प्रस्तावना
भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षणपद्धतीतून समाजपरिवर्तन करू इच्छिणारी संस्था व प्रेरणासंपन्न कार्य कर्त्यांची संघटना अशी ज्ञान प्रबोधिनीची ओळख देशविदेशात आहे. गेल्या सहा दशकांमध्ये काही शैक्षणिक प्रयोग यशस्वी होऊन विस्तारले असले, तरी आगामी दशकात वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचे भान ठेवून कार्याच्या विस्ताराचे नियोजन करावयास हवे, तरच अपेक्षित प्रभाव व परिणाम दिसून येईल. म्हणून भवितव्यलेख तंत्राचा वापर कार्य कर्त्यांच्या सहभागातून करण्याचे ठरले.
यापूर्वी पहिला भवितव्यलेख शके १९१६ ते १९३५(सन १९९४-९५ ते २०१३-१४) अशा २० वर्षांसाठी कार्य कर्त्यांच्या सहविचारातून तयार करण्यात आला. होता. देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढवणे’ असे तेव्हाच्या भवितव्यलेखाचे साध्यसूत्र निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामीण भागातील स्त्रियांसाठीचे ‘स्त्री शक्ती प्रबोधन (ग्रामीण)’ या विभागाचे बचतगट, आरोग्य, उद्योजकता, नेतृत्वविकसन असे विविध पैलूंचा समावेश असणारे व सव्वाशेहून अधिक गावांमध्ये पोहोचलेले असे भरीव काम उभे राहिले. तसेच पुणे शहरातील वस्त्यांमधून काम करणाऱ्या ‘नागरीवस्ती अभ्यासगटा’चे काम उभे राहिले. स्थलांतरित मजुरांच्या बरोबर यावे लागल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण सुटून जाण्याच्या प्रश्नावर प्रबोधिनीने साखरशाळेसारखा महाराष्ट्र शासन स्तरावर उचलून धरला गेलेला उपक्रमही या साध्यसूत्राचीच अभिव्यक्ती म्हणावी लागेल.
समाजातील विविध बदलांचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त आहे हे आढावा घेताना लक्षात आले. पहिल्या भवितव्यलेखाच्या मांडणीची वीस वर्षे पुरी होण्याआधीच, दोन वर्षे, दुसर्या भवितव्यलेखाच्या मांडणीची आवश्यकता अनेक कार्यकर्त्यांना वाटली. तसेच वीस ऐवजी दहा वर्षांची मांडणी अधिक नेमकेपणाने करता येईल असे वाटले. त्यातून दुसऱ्या भवितव्यलेखाची प्रक्रिया सुरू झाली. शके १९३४ ते १९४३ (सन २०१२-१३ ते २०२१-२२) या कालावधीसाठी दुसर्या भवितव्यलेखाची मांडणी पहिल्या भवितव्यलेखाच्या वेळी जेवढे कार्यकर्ते होते त्यापेक्षा पुष्कळ जास्त कार्यकर्त्यांनी एकत्र सहविचाराने केली.
त्या भवितव्यलेखाच्या मांडणीची प्रक्रिया सुमारे वर्षभर सुरू होती. प्रत्येक केंद्र व विभाग यांच्यातील सहविचार समित्यांना आपापल्या संदर्भातील बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन भविष्यचित्र (सिनॅरिओ) मांडण्यास सांगण्यात आले. ठिकठिकाणच्या मनुष्यबळाचे शक्तिस्थान व मर्मस्थान या अंगाने विश्लेषण करण्यासाठी व्यवस्थापन सल्लागारांची मदत घेण्यात आली. या सर्व मंथनातून ‘नेतृत्वगुण विकसन करणारी ज्ञान प्रबोधिनीची मनुष्यघडणीची प्रक्रिया शालेय वयोगटाच्या पुढे विस्तारित करणे’ हे अंतिम साध्यसूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार नेतृत्व संवर्धन केंद्र सुरू होऊन त्यात सुमारे ७०० पदवीपूर्व युवक-युवतींनी एक किंवा दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले.
आता तिसऱ्या भवितव्यलेखाची तयारी सुरू करताना मागील दोन भवितव्यलेखांचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळे सर्व प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अनुभवी व तरुण अशा सात कार्यकर्त्यांची सुकाणू समिती गठित केली गेली. सुकाणू समितीने अकरा कार्यदिशा, महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी कार्यरत असणारी दहा केंद्रे व तेथील एकूण ४८ विभागांतील दोनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या मदतीने भवितव्यलेख प्रत्यक्षात लिहवून घेतला. सर्व कार्यदिशा , केंद्रे आणि विभागांच्या भवितव्यलेखातून ३५० हून जास्त ‘मध्यंतर उद्दिष्टे’ लिखित स्वरूपात आली. या सर्वांचा अभ्यास करत ज्ञान प्रबोधिनीने संघटना म्हणून अधिक व्यापक आणि विस्तारत जायला हवे असे जाणवत होते. ज्ञान प्रबोधिनीचा ‘मध्यवर्ती भवितव्यलेख’ तयार करण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठित करण्यात आली होती.
प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना मानवेल अशी भवितव्यलेखनाची पद्धत यात वापरली गेली आहे. तिच्यामध्ये Scenario Writing, Logframe Analysis, Results Based Management अशा अनेक तंत्रांचा अभ्यास करून एकत्रित विचार केला गेला आहे. संपूर्ण प्रबोधिनी स्तरावर साध्यसूत्र, कार्य दिशांची कार्य विधाने, अपेक्षित कार्य परिणाम, मध्यंतर उद्दिष्टे, निष्पत्ती आणि उपक्रम अशी उद्दिष्टांची एक साखळी निश्चित केली गेली आहे. उद्दिष्टे आणि त्यांचे अपेक्षित गुणात्मक किंवा संख्यात्मक दर्शकही अनेक विभागांनी निश्चित केले आहेत. या सर्व प्रक्रियेचे प्रशिक्षण व विभागश: लेखन गेले वर्षभर चालू होते. आपल्या कामाकडे चिकित्सक आणि तरीही विधायक – सकारात्मक दृष्टीने पाहायचे असते, असे अनेक कार्य कर्त्यांच्या गेल्या वर्षभरात लक्षात आले आहे. कामाची नवी उमेद अनेकांना सापडली आहे.
सुकाणू समिती व मध्यवर्ती भवितव्य लेख समितीने अनेक बैठका, प्रशिक्षण वर्ग , कार्यशाळांतून प्रबोधिनीच्या भवितव्य लेखाची मांडणी केली. विस्तारत जाणारी अखिल भारतीय स्तरावरील ज्ञान प्रबोधिनी असे स्वप्न उराशी बाळगत तिसऱ्या भवितव्य लेखाचे साध्यसूत्र निश्चित झाले. त्याबद्दल पुढील पानांवर नोंदवले आहे.