साळुंब्रे : शिक्षणातून ग्रामविकासाचा प्रयोग

व्यंकटराव भताने

शाळेची सुरुवात :

जून १९९१ मध्ये प्रबोधिनीच्या ग्रामविकसन कार्याला आणखी एक धुमारा फुटला, तो म्हणजे ग्राम प्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे. प्रबोधिनीच्या पुण्यातील शैक्षणिक कार्याचा नैसर्गिकरित्या ग्रामीण विस्तार जसा शिवगंगा आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांमध्ये झाला तसाच निगडी येथील शैक्षणिक कार्याचा नैसर्गिक ग्रामीण विस्तार पवना नदीच्या खोऱ्यात साळुंब्रे व अन्य खेड्यांमध्ये झाला. पुणे जिल्हयाच्या मावळ तालुक्यात दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून तेथील रोटरी क्लब पुणे नॉर्थ आणि जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था यांनी प्रबोधिनीकडे आग्रह धरल्यामुळे हा संयुक्त प्रकल्प आकाराला आला. साळुंब्रे ग्राम पंचायतीने तेथील प्राथमिक शाळेचे वर्ग सुरुवातीला वापरावयास दिले. नंतर शेजारील १० एकर जमीनही वापरावयास दिली. गेल्या २१ वर्षात या परिसरातील एक नामवंत शैक्षणिक केंद्र म्हणून जशी या ग्रामप्रबोधिनी विद्यालयाची ओळख वाढली, तशीच ते संपूर्ण तालुक्यात ग्रामीण विकासाच्या अंगाने ठसा उमटवणारे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणूनही उभे राहिलेले दिसते.

वास्तविक पुणे-मुंबई महामार्गाच्या अगदी लगतचा असा हा परिसर. विकासातील विरोधाभास तेथेही पाचवीला पुजलेले होते. मोठमोठ्या इमारती, हॉटेल्स् व स्टड फार्मस यांची उभारणी एकीकडे होत होती परंतु प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची मात्र दुरवस्था होती. वेगाने शहरीकरण होऊ घातलेल्या या भागात कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे यावरही विचार होणे आवश्यक होते. त्यातूनच मावळ तालुक्याचे काही भाग तर खूपच डोंगराळ. अध्यापक हेच ग्रामविकासाचे कार्यकर्ते आणि गावोगावाकडून येणारे विद्यार्थी हेच तेथील विकासाचे दूत. उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच ग्रामीण विकासातील काही मानदंड उभे करण्यात कसाकसा प्रयत्न या विद्यालयामार्फत झाला, याचा हा थोडक्यात आलेख.

साळुंब्रे गावाची आदर्श गावाकडे वाटचाल :

इतर कोणत्याही गावात असतात त्याप्रमाणे साळुंब्यातही अनेक गट-तट होते. विद्यालयातील अनेक प्रसंगांमधून ही भांडणे उफाळून वर यायची आणि गावगाडा मात्र तसाच परंपरागत व विस्कटलेला राहायचा. हे लक्षात आले केवळ पुस्तकी शिक्षण देऊन या भागाचा विकास होणार नाही म्हणून विविध उपक्रमांतून सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न करावा लागला. ह्या प्रश्नातूनच सार्वजनिक गणेशोत्सव घेण्याचे, ‘एक गाव एक गणपती’ करण्याचे ठरले. गावातील भैरवनाथाच्या मंदिरात गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळ-संध्याकाळ सर्वजण एकत्र आरतीला येत असत. उत्सवाच्या काळात प्रबोधनपर व्याख्याने आयोजित केली गेली. विविध स्पर्धा आयोजित करून आबालवृद्धांना सहभागी करून घेतले.

दरम्यानच्या काळात ग्राम प्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकटराव भताने यांनी संध्याकाळच्या वेळात ग्रामस्थांच्या बैठकी घेण्यास सुरुवात केली. त्याच् सुमारास शासनाचे तंटामुक्ती अभियान सुरू झाले होते बैठकींच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर गावातील एकही प्रकरण कोर्टात न्यायचे नाही, असा ठराव गावकऱ्यांन केला. या अभियानाअंतर्गत दोन लक्ष रुपयांचा शा महाराज्ज परस्कार गावाला मिळाला. एका योजनेतून दुसऱ्या योजनेची पायाभरणी होते, तशी निर्मल ग्राम योजनेची सुरुवात या गावामध्ये झाली. घरटी शौचालयाचे बांधकाम, गटार योजना, शोष खड्डे आणि कचऱ्याची सुनियोजित विल्हेवाट याबाबत स्थानिक तरुण मंडळाने पुढाकार घेतला. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात मावळ तालुक्यात चार वेळा साळुंब्याचा पहिला क्रमांक आला. तालुका पातळीवरून जिल्ह्यात व राज्यातसुध्दा क्रमांक मिळाला पाहिजे, अशी ईर्ष्या गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली. त्याचा कळस म्हणून दि. २१ मार्च २००६ रोजी साळुंब्याला निर्मल ग्राम म्हणून राष्ट्रपती पुरस्कार मिळाला! गटागटात विभागली गेलेली घरे आता एकाच रंगात रंगवली गेल्यामुळे गावात एकोप्याचे वातावरण तयार झाले. ‘गाव माझा, मी गावाचा’ या गीताला प्रत्यक्ष आचरणाचे सामर्थ्य प्राप्त झाले.

पवनामाईचा उत्सव :

औद्योगिक परिसरातील कारखाने नदीचे पाणी हे एक साधन म्हणून किंवा सांडपाणी वाहून नेण्याचा मार्ग म्हणून त्याकडे बघतात. या तुलनेत शालेय मुलांच्या मनामध्ये ही पवना’माई’ आहे, असा संस्कार रुजवण्याचे काम प्रबोधिनीने या परिसरात केले. विद्यार्थ्यांबरोबरच नदीच्या दोन्ही काठांवरील ग्रामस्थांना एकत्र करून जलपूजनाचा कार्यक्रम १९९४ पासून सुरू केला. एरवी नदीवर धुणे धुणाऱ्या महिलांनी पवनामाईची ओटी भरली. हळदी-कुंकू वाहून नैवेद्य दाखवला व आरतीसुध्दा म्हटली. नुसती पूजा करून नदी शुद्ध राहणार नाही तर आम्ही सांडपाणी थेट नदीत सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा देखील गावकरी याप्रसंगी करतात. नदी ही अनेक गावांना जोडत असल्यामुळे जलदिंडीचा उपक्रम डॉ. विश्वास येवले यांच्या सहकार्यातून सुरू झाला आहे. या लोकजागृतीचा परिणाम म्हणून इंद्रायणीमाई आणि आंद्रामाई यांचेही उत्सव याच भागात सुरू झाले आहेत. या उपक्रमात सध्या २० सामाजिक संस्था, परिसरातील माध्यमिक तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा यांच्या माध्यमातून ३० ते ४० हजार विद्यार्थी, ग्रामस्थ, शासकीय अधिकारी व उद्योजक सहभागी होतात.

वृक्षसंवर्धन :

शालेय विद्यार्थ्यांच्याद्वारे ‘एक मूल एक झाड असा उपक्रम परिसरातील ५ माध्यमिक व ७ माध्यमिक शाळांमध्ये राबवण्यात आला. १९९९ ते २०१० या कालावधीत सुमारे १ लाख रोपांचे वाटप ग्रामप्रबोधिनीतर्फे करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागातर्फे विद्यालय परिसरामध्ये रोपवाटिका उभारण्यात आल्या.

माहेरवाशीण मेळावा :

निर्मल ग्राम योजनेच्या निमित्ताने जी जागृती निर्माण झाली, त्यामुळे महिलांसाठी माहेरवाशीण मेळावा हा उपक्रम गेली १८ वर्षे सुरू आहे. साळुंब्रे, गहुंजे, दारुंब्रे, शिरगाव व गोडुंब्रे पंचक्रोशीतील ज्या युवतींचा विवाह झाला आहे अशा नववधूचे सत्कार व ओटी भरण्याचा कार्यक्रम विद्यालयात असतो. या माहेरवाशीण युवतींच्या महिलाशक्तीचे संघटनेसाठी फार मोलाचे सहकार्य होत आहे. महिला बचत गटांचे नेतृत्व अशा तरुण युवतीच सध्या करीत आहेत. या मेळाव्यास समाजातील आदर्श गृहिणी, कार्यकर्त्या, अनेक महिला सरपंच व सदस्या उपस्थित राहतात. महिलांचे प्रश्न आणि व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन यावेळी केले जात. त्यामुळे विद्यालयाचे गट, अभ्यासिका, व्यायामवर्गास चांगले सहकार्य मिळते. या उपक्रमात साधारण ३५० महिला सहभागी होतात.

पारंपरिक व आधुनिक शेतीचा समन्वय :

नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहराकडे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी पंचक्रोशीमध्ये पारंपरिक व आधुनिक शेतीचा समन्वय साधला गेला. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत स्वावलंबी एकात्मिक शेती प्रशिक्षण प्रकल्प, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे (DBT) राबवण्यात आला. याद्वारे परिसरातील ६ गावांमध्ये सेंद्रिय शेती, पशुपालन, कीड निवारण, हरितगृह प्रशिक्षण व विस्तार संशोधन या महत्त्वपूर्ण बाबींवर काम करण्यात आले. याचा परिणाम म्हणून सांगवडे (ता. मावळ) गावात शेतकऱ्यांनी ३० पॉलीहाउसेस उभी केली आहेत. तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी शेतकरी इंटरनेट मंडळ सुरू केले आहे. यामध्ये शेतावर काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांना रोज एक तास संगणक प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर क्रमशः इंटरनेट वापरणे, आपल्याला हवी ती माहिती डाऊनलोड करणे, शेती तज्ज्ञांना इ-मेल करून आपल्या शंका विचारणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. अशाप्रकारे जीवनदायी शिक्षणाद्वारे परिसरातील विद्यार्थी तेथेच स्थायिक होण्याची शक्यता वाढते आहे.

पुरूष माजी विद्यार्थ्यांचा बचत गट :

विविध व्यवसाय करणारे माजी विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी एक बचत गट सुरू केला आहे. त्याद्वारे परिसर विकासासाठी ते प्रयत्न करत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना ते मदत करतात.

मुख्याध्यापक संघ :

परिसरातील १०० शाळांच्या मुख्याध्यापकांचा एक संघ तयार केला. या शाळा प्रबोधिनीच्या उपक्रमांचे अनुकरण करत आहेत. दरवर्षी ग्राम प्रबोधिनी विद्यालय व परिसरातील एक शाळा यांच्या विद्यार्थ्यांचे एकत्रित हिवाळी शिबिर घेतले जाते. या उपक्रमाची शासन दरबारी दखल घेतली गेली.

पशुपालन :

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच एक भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घरातील एका गायीची देखभाल करतो. दर तीन महिन्यांनी तज्ज्ञ पशु वैद्यकांच्या उपस्थितीत पशुपालक मेळावा घेतला जातो. गेली १९ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात परिसरातील २०० ग्रामस्थ आपल्या पशुंसह सहभागी होतात.

पुढची वाटचाल :

२०१२ च्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये ग्राम प्रबोधिनी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे सात जणांचे पॅनल विजयी झाले व आता ते गावाच्या पुढील विकासाच्या योजनांची धुरा आपल्या खांद्यावर घेत आहेत. अशा प्रकारे स्थानिक नेतृत्वाची उभारणी हे ज्ञान प्रबोधिनीचे उद्दिष्ट ग्रामीण भागातही यशस्वीपणे साध्य होताना दिसते.

ग्राम प्रबोधिनी विद्यालयाचा हा प्रकल्प परिसराशी जिव्हाळ्याचं नातं जोडत, मावळातल्या बदलत्या ऋतूंचे रान टिपत त्यावर विचार करत वाढत आहे.

***********************************************************************************************************

………………………………………………………………………………………………………………………………….