लेख क्र. १५
१९/६/२०२५

धर्मनिर्णय मंडळाच्या कार्यास महिलांचाही हातभार बराच लागला. धार्मिक विधींमध्ये स्त्रियांचे अधिकार पुरुषांच्या बरोबरीचे आहेत, तसेच सकेशा विधवा धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकतात असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय मंडळाने नोंदवले आहेत. तथापि नव्या युगातील महिलांच्या सामाजिक आणि संसारिक अडचणी दूर व्हाव्या अशासाठी मंडळाने एकही अधिवेशन घेतले नाही किंवा तसला विशेष निर्णय केलेला नाही असा एक आक्षेप होता. हा आक्षेप दूर करावयाचा तर महिलांनी आपले प्रश्न मांडले पाहिजेत. तसे करण्याविषयी मंडळाकडून सुचविण्यात आले होते, पण त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. सुदैवाने लोणावळे येथे राहाण्यास आलेल्या सौ. गोदूताई जांभेकर यांनी या विषयावर लिहिण्याचें मान्य करून लेखाच्या रूपाने आपले विचार प्रसिद्ध करण्यास मंडळाकडे पाठविले. तो लेख मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वृत्तांतात (सन १९५९) प्रकाशित झाला. ६५ वर्षांपूर्वीचा हा लेख आजही विचार करायला लावणारा व बदल करण्यास उद्द्युक्त करणारा आहे म्हणून येथे पुनर्प्रकाशित करीत आहोत.

समाजधुरीणांनी लक्ष देण्यासारखा विषय – “पूर्वी लग्ने लहानपणी होत आणि एकत्र कुटुंबपद्धति प्रचलित होती. त्यामुळे वडील माणसांचे वळण मुलामुलींना सहजच लागे. सणवार, पूजा-अर्चा, स्वयंपाक इत्यादी गोष्टी नेहमी दृष्टीस पडत आणि त्यांत मुलामुलींना भाग घ्यावाच लागे. याचा परिणाम असा होई की तसल्या गोष्टींबद्दल नव्या पिढीच्या मनात आस्था व प्रेम निर्माण होत असे. लहानपणी नव्या गोष्टी उचलण्याकडे मुलामुलींचा स्वाभाविक कल असतो आणि त्या वयात कोणतीही गोष्ट चटकन अंगवळणी पडत असते. हे कसे विचारावे ते कसे करावे असले प्रश्न या वयात उपस्थित होत नसतात. याउलट मोठेपणी लग्न झालेल्या मुली जरी तोंडाने बोलून दाखवित नसल्या तरी कित्येक गोष्टी त्यांना पसंत नसतात. याचा काही दिवसांनी त्यांच्या मनावर आणि शरीरावर परिणाम घडून येतो. तसे होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घरातील वडील मंडळींनी घेतली पाहिजे. आता सर्वच वातावरण पार बदलले आहे. हा बदल इतका मोठा आहे की गेल्या साठ वर्षातील सर्व गोष्टी पाहात असलेल्या अनुभवी मनुष्याच्या मनात गोंधळ निर्माण झाल्यावाचून रहात नाही. हल्लीच्या बदललेल्या राहणीला योग्य काय, संसाराची घडी नीट कशी बसवावी, सध्याच्या परिस्थितीच्या वळणात पहिल्या कोणत्या गोष्टी बसतात व कोणत्या नवीन गोष्टी समाजास सुखावह होतील इत्यादि गोष्टींचा निश्चय करणे सोपे नाही. पण समाज-धुरीणांनी इतर विषयांप्रमाणेच या विषयात लक्ष घातले तर सुधारणा झाल्याखेरीज राहणार नाही.
गृहकृत्ये, धार्मिक व्रते, उत्सव, समारंभ, दान धर्म, श्राद्धपक्ष इत्यादि सुलभरीतीने कसे पार पाडावे हे विचारपूर्वक ठरविणे अत्यंत जरुरीचे आहे. समाजसुधारक म्हणतात त्याप्रमाणे जर आता स्त्रियांची पात्रता पुरुषांच्या बरोबरीने आहे तर घरातील संसाराची जास्त जबाबदारी पुरुषांनी का घेऊ नये? मुलांस वळण लावणे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे, आजार, स्वयंपाक, हिशेब ठिशेब, बाजारहाट करणे, रुढीप्रमाणे चालत आलेली व्रते अशा अनेक गोष्टींची दुहेरी तिहेरी जबाबदारी हल्लीच्या राहणीत स्त्रियांवर पडत असते. शिवाय माता होण्याची जबाबदारी निसर्गानेच त्यांच्यावर टाकलेली आहे. याचा कोणी जिव्हाळ्याने विचार करतो काय ?
रूढी-परंपरांचे पालन – आपले आचार आणि कित्येक रूढी एकत्रकुटुंबपद्धति असतानाच्या आहेत. आता काळ पालटून नवराबायको स्वतंत्रपणे वेगळी राहण्याची जरूरी उत्पन्न झाली आहे. अशावेळी नवरा, बायको व इतरांनी आपापली जबाबदारी ओळखून एकमेकांना मदत केली पाहिजे. अशा छोट्या कुटुंबांत कोणकोणत्या रुढी पाळाव्यात आणि कोणत्या पाळण्याचे सोडून द्यावे याचा धार्मिक अधिकार असलेल्या मंडळींनी एकदा साकल्याने निर्णय करणे जरूर आहे. जुन्यांतल्या चांगल्या गोष्टी व नव्यांतील उपयुक्त व सुखावह गोष्टी घेऊन समाजाला चांगले वळण लावण्याची कामगिरी एकट्यादुकट्याच्या आटोक्यात नाही. सर्वांनीच मुख्यतः समाजधुरीणांनी ठिकठिकाणी जाऊन स्नेहसंमेलने भरवून ह्या गोष्टीचा छडा लाविला पाहिजे.
मासिक धर्म – स्त्रियांच्या मासिक पाळीचीच गोष्ट घ्या! ती जरी नैसर्गिक असली तरी तो एक आजारच असल्यासारखा असतो. कित्येकांना तर त्याचा फारच त्रास होतो. यासंबंधांत बरेच कडक निर्बंध होते. तितके आता ठेवले नाही तरी त्या दिवसांत विश्रांतीची आवश्यकता असते हे ध्यानात ठेऊन वागणे अगत्याचे होय. स्वच्छतेच्या दृष्टीनेही या बाबतीत थोडा विचार केला पाहिजे. म्हणून या विषयात स्त्री डॉक्टरांच्या सल्ल्याने काही गोष्टी ठरवून घेऊन त्याचा आचार सुरू होणे अगत्याचे झाले आहे. मागच्या काळात कित्येक गोष्टींचे नियम अति कडक असत. अलिकडील राहणीला ते जरा चमत्कारिक वाटले तरी पण मला जो अनुभव येतो तो ध्यानात घेतल्यास आणि काही दुष्परिणामांकडे लक्ष दिल्यावर ते कडक नियमच बरे होते असे वाटल्यावाचून रहात नाही.
जबाबदारीची जाणीव – अलीकडे बोकाळलेला निष्काळजीपणा, ह्यात काय त्यात काय असली मनोवृत्ती वाढत आहे त्यामुळे अनुचित गोष्टी हातून घडून जातात आणि कसलाच धरबंद न राहिल्यामुळे घरातील वळण बिघडत जाते. मनावरील दाब आणि त्यागप्रवृत्ति कमी होत गेल्याने त्याचा परिणाम प्रकृतीवर आणि आजूबाजूच्या वातावरणावर झाल्याशिवाय राहत नाही. मूळ आरोग्यच नीट नसेल तर असल्या मातांच्या हातून होणार काय व प्रजा तरी चांगली कशी निर्माण होणार? याकडे लक्ष दिले पाहिजे. लहान वयात लग्ने व्हावी असे म्हणणारे आता कोणीच राहिले नाहीत. एकापरी हे ठीक आहे. पण मोठेपणी लग्ने झाल्यावर कशाप्रकारच्या जबाबदाऱ्या त्या जोडप्यावर पडत आहेत हे पाहिले पाहिजे. ‘अगबाई इतकी शिकली मग घरातच का बसते ही? हे येत नाही का? ते कळत नाही का?’ इत्यादि अनेक दूषणे त्यांना सहन करावी लागतात. अशी दूषणे इतर मंडळीकडून तर मिळतातच पण कित्येकवेळा नवऱ्याकडूनही दोषारोप केला जातो. मुलगी मोठी असली तरी ती भांबावून जाणे साहजिक असते. कारण तिच्या समोर अचानक कित्येक गोष्टी येऊन उभ्या राहत असतात. तिचे पूर्वायुष्य अगदी फुलपाखरांप्रमाणे गेलेले असते. अभ्यास करावा, खेळावे, बागडावे, आईच्या प्रेमळ सहवासात वरवरची एकदोन कामे केली की झाले. हे आयुष्य कोठे व लग्न झाल्यावरचे आयुष्य कोठे?
संसारात पडले की अनपेक्षित गोष्टी घडतच असतात. त्यांस निभावून घेणे फार कठीण होते. त्यात आणखी पावलोपावली बदलत जाणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते ते निराळेच. सर्वात मुख्य म्हणजे माता होण्याबरोबर अनेक गोष्टींची जबाबदारी अंगावर येऊन पडते इकडे किती जणांचे लक्ष जात आहे? हातचे सोडून पळत्याच्या पाठीला लागावयाचे या म्हणीप्रमाणे बहुतेकांची स्थिती होत आहे. संसाराची गाडी एकदा का रुळावरून घसरली की ती आवरणे फारच कठीण होते. त्याविषयी अगोदरपासून सावध असावे लागते. नेहमी सभासंमेलनांतून ऐकण्यात येते की स्त्रियांनीं धर्म आणि व्रते वैकल्ये सांभाळली आहेत. ही जर चांगली गोष्ट आहे तर या बदललेल्या परिस्थितीत वरील गोष्टींना पुरुषांनी थोडा हातभार का लावू नये? शिक्षण केले, जिवाचा आटापिटा करून नोकऱ्या केल्या व इतरही गोष्टी सावरल्या तरी नैसर्गिक गोष्टी ज्या काही आमच्या वाट्याला आहेत त्यांच्याकडे कानाडोळा करून भागणार नाही. जर दणकट प्रजा निर्माण व्हावयास हवी आणि आरोग्य नीट राहिले पाहिजे तर या बदललेल्या काळात स्त्रियांच्या नाजूक गोष्टी ध्यानात आणून निरर्थक आणि अत्यंत त्रास देणाऱ्या बाबी टाळण्याचा मार्ग सुधारकांनीं अवलंबिला पाहिजे. योग्य ती सुधारणा करून कष्टाची व खर्चाची बाब व सामाजिक वळण ज्या गोष्टीने सुधारेल तेच समाज धुरीणांनीं करण्याची वेळ आता आलेली आहे.”