दुर्लभ नरदेह जाला तुम्हां आम्हां । येथें साधूं प्रेमा राघोबाचा ॥१॥
अवघे हातोहातींं तरों भवसिंधु । आवडी गोविंदु गाऊं गीतींं ॥२॥
हिताचिया गोष्टी सांगूं एकमेकां । शोक मोह दुःख निरसूं तेणें ॥३॥
एकमेकां करूं सदा सावधान । नामी अनुसंधान तुटों नेदूं ॥४॥
घेऊं सर्वभावें रामनाम दीक्षा । विश्वासें सकळिकां हेंचि सांगों ॥५॥
नामा म्हणे शरण रिघों पंढरीनाथा । नुपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥
जनी जनार्दन ऐसा भाव
पूर्वी प्रबोधिनीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात बर्ची नृत्याच्या बरोबर व्याख्यानमाला आणि परिसंवादही व्हायचे. १९७५ साली ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतांच्या चरित्र आणि तत्त्वज्ञानावर व्याख्यानमाला झाली. एकेका युवकाने चरित्र सांगायचे आणि त्याबरोबर बाहेरच्या एका ज्येष्ठ अभ्यासकाने तत्त्वज्ञान सांगायचे अशी योजना होती. गणेशोत्सवापूर्वीच्या एका बैठकीमध्ये आप्पांनी असे सांगितले की समाजसंस्थापनेचे काम करताना त्यामध्ये भागवत धर्माचा प्रसार कसा करायचा याचा विचार करायला लागेल. भागवत धर्म म्हणजे वरील पाच संतांनी सांगितलेला अद्वैत तत्त्वज्ञानावर आधारित ईश्वरभक्तीचा मार्ग. या व्याख्यानमालेत मला नामदेवांवर भाषण द्यायचे होते. चरित्र सांगताना ‘जनी जनार्दन ऐसा भाव’ हा चरण असलेला नामदेवांचाच ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान’ हा अभंग आणि आजचा ‘दुर्लभ नरदेह’ हा अभंग मध्यवर्ती ठेवून चरित्र सांगावे, असे आप्पांनी सांगितले होते. त्यावेळी मी महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात होतो. भाषण काही आप्पांच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. पण त्या अभंगांवर झालेला विचार कायमसाठी माझ्या लक्षात राहिला.
तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधुबंधू
आयुष्याच्या पूर्वार्धात पंढरपुरातच राहणाऱ्या नामदेवांना रोज विठ्ठल दर्शन घेता घेता केवळ जनांमध्ये नाही तर कुत्र्यामध्येही जनार्दन म्हणजे विठ्ठल आहे हे कळले. कुत्र्याला पोळीबरोबर तूप द्यायला धावलेले नामदेव कदाचित आख्यायिकेत असतील. परंतु जनी जनार्दन हा मनातला भाव आयुष्याच्या उत्तरार्धात उत्तर भारतामध्ये अनेक वर्षे राहून भागवत धर्माचा प्रचार करून त्यांनी कृतीत आणला. भागवत धर्माचा असा प्रचार करताना लोकांमधले होऊन लोकांच्याबरोबर राहून तुम्ही आम्ही एकत्र येऊन काय केले पाहिजे हे प्रचारकाला सांगावे लागते. त्याला उपदेशकाच्या भूमिकेत राहून चालत नाही. असा प्रचारक हा संघटकही असायला लागतो. म्हणूनच या अभंगाची सुरुवात ‘तुम्हां-आम्हां’ म्हणजे आपल्या सर्वांनाच हे मनुष्य शरीर मिळालेले आहे ही अतिशय दुर्मिळ संधी आहे असे म्हणून केली आहे. या संधीचा फायदा घेऊन आयुष्यात करण्यासारखी सर्वश्रेष्ठ गोष्ट आपण करूया. राघोबाचे म्हणजे राघवाचे किंवा रामाचे प्रेम आपण मिळवूया.
संसारात न बुडता
‘अवघे’ म्हणजे पुन्हा आपण सर्व. ‘हातोहाती’ म्हणजे अगदी थोडक्या वेळात. ‘भवसिंधू’ म्हणजे हा संसार तरून जाऊ. हा संसार तरून गेल्यावरच राघवाचे प्रेम किंवा कृपा लाभते. संसार तरून जाणे म्हणजे पलीकडच्या काठाला लागणे असाही अर्थ होतो. आणि संसारात तरून किंवा तरंगून म्हणजे न बुडता राघवाचे प्रेम संपादूया असाही अर्थ होऊ शकतो. तुम्ही आम्ही चे वर्तुळ वाढवत गेले तरच भागवत धर्माचा प्रसार होईल. त्यामुळे पलीकडच्या काठाला लागून संसारातून बाहेर पडण्यापेक्षा अनेकांना संसारात तरण्याची म्हणजे न बुडण्याची विद्या शिकवली पाहिजे. ‘अविद्यया मृत्युं तीर्त्वा’ म्हणजे ‘भौतिक ज्ञानाने भौतिक जगात यशस्वी होऊ’ हेच अवघ्यांनी भवसिंधू तरून जाण्याचे मर्म आहे. संसारात न बुडण्यासाठी गीतांमध्ये गोविंदाचे नाव सतत आवडीने गात राहिले पाहिजे. राम, कृष्ण, गोविंद कोणतेही नाव आवडीने घेत राहिले की संसारापलीकडचे तत्त्व मिळते. ते तत्त्व म्हणजेच राम, राघोबा किंवा गोविंद.
नामदेवांनी उत्तर भारतात जाऊन वैष्णवांची संघटना केली. सगळ्या वैष्णवांनी एकमेकांना धरून एकत्र संसार तरून जायचे आहे. त्यासाठी संसारातल्या शोक, मोह, दुःख देणाऱ्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे ते कळले पाहिजे. ‘आवडी गोविंदु गाऊं गीतींं’ हे जमले की शोक, मोह, दुःखाचे प्रसंग आले आणि येत राहिले तरी बाधत नाहीत. ‘निरसू तेणें’ म्हणजे प्रसंग नाहीसे करू असे नाही. तर त्यांचा त्रास जाणवणार नाही असे करू. याचा ज्याला जेवढा अनुभव आला आहे त्याने तो अनुभव इतरांना सांगावा. असे एकमेकांना अनुभव सांगून धीर देणे म्हणजेच हिताच्या गोष्टी एकमेकांना सांगणे. शोक, मोह, दुःख दूर करून आनंद वाढवणे हेच सगळ्यांच्या हिताचे आहे.
कृतीचे ध्येयाशी अनुसंधान
गोविंदाची गीते गायली की शोक, मोह, दुःख देणारे प्रसंग आपल्यावर परिणाम करत नाहीत हा अनुभव प्रत्येकाने घेण्यासाठी परमेश्वराचा नामजप प्रकटपणे किंवा मनातल्या मनात अखंड चालू राहिला पाहिजे. ज्या हिताच्या गोष्टी एकमेकांना सांगायच्या त्यामध्ये नामजपात खंड पडू देऊ नकोस असे ‘एकमेकांना सावधान करणे’ हे देखील आलेच. ‘अनुसंधान’ म्हणजे प्रेम. पण हे प्रेम सततच्या सहवासाने किंवा संपर्काने निर्माण झालेले असते. नामजप अखंड चालू राहिला तरच नामाबद्दलचे आणि त्यातून परमेश्वराबद्दलचे प्रेम निर्माण होते. नामजप करणे ही कृती आहे आणि परमेश्वराचे प्रेम मिळवणे हे ध्येय आहे. संघटनेमध्ये हे कृतीचे ध्येयाशी अनुसंधान महत्त्वाचे आहे.
‘अनुसंधान’ म्हणजे अखंड जोडले राहणे. एखादा प्रकल्प पूर्ण झाला किंवा एखादे अभियान झाले की त्यातून अनेक गोष्टी निघतात. ज्यांचा आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी उपयोग आपल्या लक्षात आला त्या पुढे पुन्हा वापरण्यासाठी आपण आपल्या जवळ ठेवल्या. त्या गोष्टींंचे ध्येयाशी अनुसंधान आपल्या लक्षात आले. आपल्या कृतीचे ध्येयाशी अनुसंधान राखणे ही चोख व्यवहार करण्यासारखी आणखी वेगळ्या प्रकारची उत्तमता आहे. व्यापारी संघटनांना चोख व्यवहारातील उत्तमता पुरते. ध्येयवादी संघटनांना कृतीचे ध्येयाशी सतत अनुसंधान राखणारी उत्तमता देखील लागते.
स्वतःचा संकल्प हीच दीक्षा
कृतीचे ध्येयाशी अनुसंधान राहण्यासाठी ध्येयाचे चिंतन आणि स्मरण सतत करावे लागते. कृतीचे काय काय अनुकूल परिणाम होतील याचा एका मर्यादेपर्यंत विचार करता येतो. पण त्यापुढे अंधारातच उडी मारावी लागते. प्रत्यक्ष अनुभव येईपर्यंत श्रद्धेच्या बळावरच आपण ध्येय निश्चित गाठणार ही सकारात्मक भावना मनात ठेवावी लागते. ही भावना बळकट करण्यासाठी जी उपासना करायची तीच रामनामदीक्षा. ‘सर्वभावे’ म्हणजे होईलच अशा विश्वासाने किंवा श्रद्धेने. नामदेवांसारखा विठ्ठलाशी प्रत्यक्ष संवाद करणारा भक्तही प्रचारक आणि संघटक या भूमिकेतून आपण सर्व ‘रामनामदीक्षा घेऊ’ असे सर्वांमधील एक होऊन आवाहन करतो. दीक्षा किंवा अनुग्रह या शब्दांभोवती ध्यानमार्गाचे आचरण करणाऱ्यांमुळे पवित्रतेचे एक गूढ वलय निर्माण झाले आहे.
मला मंगलोरचे विसाव्या शतकातील संत रामदास यांचे आत्मचरित्र आठवते. ते एका कारखान्याचे मालक. तिथल्या अडचणींवर उपाय म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना सहज म्हटले – ‘मग राम नाम का घेत नाहीस?’ हीच त्यांची रामनामदीक्षा झाली. त्यांनी अनुसंधान तुटू न देता रामनामाचा जप सुरू केला आणि काही वर्षांतच त्यांना ईश्वर साक्षात्कार झाला. भक्तिमार्गात तरी अशी सहज सूचना आपण मनाने स्वीकारणे हीच दीक्षा असते. आपण मनःपूर्वक संकल्प करून त्याचे आचरण करायचे असते. ‘परब्रह्मशक्ती स्फुरो हिंदुत्वामध्ये’ असे रोज म्हणायचे ठरविणे हीच माझी रामनामदीक्षा झाली, असा माझा अनुभव आहे. ज्यांना ज्यांना असे ध्येयाचे चिंतन करत कृतीचे ध्येयाशी अनुसंधान राखता येते त्यांनी हेच अनुभवाचे बोल सगळ्यांना सांगायचे असतात. आपण अनुभव घ्यायचे असतात आणि ‘विश्वासाने सकाळिकांना सांगायचे’ असतात. अनुभव घेऊया आणि विश्वासाने सांगूया असे नामदेव म्हणतात. स्वतः आधी अनुभव घेतल्यावर सुद्धा इतरांबरोबर पुन्हा अनुभव घ्यायला तयार असणे ही देखील प्रचारकाची आणि संघटकाची भूमिका आहे.
कार्यशरण आम्ही, ध्येयशरण आम्ही, तत्त्वशरण आम्ही
शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक दृष्ट्या किंवा सत्तेमुळे आपल्यापेक्षा बलवान असलेल्याच्या अधीन किंवा अंकित होणे म्हणजे व्यवहारातील शरणता (submission). विवेकानंद आणि अरविंदांनी भक्तिमार्गातील शरणतेसाठी surrender असा शब्द वापरला आहे. कोणाच्या शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक शक्तीमुळे नाईलाजाने किंवा नकळत त्यांच्या अधीन व्हायचे नाही. ‘मात्र खलांच्या सत्तेपुढती जुळोत ना कधि हात’ असेच राहिले पाहिजे. आपला आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, त्यामुळे परमात्म्याची इच्छा तीच आपली इच्छा, असे म्हणून आपल्या वेगळ्या इच्छा विसर्जित करून टाकणे म्हणजे surrender किंवा शरण जाणे. धृपदातील ‘येथें साधूं प्रेमा राघोबाच्या’ या ध्येयासाठी ‘शरण रिघो पंढरीनाथा’ म्हणजे परमात्म्याच्या इच्छेमध्ये आपल्या इच्छा विसर्जित करून टाकणे. अशी शरणता ज्याला साधते त्याची दीनबंधू म्हणजेच पंढरीनाथ किंवा राघोबा कधीही उपेक्षा करत नाही. शरण आलेल्याचा योगक्षेम मी बघतो असे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानेही सांगितले आहे. देवाच्या राघोबा या नावाऐवजी राष्ट्रदेव म्हणून हिंदुस्थान हे नाव घातले की हाच अभंग देशकारणासाठी संघटनेची सूत्रे पण सांगून जातो. संघटक नामदेवांचा प्रभाव आजही पंजाबमध्ये दिसून येतो.
गिरीश श्री. बापट.