गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान

लेख क्र. १९

२३/६/२०२५

अवेस्ता आणि संस्कृत या भाषांमध्ये साम्य दाखविणारे संशोधन आपण पाहिले. असे अनेक वैविध्यपूर्ण अल्पकालीन व दीर्घ प्रकल्प पुढे संत्रिकेमध्ये झाले. १९८३ साली प्रा. मो. वि. महाशब्दे, विभाग प्रमुख, संत्रिका यांनी ‘संस्कृत वाङ्मयात आढळणारं प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्याला गती दिली. या प्रकल्पाला नागपूरचे ७४ वर्षीय स्थापत्य विशारद व व्यासंगी संशोधक श्री. गो. ग. जोशी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यानंतर १९९४ पर्यंत विविध विषयातले अभ्यास वर्ग घेतले गेले. १९९४ साली सुरू झालेले एक महत्त्वपूर्ण संशोधन म्हणजे गरुड पुराणोक्त आयुर्विज्ञान. प्रा. शुभांगी देवरे यांनी मा. श्री. यशवंतराव लेले यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन १९९६ साली पूर्ण केले. गरुड पुराणाचे वाचन एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतरच करायचे असते, ते घरात ठेवू नये, या पारंपरिक जनमानसात रूढ असलेल्या दृढ संकल्पनेला छेद दिला गेला. म. म. पां. वा. काणे स्मृती विश्वस्त न्यासाने अर्थसाहाय्य केले. पुढे ह्या शोधप्रबंधाचे पुस्तकात रूपांतर झाले. येथे शोधप्रकल्पातील महत्त्वाचा भाग प्रकाशित करीत आहोत.

गरुड पुराण एक जीवनोपयोगी पुराण

सामान्यपणे आठव्या ते दहाव्या शतकात लिहून पूर्ण झालेले हे पुराण उगीचच एक अशुभपुराण म्हणून मानले जाते. या पुराणाच्या प्रेतकल्पामध्ये आलेल्या विषयांमुळे आजही काही घरात एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर हे पुराण (प्रेतकल्पाचा भाग) वाचण्याची प्रथा क्वचित् आढळते. खरंतर गरुड पुराण हे ‘पूर्वखण्ड’ व ‘उत्तरखण्ड’ अशा दोन भागांमध्ये विभागलेले आहे. यातील उत्तर खंडामध्ये प्रेतकल्प (यमलोकाच्या मार्गाचे वर्णन, मरणोत्तर करावयाच्या विधींचे वर्णन इ.) हा भाग येतो. परंतु गरुड पुराण म्हटले की फक्त प्रेतकल्पाचा भागच सर्वसामान्य लोकांना माहीत असतो.

इतर पुराणांमध्ये येतात ते विषय या पुराणात आहेतच. शिवाय सदाचाराने, नीतीने कसे वागावे हे सांगणारी वचनेही यामध्ये आहेत. प्रत्येक माणसाला सुखी-संपन्न व निरोगी जीवन हवे असते. ते लाभावे यासाठी आवश्यक असा आयुर्वेद या पुराणामध्ये त्रेसष्ठ अध्यायांमध्ये आलेला आहे, पैकी ५७ अध्यायांमध्ये पूर्णांशाने व ६ अध्यायांमध्ये अंशतः आयुर्वेद आला आहे. ‘ब्राह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन केलेली कर्मेच माणसाला पुण्य मिळवून देतात’ अशा प्रकारची शिकवण देऊन पुराणांनी आयुर्वेदाचे नियम पाळायला लोकांना प्रवृत्त केलेले दिसते. आयुर्वेदाचे शास्त्रीय ग्रंथ वाचण्याकडे, सामान्य लोकांची सहज प्रवृत्ती नसते. याउलट पुराणे मात्र देवळांमधून सांगितली जात असल्याने लोकांच्या कानावरून गेलेली असतात. आयुर्वेदासारखे महत्त्वाचे शास्त्र, प्रामुख्याने ‘अग्नि’ व ‘गरुड’ पुराणांनी लोकांपर्यंत पोहचविल्याने या पुराणांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

गरुड पुराणामध्ये निरनिराळ्या रोगांची लक्षणे, त्यावर करावयाचे औषधोपचार, निरनिराळे सिद्धयोग (उदा. गर्भकर औषधोपचार, सौंदर्य वर्धक औषधोपचार) व औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर या पुराणाच्या प्रेतकल्पाचा भाग वाचण्यापेक्षा आधीचं संपूर्ण पुराण वाचणे जास्त फायद्याचे आहे.

त्याकाळी स्वसंरक्षणासाठी आवश्यक असणारी अशी धनुर्विद्या जशी यामध्ये आहे तशीच रत्नचिकित्सा, ज्योतिषशास्त्र, व्याकरण, छंदःशास्त्र ही शास्त्रेही यामध्ये आहेत. या सगळ्या विषयांचा विचार केला तर हे एक अशुभ पुराण नसून यथार्थतेने वैष्णव पुराण आहे (विष्णू-सृष्टीच्या धारणाचे काम करतो असे मानले जाते. त्यानुसार हे पुराण; शरीर, मन यांच्या रक्षणास साहाय्यकारी आहे.) याचा प्रत्यय येईल.

गरुड पुराणातील आयुर्वेद

पुराणांची जी पंचलक्षणात्मक व्याख्या प्रचलित आहे त्यानुसार सृष्टीची उत्पत्ती, प्रलय, प्रलयानंतर पुन्हा उत्पत्ती, निरनिराळे राजवंश, त्यांचे कर्तृत्व, त्यांच्या वंशावळी, मन्वन्तरे हे पुराणांचे वर्ण्य विषय असतात. परंतु गरुड पुराणाच्या एकूण ३१८ अध्यायांपैकी फक्त १४ अध्यायांमध्येच वरील पंचलक्षणांना अनुसरून विवेचन आहे. हे देखील या पुराणाचे एक वैशिष्ट्यच मानावे लागेल.

या पुराणात जे विविध उपयुक्त विषय आले आहेत त्यापैकी आयुर्वेदाची मांडणी अधिक विस्तृत आहे. या पुराणाच्या दोन अध्यायांमध्ये वैद्यकशास्त्रातील ‘स्वस्थवृत्ताची’ माहिती संकलित केली आहे. सुरुवातीला निरोगी अवस्थेतील व रुग्णावस्थेतील स्वच्छतेविषयीचे नियम सांगून पुढे ब्राह्म, आग्नेय, वायव्य, दिव्य, वारुण व यौगिक असे स्नानाचे सहा प्रकार सांगितले आहेत.

अध्याय १४६ पासून १६७ पर्यंतच्या २१ अध्यायांमध्ये ताप, खोकला या सामान्य विकारांबरोबरच हृद्रोग, क्षय, कुष्ठ या मोठ्या रोगांची लक्षणे सांगितली आहेत. रोगांच्या लक्षणांची ही माहिती वाग्भटकृत अष्टांगहृदयाशी मिळतीजुळती आहे. त्यापुढे केवळ एकाच अध्यायात पुराणकर्त्याने आयुर्वेदातील शरीरविषयक विचार मांडले आहेत. तीन दोष, सात धातू, त्यांची कार्ये, स्थाने, वनस्पतींचे गुणधर्म, रस, वीर्य, विपाक, षड्रस इत्यादी माहिती दिली आहे. पुढे १३ अध्यायांमध्ये निरनिराळ्या रोगांवरची औषधे सांगितली आहेत. ही औषधे केवळ वनस्पतींची नसून पंचगव्य, विविध प्राणी-पक्ष्यांचे मांस, सैंधव, जवखार, मनशीळ यांसारखी खनिजे तसेच सोने, चांदी, तांबे, कथिल इत्यादी धातूंचेही औषधी उपयोग सांगितले आहेत. या औषधांबरोबरच मंत्र, तंत्र, जप, होमहवन इत्यादी उपायही सांगितले आहेत. साप, विंचू, कीटक यांच्यामुळे होणाऱ्या विषबाधेवरील उपचारांचे संकलनही यामध्ये केले आहे. औषधांबरोबरच भूक नीट लागावी, झोप यावी, आवाज मधुर व्हावा, स्मृती तल्लख व्हावी म्हणून काही उपायही पुराणकर्त्याने सुचविले आहेत. तारुण्यवर्धक व सौंदर्यवर्धक सिद्धयोगांचा समावेशही यामध्ये आहे.

मानवी आयुर्वेदाबरोबरच त्याकाळी प्रवासाला व वाहतुकीला उपयोगी पडणाऱ्या हत्ती व घोड्यांचा आयुर्वेदही थोडक्यात सांगितला आहे. औषधोपचारांची माहिती सांगून झाल्यावर पुराणकाराने पुराणात सांगितलेल्या औषधी वनस्पतींचा कोशही एका स्वतंत्र अध्यायात दिला आहे. अशाप्रकारे स्वस्थवृत्त, द्रव्यविज्ञान, रोगनिदान, चिकित्सा, सिद्धयोग, पशुआयुर्वेद, निघण्टु इत्यादी आयुर्वेदीय भागांची माहिती या पुराणात मिळते.

गरुड पुराणातील इतर विषय –

रत्नशास्त्र – आयुर्वेदाप्रमाणेच प्राचीन भारतीयांनी प्रगती साधलेले आणखी एक शास्त्र म्हणजे रत्नपरीक्षा. रत्नशास्त्राची माहिती या पुराणात अकरा अध्यायांमध्ये आलेली आहे. वज्र, मोती, पद्मराग, मरकत, इन्द्रनील, वैडूर्य, पुष्कराज, कर्केतन, भीष्म, पुलक, रुधिराक्ष, स्फटिक व विद्रुम इत्यादी रत्ने कोठे मिळतील, त्यांची सत्यता कशी पडताळावी, त्यांचे मूल्य कसे ठरवावे, त्यांची शुभाशुभ लक्षणे कोणती, या विषयांची चर्चा या अध्यायांमध्ये केलेली आहे. उत्तम रत्नपरीक्षक म्हणून ‘आचार्य व्याडी’ यांच्या नावाचा उल्लेख मिळतो. ‘महाप्रभावसिद्ध’ असे विशेषण त्यांना दिले आहे. समुद्रगुप्त विरचित ‘कृष्णचरित’ या ग्रंथात रसाचार्य व रत्नपरीक्षक म्हणून ज्या व्याडी आचार्यांचा उल्लेख येतो ते व पुराणातील आचार्य व्याडी ही एकच व्यक्ती असावी असे काही पुराणतज्ज्ञांचे मत आहे. उत्तम रत्नांचा आंतरराष्ट्रीय व्यापारही त्याकाळी काही भारतीय करीत असत.

व्याकरण व छंदःशास्त्र – व्याकरण आणि छंदःशास्त्राविषयीची माहितीही पुराणकर्त्याने संकलित केली आहे. या दोन विषयांसाठी या पुराणातील सात अध्याय वापरले आहेत. ‘सुप्तिङन्तं पदं ख्यातम्।’ अशी पदाची व्याख्या देऊन पुढे सात विभक्ती कोणत्या, व्यंजनसंधी कसे होतात, समासांचे प्रकार कोणते, संहिता ग्रंथांमधील सिद्धप्रयोगांची उपपत्ती कशी लावावी, या विषयीचे नियम दिले आहेत. छन्दःशास्त्रामध्ये आर्यावृत्ते, समविषम-अर्धसमवृत्ते यांची माहिती दिली आहे. व्याकरणाचा भाग हा संवादात्मक असून त्याचा वक्ता कुमार व श्रोता कात्यायन हा आहे. कात्यायनकृत प्रचलित ‘कातन्त्र व्याकरणाला’ अनुसरूनच या अध्यायांची रचना केली असावी असे वाटते.

इतिहास – प्राचीन भारताचा इतिहास आणि भूगोल समजावून घेण्यासाठी पुराणे ही उत्तम साधने मानली जातात. यामध्ये सूर्यवंशीय व सोमवंशीय राजांच्या वंशावळी सविस्तर दिल्या आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचे महत्त्व कमी नाही. रामायण आणि महाभारत या ग्रंथातून देखील प्राचीन भारताचा इतिहास आपल्यासमोर येतो. त्याचेही संक्षिप्त वर्णन या पुराणात मिळते.

प्राचीन भूगोल – भुवनकोश वर्णन हा तर सर्वच महापुराणांमध्ये येणारा विषय आहे. गरुड पुराणामध्ये ४ अध्यायांत भुवनकोशाचे म्हणजेच प्राचीन भूगोलाचे वर्णन केले आहे. हे वर्णन वाचत असताना असे लक्षात येते की पुराणकारांना संपूर्ण बृहत्तरभारतातील प्रांतोपप्रांतांची व्यवस्थित माहिती होती. यावरून असेही स्पष्ट होते की त्याकाळीही ‘एकात्मभारत’ ही संकल्पना होती. बहुतांशवेळा असे म्हटले जाते की पूर्वीचा भारत हा राष्ट्रराज्यांमध्ये विभागलेला होता. त्याला प्रथम एकसंघ केले ते ब्रिटिशांनी. या विधानाची सत्यता कितपत आहे ते पुराणांमधील एकात्म भारताविषयीचे वर्णन वाचल्यानंतर कळून चुकते.

राजनीती – हा देखील आजच्या काळातील महत्त्वाचा नि प्राचीन काळातच प्रगल्भावस्थेला पोहोचलेला विषय आहे. राजाची दिनचर्या कशी असावी, कोणते गुण त्याने प्रयत्नपूर्वक अंगी बाणवावेत, याच बरोबर राजपुरोहित व मंत्री यांची नेमणूक कोणत्या निकषांवर करावी, या विषयीची पुराणकर्त्यांची मतेही लक्षात घेण्यासारखी आहेत. कोषाध्यक्ष, रत्नपरीक्षक, सेनाध्यक्ष, प्रतीहार, लेखक, पाठक, दूत, धर्माध्यक्ष, सूपकार (स्वयंपाकी), राजवैद्य, राजपुरोहित, गणक (हिशेबनीस), प्रतिबोधक (व्यवहार जाणून निर्णय घेणारा) इत्यादी पदांवर नेमावयाची माणसेही त्या त्या पदास अनुकूल अशा गुणांनी युक्त असावीत असे म्हटले आहे.

यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः ।तथा चतुर्भिर्भृतकं परीक्षयेद् व्रतेन शीलेन कुलेन कर्मणा ॥

वास्तुशास्त्र – सर्वच पुराणांमध्ये येणारा नि अलिकडच्या काळातही अभ्यासायला हवा असा आणखी एक विषय म्हणजे वास्तुविद्या. या पुराणात वस्तुमानाध्याय व प्रासादलक्षणाध्याय या दोन अध्यायांमध्ये हा विषय आलेला आहे. पुर, दुर्ग, प्रासाद यांची मापे, आकार व त्यांच्या उभारणीविषयीचे नियम यामध्ये दिलेले आहेत. वैराज, पुष्पकाख्य, कैलास, मालिकाहृदय, त्रिविष्टप असे प्रासादांचे पाच प्रकार सांगितले आहेत. या प्रासादांमध्ये कोणत्या दिशेस काय असावे, प्रासादांभोवती कोणत्या वृक्षांची रचना करावी, याचीही माहिती दिली आहे. वास्तुशास्त्राची ही मांडणी शास्त्रीय निकषांवर पडताळून पाहाण्यासारखी आहे.

या खेरीज वेदान्त व सांख्य तत्त्वज्ञान, भगवद्गीतेचे सार, याज्ञवल्क्य व पराशर स्मृतीला अनुसरून केलेली धर्मशास्त्राची मांडणी हे विषय देखील अत्यंंत उपयुक्त आहेत. अशा प्रकारे निरनिराळ्या उपयुक्त विषयांचे संकलन या पुराणामध्ये केलेले असल्याने हे पुराण नक्कीच अभ्यसनीय आहे.

पुराण : अनेक शास्त्रांची तोंडओळख – इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावयास हव ती ही की वर सांगितलेल्या सर्व शास्त्रांची रचना पुराणग्रंथांतच झाली असे इथे म्हणावयाचे नाही. पुराणकारांनी त्या त्या शास्त्राच्या ग्रंथांमधूनच सर्व गोष्टी घेऊन त्यांचे संकलन केले आहे. शास्त्रीय विषयाची मांडणी करताना आवश्यक असा काटेकोरपणा व परिभाषेचा वापरही पुराणांमध्ये दिसत नाही. तरीदेखील पुराणांमध्ये येणाऱ्या या शास्त्रीय ज्ञानशाखांचे महत्त्व कमी नाही. कारण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे पुराणे ही त्याकाळी लोकशिक्षणाचे एक माध्यम होती. एरवी वास्तुशास्त्र वा आयुर्वेद वा रत्नपरीक्षा या विषयांवरील शास्त्रीय ग्रंथ वाचण्याची सर्वसामान्य लोकांची प्रवृत्ती होत नाही. पुराणश्रवणातून मात्र त्यांचे जिज्ञासाशमन नक्कीच होत असेल. पुराणाचे असे आजच्या काळासही उपयुक्त ठरणारे स्वरूप पाहिल्यावर वायु पुराणातील ‘पुरा अपि नवं भवति।’ म्हणजेच ‘प्राचीन असूनही जे नवीन गोष्टींची कामना करते ते पुराण’ या व्याख्येची यथार्थता पटते.