श्री. यशवंतराव लेले
माहेरचे एक छोटेसे रोप घेऊन सासरी जाणारी नववधू हे सारस्वत समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे ऐकले होते. खरं तर प्रत्येक नववधू ही मातृघरातून काढून पतीच्या घरी नेऊन लावलेलं एक सुंदरसं रोपच असतं. बहुधा लाजाळूचंच हे रोप असतं ! नव्या ठिकाणी रुजण्याचं, वाढण्याचं, फुलण्याचं अन् जीवन सफल करण्याचं छोटं मोठं स्वप्न, घेऊन ते आलेलं असतं ! वातावरण नवं, स्थळ अन् माळीही नवाच ! काय चांगलं अन् काय वाईट हेही सांगता येत नसतं. अनामिक हुरहुर अन् बरोबर भीतीही त्या नवलक्ष्मीच्या (की वनलक्ष्मीच्या) हृदयी दाटलेली असते. प्रसंग असतो लक्ष्मीपूजनाचा !
पारंपरिक विवाहविधीचा अखेरचा भाग असतो लक्ष्मीपूजन ! नववरासह वधूने गृहप्रवेश केल्यानंतर त्या नववधूस लक्ष्मीस्वरूप समजून घरादारानं वंदन करण्याचा हा प्रसंग ! तो मनःपूर्वक असेल, प्रेमपूर्वक असेल तर संसार सुरळीत होण्याचा संभव !
आशयाचं भान
खरोखर सर्व लग्नविधी अर्थपूर्ण होईल तर कितीतरी संसार आनंदाची उधळण करू लागतील. आजच्या साऱ्या संस्कारांमधून अर्थ लुप्तप्राय झाला आहे.
त्यामध्ये पुनश्च अर्थ भरण्याची नितान्त आवश्यकता आहे. लग्नविधींमध्ये तर याची विलक्षण गरज आहे, कारण सहजीवनातील संभाव्य धोके टाळण्यासाठी सहभागी होणाऱ्या उभयतांना त्यांचे कर्तव्य अन् अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी लग्नविधीतील मंत्रांचे अर्थ सु-स्पष्ट व्हायला हवेत, त्यावर विचार व्हायला हवा ! आपण उभे आयुष्य एकमेकांशी बांधून घेतो आहोत. बहिरंग पसंतीने परस्परांचा स्वीकार झाला असला तरी बहिरंग उडू लागण्यापूर्वीच अंतरंगातील भावसौंदर्यात बद्ध होऊन एकमेकांसाठी व अपत्यांसाठी परस्परांनी धरून राहण्याची प्रतिज्ञा करायची असते, याचे भान वधूवरांना यायला हवं अन् पुरोहितांनी त्यांना भानावर आणण्यासाठी संस्कृत मंत्र स्पष्ट करून सांगायला हवेत.
शब्दांचं ज्ञान
आजचा लग्नविधी हा मुख्यतः भोजन समारंभ, त्यासाठीचं कार्यालय आणि ‘आनुषंगिक’ म्हणून विवाह कर्मकांड असा पार पाडण्यात येतो. यात बदल व्हायला हवा. जीवनात शरीरसुखाबरोबर मानसिक, बौद्धिक, आत्मिक असेही मोठे सुख असते व कोणत्याही सहजीवनात काही ना काही देवघेव, तडजोड ही अपरिहार्यच ठरते, या गोष्टी वधूवरांनी जाणून घ्यायला हव्यात, मनोमन स्वीकारायलाही हव्यात ! पुरुषांनी तर ही गोष्ट विशेष ध्यानी घ्यायला हवी आहे. लग्नात वधू त्यांना वचन मागते व वर त्रिवार ने देतोही; पण आपण वचन मागतो आहोत, हे त्या वधूस कळत नाही अन् आपण पत्नीस काही वचन एकदाच नव्हे तर त्रिवार दिले आहे याचा पता वरासही नसतो ! धर्म, अर्थ अन् काम या कशातही आपल्या कन्येची मानमर्यादा जावयाने मोडू नये, अशी वधूपित्याची अपेक्षा असते. म्हणून तो मुलीला नववराकडे तसे वचन मागण्यास सुचवत असतो. किती विवाहित स्त्रियांनी समजून उमजून असे वचन आपापल्या लग्नात मागितले व किती नवऱ्यांनी अर्थ समजून घेऊन वचन दिले होते. याचा विचार करून पहावा. धर्म-अर्थ-काम हे शब्द कळले असतील, तर त्या शब्दांचा अर्थ काय होतो, याचा विचार लग्नप्रसंगी केला होता का ? याचा विचार व्हावा. त्रिविध पुरुषार्थाची साधना व्हावी, म्हणून धर्मपत्नीसह गृहस्थाश्रमात प्रवेश केला हे खरे; पण पुरूषार्थसाधनेत पत्नीच्या आशा-आकांक्षांचा मान ठेवून मार्गक्रमणा होणे अपेक्षित असते हे स्मरणात हवे.
कालबाह्य गोष्टी !
अनेकांच्या दृष्टीने सीमान्तपूजन हा लग्नाचा प्रारंभ असतो. सीमान्तपूजन पूर्वसंध्येस केले जाते. हा विधी वैदिक नाही व गृह्यशास्त्रांसारख्या ग्रंथातही दिलेला नाही. गावच्या वेशीवर जाऊन वराचे स्वागत करण्याचा हा रिवाज जुन्या जमान्यात ठीक होता. आता त्याची काही आवश्यकता नाही व हे श्रीमंतपूजनही नव्हे, हे ध्यानी ठेवू या. त्यातूनही काही करायचेच तर उभयपक्षांमधील एकेका जाणकार व्यक्तीने आपापल्या पक्षातील एकेका व्यक्तीचा नेमका परिचय करून द्यावा. यावेळी वर-वधूपक्षीय सारी मंडळी शांतपणे बसलेली असावीत व आपण ज्या नवीन कुटुंबाशी जोडले जातो आहोत त्यांची नीट ओळख करून घेण्याची संधी साधावी. वधूचा मामा, वराचा मामा समोरासमोर येऊन श्रीफलाचे आदान-प्रदान करून जागेवर जाऊन बसतील, तर उभयपक्षीय नातेवाईक एकमेकांना भेटल्याने चेहरा माहितीचा होण्यापेक्षा अधिक काम साधत नाही. म्हणून या विधीत अधिक अर्थ भरला पाहिजे तो चांगल्या परिचयाने.
कोणत्याही धर्म विधीत संकल्प, पुण्याहवाचन हे असतात. ते उरकून कन्यादान करण्याची प्रथा असते. हल्ली कन्या शिकलेल्या असतात, आपले दान देण्यात यावे हे त्यांना आवडतेच असे नाही. अशा वेळी स्वयंवर विधीने प्रारंभ करावा हे उचित होईल. वधू व वर हे वयात आलेले म्हणजेच सज्ञान तर असतातच; पण सुशिक्षित, विद्वान अन् सुसंस्कृतही असतात. अशा दोघांनी परस्परांना पतीपत्नी म्हणून सर्वाच्या साक्षीने स्वीकारणे म्हणजेच ‘स्वयंवर.’ या पद्धतीतही वडील मंडळींचायोग्य तो मान ठेवला जातोच.
अपेक्षांची परिपूर्ती करण्याचे अभिवचन
यानंतरचा विधी अक्षतारोपणाचा असतो. गृहस्थाश्रमात प्रवेशताना आपापल्या काय अपेक्षा आहेत, हे उभयतांनी सांगणे व परस्परांच्या अपेक्षा पुऱ्या करण्याचा शब्द देताना एकमेकांच्या मस्तकावर ‘तथास्तु’ म्हणून अक्षता टाकणे यास अक्षतारोपण म्हणतात. काळानुसार या अपेक्षा अधिक सुस्पष्ट व नेमक्या शब्दात व्यक्त करण्यात याव्यात, म्हणजे त्या पूर्ण करण्याची शक्यता वाढते. वधूने मग, श्री आणि संततीची म्हणजेच सर्व प्रकारची समृद्धी, सुंदरता आणि इष्ट अपत्यांची इच्छा व्यक्त केल्यावर ती पूर्ण करण्याचा शब्द ‘तथास्तु’ म्हणून वधूचे मस्तकी अक्षता टाकत वराने द्यायचा असतो, याचरोबर वर यज्ञ, धर्म आणि यश अशा तीन अपेक्षा व्यक्त करतो. वधूने ‘तथास्तु’ म्हणून वराच्या मस्तकी अक्षता टाकत त्यास मान्यता द्यावयाची असते. या विधीतील वराच्या अपेक्षा आजही विचार करण्यासारख्या आहेत. धर्म म्हणजे न्यायनीतीच्या आचरणाची अपेक्षा. ‘यश’ शब्दामधून असामान्य अशा सद्गुणसमूहाची साधना अपेक्षित आहे, तर यज्ञ शब्दातून उदात्त जीवनध्येयं सूचित होते. पतीस ध्येयनिष्ठ होण्यात अन् राहण्यात, न्यायनीतीचे मार्गावर साथसंगत देण्यात, आणि उत्तम गुणांची संपदा वाढवण्यात वधूने सहाय्यक व्हावे, हे तर या विधीचे उद्दिष्ट असते. एकट्या वराच्या वा एकट्या वधूच्या या अपेक्षा असतील असे नाही. प्रसंगी या सर्व अपेक्षा दोघांनीही बरोबरीने व्यक्त कराव्यात असे वाटल्यास त्या त्यांनी व्यक्त कराव्यात व आचार्यांनी त्या उभयतांच्या मस्तकी अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद द्यावा. वधू-वरांच्या याहूनही अन्य अपेक्षा असू शकतात. त्या तशा असल्यास त्यांचा उल्लेख करण्यास काहीच अडचण नाही. ज्ञान प्रबोधिनी पद्धतीच्या विवाहविधीत अनेक वधू-वरांनी हा मार्ग स्वीकारलेला आहे. प्रत्यक्षात विवाहापूर्वी यावर वाचन, चिंतन विचारविनिमय होईल, तर नेमक्या शब्दात हव्या त्या अपेक्षा व्यक्त होतील व त्यांची परिपूर्ती होण्याची शक्यताही वाढेल.
मंगल बंधन दोघांनाही हवेच
मंगलसूत्रबंधनाचा विधी प्राचीन नाही व आजही सार्वत्रिक नाही, उत्तरेत सिंदूरभरण तेवढे असते. मंगळसूत्र नसते. मंगळसूत्राचा स्वीकार करणाऱ्या वधूने वरासाठी असेच एकनिष्ठ राहण्यासाठी बंधन अवश्य घालावे. ते अंगठी, कंठी वा साध्या गोफातील ओंकार चिन्हाच्या स्वरूपाचे असले तरी चालेल; पण मंगळसूत्राइतकेच सातत्याने वराने ते चिन्ह वापरून आपल्या पत्नीनिष्ठेचे प्रमाण देत राहिले पाहिजे. साखरपुड्याच्या वेळी अंगठी दिली असेल, तर मंगळसूत्रबंधनापूर्वी ती वधूने वराकडून घेऊन बंधन म्हणून त्यास द्यावी हा पर्यायही काहींनी वापरलेला आहे.
सौभाग्यवान् होण्यासाठी पाणीग्रहण !
यानंतर असतो पाणीग्रहण विधी. परस्परांचे उजवे हात हाती घेणे हा याचा अर्थ. वराने यावेळी म्हणावयाचा मंत्र ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील आहे. पंचाऐंशी क्रमांकाचे विवाहसूक्त हे आजच्या विवाहाचे मूळ आहे. त्यातील पाणीग्रहणाचा मंत्र सूर्या नामक तेजस्वी युवतीने रचलेला असून तिच्या स्वयंवरात तिने वराकडून म्हणजे आश्विनाकडून तो म्हणवून घेतला होता. “माझ्या सौभाग्यासाठी मी तुझा हात हातात घेत आहे. माझ्यासह तू वृद्धत्वापर्यंत (सुखात) रहावेस व गृहस्थाश्रमीय कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडावीत यासाठी भग, अर्यमा, सूर्य व इंद्रांनी माझी अर्धांगिनी म्हणून तुझी योजना केली आहे”, अशा अर्थाचा तो मंत्र आहे, यातील भग ही विवाहविधींची विशेष देवता आहे तर अर्यमन् ही पितृदेवता आहे. घरातील शुभकार्यात वाडवडिलांचा, पूर्वजांचा अन् पितृदेवतांचा आशीर्वाद अभिप्रेत असल्याने अर्यमा देवतेचे स्मरण केले जाते. सूर्य ही तर सर्व ऊर्जांची, प्रेरणांची मुख्य सनातन देवता आणि इद्र हा तर देवाधिदेव !
यानंतर त्या सूर्यदेवाचा पृथ्वीवरील प्रतिनिधी, जो अग्नी त्यास पाच आहुती देण्यात येतात, मग प्रधान होमाच्या चार आहुती देऊन लाजाहोमास प्रारंभ होतो. माहेरासारखेच मामरशी प्रेमबंध उत्पन्न व्हावेत, या हेतूने लाह्यांची आहुती वधूवर मिळून देतात
अबला नव्हे प्रबला वधू
अश्मारोहण विधीचा अर्थही समजावून घेण्यायोग्य आहे. पाट्यासारख्या भरभक्कम दगडावर वधूने उजवा पाय ठेवून उभे रहावयाचे. यावेळी वर तिला म्हणतो, “या पाषाणखंडाप्रमाणे तू (गृहस्थाश्रमात) स्थिर हो. (अन्) तुझ्याशी शत्रुत्व करणाऱ्यांच्या छातीवर पाय देऊन उभी राहा व त्यांना परास्त कर”. येथे स्त्रीकडे अबला म्हणून पाहिलेले नाही. संकटप्रसंगी मुळूमुळू रडणारी व नवऱ्याच्या आधारावाचून उभी राहण्यास असमर्थ अशी ही दुर्बला नाही, तर प्रतिस्पर्ध्यांच्या छाताडावर पाय देऊन उभी राहू शकणारी खलनिर्दालिनी महिला आहे. आता हा सारा अर्थ आपण शब्दांमधून अन् व्यवहारातून हरवून बसलो आहोत. विचार-उच्चार या क्रमाने जाऊन तो आचारात उतरविण्यावाचून पर्याय नाही.
कर्मकांडातील काव्य !
अग्नीस वधूसह प्रदक्षिणा घालणे म्हणजेच परि-नयन, परिणय होय. या प्रसंगी जे मंत्र म्हणण्यात येतात ते अत्यंत काव्यमय आहेत. वर म्हणतो, “मी आकाश – अन तू पृथ्वी, मी सामगान तर तू ऋग् रूपी छंद ! मी पुरूष अन् तू प्रकृती, असा भाव मनी धरून आपण एकरूप होऊ, शंभर वर्षे जगू.” हे सुंदर, काव्यमय, भावमधुर मनोगत समजावून न देता गुरूजी अन् ध्यानी न घेता वधूवर हे लग्नविधी किती नीरस करून टाकतात..!
मैत्रीसाठी सप्तपदी
सप्तपदी हा तर साऱ्या विवाहविधीचा गाभा आहे. रूढी शास्त्र अन् कायद्याच्या दृष्टीने सप्तपदीस, अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही सप्तपदी-शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण, आदिवासी अन् अनादिवासी, भटके-विमुक्त अन् घरंदाज़ अशा समाजातील सर्व स्तरांमध्ये या ना त्या रूपात आहेच. कुठे त्या अग्नीस सात प्रदक्षिणा असतात तर कुठे विवाहकंकणाचे सात वेढे असतात, तर कुठे कुंकूमाचे सात तिलक असतात; पण सातांचे महत्त्व सारे मानतात हे विशेष ।
सप्तपदीचे सौंदर्य
पहिले पाऊल अन्नपूर्णतेसाठी तर सामर्थ्यसंपादनाच्या हेतूने दुसरे पाऊल टाकण्यात येते. तृतीय पद टाकताना समृद्धीची अपेक्षा व्यक्त केली जाते. चौथे पाऊल सुखसमाधानासाठी असते. सुप्रजाप्राप्तीसाठी पाचवे पाऊल उचलण्यात येते, तर विविध ऋतूंमधील वैविध्यपूर्ण सुखांसाठी सहावे पाऊल असते. सातव्या पावलास म्हणण्यात येते ‘सखा सप्तपदी भव’ म्हणजे “आपल्या दृढ मैत्रीसाठी आपण सातवे पाऊल टाकूया. येथे वधूवरांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची कल्पना नसून उत्तम मित्राप्रमाणे परस्परांना समजावून घेत सहप्रवास करण्याची कल्पना स्पष्ट आहे. त्यामुळे वराने वधूस “माम् अनुव्रता भव’ असे रूढीप्रमाणे न म्हणता ‘सा मे सहव्रताभव’ असे अवश्य म्हणावे. ‘तू माझ्या मागोमाग ये,’ असे म्हणायचे नाही ‘आपण बरोबरीने मार्गक्रमण करूया,’ असे म्हणणे इष्ट, अन् आवश्यक. एकमेकांना गुणदोषांसह आत्मीय मानत जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करणे हे सप्तपदीचे मर्म आहे. हे सारे अर्थसौंदर्य समजावून दिले-घेतले, तरच प्रत्यक्ष ‘जीवन म्हणजे उधळित जाणे हृदयातील आनंद’ याची अनुभूती शक्य होईल.