लेख क्र. २३
२७/६/२०२५

गरुड पुराणातील आयुर्विज्ञान, भूकंप, संस्कृत साहित्याचा इतिहास असे मोठे प्रकल्प संत्रिकेत २००२ च्या आसपास झाले. प्रकल्पांशिवाय संत्रिकेतून वाचस्पती पदवीसाठी (Ph.D.) अभ्यास करणारी पहिली परदेशी विद्यार्थिनी ‘Tan Kah Siew’ होती. त्यांनी २००२ मध्ये संत्रिकेत संशोधनास सुरुवात केली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘The Path to Liberation : (Nirvana/Nibbana) Yoga in Bhagavadgeeta vis-as-vis Vipasaanaa in Early Buddhism’ होता. डॉ. ज. रा. जोशी त्यांचे मार्गदर्शक होते. तीन वर्षे ‘Tan Kah Siew’ यांनी संत्रिकेतून अभ्यास केला. तेव्हा त्यांनी ईश, केन, कठ इ. दश उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, पातञ्जलयोगसूत्राणि आदी संस्कृत ग्रंथांचा तर दीघनिकाय, धम्मपद इ. बौद्ध ग्रंथांचा तसेच अनेक भाष्यग्रंथ व साहाय्यक ग्रंथांचा, निबंधांचा अभ्यास करून संदर्भ गोळा केले. साधारण २००७ च्या सुमारास डॉ. ज. रा. जोशी यांची प्रकृती बिघडल्यामुळे Tan Kah Siew यांनी पुणे विद्यापीठाच्या पाली विभागातील डॉ. महेश अ. देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पुढे नेले. असे एक पत्र संत्रिकेत आहे. Tan Kah Siew यांच्या नाईलाजास्तव झालेल्या स्थित्यंतरामुळे मात्र संत्रिकेतून होणारा एक वाचस्पती पदवी प्राप्त अभ्यासक कमी झाला.

ही जरी खेदकारक घटना असली तरी संत्रिकेत त्यादरम्यान (२००२-२००७) अनेक शोधप्रकल्प चालूच होते. प्रकल्पांची माहिती खालीलप्रमाणे –
- स्वामी दयानंद आणि त्यांचे कार्य – सौ. राजलक्ष्मी देशपांडे यांनी ज्ञान प्रबोधिनीसाठी आदर्श असलेल्या चार व्यक्तींपैकी एक स्वामी दयानंद सरस्वती यांवर अभ्यास करायचे ठरवले. स्वामी दयानंद हे नाव सर्वश्रुत असले तरी त्यांचे देशाप्रती कार्य अनेकांना माहिती नसते, म्हणून हा प्रकल्प त्यांनी निवडला. त्यासाठी मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मार्गदर्शन केले. हा प्रकल्प २००२ साली सुरू झाला. सौ. राजलक्ष्मी देशपांडे यांनी सत्यार्थप्रकाश, गोकरूणानिधि इ. स्वामी दयानंद रचित ग्रंथांचा अभ्यास केला. शिवाय स्वामींना लिहिलेली व स्वामींनी लिहिलेली पत्रे अभ्यासली गेली.
- भगवान दत्तात्रेय : उगम आणि विकास – ‘दत्तात्रेय’ शब्दाचा अर्थ, त्यांचा काळ, स्वभावधर्म, त्यांची शस्त्रे, दत्त संप्रदायाचा इतिहास, दत्तात्रेय व औदुंबर यांचा संबंध अशा मुद्द्यांवर हा प्रकल्प सौ. गौरी पत्की यांनी पूर्ण केला. प्रकल्प मार्गदर्शक मा. श्री. यशवंतराव लेले होते. गुरुचरित्र, दत्तात्रेय ज्ञानकोश, अवधूत गीता इ. पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून वापरली.
- प्राचीन भारतीय जल-व्यवस्थापन – भारत एकूणच बर्याच वर्षांपासून पाणीप्रश्न सुरु आहे. त्याच आधारावर २००३ मध्ये डॉ. मनीषा शेटे यांनी प्राचीन जल-व्यवस्थापन कसे होते याचा अभ्यास सुरु केला. त्याकरिता ‘वराहमिहीराची बृहत्संहिता’ हा ग्रंथ आधारग्रंथ म्हणून वापरला. त्याशिवाय शास्त्र सार, कौटिलीय अर्थशास्त्र इ. ग्रंथसुद्धा अभ्यासले गेले. या प्रकल्पासाठी मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मार्गदर्शन केले.
- भगिनी निवेदिता यांचे चरित्र (सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्य व देशाच्या विकासातील सहभाग) – सौ. राजलक्ष्मी देशपांडे यांनी मा. श्री. यशवंतराव लेले यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य पुस्तके वाचून व मुलाखती घेऊन एका वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला.