विवेज कुलकर्णी
पार्श्वभूमी :
स्पर्धा परीक्षा केंद्र हा ज्ञान प्रबोधिनीच्या शिक्षण प्रभागातील एक विभाग. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे मार्गदर्शन या विभागातून केले जाते. गेल्या १७ वर्षांत या परीक्षा केंद्राचे शेकडो विद्यार्थी अधिकारपद मिळवून परदेशात, विविध राज्यांमध्ये व महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये उत्तम काम करीत आहेत. सुशासनाच्या माध्यमातून विषमता कमी करून समतोल व सर्वसमावेशक विकास घडविणे हे केंद्राचे ध्येयविधान (Vision) आहे. त्यासाठी प्रशासनामध्ये स्वच्छ व कार्यक्षम अधिकाऱ्यांची संख्या वाढविणे व त्यांचे जाळे (network) तयार करणे हे केंद्राचे कार्यविधान (mission) आहे. अर्थातच इतिहास-भूगोल-राज्यशास्त्र-अर्थशास्त्र- समाजशास्त्र-विदेश धोरण-लोकप्रशासन या विषयांच्या दैनंदिन शिकविण्यापलीकडे केंद्रामध्ये मूल्यशिक्षण व अनुभव शिक्षण यावर खूप भर दिला जातो.
अनुभव शिक्षणाच्या पद्धती :
अनुभव शिक्षणाच्या अनेक पद्धती व संसाधने स्पर्धा परीक्षा केंद्रात वापरली जातात. राज्य-जिल्हा अभ्यास दौरे आणि ग्रामअभ्यास या त्यातील दोन महत्त्वाच्या पद्धती. प्रबोधिनीचे आद्य संचालक कै. आप्पा पेंडसे यांनी शालेय वयातच विद्यार्थ्यांना देशप्रश्नांची प्रत्यक्ष ओळख व जाणीव व्हावी यासाठी उद्योग, आरोग्य, ग्रामविकसन अशा प्रभागांची सुरुवात केली. अनुभव ग्रामविकसन अशा प्रभागांची सुरुवात केली. अनुभव शिक्षणाच्या प्रयोगशाळा ही मर्यादा ओलांडून हे सर्व प्रभाग या देशप्रश्नांवर स्वतंत्रपणे ठसा उमटविणारे काम करण्याइतके आता विस्तारले आहेत. त्यामुळे ग्रामअभ्यासासाठी साहजिकच प्रबोधिनीच्या ग्रामविकसन विभागाबरोबर उपक्रम योजिले जातात. ग्रामविकसन प्रभागातील वैविध्यपूर्ण कामांचा, त्यातील लोकसहभागाच्या पुढे जाऊन ‘लोकांच्या कामातील संस्था सहभाग’ या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम होतो.
ग्राम अभ्यास भेटी :
सुरुवातीला राळेगणसिद्धी- हिवरेबाजार येथे विद्यार्थ्यांची अभ्यासभेट व्हायची. पण २०१० पासून गेली चार वर्षे शिवगंगा-गुजवणी-कानंदी खोऱ्यातील गावांमध्ये गटागटाने विद्यार्थी जातात. या विद्यार्थ्यांना ‘सहभागीय ग्राम आकलन (PRA)’ या तंत्राची ओळख प्रबोधिनीचे कार्यकर्ते श्री. प्रमोद सडोलीकर यांनी करून दिलेली असते. त्याशिवाय सुभाषराव, रामभाऊ, सुवर्णाताई, बागेश्रीताई, विवेकराव यांच्याशी ग्रामीण प्रश्न व आपल्या कार्यक्षेत्रातील गावे-माणसे यांविषयी या विद्यार्थ्यांच्या सविस्तर चर्चा झालेल्या असतात. दि. २४ ते २६ जानेवारी अशी तीन दिवस ग्रामभेट असते. यामध्ये मुख्यतः सामाजिक नकाशा, संसाधने नकाशा, काळरेषा तयार करण्यासाठी शिवारफेरी, गावफेरी, विविध ग्रामस्थांच्या भेटी घेणे असे उपक्रम योजले जातात. २५ च्या रात्री महिला सभा घेण्याचा प्रयत्न असतो. प्रबोधिनीच्या कामाचा प्रभाव असणाऱ्या भागात उत्तम सभा होतात, महिलांचे सक्षमीकरण जाणवणारे असते. ग्रामसभाही बऱ्या होतात. महामार्गाजवळच्या गावापासून ते वेल्ह्यापलीकडे २५-३० कि.मी. घाटमाथ्यावरच्या गावापर्यंत अभ्यासाची range असते. त्यातून अत्यंत अविकसित ते विकसित गाव असा एक पटच समोर येतो.
परत आल्यावर झालेल्या अनुभव शिक्षणाची निवेदने होतात. अभ्यासाचे पोस्टर्सच्या साहाय्याने सादरीकरण होते. त्यावर प्रबोधिनीतील अनेक ज्येष्ठ लोक प्रश्न विचारतात आणि अत्यंत सविस्तर व शिक्षणापलीकडे समाजाशी नातं जोडणाऱ्या चर्चा/sharing होते. विद्यार्थी गावांशी आणि प्रबोधिनीशीसुद्धा एका भावनिक नात्याने जोडले जातात.
शिवगंगा-गुंजवणी नद्यांच्या खो-यांमधील जवळजवळ १३७ गावांमध्ये प्रबोधिनीचे विविध प्रकारचे विकासाचे काम चालते. त्याची माहिती करून घेत गावामधील स्थानिक प्रशासनाचा अंदाज घेण्याचा उपक्रम UPSC चे विद्यार्थी अनेक वर्षे करत आहेत.
‘प्रेरणा १०’ या तुकडीतील विशाखा शिंदेने केंद्राच्या वार्तापत्रात लिहिले आहे :
पहिला दिवस मुख्यतः गाव समजून घेण्यात आणि स्थानिकांच्या डोळ्यातील प्रश्नचिन्हे दूर करण्यात गेला. गावाच्या मुख्य समस्या काय आहेत, शासन कुठपर्यंत पोहोचले आहे? योजना राबविण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत आणि एकूणच ग्रामस्थांचा ‘शासकीय यंत्रणे’कडे पाहण्याचा दृष्टिकोन व विकासाची संकल्पना काय आहे हे जाणून घेण्याचा मुख्य उद्देश होता. “Grass-Root Democracy’, ‘Decentralisation’, ‘Top Down Approach’ या अभ्यासात शिकत आलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायच्या होत्या. ‘महिला सभा’ व ‘ग्राम सभा’ हे त्यातले महत्त्वाचे घटक होते.
त्याच उद्देशाने ३ दिवसांच्या वेळापत्रकात गावातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या (सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळेतील मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आणि अन्य ज्येष्ठ व्यक्ती) भेटी घेतल्या. गावातील युवक, शाळेतील मुले यांच्याशी गप्पा, गावफेरी व शिवारफेरी या बरोबरच ‘महिला सभा’ आयोजित केली. गावाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्व महिला एकत्र येऊन महिलाप्रश्नावर चर्चा झाली. बचत गटाचे महत्त्व पटवून दिले आणि सर्वसंमतीने वेगवेगळे ठराव पास करून ग्रामसभेकडे पाठवण्यात आले. या सर्व प्रयत्नांत आम्हां मुला-मुलींची कसोटी लागत होती.
तीन दिवसांच्या या गावभेटीत खूप गोष्टी समजल्या. ९०% शेतीवर अवलंबून असलेल्या या गावातल्या शेतकऱ्याला ‘शासन आपल्यासाठी काय करतेय?’ हे माहीत नसते, माहीत असले तरी लालफितीच्या कारभाराला हा सामान्य गावकरी वैतागतो. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी त्याला पुरेशी माहिती नसते. सधन शेतकऱ्याला फायदा मिळतो. पण ३ ते ५ एकर शेती असलेल्यांना कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाही. विहीर घेणे, मोटार बसविणे, बागायती शेती करणे त्यांना परवडत नाही.
पण काही ठिकाणी आशेचे किरण दिसत होते. वेगवेगळ्या NGO’s मार्फत शाळेत संगणक आलाय. बरीच गावे ‘निर्मल ग्राम’ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही गावात महिलांनी एकत्र येऊन दारूबंदी घडवून आणली. बचतगटाच्या माध्यमातून काहींनी लघुउद्योग सुरू केले आहेत. श्रमदानातून बऱ्याच गावांमध्ये बंधारे बांधले आहेत.
हे सर्व समजून घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की गावाचा विकास होण्यासाठी ‘स्थानिक नेतृत्व’ आणि ‘ग्रामस्थांची एकजूट’ खूप महत्त्वाची आहे. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक असाव्यात. लोकांचा सहभाग आणि इच्छा असेल तर खूप गोष्टी सहज साध्य होतील.
‘प्रेरणा १०’ या तुकडीतील एक विद्यार्थी लिहितो :
गांधीजींच्या ‘खेड्यांकडे चला’ या मंत्राला स्मरून गेली पाच वर्षे ‘सर्वसमावेशक वाढ’ हे धोरण सरकार राबवत आहे. केलेल्या अनेक योजना ११ व्या पंचवार्षिक योजनेतील या शेवटच्या वर्षी गावांपर्यंत किती प्रमाणात पोहोचल्यात व पाच वर्षांत झालेली ही वाढ किती प्रमाणात सर्वसमावेशक झाली आहे याचा एक अंदाज घेण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘प्रेरणा ११’ तुकडीची ‘Village visit’ ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे आयोजिली होती.
तीन दिवसांमध्येच गावातील परिस्थितीचा कसा आढावा घ्यावा, लोकांकडून ‘खरी-खुरी’ माहिती कशी मिळवावी, यासाठी प्रमोद सडोलीकर सरांनी ‘Participatory Rural Appraisal’ या विषयावर प्रेरणा तुकडीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व ‘शितावरून भाताची परीक्षा’ कशी करावी हे सांगितले. श्री. सुभाषराव देशपांडे यांनी Issues in Rural तीन दिवसांमध्येच गावातील परिस्थितीचा कसा आढावा घ्यावा, लोकांकडून ‘खरी-खुरी’ माहिती कशी मिळवावी, यासाठी प्रमोद सडोलीकर सरांनी ‘Participatory Rural Appraisal’ या विषयावर प्रेरणा तुकडीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व ‘शितावरून भाताची परीक्षा’ कशी करावी हे सांगितले. श्री. सुभाषराव देशपांडे यांनी Issues in Rural Development या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. विवेक गिरीधारी सरांनी ‘प्रेरणा’ गटाशी बोलताना पाणलोट क्षेत्र विकास व गावात काम करण्याच्या पद्धतींविषयी मार्गदर्शन केले. बागेश्रीताई पोंक्षे यांनीही गावातील आपल्या कामाबद्दलचे अनुभव गटासमोर मांडले व कामाच्या पद्धती व अडचणी, विविध दृष्टिकोण याबाबत गटाशी संवाद साधला.
‘प्रेरणा ११’ या तुकडीतील आराधना निकमने आपले अनुभव शब्दांकित केले आहेत :
शिवापूर येथील कृषी तंत्रनिकेतन पाहणे, मांगदरी येथील पाणलोट क्षेत्र विकासाचे काम पाहणे व या परिसरातील बचतगटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांशी गप्पा, असा दिवसभराचा कार्यक्रम होता. या सर्व कामांची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांच्या लक्षात यावी म्हणून प्रबोधिनीतील ग्रामविकसन विषयातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रामभाऊ डिंबळे यांचे मार्गदर्शक व्याख्यान शिवापूर येथील ‘राम-सीता पुराणिक प्रशिक्षण केंद्रात’ झाले. शिवगंगा खोऱ्यातील कामाच्या सुरुवातीपासून आजवरच्या वाटचालीचा प्रवास रामभाऊंनी त्यांच्या मोकळ्या, मिष्किल शैलीत सांगितला.
कालमापनाची ऐसपैस पद्धत इथे असते, आम्ही मिनिटांवर पळत नाही असं सांगत रामभाऊंनी जवळजवळ दीड तास ग्रामीण लोक स्थानिक ठिकाणी राहून सक्षम होण्यासाठी ग्रामविकसन पूरक ठरलं पाहिजे, हे विद्यार्थ्यांना समजावून दिलं. कामाची आवश्यकता पटवून देताना ग्रामस्थांची मानसिकता हळूहळू बदलावी लागते हे मनावर ठसवलं. शिवापूर, गुंजवणी, वेल्हा भागातील शौचालयासारख्या मुलभूत गरजांपासून, दारूबंदी, कृषी तंत्रनिकेतन, पाणलोट क्षेत्र विकासापर्यंतची कामे कशी उभी राहिली याचे किस्से सांगितले. त्याच वेळेला ‘Real Time Development’ चा अर्थ समजून घेत सर्वसामान्य माणसाला ‘सत्य’ समजून घेण्याची क्षमता यावी, यासाठीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी आग्रहाने मांडली.
अनेक पातळींवर ग्रामीण कायापालट करण्याच्या, तेथील मनुष्यबळ विकसित करण्याच्या उद्देशाने, निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीने ही सहल संस्मरणीय ठरली. ‘या माझ्या भारत देशी सुखस्वप्ने फुलुनी यावी’, हा या सर्वांनी घेतलेला ध्यास मनात ठसवून पुढे असेच काम करण्याची प्रेरणा आम्ही यानिमित्ताने मनात रुजवली. येथील शेतावर मोकळ्या पटांगणात घेतलेले चुलीवरचे भोजन आणि निसर्गसान्निध्यातील फेरफटका यामुळे ताजेतवाने होऊन आम्ही रामभाऊंनी सांगितलेली Real Time Devel-opment प्रत्यक्ष पाहिल्याच्या आनंदात पुण्यात परतलो.
अभ्यास भेटींचा ठसा :
प्रशासनात जाऊन देशासाठी काम करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हा ग्रामअभ्यास खोलवर ठसा उमटवणारा ठरतो. म्हणूनच महाराष्ट्रात गेल्या वर्षी प्रथम क्रमांकाने IAS झालेला अमृतेश औरंगाबादकर मसूरीच्या प्रशिक्षणादरम्यान village visit ला जातो आणि मला फोन करतो; “सर, गुंजवणीकाठच्या कोदवडे गावात जे शिकायला मिळालं ते इथं उत्तरप्रदेशात नाही मिळालं. आपल्या ग्राम अभ्यासात आयुष्यभर उपयोगी पडणारं ज्ञान व शहाणपण मिळाल्यासारखं वाटत ” !
*************************************************************************************************************