रामभाऊ डिंबळे प्रबोधिनी नावाचे रसायन :
ज्ञान प्रबोधिनीची स्थापना १९६२ सालच्या ऑगस्ट महिन्यात करण्यात आली. अशा प्रकारची शैक्षणिक संस्था आकस्मिक विचारातून जन्माला येत नसते. ती एक प्रदीर्घ विचार व प्रयोगप्रक्रिया असते. कै. डॉ. आप्पासाहेब पेंडसे यांनी प्रबोधिनीच्या स्थापनेपूर्वी कोणता विचार मांडला होता व कोणकोणते प्रयोग केले होते, याचा आढावा घेतला तर असे दिसते की आपल्या देशाच्या ज्या कमतरता भरून काढाव्यात असे त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना उत्कटपणे वाटत असे. त्या समस्यांना तोंड देण्यासाठीचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणून त्यांनी विविध उपक्रम पायाभूत धरले.
प्रबोधिनीचे नाव काय ठेवावे याबाबत पहिल्यांदा जो विचारविनिमय झाला त्यात ‘ज्ञान-विज्ञान प्रबोधिनी’ असे नाव समोर आले व ते काही प्रारंभिक परिपत्रकात छापलेही गेले. पुढे सुटसुटीतपणासाठी ‘ज्ञान प्रबोधिनी’ असे नाव रूढ झाले. तरीही प्रबोधिनीच्या प्रार्थनेत ‘विज्ञान-ज्ञान अमुचे परिपूर्ण होवो’ असा जो संकल्प दिसतो त्यात विज्ञानाचा आवर्जून समावेश आहे. हे विज्ञानज्ञान कशासाठी तर ‘अभ्यास देशस्थितीचा समतोल चालो’ या संकल्पाला आधार देण्यासाठी. हा देशस्थितीचा समतोल अभ्यास प्रबोधिनीत प्रथमपासून रूढ झाला तो ग्रामदर्शन या स्वरूपात. मुलांना खेडोपाडी घेऊन जायचे, आत्मीयतेने गावकऱ्यांशी बोलायला लावायचे, तिथल्या प्रश्नांना भिडताना आधुनिक विज्ञानाचा उपयोग कसा करायचा याची प्रयोगप्रात्यक्षिके घडवायची आणि बरोबरीने लोकसंघटनाचा आग्रह धरायचा, हे प्रबोधिनीचे ग्रामतंत्र प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात आले.
प्रबोधिनीच्या स्थापनेपूर्वी आप्पांनी जे आग्रह जोपासले त्याचे अवलोकन केल्यास त्यांनी प्रबोधिनीचे रसायन कसे जमविले ते कळू शकेल. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रचारक कार्यकर्ते होते. तेव्हा संघात त्यांनी हवेली तालुक्याची जबाबदारी सांभाळली. त्यावेळी पुण्यातल्या कार्यकर्त्यांना खोलवर ग्रामीण भागात सायकलवरून सतत भ्रमण करायला ते उद्युक्त करीत. त्याच टप्प्याला त्यांनी संघात प्रथमच श्रमदानाचा प्रयोग घडविला. शिवण्याचा रस्ता स्वयंसेवकांनी श्रमदानाने केला. अनेकांना तो प्रयास संघाच्या तंत्रात न बसणारा वाटला होता !
१९५१ साली त्यांनी संघाची प्रांतस्तरीय ‘दुष्काळ विमोचन समिती’ स्थापन करून, त्यात अनेक उपक्रम राबविले. खरे तर संघात असे काम करण्याचा प्रघात प्रथमच पडला. तोही केवळ आप्पासाहेब पेंडसे यांच्या आग्रहाखातर ! आता संघाची अशी सेवाभावी कामाची स्थायी व्यवस्था आहे व ती प्रभावीपणे काम करीत असते. पुण्यात एन्फ्लूएन्झाची मोठी साथ आली असताना त्यावर होमिओपॅथिक उपचाराची केंद्रे आप्पांनी संघाच्या वतीने चालविली. संघात या उपक्रमाची उपेक्षा आणि क्वचित कुत्सित चिकित्साही झाली; पण समाजाशी नाळ जोडण्याचा आणि त्यासाठी आधुनिक विज्ञान आणि संघटनाशास्त्र वापरण्याचा आग्रह आप्पा किती सातत्याने व विचारपूर्वक करीत होते हेच यातून दिसून येते. संघात शुद्ध युवक संघटना बाहेरचे काहीही रूढ व्हायला फार अवघड होते. त्याला जणू तात्त्विक विरोध होता. त्यासाठी आप्पांनी संघधूरीणांचा रोष पत्करूनही आग्रह धरला. पुढे त्यांनी आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली. पण आज संघात ज्या विविध परिवार संस्था रूजल्या आहेत व देशभर हजारोंनी सेवाकार्य करीत आहेत, त्याचे प्रथम पदन्यास आप्पांच्या आग्रही प्रयत्नांमुळेच रुजले हे विसरता कामा नये. १९५० ते १९६० च्या दशकातल्या या विचारसूत्राचे धागे प्रबोधिनीच्या मंडणीत आवर्जून अवतीर्ण झाले असे दिसेल.
ग्रामीण सेवाकार्यावरील प्रबोधिनीचा भर :
१९६१ च्या पानशेत पूर प्रसंगात आप्पांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापिलेल्या ‘राष्ट्रजागृती मंडळ’ या सेवा संघर्ष गटाने संघटित सेवाकार्य केले. आपत्तीनिवारणार्थ तात्काळ धावून जायचे हेच वळण पुढे प्रबोधिनीच्या अनेक टप्प्यांवर दृष्टोत्पत्तीस येते. १९६९ सालच्या कोयना भूकंप प्रसंगी प्रबोधिनीची मोठी वार्षिक सभा रद्द करून सर्व कार्यकर्ते महिन्यापेक्षा अधिक काळासाठी कोयनेच्या ग्रामीण परिसरात पाठवण्यात आले आणि पुण्यातून दैनंदिन साहाय्य संकलन करून त्या कार्यकर्त्यांकडे रसद पोचवण्यात आली. असे संघटित सेवाकार्य विद्यार्थ्यांना जे वळण लावते, तेच खरे शिक्षण होय असे प्रबोधिनी मानते. असे ग्रामीण भागाशी नाळ जोडणारे उपक्रम हे प्रासंगिक किंवा वरवरचे लाक्षणिक उपक्रम नव्हेत. प्रबोधिनीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची घडण या उपक्रमातील सतत सहभागातून होत असते. बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणाची अगदी मूलभूत गाभ्याची अशी ही ग्रामीण सहभागाची शिक्षण व्यवस्था आहे. पोटात कळकळ, हृदयात तळतळ आणि डोक्यात चळवळ निर्माण करण्यासाठी ग्रामीण भारताचे दारिद्र्य वास्तविक समोर आले पाहिजे. त्यावरचे उपाय स्वतः सहभागाने अनुभवले पाहिजेत आणि त्या उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांचे स्थायी आणि प्रभावी संघटन करता आले पाहिजे, ही प्रबोधिनीतली मनुष्यघडणीची विद्यानीती आहे.
महिलांची दारूबंदी चळवळ :
ग्रामीण भागातील व्यसनाधीनतेविरुद्ध प्रबोधिनीने जी प्रदीर्घ दारूबंदी चळवळ केली तीमध्ये संपूर्ण प्रबोधिनी परिवार प्रत्यक्ष सहभागी होता. शिवापूरच्या यंत्रालयाचे अधिकारी सदस्य हे तर या चळवळीचे मुख्य कार्यकर्ते होते, पण या चळवळीत प्रबोधिनीच्या अनेक युवती कार्यकर्त्या पूर्णवेळ कार्यरत होत्या. त्यातूनच त्यांना ग्रामीण स्त्रियांशी सुखसंवाद करण्याची दीक्षा मिळाली. ग्रामीण महिलांमध्ये असलेल्या अनेक क्षमता हेरून त्यांना वाव देण्याचे कौशल्य शिकता आले. यादृष्टीने १९८९ मधला प्रसंग सांगण्यासारखा आहे. त्यावेळी महाराष्ट्र शासन नव्या १५०० दारूपरवान्यांच्या तयारीत होते. दारूबंदी मंत्री छेदीलाल गुप्तांना याचा जाब विचारण्यासाठी आपल्या भागातील २६ महिला मंत्रालयात गेल्या. त्यातल्या कुणी मुंबई, मंत्रालय, मंत्री पाहिले नव्हते की घेराव, निदर्शने, घोषणा अनुभवल्या नव्हत्या. त्यांच्याजवळ फक्त दारूबद्दलची चीड व उद्ध्वस्त संसाराची वेदना होती. या महिलांना घेऊन प्रबोधिनीच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मंत्रालयात महिलांचा दारूबंदी मंत्र्यांशी संवाद घडविला आणि मंत्र्यांनी उडवाउडवीची उत्तरे देताच त्या महिलांनी रुद्रावतार धारण करून त्यांचा पाठलाग करीत घेराव घातला आणि अखेरीस परवाने बंदीचे आश्वासन मिळविले !
आज याच महिलांच्या निर्धारशक्तीचे संगोपन करून प्रबोधिनीच्या युवती कार्यकर्त्यांनी बचतगटांचे कर्तबगार महिलाबळ शिवगंगा-गुंजवणीच्या परिसरात उभे केले आहे. म्हणजे यात ग्रामीण महिला आर्थिक सक्षमता शिकल्या आणि प्रबोधिनीच्या विद्यार्थिनी या जाणत्या लोकसंघटक बनल्या. यापुढे जाऊन आता ग्रामीण महिला उद्योजिका बनून स्वयंरोजगाराची वाटचाल करीत आहेत.
प्रबोधिनीत विद्यार्थ्यांच्या ज्या गुणांचे संवर्धन योजिलेले आहे, त्यात या उद्योजकतेचे संगोपन खूपच महत्त्वाचे आहे. त्यातही हा उद्यम समाजहिताचा, लोकोपयोगी दिशेचा असावा असा आग्रह असतो. याचदृष्टीने दोन उपक्रमांची प्रबोधिनीशी जी सांगड घातली गेली त्याची उदाहरणे बोलकी अशीच आहेत.
आर्थिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न :
एक म्हणजे शिवगंगा खोऱ्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जो शेतमालविक्रीचा उपक्रम १९७९ पासून सलग ८-१० वर्षे खुद्द ज्ञान प्रबोधिनीच्या वास्तूत, उपासना मंदिरात चालला, तो होय. यात १०-१५ गावांतील १०० शेतकऱ्यांकडचा सुमारे १००० क्विंटल तांदूळ प्रबोधिनीत थेट ग्राहकांना विकला जात असे. संपूर्ण उपासना मंदिर घमघमाटी वासाच्या आंबेमोहोराने भरलेले असे. शेकडो ग्राहकांची झुंबड तिथे उडत असे. लहान शेतकरी आणि किरकोळ ग्राहक यांचा नित्य संवाद तिथे घडत असताना प्रशालेचे विद्यार्थी त्याचे साक्षीदार असत. आज सर्वत्र तांदूळ महोत्सव चालतात, त्या सर्वांचे मूळ प्रबोधिनीतली ही तांदूळपेठ आहे. एकीकडे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीची तंत्रे शिकवीत दुसरीकडे त्यांना उजवा बाजारभाव मिळवून देण्याची ही साक्षात प्रयोगशाळा प्रबोधिनीच्या प्रशालेचा अंगभूत घटक होती.
दुसरा असाच प्रयोग प्रबोधन दुग्धालयाचा. शिवगंगा खोऱ्यातील रोजगार निर्मितीचा प्रयत्न म्हणून १९८२ ते १९९० या काळात सहा गावातून शेतकऱ्यांना उजवा बाजारभाव देत दूध संकलन केले जाई आणि त्या दुधावर प्रक्रिया करून ते पिशवीबंद करून पुण्यात त्याची विक्री केली जाई. या विक्री उपक्रमाचे केंद्रही प्रबोधिनीच असे.
ग्रामीण परिसरात प्रबोधिनीचे शिक्षण रुजविण्याचे प्रयोग :
आज हराळीला जे कृषिविद्यालय आणि प्रयोगशेती चालते, फळप्रक्रिया चालते ती सारी प्रक्रियाही शैक्षणिकच आहे. तिथला शेतमाल आजही प्रबोधिनीच्या वास्तूत विक्रीस असतो.
प्रबोधिनीची ग्रामप्रबोधिनी, साळुंब्रे येथील शाळा ही वेगळी काढलेली रुढ अर्थाची शेतीशाळा नव्हे. ती सर्वसामान्य पाठ्यपुस्तकी शाळा तर आहेच, पण आज ती मावळ तालुक्यातील सर्व शाळांची स्फूर्तिदात्री, मावळ तालुक्यातील आधुनिक शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशी आधारभूमी आहे. तिथे शिकणारे ग्रामीण विद्यार्थी आधुनिक पुस्तकी शिक्षणाच्या जोडीने सर्व कृषिप्रक्रियांमधून जातात आणि ‘गाव माझा मी गावाचा’ असा प्रत्यक्ष संस्कारही घेतात.
एकात्म शिक्षणाचा विचार :
थोडक्यात, प्रबोधिनीतील बुद्धिवंतांचे अव्वल शिक्षण हस्तिदंती मनोऱ्यातले, एलिटिस्ट वा एस्केपिस्ट (उच्चभ्रू वा पलायनवादी) तुसडे शिक्षण तर नाहीच नाही; तर ते सर्वार्थांनी भारतीय मातीचा गंध घेऊन उभारी धरणारे कर्तव्यपूर्तीचे संवेदनाशील शिक्षण आहे. याचे कारण हे आहे की प्रबोधिनी संस्थेला ग्रामविकासाची एक विंग जोडण्याचा विचार न करता ‘ग्रामविकास’ हा विद्यार्थ्यांच्या ‘अंतरिचा रामविकास’ व्हावा, या धोरणाने इथल्या शिक्षणाची एकात्म (Integrated) रचना केली गेली आहे. इथे शिक्षण ग्रामविकासाने अर्थपूर्ण झाले आहे आणि गावे शिक्षणाने डोळस झाली आहेत.
ग्रामविकसनाची पाच दशके :
गेल्या पन्नास वर्षांत ज्ञान प्रबोधिनीच्या ग्रामविकास कार्यात दृष्टिकोन आणि तंत्रे यात कसकसा बदल किंवा विकास घडत गेला याचा प्रांजळ आढावा घेणे मोठेच बोधप्रद ठरणारे आहे.
या काळात ग्रामीण वास्तव बदलून गेले आहे हे निर्विवाद सत्य आहे. निदान पुणे परिसरातील पश्चिम महाराष्ट्राबाबत तरी हे नाकारता येणार नाही. प्रबोधिनीच्या कामात ‘रूप पालटू देशाचे’ असा जबाबदार अभिनिवेश असतो. किंबहुना ‘राष्ट्रार्थ भव्य कृति काहि पराक्रमाची। ईर्ष्या निजांतरि धरोनि करावयाची।’ ही प्रबोधिनीच्या प्रार्थनेतील प्रतिज्ञाच या रूप पालटण्याच्या संकल्पाची ग्वाही देत आली आहे. पण आजचे ग्रामीण भारताचे बदललेले चित्र नेमके कुणी बदलले आहे? ते इष्ट दिशेने बदलत गेले आहे की अनिष्ट दिशेने? प्रबोधिनीच्या ग्रामविकासाचा परिसर म्हणजे छत्रपती शिवरायांचे मूळ स्वराज्यच असलेला शिवगंगा-गुंजवणी नद्यांकाठचा वेल्हे-भोर-हवेलीचा सुमारे १५०-२०० गावांचा मावळ प्रदेश. त्यालाच आपण प्रबोधिनीत ‘शिवप्रदेश’ असे संबोधतो. या शिवभूमीचे आजचे चित्र बदलत गेले आहे. ते किती नैसर्गिक राहिले, किती सरकारी यत्नांनी, किती बाह्य परिणामांनी आणि किती प्रबोधिनीच्या प्रयत्नांनी, याचा सम्यक् आढावा घ्यायला गेल्यास काय दिसते?
शिवापूर यंत्रशाळा स्थापनेचे दशक :
१९६० ते ७० च्या दशकात, प्रबोधिनीच्या स्थापनापर्यंत पहिली पाच वर्षे प्रबोधिनी या मावळ भागाचा परिचय करवून घेणे एवढी मर्यादित भूमिका बाळगून होती. १९६२ च्या चिनी आक्रमण प्रसंगात मी प्रथमच या आक्रमणाचा इतिहास गावकऱ्यांना सांगणारी भाषणे पाच गावी दिली. त्यात नकाशे मांडून, भर चौकात गर्दी जमवून लोकांना माहिती देण्याच्या माझ्या प्रयत्नांना जो प्रतिसाद मिळाला तो १० वीत शिकणाऱ्या मुलाच्या दृष्टीने अगदी विशेषच होता. हे सारे खेड्यात सांगून उपयोग काय? असा प्रश्न मला पडला नाही. एवढेच कळले, की या गावांशी आपली नाळ जोडलेली आहे आणि ती तशीच राहणार. याच काळात आप्पांच्या काही सहकाऱ्यांनी आमच्या कल्याण गावी जाऊन वृक्षारोपण केले होते. ६६ साली कल्याण गावी श्रमदानाने शौचालय बांधणी करून खरे तर आपण ग्रामविकासाचा श्रीगणेशा केला. त्याच काळात आप्पांनी बौद्धवस्तीत गावकऱ्यांसह चहापानाचा कार्यक्रम व भजन केले. या आरंभीच्या उपक्रमानंतर १९६९ साली ‘फ्रेंडस् ऑफ् फ्रान्स’च्या संपर्कातून पॅट्रिक फ्ल्युकोटो या फ्रेंच तरुणाने कल्याण गावाच्या बाह्यांगी विकासासाठी मोठी देणगी दिल्यावर त्यातून ग्रामहिताचे काय काम करता येईल याचे खऱ्या अर्थाने चिंतन व आखणीचे काम सुरू झाले. यात शेतीचे आधुनिकीकरण, गावासाठीचा रस्ता, पाणी, शाळा इ. मूलभूत सुविधांची निर्मिती आणि पोल्ट्री, रासायनिक खते वाटप यासारखे रोजगार निर्मितीचे काम अशी रचना करण्यात आली. यात आकस्मिक उपलब्ध झालेल्या सोयीसुविधांमुळे गावात भारलेले, एकोप्याचे व कुतूहलाचे वातावरण होते. कल्याण गावी पाणी साठवण बंधाऱ्याचे ठसठशीत काम +गावकऱ्यांच्या श्रमसहभागातून आकाराला आले. आज चाळीसहून अधिक वर्षे हा बंधारा गावाचा भरवशाचा पाणोठा म्हणून उपयोगात आहे. विशेष म्हणजे शासनाच्या मदतीने या बंधाऱ्याचे नुकतेच नूतनीकरण झाले असून, तो अजून ४० वर्षे निर्विघ्न वापरात राहील अशी हमी देता येईल.
तेव्हापासून पाण्याच्या उपलब्धतेसाठी सामुदायिक श्रमयोगातून वा व्यक्तिगत खर्चाने विविध पर्याय उभे करणे, हे प्रबोधिनीच्या ग्रामविकास कार्याचे महत्त्वाचे अंग राहिले आहे. प्रथम सार्वजनिक विहिरी, मग सिंचनासाठीच्या खाजागी विहिरी, मग सिंचनासाठीच्या खाजगी विहिरी, अनेक प्रकारचे छोटे मोठे बंधारे बांधणे, बोअरवेल्स खोदणे, त्यासाठीचे हातपंप निर्मिणे, ते बसवणे, दुरुस्त करणे, पाणी पुरवठ्यासाठी डिझेलपंप पुरवणे, हे पाणी शुद्ध करणारे फिल्टर्स करणे व बसवणे अशी विविध कामे प्रबोधिनीने हाती घेतली. विहिरींना बारमाही वा हंगामी भरवशाचे पाणी लागावे म्हणून एखाद्या दऱ्याचे, पाणलोट क्षेत्राचे विकसन म्हणजे समतल चर व विविध बांध बांधणे, लिफ्ट इरिगेशन, झरे विकास, पाझर तलाव बांधणे, शेततळी बांधणे अशा प्रकारचे काम व्यावसायिक दर्जाचे तरीही लोकांना बरोबर घेऊन, कधी लाभार्थीच्या प्रत्यक्ष आर्थिक योगदानातून तर कधी विविध न्यासांच्या देणग्यातून आणि ८९ सालानंतर प्रबोधिनीने कपार्टसारख्या ग्रामोपयोगी निधिसंस्थेकडून अनुदान मिळवून क्वचित सरकारी अनुदानाने देखील केलेले आहे. यातली बहुतांश कामे ही १९६० ते १९८० या टप्प्यात प्रबोधिनीचे वैशिष्ट्य म्हणून सर्वपरिचित होती.
६०-७० च्या दशकातच ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी बिगरशेती, औद्योगिक उपक्रमांची जोड खेड्यांना देण्याचे सूत्र प्रबोधिनीच्या ध्यानात आले. त्यातूनच शिवापूरच्या यंत्रशाळेच्या अभिनव उपक्रमाचा जन्म झाला. शिवापूर या मध्यवर्ती गावी दोन-एकशे नवतरुणांना स्थायी औद्योगिक रोजगार देताना कितीतरी सामाजिक अंगांचा विचार झाला. ही सर्व मुले गावोगावची सर्वात गरीब व नवशिक्षित अशी होती. त्यातही दलित कुटुंबातून मुले निवडण्याचा विशेष आग्रह होता. त्या सर्वांना औद्योगिक नियमितता, नेमकेपणा, शिस्त नव्याने शिकवण्यात आली. यंत्रशाळेत नोकरी करणारे ‘कामगार’ असे कधीच वाटू नयेत, ते ‘सदस्य’ असावेत असा प्रयत्न होता. त्यांचे सततचे प्रबोधन, सामाजिक जाणीव जागृती यातून हे सारे ग्रामपरिवर्तनाचे कार्यकर्ते व्हावेत अशी दृष्टी होती. त्यांनी श्रमदानाने ग्रामकार्ये केली; व्यसनमुक्तीची चळवळ चालवली, आरोग्य चळवळीत भाग घेतला आणि गावोगावच्या ग्रामपंचायतीही चालवल्या. या यंत्रालयाच्या पाठोपाठ शिवापूर भागात अनेक कारखाने यावेत असा योजनापूर्वक प्रयत्न केला गेला. किमान पाच हजार स्थानिक बिगरशेती रोजगार त्यातून निर्माण व्हावेत असा प्रयत्न यशस्वी झाला. हे सारे स्थानिक तरुणांनी शहराकडे स्थलांतर करू नये आणि गावातली शेती आणि कारखानदारी दोन्ही सांभाळावीत या विकासदृष्टीने करण्यात आले. या सदस्यांनी स्वतः उद्योजक व्हावे म्हणून त्यांना उत्तेजन देण्यात आले. त्यातून अनेक लघुउद्योजक स्थिर झाले. यंत्रालय ही एक शाळाच होती. या यंत्रशाळेने दीड हजाराहून अधिक ग्रामीण तरुणांना तंत्रशिक्षण दिले व त्यांना परिसरात नव्याने येऊ घातलेल्या उद्योगात नोकऱ्या मिळाल्या.
आज बाहेरच्या रेट्याने या भागात उद्योग येत आहेत, नागरीकरणही येत आहे. अर्थात त्यामागे बाहेरच्या उद्यमी लोकांचे संधी शोधत इकडे येणे आहे. त्यात स्थानिकाच्या हिताची दृष्टी अशी अर्थातच नाही.
१९६९ साली शिवापूरची यंत्रशाळा सुरू झाली. ती सलग ३० वर्षे शिवापूर भागाचे केंद्रस्थान असल्यासारखी कार्यरत होती. पुढे १९७७ ला गुंजवणी खोऱ्यात खांडसारी साखर कारखाना करंजावणे येथे काढला, त्यातही भागाच्या विकासाच्या दृष्टीने आस्थापना केंद्रस्थानी होती.
उद्योग आणि आधुनिक शेती या दोन गोष्टींच्या जिवावर ग्रामीण वास्तव बदलण्याच्या प्रयत्नाचा शुभारंभ६०-७० च्या दशकात झाला, आणि ७०-८० च्या दशकात हा प्रयत्न अधिक विस्तृत आणि स्थिर झाला असे म्हणता येईल.
शिवगंगा खोरे विकास योजनेचे दशक :
७०-८० च्या दशकात ७२ च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जे जल व्यवस्थापनाचे प्रकल्प झाले, त्यांस आकार आला. मोठमोठे पाझर तलाव बांधण्याची, शेतीसाठी विहिरी खोदण्याची, विविध प्रकारचे बांध-बंधारे करण्याची मध्यवर्ती यंत्रणा शिवापुरात ‘शिवगंगा खोरे विकास योजना’ या नावाने उभारण्यात आली. या यंत्रणेत भाड्याने डिझेलपंप, ट्रॅक्टर, स्प्रे पंप मिळण्याची सोय होती. शेतीला अशा त-हेची यंत्रे व तंत्रे प्रथमच जोडण्यात येत होती. याच बरोबरीने गावोगावी मूलभूत आस्थापना उभारण्याचे आग्रह सुरू झाले. गावाचे जोडरस्ते व्हावेत असे आग्रहच तत्पूर्वी नव्हते. श्रमदानाने रस्ते करणे, सरकारी अनुदान असो नसो, गावची पिण्याच्या पाण्याची विहीर व्हावीच असे योजणे, गावाच्या शाळेला खोल्या बांधणे या प्रकारची कामे गावोगावी योजण्यात आली. खरे पाहता, खेड्याच्या या मूलभूत गरजांकडे शासनाचे ८० सालापूर्वी जवळजवळ पूर्ण दुर्लक्ष होते. गावकऱ्यांनीही सुविधांविना जगणे नैसर्गिकच समजले होते. प्रबोधिनीने गावोगावी ही सुविधांची भूक निर्माण केली. या सुविधा श्रमदान, लोकवर्गणी, देणग्या अथवा अनुदान यांपैकी शक्य त्या मार्गानी उभ्या करण्याची लोकचळवळ आपण आग्रहपूर्वक रुजवली.
याच दशकात अनेक गावोगावी नवतरुणांनी जाणीवपूर्वक ग्रामपंचायत सदस्य व्हावे, असा प्रयत्न झाला. खोऱ्यातील नवसदस्यांसाठी पंचप्रशिक्षण व नित्यचर्चा योजण्यात आल्या. त्यातून हळूहळू गावांमध्ये नवकल्पना रूजू लागल्या. ८० च्या टप्प्याला हरेक गावी वीज असली पाहिजे, असा आग्रह प्रत्यक्षात येऊ लागला. ती वीज रोज दिवसेंदिवस गायब असता कामा नये याचा न कंटाळता पाठपुरावा सुरू झाला. त्याशिवाय औद्योगिक रोजगार या भागात येणार नाही याची जाणीव निर्माण झाल्याने त्याचे दडपण MSEB वर निर्माण करण्यात आले.
टेलिफोन सारखी सेवा रूजावी यासाठी छोटी एक्स्चेंजेस् आग्रहपूर्वक उभी करण्यात आली. शिवापूर व नसरापूरला अशी किमान २५-३० कनेक्शन्स असलेली यंत्रणा येणे हे फार दुष्कर होते. लोकांना या गोष्टींची गरज पटवून देणे, यासाठी लोकांच्या वतीने प्रबोधिनीनेच भरणा करून किमान कनेक्शन्सची मागणी नोंदवणे अशा टप्प्यातून ही सुविधा रुळली. आज ३० वर्षानंतर हरेक कानाला मोबाइल चिकटलेला गावोगावी व रानोरानी दिसतो आहे, त्याचे मूळ अशा चिवट प्रयत्नांमध्ये आहे.
या ७०-८० च्या दशकात नवनवे शेतीविषयक प्रयोग रूजवण्याचेही प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आले. नवी पिके, नवे वाण गावोगावी पोचवणे महत्त्वाचे होते. गहू व भाताच्या नव्या जातीची बियाणी लोकांपर्यंत जायला हवीत; त्यासाठी रासायनिक खते वापरायची सवय लोकांना व्हावी यासाठी शिवापूरला असे पुरवठा केंद्र अनेक वर्षे चालवण्यात आले. आज या गोष्टी व्यवसाय स्वरूपात रुळल्या आहेत, पण तेव्हा यांचा प्रचार करावा लागत असे. खते, कीटकनाशके यांचा गावोगावी वापर त्या टप्प्यात सुरू झाला. ७६-७७नंतर ऊसपिकाच्या बाबतीत जाणीवपूर्वक उत्पादनवाढीचे प्रयत्न झाले.
याच दशकात जीवनशैलीतील बदलासाठीचे नमुना प्रयत्न सुरू होते. बिनधुराच्या चुली गावोगावी उभारण्यात आल्या. गोबरगॅसचा आणि त्याला जोडलेल्या शौचालयांचा प्रसार करणे, हे या काळातच सुरू झाले. मुळातच लोकांची क्रयशक्ती क्षीण होती. नव्या कल्पनांसाठी भांडवल घालायला तयार होणारे लोक कमी असत. त्यातही नव्या प्रयोगातील अपयशांच्या शक्यता होत्या व त्यामुळे प्रत्येक गावात कोणा एका प्रयोगी शेतकऱ्याकडे तरी नमुन्याची नवी गोष्ट असावी, असा हा प्रयत्न होता. या सगळ्या बदलांचे लक्ष्य घराघरातील ग्रामीण स्त्री हेच असे. तरीही या काळात निखळ स्त्रियांसाठीचे उपक्रम सुरू झाले नव्हते असेच म्हणावे लागेल.
या दशकात आपले ग्रामविकास उपक्रम पलीकडच्या गुंजवणी नदीच्या खोऱ्यात पसरू लागले. ७६ साली राजगड परिसरातील १८ गावांना जोडणारा गुंजवणीवरील साखर गावचा पूल एक आह्वान म्हणून स्वीकारून आपण बांधला. या अंतर्भागात कंत्राटदार येत नसत म्हणून जिल्हा परिषदेने प्रबोधिनीला हे आवाहन केले. कुठलाही अनुभव पाठीशी नसताना हे काम आपण जिद्दीने पुरे केले. यात लोकसहभाग आणि शासकीय असहकार असे दोन्ही अनुभव घेत नुकसान सोसून आपण काम पूर्ण केले. याच काळात म्हणजे ७७-८१ या काळात करंजावण्यास खांडसारी साखर कारखाना चालवला. इथेही रोजगार व शेतीविकास ही दृष्टी ठेवून आपण अनुभव नसताना त्यात उतरलो. विलक्षण मेहनत केली, पण औद्योगिक अनुभव कमी पडल्याने प्रयोग आटोपता घ्यावा लागला, नुकसान सोसावे लागले. एखाद्या संपूर्ण भागाच्या हितासाठी असे स्वयंसेवी प्रयत्न प्रसंगी अपयश व नुकसान सोसून करीत राहणे, यात एक वेगळी बांधिलकी दिसते. आज उभे राहिलेले चापेटचे धरण व्हावे म्हणून त्यावेळी आपण बळकट लोकाग्रह उभा केला होता तोही याच दृष्टीतून. मांगदरी-शिवापूर रस्त्यासाठी व गुंजवणीवरील १३ बंधाऱ्यांसाठी अशीच लोकजागृती आपल्या कार्यकर्त्यांनी केली. अशा कल्पना त्यावेळी असंभव आणि स्वप्नाळू वाटत असतात. पण ज्यांना उद्याची दृष्टी असते त्यांनी हताश न होता असे आग्रह लावून धरावे लागतात, तेव्हाच कधीतरी वीस एक वर्षांनी या कल्पना प्रत्यक्षात उतरत असतात.
दारूबंदी आंदोलनाचे व चळवळीचे दशक :
८०-९० चे तिसरे दशक ग्रामविकास कार्याच्या मध्यन्तराचे दशक म्हणता येईल. याकाळात शिवगंगा खोरे विकास योजनेकडील बोअरवेल रिग्ज, ट्रॅक्टर्स व काँप्रेसर्स ही मशिनरी जुनी झाली होती. या भागात आता खाजगी रीतीने हे व्यवसाय सुरू झाल्याने त्याची गरजही उणावल्याने ही यंत्रणा आपण काढून टाकली. याच काळात शेतमालाला चांगला भाव मिळणे, ही बाब महत्त्वाची गरज म्हणून पुढे आली. त्याला प्रतिसाद म्हणून आपण आपल्या भागातील प्रसिद्ध आंबेमोहोर तांदुळाला पुण्यात थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा अभिनव प्रयोग राबवला. अनेक वर्षे ही तांदूळपेठ आपले वैशिष्ट्य होती. गंमत म्हणजे आज २०१३ सालात अशी थेट विक्री करण्याच्या केंद्रांचा पुण्यात एक अभिनव कल्पना म्हणून बोलबाला चालू आहे ! याच काळात प्रबोधन दुग्धालयाचा उपक्रम करून ५-६ गावातील शेतकऱ्यांच्या दुधाची पुण्यात पिशवी बंद विक्री करण्याचा उपक्रम आपण ८ वर्षे चिकाटीने चालविला.
१९८८-८९ च्या टप्प्याला प्रथमच प्रबोधिनीने शासकीय विकासनिधी घेऊन कामे उभी करण्याचा प्रयोग सुरू केला. पाणलोट क्षेत्र विकासाकरिता कपार्टचा निधी घेऊन आपण आपल्या पद्धतीने कामे उभारली एखाद्या दऱ्याचे काम, एखादया शिवाराचे काम यापेक्षा संपूर्ण खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र बांधणीचे काम करण्याची योजना यातून पुढे आकाराला आली.
सुप्रसिद्ध दारूबंदीची चळवळ ही या दशकातली, अपूर्व यशाची लोकचळवळ आपण उभी केली. उदारीकरण, शहरीकरण, औद्योगीकरण या सर्वांचा अपरिहार्य परिणाम म्हणून बेफाम नशेबाजी खेडोपाडी पसरू लागण्याचा तो काळ होता. या चळवळीचे कार्यकर्ते आपल्या यंत्रशाळेचे सदस्य, गावोगावचे तरुण, प्रबोधिनीच्या युवती कार्यकर्त्या हे सारे होते. एकाच वेळी ११ गुन्हेगार हातभट्ट्या उद्ध्वस्त करणे आणि चार लायसेन्स देशी दारूची दुकाने बंद करण्यासाठीची लोकचळवळ उभी करणे हे काम आपण केले. समृद्धीच्या निर्मितीचे कार्यकर्ते हे समृद्धीची व्यसनी लूट थांबवण्याच्या लढाईचे स्वयंसैनिक होण्याचा हा महत्त्वाचा प्रयोग झाला तोही याच काळात. आज दारू अशीच मोकाट आहे पण आपण मात्र व्यसनमुक्तीचा ध्यास सोडून दिल्यासारखे झाले आहे ही खंत आहे.
पाणलोट क्षेत्र विकास कामांच्या पथदर्शी प्रकल्पांचे दशक :
१९९० पासून २००० सालापर्यंतचे दशक प्रबोधिनीच्या ग्रामविकास कार्याला नवे आयाम मिळवून देणारे शिस्तशीर अखंड प्रयत्नांचे दशक होय. या कालखंडात पाणलोट क्षेत्रविकासाचे नमुनेदार काम उभे राहिले. दुसरीकडे आपल्या सर्वंकष आरोग्य योजनेने कुष्ठरोग निर्मूलनाचे नमुनेदार, व्यापक काम करीत दोन लक्ष लोकसंख्येला गवसणी घालीत एक पथदर्शी प्रकल्प सिद्ध करून दाखवला. १९-२० वर्षे एक योजना सातत्याने चालवली की मोजता येण्यासारखे, स्पष्ट, इष्ट परिणाम दिसतात हेच चार तालुक्यातील २८६ गावात दिसून आले. कृषितांत्रिक विद्यालयाचा वीस वर्षांतील तंत्रशिक्षणाचा उपक्रम सुमारे १५०० विद्यार्थ्यांना नवे उपजीविका साधन देऊ शकतो हे दिसून आले. तथापि, हा उपक्रम मोठा प्रतिसाद का मिळवू शकत नाही याचा विचार व्हायला हवा. समाजात व्हाइटकॉलर जॉब्स भाव खाऊन आहेत आणि नाइलाज असल्याशिवाय हस्तकौशल्य, श्रम याचा आधार घ्यायला समाज तयार नाही असा याचा अर्थ आहे.
विस्ताराचे व स्त्री शक्ती प्रबोधनाचे दशक :
२००० ते २०१० या दशकात प्राधान्याने ग्रामविकास उपक्रम अधिक दुर्लक्षित भागांकडे आणि घटकांकडे वळले. म्हणजे शिवापूर भागांचे औद्योगीकरण व नागरीकरण झाल्याने तिथले भौतिक विकासाचे कार्यक्रम पलीकडच्या अविकसित गुंजवणी खोरे, तोरण्यापलीकडची दुर्गम खेडी इकडे वळले. तोरण्याच्या पायथ्याशी वेल्ह्यात स्थायी केंद्र झाले आणि तिथून दूरवर संपर्क आणि कार्यकर्त्यांची साखळी उभी करण्यात आली. उपक्रमांमध्ये विविधता आली. छोटे छोटे तंत्रप्रशिक्षण वर्ग आणि उपक्रम आले. उदा. बांबू प्रक्रिया, जैवशेती, सुजल फिल्टर, युरिया गोळ्यांचे उत्पादन, चारसूत्री भातशेती इ. तिकडे मावळ तालुक्यात साळुंब्रे येथे आणि उस्मानाबादेत हराळीला शेती व शेतकरी केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक रचना उभ्या राहिल्या. पुणे जिल्ह्याबाहेरही रत्नागिरी, नंदूरबार, अंबाजोगाई येथे शेती, शेतकरी, गावकरी यांच्यासाठीचे प्रासंगिक व स्थायी उपक्रम उभे राहिले. २००६ सालचा जलस्वराज्य प्रकल्प हिंगोली आणि वाशिम येथे झाला. शासनाच्या अधाशी कर्मचाऱ्यांशी आपली नाळ जुळणे नाही आणि म्हणून शासकीय योजनांमध्ये विशेष काही करून दाखवण्याला मर्यादा येणार असे दिसते. म्हणजेच थोडक्यात या देशाचे रूप पालटण्याचा ध्यास शासनेतर मार्गांनीच सांभाळावा लागणार की काय, अशी कटू जाणीव यातून झाली.
या दशकातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची उपलब्धी म्हणजे ग्रामीण महिला उपक्रमांना येत असलेले यश. यापूर्वीच्या दशकात आपण दारूबंदीच्या निमित्ताने महिलांमध्ये काम केले होते. त्यातूनच सुचलेली महिला संघटनाची उभारणी प्रबोधिनीच्या युवती कार्यकर्त्यांनी इतक्या प्रभावी आणि अभिनव पद्धतीने केली की एखाद्या संघटित व सातत्यपूर्ण उपक्रमातून समाज बदलतो म्हणजे काय याचे ते प्रात्यक्षिकच ठरावे. निरक्षर बुजऱ्या मावळी महिला या शिस्तशीर उद्योजिका बनून लाखांचे व्यवहार सफाईने करताना पाहणे; त्यांना गावकीच्या व्यवहारातही मानाचे स्थान लाभू शकते हे पाहणे आणि कुटुंबाचा आधार बनणारी ग्रामीण महिला पाहणे हा खरोखरीच भाग्ययोग आहे. किशोरी विकास आणि महिला बचतगटाच्या माध्यमातून होणारी कामे ही एक अदृश्य सामाजिक क्रांतीच आहे.
या पाच दशकातून ग्रामविकासाच्या तंत्र आणि कल्पनांमध्ये काही सातत्य व काही नावीन्य याचा उत्तम मेळ दिसून येतो. भौतिक सुविधा, पोटापाण्याचे उद्योग, शेती, औद्योगिक रोजगार मिळवून देण्याची धडपड, गाव हे घटक धरून करण्याने सुरूवात झाली. अख्ख्या गावाला या यत्नात समाविष्ट करण्याची आपली पद्धत राहिली. सुट्या, वैयक्तिक लाभाच्या फार थोड्या योजना आपण केल्या. सामूहिकतेला आवाहन करण्याचे अवघड तंत्र आपण अंगीकारले. यातूनच पुढे नदीच्या संपूर्ण खोऱ्याच्या हिताचा विचार मनी धरून मध्यवर्ती योजना करीत गेलो. त्यातूनच सर्वव्यापी वातावरण तयार होते. उदाहरणार्थ, ८० च्या दशकात संपूर्ण शिवापूर खोऱ्याची गणेशविसर्जन मिरवणूक आपण शिवापूरला घ्यायचो किंवा दारूच्या लायसन्सविरोधात ११ गावातल्या हरिजन वस्त्यांनी आणि २१ ग्रामपंचायतींनी ठराव व चळवळ केली. चापेटचे धरण व्हावे म्हणून संपूर्ण वेल्हा नसरापूर पट्टा एक झाला. किंवा साखरचा पूल व्हावा यासाठी १८ गावातील कार्यकर्ते आमदार व कलेक्टरला भेटीला गेले. दारूबंदीचा महामोर्चा कलेक्टर कचेरीवर गेला त्यात सर्व गावांची पथके होती. मुळात प्रबोधिनीने जी. बी. मोडक या निवृत्त अधिकाऱ्याच्या मदतीने दोन्ही खोऱ्यांची एकत्रित विकास योजना मांडली होती किंवा कै. आप्पांनी १९८२ साली ग्रामविकासाची दहा कलमी योजना सर्वांसमोर ठेवली होती. संपूर्ण शिवभूमीचा विचार हाच अलीकडे आपण पाणलोट क्षेत्राच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत केला.
भौतिक प्रगतीच्या पुढे जाऊन आता माणसाच्या क्षमता वाढाव्यात आणि त्यांच्या सामूहिकतेला अनुकूल मनोवृत्ती निर्माण व्हावी यासाठीचे उपक्रम आपण योजीत आहो. सरकारी, भांडवली गुंतवणुकीतून एखादा भागच्या भाग रूपांतरित होऊ शकेल, पण तिथली माणसे तशीच अडाणी, भांडखोर, अंधश्रद्ध राहू शकतील. तेव्हा खरे काम माणूस बदलण्याचे आहे व ते सरकारला जमणारे नाही.
पुढे काय ?
पुण्यासारख्या फोफावणाऱ्या महानगराच्या ५० किलोमीटर परिघातले प्रत्येक खेडे सुजलेले, पोकळ, चेहरा हरवलेले, शहरग्रस्त होत चालले आहे हे वास्तव आहे. इथला सर्व समाज शेतीशी फारकत घेण्याच्या मन:स्थितीत आहे. शहरी नोकरीधंद्यामुळे इथले दारिद्र्य उणावते आहे. जमिनींना भारी भाव येत असल्याने अनेकांजवळ कर्तबगारीविना संपत्ती येऊ लागली आहे. नव्या रासवट श्रीमंतांच्या झंडी आता गावावर कब्जा करून आहेत.
संपूर्ण शिवगंगा खोऱ्यातून शेतातही सुपीक माती वीटभट्टीतून भाजली जाऊन कायमसाठी वांझ बनत पुणे शहर व परिसरातील इमारतींसाठी विकली जात आहे. हिरव्या दन्यांमध्ये खडी मशीन्सचा धुरळा पसरतो आहे. आपल्या अनेक गावांत आता ओनरशिपची जंगले उभी राहू लागली आहेत. आपले डोंगर शहरी श्रीमंतांची दुय्यम चैनघरे बनत आहेत. पुण्यालगतच्या धनकवडी वडगाव, धायरी, वारजे गावांचे अस्तित्व पार हरवले तसे आपल्या कुठकुठच्या लोकांचे ओनरशिप चाळीतील लोंढे हेच बहुसंख्य होणार आहेत.
कष्टाने, शिक्षणाने आपले जीवनमान बदलण्याची गरजच उरली नसल्याने गावोगावी गुन्हेगार टोळ्या उभ्या राहत असून त्यात आपले पोर जाऊ नये यासाठी काय करावे हे कळेनासे झाले आहे. बांदल, चोरघे, शिळीमकर, मोहोळ, मारणे, बोडके ही ऐतिहासिक मावळी नावं आता सुपारीबाज गुन्ह्यांसाठी नावाजली जात आहेत.
आपल्या भागातून सुसाट धावणा-या महामार्गाभवती पाच-पाच इंजिनियरिंग, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स झाल्यात, त्यात आमचे पोर कुठे नाही. आमच्या शेतकरी तरुणाला नवरी द्यायला कुणी तयार नाही. जागोजागी लॉन, कार्यालये उभी राहिलीत, त्यात उधळमाधळीची कंत्राटी चैनबाजीची लग्ने करावी लागत आहेत व या लग्नात वधूवरांपेक्षा फेटेबाज पुढाऱ्यांचे मान मरातब महत्त्वाचे ठरत आहेत. जमिनी विकून भारी लग्ने, भारी घरे बांधणारे गावकरी आता नावालाच गावकरी राहिले आहेत. हरेक गावातून शे-दोनशे पोरे पुण्यात स्थलांतरित झाली.
गावागावात दुपारी हिंडावे तर कुलूपबंद घरे पाहावी लागतात व कुठेकुठे खुडूक म्हातारे खोकत बसलेले दिसत आहेत. गावाच्या पोटातले रस्ते काँक्रिटचे झालेत, गावापर्यंत बसेस येतात, नळयोजना झाल्यात क्वचित घरोघरी संडास झालेत, हरेक गावातली मंदिरे जीर्णोद्धारानंतर चमकत आहेत व सप्ताह जोरात आहेत. पण हा देखावा वरवरचा आहे. खरी गर्दी फाट्यावरल्या धाब्यावर मटणे झोडणाऱ्या पुढाऱ्यांची आहे. त्यात गावोगावच्या जमिनी हडपणाऱ्या सातबाराच्या एजंटांची चलती आहे. प्रत्येक गावाबाहेर प्लॅस्टिक पत्रावळ्यांचा ढिगारा आणि अक्षय कचऱ्याचे डोंगर उभे आहेत. गावागावातील शाळांमध्ये जेमतेम पटसंख्या आहे, कारण पुढाऱ्यांची पोरे पुण्यात पळत आहेत.
त्यात पश्चिमेला कल्याणपासून पूर्वेस वेळूपर्यंत जाणारा संकलित रिंगरोड या गावातून हजार फूट रुंदीची नाळ काढणार या एका बातमीने एजंटांची अंगे शहारली असून दीडदोन लाख रुपये गुंठ्यावर जमीनभाव सहजच गेले आहेत. त्यामुळे जमीन वाटपांचे वाद, फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आपले गावपुढारी शेतात किती जातात आणि सफेद कपडे घालून व सोनसाखळ्या घालून किती मिरवतात हे मोजले पाहिजे. यांच्याच जिवावर गावचे राजकारण चालत असले की सावकारी, गुंडगिरी, जमीन हडपणे या साऱ्याला अभय मिळणार हे उघड आहे, यामुळे गावागावातून उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण घेणारी मुले कशी निपजणार? मेहनती, कल्पक शेतकरी, धोरणी उद्योजक याच गावातून कसे निर्माण होणार हा प्रश्न आहे.
या सर्व निराशाजनक परिस्थितीचे मूळ बेफाम शहरीकरणात आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या निर्लज्ज चंगळवादात आहे.
त्यामुळे आता यापुढे ग्रामविकासाचा भर भौतिक भरभराटीकडून माणसाला समंजस, शहाणा करण्याकडे वळवायला हवा. कल्पक आधुनिक शेती करून, छोटेमोठे उत्पादक उद्योग चालवून, चिवट व्यापारउदीम करून अथवा आधुनिक उच्च शिक्षण घेऊन जे धन मिळेल त्यात समाधानाने राहायला शिकवण्याकडे भर द्यायला हवा. संपत्ती झऱ्यासारखी हवी, पुरासारखी नको हे शिकवायला हवे. टी.व्ही. तीली चकाकी खोटी आहे, आपली धट्टीकट्टी गावकी व भावकीच खरी हे सांगायला हवे. नव्या तंत्रसमृद्ध, विज्ञानवादी जीवनशैलीचा प्रसार-प्रचार करून भंपक अंधश्रद्धा मोडायला हव्यात. समता, स्वातंत्र्य, माणुसकीचा आग्रह धरायला हवा. स्त्रियांना संधी, शिक्षण, मोकळीक व सन्मान देण्याचा आग्रह धरायला हवा.
अशा तन्हेने काय घडायला हवे याचा विचार आधी मांडून मग त्यादृष्टीने उपक्रम योजायला हवेत. उपलब्ध माणूसबळ, संसाधने व साहाय्य यावर उपक्रमांचा आवाका व वेग ठरेल. इथल्या माणसांबद्दलचा जिव्हाळा आणि उत्तम उद्याची सुखस्वप्ने हा गेल्या पन्नास वर्षांच्या कामाचा वारसा हाती आहे. या देशाचे रूप पालटण्याइतकीच या शिवप्रदेशाचे अंतःकरण पालटण्याचे वेड यापुढची वाटचाल ठरवील.
ज्याने गावचि देव मानिला । सेवाकार्याचा मंत्र जपला ।
त्याचाचि असावा बोलबाला । गावामाजी आपुल्या ।। (ग्रामगीता : ३९-११०)
ग्रामसुधारणेचा मूलमंत्र । सज्जनांनी व्हावे एकत्र ।
संघटना हेचि शक्तीचे सूत्र । ग्रामराज्य निर्माण करी ।। (ग्रामगीता : ११-१७)
ग्रामराज्यचि रामराज्य । स्वावलंबन हेचि स्वराज्य ।
बोलिले महात्मा विश्वपूज्य । विकास त्याचा सुंदर हा ।। (ग्रामगीता : ३९-१२५)
***********************************************************************************************