स्त्री शक्ती प्रबोधन

भाजी-विक्री, एक मदतकार्य !

आभाळात मान्सून पूर्व ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा आला. दोन दिवस उन्हाने तापलेल्या वातावरणात एकदम सुखकर फरक पडला तेवढ्यात कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई पाउस येणार असे दिसतंय! नुकताच काढलेला कांदा शेतात चांगला वाळला आहे पावसाने भिजला तर आज २०-२५ रुपयाने जाणाऱ्या कांद्याला किलोला २ रुपये सुद्धा मिळणार नाहीत! काही तरी करा आणि कांदा लवकर म्हणजे उद्याच विकता येईल असे बघा!’ मी नेमकी अडचण समजावी म्हणून विचारले की ‘किती आहे?’ त्या म्हणाल्या, ‘फार नाही ५० किलोची १०० पोती तरी भरतील!’ …. एकीला मदत करायची तर ५००० किलो… ५००० किलो नुसता विचारही मला झेपेना. पण काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं. कावेरीताईंनी मला एकटीला नाही तर अनेक ताईंना फोन केले होते. सगळ्यांनी एकत्र बोलून मदत करायचे ठरवले! गटातल्या वंदनाताईंनी पुढाकार घेतला. एरवी त्रास वाटणारी प्रसार माध्यमे या वेळी कामी आली आणि कांदे विक्रीचा निरोप झपाट्याने फिरला. पुण्यात ३५ रुपये किलो कांदे मिळत असताना गावात १०रु ने विकला जात होता. म्हणून १८ रु किलो असा विक्रीचा भाव ठरवला पण किमान ५ किलो तरी घ्यायचा असं ठरवलं आणि म्हणता म्हणता १००० किलोच्या ऑर्डर बुक झाल्या आणि दुसऱ्या दिवशी वाटप करायचे ठरवून कावेरीताईंची मुले छोटा टेम्पो घेउन पुण्यात आलीही. वंदनाताईंनी कसं कुठून जायचे हे सांगितले आणि ग्राहकांना कुठे थांबा हेही सांगितले. तसे घडले आणि कांदा बघून लोकांनी ‘अजून द्या’ ‘अजून द्या’ अशी मागणी केली, ती अर्थातच पूर्णही झाली आणि एका दिवसात व्हॉटस अॅप कृपेने एका दिवसात १५००किलो कांदा विकला गेला.  लॉकडाउनमुळे सगळे घरात होते रोजचे भाजीवाले येत नव्हते त्यामुळे कांदा विक्रीला उदंड प्रतिसाद मिळाला. घेणारा आणि विकणारा दिघेही खुश झाले. घेणाऱ्याची गरज भागताना कमी दरात कांदा मिळाला आणि शेतकऱ्याला मदत झाली असे समाधान मिळाले तर विकणाऱ्याला चार पैसे जास्त मिळाले, कटकट न करता समाधानाने कांदे घेणारे ग्राहक मिळाले, रोख पैसे लगेच हातात आले. पाउस लागायच्या आत कांद्याचे पैसे झाले. सगळा खर्च निघाल्याचे समाधानहे त्या सोबत मिळाले! संध्याकाळी कावेरीताईंचा फोन आला, ‘ताई, कांदा करताना झालेला सर्व खर्च भरून आला. कालच्या फेरीत मुलांनी काही कांदा हॉटेलला विकला, काही भाजीवाल्यांनी ऑर्डर दिल्या. उद्या पुन्हा फेरी केली की संपेल सारं. बर वाटलं लोकांनी कांदा घेतला तेव्हा कोणी जेवण दिले तर कोणी उन्हाचे गार पाणी दिले, तर कोणी सरबत भरून बाटली दिली… सन्मानाने विक्री झाली! फार बर वाटलं. कांद्यामुळे नवीन कर्ज होणार नाही… आधीच लॉकडाउन त्याला चांगला आधार मिळाला!’ एरवी वर्तमान पत्रात बातमी वाचतो ‘अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान’ म्हणजे काय हे कांदा घेणाऱ्या प्रत्येकाला थोडं तरी कळलं! ….प्रश्न सगळ्यांना होता आताकुठे एकीचा प्रश्न मार्गी लागला! तो पर्यत प्रबोधिनीने कांदा विकला ही ‘बातमी’ पुण्यात आणि बचत गट घेत आहोत त्या गावात पसरली. मग काय भारतीताईला फोन आले, ‘ताई आमची भाजी विकायची आहे. करोनामुळे बाजार बंद आहेत म्हणून शेतात गुर सोडायची का? असा प्रश्न आहे. देउ का पाठवून?’ आशाताईना फळवाले म्हणाले आमचे अंजीर, चिक्कू पण घ्याकी…. घेत असलात तरच तोडा करतो नाहीतर पक्षी येतीलच की…. मग कार्यकर्त्यांना स्वस्थ बसवेना, आशाताई म्हणाल्या मीच जाते कांद्याच्या टेम्पोत भाजी-फळे घेउन …. तोवर भारतीताईंनी एका अपार्टमेंटमध्ये स्टॉल ठरवला आणि दुसरे दिवशी २ गाड्या भाजी, कांदे घेउन निघाल्या. एक स्टॉल लागला त्यावर फक्त भाजीच विकली. सोसायटीतल्या पदाधिकाऱ्यांनी वजन करायला सुद्धा मदत केली. तीन तासात १५० किलोपेक्षा जास्त विक्री केली. तर कांद्याचा टेम्पो आज भाजी घेउन मागणी पुरवत पुणेभर फिरला त्याने ४०० किलो पेक्षा जास्त विक्री केली सकाळी ७ वाजता निघालेली गाडी शेवटची भाजी रात्री ९,३० वाजता देउन गावी परतली. दिवस भरात एकूण ५५६ किलो भाजी व १२०० किलो कांदे विकून झाले! वर्तमानपत्रे चालू नसली तरी आपल्या या उपक्रमाचा दोन दिवसात वाऱ्याच्या गतीने पुण्यात आणि गावात प्रसार झाला. देणारे आणि घेणारे दोघेही आग्रह करत होते. आता रचना बसवण्याची गरज वाटायला लागली. आधी मागणी नोंदवायची१ त्या प्रमाणे शेतकऱ्याला भाजी मागणी प्रमाणे काढायला२ सांगायची, गावागावातून गोळा करायची३. आणि पुणेभर वितरण करायचे४ …. कामेही त्याच क्रमाने करायची, तसे काही सोपे नव्हते, कारण लॉकडाउन चालू होते. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. गावातला टेम्पो भाजी घेउन बाहेर पडायला परवानगी लागतं होती, त्यामुळे आपल्या वाहनाला ‘अत्यावश्यक सेवा’ परवाना काढायचा, वितरकांनी करोना काळजी घेत सारे करायचे आणि काही शे किलो भाजी व फळे असे नाशवंत सामान मागणी केलेल्या व्यक्तींपर्यंत पोचवायचे ठरवले.  मग प्रबोधीनीय कार्यकर्ते कामालाच लागले! मागणी नोंदवण्यासाठी अॅप बनवले गेले. व्हॉटस अॅपने प्रचार सुरु झाला. सिंहगड रोड, सातारा रोड, कोथरूड, गावभाग असे व्हॉटस अॅपचे गट केले म्हणता म्हणता एकेका गटात २५७ सभासद होउन गट पूर्ण झाले, मग दुसरा गट असे एकूण ७ गट तयार केले. साधारण १३००+ सभासद गटात सहभागी झाले. भरपूर मागणी नोंदवली गेली.  आता मात्र पुरवठ्याची रचना अपुरी पडणार का काय असे वाटायला लागले. युद्धपातळीवर कामाला सुरुवात झाली. मागणी नुसार विभागवार पुणे शहरात भाजी वितारण करण्यासाठी रस्ते माहिती असणारे युवक, युवक विभागाने शोधून कामाला लावले तर ग्रामीण महिलांनी भाजी-फळे मिळवून वजन करून क्रेटमध्ये बसतील असे पाहिले. वांगी, दुधी, टॅमाटो, भेंडी असा कीट तयार करणे चिक्कू, अंजीर अर्धा एक किलोत पॅकिंग करणे असे ५००-५५० किलोचे पॅकिंग एकेका दिवशी सुरु झाले. हे चालू काम जे लांबून बघत होते ते सुद्धा उत्साहाने मदतीला धाउन आले. मनुष्यशक्ती कामाला लावायची पण करोना लॉकडाउनचे सर्व नियम पाळून, त्यामुळे गाडीत डिलिव्हरी द्यायला जातानाही दोन पेक्षा जास्त जणांनी एकत्र बसायचे नाही, मास्क हवेत हे सारे केले.  काम सुरु झाल्यावर प्रश्नही सुरु झाले. पहिल्या दिवशी सारे प्लॅस्टिक पिशवीत भरले तर दुसऱ्या दिवशी भाजी भरायला पिशव्याच नव्हत्या, दुकाने बंद त्यामुळे मिळणारही नव्हत्या, असे लक्षात आले मग रद्दी गोळा केली, त्याच्या पिशव्या तयार केल्या अगदी स्टेपलरच्या पिना संपल्या लॉकडाउनमुले त्याही मिळणार नाहीत मग पिशव्या पुरवायची जबाबदारी युवती विभागाने सांभाळली. कागदी पिशव्यात फळे भरली, भाजीसाठी कापडी पिशव्या वापरल्या पण त्याही खूप नव्हत्या एकीकडे गावात निरोप देउन त्याचे उत्पादन सुरु केले, तर ग्राहकांना सांगितले की भाजी घ्यायला येताना पिशवी घेउन या पिशवीत भाजी ओतून घ्या. कापडी पिशवी हवी असेल तर वर १० रुपये द्यावे लागतील पण पिशवी परत केलीत तर हवी आहे. ग्राहकांनी साथ दिली बहुतेक पिशव्या परत आल्या.  ग्राहकांनी फक्त मागणी देउन मदत केली असं नाही तर युवक गट भाजी वाटप करताना ‘भाजी’च्या वेळेला म्हणजे सकाळी-संध्याकाळी पोचला असे झाले नाही, कधी ऐन दुपारी सुद्धा पोचला तरी फोनवर बोलणे झाल्या प्रमाणे ठरलेल्या ठिकाणी बहुतेक जण आले. पोलिसांनी रस्ते बंद केले असताना मोकळे रस्ते शोधत एखाद्या पत्याच्या जवळपास जाणे सुद्धा लॉकडाउनमध्ये सोपे नव्हते. त्यामुळे कधी वेळ पुढेमागे झाली तर कधी एखादी मागणी केलेली भाजी एवढ्या डिलिव्हरी करताना पुढेमागे झाली तरी कोणी तक्रार केली नाही. हे ग्राहकांचे सहकार्य खूप महत्वाचे होते. भाजी-फळे वितरण करताना ज्याला डिलिव्हरी द्यायची त्याचा फोन लागला नाही म्हणून जर एखाद्या घरी जावे

भाजी-विक्री, एक मदतकार्य ! Read More »

मागे वळून बघताना १९ – करोना.. मदत करताना….. 

वेल्ह्यात एकूणातच आरोग्याची ऐशी-तैशी आहे. त्यातही महिलाच्या आरोग्याला कोणी वालीच नाही म्हणून गेली २५ वर्ष आपण वेल्हे तालुक्यात खपून काम करत आहोत. डॉक्टरांपेक्षाही जाणीव जागृतीचीच गरज जास्त आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात येत होतं म्हणून 2020 मध्ये कामाच्या पंचविशी निमित्ताने महिला दिनाला ‘आरोग्य दौड’ काढली.. ६ ते ७२ या वयातल्या ८९० जणी ६३ गावातून सहभागी झाल्या होत्या. विंझर ते वेल्हे असे १० किमी अंतर पळून अनेकींनी पार केले त्यात अनेक जणी नउवारी साडीतल्याही होत्या. ….. या कार्यक्रमाला गावागावातून बायकांना दौडला घेउन आलेल्या वाहन चालकांचा अजून हिशोबही पूर्ण झाला नव्हता तेवढ्यात करोना संकट आले…  अचानक आलेल्या संकटात आधी स्वतःला सावरायचे मग इतरांना मदत करायची तसे झाले. हे करोना संकट इतके अचानक आले की स्वतःला सावरण्यात थोडा वेळ गेला कारण पुणे-मुंबई या मोठ्ठ्या शहरात लॉकडाउन केल्यावर पोटासाठी तिथे स्थलांतरीत झालेली गावातली मुले म्हणजे पुरुष मंडळी आपापल्या गावी घरी दीर्घ मुक्कामासाठी बायका-पोरांसह परतली होती. गावाची लोकसंख्या सात-आठशे असताना अचानक त्यात दोन-अडीचशेने त्यात एकदम वाढ झाली …… स्थानिक किराणा मालाच्या दुकानदाराचे साहित्यच संपले… असेही झाले. यामुळे करोनाचे गांभीर्य गावागावातच काय पण घराघरात पोचले. स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण विभागातल्य सर्व जणी फोनवर संपर्क करत होत्या. रोज झूमवर मिटिंग होत होती त्यामुळे ग्रामीण भागातली परिस्थिती समजत होती. पुण्यात एवढेच माहिती होते की फक्त ‘अत्यावश्यक सेवा’ चालू आहेत. याचा ग्रामीण अर्थ, जे फुले करणारे शेतकरी होते म्हणजे ज्यांनी झेंडूचे किंवा मोगरा, निशिगंध याचे शेत केले होते अशांचे ‘फुल बाजार बंद’ (कारण फुले अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने) नुकसान झाले. कारण फुलांसाठी पाडवा झाला नाही की रामनवमी अगदी हनुमान जयंती सुद्धा झाली नाही या उत्सवांचा पक्वान्ना बरोबरच फुलांशीही संबंध असतो! गावाकडून व्हॉट्सअप वर आलेले झेंडूच्या फुललेल्या शेताचे फोटो या काळ्या किनारीमुळे पहावत नव्हते! गावांनी ठरवून पुण्यात जाणाऱ्या गवळी लोकांना सुद्धा सांगितले ‘जीव महत्वाचा असला तर दूध घालायला जाउ नका, त्यांच्या अत्यावश्यक सेवेपेक्षा जीव महत्वाचा आहे’ रोज ६० ते ८० लिटर दूध मोटारसायकलवर येउन दूध घालणारे बंद झाले. त्यांचे दूध जवळच्या डेअरीला घातले गेले म्हणजेच लिटर मागे १५-२० रुपयाचा फटका! आता कर्ज कसे फिटणार ही वेगळीच चिंता. शासनाने हप्ता ३ महिने लांबवला तरी व्याजाचे काय? आज कोणालाच उत्तर माहित नाही. अशा कशाकशाचे समाजावर आर्थिक ताण.  जसे दूध बंदी केली तसे गावाबाहेर जाण्यास गावानेच शासनाने सांगण्याआधीच आपापली बंदी केली. भाज्या शेतात पण तोडा करून मार्केटला जाउ नका, घरच्या लागतील तेवढ्याच काढा पण पुण्याचे मार्केट नको…. पुण्यातून येताना करोना आला तर? याची भीती! अगदीच योग्य होती…. कारण सगळे काळजी घेत आहेत असे चित्र नाही…. हे टीव्ही वर सारखे दिसते आहे. तर काय…. गावात एकूणच उदासीन वातावरण आहे! तरीही थोडे सावरल्यावर गावातली कार्यकर्ती गावातच बाहेर पडली. गावात कोणाला मदतीची जास्त गरज आहे ते पहायला सुरुवात झाली. ज्यांची मुले घरी परतली नव्हती अशा किंवा ज्यांना मुलेच नव्हती अशा वयोवृध्द दांपत्यांना मदतीची गरज होती, हातावरच पोट असणाऱ्या एकल महिला; त्यांच्या कुटुंबाला मदतीची गरज होती. गावातल्या कार्यकर्तीला यादी पाठवायला सांगितली. तर म्हणता म्हणता ५० कुटुंबे झाली. तोवर पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी थोडी देणगी उभी केली. पुण्यातून प्रत्यक्ष कोणी जाउ शकणार नव्हते हे जरी नक्की असले तरी होईल तेवढे सगळे जण मदत करत होते.  एरवी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना बैठकीला गावागावातून आणायचे काम खुटवडदादा नेहमी करायचे मग त्यांना विचारले, ‘गावोगावी जाल का?’ त्यांनी आनंदाने ‘हो’ म्हंटले. नसरापूर गटातल्या महिलांनी घाउक दुकानाचा संदर्भ दिला तिथे खुटवड दादा गेले व पहिली ५० मदतीची पाकिटे बनवायला सांगितली. त्याचे e-payment केले (नोटाबंदीने सगळ्यांना e-payment करायला शिकवले त्याचा आत्ता उपयोग झाला) आणि पहिली मदत कार्याचे सामान घेउन गाडी निघाली!  शासन परवानगी लागेल हे लक्षातच आले नाही. गाडीने वेल्हे तालुक्यात प्रवेश केला आणि आंबवणे गावात पोलिसांनी गाडी अडवली. मदत कार्याचे पत्र हवे असे सांगितले मग pdf फॉर्म मधले e-पत्र व्हॉटस-अॅप वरून खुटवडदादांना पुण्यातून पाठवले. पण त्यावर शासकीय शिक्का नव्हता. हे होई पर्यंत वेळ गेला. पण स्थानिक कार्यकर्त्या निमाताई दादांना माहिती होत्या त्यांना दादांनी पोलीसांपाशी बोलावले. ‘हो हे संस्थेचे मदत कार्य आहे… सोडा की त्यांना’ निमाताई त्याच गावात रहात असल्याने पोलीस ओळखत होते…. तोवर वेल्हे कार्यालयातल्या निवासी कार्यकर्त्या प्रतिभाताई तहसील कार्ययालायात पोचल्या. नायब तहसिलदार होते. त्यांना गाडी आडवल्याचे सांगितले. त्यांनी आंबवणे गावात असलेल्या पोलिसांना खात्री करून मदत कार्याची गाडी सोडा… असे सांगितले.  पोलिसांनी खुटवडदादांना मदत घेउन जायच्या गावांची व कुटुंबाची यादी मागितली. त्यांनी त्या त्या गावच्या तलाठ्यांना फोन करून माहितीची खातर जमा करायला सांगितली मग तलाठ्यांनी सरपंचांना फोन केले, सरपंचांनी गावातल्या आपल्या कार्यकर्तीला बोलावून यादी मागितली. तिनेच ती दिली असल्याने चोख जुळली…. पुन्हा सगळे उलटे फोन झाले आणि खुटवडदादांना पोलीस म्हणाले, ‘आज सोडतो पण उद्या आलात तर शासन शिक्याचे पत्र असेल तरच सोडीन!’    हे सगळे करायला सगळं चोख होतं तरी तास गेला मग दादांनी निघताना पुन्हा कार्यकर्त्यांना फोन केले. ‘आंबवणे येथून निघालो’ सांगितले … तर त्या म्हणाल्या, ‘गावात कसे येणार रस्ता झाड पाडून आडवला आहे’, तर कोणी म्हणाले ‘दगडी टाकली आहेत आम्ही!, ….मग मात्र सांगितले ‘सगळ्यांना घेउनच मुख्य रस्त्यावर येते. तुम्ही आम्ही येईपर्यंत थांबा’ दादा पोचेपर्यंत सगळ्यांना गोळा करून तोंडाला मास्क घालून एक एक कार्यकर्ती जिच्या तिच्या फाट्यावर पोचली. गाडी आल्यावर सामान घेतले…. अगदीच ज्यांना चालताही येत नव्हते त्यांचे सामान त्यांनी स्वतःच गावापर्यंत वाहून नेले आणि प्रत्येकीला दिले. संच मोजून दिले होते. ‘कशाची मदत करायची?’ हे ठरवताना सगळ्याच बायका असल्यामुळे नेमके जिन्नस निवडले. शासन रेशन देत होती त्यात गहू तांदूळ होते. त्यामुळे तेल, मसाला, बेसन, साखर, साबण आणि मुख्य म्हणजे चहा असा शिधा आपण दिला होता. घरात बसले की दूध नसले तरी चालेल एकवेळ पण चहा हवाच! हे समजून सामान भरले. काही ठिकाणी इतरही मदत पोचली होती पण ज्यांना मदत मिळत/ मिळाली/ मिळवता आली नव्हती अशा घरात आपली मदत पोचली! पहिला दिवस खूप शिकवून संपला…. दिवस भरात फक्त ७ गावातल्या नेमक्या ५० कुटुंबांना ही मदत मिळाली. समाधान वाटले. ज्यांनी वाटप केले अशा एकीनेही स्वतःचे नाव त्या यादीत घातले नव्हते हे विशेष!  आता मदत कार्यासाठी तहसील कार्यालयातून आपल्या वाहनासाठी ‘अत्यावश्यक सेवा’ असे पत्र मिळवले. तेव्हा आपली योजना तहसीलदारांना सांगितली. त्यांनी स्थानिक नसल्यामुळे ज्यांना रेशन देता येत नाही अशा मजुरांची यादी दिली यांनाही मदत करा असे आवाहन केले. तलाठी संपर्क करतील असे सांगितले. वाटपाचा दुसरा दिवस होता. आता गाडी सोबत कार्याकर्त्याही गेल्या. सामान बरोबर आहे ना… घाऊकात घेतले म्हणून दर्जा घसरला नाही ना हे तपासले. मदत कार्य करताना गावागावाच्या वेशीवर आता खडा पहारा होता. पोलीस कुठे कुठे पुरणार? आता शासनाने शिक्षकांना कामाला लावले आहे. आपण किशोरी विकास करताना शाळेत जातो तेव्हा सारे शिक्षक आपल्या स्थानिक ताईना ओळखत होते. ‘अत्यावश्यक सेवा’ पत्र होते पण चेहेरेच ओळखीचे होते त्यामुळे कुठेही आडवणूक झाली नाही. अगदी गरजू कोण आहे… आणि राजकारणी घराशेजारी

मागे वळून बघताना १९ – करोना.. मदत करताना…..  Read More »

मागे वळून बघताना १८ – कृषी पर्यटन एक स्वयंरोजगार संधी! 

बचत गटाचं काम सुरू झालं तेव्हा बचतीची रक्कम ठरवताना चर्चा इथूनच सुरु व्हायची की बचत करणं हे जरी चांगलं असलं तरी बचतीसाठी वर्षभर रोख रक्कम आणायची कुठून? महिनाभर कष्ट केलेल्या बाईला तिच्या मिळकतीच्या एका दिवसाच्या मजूरीवर सुद्धा हक्क नसतो. त्यामुळे काहीतरी उत्पादन करून रोख पैसे मिळवणे यामधला महिलांचा सहभाग वाढवायला हवा या निमित्ताने स्वयंरोजगाराच्या कामाला सुरुवात झाली. ‘जे मला जमेल त्या वैध मार्गाने मी पैसे मिळावीन!’ असे म्हणायला ग्रामीण महिलेला खूपच हिम्मत लागते असेही लक्षात आले, म्हणून या मानसिक बदलाच्या कामाला स्वयंरोजगाराच्या निमित्ताने सुरुवात केली.    रोखीत पैसे मिळवण्यातील भीड चेपणे यावर काम करावे लागणार होते आत्मविश्वास पुरेसा नसेल तर कुठलेही काम करताना अडचणी येतात याचा प्रत्यय वारंवार यायचा. अपरिहार्यपणे करावे लागणाऱ्या कष्टाच्या कामाच्या भारामुळे ‘उद्योगी’ असायला मनाची मोकळीक नव्हती. ‘मला काही येत नाही, तुम्ही सांगा ते करण्याची माझी तयारी आहे’ असा सूर स्वयंरोजगारात फारसा उपयोगी पडत नाही म्हणून ‘तुला नक्की येतं तेच तू स्वतःच्या जबाबदारीवर करुन कमवू शकतेस’ याचा अनुभव द्यायचा ठरवावं.  २० वर्षांपूर्वी माझी मैत्रीण सुप्रिया हिने कल्पना मांडले की ‘जे काम महिला करतंच आहेत, त्याच कामाचं व्यवसायात रूपांतर केलं तर?’ या कल्पनेला वेल्ह्याची सुरेखा तयार झाली आणि पहिला ‘भात लावणी’ करायचा अनुभव देणारा पुण्यातल्या कुटुंबाच्या सहलीचा घाट सुप्रियाने यशस्वी केला. सहलीत सहभागी झालेली मुले यथेच्छ चिखलात खेळली, पावसात भिजली, धमाल केली! २० वर्षांपूर्वी अशी कल्पनाही कोणाला सूचली नव्हती ती करून दाखवली! चिखलातून चालणे किती अवघड गोष्ट आहे हे पर्यटकांना कळत होते तेव्हाच भात लावणीच्या दिवसांमध्ये रोख रक्कम हाताशी नसल्याने येणारी अडचण या पर्यटनाच्या पैशातून पूर्ण होत होती. अनेक वर्ष भात लावणीच्या दिवसांमध्ये अशा सहली आपण काढल्या आणि लाखो रुपयाची उलाढाल केली. सर्व रक्कम महिलेच्या हातात पोचली! किती रकमेची उलाढाल हे माझ्यासाठी फारसं महत्त्वाचं नव्हतं अशा पाहुणचारातून रोख रक्कम मिळवू शकतो हा विश्वास ग्रामीण महिलेला मिळाला तो महत्त्वाचा होता! पुढच्या टप्प्यामध्ये विजयाताई रसाळ यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीतल्या सहली काढल्या! करवंद, फणस, जांभूळ, खायला चला अशा नावाने ‘ग्रामीण पर्यटन सहली’ यात विशेष आकर्षण होते बैलगाडीमधून  चक्कर मारणे, विहिरीवर जाऊन पाणी भरणे, नैसर्गिक पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये पोहणे यापासून संध्याकाळी निघताना धारोष्ण दूध पिणे. सहलीच्या जेवणाचा मेनू झुणका-भाकरी, चुलीवरचा भात, खीर असा साधासा असायचा. कोणालाही करता येईल इतका सोपा पण ‘मी करीन’ म्हणण्याची तयारी करायला लावणारा. अशाच काही सहली खास मुलांसाठीही काढल्या. या सहलीमध्ये झाडावरून आंबे काढून फोडी न करता खाणे, गरज पडली तर शिडी वापरून पण झाडावर चढणे, पारंब्यांचा झोका खेळणे, मासे पकडायचा प्रयत्न करणे, ससे-शेळी अशा प्राण्यांना हाताळणे अशी वेगळीच आकर्षणे होती. अशा काही सहलींना तर शाळांनी सुद्धा प्रतिसाद दिला मग त्या सहलीत ग्राम पंचायत दाखवणे, शेती अवजाराचे प्रदर्शन मांडणे, पंचायत सदस्यांच्या मुलाखती असे काही शैक्षणिक विषयही जोडले. या सहलीला १००-१२५ मुले सुद्धा आली एवढ्या सगळ्यांची न्याहारी, जेवण, अन्य कार्यक्रमाची योजना करताना पैसे मिळवण्या बरोबरच नियोजन कौशल्य शिकल्या, गटाने काम करायला, सगळ्यांना सामावून घ्यायला शिकल्या. अशा सहली भरभरून नफा देणाऱ्या ठरल्या आणि नफ्यासोबतच कुटुंबांना आत्मविश्वास देणाऱ्या ठरल्या. बाईने कमावले तरी ‘ती’चे सगळे घर ‘ती’लाही मदत करते हे ‘ती’नेही अनुभवले.  २०१२-१३ मध्ये रिझर्व बँकेची पंच्याहत्तरी झाली. त्यावर्षी आपण त्यांच्या सोबत गावोगावी कार्यक्रम केले आपल्या या कृषी पर्यटन करणाऱ्या महिलांनी या गटाच्या जेवणाची व्यवस्था केली. त्या चवदार जेवणामुळे या महिलांना संधी देण्यासाठी, रिझर्व बँकेच्या पुण्याच्या कार्यालयाने त्यांच्या ७००-८०० जणांच्या कौटुंबिक मेळाव्याचा मेनू त्यांच्या लॉनवर आपल्या मदतीने ठरवला. त्या वेळी सिंहगडावर दही विकणाऱ्या आपल्या गटाच्या महिलांना बोलावले होते तर गावरान चिकन बरोबरच गावरान मसालेदार आमटीसह पुरणपोळीचा स्टॉल सुद्धा बुफेमध्ये लावायची योजना केली. सगळे यशस्वी झाले. वेगळ्याच मेनूचा जरा ‘हटके’ असा आस्वाद घेऊन लोकं समाधानी झाली. या संधीमुळे असे वाटले की करायला लागले की मदतीचे हातही येतात. तोपर्यन्त कुठल्याही शासकीय योजनेत ‘कृषी पर्यटन’ अशी सोय नव्हती.  त्या नंतरच्या कोरोनाचा काळात तर बहुतेक घरातली आज पर्यन्त साठवलेली सगळीच बचत संपून गेली. व्यवहारिक निर्बंधांमुळे नवी कमाई कशी कधी होईल याचीही काही कल्पना येत नव्हती, तेव्हा ‘मामाच्या गावाला जाऊया’ अशासारख्या चार-पाच जणांच्या कौटुंबिक सहली, ‘चला शेती करूया’ अशा योजना आखून २.५-३ लाख रुपयांची उलाढाल केली. ५० कुटुंबांनी या सहल योजनेचे यजमानपद घेऊन नफा मिळवला.   नंतर थंडीच्या दिवसांत ‘चला पावटा भात खायला’ अशा सहली ठरवल्या. कोवळ्या उन्हात शेतात फिरायचे, स्वतः पावटा, वांगी, काकडी शेतांतून काढून आपलंच जेवण चुलीवर बनवायला मदत करायची. या पर्यटन उद्योगात ३०-४० कुटुंब नव्याने सहभागी झाली. पर्यटक येण्याच्या दिवशी गावातच शेतमालाचा स्टॉल लावायचा व थेट शेतकाऱ्यांकडून ताजा माल खरेदीचा आनंद गटाला द्यायचा हेही केले.  आता छोट्याशा कुटुंबाची वर्षभराची किमान आर्थिक गरज बंगायला ४/५ सहली पुरतात अशी रचना बसली.  ‘आपल्या घरात पाहुणे जेवले तर जेवणाचे पैसे घ्यायचे कसे?’ या विचारा पासून ‘पर्यटक म्हणून पाहुणे आले तर पैसे घ्यायला हरकत नाही’ या टप्प्यापर्यंत पोचल्या. संकोच कमी झाला. पैशाचे व्यवहार करतानाच्या मानसिकतेत बदल झाला. ज्या महिला पैसे घ्यायला शिकल्या त्यांची गावातली उधारीही चुकती व्हायला लागली म्हणजे ‘पैसे द्यायलाही शिकल्या!’ मग तिच्याकडे पाहुणे आले तर मजूरी करायला ‘नक्की वेळेत पैसे मिळणार’ या विश्वासाने मदतीचे हात वाढले. मग पापड, मसाले, भाजणी असे उद्योग सुरू झाले. नुसत भांडवल मिळून गिरणी उद्योग यशस्वी होत नाही, ‘माझ्याकडे दळायला टाकतील’ असे वाटणारीचा गिरणी उद्योग यशस्वी होतो असे स्वतःच्या उदाहरणाने अनेकींनी सिद्ध केले.  अतिशय महत्त्वाचा असणारा मानसिक बदल भारतीताईंनी एकीत-दोघीत नाहीत तर अनेकींमध्ये घडवला. बचत गटाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा टिकणारा बदल करणं सोपं गेलं. एकीला दुसरीची मदत होऊन जिला स्वयंपाक येतो तीनच ते चांगल्या प्रकाराने करणं हे वर वर सोप्पं वाटलं तरी व्यवसाय म्हणून जमायला मानसिक बदल व्हावे लागतात. मग जाता जाता जमून जातं.  स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाचा भाग म्हणून जेव्हा आपण स्वयंरोजगार शिकवतो तेव्हा यशस्वी उद्योग झाला की तो तिचा हे आपल्याला स्पष्ट असते. तरीही एकेकीचा आत्मविश्वास वाढल्या शिवाय, समाजात सन्मानाने वावरता यायला लागल्या शिवाय, अभिव्यक्ती सुधारल्या शिवाय स्वयंरोजगारही यशस्वी होत नाही.  प्रबोधनाचे सगळ्यात प्रभावी आणि दृश्य माध्यम म्हणून आपण स्वयंरोजगाराचे काम केले आहे आणि करत आहोत ही नक्की!   सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १८ – कृषी पर्यटन एक स्वयंरोजगार संधी!  Read More »

मागे वळून बघताना १७ : किशोरी विकास 

बचत गटाच्या कामाला सुरुवात केल्यानंतर महिलांना स्वतःच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या मग ‘मागच्यायचं ऱ्हाऊदया पुढच्याचं सुधरा’ या उक्ती प्रमाणे त्यांच्या मुलींच्यासाठी काहीतरी करा असा आग्रह त्यांनी धरला. त्यातून मुलींसाठीच्या कामाला सुरुवात झाली. किशोरी विकास हा रचनात्मक उपक्रम स्थानिक शाळांच्या सहकार्याने सुरू केला. ८-९ वीच्या किशोरींसाठी शाळेत जाऊन तास घेणे असे त्यांचे स्वरूप होते. तासिकांमध्ये किशोरींचे वृत्तीघडण व्हावे, आयुष्याची पुढची दिशा ठरायला मदत व्हावी, साहस निर्माण व्हावे आणि या सगळ्यातून आत्मविश्वास वाढवा यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न केले. अश्विनीताईं या उपक्रमाचे प्रमुख म्हणून नियोजन केले.   पुण्यातील साने गुरुजी कथामालेसह संवाद कौशल्य यावे म्हणून कथाकथन कसे करायचे ते सलग ८ वर्ष शिकवले. किशोरींना गोष्ट सांगण्यासाठी प्रवृत्त केले त्यांच्या स्पर्धा घेतल्या. यामुळे गटासमोर उभे राहण्याचे धाडस तर येतेच आणि शब्द संपत्ती वाढवून आपलं म्हणणं दुसऱ्यासमोर मांडण्याचे कौशल्यही शिकता येते. गटासमोर स्वतःला सादर करणे ही पहिली पायरी!  त्यानंतर मुलीवर ‘मला काहीच जमणार नाही’ असा झालेला संस्कार पूसुन काढण्यासाठी मानसिक घडण करायला सुरुवात करणे गरजेचे होते. मग थोड्याशा साहसी गोष्टी करण्याचे ठरवले. किशोरी विकास मधल्या मुलींची सातत्याने १०-१२ वर्ष ‘निवासी तंबूतील शिबिरं’ घेतली. कुटुंबापलीकडे मैत्रिणी मैत्रिणींनी रात्री एकत्र राहायचं, तंबूंना पहारा देत रात्र जागवायची, शिबिराच्या शेवटी गड किल्ले सर करायचे अशा वेगळ्याच भाविश्वात आपण किशोरींना घेऊन जायला लागलो. या प्रयत्नातून तोरणा, राजगड, पुरंदर, रायरेश्वर, सिंहगड, सज्जनगड असे किल्ले एकेकावर्षी एकेक गड सर केले! डोंगरांवर फाटा आणायला जाणाऱ्या मुलींना गड ‘सापडला’, इतिहास समजला.. मग आपसूक ‘पाळी’ या विषयाचा संकोच गेला, त्यांचा आत्मविश्वास दुणावला! शारीरिक आणि मानसिक आव्हानासाठी किशोरींनी सायकली चालवल्या पाहिजेत असा आग्रह धरला. स्वयंपूर्णतेसाठी उचललेलं हे पहिले पाऊल होतं. ३-४ वर्षात मिळून पुण्यातील मुलींच्या वापरल्या जात नाहीत अशा जवळ जवळ ८०-९० सायकली गोळा केल्या आणि नव्या कोऱ्या सायकली कॉगनिजंट कंपनीमधून मिळवल्या त्याचा वाटपाचे कार्यक्रम केले. त्यावेळी सामाजिक वातावरण असे होते की सायकल हातात असली तरीही मुली सायकली चालवण्याचं धाडसच करू शकत नव्हत्या. मग मात्र आपण मुलींनी सायकल चालवण्याला सामाजिक मान्यता मिळावी म्हणून एक वर्ष महिलांची वाहन रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये सर्वजण महिला चालक होत्या. ज्यांना स्कूटर येत होती आशा १० जणी पुण्यातून स्कूटरनी आल्या, ज्यांना गाडी येत होती त्या गाडीने आल्या आणि ५० किशोरींचा गट सायकल चालवत २२ किमी रॅलीमध्ये सहभागी झाला. रॅलीमुळे ‘शारीरिक ताकदीची चॅलेंजेस सुद्धा मानसिक ताकदीच्या बळावर मी सहज पूर्ण करू शकते’ असा विश्वास आला.  पुढे ४ वर्षानी मुलींची आणि महिलांची क्रीडा प्रात्यक्षिके घेतली त्यावेळी या गटातील काही मुलींनी सायकल कसरती सुद्धा केल्या म्हणजे एकच विषय सातत्याने लावून धरल्याने मुलींच्या मनोवृत्तीत बदल होऊन गटाचा आत्मविश्वास वाढतो हे आपण सिद्ध करून देऊ शकलो. त्यावर्षी भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या उपक्रमाची दखल घेतली आणि खासदार निधीतून सगळ्या किशोरींना सायकल वाटप केले. आता सायकल मिळवणे या पथदर्शी प्रकल्पाचे काम संपुष्टात आले. त्यानंतर आपण हा विषय पुढे लावून धरला नाही. आजही मुली रस्त्यावर सायकल चालवताना दिसतात पण अपवादाने …. आपल्या कामाने परिस्थिती नक्कीच बदलली आहे पण सायकल चालवण्यासाठी मनोबल जसं महत्त्वाचा आहे तसं ‘माझ्या सायकलमध्ये मी हवा भरेन’ ‘माझ्या सायकलला झाले तर मीच पंचर काढीन’ याचे प्रशिक्षण देण्यात आपण कमी पडलो. पण समाजाचे मत परिवर्तन करायला ७-८ वर्षांचा काळ पुरत नाही.. पुढच्या किशोरींसाठीही अजून काही काळ असाच उपक्रम करायला हवा होता.     किशोरींसाठी तंबूतली शिबिरं घेतली तशी शारीरिक धाडस वाढावे म्हणून मढे घाटावर रॅपलिंगची शिबीरे सुद्धा घेतली. दोराच्या साह्याने प्रस्तरावरतरण करणे यासाठीची मनाने तयारी होणे हे खूपच अवघड होते. अश्विनीताई सोबत कुंदाताईंसारख्या ताईंनी स्वतः उंचच उंच कडा उतरून मुलींना दाखवले की आम्हाला जमते मग तुम्हाला का नाही? ..मग त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या मुली भराभर रॅपलिंग करत उतरल्या. मनाचे घडण ही शारीरिक घडणीपासून सुरु होते! पुढचा टप्पा होता तो विद्याव्रताचा स्वतःच्या आयुष्याचा पुढचा निर्णय करण्यासाठी संकल्प कथन करणे गरजेचे होते. किशोरी विकास उपक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणून सातत्याने गेली १४-१५ विद्याव्रत करत आहोत. भागातील १०००-१२०० किशोरवयीन मुला-मुलींचे विद्याव्रत आपण केले. या सगळ्यांना विधायक विचार करण्याची ताकद, व्यसनांपासून दूर राहणे, स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वतः घेणे आणि संकल्प शक्ती वाढवणे आणि पंचकोशातून विकास या वरच्या व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले. छोटे छोटे उपक्रम गटागटाने करून घेतले. यातले अनेक उपक्रम किशोरी विकास उपक्रमामुळे आयुष्यात मुलींनी एकदाच केले असतील पण हे उपक्रम असे होते की ते त्यांच्या आयुष्यातल्या सुखद आठवणीचा भाग बनले. १० वर्षांनी जरी त्या किशोरी कुठेही भेटल्या अगदी रस्त्यात, बसमध्ये, जीपमध्ये, माहेरी आल्यामुळे आपल्या गरोदर तपासणी शिबिरात…. तरी ‘ताई मला ओळखलं का? त्या शिबिरात तुम्ही आला होतात’ असं म्हणत ‘आता मी..’ आपलेपणाने बोलायला लागतात. त्यांच्या आयुष्यामध्ये त्या प्रसंगाचं महत्त्व किती होतं हे आपल्याला सांगतात.  किशोरी विकास उपक्रमातून किशोरींची स्वप्न मोठी झाली पाहिजेत म्हणून तासांना चांगलं शिक्षण होण्यासाठी चांगले मार्क मिळावेत म्हणून अभ्यास कौशल्यांचे वर्ग घेतले, दहावीत गेलेल्या मुला-मुलींना पेपर कसे सोडवायचे कुठल्याही प्रकारची कॉपी करायची नाही आणि अभ्यास कसा करून मार्क चांगले मिळवायचे यावरही मार्गदर्शन केलं. शिक्षणाच्या संधीवर व्याख्याने दिली. विविध क्षेत्रांची ओळख होऊन आयुष्याची दिशा ठरवायला मदत करणारे मार्गदर्शनही केलं. निवडक गटाला क्षेत्रभेटीसाठी पुण्यात आणलं कधी दीनानाथ सारख्या हॉस्पिटलची मुलींना भेट देऊन नर्सिंग पासून डॉक्टरांपर्यंत आणि टेक्निशियन पासून अन्य स्टाफ पर्यंत नोकरीचे काय मार्ग आहेत याचा परिचय करून दिला तर कधी कर्वे शिक्षण संस्थेच्या भेटीतून इंजीनियरिंग पासून फॅशन डिझाइनिंग पर्यंत आणि नर्सिंग पासून संगणकापर्यंत इथं मुलींच्या निवासात राहून सुरक्षित शिक्षण कसं घेता येईल याचे परिचय करून दिला. गावात दहावी होणाऱ्या मुलीला कॉलेजमध्ये जायचं एवढंच ऐकून माहिती असतं पण कॉलेजमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी काय करावे लागतं याबद्दल मात्र ती अनभिज्ञ असते. किशोरी विकास उपक्रमातून आधीमित्र गट मुलींना सहज उपलब्ध झाला की सोबत काम करणाऱ्या ताया वयाने त्यांच्यापेक्षा फार मोठ्या नव्हत्या त्यामुळे झालेल्या सहज संवादातून अनेक गोष्टी घडत गेल्या.  किशोरी विकास उपक्रमाने अजून एक महत्त्वाचं काम केले ते म्हणजे स्वतःच्या गावात त्यांनी धडपडून काहीतरी केलं पाहिजे म्हणून किशोरीनच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कामाचे आवाहन केलं. गावातील मुला-मुलींना जमवून बाहेरून येणाऱ्या मार्गदर्शक तायां सोबत गाव पातळीवर मेळावा घ्यायचा. असा उपक्रम आपण गेले दहा वर्ष करत आहोत एका वर्षी सगळ्यात जास्त म्हणजे ८५ गावांमधून २५०० मुला-मुलींपर्यंत किशोरींच्या मदतीने आपण पोहोचलो. स्वतःच्या गावात चांगला झालेला मेळावा बघून माझ्या मामाच्या गावात घेऊयात, माझ्या मावस बहिणीच्या गावात घेऊयात असे म्हणत मुलींनी पुढाकार कसा घ्यायचा आणि ठरवलेले काम कोणाच्यातरी मदतीने साध्य कसे करायचे याचे शिक्षण घेतले. अशा आपल्या धडपडणाऱ्या मुली कॉलेजमध्ये गेल्या आणि त्या कॉलेजमधल्या बाईंची भेट झाली तर त्या आपल्याला आवर्जून भेटून सांगतात, ‘तुमची ती मुलगी वर्गात उठून दिसते बर का!’ आणि त्यामुळे तिचं पालकत्व आपण घेतलं आहे हे तिच्या बदललेल्या वागणुकीतूनच कळतं. अशा अनेक मुलींच्या आयुष्यावर ठसा उमटवणार काम किशोरी विकासाच्या निमित्ताने केलं कारण या सगळ्या कामाला या सगळ्यांच्या आईचा पाठिंबा होता. बचत गटातून त्या शिकल्या होत्या की मुलीने

मागे वळून बघताना १७ : किशोरी विकास  Read More »

मागे वळून बघताना १६ – कातकरी

  बचत गटाच्या कामाला सुरुवात झाली त्याला गावातल्या मुख्य गटाने प्रतिसाद दिला हे गेल्या लेखात आपण पाहिले. त्याकामात वंचित गटांसाठीच्या कामाची बरीच भर पडली गेली. गेल्या ८ वर्षा पासून प्रतिभाताईच्या पुढाकाराने वेल्ह्यातालुक्यात आपण कातकरी समाजासाठी काम सुरू केले.  कातकरी समाज हा सामाजिक उतरंडीमध्ये सगळ्यात खाली त्यामुळे ‘विकास’ या  कुटुंबापर्यंत पोहोचलाच नाही. बहुतेक घरातल्या आई-वडील यांनी स्वतः कधी शाळा सुद्धा पाहिली नाही त्यामुळे जरी सर्व शिक्षा अभियानात मुलांनी शाळेत जायाला हवे असे सांगितले असले तरी पालक म्हणून त्यांना आग्रह धरणेही अवघडच होते.  कातकरी लहान मुलांनी शाळेत जायचे का नाही? हा निर्णय ५-७ वर्षांच्या मुलांनी करायचा नसतो तर पालकांनी तो लावून धरायचा असतो. या वयात मूल शाळेत गेले नाही तर पुढे जाण्याची शक्यताच नाही. यासाठी पालक संवाद महत्वाचा हा संवाद बचत गटाच्या कामामुळे सोपा झाला. कधीच शाळेत न गेलेल्या माणसाला, वाचता सुद्धा येत नाही म्हणून कसे फसवले जाते त्याचा पालकांना अनुभव होताच पण शाळेत मुलांना पाठवण्याचा आग्रह आपल्या कामामुळे धरता आला.  गावातल्या इतर मुलांच्या सोबत शाळेत जाऊन शिकण्यासाठी कातकरी मुलांना आंघोळ करणे, केस विंसरणे, दात घासणे अशा गोष्टी शिकवण्यापासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. जेव्हा मुलांचा गट एकदम नव्याने शाळेत जायला लागतो तेव्हा ‘गटाने जावे लागते’ म्हणजे शाळेत जायची प्रेरणा सुद्धा टिकेल असे समजून तायांनी मुलांची तशी तयारी करून घेतली, एवढेच नाही तर शाळेतल्या गुरुजींना भेटून सांगितले की, ‘आम्ही मुलांची तयारी करून पाठवत आहोत मुले बसतील असे बघा’ ज्या मुलांना वर्गात काय चाललं आहे ते कळलं ती टिकली, एवढा वेळ एकजागी बसायची सवयच नाही, वर्गात शिकवलेले काही कळत नव्हतं ती मात्र फार काळ जाऊ शकली नाहीत, शाळेला कंटाळली असंही झालं.   ताईने युवती विकास उपक्रमात सहभागी होणाऱ्या युवतींचे ‘कातकरी’ अभ्यास शिबिरच घेतले. मग या वस्ती विकासाच्या कामामध्ये त्या युवती प्रशिक्षक म्हणून काम करायला तयार झाल्या. खरेतर त्यायुवतीही जवळपासच्या गावातल्याच होत्या लांबून वस्ती त्यांना माहिती होती पण तरीही त्या कधीही वस्तीवर गेल्या नव्हत्या. तिथले दारिद्र्य बघून त्यांनाही धक्का बसला. या कर्त्या गटाने मग वेल्हे भागातल्या सर्व वस्त्यांचे सर्वेक्षण केले. त्यातून मुलांना खेळातून गोडी लाऊ.. मराठी गाणी शिकवू असे ठरवून गट कामाला लागला.  आईच्या व्यसनांमुळे रात्रीचा स्वयंपाक घरात होईलच असे नाही असे लक्षात आल्यावर कातकरी वस्तीवर सकस आहार सुरू केला, नसरापूरला शाळा व वस्ती यामधून हायवे जातो, ‘पोरे रास्ता कशी क्रॉस करणार? म्हणून शाळेत जात नाहीत!’ असे पालकांनी सांगितल्यावर आपण वस्तीवर एक ताई नेमली जी शाळेच्या वेळेत मुलांना एकत्र करून शाळेत सोडेल व आणायला जाईल.. यामुळे २५-३० मुळे शाळेत जायला लागली. काही वस्त्यांवर बचत गट केले, काही ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली. अशा शिबिरांना पूर्वी अजिबात प्रतिसाद नसायचा पण आपण वस्ती विकासाचे काम सुरू झाल्यावर अगदी लहान मुलांच्या तपासणी शिबिराला सुद्धा आई मुलाला घेऊन यायला लागली, अपवादाने एखादी गरोदर महिला गर्भारपणात तपासणी शिबिरात यायला लागली, पण आरोग्याच्या काळजीने नाही तर ताईच्या आग्रहामुळे! स्वतःच्या आरोग्याकडे बघायला अजून वेल्हयातल्या कातकऱ्यांना शिकावे-शिकवावे लागणार आहे.   सातत्याने ८ वर्ष असे काम सुरू आहे. वस्तीवर राहून मुलींनी शिकणे अजूनच अवघड आहे असे वाटले कारण अजूनही लहान वयात म्हणजे १४-१४ व्या वर्षी मुलींची लग्न होतात त्यामुळे एकीला पुण्यात कर्वे शिक्षण संस्थेत शिकायला पाठवले तिने ११ वी केले पण पुणे फार लांब वाटले म्हणून मग आपल्याच वेल्हे निवासात मुलींनी शिकायला यायचे आवाहन केले.. ४ जणींनी प्रयत्न केला पण एक जण टिकली चांगली शिकली, आज तिने दहावीची परीक्षा दिली. पुढेही शिकायचे नक्की ठरवले आहे. तिच्या शिक्षणाचा खर्च एका देणगीदारांनी उचलला त्यामुळेही शिकायचं उत्साह वाढला. तिच्यात झालेला चांगला बदल बघून आता तिची बहिणंही निवासात शिकायला आली आहे.  शिकले की अनेक गोष्टी करता येतात, रोजगाराच्या संधीही बदलतात. काही गोष्टी बघून अनुभव विश्व विस्तारावे म्हणून दरवर्षी प्रतिभाताई या गटाच्या सहल काढते. ज्ञान प्रबोधिनीवरच्या विश्वासाने पालकही पाठवतात. या निमित्ताने कधी सिंहगड तर कधी सज्जन गड, कधी राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तर कधी पेशवे उद्यान असे काय काय पाहून झाले. फक्त ‘शाळेत जा’ असे सांगून पुरत नाही, शाळेत गेल्यामुळे शिक्षण मिळाल्यामुळे आयुष्य कसे बदलते हे हळूहळू सांगावे लागते. प्रतिभाताईला तर असे वाटायला लागले आहे की वस्तीच्या वातावरणामुळे शिकायचा वेग कमी होतो.. या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृहच बांधायला हवे, नाहीतर आई-वडिलांचे रोजचे व्यसन बघून, आणि सहज मिळत असल्याने पुढच्या पिढीला व्यसन लागायला वेळ लागत नाही. आई-वडिलांची इच्छा असली तरी त्यांच्या वागण्यातही बदल लगेच होणार नाही हे आपणही स्वीकारले पाहिजे.  गेली काही वर्ष आपण वस्त्यांवर दिवाळी साजरी करत आहोत. देणगीतून फराळ, रांगोळी, किल्ल्यांवरची चित्रे भेट देतो, किल्ले करून घेत आहोत, पणती लावायला शिकवत आहोत, एकत्र फराळ करायला शिकवत आहोत.. त्यावेळी अनेकांनी सांगितले की अशी गोड खाऊन आम्ही पहिल्यांदाच साजरी केली. अशा कार्यक्रमामुळे वस्तीवरचे वातावरण हळूहळू बदलायला लागले .. वस्तीवर स्वागत व्हायला लागले.  अशा कामामुळे वस्तीवरचा वावर सहज झाला. प्रतिसाद सुधारला. मग युवक, पुरुष यांचा संवाद वाढवला आणि स्वयंरोजगार संधी बघायला वस्तीवरच्या २५-३० जणांची बाळासाहेब कोळेकरांचे कातकऱ्यांसाठी चाललेले काम बघायला गट महाडला जाऊन आला. उत्साह वाढला. योजनांची माहिती मिळाली पण कागदपत्रे नसल्यामुळे काहीच लाभ घेता येत नाही असे लक्षात आले. मग ही कागदपत्रे तयार करायचे काम जे अधिकारी करतात त्या तहासिलदारांशी संवाद साधला की कधीतरी फिरस्ती असली तरी आता ही मंडळी गेली अनेक वर्ष याच वस्तीवर रहात आहेत तर त्यांना या वस्तीवरचा राहिवासा पुरावा देऊया. त्यांचे आधार कार्ड काढूया. ठरले! मग आख्या वस्तीने शासकीय कार्यालयात येण्याऐवजी अधिकारीच वस्तीवर आले तर? असा प्रस्ताव अधिकाऱ्यांसामोर मांडला आणि अधिकाऱ्यांनी मान्य केला. त्या दिवशी स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी ६०-६२ कातकरी कागदोपत्री अस्तित्वात आले हा कामाचा मोठ्ठा टप्पा म्हणायला हवा!  सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १६ – कातकरी Read More »

मागे वळून बघताना १५ – वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात..

 स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला सुरुवात केली ती ग्रामीण महिलेसाठी, बचत गट करण्यापासून! तेव्हा वाटत होते की ही ग्रामीण महिला, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे तिने मुख्य प्रवाहात यायला हवे. पण जसजशी वर्ष जायला लागली, तसतसे लक्षात यायला लागले की या ग्रामीण महिलांमध्येही वेगवेगळे गट आहेत. ग्रामीण समाजातील महिलांमध्ये एकसंधता नाही. त्यामुळे उपक्रम एकच असला तरी बचत गटाचा फायदा सर्व गटांना सारखाच पोहोचला नाही! त्याच प्रमाणे गटाचा भाग झाल्या तरी सगळ्या सभासद सारखेच शिकल्या नाहीत! ज्या महिला दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांचे आपण शासकीय योजनेसाठी स्वतंत्र बचत गट चालवले. त्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनाने बचत गटाद्वारे वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. शासनाला त्यांचे ‘target’ पूर्ण करायला कुठल्यातरी गटाला फायदा मिळवून द्यायचाच आहे तर मग आपणच संघटीत केलेल्या गटांना त्याचा फायदा मिळवून देऊ म्हणजे शासनाच्या दप्तरी त्या गटांची नोंद होईल असे ठरवले. गटांना मिळणारी सबसिडी म्हणजे ‘परत न करायचे कर्ज’ सुद्धा आपण गटांना मिळवून दिली. सबसिडी घेणारा गट जरी ‘दारिद्र्य रेषेखाली’ असला तरी त्याला शिकवले की केवळ सबसिडी ‘खाऊन’ विकास होत नाही. विकास स्वकर्तृत्वावर करायचा असतो म्हणून दारिद्र्य रेषे खाली असणाऱ्या महिलांनाही दारिद्र्य रेषेवर असणाऱ्या सभासदांच्या गटात सुद्धा घेतले आणि कर्ज घेऊन व्याजासह चोख परत फेड करायला शिकवले! तसाच दुसरा गट लक्षात आला तो म्हणजे ज्या एकल आहेत अशा महिला! काहीही कारण असले तरी.. एकल म्हणजे .. ‘सोडून’ दिलेल्या असतील, नवरा नांदवत नाही असे असेल, विधवा असतील, माहेरी रहात असतील किंवा नवरा असला तरी दारूडा/व्यसनी असल्याने यांनाच कुटुंबाला पोसावे लागत असेल…. तर अशा महिला म्हणजे एकल महिला! पर्यायच नाही म्हणून त्या सगळ्या अतिशय कष्ट करणाऱ्या आणि तरीही समाजात त्यांना ‘किंमत’ नाही, सन्मान नाही, अशा दुर्लक्षित महिला असतात. बचत गटांमुळे या गटाचे सगळ्यात जास्त कल्याण झाले कारण आपले बचत गट फक्त आणि फक्त महिलांचे होते.. कारभार बघणाऱ्याही सगळ्या महिलाच आहेत. आपल्या गावपातळीवरच्या कामातही पुरुषांचा कुठेही वावर कधीही नव्हता आणि नाही, त्यामुळे एकल माहिलांना सुरक्षित वाटायचे आणि मोकळेपणाने त्या त्यांची आर्थिक गरज सुद्धा मांडू शकायच्या. यातल्या अनेक जणींना फसवलेले असायचे. शिक्षण नाही आणि एक्सपोजर नाही त्यामुळे जगाची ओळखंच नाही…. अशा महिलांना आपला आधार वाटायचा!  तिसरा गट गावातला अशा महिलांचा की ज्या सामाजिक उतरंडीमधल्या सगळ्यात तळाच्या गटात मोडतात, ज्यांना विकास प्रक्रियेत यायचे असते हेच माहीत नाही अशा! मागास समाजाच्या असल्यामुळे त्या गावातल्या व्यवहारातही सामावल्या जात नाहीत, दाखलपात्र नसतात अशा महिला. कधी धनगरांच्या, ज्या डोंगरावर छोटी वस्ती करून राहिल्याने गावापासून भौगोलिक अंतरानेही दूर असल्याने तुटलेल्या तर कधी कातकरी ज्या गावापासून दूर राहील्यामुळे वेगळा विचार करणाऱ्या ज्यांच्या अस्तित्वाचे पुरावेही अजून पर्यन्त निर्माण झाली नाहीत अशा महिला! आणि चौथा गट असा की जो दारिद्र्यरेषे पेक्षा थोडासा वर असणारा आणि सामाजिक दृष्टीने अशा समाजाचा भाग की ज्याला समाजामुळे काही शासकीय योजनेतून सवलत मिळणार नाही. हा खरं धडपडा गट अनेकदा हा गट राजकीय पुढाऱ्यांच्या पासूनही सावध अंतरावर असतो. थोडक्यात काय तर हा गट स्वकर्तृत्वावर छोटी-मोठी स्वप्न बघत असतो. ही मंडळी शेती करत असतात पण जागा खातेफोड झाली नसल्याने त्यांच्या नावावर झालेली नसते. बँकेतून कर्ज काढावसे वाटते पण उत्पन्नाचा दाखला नसतो की जामीन राहायला कोण्या शासकीय नोकरदारांची ओळख असते! त्यामुळे यांना त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन विना तारण, माफक दरात कर्ज आणि मार्गदर्शन मिळाले तर कर्ज घेऊन स्वतःच्या कुटूंबांचे आयुष्य बदलू शकतात. बचत गटातील सहभागाने या गटातील महिलांना विशेष फायदा झाला.     स्त्री शक्ती प्रबोधनाच्या कामाला बचत गटांपासून सुरुवात केली आणि नेमके परिणाम कारक काम करायचे असेल तर अशा वेगवेगळ्या गटांसाठी, वेगवेगळे काम करण्याची गरज दिवसेंदिवस लक्षात यायला लागली. कामाच्या गरजेचे बारकावे लक्षात आल्यावर यातल्या प्रत्येक घटकासाठी स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली, कारण एकल महिलांसाठी काम करायला लागल्यावर आशाताईंना ‘एकल’ महिलांचे वेगळे प्रश्न लक्षात आले तर दारिद्र्य रेषे खालच्या गटासाठी काम करताना भारतीताई यांना वेगळेच प्रश्न जाणवले आणि कातकरी महिलांसाठी कामाला लागल्यावर तर प्रतिभाताईला वेगळ्याच प्रश्नांची जाणीव झाली.  आपण या प्रत्येक गटांसाठी स्वतंत्रपणे ज्ञान प्रबोधिनी म्हणून गेले ८-१० वर्ष काम करत आहोत. या कामाचा परिणाम म्हणून आता या प्रत्येक गटात किमान एक तरी ज्ञान प्रबोधिनीच्या गणवेशातली कार्यकर्ती आपल्याकडे आहे, जी तिचा प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडू शकायला लागली आहे. जसजसे मनुष्यबळ तयार होत गेले तसतसे काम त्या-त्या गटासाठी काम करणे सोपे झाले. खरेतर असे काम उभे करणाऱ्या प्रत्येकच ताईची कहाणी लिहिण्यासारखी आहे. आपल्याच गावात आपल्याच माणसात राहून बदलाचा विचार मांडत रहाणे सोपे नसते.. त्याला जवळचा गट/समाज आनंदाने स्वीकारतो असेही नाही.. ‘आली मोठी शिकवायला!’ अशी या शब्दांत मोठ्यांदा न बोललेली अवहेलनाही अनेकदा पंचवावी लागते. त्यामुळे सावकाश झाले तरी चालेल पण विरोध न होता कसकसे रचनात्मक काम केले ते येत्या १-२ लेखात आपण बघूया! सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १५ – वंचित गटांसाठीच्या कामाची सुरुवात.. Read More »

नोटाबंदी एक आपत्कालीन मदत कार्य

दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८.३० नरेंद्र मोदी यांनी रात्री १२ नंतर ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्याचे जाहीर केले. ग्रामीण भागात बहुतेक व्यवहार फक्त रोखेनेच होत असल्याने या निर्णयाचा ग्रामीण जनजीवनावर चांगलाच परिणाम होणार होता. पंतप्रधानांनी असा निर्णय घेऊन आपल्या कामाची अचानक परीक्षा घेतली आहे असे वाटून निर्णय कळल्या क्षणीच बचत गटाच्या कार्यकर्त्यांचा गट कामाला लागला. २२ वर्ष केलेल्या  कामामुळे महिला आता विश्वासाने पैसे हाताळत होत्या. बचत गटाच्या निमित्ताने दरमहा लाखों रुपयांचे व्यवहार होत होते, त्या निमित्ताने ५००/१००० रुपयाचे चलन बँकेच्या कॅशियर खालोखाल बचत गट प्रमुखच हाताळत असाव्यात असा माझा प्राथमिक अंदाज होता. म्हणून अशा गावच्या प्रमुख महिला ज्या एरवी बचत गटाचे बँकेत मोठ्या रकमांचे रोखीचे व्यवहार करतात अशा महिलांची ९ नोव्हेंबरला सकाळी तातडीचे बैठक बोलावली. रात्री उशीरा ८नंतर फोनवर निरोप देऊनही १२ गावच्या १२ प्रमुख, ज्यांना या विषयाचे गांभीर्य समजत होते अशा वेळेत हजर झाल्या. ग्रामीण महिला आर्थिक सुनामीच्या मदत कार्यास पदर खोचून तयार होत्या. ज्यांच्याकडे व्हाट्सअप असणारे फोन होते त्यांनी गटातल्या महिलांना बैठकीला येण्यापूर्वी, ‘घाबरू नका थांबा आपण उपाय करू, बैठक झाले की काय करायचे ते सांगते!’ अशा आशयाच्या सूचना दिल्या होत्या.  ९ नोव्हेंबरला ग्राहकांना व्यवहारासाठी बँका बंद होत्या तरी आपल्या संपर्कातल्या बँकेत कार्यकर्त्या ‘आतून’ भेटायला गेल्या. बँक शाखा व्यवस्थापकांना कार्यकर्त्यांनीच मदतीचा हात दिला. बँक शाखा व्यवस्थापकांशी चर्चा झाली. त्यात ठरले की येते ५ दिवस तरी गावकऱ्यांना बँकेत गर्दी होऊ नये म्हणून बँकेत न येण्याची विनंती करायची. गाव प्रतिनिधीने गावातल्याच लोकांकडून डिपॉझिट स्लिप भरून घ्यायच्या म्हणून १५०० ताब्यात घेतल्या. बँकेतली गर्दी टाळण्यासाठी गाव कार्यकर्तीने स्लिप भरून, पैसे मोजून, नोटा एकत्र लावून बँकेत आणून द्यायची. ज्या गटांची कर्जफेड बाकी आहे त्या गटातल्या सदस्यांनी बँकेतले व्यवहार कमी संख्येत व्हावेत म्हणून शक्यतो एक रकमी गटाचे कर्जफेड करायची म्हणजे २० जणांच्या २० बचत खात्यासाठी डिपॉझिटची एन्ट्री करण्याऐवजी एका एन्ट्रीत २० घरचे बाद चलन बँकेत जमा होईल व सगळ्यांचेच काम हलके होईल. १० नोव्हेंबर, त्यानंतरही बँकेत काही दिवस अनियंत्रित गर्दी उसळू शकते म्हणून बँकेने पोलीस प्रोटेक्शन मागितलेच होते पण तरी गरज पडल्यास फोन केला तर लगेच बँकेच्या मदतीला येण्यासाठीचा निरोप दक्षता समितीच्या महिलांना देऊन ठेवायचे.  कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही माहिती देऊन रणनीती ठरली. गावात रोख पैसे बाळगून असणाऱ्यांपासून सावधानतेचा इशाराही देण्यात आला. नोटबंदीच्या प्रसंगामध्ये बचत गटाच्या निमित्ताने झालेली आर्थिक साक्षरता महिलांना खूपच उपयोगी पडली. त्या काळात गावात शिकलेला माणूस सुद्धा बँकेत जाण्यापूर्वी आमच्या कार्यकर्तीचा सल्ला घेत होता.  माध्यमांमध्ये येत नव्हत्या अशा अनेक गोष्टी गावात घडत होत्या. एक पंतप्रधानांनी ज्यावेळी घोषणा केली त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ‘चलनात नसणाऱ्या ५००/१००० च्या नोटा द्या आणि निम्मे पैसे घ्या’ असे म्हणणारे काही जण गावात दाखल झाले. ते असे सांगत होते की सरकार तुमचे फक्त ४०००रु. बदलून देणार आहे पण ‘रोज ४०००/-‘ हे कोणीच सांगत नव्हते. अर्धवट माहिती देऊन अनेकांना गुपचूप फसवण्याचे उद्योग सुरू झाले. ज्या गावात बँकेत नियमित जाणारी बचत गटाची ताई होती तेथे फसवणे शक्य झाले नाही. जरी या महिला वर्तमानपत्र वाचण्या इतक्या साक्षर नव्हत्या तरी अडचण आल्यावर कोणाला फोन करायचा हे त्यांना माहिती होते अशी कुटुंबे/गावे फसली नाहीत. अशा कुटुंबांनी इतरांनाही बँक मॅनेजरशी बोलून धीर दिला व असे अर्धवट माहितीमुळे होणारे अनेक गावांचे नुकसान टळले.  गावात होणारी चर्चा ऐकून येणाऱ्या प्रश्नमुळे खूप माहिती सांगावी लागत होती. काळा पैसा हा रंगाने कधीच काळा नसतो अशी माहिती वेळेत योग्य त्या गटापर्यंत पोहोचवावी लागत होती. एखाद्या सासुरवाशीणीने किंवा म्हातारीने लपवून केलेली बचत काळा पैसा नाही असे सांगून तिला आधार देऊन बँक व्यवहारात तिची बचत गुपचुप बदलून देण्याची व्यवस्था होत होती. ज्या महिलांनी बचत गटात सहभाग घेतल्यामुळे जनधन योजनेला प्रतिसाद देऊन स्वतःचे बँकेत खाते काढले होते त्या कुटुंबाचा नोटा बदलून मिळाल्याने फायदा झाला. ‘ती’चा क्षमता विकास झाल्यामुळे कुटुंबांनी तिच्यावर दाखवलेला दाखवलेला विश्वास सार्थ झाला होता.  खरे सांगायचे तर घरात बचत गटाचे कोणीतरी सभासद आहे, अशा कुटुंबांचे अडले नाही. केवळ बचत गटामुळे लाखो रुपये विनाताण बँकेत जमा झाले. या कालावधीत नवीन खाते काढून घ्यायला परवानगी नव्हती, त्या खात्यांचे चौकशी होईल अशीही भीती होतीच. बचत गट विश्वासामुळे गावागावातून डिपॉझिट स्लिप भरून आणल्या. कुठेही छापील पत्रक न वाटता हे निरोप तोंडी गावातल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले. गावकरी बँकेच्या निरोपाप्रमाणे थांबले.  अडचण आल्यावर फक्त टीव्हीवरच्या बातम्या बघत असले तरी गावातले व्यावहारिक प्रश्न गटात सोबत चर्चिले गेले. आपल्या कार्यकर्त्यांनी, युवतींनी स्लिप भरायला बँकेत जाऊन मदत केली. मदतीसाठी त्या बँक आवारातच बसल्या. ४०-४५ वय उलटून गेलेल्या लोकांना जास्त मदत लागली. मदत करणारी अधिक साक्षर होती म्हणून मदत करत नव्हती तर बँकेसंबंधी कागद भरायला लागणारी वित्तीय साक्षरता तिच्याकडे होती म्हणून करत होती. अनेकींनी हे काम विना मोबदला स्वयंस्फूर्तीने केले. लोकांच्या अडचणीचा फायदा घेऊन बरेच पैसे मिळवता आले असते तरीही तसे करू नये असे वाटण्या इतकी मनुष्य घडण आर्थिक उपक्रमाने झाली होती.  बैठकीला आलेल्या सगळ्या जणी त्यांच्या मैत्रिणींना व्हाट्सअप ने जोडलेल्या होत्या त्यामुळे संदेशवहन अतिशय पटपट होत होते. या प्रक्रियेतली लोकशिक्षणाची अजून एक महत्त्वाची बाजू लक्षात आली ती म्हणजे, आपत्कालीन प्रसंगी कसे वागायचे हे शिक्षण, तातडीने निरोप देण्याच्या देवाणघेवाणीतून झाले. यामुळे एकटेपणाचे भावना नव्हती गटाच्या एकोप्याने वाढलेला आत्मविश्वास होता.  या काळात हा गट दररोज घडामोडी व्हाट्सअप च्या गटावर टाकत होता गटावरचे संदेश साधारण असे होते. ‘आज 22 स्लिप भरल्या’, ‘आज धनगराची माणसं एरवी गावाचे वावरत नाहीत ती घरी येऊन विचारत होती’, ‘गावातले पुढारी घरी येऊन गेले’, ‘वरच्या आळीच्या हिशोबात ३ नोटा खोट्या सापडल्या’, ‘आज मी 4000 रुपये बँकेतून बदलून आणले. पैसे खात्यात भरावे लागतात तसेच मिळत नाहीत’, ‘आज आमच्या बँकेतून ४००० मिळायला लागले’.  ‘माझं घर जणू गावातली बँकेत झाली आहे’. ‘मी लिखाणात गुंतून पडले तर आमच्या घरी पारूबाईने जेवण आणून दिले’, ‘माणसं बँकेत जाऊ नका म्हटलं तरी ऐकत नव्हती पण बाकीच्यांनी आपला शब्द ऐकला’, ‘त्यांचे पैसे रांगेत न थांबताच खात्यात जमा झाले असे ते दुसऱ्या गावात जाऊन सांगत होते’…. असे विश्वासार्हता वाढवणारे संदेश वाचायला मिळत होते आलेल्या अडचणीवर हे चर्चा होतीच त्यात मुख्य प्रश्न लक्षात आला तो म्हणजे खोट्या नोटांचा ज्याचा विचार किंवा उल्लेख तोपर्यंत कुठल्याही माध्यमांनी केला नव्हता ज्या गावात बचत गटाचे काम करणाऱ्या जबाबदारी घेणाऱ्या महिला होत्या, त्यांनी संस्थेतील नोटा तपासणारे व मोजणारे यंत्र गावोगावी वेळापत्रक लावून नेले. मशीनवर नोटा कशा मोजायच्या? हे त्या जबाबदारीने शिकल्या. गावकऱ्यांचा ‘माझ्याकडे असलेली नोट खोटी नाही ना?’ या धास्तीचा भार हलका झाला. महिलांचे या प्रक्रियेत खूपच शिक्षण झाले वेळेत व विश्वासार्ह माहिती मिळणे किंवा मिळवणे किती महत्त्वाचे असते हे त्यांनी अनुभवले, विश्वासाने तिचे काम सोपे झाले. बचत गटाच्या कामासाठी नियमित बँकेत जात असल्यामुळे कामात सहजता होती म्हणून गावातल्या अनेक पुरुष मंडळींनी सुद्धा त्यांचे प्रथमच ऐकले. यामुळे ‘ती’चा आत्मविश्वास लक्षणीय वाढला गटात होते म्हणून निभावले असं म्हणणाऱ्यांना अडीअडचणीला

नोटाबंदी एक आपत्कालीन मदत कार्य Read More »

मागे वळून बघताना १४ – आर्थिक विषयाचे प्रशिक्षण म्हणजे…. 

आपण कामाला सुरुवात केली, तेव्हा बचत गट म्हणजे काय हे ग्रामीण महिलेला माहिती नव्हते आणि हिशोब करणे, पैसे मोजणे अशी आर्थिक कामे करायची भीती वाटत होती. आता हळूहळू महिला ही कामे धिटाईने करू लागल्या आहेत. अनेक गावांना आता गटाचे आर्थिक गणित समजले. व्याजदर किती असेल तर गट बंद होताना व्याजाचा किती वाटा मिळतो हेही लक्षात आले. मग विश्वासाने बचत गटाची सभासदांची बचत वाढायला लागली. सुरुवात केली तेव्हा दरमहा प्रत्येक सभासद २० रु बचत करायची या टप्प्यापासून आता ३० वर्षात अपवादाने काही गटातील प्रत्येक सभासद दरमहा २००० रु बचत सुद्धा करून लाखात कर्ज व्यवहार सहज करायच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत याचे समाधान आहे. शहरापासून जवळच्या गावापासून हाय वे वर असणाऱ्या गावापासून सुरुवात करून आता असे व्यवहार करायला वेल्हयातील दुर्गम भागातल्या महिलांना शिकवणे अजूनही चालू आहे.  बचत गटाचे व्यवहार करताना सुरुवातीच्या काळात महिला घाबरायच्या. त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आले की बचत गटकर्जाच्या येणेबाकी रकमेवर सगळ्यांसामोर गणित करून व्याज काढता येत नव्हते, गणित  चुकले तर? अशी भीती वाटायची कारण गणित एवढे पक्के नव्हते मग आपण कॅल्क्युलेटर वापरायला शिकवलं. त्याकाळात ज्यांचे शिक्षण झाले होते ते मराठीतून म्हणजे आकडेही देवनागरीतून लिहायला शिकल्या होत्या, कॅल्क्युलेटरवर फक्त इंग्रजी आकडे असतात त्यामुळे ६, ९, मध्ये आकडे वाचनात गोंधळ व्हायचा तर इंग्रजीत (रोमनमध्ये) ७, ८ वाचताच यायचे नाहीत. मग जर अंतर्गत व्याज दर २% असेल तर येणे बाकी वर व्याज किती द्यायचे आणि ३% असेल तर व्याज किती द्यायचे असे शुद्ध देवनागरीत लिहिलेले तक्ते तयार केले. आणि प्रश्नच सुटला.. मग पुढचा प्रश्न .. हिशोब करताना कधीतरी खाडाखोड व्हायची तेव्हा हमखास बेरीज चुकायची आणि अशा वेळी जमलेली रक्कम जर हिशोबाच्या बेरजेशी बेरीज चुकल्यामुळे जुळली नाही तर भांडणे ठरलेली, मग आपल्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून आपण वेळच आली तर खाडाखोड कशी करायची, एकावर एक आकडा गिरवायचा नाही इतक्या बारीक सूचना ‘चोख हिशोबाची तंत्र!’ या नावाखाली द्यायला सुरुवात केली.   ज्ञान प्रबोधिनीने नाबार्ड कडून अर्थसाहाय्य घेऊन बचत गट तयार केले व बचत गटांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी बँकेला जोडले. त्या निमित्ताने नाबार्डचे अधिकारी आपल्याकडे बैठकीला/पहाणीला/भेटीला यायचे व असे साधे सोपे मराठीतले कमीत कमी अक्षरे लिहिलेले रंजक प्रशिक्षण साहित्य बघून त्यांनी सुचवले की नाबार्डला अर्ज करा व यांची पुस्तिका छापायला निधी मागा!  आणि आपले पहिले प्रशिक्षण पुस्तक नाबार्डच्या आर्थिक मदतीने तयार झाले.  अशा साध्या सोप्या पण सातत्याने केलेल्या प्रशिक्षणामुळे खरे म्हणजे दरमहा होणारे बचत गट हळूहळू आपापले चालायला लागले. तसतसे ग्रामीण महिला आर्थिक-स्वयंपूर्ण आणि आर्थिक साक्षर कशी होईल यावर काम सुरू केले. २००९-१०साली रिजर्व्ह बँकेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी ‘आर्थिक समावेशन’ करायचे या विषयावर काम सुरु केले. पुण्यातल्या रिजर्व्ह बँकेच्या ‘कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंग’ (CAB) मध्ये ग्रामीण बचत गटाच्या अनुभव कथनासाठी कायम निमंत्रण असायचे. हाच धागा धरून तिथल्या अधिकाऱ्यांनी विचारले ‘ज्ञान प्रबोधिनी आर्थिक समावेशनाच्या कामात रिजर्व्ह बँकेला मदत करेल का?’ रिजर्व्ह बँकेसोबत काम करायची  अतिशय उत्तम संधी आहे असे समजून आपण एकत्र कामाला लागलो. भोर, हवेली, वेल्हयाच्या १० गावात ‘बँक’ या विषयीची जाणीव जागृती करणारे कार्यक्रम घेतले, खोट्या नोटा कशा ओळखायच्या यावर गावोगावी क्लिप दाखवून जागृती केली. आर्थिक समावेशनाचे काम करण्यापूर्वी ३६ प्रश्न असणारी ७ पानी प्रश्नावली खोपीतील २४१ कुटुंबांकडून भरून घेतली. यातून लोकांचे बँकेबद्दलचे समज-गैरसमज समजले, कोण बँकेत खाते काढते, का काढते? कधी वापरते अशी सगळी माहिती गोळा झाली. बँकेत खाते काढायच्या खऱ्या अडचणी काय आहेत त्या या सर्वेक्षणामुळे समजल्या म्हणजे खात्यात पैसे कोणीही ठेवू शकते पान काढायला मात्र स्वतः जावे लागते अशी प्राथमिक माहिती सुद्धा नव्हती त्यामुळे २०० रुपये ठेवायला बँकेपर्यंत पोचायचा बसचा खर्च ४० रु करून दिवस कोण वाया जातो.. आशा उत्तरांमुळे नेमके काय सांगायला हवे ही समजले मग त्यावर काम केले. ज्या कुटुंबातल्या कोणाचेही बँकेत खाते नव्हते अशा कुटुंबातल्या महिलांना व युवकांना खाते काढण्यास प्रेरणा दिली, मदत केली. अगदी सेंट्रल बँकेची प्रासंगिक शाखा गावात उघडेल, गावातून e-transactions होतील असे पाहिले. त्यासाठी गावातील युवकांचे प्रशिक्षण घेतले आणि या सगळ्या प्रयत्नांमुळे भोर तालुक्यातील खोपी गावाचे १००% आर्थिक समावेशन झाले. यामुळे पुण्याच्या शाखेला(CAB) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या निमित्ताने रिजर्व्ह बँकेचे लोकपाल, आणि मोठमोठ्या पदावरचे अधिकारी खोपीत येऊन गेले. आपल्या कार्यकर्त्यांचाही पुण्याच्या शाखेने तेथे (CAB) बोलावून सत्कार केला. त्याच वर्षी तेव्हाचे गव्हर्नर डॉ. राघू रामराजन यांनी असंघटित लोकांचे बँकेबद्दलचे मत जाणून घ्यायचे ठरवले होते. तेव्हा रिजर्व्ह बँकेच्या निमंत्रणांवरून त्यांना प्रत्यक्ष भेटून, बँकेबद्दलचे ग्रामीण भागातल्या बचत गटाच्या महिलांचे म्हणणे काय आहे हे सांगून, ग्रामीण बँकेत फक्त पुरुष स्टाफ असल्यामुळे महिला आर्थिक प्रश्न बोलायला संकोचतात अशी अडचणीही त्यांच्यासमोर मांडता आली. असे बचत गटाच्या महिलांच्यावतीने सर्वोच्च पदावरच्या अधिकाऱ्या समोर निवेदन करायला मिळणे मिळणे ही कामाची खरी पावती होती! या कामामुळे समजलेल्या प्रश्नावर पुढे अनेक वर्ष काम केले. बचत गटाच्या बैठकीत बँकेशी म्हणजेच फॉर्मल रचनेशी जोडून घेण्यासाठी बचत गट प्रमुखांना प्रशिक्षण दिले. या सगळ्या प्रशिक्षणाचे संकलन करून ‘बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी!’ अशी एक प्रशिक्षण पुस्तिका तयार केली. ही पुस्तिका अनेक संस्थांना पाठवली, ज्यामुळे अनेक जिल्ह्यातील महिलांचे प्रशिक्षण झाले. ही प्रशिक्षण पुस्तिका जेव्हा बँक अधिकाऱ्यांना दाखवली तेव्हा लक्षात आले की बँकेत ग्राहक म्हणून येणाऱ्या माणसाच्या प्रशिक्षणापेक्षा बँक अधिकाऱ्यांचे/ अशी कामे करणाऱ्या शासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होण्याची जास्त गरज आहे. ही संधी कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बँकिंगने दिली, यशदाने, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या प्रशिक्षण केंद्राने दिली! आजही त्यांची व्याख्यानासाठी निमंत्रणे येत असतात. आणि त्यामुळे आपले काम पॉलिसी बनवणाऱ्यांपर्यंत पोचते आहे ही सांगायला आनंद होतो आहे.   सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन (त्रिदशकपूर्ती लेखन) ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १४ – आर्थिक विषयाचे प्रशिक्षण म्हणजे….  Read More »

मागे वळून बघताना १३  – आरोग्यदायक चूल

आरोग्यदायी चूल! ग्रामीण महिले सोबत काम करताना ‘ती’चे कष्टप्रद जीवन सतत समोर दिसत असते. ‘ती’च्यांच शब्दांत सांगायचे तर ‘जीवाला कधीच उसंत नसते’. त्यामुळे बैठकीच्या निमित्ताने शारीरिक काम न करता नुसते बसले तरी तिला सहज डोळा लागतो.. कारण शरीर कायमच थकलेले असते! उन्हाळ्याचे दिवस म्हणजे सरपण-लाकूडफाटा भरून ठेवायचे दिवस. या १००-१२५ दिवसांत दुर्गम गावातल्या महिला वर्षभरासाठी किमान ५ टन लाकूड फाटा भरून ठेवतात. चुलीवर स्वयंपाक करायचा, रोज आंघोळीचे पाणी तापवायचे तर ५-६ माणसाच्या कुटुंबाला एवढे लागणारच! आपण नेहमी बघतो ती सगळीकडे दिसणारी चूल, महिलेच्या आरोग्याला किती हानीकारक आहे यांची सुशिक्षित माणसाला कल्पनाच नसते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सप्टेंबर २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार भारतात दर वर्षी निदान ५ लाखाहून जास्त बायका-मुलं चुलीच्या धूरामुळे अकाली मृत्युमुखी पडतात तर जगातला हाच आकडा ४० लाखांवर आहे. (Pre-mature death because of indoor air polution), त्यातली ८% फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यामुळे तर २७% निमोनियाने… ही अतिशयोक्ती नाही.    बाई चुलीवर रोज स्वयंपाक करते तेव्हा चुलीचा जो धूर तिच्या फुफ्फुसात जातो, तो धूर जणूकाही रोज १०० सिगरेट ओढण्याइतका असतो, त्याने ‘ती’चे फुफ्फुस आतून हळूहळू निकामी करतो. चाळिशीच्या बाईचे फुफ्फुस किती कार्यक्षम आहे असे आपण दीनानाथ रुग्णालयात तपासले तर ३५ -४० वर्षांच्या बाईचे फुफ्फुस ८ वर्षांच्या मुलांच्या फुफ्फुसा इतके लहान झालेले असते.  हा चुलीचा धूर जर डोळ्यात गेला तर डोळ्याचेही आजार बळावतात. आणि चुलीसाठी लाकडे वाहून कणा झिजतो. कारण ग्रामीण भागातले सर्वसाधारण कुटुंब वर्षभरासाठी किमान ५ टन म्हणजे ५००० किलो लाकूड वापरते. ही लाकडे डोंगरावरून आणण्याचे कामही ‘ती’लाच करावे लागते. लाकूड जवळच्या डोंगरावर जाऊन म्हणजे सरासरी ३ किमी. अंतरावरून डोक्यावरून वाहून आणावे लागते. एक मोळी साधारण ३०-३५ किलोची असते म्हणजे वर्षातले साधारण १००-१२५ दिवस रोज ४-६ तास ती बाई लाकूडफाटा आणणे असे ‘बिन पैशाचे’ काम करत असते! लाकूड फाटा आणताना २-३ तास वेड्यावाकड्या चढ-उतारांच्या रस्त्यावर हे ओझे ‘ती’च्या डोक्यावर असते. असे वजन सातत्याने वाहून आणल्यामुळे तिचा कणा झिजतो आणि त्यामुळे कण्याच्या त्रासाने ती बेजार असते. या सगळ्या आरोग्यहानीचा परिणाम असा दिसतो की चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे वय, असलेल्या वयापेक्षा जास्त वाटते.. वार्धक्य लवकर येते. शहरात रहाणाऱ्या बाईपेक्षा गावातली बाई कमी जगते. कारण गरीबीमुळे अशा समस्यांना ‘ती’ला तोंड द्यावे लागते. जसजसे वय वाढते तसतसा वजन उचलल्यामुळे होणारा त्रास जास्त व्हायला लागतो आणि त्यामुळे स्वाभाविकच हे काम वयाने लहान असणाऱ्यांकडे जाते. हे चुलीसाठी लाकूडफाटा आणायचे काम इतके अपरिहार्य असते की अनेकदा गरोदर महिलांना सुद्धा हे काम करावे लागते. त्यामुळे आपल्या गारोदर पणाच्या तपासणीसाठी येणाऱ्या महिलांमध्येही गर्भपाताच्या समस्येला सामोऱ्या जाणाऱ्या काही थोड्या नाहीत.  लाकूडफाटा तोडीने निसर्गाचीही हानी होते. एक घर किमान ५ टन लाकूड तोडते तसे आख्खे गाव लाकूड फाटा आणते. पण लाकूड तोडणारे घर वर्षाला ५ टन लाकूड तयार होईल एवढी झाडे लावत नाही. यामुळे लाकडे मिळण्याची ठिकाणे दिवसेंदिवस गावापासून लांब लांब जायला लागली आहेत. पूर्वी जंगले/ लाकडासाठीची माळराने जेवढी गावाजवळ होती तेवढी आता राहिली नाहीत, असे सर्वच ग्रामीण भागात वयाने मोठ्या असणाऱ्या महिला सांगताना दिसतात. फक्त ‘पर्यावरण दिवस’ साजरा करण्यासाठी केलेले वृक्षारोपण यासाठी उपयोगी पडत नाही.  चुलीबद्दल वैज्ञानिक माहिती: आपण ज्या चुली नेहमी बघतो, ज्या चुलीवर ग्रामीण भागात स्वयंपाक केला जातो त्या चुलीचा जाळ चुलीवरचे भांडे जेवढे गरम करते त्यापेक्षा जास्त आजूबाजूची हवा गरम करते म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचे तर पारंपारिक चुलीची कार्यक्षमता (एफिशियंसी) फारच कमी असते. किती कमी असते तर फक्त १३-१४% असते. निळी ज्योत असणारे इंधन प्रदूषण मुक्त आहे पण परवडत नाही. इंधन म्हणून गॅस वापरायचा तर दिवसाची खर्च २०-२५ रुपये येतो तेवढा करता येत नाहीत अशी घरे अजून आहेत. एखाद्या संध्याकाळच्या हॉटेलच्या जेवणाचे दीड-दोन हजारांचे सहज बिल भरणाऱ्या हल्लीच्या मध्यमवर्गाला हे माहिती तरी आहे का?  कार्यक्षमता चांगली असणारी चूल वापरणे हे अनेक आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या प्रश्नांचे उत्तर आहे ही लक्षात घेऊन स्त्री शक्ती प्रबोधनच्या कामाचा भाग म्हणून आपण आरोग्यपूर्ण, पर्यावरण पूरक चुली वाटप करण्याचे काम आपण केले, ही काम गेली ८ वर्ष सुरू केले आहे. माहिलांना आधुनिक चुलीचे प्रात्यक्षिक दाखवले. ती चूल अशी आहे की ज्या चुलीला खालून हवा येण्यासाठी पंखा आहे, तो चार्ज करायची सोय आहे. पंख्यामुळे चुलीतील इंधनाला जळताना पुरेशी हवा (ऑक्सीजन) मिळतो, त्यामुळे कार्यक्षमता ४०% पर्यन्त वाढली आहे. एरवी ७-८ किलो लागणाऱ्या लाकडं ऐवजी ८०० ग्रॅम इंधनकांडी मध्ये तेवढीच उष्णता मिळते, आधुनिक पंख्याच्या चुलीत इंधनकांडी वापरता येते जी शेतात तयार होणाऱ्या काडी-कचऱ्या पासून बनवता येते. या चुली वापराचा उद्देश एकच की ग्रामीण बाईचे आयुष्य सुधारले पाहिजे.  अशा चूल वापरण्या बद्दल जाणीव जागृती केली. चूल वापरायची प्रात्यक्षिके गावोगावी करून दाखवली. एका कुटुंबासाठी कोणीतरी ७-८ हजारांची देणगी दिली तरी वापरणाऱ्या कुटुंबाने चूल नक्की वापरावी म्हणून ५०० रुपये तरी भरायचे. या प्रत्येकक्षिकांमुळे जाणीव जागृती तर झालीच पण नावनोंदणी सुद्धा चांगली झाली. सध्या भोर-वेल्हे तालुक्याच्या दुर्गम भागात अशा ३०० पेक्षा जास्त चुलींचे वाटप केले आहे. अपवाद वगळता सगळ्या वापरात आहेत. त्यामुळे बाईला रणरणत्या उन्हाळ्यात विश्रांती मिळाली आणि वेळही मिळाला. या प्रयोगासाठी आधी वैयक्तिक देणगीदारांनी पुढाकार घेतला यशस्वी होत आहे असे दाखवल्यावर कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी या उपक्रमाला दिला म्हणून हे जमले. तरीही ते सिंधूतील बिंदू इतकेही नाही!  एका कुटुंबासाठी ५ टन लाकूड उत्पादन करायची व्यवस्था वृक्षारोपणातून करण्यापेक्षा, आहेत तिच झाडे तोडण्यापासून वाचवणे, हा हिरवाई टिकवण्याचा खात्रीशीर उपाय होऊ शकतो असे यातून लक्षात आले.  या चुली वाटापाला पूरक असणारी इंधन कांडी बनवणारी २ युनिट भागातच चालू आहेत. त्या बद्दल पुढे कधीतरी ऐकूया! पण आशा अनेक उनिटस् ची गरज आहे ही तुमच्या लक्षात आले असेल. सुवर्णा गोखले, ज्ञान प्रबोधिनी, ९८८१९३७२०६

मागे वळून बघताना १३  – आरोग्यदायक चूल Read More »

मागे वळून बघताना १२ – गोष्ट एकत्र उद्योगाची

आज पर्यंतच्या अनुभवात आपण यशस्वी झालेल्या गोष्टी बघितल्या पण सुरु केलेली प्रत्येकच गोष्ट हवी तशी यशस्वी होते असं नाही, काही वेळा, काही प्रमाणात यश पदरी पडलेले असते अशा एका उद्योग प्रकाराची गोष्ट आज पाहूया!  १९९५ साली वेल्ह्यात बचत गट सुरु झाले. अगदी किरकोळ म्हणजे महिन्याला २५ रुपये बचत असली तरी दर महिन्याला बचतीचे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न होताच, म्हणून जोडीनेच स्वयंरोजगाराचे काम सुरु केले. त्या सुमारास शासनाचा जोर होता की महिलांनी गटाने एकत्र येउन उद्योग करावा पण असे उद्योग कुठे यशस्वी झालेला ऐकलेले नव्हते. एखाद्या महिलेने स्वबळावर स्वयंरोजगाराच्या कामाला सुरुवात करणे हे त्या काळात फारच अवघड होते याची कल्पना होती म्हणून शासन म्हणतेच आहे तर गटानी एकत्र उद्योग करून बघू असे ठरवले! कुठलाही उद्योग करायचा ठरवला तर उद्योग यशस्वी होण्यासाठी तयार मालाची खरेदी कोण करणार हे माहित असायला हवे. जोपर्यंत शाळा आहेत आणि काळा फळा वापरला जातो तोपर्यंत खडू लागणारच या गृहीतावर १९९६ साली आपल्या वेल्ह्यातील महिलांनी गटाने पहिला खडू निर्मिती उद्योग करायचा ठरवला.  खडू कसा बनवायचा ते शिकवले, कच्चा माल कुठून आणायचा ते सुद्धा शिकवले. अतिशय उत्साहाने सगळे समजून महिलांनी परिश्रम करून खडू बनवले. वेल्ह्यातील सगळ्या शाळा सरकारच्या मालकीच्या मग ‘सरकारच विकत घेईल का?’ विचारायला हवे असे म्हणत बचत गटाच्या महिला पंचायत समितीमध्ये खडूचा नमुना घेउन गेल्या. आणि ‘हो’कार मिळवून परतल्या! खडूचा कच्चामाल कोणी आणायचा हे त्यांनी ठरवलं, परवडणारा दर काय असावा हे त्यांनी ठरवलं, वाटप करण्यासाठी कमीत कमी खर्च यावा म्हणून स्थानिक जीपवाल्याशी बोलणे केले, सगळं परवडणाऱ्या खर्चात होईल असे पाहिले आणि महिलांनी गावोगावी जाऊन शाळांना खडूचे वाटप केले सुद्धा. कधीच शाळा न पाहिलेल्या महिलांनी पुढच्या पिढीच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली!  आता पुढची अडचण डोळ्यासमोर आली ती म्हणजे दिलेल्या खडूच्या बिलाची वसुली कशी करायची? हे सगळं करेपर्यंत मलाही ‘शासन कसं चालतं’ याची पुरेशी कल्पना नव्हती आणि त्यामुळे मीही त्यांच्या सारख्याच  भाबड्या समजूतीत होते की ज्या अर्थी शासनाने खडूची ऑर्डर दिली त्याअर्थी पैसेही सहज मिळतील! पण तसे झाले नाही… महिनोंमहिने हेलपाटे मारावे लागले… हळूहळू गटाची प्रेरणा कमी व्हायला लागली. आता तर गटाची प्रेरणा टिकणे हेच मोठे आव्हान होउन बसलं … म्हणून या गटाला ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य विभागाच्या मदतीने ‘समिधा गोळा करणे’ असे काम मिळवून दिले. हजारो रुपयांच्या समिधा या गटांनी पुण्यात आणून विकल्या. त्यातून खडूच्या वसूलीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना तोंड द्यायची हिम्मत आली. जवळजवळ दोन वर्षांनी जेमतेम घातलेली मुद्दल बाहेर येऊन खडूचा व्यवसाय गुंडाळून ठेवायला लागला. खरेतर समिधा विकण्याचा उद्योग केल्यामुळे शासनाकडून खडूची रक्कम मिळवता आली, नाहीतर हेलपाटे मारण्यासाठी लागणारं महिला गटाचं मनोबलही कमी पडलं असतं. तर काय खडू निर्मिती उद्योग ना नफा ना तोटा या तत्त्वावर आपण बंद केला! त्यातून मी शिकले की तोटा झाला नाही हा मोठ्ठाच फायदा!! प्रयोग दुसरा : ज्ञान प्रबोधिनीची शिवायपूरला यंत्र शाळा चालू होती. आपण महिलांना फक्त एरवी महिलाच करू शकतील अशाच कामात गुंतवायचे नाही असे ठरवलेच होते तेव्हा संधी चालून आली की व्हऱ्लपूल वॉशिंग मशिनला शॉक अबसॉर्बर असेंबल करून हवे होते. मग काय महिलांना सोल्डरींग शिकवले आणि जॉब करून द्यायला सुरुवात झाली. गटाने उद्योग केला. गटाच्या नावाने चलन तयार केले. जमले.. पण कारखानाच त्या भागातून हालला त्यामुळे जास्त काळ जमलेला उद्योग करता आला नाही! तिसरा उद्योग: महाराष्ट्र ग्रामीण पत पुरवठा म्हणजेच एम आर सी पी योजनेतून 1998 च्या सुमारास आंबवणे गावात युरिया-डीएपी खताच्या ‘विक्रम’ नावाने ब्रिकेट करायला सुरुवात केली. दोन खतं एकत्र करून प्रेशरने त्याच्या ब्रिकेट होतील असा उद्योग, यंत्र खरेदी करून सुरु केला. जे कधी बघितले नाही त्याचे उत्पादन कर्ज घेउन करायचे हे शिकवताना खूपच अवघड जात होतं. शासकीय योजनेतून निधी मिळत होता म्हणून अंबवणं गावाच्या गटाला तयार केलं. या उत्पादनाची मुख्य खरेदी ज्ञान प्रबोधिनी संस्था स्वतः करणार होती त्यामुळे अडचण नव्हती. उत्पादन १ टन झाल्यावर आनंदाची बातमी कळली की संस्थे बरोबर आता गोळीखत वापरासाठी कृषी खात्यानी सुद्धा पुढाकार घेतला आहे. कृषी खाते सबसिडी देणार आहे. याचा प्रचार झाल्यामुळे मागणी चांगली वाढली. जिथे खाजगी लोकं खरेदी विक्री करणार होते ती प्रत्येक गोष्ट यशस्वी झाली पण जेव्हा कृषी खात्यानी दोन टन खरेदी करायचं आमिष दाखवून प्रत्यक्ष खरेदीही केली, तेव्हा मात्र हा उद्योग डब्यातजायला सुरुवात झाली कारण त्याची पै पै वसुली करण्यासाठी लागणारं मनोबळ गटाकडे शिल्लकच राहीलं नाही. खरंतर वेल्हे तालुक्यात महिलांनी चालवलेला हा एकमेव यशस्वी उद्योग असल्यामुळे त्या दोन वर्षात जणूकाही शासनाकाडे आलेला प्रत्येक पाहुणा हे युनिट बघायला आला, त्याने गटाला भेट देली. पण त्या पाहुण्यांचं चहापाण्याचं बिल मात्र गटाला कधीच मिळालं नाही. हा उद्योग, उद्योग म्हणून यशस्वी झाला पण पाहुणचारासाठी करावा लागलेला भरमसाठ खर्च गटाला परवडला नाही आणि गट कर्ज फेडू शकणार नाही म्हणजे ‘बुडीत’ झालं असं बँकेने जाहीर केले. पै सुद्धा परत न करता कर्ज माफ होणार होतं पण आपण अस करायला कधीच शिकवले नाही. उलट गटाला आवाहन केले की आपला गट बुडीत जातोच कसा? असं चालणार नाही, नफा झाला नाही तरी चालेल पण ना नफा ना तोटा या तत्त्वावर आपण गट बंद करू. त्यानंतर गटात पुन्हा एकदा जिवंतपणा आणला आणि युनिट चालू झालं. काळजी घेऊन.. एकही रुपयाची शासकीय ऑर्डर घेतली नाही. फक्त प्रबोधिनीच्या बचत गटाच्या संपर्काचा वापर करून, गटाने बँकेकडून घेतलेले कर्ज पै-पै फेडलं आणि यंत्र विकलं. यंत्र विकून आलेले पैसे गटाचा फायदा होता, तो गटाने वाटून घेतला. विशेष म्हणजे एका सभासदाच्या वाट्याचा नफा संस्थेला गटाने स्वखुशीने दिला….  या टप्प्याला गट गेला, या निमित्ताने गावात महिलांनी चालवलेला उद्योग ‘चालतोस कसा?’ म्हणूनही खूप भांडण झाली. त्या सगळ्यावर वेगवेगळ्या प्रकारानी महिलांनी मात केली. तालुकाभर चर्चा होऊन शेवटी कोणालाही अडचण नाही अशा टप्प्यावर हा गट उद्योग बंद केला आणि श्रीरामनगरच्या गटाने ते यंत्र खरेदी केले. श्रीरामनगरच्या गटाने नवीन उद्योगाला सुरुवात केली. हा युरिया ब्रिकेटचा एकत्र उद्योगाचा चौथा प्रयत्न!  श्रीरामनगरच्या गटाला जुन्या यंत्रावर जमतंय असं लक्षात आल्यानंतर जुने यंत्र वापरून वापरून रसायनामुळे निकामी झाले, मग नवीन यंत्र खरेदी केले. गटाच्या प्रमुख आशाताई गोगावले यांनी हवेली पंचायतीमध्ये चकरावर चकरा मारल्या आणि कुठल्याही टेबलवर एक रुपयाची सुद्धा लाच न देता काम करून घेतले. राज्यपालांच्या हस्ते गटाच्या उद्योगाचे उद्घाटन झाले. हा उद्योग गटाने व्यवस्थित चालवला. या गटामध्ये महिलांनी एकत्र काम करून युरिया ब्रिकेटचे उत्पादन केले हे खरे पण या वेळेपर्यंत आलेल्या अनुभवाने काम करणार्या गटाला दिवसाच्या रोजंदारीवर मजुरी देण्याऐवजी एक टन काम केले की ठराविक मजुरी असे गणित आपण करून दिले. हा उद्योग यशस्वी झाला. गटाला सर्व कर्ज फिटेपर्यंत ऑर्डर मिळण्यासाठी, मिळवण्याची संस्थेने मदत केली. गावातील स्थानिक लोकांनी सुद्धा मदत केली या गटानी खताची खरेदी विक्री करण्यासाठी परवाना सुद्धा काढला. जोपर्यंत गट एकसंध होता तोपर्यंत हा उद्योग अतिशय यशस्वी चालला. पाच-सहा वर्षानंतर त्याच गटाला तो उद्योग त्याच प्रेरणेने चालवता येणार नाही असे लक्षात आले, तेव्हा हा

मागे वळून बघताना १२ – गोष्ट एकत्र उद्योगाची Read More »