ज्ञान प्रबोधिनी परिचय

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पाजी पेंडसे एक शिक्षणतज्ज्ञ, समाजसंघटक आणि कृतिशील विचारवंत होते. स्वामी विवेकानंद हे त्यांचे प्रेरणास्थान! ‘आपल्या देशाची अस्मिता व एकात्मता ज्यातून व्यक्त होते अशी सांस्कृतिक परंपरा तसेच दारिद्रय निर्मूलन,दुखः निवारण यासाठी करावयाचे प्रबोधन आणि संघटन’ यांची सांगड स्वामी विवेकानंदांनी घालण्याचा प्रयत्न केला. मनुष्यघडणीच्या शिक्षणाचा विचार त्यांनी मांडला. त्या विचारातून देशविदेशात अनेक कार्ये उभी राहिलेली आहेत. ज्ञान प्रबोधिनी हा त्यातीलच एक स्वायत्त आविष्कार !!

मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी आत्मनिर्भर बुद्धिमत्तेची आवश्यकता असते, ही गोष्ट स्वतः मानसतज्ज्ञ असलेल्या कै. आप्पांनी हेरली होती. स्वतंत्र भारतासमोरील विविध प्रश्न सोडवण्यासठी ज्यांचे बौद्धिक, शारीरिक आणि आत्मिक विकसन होऊन एकसंध असे व्यक्तिमत्त्व आकारास आले आहे, असे युवक-युवती समाजाला हवेत, असे त्यांच्या लक्षात आले. ‘रूप पालटू देशाचे’ या ध्येयासाठी त्यांनी मार्ग निवडला नेतृत्वशिक्षण आणि नेतृत्वघडणीचा… आणि या कल्पनेतून ज्ञान प्रबोधिनीची सुरुवात १९६२ साली बुद्धिमंतांसाठी चालणारा एका शैक्षणिक प्रयोग या स्वरूपात झाली.

ज्ञानाचे प्रबोधन करणारी, बुद्धिमत्तेस समाजपरिवर्तनाची प्रेरणा देणारी ती ज्ञान प्रबोधिनी!! निवडक विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या शैक्षणिक प्रयोगाने आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मान्यताप्राप्त संघटना म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. भौगोलिक सीमा ओलांडून संघटनांचे हे काम गेल्या काही वर्षांत जगभरात विस्तारते आहे. ज्ञान प्रबोधिनी फाऊंडेशनच्या नावाने जगभरात पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या संपर्काचे पुन्हा एकत्रिकरण होऊन भरीव कामाची सुरुवात झाली आहे. प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रबोधिनी अल्युमिनाय असोसिएशनच्या माध्यमातून माजी विद्यार्थी संघटनाची सुरुवात केली आहे. प्रबोधक संघटनाच्या या प्रयत्नांच्या बरोबरच अटल इनोव्हेशन सेंटर आणि एसीआयसी ज्ञान प्रबोधिनी इनोव्हेशन फौंडेशन यांच्या माध्यमातून नवनिर्मिती करणाऱ्या व्यक्ती, संस्था इ. चे संघटन उभे राहात आहे.

प्रत्येकाच्या प्रज्ञेला सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देण्याची ऊर्मी ज्ञान प्रबोधिनी मनात बाळगून आहे. आज हे काम शहरात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शिक्षण, संशोधन, संघटन, ग्रामविकसन, स्त्री शक्ती प्रबोधन, आरोग्य आणि राष्ट्रीय एकात्मता अशा विविध दिशांनी चालू आहे.