प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप

लेख क्र. २०

२४/६/२०२५

अतिवृष्टी, दुष्काळ, ज्वालामुखीचा उद्रेक इ. नैसर्गिक आपत्तींमुळे जीवितहानी ओढवते, मोठा विनाश होतो. अशीच एक विनाशकारी आपत्ती म्हणजे भूकंप. किल्लारी (१९९३) हा भीषण भूकंप अनुभवल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली की प्राचीन काळी झालेल्या भूकंपाबद्दल माहिती मिळवली पाहिजे. या उत्सुकतेपोटी संत्रिकेतील मा. श्री. यशवंतराव लेले, प्रा. शुभांगी देवरे व डॉ. वसंत शंकर लेले यांनी प्राचीन भारतीय साहित्यातील भूकंप या विषयावर १९९६ साली प्रकल्प हाती घेतला. नंतर ह्या प्रकल्पाचे पुस्तक तयार झाले Earthquakes – References from the Rigveda to the Rajatarangini.

या संंशोधनासाठी वेद, रामायण, महाभारत, पुराणे, वराहमिहीराची बृहत्संहिता, नारदसंहिता, अद्भुतसागर व राजतरंगिणी हे ग्रंथ आधुनिक भूकंपशास्त्राच्या आधारे अभ्यासायचे निश्चित केले. अभ्यासातून वरील ग्रंथांत अनेक संदर्भ सापडले. त्यांपैकी काही संदर्भ या लेखात देत आहोत.

ऋग्वेद – यः पृथिवीं व्यथमानामदृंहद् यः पर्वतां प्रकुपिताम् अरम्णात्। यो अन्तरिक्षं विममे वरीयो यो द्यामस्तभ्नात् स जनास इन्द्रः॥ (ऋ. २. १२. २) याचा अर्थ – हे लोकांनो, हलत्या पृथ्वीला आणि चंचल पर्वतांना स्थिर करणारा, तसेच विस्तीर्ण अंतरिक्षाला नियमबद्ध करून द्यूला (स्वर्गाला) आधार देणारा इंद्र हा असा आहे.

रामायण – हनुमान सीतेला शोधायला लंकेला जाताना समुद्रातून मैनाक पर्वत वर येतो (सुंदरकांड १. ९४,९५). हा उल्लेख पृथ्वीच्या तळात होणार्‍या कंपामुळे झालेल्या बदलाला सूचित करतो.

नारदसंहिता – भूकंपाची कारणे देताना नारदांनी सांगितले आहे की शेषनाग हा भूभार धारण करून जेव्हा थकतो आणि उच्छ्वास टाकतो, त्यावेळी भूकंप होतो (भूभारखिन्ननागेन्द्रदीर्घनिःश्वाससम्भवः । भूकम्पः सोsपि जगतामशुभाय भवेत्तदा॥ ५०. १)

वराहमिहीराची बृहत्संहिता – इ. स.च्या ६ व्या शतकामधील प्रसिद्ध ज्योतिर्गणिती वराहमिहीर याने आपल्या बृहत्संहिता या ग्रंथामध्ये भूकंपाचा संबंध नक्षत्राशी जोडला आहे. अर्थात याचा उगम वेदात मिळतो. २८ नक्षत्रे (यामध्ये अभिजित नक्षत्र पण विचारात घेतले आहे.) यांचे सात नक्षत्रांचा एक गट करून वेद, पुराणे याप्रमाणे भूकंपाचे चार भागांमध्ये (मंडलामध्ये) विभाजन केले आहे. वायू, अग्नी, इंद्र व वरुण अशी ही चार मंडले आहेत. प्रत्येक मंडलामध्ये नक्षत्रे नक्षत्र-तत्त्वाप्रमाणे एकत्र केली आहेत. (याला अपवाद वायू मंडलामधील ‘स्वाती’ नक्षत्र अग्नी तत्त्वाचे आहे व अग्नी मंडळातील विशाखा’ हे वायू तत्त्वाचे आहे.) दिवस व रात्र मिळून चार प्रहर मानून प्रत्येक मंडलाचा भूकंप कोणत्या प्रहरामध्ये होईल हे दिले आहे त्याच प्रमाणे मंडला प्रमाणे भूकंप भारताच्या कोणत्या भूप्रदेशात होईल व त्यामुळे होणारी पिक, पाणी यांची हानी व साथीचे रोग यांची पण माहिती दिली आहे.

राजतरंगिणी – काश्मीरमध्ये १२ ते १६ व्या शतकात झालेल्या भूकंपाविषयीची माहिती या ग्रंथात मिळते. हा संस्कृतात लिहिलेला काश्मीरचा इतिहास सांगणारा ग्रंथ आहे. इ. स. ११४८ ते १५३८ या कालखंडामध्ये काश्मीर खोऱ्यात झालेल्या विविध भूकंपाचे वर्णन या ग्रंथात आहे. एकूण ५ राजतरंगिणी आहेत. त्यापैकी चार राजतरंगिणीमध्ये भूकंपाविषयी माहिती आहे. त्यातील येथे तिसर्‍या व चौथ्या राजतरंगिणीत आलेला संदर्भ दिला आहे. श्रीधर शुकच्या (इ. स. १४८६) तिसऱ्या राजतरंगिणीमध्ये काश्मीरमधील मडव राज्यात आलेल्या भूकंपाविषयी माहिती मिळते. राजा हैदरशाहने मडव राज्यात प्रवेश केला आणि भूकंप झाला अशी नोंद मिळते. भूकंपामुळे घरे डळमळीत झाली व प्रजेला कापरे भरले असा उल्लेख आहे. पृथ्वी झगझगीतपणे प्रकाशमान झाली होती व सारखी कंप पावत होती. (उत्तर कंप असण्याची शक्यता दिसते) वादळांमुळे झाडे व मोठे दगड जमिनीवर आदळत होते. फुगलेल्या पाण्यात (जास्त वेळ असल्याने) प्रेतांचे ढीग पडले होते. सोने, चांदी इ. मौल्यवान वस्तूंना काही किंमत नव्हती. प्राज्यभट्टाच्या (इ. स. १५१३) चौथ्या राजतरंगिणीमध्ये भूकंपाचे वर्णन दिले आहे. त्यामध्ये हा भूकंप रात्रीच्या दुसऱ्या प्रहरामध्ये झाला अशी नोंद आहे. प्रजा गाढ झोपेत असल्याने अगणित मनुष्यहानी झाल्याचा उल्लेख आहे. जमिनीला अनेक भेगा पडल्या होत्या ह्या भेगांमध्ये अनेक घरे गाढली गेली. (आसाममध्ये १८९७ साली झालेल्या भूकंपात घरे छतापर्यंत गाढली गेली, अशी नोंद मिळते.) सकाळ झाल्यावर घराचे घत फोडून माणसे बाहेर आली. काही जुनी लाकडी घरे वितस्ता (झेलम) नदीच्या प्रवाहात वाहत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील लोक गाढ झोपेतून जागे झाल्यावर हा प्रकार घराबाहेर पडल्यावर त्यांच्या लक्षात आला. नदीच्या पात्राच्या बदलामुळे हसेनपूर आणि होसेनपूर ही विसस्ता (झेलम) नदीकाठी मोठ्या अंतरावर असलेले दोन गावे एकमेकांजवळ आली. (नदी व गावांची सापेक्ष स्थाने यामध्ये बदल झाला असे दिसते.) गावांनी नदी ओलांडली असे नसून नदीचे पात्र बदलले असे दिसते. सूर्याची उष्णता सहन होत नव्हती. जमीन अजस्त्र लाटांवर हेंदकाळणाऱ्या तांबड्या भोपळ्याप्रमाणे खालीवर होत होती. असे हे भूकंपाचे भयावह वर्णन आपल्याला या राजतरंगिणीत दिसते.

वैदिक काळी सुद्धा भूकंप होत होते हे ऋग्वेदातील सूक्तांमधून समजते. राजतरंगिणी हा ग्रंथ त्यामानाने अलिकडच्या काळातील असल्यामुळे यातील संदर्भ अधिक विश्वासार्ह वाटतात. अशा ह्या प्राचीन काळी झालेल्या भूकंपाची माहिती व भूकंप कसा होतो याचे ज्ञान आपल्याला विविध ग्रंथांमधून मिळते.

डॉ. य. स. सहस्रबुद्धे यांनी पुस्तकाबद्दल जे म्हटले आहे ते असे – The overall picture that has evolved from the project studies is that the Jnana Prabodhini, Pune, has brought out a commendable conclusion that the Ancient Vedic literature was certainly far ahead of their times in the methods of prediction of earthquakes. The authors have justified the continuance of such studies to get a probable permanent solution. The International Scientific Community has not met so far with any positive result inspite of about forty years of sincere efforts, with all modern scientific concepts and sophisticated equipments.