झाल्या झाल्या लगनावेला (भाग १)

लेख क्र. २४

२८/०६/२०२५

मा. श्री. यशवंतराव लेले वसई गावापासून 23 कि.मी. अंतरावर असलेल्या सकवार या वारली लोकांच्या पाड्यावर ‘रामकृष्ण आश्रम’वतीने चालणार्‍या ग्रामविकासाच्या उपक्रमात १९८१ पासून सहभागी होत होते. तेथे त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या. मुंबई-अहमदाबाद‌सारख्या सतत वाहत्या राष्ट्रीय महामार्गाच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेलं असूनही ते अतिशय मागासलेलं राहिलं. असं असलं तरी तिथल्या जीवनातील सहज- सुंदरता, छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनानंद निखळपणे लुटण्याची प्रवृत्ती आणि निसर्गसान्निध्यात राहिल्यामुळे असलेला गोडवा मा. श्री. यशवंतरावांना दिसला. त्यातील एक विशेष म्हणजे वारली लोकांचे लग्न. हा अनुभव डॉ. आर्या जोशी यांनी शब्दबद्ध केला व त्यावर विचार मांडले, तसेच नंतर एक शोधनिबंध सुद्धा लिहिला. वारलींच्या लग्नाचे हे वर्णन दोन भागात केले आहेत. या पहिल्या भागामध्ये वारलींंचे लग्न कसे होते, वधु-वर यांची निवड, लग्नाच्या आधीचा दिवस इत्यादींचे वर्णन केले आहे.

लग्न ठरविण्याची पद्धत – लग्नसमारंभाची खरी सुरुवात तसं म्हटलं तर ‘तारप्याच्या नाचा’पासून होते. ‘तारपे’ हे वाद्य पूर्ण पिकलेल्या दुधीभोपळ्याच्या आतील बिया काढून त्यात बांबूच्या नळ्या घालून तयार करतात. हे वाद्य पुंगीसारखं दिसतं. आश्विन महिन्यात नवी पिकं डोलू लागलेली असतात. हिरवीगार वनश्री दिवाळीच्या आगमनाची वर्दी देत असतात. घाटावर दुम् दुम् पटदुम् च्या तालात लेझीम झिंगत असते तेव्हा वारली वस्त्यांमध्ये या तारप्याची सुरावट रंगत असते. दिवाळीच्या सणाच्यावेळी या तारप्याच्या नाचासाठी आजूबाजूच्या गावातून आणि पाड्यांमधून अनेक तरुण-तरुणी जमतात. लग्नाळूंसाठी ही एक सुवर्णसंधीच असते. बहुतांशी या नाचाच्या वेळी तरुण मुलं आपली सहचारिणी शोधतात. आवडलेल्या मुलीची माहिती मुलगा आपल्या आई-वडिलांना सांगतो. मग आई-वडिल त्या मुलीच्या घरी एखाद्या मध्यस्थामार्फत जातात. मुलाच्या पित्याला काही संपत्ती मुलीच्या पित्याला द्यावी लागते. परंतु ही ‘देज’ ठरलेली असते (काही मण भात आणि पैसे). लग्नाचा सर्व खर्चही मुलाकडूनच केला जातो. जर पुढे काही कारणांनी लग्न मोडलं आणि ‘बायको पळाली माहेरी’ असा प्रकार घडला तर ‘देज’ आणि खर्च मुलीच्या वडिलांना द्यावा लागलो. यामुळे वारल्यांमधील लग्नात मुलाची आणि त्याचबरोबर मुलीचीही संमती घेतली जाते.

लग्नाचा सर्वसाधारण खर्च साधारणपणे १५०० रु. पर्यंत येतो. यात प्रामुख्याने देज आणि दारु यासाठीच जास्त खर्च येतो. मुलगी देताना मुलीचा पिता आपल्या भावी जावयाच्या परिस्थितीची चौकशी करतो. शेळ्या, गाई, बैल, जमीन, घरची माणसं याची चौकशी केली जाते. गाई किंवा शेळ्या ही एक संपत्तीच मानली जाते. करवंद, बोरं, जांभळं, मधाचं अख्खं पोळं अशा चैनींच्या गोष्टी जवळच्या जंगलात असताना वासराला तोडून गाईचं दूध काढणं हे वारल्यांना पटत नाही आणि दूध उत्पादन हा एक जोडधंदा होऊ शकतो याचं त्यांना आकर्षण नाही. दागिन्यांचा सोसही कुणालाच परवडण्यासारखा नसतो.

लग्नाला दोन्ही बाजूंची संमती असेल आणि मुलाच्या हाती पैसे तयार असतील तर आठ दिवसातच लग्नसोहळा पार पडतो. सर्वांच्या सोयीने एखादी तारीख ठरल्यानंतर गावच्या सर्वांना लग्नाची सुपारी दिली जाते. हल्ली लग्नाच्या छापील निमंत्रणपत्रिकाही मिळतात. त्यातल्या गाळलेल्या जागा भरून ती पत्रिका समक्ष देऊनही बोलावणं करतात. या लग्नपत्रिकेला कोकंत्री म्हणतात. वारल्यांच्या धार्मिक समारंभांचा आणखी एक विशेष म्हणजे कुठल्याच पारंपरिक विधीसाठी त्यांना ब्राह्मण लागत नाही. वारल्यातीलच एखाद्या बाईला ही विद्या येत असते. काहीवेळा पुरुषही हे पौरोहित्य करतात. लग्नाच्या पौरोहित्याबद्दल या स्त्री किंवा पुरुषाला म्हणजेच धवलेरींना रु. द्यावे लागतात.

मांडव – आजच्या काळात हा लग्नसमारंभ दोनच दिवसांचा असतो. आदल्या दिवशी मांडव घालतात. घरासमोर स्वच्छ सारवून नऊ मेढ्याचा हा मांडव घालतात. त्यासाठी जंगलातून तोडून आणलेल्या उंबराच्या आणि जांभळाच्या झाडांच्या फांद्या आणि आंब्याचा व जांभळाचा पाला वापरतात. त्यामुळे याचाही खर्च नसतो. हा मांडव देवानेच घातला असून त्यासाठी देवाला किती कष्ट घ्यायला लागले हे सांगताना धवलेरी सांगतात –

देवानं घेतल्या तिवर्‍याची (पोलादी) कुर्‍हाडी, देव गेला कलघर (खडकाळ कडा) डोंगरा । नाही मिलत उंबराची जांभुलची झाडं, शेवटी गेले खंगारे (डोंगरमाथा) डोंगरा॥तिथे हायेत उंबराची, जांभुलची झाडं, आवट्या (लाकूड कापणे) पाडून धरणी पाडली न् भारा बांधला। निघून आलं मंडपाच्या दारी देवानं काढल्या सोन्याच्या पाहरी॥ …..

मांडव घालून झाल्यावर दुपारी बाराच्या सुमारास बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम होतो. बाशिंग बांधायला चला म्हणून सांगत अख्ख्या गावातून वाजत-गाजत मिरवणूक निघते आणि सगळ्यांना गोळा करून लग्नघरी येते. लग्नात लावली जाणारी हळद नवरा-नवरीबरोबरच त्यांच्या मामा आणि मामीलाही लावली जाते. लग्नघरी भेटायला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या पायावर मुला-मुलीचे आई वडिल डोकं ठेऊन नमस्कार करतात. त्यावेळी लग्नाचा आहेर केला जातो.

देवादेवी – पहिल्या दिवशी संध्याकाळी’ देव करणे’ हा विधी असतो. यासाठी मात्र वारल्यांना गावच्या भगताची आवश्यकता भासते. एका स्वच्छ पाटावर तांदुळाच्या पिठाने उभ्या-आडव्या रेघा मारून चौकोन पाडले जातात. प्रत्येक चौकोनात थोडे-थोडे तांदूळ घालून त्यावर सुपारी ठेवून देवाची स्थापना केली जाते. सर्वच भागातल्या वारल्यांमध्ये हिरवा, नारन्‌देव, बरहमादेव, वाघोबा, चिडोबा हे देव असतात. सकवार भागातील वारल्यांमध्ये झोटिंग, एकशिऱ्या, कानव, वालव, हरजी भगत, बामन, चित्ता यांचीही पूजा करतात. वारल्यांच्या देवविषयक कल्पना अतिशय प्राथमिक अवस्थेतील आहेत, ज्याचा कोप झाला असता अनर्थ कोसळतो तो देव अशी देवाची सोपी व्याख्या केल्यामुळे देवाला संतुष्ट राखणं एवढंच धार्मिक कार्य पुढे ठेवलेलं असतं. त्यामुळे सर्व निसर्गदेवता, प्राणी देव मानले आहेत.

पाटावर देवांची प्रतिष्ठापना झाल्यावर प्रत्येक देवापुढे विडा आणि सुपारी ठेवतात. देवांना वाहण्यासाठी झेंडूची फुले, कुंकू, हळद, गुलाल ठेवलेलं असतं. मग भगत ज्यांच्या अंगात येतं अशा पाच लोकांना बोलावतो. प्रत्येकाला तो देवाचं नाव ठरवून देतो आणि प्रत्येकाच्या हातात मूठभर तांदूळ देतो. तांदूळ एका हाताने दुसऱ्या हातात करीत ताशाच्या कडकडाटाबरोबर हे पाचजण झुलू लागतात. अंगात देव येताना तो माणूस पायापासून थरथरू लागतो. मग उठून उभं राहून घुमू लागतो. हे ‘देवादेवी खेलनं’ इतर गावकरी पहात असतात. देवादेवी खेळल्यानंतर नवरा-नवरींना कोंबडीचं आणि बरोबरीनं पुरणपोळीचं जेवण दिलं जातं. जेवणानंतर नाचाचा कार्यक्रम असतो. गावातील तरुण-तरुणी आणि गावकरी या नाचात भाग घेतात. लग्नाची गाणीही बायका बराच वेळ म्हणतात.

क्रमशः