्र, गृह्यसूत्र आणि धर्मसूत्रे लिहिलेली आहेत.        *वृद्धशातातप – एक स्मृतिकार         आपस्तंब हा ऋषी भृगुकुळातील असून त्याने श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, स्मृती, उपनिषद आणि धर्मसूत्रे लिहिलेली आहेत.

आपल्याला नेहमी पडणारे प्रश्न Read More »

परिशिष्ट

धर्मकार्यातील विविध संकल्पना आपणास माहिती असतात. परंतु त्यांचे प्रयोजन  माहिती नसते. या प्रकरणात अशा विविध संकल्पनांचे स्पष्टिकरण केले आहे. धर्मकार्यात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टी या औषधी आहेत असे दिसते. अशा रोगनाशक गोष्टींची लोकांना ओळख राहावी यासाठी त्या धर्माशी जोडल्या असाव्यात असे वाटते. गणपतीच्या आवडीची म्हणून जी पत्री सांगतात ती सारीच्या सारी औषधी वनस्पतींची आहे हे सिद्ध झालेच आहे. खाली दिलेल्या गोष्टींमध्येही आपणास हे सूत्रच दिसून येईल. जे जे माणसाला सुखदायक – दुःखनिवारक ते ते देवाला देऊ करण्यात येते यात काही संदेह नाही. १) अक्षता  –        भोक, भोके पडलेले म्हणजेच किडलेले ! कीड  नसलेले ते अक्षत ! अक्षता म्हणजे न मोडलेले अखंड तांदूळ. कुंकू किंवा केशर लावलेले तांदूळ धर्मविधीत वापरले जातात. पूजेमधे एखादे द्रव्य नसेल तर त्याऐवजी उदा.- आसन, अलंकार यासाठी अक्षता वापरल्या जातात. विवाहविधीत वधूवरांवर आशीर्वाद म्हणून अक्षता टाकल्या जातात. औक्षण करताना अक्षता टाकण्यामागेही हाच भाव असतो. पूर्वीपासून धान्य हे संपन्नतेचे प्रतीक समजले जाते. वधूवरांचा विवाह संततीने सुफलित व्हावा हा उद्देश अक्षता टाकण्यात असावा. अक्षता या बल, समृद्धी व दीर्घायुष्य देणाऱ्या आहेत असे समजले जाते. २) अक्षतारोपण –        वधूवरांनी परस्परांविषयीच्या गृहस्थाश्रमातील अपेक्षा व्यक्त करणे आणि त्या पूर्ण करण्याचे अभिवचन  देणे असा हा विवाहविधीतील एक भाग आहे. यामधे वधूवर यश, संतती, संपत्ती, इ. इच्छा पूर्ण होवोत अशी भावना व्यक्त करतात व ‌‘तथास्तु! ही इच्छा मी पूर्ण करीन‌’ असे अभिवचन, एकमेकांवर अक्षता टाकताना, ते देतात. याला अक्षतारोपण म्हणतात. आजच्या काळात वधूवरांनी आपापल्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा शब्दबद्ध करून त्यांचाही उल्लेख अक्षतारोपण प्रसंगी अवश्य करावा. ३) अग्नी /होम –         अग्नी ही ऋग्वेदकाळापासून महत्त्वाची देवता मानली गेली आहे. अग्नी आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोचवतो अशी पूर्वी समजूत होती. कोणत्याही धर्मकृत्यात अग्नी प्रज्ज्वलित करणे महत्त्वाचे मानले जाते. उपनयन, विवाह यांसारख्या प्रसंगी जी प्रतिज्ञा केली जाते तीदेखील अग्निसाक्षीने करावी अशी कल्पना असते. अग्नीच्या वर उसळणाऱ्या तेजस्वी  ज्वाळा पाहून मनातही उदात्त विचार आल्यावाचून राहात नाहीत.      विविध देवतांना उद्देशून अग्नीत मंत्रपूर्वक तूप, समिधा यांसारखे द्रव्य समर्पित करणे  याला होम म्हणतात. याने पर्यावरणशुद्धी होते. ४) अभिषेक, प्रोक्षण –        अभिषेक म्हणजे सर्व बाजूंनी सिंचन करणे. देवाला पंचामृताने अथवा शुद्ध जलाने मंत्रपूर्वक स्नान घातले जाते तो अभिषेक होय. विवाहविधीत आशीर्वादपर मंत्र म्हणत वधूवरांवर ज्येष्ठ मंडळी पाण्याने सिंचन करतात त्यालाही अभिषेक म्हणतात. पाणी शिंपडणे म्हणजेच प्रोक्षण करणे होय. अभिषेक /प्रोक्षण प्रसंगी मनानेच आपण शुद्ध होत आहोत असा अनुभव घ्यायचा असतो.   ५) अवक्षारण –        ५) अवक्षारण – व्रत संक्रमित करणे. विवाह विधीमधे वधूच्या ओंजळीतील जल खाली वराच्या ओंजळीत सोडले जाते.  १. मुलीचे  दायित्व वडिलांकडून तिच्या पतीकडे दिले जाणे याचे सूचक असे हे अवक्षारण असते. २. अव म्हणजे खाली व क्षारण म्हणजे गाळणे. ३.  गुरूंचे व्रत शिष्याला देतानाही असेच सूचक अवक्षारण केले जाते. ६) अश्मारोहण –        ‌‘अश्मन्‌‍‌’ म्हणजे दगड आणि ‌‘आरोहण‌’ म्हणजे चढणे, भरभक्कम अशा दगडी पाट्यावर किंवा सहाणेवर वधूला उभे राहाण्यास सांगून वराने  पुढील मंत्र म्हणणे म्हणजेच अश्मारोहण होय .               इमम्‌‍ अश्मानम्‌‍ आरोह अश्मा इव त्वं स्थिरा भव |             सहस्व पृतनायतः अभितिष्ठ पृतन्यतः ॥   (आश्वलायन गृह्यसूत्र 1.7.7)        ‌‘या घडीव दगडावर आरूढ हो. तू पाषाणखंडाप्रमाणे स्थिर हो. तुझ्याशी शत्रुत्व करणाऱ्याच्या छातीवर पाय देऊन उभी राहा व त्याचा पराभव कर.‌’ अशा अर्थाचा मंत्र वर वधूला उद्देशून म्हणतो. स्त्री ही अबला नाही. संसार करताना ज्या काही भल्या बुऱ्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल त्यांना खंबीरपणे तोंड देण्याचे सामर्थ्य तिच्यामधे असावे अशी अपेक्षा होती. आजही आपण अशी अपेक्षा ठेवत असू तर हा मंत्र नीट समजावून घेणे आवश्यक वाटते. ७) अस्थिसंचय – मरणानंतर शवाची व्यवस्था लावण्यासाठी हिंदू समाजात अग्नी देण्याची पद्धत आहे. अग्निसंस्कारानंतर तिसऱ्या दिवशी उरलेल्या अस्थी गोळा करणे याला अस्थिसंचय म्हणतात. त्या अस्थी नंतर संगमावर तीर्थक्षेत्री नदीमधे विसर्जित करण्याची पद्धत आहे. यामधे मृत व्यक्तिविषयी आदर, प्रेम व्यक्त होते. तसेच त्या व्यक्तीला मरणोत्तर सद्गती मिळावी ही सदिच्छा व्यक्त होते.  ८) आचमन –        धर्मविधीच्या प्रारंभी परमेश्वराचे नामस्मरण करून तीनदा पळीभर पाणी प्राशन  करून चौथ्या वेळी हातावरून पाणी सोडले जाते. या क्रियेला आचमन म्हणतात. ही एक शुद्धिक्रिया आहे. स्वरेंद्रिय, जीभ यांना पळीभर पाण्याने ओलावा यावा, अंतरंग शुद्धीचा अनुभव यावा यासाठी आचमन करतात. परमेश्वराच्या नामोच्चाराने मन पवित्र होते, शुद्ध होते. देवर्षिपितृमनुष्याणां जलाञ्जलीदानेन तृप्तिसम्पादनम्‌‍ |        देव, ऋषी, पितर व मनुष्य यांना जलांजली देऊन तृप्त करणे म्हणजेच तर्पण होय. दैनंदिन संध्येत तर्पण केले जाते.        आचमन केल्यानंतर उजव्या हाताच्या बोटांवरून समोर पाणी सोडले जाते, तो भाग म्हणजे देवतीर्थ, अंगठा व तर्जनी यांच्यामधील भाग म्हणजे पितृतीर्थ, करंगळीच्या बाजूची हाताची कड म्हणजे ऋषितीर्थ, तर मनगटाच्या बाजूने जल प्राशन केले जाते तो भाग म्हणजे आत्मतीर्थ. असे हाताचे भाग सोयीसाठी केले आहेत. ९) आरती –           ताम्हनामधे नीरांजने ठेवून त्यांनी देवाला ओवाळणे याला आरती म्हणतात. आरती ओवाळताना देवाची स्तुतिपर पद्ये म्हणण्यात येतात. रामदासादि संतांनी रचलेल्या आरती. अतिशय भावमधुर व भक्तिपूर्ण आहेत. सगुणोपासक भक्तांनी आपल्या मनातील भाव प्रकट करण्याकरता  या रचना केल्या आहेत. आरती, म्हणजे ‌‘नीराजन‌’ असा मूळ, संस्कृत शब्द आपण मराठीत आणताना  ‌‘नीरांजन‌’असा केला आहे. १०) आसन –         कोणतेही धर्मकार्य करत असताना शक्यतो पद्मासनामध्ये ताठ बसावे. पद्मासनाची सवय होईपर्यंत साधी मांडी घालून बसावे. बसण्यासाठी जो पाट आपण वापरतो तो धर्मशास्त्रात सांगितलेला नाही. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे हरिणाजिन (हरणाचे कातडे), चटई  / सुती वस्त्राची घडी बसण्यासाठी घ्यावी. स्वतंत्र तंत्र ग्रंथामधे पांढरे-काळे कांबळे हे चांगले आसन मानले असून लाल कांबळे हे सर्वोत्तम आसन सांगितले आहे. ११) आहुती/समिधा  –        समिधा अथवा तूप अग्नीमधे अर्पण करणे या कृतीला आहुती देणे असे म्हणतात.         वड, पिंपळ,औदुंबर, पळस, खैर,रुई, शमी, आघाडा, बेल, चंदन, सरल (पाईन), सालवृक्ष, देवदार, खदीर अशा औषधी वनस्पतींच्या काड्या अग्नीत अर्पण केल्या जातात  त्यांना समिधा म्हणतात. दूर्वा व दर्भांचाही असा  वापर  कधीकधी केला जातो. या समिधांचे काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्या अग्नीत अर्पण केल्याने पर्यावरण प्रसन्न होते. १२) आश्रम –         ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम होत. विद्याभ्यास करणे हे ब्रह्मचर्य आश्रमातील प्रमुख कर्तव्य आहे. शरीरबल, बुद्धिबल, नैतिक बल मिळवणे  ब्रह्मचाऱ्यास अगत्याचे असते. विवाह करून कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळणे, धनार्जन, अपत्यसंगोपन, अतिथिसत्कार ही गृहस्थाश्रमातील कर्तव्ये आहेत. पूर्वी गावाबाहेर एखाद्या निवांत जागी राहून दुरूनच लोकांना मार्गदर्शन करणे, जास्तीत जास्त वेळ आत्मचिंतनात व्यतीत करणे अशी वानप्रस्थाश्रमाची कल्पना होती. आता वनात जाऊन राहणे शक्य नसले तरी सांसारिक जबाबदाऱ्या पुढील पिढीवर सोपवून घरातच अलिप्तपणे, परोपकारी  वृत्तीने राहाणे शक्य आहे. संन्यास म्हणजे सर्वसंग परित्याग होय. अन्य सर्व गोष्टींचा त्याग करून केवळ आत्मचिंतनात उर्वरित आयुष्य जगणे म्हणजे संन्यास. १३) एकोद्दिष्ट  – केवळ दिवंगत व्यक्तीस उद्देशून केलेले श्राद्ध म्हणजे एकोद्दिष्ट. या श्राद्धात मृत व्यक्तीच्या मागच्या दोन पिढ्यांचा समावेश नसतो. अन्य श्राद्धांमधे तो असतो.  १४) ओंकार  –        अ, उ आणि

परिशिष्ट Read More »

प्रत्यक्ष धर्मविधी करताना ….

मागील चार प्रकरणांमधे आपण पाहिले की  धर्माचे दोन भाग असतात. तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे धर्म म्हणजे अनुष्ठाने व प्रतीके यांच्याद्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्त रूप होय. विविध संस्कार, शांती, पूजा म्हणजे तत्त्वज्ञानाला मूर्त रूप देण्याचाच एक प्रयत्न  होय. मात्र या सर्व विधींमधे स्थलकालानुरूप परिवर्तन झाले पाहिजे. ते का व कसे झाले पाहिजे हेही आपण पाहिले. या प्रकरणात आपण प्रत्यक्ष धर्मविधी करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात ते पाहू. हे सर्व विवेचन म्हणजे धर्मविधींमधील परिवर्तन कसे झाले पाहिजे ते दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे. १.  पुरोहित ‌‘पुरोहित‌’ हा शब्द पुरस्‌‍ + हित (‌‘धा‌’ (ठेवणे) या धातूपासून बनलेले भूतकाळवाचक   विशेषण) असा बनलेला आहे. पुरस्‌‍ म्हणजे पुढे आणि हित म्हणजे ठेवलेला. पूर्वीच्या काळी युद्धात, राज्यकारभारात, धर्मकृत्यात अग्रभागी राहून राजास मदत करणाऱ्या व्यक्तीला पुरोहित म्हटले जाई. हा शब्द ऋग्वेदकाळापासून प्रचलित आहे. उदा. अग्नीला पुरोहित हे विशेषण लावले आहे. बृहस्पती हा देवांचा पुरोहित होय असे उल्लेख आढळतात. पुरोहित युद्धामध्ये  सैन्याच्या पुढे  राहात असे व आपल्या सैन्याला विजय मिळावा म्हणून प्रार्थना करीत असे. राज्यकारभारातही पुरोहिताचा सल्ला महत्त्वाचा मानला जाई. यज्ञयागादि धर्मकृत्यांमधे मंत्रपठण करणे व तदनुषंगिक कृतींचे मार्गदर्शन करणे हे पुरोहिताचे काम असे. यावरून पुरोहित ही समाजाचे नेतृत्व करणारी महत्त्वाची व्यक्ती मानली जात होती हे लक्षात येते.               ‌‘वयं राष्ट्रे जागृयाम पुरोहिताः| (शुक्ल यजु. ९-२३)        ‌‘आम्ही पुरोहित राष्ट्रामधे जागृत राहू‌’ ही पुरोहितांची महत्त्वाची उद्घोषणा होती.        आम्ही पुरोहित होऊन राष्ट्रकल्याणार्थ सदैव  सावध राहू. आम्ही पुरोहित म्हणजे कोणी पोटार्थी भिक्षुक नाही तर समाजाच्या अग्रभागी राहून  सत्याचे नेतृत्व करणारे आहोत.               संशितं क्षत्रं जिष्णु यस्याहमस्मि पुरोहितः ॥   (शुक्ल यजु. ११-८१) ‌‘शास्त्रशुद्ध आचरणाने मी माझे ब्रह्मतेज अत्यंत तीक्ष्ण व कडकडीत राखले आहे. मी माझे शरीरसामर्थ्य व इंद्रियांच्या शक्ती कार्यक्षम ठेवल्या आहेत. ज्या राजाचा मी पुरोहित आहे त्याचे क्षात्रतेजही मी वृद्धिंगत केले आहे.‌’ असा आत्मविश्वास वैदिक काळी पुरोहितांच्या ठायी होता. वैदिक काळात पुरोहितांच्या शक्तीने राजशक्तीवरही प्रभाव गाजवल्याचे दिसते. पुढे बौद्ध धर्माचा उदय झाल्यावर पुरोहितांचे महत्त्व कमी झाले. पुढे भारतावर मुस्लिमांचे व नंतर ब्रिटीशांचे राज्य आल्यावर पुरोहित वर्गाचे पूर्ण पतन होऊन केवळ विवाहादि संस्कार, पूजाअर्चा हेच त्यांचे काम शिल्लक राहिले. आजच्या काळातही पुरोहितवर्गाचे हेच चित्र दिसत आहे. प्रत्यक्षात पुरोहितांची मुले आज वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करताना दिसतात. त्यांना बहुतेक पौराहित्यात प्रतिष्ठा वाटत नाही. आपण तंत्रज्ञ आहोत किंवा अधिकारी आहोत हे सांगताना जसे बरे वाटते तसे पुरोहित असल्याचे सांगताना वाटत नाही असे दिसते. त्यामुळे आपण धर्माचा अभ्यास करावा, तो लोकांपर्यंत पोचवावा, त्यासाठी स्वतः पुरोहित व्हावे असे ज्यांना वाटते आहे त्यांना पुरोहित शब्दामागील ही सगळी पार्श्वभूमी माहिती पाहिजे. उत्तर काळामधे पुरोहितांचे पतन कोणत्या गोष्टींमुळे झाले ते ओळखून आता ते दोष निर्माण न होण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. धर्माच्या क्षेत्रात समाजाचे नेते, मार्गदर्शक होण्यासाठी आवश्यक ते आचरण पुरोहिताचे असावे. त्यासाठी – १) पुरोहिताचा निदान उपनयन संस्कार झालेला असणे, त्याने स्वतःची  दैनंदिन उपासना करणे, सदाचारी असणे आवश्यक आहे.स्पष्ट व उच्चार त्याच्याकडून अपेक्षित आहेत. २) धर्म लोकांपर्यंत पोचवण्याचे एक माध्यम म्हणजे संस्कार, शांती, पूजा इ. विधी असल्यामुळे सर्व जाति-जमातींच्या लोकांकडे जाऊन हे काम अवश्य  करावे. ३) वाचन, श्रवण, चर्चा, इ.द्वारे धर्मशास्त्र व अन्य विषयांमधीलही व्यासंग वाढता ठेवावा. म्हणजे लोकांच्या प्रश्नांचे योग्य समाधान करता येईल. ४) स्वतःच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी पुरोहिताने प्रयत्नशील असावे. व्यक्तीच्या आंतरिक गुणांचा बाह्य दर्शनावर परिणाम होतो हे लक्षात ठेवून स्वतः चारित्र्यसंपन्न असावे. ५) पुरोहिताने निःस्पृह असणे आवश्यक आहे. समाजाने दिलेली दक्षिणा अवश्य स्वीकारावी मात्र धनलालसा असू नये. ६) कोणत्याही धर्मविधीची ठरलेली वेळ पुरोहिताने काटेकोरपणे पाळली पाहिजे आणि यजमानांकडेही तसा आग्रह धरला पाहिजे.  स्त्री पौरोहित्य- पौरोहित्यासंबंधी वरील सर्व विवेचन करीत असताना एक गोष्ट जरूर सांगावीशी वाटते की पुरोहितांचे वर्चस्व स्थापन करण्याचा हा प्रयत्न नाही. धर्मविधींच्या बाबतीत लोकांनी स्वावलंबीच असले पाहिजे. गणेशस्थापना, सत्यनारायण, लक्ष्मीपूजन, इ. पूजा व वर्षश्राद्धासारख्या विधींमधे खरे तर घरातीलच कोणी ज्येष्ठ व्यक्तीने पुरोहित म्हणून काम करावे. विवाह, वास्तुशांती इ.बाबत पुरोहितांची आवश्यक ती मदत घ्यावी.        आजच्या काळात सर्व जाति-जमातींच्या व्यक्तींना पौरोहित्याचा अधिकार आहे. केरळमध्ये देवस्थान संस्थांचे नियुक्त मंडळ असते व पुजाऱ्यांसाठी परीक्षा असतात. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या कोणासही, मग तो कोणत्याही जातीचा असो, पुजारी म्हणून, पुरोहित म्हणून नोकरी मिळते. (पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही पौरोहित्य करता येते. ऋग्वेदामधे ‌‘विश्वावरा‌’ ही यज्ञाचे पौरोहित्य करणारी स्त्री आढळून येते. नव्या काळात स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना करून स्त्री पौरोहित्याचा नव्याने प्रारंभ केला. माई भगवती व श्रीमती ठकुरानी यांचे उपनयन करून त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दयानंदांनी दिला.        आजच्या काळातही शिर्डीपाशी साकुरी येथे एक आश्रम असून श्री साईबाबांचे शिष्य उपासनी महाराज आणि त्यांच्या शिष्या गोदावरी माताजी यांच्यापासून तेथे स्त्रियांची वेदपठणाची परंपरा चालत आली आहे. या स्त्रिया मोठमोठ्या यज्ञांचे पौरोहित्यही करतात.        पुण्यात कै. शंकरराव थत्ते यांनी उद्यान प्रसाद कार्यालयात स्त्रियांसाठी पौरोहित्याचा वर्ग चालवून कित्येक स्त्रियांना पौरोहित्याची दीक्षा दिली. वर नमूद केलेल्या प्रयत्नांव्यतिरिक्त अन्यही ठिकाणी असे वर्ग चालू असतील. ते निश्चितच अभिनंदनीय आहेत. ज्या पुण्यामधे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याला मुलींची शाळा चालवल्याबद्दल समाजाच्या जहरी टीकेला तोंड द्यावे लागले त्याच पुण्यात आज स्त्री पुरोहितांचे कौतुक होताना दिसते. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अन्यत्र स्त्री पौरोहित्याचा हा प्रयोग अभिनव व यशस्वी ठरला आहे.  हिंदू धर्माच्या लवचिकतेचे हे द्योतक आहे.        ज्ञान प्रबोधिनीमधे १९९० पासून सर्व जाति-जमातींच्या स्त्रीपुरुषांसाठी पौरोहित्य वर्ग चालू असून पुरुषांप्रमाणे महिलाही अन्त्येष्टीसह विविध संस्कार, शांती व पूजा यांचे पौरोहित्य  परिवर्तनाच्या धोरणाला अनुसरून करत असतात.)        स्त्रियांनी आणि तथाकथित ब्राह्मणेतर समाजाच्या लोकांनीही पौरोहित्याचा अधिकार कोणी ठराव करून देण्याची वाट बघत न बसता किंवा कोणाकडे मागत न बसता आत्मविश्वासपूर्वक स्वतःच घेतला पाहिजे असे वाटते. २. शुचिता विचार शुचिता म्हणजे शुद्धता, निर्मळता, पावित्र्य. याबाबतीत पुढील वचनाचा विचार करण्यासारखा आहे – देशकालक्रियाद्रव्यकर्तृणां शुद्धता यदि |             मन्त्राणां च तदा पूर्णं कर्मणां फलमश्नुते |   (बृहन्नारायणीय उपनिषद्‌‍  उत्तर  भा. ३३ – ६३, ६४) स्थान, समय, कृती, साधने, कर्ता व मंत्र यांच्या ठिकाणी शुद्धता असेल तर कोणत्याही कामात संपूर्ण यश मिळते. यावर सविस्तर विचार करणे योग्य होईल. १) देश म्हणजे जेथे, ज्या जागी धर्मविधी केला जातो ती जागा स्वच्छ असणे आवश्यक आहे. जमीन एकसारखी सपाट असावी व ती कोरडी असावी. सुंदर रांगोळी घातलेली असावी. शुभचिह्ने रेखाटलेली असावीत. त्या जागी दुर्गंधी उत्पन्न होईल अशी परिस्थिती नसावी. मंद धूप जळत असावा. तोरणे, पुष्पमाला, पताका या सर्वांच्या साहाय्याने वातावरणनिर्मिती करावी. प्रसंगोचित अशा संगीताचा वापर करावा. सर्वत्र स्वच्छ उजेड असावा. ज्यामुळे मांगल्याचा, पावित्र्याचा भाव मनात उत्पन्न होईल असे वातावरण त्या जागी राखणे म्हणजे देशशुद्धी. अन्त्येष्टी, श्राद्धविधी असले तरी तेथेही टापटीप व स्वच्छता आवश्यकच ! धर्मविधींमधे  कोणी कोणत्या दिशेला तोंड करून बसावे याबाबत चर्चा केली जाते.       सदा संतुष्टमनसः सर्वाः सुखमयः दिशः| (भागवत ७-१५-१७) ‌       ‘संतुष्टचित्त मनुष्याला सर्व दिशा चांगल्याच आहेत‌’ असा आपला विचार आहे. तथापि पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या

प्रत्यक्ष धर्मविधी करताना …. Read More »

परिवर्तन का व कसे ?

       मागील तीन प्रकरणांमधे आपण धर्म म्हणजे काय, धर्मामधे स्थल-कालातीत  तत्त्वांप्रमाणेच, स्थलकालसापेक्ष सत्यासारखे तत्त्व एका ठिकाणी लागू असून अन्य कोठे ते लागू पडत नाही असे नाही. याला म्हणतात ‘‌‍‍‌‌स्थलनिरपेक्ष‌’ अमक्या वेळी हे तत्त्व योग्य आणि अन्य वेळी अयोग्य याचा अर्थ ‌‘कालनिरपेक्ष‌’ आचारधर्म मात्र जागोजागी, वेळोवेळी बदलताना दिसतात व तसे ते पुढेही दिसणार याचा अर्थ ‌‘स्थलकालसापेक्ष‌’.     आता  या व पुढील प्रकरणात आपण या धर्मविधींमधे  स्थलकालानुसार परिवर्तन करण्याची काय आवश्यकता आहे, हे परिवर्तन करण्याला आधार कोणता व ते कसे केले पाहिजे हे समजावून घेऊ.        धार्मिक क्षेत्रामधे परिवर्तनीयतेची परंपरा महाराष्ट्रात ज्ञानदेवांच्या काळापासून चालत आलेली आहे. गीतेसारख्या ग्रंथाचा मायमराठीत सर्वजनसुलभ असा आविष्कार करून ज्ञानदेवांनी या परंपरेचा पाया घातला आहे. त्यांच्या अवती-भवती अठरापगड जातींच्या संतांची मांदियाळी उभी राहिली व त्यात स्पृश्यास्पृश्यतेची रूढी अर्धमेली होऊन गेली. मग संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, इत्यादींनी मराठी भूमीवर औदार्याचे, माणुसकीचे गंगाजल शिंपून तिची मशागत केली. समर्थ रामदासांनी               भेटो कोणी एक नर | धेड महार चांभार |             राखावे तयाचे अंतर | या नाव भजन ॥ (समर्थ रामदासांच्या सवाया)        अशा शब्दांत भक्तिमार्गातील समतेचा डांगोरा पिटला, तर छळाबळाने बाटवलेल्यांना पुनश्च स्वधर्मात स्वीकारून छत्रपती शिवरायांनी आणखी पुढचे पाऊल टाकले.        पेशवाईत राजकीय प्रगती झाली पण काहीसे सामाजिक विषमतेचे दृश्यही दिसले. इंग्रज  राजवटीच्या आरंभीच श्री. बाळशास्त्री जांभेकरांनी धर्मभ्रष्टांना पुन्हा स्वधर्मात  घेण्यास प्रारंभ केला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापून नवीन दृष्टीने, नवीन पद्धतीने धर्मसंस्कार करण्यास सुरुवात केली. धर्मसंस्कारांमधे त्यांनी लोकभाषेचा वापर करून सुलभता आणली. पुरोहित वर्गाचे महत्त्व कमी करून समतेची चळवळ उभी केली. न्यायमूर्ती रानडे यांनी संतपरंपरेचा धागा पकडून पारमार्थिक लोकशाहीची परंपरा धर्मक्षेत्रात आणण्यासाठी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि दयानंद सरस्वतींच्या परिवर्तनवादी आर्य समाजासही पाठिंबा दिला. श्री शाहू छत्रपतींनीही  दयानंद सरस्वतींना मोठा पाठिंबा दिला. कोल्हापुरात सत्यार्थप्रकाश या दयानंद सरस्वतींच्या ग्रंथाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले.        धार्मिक बाबतीतील सुधारणांचे प्रयत्न अशाप्रकारे चालू असतानाच पाश्चात्य पद्धतीने शिक्षण घेतलेल्या काही नवशिक्षितांनी भारतीय संस्कृती, धर्म, आचार-विचार यांना कनिष्ठ  किंवा अगदी टाकाऊ समजण्यास सुरुवात केली होती. तरीही काळानुसार आवश्यक ते फेरबदल करून योग्य तो आचारधर्म चालू ठेवण्याचे औचित्य दाखवणारा वर्गही समाजात होता.        धर्मातील दोन प्रमुख भाग म्हणजे तात्त्विक धर्म आणि आचारधर्म. सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती, इ. तत्त्वे स्थलकालातीत असली तरी ती तत्त्वे व्यवहारात उतरवण्याची साधने म्हणजे आचारधर्म हा स्थलकालसापेक्षच असतो हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील परिवर्तनवादी पंडितांनी १९३४ मधे ‌‘तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदे‌’ची स्थापना केली. या परिषदेचे बहुतेक संस्थापक हे हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास केलेले व काहीजण इंग्रजीचाही अभ्यास  केलेले असे होता. त्यांचा मुख्य विचार असा –        ‌‘हिंदू धर्मात अनेक स्मृती रचल्या गेल्या याचे कारण त्या त्या परिस्थितीला आवश्यक असे बदल मूळच्या आचारधर्मात करावे लागतात. (उदा. इस्लाम भारतात आल्यानंतर जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी देवल स्मृतीचा जन्म झाला.)  आचारधर्मातील परिवर्तनाची ही आवश्यकता लक्षात घेऊन आजच्या काळातही ते करण्यात आले पाहिजे.‌’        समाजामधे अशा परिवर्तनवादी लोकांप्रमाणेच स्थितिवादी म्हणजे ‌‘जुने मोडू नये आणि नवे करू नये‌’ असे म्हणणारेही काही लोक असतात. त्यांना सनातनी म्हणतात. त्यांची धर्मनिष्ठा खोटी नसते. आपल्या धर्ममतांशी ते प्रामाणिकच असतात. तसे लोक त्या काळीही होते. या सनातनी मंडळींनी आपल्या धोरणांत काही लवचिकता ठेवली असती तर महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा अधिक परिवर्तन होणे शक्य होते. या काळी सनातनी मतांचे समर्थन करणारे लेखन सुरू झाले. हे लेखन परिवर्तनास प्रतिकूल होत आहे हे पाहून पं. नारायणशास्त्री मराठे यांनी धर्मकोशाची रचना करण्याचे ठरवले. पं. नारायणशास्त्री मराठे हे परिवर्तनवादी पक्षाचे होते व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्यांचे उजवे हात!  इ.स. १९२७  मधे  प्रयाग येथील कुंभमेळ्याच्या प्रसंगी पं. मदनमोहन मालवीय यांनी बोलावलेल्या पंडित परिषदेस पं. नारायणशास्त्री मराठे व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे उपस्थित राहिले व त्यांनी शास्त्रचर्चेत परिवर्तनवादी पक्षाची भूमिका समर्थपणे मांडली.        श्री. रा. स. भागवतांच्या पुढाकाराने ठाणे येथे ७, ८ एप्रिल १९३४ या दोन दिवशी तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेचे प्रथम अधिवेशन भरले. म. म. पाठकशास्त्री हे अध्यक्षस्थानी होते. या पहिल्याच परिषदेने ‌‘वेद‌’ हे अपौरुषेय नव्हेत तर मनुष्यकृतच असल्याचा स्पष्ट निर्णय केला.        पुणे येथे गीताधर्म मंडळात परिषदेचे दुसरे अधिवेशन भरले ते २७ डिसेंबर १९३५ या दिवशी ! याच्या आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे अस्पृश्यता निवारणावर या अधिवेशनात विशेष भर देण्यात आला. डॉ. कुर्तकोटी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.         ४ ते ६ जून १९३६ रोजी नगर येथे स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन झाले. या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. नानासाहेब सप्तर्षी यांनी आपल्या भाषणात, ‌‘जुनी परंपरा न सोडता आजच्या आचारांत फरक कसा घडवून आणावा याचा विचार करण्यासाठी हे अधिवेशन भरवण्यात आले आहे‌’ असे सांगितले. समाजधारणा होऊन उत्कर्ष साधावा  यासाठी श्रुती, स्मृती आणि सदाचाराचे अनुषंगाने आचार  परिवर्तनाचे धोरण नगरला निश्चित केले गेले. १६ ऑक्टोबर १९३८ या दिवशी लोणावळ्यात चौथे अधिवेशन पार पडले. त्याचेही अध्यक्ष स्वामी केवलानंदच होते. या अधिवेशनात जे स्वागतगीत म्हणण्यात आले ते मोठे अर्थपूर्ण होते –               श्रुती – स्मृतींचे मंथन करुनी, तत्त्वामृत जे देति अम्हाते              समाजधारण, समाजोन्नती, ध्येय हेच धर्माचे मानिति |             धर्मां साधन मानुनि करिती, परिवर्तन जे आचारांचे             तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी, नाम असे हे सार्थ  तयांचे ॥        या अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात स्वामी केवलानंद सरस्वतींनी परिवर्तनवाद्यांच्या एकत्र काम करण्याच्या आवाहनास प्रतिसाद न देता सनातन्यांनी  ‌‘वर्णाश्रम – स्वराज्य – संघा‌’ची स्थापना करून सवता सुभा स्थापल्याबद्दल व त्यात परिवर्तनवाद्यांना प्रवेश देऊ नये असे ठरवल्याबद्दल खेद व्यक्त केला. यानंतर ‌‘उपनयनादि-संस्कार‌’ यावर चर्चा झाली. याच अधिवेशनात तत्त्वनिष्ठ परिवर्तनवादी परिषदेने ‌‘धर्मनिर्णय मंडळ‌’ हे नाव धारण केले व संस्थेची संक्षिप्त घटना निर्माण करून तिलाही मान्यता देण्यात आली. आता वर्षातून एक अधिवेशन घेण्याची जुनी कार्यपद्धती बदलून वर्षभर कार्यरत राहाण्याच्या हेतूने कार्यकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली.        १९३९ पासूनच मंडळाचे कार्यवाह तर्कसांख्यतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे  यांनी काम पाहिले. यांचे पूर्ण नाव रघुनाथ गोपाळ कोकजे. ते वाईच्या प्राज्ञपाठशाळेत शिकले. वेदशास्त्रसंपन्न नारायणशास्त्री मराठे यांचे ते विद्यार्थी. पुढे ते लोणावळ्यातील कैवल्यधाम या योगशास्त्रासाठी काम करणाऱ्या संस्थेत तत्त्वज्ञान हा विषय शिकवत. अध्यापन, ग्रंथसंशोधन याबरोबर आयुष्यभर त्यांनी धर्म निर्णय मंडळाच्या प्रचाराचे, संस्कार कार्याचे काम केले. यांनी ठिकठिकाणच्या आपल्या भाषणांमधून सामूहिक प्रार्थनेच्या प्रचारास प्रारंभ केला. उपनयन, विवाह व संध्येची छोटी पुस्तिका प्रकाशित झाली. अशा प्रकारे विचारमंथनास  कृतीचीही जोड मिळू लागली. यानंतरच्या अधिवेशनांमधे शास्त्रचर्चेसाठी एक सत्र राखून ठेवून खुल्या सत्रात सर्वसामान्य जनतेस मंडळाची भूमिका समजावून सांगणे असा कार्यक्रम असे. स्वामी केवलानंदांकडे शास्त्रचर्चेचे स्थायी अध्यक्षपद दिले गेले होते.        ४ व ५ नोव्हेंबर १९३९ रोजी बदलापूर येथे मंडळाचे पाचवे अधिवेशन झाले. त्याचे अध्यक्ष महामहोपाध्याय पां. वा. काणे होते. त्यांनी मंडळावरील आक्षेपांचे खंडन करून अत्यावश्यक विधींनुसार धर्मसंस्कार करण्याचे समाजास आवाहन केले. पुढे १९४० मधे अन्त्येष्टी व श्राद्ध आणि १९४१ मधे पुनर्विवाह व हिंदूकरणाच्या पोथ्या मंडळाने

परिवर्तन का व कसे ? Read More »

शांती व पूजा

शांती        शांती हा शब्द ‌‘शम्‌‍‌’ धातूपासून बनलेला असून त्या धातूचा अर्थ  वाईट प्रभाव हटवणे, शमन करणे, प्रसन्न किंवा संतुष्ट करणे असा होतो. शम्‌‍ धातूच्या या विविध अर्थांच्या प्रकाशात शांती शब्दाचा अर्थ शोधू लागल्यास मनात उत्पन्न होणाऱ्या चांगल्या विचारांच्या योगे अशुभाचे सावट, संकटांची भीती व वाईट विचारांचा  प्रभाव हटवणे, चित्तामधील क्षोभ शांत करून ते प्रसन्न करणे असा अर्थ आढळून येतो. जीवनाची क्षोभरहित अवस्था म्हणजे शांती होय. शांती ही एक मनोवृत्ती असून ते जीवनाचे अंतिम मूल्य आहे. जडत्व, निष्क्रियता, आळस म्हणजे शांती नसून चैतन्यपूर्ण, क्रियाशील व उत्साही अवस्था शांती शब्दाने व्यक्त होते.        यत्किञ्चित् वस्तु सम्प्राप्य स्वल्पं वा यदि वा बहु |        या तुष्टिर्जायते चित्ते सा शान्तिरिति कथ्यते ॥ (वयोवस्थाभिदशान्तिसमुच्चयः | लेखक – श्री. नारायणशास्त्री आंजर्लेकर  -केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, पान क्र. १०)        अशी शांतीची एक व्याख्या उपलब्ध आहे. एखादी खूप हवीशी वाटणारी गोष्ट मिळाली की मनाची जी एक तृप्त, समाधानी अवस्था येते तिला शांती असे म्हणतात. यावरून दिसून येईल की शांती ही मनाची एक विशिष्ट अवस्था असून ती प्राप्त होण्यासाठीच वास्तुशांती, उदकशांती, साठीशांती, सहस्रचंद्रदर्शन शांती यांसारखे धार्मिक विधी सांगितले आहेत. काही विशिष्ट कृती आणि त्याबरोबर म्हणावयाचे मंत्र हे या धार्मिक विधींमधे येतात व त्यांचा परिणाम म्हणून मनाला शांती मिळावी अशी अपेक्षा असते.        पूर्वीच्या काळी कित्येक प्रकारच्या शांती सांगितल्या गेल्या आहेत. जुळे जन्मल्यास, घराला आग लागल्यास, घरात भांडणं झाल्यास, वाईट स्वप्न पडल्यास, एखाद्या प्राण्याचा विशिष्ट आवाज ऐकल्यास, शरीराचा एखादा भाग कंप पावल्यास अशा विविध प्रसंगी शांती करण्यास सांगितले आहे. पूर्वीच्या काळी माणसांना ग्रहण, धूमकेतू, उल्कापात, समुद्री तुफान, कुत्र्याचे रडणे अशा घटना अनाकलनीय व भयकारी वाटत असत. त्या स्वाभाविक घटनाक्रमाच्या विरुद्ध वाटत असत. शरीरावयवांची स्पंदने ही पुढे घडणाऱ्या वाईट घटनांची निदर्शक वाटत असत. मनाच्या या साऱ्या खेळातून शुभाशुभ शकुनांची कल्पना आली.जे यापूर्वी घडलेले नाही व पुढे घडणार आहे त्याबद्दल कतूहल व भय माणसाला पूर्वीपासूनच वाटत आले आहे. न जाणो काही अनिष्ट घडेल की काय? ही शंका माणसाच्या मनाला छळत असते आणि कमकुवत करीत असते. त्यामुळे अनिष्टाच्या परिहारासाठी व इष्टाच्या स्थापनेसाठी शांतीची कल्पना पुढे आली असावी.               यथा शस्त्रप्रहाराणां कवचं भवति वारणम्‌‍ |             तथा दैवोपघातानां शान्तिर्भवति वारणम्‌‍ ॥ (वयोवस्थाभिदशान्तिसमुच्चयः | लेखक – श्री. नारायणशास्त्री आंजर्लेकर –  केशवभिकाजी ढवळे प्रकाशन, पान क्र. ९)        कवचाने म्हणजे  चिलखताने ज्याप्रमाणे शस्त्रप्रहारांपासून बचाव होतो त्याप्रमाणे शांती केल्याने  दैवी आघातांपासून बचाव होतो. ही या शांतिकर्मांमागची कल्पना आहे. आजच्या काळात शांती केल्यामुळे अशुभाचे निवारण आणि शुभाचे अवतरण खरेच होते की नाही हा मुद्दा विवादास्पदच ठरेल. त्यामुळे अनिष्ट घटना घडू नयेत यासाठी नव्हे तर त्या जर घडल्याच तर त्यांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी मानसिक धैर्य लाभावे असा हेतू समोर ठेवून शांतिकर्मांची रचना केली पाहिजे. या शांतिकर्मांच्या निमित्ताने चार चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवता येतील. लोकांच्या कातर मनाला दिलासा मिळेल असे  मंत्र त्यात आवर्जून घेता येतील. पूर्वी प्रचलित असलेल्या सर्वच्या सर्व शांती केल्याच पाहिजेत असे नाही पण वर सांगितलेल्या कर्मांमागील भाव लक्षात घेऊन काही मोजकी शांतिकर्मे करण्यास हरकत नाही. त्यांच्याकडे ‌‘काही मानसोपचार‌’ अशा दृष्टीने पहावे लागेल. १. वास्तुशांती        हिंदू संस्कृतीतील अनेक उत्तमोत्तम कल्पना घराच्या आधाराने फुलल्या आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांत गृहस्थाश्रम धन्य होय असे मानले आहे. अपत्यसंगोपन, अतिथिपूजन इ. गृहस्थाश्रमातील कर्तव्यांना घराचा आधार असतो. कुटुंबव्यवस्थेचे उबदार कोंदण म्हणून घराकडे पाहिले जाते. केवळ चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नाही. तर वास्तू, त्यात राहाणारी माणसं, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, त्यांचे विचार या सर्वांनी मिळून घर बनत असते. अशा या घराची वास्तू जेव्हा नव्याने बांधली जाते तेव्हा त्यात प्रवेश करणाऱ्यांच्या मनात एक मंगल, पवित्र भावना असते. चराचरामधे भरून राहिलेली ईश्वरी शक्ती वास्तूपुरुषाच्या रूपाने आपल्या घरातही असावी म्हणून वास्तुपुरुष आणि वरुणदेवतेची पूजा करून वास्तुशांती करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. वीज, वादळ, अतिवृष्टी, अनावृष्टी अशा वरुणप्रकोपांची बाधा आपल्या घराला होऊ नये असे आपल्या पूर्वजांना वाटत असे आणि आपल्यालाही  वाटत असते.  काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी  | देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः |             सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः |             सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्‌‍ दुःखमाप्नुयात् ॥        अशी आपली एक प्रार्थना आहे. वरुणदेवतेच्या कृपेने अन्नधान्य विपुल होऊन आपले घर  भरलेले असावे अशी आपली इच्छा असते. वरुण व वास्तुपुरुष यांचे कृपाछत्र घरावर असावे, त्याखाली घरातील मुलामाणसांनी सुखाने राहावे, यशस्वी जीवन जगावे व दीर्घायुषी व्हावे अशी प्रार्थना या प्रसंगी केली जाते. प्रत्येक स्थानावर काही सुष्ट – दुष्ट शक्तींचे वास्तव्य असते अशी आपल्याकडे समजूत आहे. ज्या अशुभ, अहितकारी शक्ती आहेत त्यांनी वास्तु सोडून निघून जावे व शुभ, हितकारी शक्तींनी त्यात वास्तव्य  करावे अशा आशयाच्या प्रार्थनाही यामधे  केल्या जातात.        हिंदू संस्कृतीत घर या संकल्पनेला सामाजिक संदर्भही आहे. घर हे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर समाजाचेही आधारकेंद्र व्हावे लागते. कुटुंबव्यवस्था हा समाजव्यवस्थेचा कणा आहे असे मानले तर तिचे अधिष्ठान जे घर तिथे पवित्र शुभसंकल्पांचे सिंचन झालेले असणे यात विशेष औचित्य आहे. २. उदकशांती        उदकशांतीचा विधी बौधायन गृह्यसूत्रामधे सांगितला आहे. संकल्पित कामना पूर्ण करण्यासाठी, अपमृत्यू टाळण्यासाठी, वास्तूच्या शुद्धीसाठी हा विधी करावा असे त्यात म्हटले आहे. उदकशांतीचा विधी आजही काही ठिकाणी केला जातो. उदक म्हणजे पाणी. पाणी हे स्वभावतःच शांती व तृप्ती देते. त्यामुळे या पाण्याचा उपयोग शांतिकर्मासाठी करणे यात औचित्यच आहे. वेदांचे आवाहन करून जल पूजन केले जाते. नंतर त्या पाण्याने यजमानांना अभिषेक केला जातो.        आजच्या काळामधे वेदपूजन या स्वरूपामधे हा विधी टिकवणे योग्य होईल. अज्ञान म्हणजे भ्रम, भ्रम म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजे अशांती होय. ही अशांती दूर करायची तर ज्ञानाची उपासना केली पाहिजे; तरच खरी शांती लाभेल. वेद  म्हणजे ज्ञान.  वेद हे भारतीयांचे सर्वात प्राचीन ग्रंथ होत. या ग्रंथाची पूजा ज्ञानोपासकांनी केली पाहिजे व त्यानिमित्ताने ज्ञानोपासनेची परंपरा सुरू करणाऱ्या आपल्या पूर्वजांचेही स्मरण केले पाहिजे.        या विधीमधे वेदग्रंथांची मांडणी केलेली असेल. प्रतीकरूपातील वेदांची विविध उपचारांनी पूजा केली जाईल. खरे वेदपूजन, वाचन, श्रवण, स्मरण, पठण व मनन या  उपचारांनी केले पाहिजे. त्याचे बाह्यप्रतीक म्हणून गंध, फूले, धूप, दीप, नैवेद्य हे उपचार करता येतील. वेदांमधील उत्तमोत्तम अर्थांच्या मंत्रांचे अर्थांसह पठण केले जाईल. वेदवाङ्मयातील विचारांची समाजाला ओळख करून देण्याची ही एक संधी असेल. ३. साठी शांती        वय वर्षे पन्नासनंतर मनुष्याच्या वयाचा उतरणीचा काळ सुरू होतो. उतार वयामधे मृत्यूच्या चाहुलीने मन कातर होऊन जाणे हे स्वाभाविकच ! अशा मनाला दिलासा मिळावा म्हणून वय वर्षे पन्नास व त्यापुढे प्रत्येक पाच वर्षांच्या टप्प्याने शांती करण्यास सांगितले आहे. नखाधिकशतं आयुः मनुष्याणां प्रकीर्तितम्‌‍ |  (लिंगपुराण)        असे एक वचन आहे. पूर्वी माणसाचे आयुष्य शंभर वर्षे मानले जाई. वय वर्षे पन्नास ते शंभर अशा कालावधीत केल्या जाणाऱ्या शांतींना वयोवस्थाभिदशांती म्हटले आहे. या शांती पुढीलप्रमाणे –               वैष्णवी वारुणी चैव ततश्चोग्ररथी तथा

शांती व पूजा Read More »

षोडश संस्कार

२. षोडश संस्कार        सम्‌‍ उपसर्ग असलेल्या ‌‘कृ‌’ या धातूपासून संस्कार हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ चांगले करणे, शुद्ध करणे, सुंदर करणे असा होतो. हा अर्थ आपल्याला एका उदाहरणावरून समजून घेता येईल. खाणीतून जेव्हा सोने काढले जाते तेव्हा ते शुद्ध स्वरूपाचे नसते. त्यामधे हीण मिसळलेले असते. या सोन्यावर अग्निसंस्कार करून त्यातील हीण काढून टाकून त्याला उजाळा दिला जातो. यालाच म्हणतात इष्ट ते परिवर्तन. इष्ट ते परिवर्तन या अर्थी संस्कार शब्द वापरला जातो. असे परिवर्तन कशामुळे घडून येत असते? एखाद्या वस्तूतील दोष काढून टाकून त्या जागी चांगल्या गुणांची पेरणी केल्यामुळे. यालाच दोषापनयन (दोष दूर करणे)  आणि गुणाधान (गुण निर्माण करणे) असे म्हटले आहे. वर आपण खाणीतून काढलेल्या सोन्याचे उदाहरण घेतले. त्यामधे अग्निसंस्कारामुळे हीण जळून जाणे हे झाले दोषापनयन आणि सोन्याच्या रंगाला अधिक उजाळा मिळणे हे झाले गुणाधान. तंत्रवार्तिकामधील व्याख्येत ‌‘इष्ट ते परिवर्तन‌’ याला ‌‘योग्यता‌’ म्हटले आहे.      योग्यतां च आदधानाः क्रियाः संस्काराः इत्युच्यते | (तंत्रवार्तिक, पृष्ठ १३७८)        योग्यता प्राप्त करून देणाऱ्या क्रियांना संस्कार असे म्हणतात. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाला अशी योग्यता प्राप्त करून देणे, व्यक्तिमत्वाचे सर्वांगीण विकसन घडवून आणणे आणि त्याला एक उंची प्राप्त करून देणे हाच या संस्कारांमागचा उद्देश आहे. संस्कारांसंबंधी आपली कल्पना केवढी उदात्त आहे हे खालील वचनावरूनही दिसून येईल – चित्रकर्म यथानेकैः रङ्गैः उन्मील्यते शनैः | मानव्यमपि तद्वत् स्यात् संस्कारैः विधिपूर्वकैः ॥ (पाराशर गृह्यसूत्रावरील हरिहरभाष्य, पान  260 )        वेगवेगळ्या रंगांच्या योगाने हळूहळू चित्र जसे आकारास येत जाते त्याचप्रमाणे माणूसपण हेही पद्धतशीरपणे केलेल्या संस्कारांनी क्रमाक्रमाने उमलत जाते. एखादे चित्र हे साधे रेखाचित्र असण्यापेक्षा त्यात रंग वापरले जातात त्यावेळी ते निश्चितच खुलून दिसते. माणसाचे आयुष्यसुद्धा एक चित्रपटच आहे. जीवन हे सरळ, साधे  रेखाचित्राप्रमाणेही जगता येते. परंतु त्यात जर संस्काररूपी  रंग भरले तर जीवनातील शोभा नक्कीच वाढते. जीवन अधिक उदात्त, उन्नत आणि उत्तम बनू शकते. चित्रात रंग भरताना अनुकूल रंगसंगती साधणे हे महत्त्वाचे असते. तसे हे संस्कारही योग्य वेळी, योग्य रीतीने केले जाणे आवश्यक आहे. अशा संस्कारांनी व्यक्तिमत्त्व विकसता विकसता विकसत जावे, पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे प्रवास व्हावा अशी संकल्पना आहे.        संस्कार हा संस्कृतीचा कृतिरूप उन्मेष होय असे म्हटले जाते. बहुटेक लोक सर्व संस्कृतींमधे कौटुंबिक जीवनात अपत्यजन्म, विवाह, देहावसान यांसारख्या घटना संस्कारांनी बांधलेल्या दिसतात. अतिशय उदात्त आणि मनोरम आशय या संस्कारांतून व्यक्त केला जाऊ शकतो. व्यक्तीच्या जीवनाला असलेला सामाजिक व आध्यात्मिक संदर्भही या संस्कांरांमधून प्रकट होऊ शकतो. समाज व व्यक्तीच्या विकासाला पोषक अशी मूल्ये संस्कारांमधून प्राप्त होतात. हिंदू जीवनपद्धतीत अशा सोळा संस्कारांची गुंफण पूर्वी केलेली होती.        संस्कारांची संख्या नक्की किती याविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथांमधे पुष्कळ मतभेद आहेत. गौतम धर्मसूत्रांमधे म्हटले आहे –                      चत्वारिंशत् संस्काराः अष्ट आत्मगुणाः |        चाळीस संस्कार आणि आठ आत्मगुण मिळून अठ्ठेचाळीस संस्कार होतात. हे आठ आत्मगुण कोणते ?    दया सर्वभूतेषु क्षान्तिरनसूया शौचमनायासो माङ्गल्यमकार्पण्यमस्पृहेति |        दया, क्षमा, अनसूया (कोणाचाही मत्सर न करणे), शौच (अंतर्बाह्य पावित्र्य), अनायास (अनावश्यक कामासाठी वृथा कष्ट न घेणे), मांगल्य (आनंदी वृत्ती) अकार्पण्य (उदारता), अस्पृहा (दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा न धरणे) हे आठ आत्मगुण होत.        चाळीस संस्कारांबरोबर या आठ आत्मगुणांना स्थान देऊन असेही म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीवर सर्व संस्कार होऊनही तिच्यात आत्मगुणांचा अभाव असेल तर ते संस्कार  व्यर्थ होत. याउलट एखाद्या आत्मगुणसंपन्न व्यक्तीवर एखाददुसराच संस्कार झाला असेल तरी ती व्यक्ती श्रेष्ठ होय.(संस्कार – भारतीय संस्कृति कोश, खंड ९, पान क्र. ५६३,  संपादक – पं. महादेवशास्त्री जोशी )           हे अठ्ठेचाळीस संस्कार कमी होत होत ही संख्या सोळावर आली. या संस्कारांचे वर्गीकरण सामान्यतः पुढीलप्रमाणे करता येईल. १) जन्मपूर्व संस्कार  –  गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन २) बाल्यकालीन संस्कार  – जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकरण, कर्णवेध ३) शैक्षणिक संस्कार – विद्यारंभ, उपनयन, वेदारंभ, केशान्त, समावर्तन ४) विवाह ५) अन्त्येष्टी (हिंदू संस्कार- श्री.राजबली पांडेय- मोतीलाल बनारसीदास प्रकाशन)        या संस्कारांचे स्वरूप बघितले तर यात मानवी जीवनाचा सखोल विचार केलेला दिसेल. माणसाच्या जन्माच्या आधीपासून ते मरणानंतरही हे संस्कार होत असतात.        बालकाच्या जन्माला कारणीभूत अशा स्त्रीपुरुषांच्या एकत्र येण्याच्या क्रियेपासूनच संस्कारांची सुरुवात होते. गर्भस्थापना झाली की मूल गर्भात असतानाच त्याच्यावर  नकळत संस्कार होत असतात. या जन्मपूर्व संस्कारांमधे मुलाच्या आईला आनंद मिळेल अशाही गोष्टी असतात. तिच्या प्रसन्न वृत्तीचा सुपरिणाम मुलाच्या वृत्तीवर होत असतो. मुलाचा जन्म, त्याला त्याच्या नावाने संबोधणे, त्याचे पहिल्यांदा घराबाहेर पडणे, त्याने पहिल्यांदा अन्न ग्रहण करणे, त्याचे जन्मतः असलेले केस काढणे, कान टोचणे, इ. सर्व प्रसंग कुटुंबियांच्या दृष्टीने कौतुकाचे असतात. पण या प्रसंगांना नुसतेच सोहळ्याचे रूप न देता संस्कारांच्या चौकटीत त्यांना बसवले आहे. पुढे मूल मोठे झाल्यावर त्याच्या प्राथमिक शिक्षणाचा घरीच प्रारंभ होतो. पूर्वीच्या काळी ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम अशा चार आश्रमांमधे शतवर्षीय जीवनाची विभागणी केलेली होती. ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करून माध्यमिक शिक्षणाला प्रारंभ करण्यापूर्वी त्याला काही व्रते घ्यावी लागतात. शिक्षण चालू असेपर्यंत ती पाळावी लागतात. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर या व्रतांचा समारोप करूनच त्याने विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा असतो. विवाहप्रसंगीदेखील त्याने काही व्रते घेऊन ती पुढे पाळावीत अशी अपेक्षा असते. अशा प्रकारे आयुष्याच्या प्रत्येक  टप्प्यावर संस्कारांची योजना केली आहे असे दिसते. मृत्यूनंतरही हे संस्कार चालू असतात. कारण देह नष्ट झाला तरी आत्मा नष्ट होत नाही अशी हिंदू विचारसरणी आहे आणि निर्जीव देह नष्ट करतानादेखील त्याच्याविषयी आदर राखला पाहिजे अशी कल्पना आहे.        सर्वसाधारणपणे विविध मंत्रांचे उच्चार, त्यानुसार काही आचार आणि या दोन्हींबरोबर उत्पन्न होणारे काही चांगले विचार अशा त्रिविध गोष्टींचा समावेश संस्कारविधीत होतो. यावरून लक्षात येईल की संस्कार हे केवळ एक बाह्य कर्मकांड या स्वरूपात आचरणे एवढीच त्यामागील कल्पना नाही तर  या संस्कारांचा परिपाक नैतिक गुणांच्या अभिवृद्धीत व्हावा अशीच अपेक्षा आहे. म्हणूनच संस्कारांप्रमाणेच जीवनातील प्रत्येक पायरीसाठी व्यवहाराचे नियमही धर्मशास्त्रांनी निर्धारित केले. त्यात व्यक्तीच्या नैतिक विकासाचे प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतात. संस्कारांनी उत्पन्न होणाऱ्या नैतिक गुणांतून संस्कार्य व्यक्तीचा आध्यात्मिक विकास घडावा अशीही अपेक्षा असते. अशा प्रकारे हे संस्कार म्हणजे आध्यात्मिक विकासाच्याच पायऱ्या मानल्या गेल्या आहेत. (संस्कार – भारतीय संस्कृति कोश खंड ९, पान क्र. ५६६,  संपादक पं. महादेवशास्त्री जोशी)  अशा सोळा संस्कारांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ. अ) जन्मपूर्व संस्कार १.  गर्भाधान        ज्या संस्कारामुळे स्त्रीच्या ठिकाणी गर्भाची धारणा होते त्याला गर्भाधान असे म्हणतात. पतिपत्नींनी पितृत्व व मातृत्व प्राप्त करून घेण्यासाठी हा विधी करावयाचा असतो. गर्भधारणा या नैसर्गिक क्रियेला पवित्र अशा संस्काराच्या स्तरावर नेऊन ठेवले आहे ही गोष्ट येथे महत्त्वाची आहे.        ज्या स्त्रीच्या ठिकाणी गर्भाची स्थापना करावयाची ती तो धारण करण्यास सक्षम असावी, गर्भपात न व्हावा किंवा गर्भधारणा होत नाही असेही न व्हावे. गर्भाशयातील दोष दूर होऊन पावित्र्य उत्पन्न व्हावे, गर्भवती स्त्री व गर्भ या दोघांचेही रक्षण व्हावे अशा हेतूने या संस्काराची योजना केली जाते.        या संस्कारातील प्रमुख विधी म्हणजे पती आपल्या ऋतुस्नात पत्नीला गर्भाधानासाठी आवाहन करतो. तिच्या ठिकाणी गर्भ प्रस्थापित

षोडश संस्कार Read More »

धर्म

धर्म नेहमीच्या भाषेमधे आपण हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म असे शब्दप्रयोग करत असतो. येथे धर्म शब्द आपण उपासनापद्धती म्हणून वापरतो. धर्म शब्दाचा खरा अर्थ मात्र उपासनापद्धती असा नव्हे. ‌‘धृ‌’ म्हणजे धारण करणे या अर्थाचा संस्कृत भाषेतील धातूपासून धर्म शब्द बनला आहे. व्यक्ती आणि समाजाच्या धारणपोषणास कारणीभूत होतो तो धर्म. ज्या नियमबंधनांच्या योगे समाजव्यवस्था टिकून राहाते व प्रगती करते त्याला धर्म म्हणतात. ‌‘संतुलित समाजस्थितीसाठी आवश्यक असलेला आचार‌’ हा धर्म शब्दाचा अर्थ आहे. धर्म शब्दाला हा सामाजिक संदर्भ महाभारतात प्राप्त झालेला दिसतो.    धारणात् धर्मम्‌‍ इति आहुः धर्मेण विधृताः प्रजाः | यः स्यात् धारणसंयुक्तः सः धर्मः इति निश्चयः ॥  (महाभारत शांतिपर्व  १०९-११)        धारण करण्याच्या क्रियेमुळे (विशिष्ट आचारपद्धतीला) धर्म असे म्हणतात. धर्माच्या योगाने समाजधारणा होते. म्हणून ज्याच्या ठिकाणी धारणपोषण करण्याचे गुण आहेत त्याला धर्म असे निश्चितपणे म्हणावे. या व्याख्येत व्यासांनी समाजधारणा हेच धर्माचे मुख्य ध्येय मानले आहे. परंतु समाजाची धारणा होते म्हणजे काय? कणाद महर्षींनी म्हटल्याप्रमाणे –               यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः | (वैशेषिक सूत्र १-१-२)        ज्याच्यामुळे अभ्युदय व निःश्रेयस यांची प्राप्ती होते तो धर्म ! अभ्युदय म्हणजे घरदार, जमीनजुमला, पैसाआडका आदि ऐहिक सुखसोयींची साधने मिळवून उन्नती साधणे, तर  निःश्रेयस म्हणजे आत्मिक उन्नती साधून परमोच्च सात्त्विक आनंदाचा अनुभव घेणे. धर्मामुळे  समाजाची धारणा होते याचा अर्थ अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टींसाठी अनुकूल सामाजिक परिस्थिती प्राप्त होते.        आपल्या पूर्वजांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांची मांडणी केली आहे. काम म्हणजे मानवी इच्छा-आकांक्षा आणि अर्थ म्हणजे त्या पूर्ण करण्याची साधने. अर्थप्राप्ती आणि कामनापरिपूर्ती म्हणजेच अभ्युदय. या गोष्टी धर्माच्या चौकटीत राहूनच करायला सांगितल्या आहेत. मोक्ष म्हणजेच निःश्रेयस. मोक्ष हा परमपुरुषार्थ होय. धर्माचे आचरण करणे हे मोक्षमार्गासाठी आवश्यक असेच आहे. अशाप्रकारे धर्म हा सर्व पुरुषार्थांचा पाया मानला जातो.        या धर्माचे मूलाधार कोणते? धर्म कोणता हे ठरवण्याचे स्रोत कोणते? मनुस्मृतीत म्हटले आहे- वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः | एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम्‌‍ ॥  (मनुस्मृती २-१२)        वेद (ज्ञान), स्मृती (धर्मशास्त्र), सदाचार आणि स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी ही चार धर्माची लक्षणे होत. वेदप्रामाण्य मानणारा आणि न मानणारा असा सर्व भारतीय समाज डोळ्यासमोर ठेवून वेद याचा ज्ञान असा मूळ अर्थ येथे स्वीकारावा लागेल. वेद हा शब्द विद्‌‍ म्हणजे जाणणे या धातूपासून बनला असून ज्ञान, ज्ञानाचे साधन, ज्ञानाचा विषय असा त्याचा अर्थ होतो. म्हणून ज्ञान हा धर्माचा मूलाधार आहे. स्मृती म्हणजे धर्मशास्त्र आणि धर्मशास्त्र म्हणजे कायदा. त्या त्या काळात त्या त्या स्मृती कायदा म्हणून प्रचलित होत्या व स्थलकालानुरूप त्यांत परिवर्तने झाली आहेत. आजच्या काळात भारताच्या घटनेच्या आधारे बनवलेले कायदेच या देशातील लोकांना लागू आहेत. स्मृती म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या चांगल्या सामाजिक प्रथा असा अर्थ घ्यावा. सदाचार हा धर्माचा एक मूलाधार म्हणून मानला आहे. यासंदर्भात –     जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे | जनी वंद्य ते सर्व भावे करावे । (मनाचे श्लोक २)        हे समर्थ रामदासांचे सोपे सूत्र लक्षात ठेवावे. समाजामधे ज्या व्यक्ती आदर्श म्हणून मानल्या आहेत अशांचे उदाहरण समोर ठेवून केलेले आचरण किंवा समाजामधे जो आचार चांगला मानला आहे, तदनुरूप आचरण असा सदाचार याचा अर्थ होतो. व्यक्तीला प्रिय असणाऱ्या गोष्टींचा धर्माचा मूलाधार म्हणून स्वीकार होणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अर्थात् या प्रिय असणाऱ्या गोष्टी वेद, स्मृती, सदाचार यांच्या निकषांवर तपासून घेतलेल्या अशाच असल्या पाहिजेत. कोणीही मन मानेल तसे वागावे आणि त्याला धर्म म्हणावे असा अर्थ येथे नाही.        अशा प्रकारे वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःचे प्रिय यांच्या आधारावर उभ्या असलेल्या धर्माचे भारताच्या बाबतीत तर विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व स्वामी विवेकानंदांनी बरोबर ओळखले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा जसा विशेष स्वभाव असतो तसाच प्रत्येक राष्ट्राचाही असतो. त्या स्वभावानुरूपच त्या त्या राष्ट्राची उन्नती होते. त्या स्वभावाला अनुसरून केलेल्या सुधारणाच त्या राष्ट्रासाठी उपयोगी ठरतात. भारताचा विशिष्ट स्वभाव, विशिष्ट प्रकृती, विशिष्ट जीवनहेतू ‌‘धर्म‌’ हा आहे. म्हणूनच धर्माचा विचार न करता केलेल्या योजना अन्य राष्ट्रांबाबत उपयोगी ठरत असल्या तरी त्या भारतात मात्र यशस्वी होतीलच असे नाही. म्हणूनच स्वतःची आणि आपल्या परमप्रिय राष्ट्राची प्रगती साधू  इच्छिणाऱ्या प्रत्येकाने धर्माचा विचार केला पाहिजे.        समाजव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून घालून दिलेले नीतिनियम असा धर्म या शब्दामागचा आशय आपण पाहिला. समाजाचे म्हणून जसे काही नीतिनियम असतात तसेच ते प्रत्येक व्यक्तीसाठीही, स्वतंत्रपणे सांगितलेले असतात. तोच त्या त्या व्यक्तीचा धर्म होय. उदा. उत्तम अध्ययन करणे हा विद्यार्थ्याचा धर्म होय. सचोटीने व्यापार करणे हा व्यापाऱ्याचा धर्म होय. पक्षपात न करता न्याय देणे हा न्यायाधीशाचा धर्म होय. अशा त्या त्या  माणसागणिक बदलणाऱ्या धर्माला  गीतेने ‌‘स्वधर्म‌’ म्हटले आहे.        पण माणूस म्हणून प्रत्येकाचा धर्म कोणता? स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, “माणसामधे मूलतःच असलेले दिव्यत्व आविष्कृत करणे म्हणजे धर्म”. या दिव्यत्वाच्या आविष्करणास उपयुक्त अशी सेवा, प्रेम, त्याग, निःस्वार्थीपणा, अहिंसा, सत्य अशी तत्त्वे  मूल्ये म्हणून सांगितली गेली आहेत. अशी ही धर्माची स्थलकालाच्या कसोटीला उतरून  शाश्वत ठरलेली तात्त्विक बाजू आहे. ही बाजू स्थिर व कालातीत म्हणूनच  अपरिवर्तनीय आहे.        धर्माच्या या तत्त्वज्ञानात्मक अंगाला व्यावहारिक चौकटही असावी लागते.  स्वामी विवेकानंद  एके ठिकाणी म्हणतात, “केवळ शिथिल अशा तत्त्वज्ञान पद्धतीने लोकांच्या मनावर प्रभाव पडत नाही. लोकांना साधारणपणे बाह्य अनुष्ठानांची आवश्यकता असते. धर्म म्हणजे अनुष्ठानांच्या व प्रतीकांच्या द्वारे तत्त्वज्ञानाला दिलेले मूर्तरूप होय.”                            (विवेकानंद ग्रंथावली खंड ९, आवृत्ती ४, पान ५०३) प्रस्तुत पुस्तकात आपण संस्कार, शांती, पूजा यांसारख्या धर्मविधींचा परिचय करून घेणार आहोत. त्यामुळे धर्मामधे या विधींचे स्थान काय हेही आपण पाहिले पाहिजे. हे धर्मविधी म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे धर्माच्या तत्त्वज्ञानात्मक अंगाला व्यावहारिक चौकट देण्याचाच एक प्रयत्न आहे. हे धर्मविधी म्हणजे धर्ममार्गावरील प्रारंभिक पायऱ्या किंवा धर्मरूपी रोपट्याला घातलेल्या कुंपणाप्रमाणे आहेत. रोपट्याच्या रक्षणासाठी प्रथम कुंपणाची आवश्यकता असतेच  असते. म्हणून माणसाच्या मनातील धर्मभावनेच्या रक्षणासाठी हे संस्कार, शांती, पूजा इ. धर्मविधी आवश्यक आहेत.        रोपट्याचा वृक्ष झाल्यावर ते कुंपण त्याच्या वाढीस अडथळा ठरते व त्याची आवश्यकता उरत नाही हे खरे. या अर्थाने ही सर्व क्रियाकर्मे, अनुष्ठाने, शास्त्रे, इ. गोष्टींना स्वामी विवेकानंदांनी गौण तपशीलाच्या बाबी असे म्हटले आहे. पण या गौण तपशीलाच्या बाबींचे महत्त्वदेखील ते जाणून होते असेच दिसते. एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे, “कर्मकांड, अनुष्ठाने, देवळेरावळे व तत्सदृश बाह्य अवडंबर निरर्थक आहे असे म्हणणे फार सोपे आहे. पण या साऱ्या स्थूल वस्तू ज्यांची प्रतीके होत त्या अमूर्त भावांचा उदय त्यांच्यामुळे होत असतो. म्हणून अनुष्ठाने व प्रतीके यांची उपेक्षा करणे व त्यांना फाटा देणे हे शहाणपणाचे नाही.” (विवेकानंद ग्रंथावली खंड १, आवृत्ती ४,  पान ९७)        अशाप्रकारे धर्मातील विधींचे महत्त्वाचे स्थान समजावून घेतल्यानंतर आपण क्रमशः संस्कार, शांती आणि पूजा यांसारख्या धर्मविधींचा परिचय करून घेऊ.

धर्म Read More »