ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण – कातकरी विकास प्रकल्प

वार्षिक वृत्त २०२४-२५

२०१७-१८ या वर्षी सुरु केलेल्या या प्रकल्पात शिक्षण,आरोग्य,रोजगार, आर्थिक साक्षरता,शासकीय योजना,व्यसनाधीनता,अंधश्रद्धा असे एकूण ७ विषयांवर काम चालते या वस्त्यांवर एकूण काम करणाऱ्या मार्गदर्शिका ताई १४ या आहेत. २०२४-२०२५ या वर्षी मालवली, कोंढवली, अडवली, अंबवणे, भोसले पाली, माळेगाव, चेलाडी, कातवडी  या ८ वस्त्यांवर नियमत व धानेप, कोंढावळे, विहीर, वैद्यवाडी, वाजेघर, साखर, सोंडे माथना या ७ वस्त्यांवर प्रासंगिक असे एकूण १५ वस्त्यांवर काम केले. 

*शिक्षण*

२०१७-१८ या वर्षी सुरू झालेल्या कातकरी समाजातील मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, चांगल्या सवयी लागव्यात, कौशल्य विकसित व्हावीत म्हणून वेल्हे तालुक्यातील मालवली, कोंढवली, अडवली, अंबवणे, भोसले पाली, माळेगाव, चेलाडी, कातवडी या ८ वस्त्यांवर ५ ते १५ वयोगटातील मुला-मुलींसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे नियोजन केले.

१) नियमित सत्रे :

  • २०२४-२५ या वर्षी सहभागी मुला-मुलींची संख्या : १२९
  • २०२४-२५ या वर्षी झालेली एकूण सत्रे : पहिली ते सातवीच्या मुला-मुलींसाठी एकूण  २५५  सत्र झाले.
  • सहभागी विद्यार्थ्यांचा वयोगट : ५ ते १५ वयोगटातील मुले-मुली या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये   सहभागी झाली.
  • विशेष : यावर्षीपासून निवासात शिकत असणारी मालवली वस्तीवरील प्रतिक्षा वाघमारे वस्त्यांवर सुरू असलेल्या कामात जबाबदारी घेऊन मदत करते आहे.
  • ज्ञान प्रबोधिनी जास्वंद गिरीकन्या सहनिवास येथे राहून ४ किशोरी व १ युवती अशा ५ जणी शिक्षण घेत आहेत.   
  • नियमित सत्राचे विषय :

चांगल्या सवयी : मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून शारीरिक स्वच्छता व परिसर स्वच्छतेची सत्रे घेतली जातात. शारिरीक स्वच्छतेमध्ये दररोज आंघोळ करणे, दात घासणे, केस विंचरणे, नखे स्वच्छ ठेवणे, नखे कापणे अशा विषयांवर भर दिला जातो तर परिसर स्वच्छतेमध्ये स्वतःच्या घराची व परिसराची स्वच्छता यावर भर दिला जातो. या विषयाची माहिती सांगून, छोट्या छोट्या व्हिडीओ दाखवून, तसेच काही गोष्टींचे प्रात्यक्षिक दाखवून करून घेतले जाते. उदा. नखे स्वच्छ करून कापणे, केस विंचरणे इ.

अभ्यास : मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून भाषा व गणित या  विषयांवर चित्रातून गोष्ट सांगून तसेच प्रत्यक्ष कृतीतून गोष्ट मुलांकडून करून घेऊन समजलेल्या गोष्टीवर आधारित भाषा व गणिताचे खेळ घेतले जातात. यानिमित्ताने मुलांना अक्षर व अंक ओळख होते आहे. 

खेळ : या सत्रामधून बैठे खेळ व मैदानी खेळ असे वेगवेगळे खेळ घेतले जातात.

कला-कौशल्य : मुलांच्या कला कौशल्यांना वाव मिळावा म्हणून कौशल्य सत्राचे नियोजन केले जाते. उदा. पतंग बनवणे, कागदी फुले बनवून हार बनवणे, किल्ला बनवणे, पणत्या रंगवणे, कथा कथन स्पर्धा इ.

२) पालक बैठका :

          मालवली, कोंढवली, माळेगाव, अंबवणे, आडवली, भोसले पाली, कातवडी या ७ वस्त्यावर पालक बैठका घेण्यात आल्या. शिक्षण जाणीव जागृतीच्या निमित्ताने पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे या उद्देशाने मुलांना तसेच पालकांनाही शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी या बैठका घेण्यात आल्या. 

३) शाळेतील प्रवेश :

     १० मार्च २०२४ या दिवशी कातकरी वस्त्यांवरील ५२ मुले-मुली व १३ ताई अशा ६५ जणांची सहल तर आपण ही सहल वस्तीवर असल्यावर एकमेकांच्या नादाने मुले शाळेत जात नाहीत,  तसेच घरी असल्यामुळे पालक मुलांना कामावर घेऊन जातात. तर अशा निवासी शाळांमध्ये प्रवेश झाल्यास वस्त्यांवरील मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत असा सहलीचा उद्देश होता.

    सहल जाऊन आल्यानंतर कोणा कोणाला शाळेत जायला आवडेल याचा पाठपुरावा करून मुलांच्या गृहभेटी घेऊन यादी तयार करण्यात आली. त्यानंतर वस्त्यांवर पालक बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर शाळेत जाण्याची तारीख नक्की करून १९ जून यादिवशी कातकरी वस्तीवरील ९ मुलांचे व धनगर वस्ती कुसारपेठ येथील ४ मुलांचे अशा एकुण १३ (७ मुली व ६ मुले) जणांचे प्रवेश पालकांना सोबत घेऊन केले.

४) मेळावे :

(१) शिक्षण मेळावा :

मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून १४ मे २०२४ या दिवशी कातकरी वस्त्यांवरील ७२ मुला- मुलींचा सकाळी १०.०० ते ४.०० या वेळेत मेळावा घेण्यात आला. हा मेळावा घेण्यासाठी १३ प्रशिक्षिका उपस्थित होत्या. तसेच हा मेळावा बघण्यासठी म्हणून ४ पालक आवर्जून मेळाव्यात सहभागी झाले होते. मेळाव्याचा शिक्षण हा मुख्य विषय होता.

“टाकरं जरा नजर”  या पद्याने मेळाव्याची सुरुवात झाली. त्यानंतर शिक्षणावरील “चेत्या” ही फिल्म दाखवून त्यावर चर्चा घेण्यात आली. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून स्वच्छतेवर एक presentation दाखवण्यात आले. आणि त्यावर काही प्रश्न विचारून उत्तरे देतील त्यांना बक्षीस म्हणून पेन्सिल देण्यात आल्या. नंतर निरीक्षण कौशल्याचा चित्रातील फरक ओळखणे हा खेळ घेऊन फरक ओळखेल त्या मुलांना बक्षीस म्हणून खाऊ देण्यात आला.

दुपारच्या जेवाणानंतर कौशल्य सत्र झाले. या सत्रात ५ गट करून मुलांना गटांमध्ये कागदापासून फुलपाखरू बनवायला शिकवले. सर्वांना २-२ फुलपाखरू बनवण्याचे साहित्य देऊन फुलपाखरे बनवून घेण्यात आली. आणि ती फुलपाखरे घरी लावण्यासाठी प्रत्येकाला देण्यात आली.

शेवटी पुढे येऊन बालगीते, कविता सादर करण्याची संधी मुलांना दिली. काहींनी वैयक्तिक तर काहींना गटात असे एकुण १६ जणांनी सादरीकरण केले. मेळाव्याचा समारोप करून खाऊ वाटप करण्यात आला.

(२) दिवाळी मेळावा :

२७ ऑक्टोंबर २०२४ या दिवशी कै. लीलनताई तांबे महिला शैक्षणिक संकुल वेल्हे येथे ८ वस्त्यांवरील ८४ मुला-मुलींचा मेळावा घेण्यात आला.

नेहमी प्रमाणे मेळाव्याची सुरुवात पद्याने झाली. मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शिक्षण या विषयावर फिल्म दाखवून त्यावर मुलांना प्रश्न विचारून चर्चा घेण्यात आली. त्यानंतर मुलांचे ४ गट करून खुर्चीत बसून फुगा फोडणे, पायांच्या बोटात गोट्या उचलून प्लेट मध्ये टाकणे, बकेट मध्ये बॉल टाकणे, रिंग टाकून खाऊ जिंकणे अशा प्रकारचे ४  गंमत खेळ गटात घेण्यात आले. दुपारी जेवणानंतर सर्वांना गटा गटामध्ये बसवून आकाशकंदिल बनवून घेण्यात आला. तसेच प्रत्येकाला २ पणत्या देऊन रंगवून घेण्यात आल्या.

सर्वांना घरी जाताना पणत्या, आकाशकंदिल, ब्रश, साबण, कोलगेट, फराळ अशा प्रकारचे किट वाटप करण्यात आले. मेळाव्यात रसिकाताई चिकटे या देखील उपस्थित होत्या. त्यानंतर मेळाव्याचा समारोप करण्यात आला.  

५) विज्ञान शिबिर : दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२४ या दिवशी वेल्ह्यात नातू सभागृहात ६ वस्त्यांवरील ६१ मुलां-मुलींचे विज्ञान या विषयावर शिबिर घेण्यात आले. १२ युवतींनी हे शिबिर घेतले. शिबिरात खालील विषय घेण्यात आले.   

पथनाट्य : आयुष्यात काहीही घडले तरी अंगात येणाऱ्या देवाकडे दाखवून आपले सगळे चांगले होईल असा विश्वास ठेऊन जगणारे हे लोक आजारपणातही डॉक्टरांकडे जात नाहीत. म्हणून ज्ञान प्रबोधिनी जास्वंद गिरीकन्या निवासातील युवतींनी भोंदूबाबा आणि आजारपण व डॉक्टर आणि आजारपण या दोन विषयांवर पथनाटये सादर केली. आणि त्यावर प्रश्न विचारत चर्चा घेण्यात आली.

स्मरण कौशल्य : मुलांचेस्मरण कौशल्य वाढावे म्हणून ४ स्मरण कौशल्यांचे खेळ घेण्यात आले. तसेच पाने, फुले, मेणबत्ती असे काही निरीक्षणे करायला सांगून ते नोंदवून गटाने पुढे येऊन सादर करण्यात आले. त्यामुळे  एखाद्या वस्तूचे निरीक्षण कसे करायचे व ते समोर सादर कसे करायचे हे मुलांना समजले.

गटकार्य : ८ गट करून गटकार्य करून घेण्यात आले. प्रत्येक गटाने किल्ल्याच्या परिसरात कोणती झाडे आहेत व त्या झाडांचा उपयोग कशासाठी होतो अशी यादी तयार करून प्रत्येक गटाने केलेल्या यादीचे सादरीकरण सर्वांसमोर केले. या निमित्ताने मुलांनी गटाने कसे काम करावे याचा अनुभव घेतला तसेच मुलांना असे पण समजले की कोणत्या वनस्पतीचा उपयोग कशासाठी केला जातो.

विज्ञान प्रयोग : हळदीचारंग बदलणे, तरंगणे-बुडणे, दुर्बिणीच्या साहाय्याने कागद जाळणे, कागदी फोन, हवेच्या दाबाचे प्रयोग ५ गट करून प्रत्येक मुलाकडून करून घेण्यात आले. त्यामुळे स्वत: प्रयोग करून बघण्याचा आनंद मुलांनी घेतला.

दल : दोन दिवस १-१ तास मुलांचे दल घेण्यात आले. दलावर उभा खो-खो, बॉल पासिंग, चिट-पट असे वेगवेगळे खेळ घेण्यात आले. 

समारोपाच्या सत्रात दोन दिवसांत जे काही विषय घेतले त्यांवर प्रश्न विचारून बक्षिस म्हणून खाऊ देण्यात आला आणि शिबीराचा समारोप करण्यात आला.

६) सहल : १६ मार्च २०२५ या दिवशी ४ वस्त्यांवरील ४० मुले-मुली व १० ताई अशा ५० जणांची सहल नायगाव व बालाजी येथे जाऊन आली. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीतील प्रत्येक चित्राची माहिती मुलांना सांगून सावित्रीबाई फुले यांचे जन्म ठिकाण असलेला वाडा दाखविला. या वाड्यात एकत्र बसून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित काही प्रश्नोत्तरे झाली.

त्यानंतर केतकावळे येथील बालाजी मंदिरात दर्शन घेऊन व महाप्रसाद घेऊन परतीचा प्रवास झाला.   सर्व मुलांनी आणि तायांनी देखील पहिल्यांदाच ही दोन्ही ठिकाणे पाहिली.

*रोजगार*

१) जाणीव जागृती सत्र :

कोंढवली, मालवली, आंबवणे, अडवली व चेलाडी या ५ वस्त्यांवर जाणीव जागृती सत्रे घेण्यात आली.  युवतींना कौशल्य प्रशिक्षण वर्गाबद्दल माहिती देऊन हा वर्ग केल्यावर काय फायदा होऊ शकतो असे समजावून सांगितले. ही सत्रे झाल्यानंतर वस्त्यांवरील युवतींची कौशल्य प्रशिक्षण वर्गांसाठी नाव नोंदणी करून घेण्यात आली. 

२)कौशल्य प्रशिक्षण वर्ग :

        युवतींची कौशल्ये विकसित व्हावीत तसेच समाजात असणाऱ्या रोजगाराच्या संधी लक्षात याव्यात म्हणून वेगवेगळ्या विषयांचे बेसिक प्रशिक्षण वर्गांचे नियोजन करण्यात आले.   वस्त्यांवरील मुले-मुली शाळेत जावेत याकरीता आपण प्रयत्न करत आहोतच पण ज्यांना शाळेत जाणे आवडतच नाही अशांसाठी आपण वेगवेगळे कौशल्य वर्ग वर्षभरात घेण्याचे नियोजन केलेले होते. सहभागी वयोगट हा १३ वर्षापासूनचा होता. यानिमित्ताने पुढे जाऊन काही ना काही रोजगार या मुलांना उपलब्ध व्हावा असा उद्देश आहे.

(१) पार्लर वर्ग : करंजावणे येथे हा वर्ग घेण्यात आला. या वर्गात ४ वस्त्यांवरील मिळून १४ मुली सहभागी झाल्या होत्या. हा वर्ग ६ दिवसांचा झाला. या वर्गात साड्यांचे प्रकार, हेअर स्टाईल, हेअर कट, क्लीनअप, बेसिक मेकअप शिकवण्यात आले. पहिल्यांदाच असा वर्ग वस्त्यांवरील मुलींसाठी घेण्यात आल्या. शेवटच्या दिवशी जे काही ६ दिवस शिकवले त्याचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.

(२) मेहंदी वर्ग : करंजावणे येथे हा वर्ग घेण्यात आला. या वर्गात ४ वस्त्यांवरील मिळून ९ मुली सहभागी झाल्या होत्या. हा वर्ग ३ दिवसांचा झाला. या आधी हा वर्ग २०२३-२४ या वर्षी वस्त्यांवर घेतलेला असल्यामुळे थोडा पुढच्या टप्प्याचा वर्ग घेण्यात आला. मात्र ज्यांना काहीच जमत नाही अशांना बेसिक गोष्टी शिकवण्यात आल्या.

(३) शिवण वर्ग : करंजावणे येथे हा वर्ग घेण्यात आला. या वर्गात ४ वस्त्यांवरील मिळून ७ मुली सहभागी झाल्या होत्या. हा वर्ग ५ दिवसांचा झाला. या वर्गात हात शिलाई, बटन, हुक-लुक, ओवर लॉक तसेच मशीन चालवायला शिकवून पेपर वर मापे टाकायला शिकवून कटींग करायला शिकवले. त्यानंतर हातरुमाल व साधी पिशवी शिवायला शिकवली.  

 (४) भरतकाम : हा वर्ग नसरापूर केंद्रात घेण्यात आला. या वर्गाला ४ वस्त्यांवरील मिळून एकूण ८ युवती उपस्थित होत्या. सकाळी ११:०० ते ४:०० या वेळेत एक दिवसाचा हा वर्ग घेण्यात आला.  एकूण  ५ प्रकारचे भरतकामाचे टाके शिकवण्यात आले.

२) जांभूळ विक्री :

दरवर्षी डिसेंबर-जानेवारी महिन्यात साधारण ५-६ महिन्याकरीता वेल्हे तालुक्यातील लोक कामासाठी म्हणून दौंड, बारामती, इंदापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागात तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात ही स्थलांतरित होतात. आणि याचा परिणाम हा थेट मुलांच्या शिक्षणावर होताना दिसतो. स्थलांतरित झाल्यावर जी मुले शाळेत जात होती त्यांची ही शाळा थांबते हा एक प्रश्न आणि दुसरे म्हणजे या दिवसात रोजगार मिळत नसल्याने घर खर्च भागविणे अवघड होते. उन्हाळ्याच्या दिवसात या लोकांच्या हाताला काम मिळाले तर हा प्रश्न थोडा कमी होईल म्हणून आपण २ वर्षांपूर्वी जांभूळ विक्रीचा प्रयोग करून पाहिला. तो चांगला झाला. म्हणून या ही वर्षी आपण या लोकांकडून जांभळं घेऊन पुण्यात विक्री केली. या वर्षी वस्तीवर जाणाऱ्या तायांच्या मदतीने जांभूळ मोजून बॉक्स पॅकिंग कसे करायचे हे ही लोकांना शिकवले.  

१० दिवसांत ७ कुटुंबांनी मिळून २५१.५०० किलो जांभळं विक्रीसाठी दिली. यातून या ७ कुटुंबांना ३८,२००/- रुपये मिळाले. यामुळे त्यांना बरीच मदत होते आहे असे लक्षात आले.

३) उद्योग सहल :

       युवक-युवतींनी प्रशिक्षणे घेऊन स्वतःचा काही ना काही उद्योग सुरु करावा याकरीता १५ फेब्रुवारी २०२५ या दिवशी वेल्हे तालुक्यातील खोपडेवाडी येथील खेकडेपालन करणारे बापू जोरकर व निगडे येथील मत्सपालन करणारे शिवाजी बावळेकर यांना भेट  देऊन खेकडेपालन व  मत्सपालन कसे केले जाते हे समजावून घेतले. तसेच प्रत्यक्ष खेकडे प्लांटला व मत्सतळ्याला भेट देऊन त्याचा येणारा वार्षिक खर्च, खाद्य, विक्री यावर चर्चा करत समजावून घेण्यात आले. या सहलीत ६ जण सहभागी झाले होते.  

*आरोग्य*

१) स्वच्छता जाणीव जागृती उपक्रम : मालवली, कोंढवली, अंबवणे, चेलाडी, भोसलेपाली, अडवली या ६  वस्त्यांवर स्वच्छतेची माहिती सांगून स्वच्छता करणे का महत्वाचे आहे हे पटवून सांगण्यात आले. या निमित्ताने ६ वस्त्यांवर मिळून एकूण  ४५ जण सहभागी झाले.

२) स्वच्छता उपक्रम : मालवली, कोंढवली, अंबवणे, चेलाडी, भोसलेपाली, अडवली या ६  वस्त्यांवर लोकांच्या सहभागाने स्वच्छतेचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये मुलांचा सहभाग चांगला होता. स्वच्छता उपक्रमांतर्गत  खालील उपक्रम वस्तीवर राबविण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये मिळून एकूण ५० जण सहभागी झाले.

  • परिसर स्वच्छता
  •  सांडपाणी व्यवस्था
  •  कचरा व्यवस्थापन

वस्त्यांवर जाऊन तायांनी सर्व लोकांना व मुलांना एकत्र जमा करून सर्वांनकडून गटाने काम केले त्यानिमिताने लोकांना गटाने काम करण्याचा अनुभव मिळाला. वस्तीवरील कचऱ्यांची विल्हेवाट लावून कचरा व सांडपाणी व्यवस्था करून देण्यात आली.

३) सकस आहार सत्र : वस्त्यांवरील लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मिळेल तिथे दिवसभर काम करून दिवस भागवला जातो. त्यामुळे पालकांकडून मुलांच्या शारिरीक वाढीकडे लक्ष दिले जात  नाही. म्हणून २०२३-२४ या वर्षी चेलाडी वस्तीवर १०० दिवसांचा ८३ मुला-मुलींकरीता सकस आहार उपक्रम राबविण्यात आला. या प्रकल्पाच्या निमित्ताने मुलांना एक वेळचा पोटभर खाऊ तर मिळालाच पण त्याचबरोबर मुलांच्या वाढीतील बदल लक्षात आले.  म्हणून या वर्षी ६ वस्त्यांवर ४७ पालकांसाठी सकस आहार सत्रे घेण्यात आली. या सत्रांमध्ये पालकांना मुलांच्या वाढीसाठी आहाराचे महत्व समजावून सांगण्यात आले. तसेच कोणत्या दिवसात कोणता आहार घ्यावा, त्या त्या भागात उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे  कोणती अशी सर्व माहिती चित्रे दाखवून सांगण्यात आली.

४) आरोग्य तपासणी :

०९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी करांजवणे येथे ९.३० ते ४.३० या वेळेत कोंढवली, मालवली, अडवली, भोसलेपाली, कातवडी या ५ वस्त्यांवरील ५१ जणांची (८ महिला + ४३ मुले-मुली) जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणीसाठी स्नेहसेवा/ मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्ट यांनी मदत केली. यासाठी पुण्यातून डॉ. मुकुंद संगमनेरकर, ट्रस्ट अध्यक्ष डॉ. राधा संगमनेरकर व ट्रस्ट सचिव नीला सरपोतदार आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात पद्याने करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी स्वच्छतेबद्दल मुलांना व पालकांना माहिती सांगितली. तसेच मुलांना कपडे व खेळणी वाटप करण्यात आली. मुलांना कपडे व खेळणी वाटप करून झाल्यावर सर्वांची तपासणी करण्यात आली. तपासणी झाल्यावर त्या त्या वस्त्यांवरील पालकांशी बोलून मुलांना औषधे देण्यात आली. ठराविक जणांना डॉक्टरांनी लिहून दिलेली वेगळी औषधे घेऊन नंतर वस्त्यांवर पोहच करण्यात आली. खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

आपण आत्तापर्यंत त्या त्या वस्तीवर आरोग्य तपासणी घेत होतो. यावेळी सर्व वस्त्यांना निरोप देऊन कारंजवण्यात यायला सांगितले होते. आणि ५१ जण या तपासणीसाठी आले हे विशेष.

वस्तीवर आरोग्य तपासणीसाठी येऊ  नका म्हणणारे लोक आता स्वतःहून तपासणीसाठी आले हे महत्वाचे.

ज्या वस्त्या गावापासून लांब आहेत अशा २ वस्त्यांनी औषध पेटीची मागणी केल्यामुळे त्या २ वस्त्यांवर औषध पेटी देण्यात आली. या औषध पेटीचा चांगला उपयोग होतो आहे असे लक्षात येते आहे.     

*शासकीय कागदपत्रे व योजना*

 १) शासकीय कागदपत्रे व योजना मेळावा :

दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ या दिवशी वेल्हे येथे हा मेळावा झाला. या मेळाव्यात ३८ वस्त्यांवरील २२९ जण +  ज्ञा.प्र. कार्यकर्ते २२ + निवासी नायब तहसीलदार, साहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, जि.प. सदस्य असे शासकीय अधिकारी ३७ असे एकुण २८८ जण सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात “संघटना हे सूत्र बनावे” या पद्याने करण्यात आली. प्रस्तावना झाल्यावर अधिका-यांनी सर्वांशी संवाद साधला. तसेच कागदपत्रांची/ योजनांची माहिती सर्वांना देण्यात आली. लोकांच्या प्रश्नांवर/ अडचणींवर प्रश्नोत्तरे होऊन चर्चा झाली. मा. बागेश्रीताई पोंक्षे यांनी सर्वांना मार्गदर्शन करून अश्विनीताईंनी सभेचा समारोप केला.

सभा झाल्यानंतर एकाच वेळी ५ कॅम्प लावण्यात आले. या कॅम्पमध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तींची संख्या खालील प्रमाणे –

१) आधार कार्ड (लिंक करणे, अपडेट करणे) – १४

२) रेशनकार्ड  (ऑनलाईन करणे, नाव वाढवणे व कमी करणे) – ३७

३) वीज जोडणी (वैयक्तिक व वस्तीची कामे) – ४९

४) नळ जोडणी (वैयक्तिक) – १३

५) आरोग्य तपासणी शिबिर (जनरल तपासणी, बी पी, शुगर, बाल आरोग्य तपासणी) – ७२

अशा एकुण १७४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

२)जात पडताळणी मेळावा :

६ सप्टेंबर २०२४ या दिवशी जातीचे दाखले काढण्यासंदर्भात मेळावा घेतला होता. १२७ जणांची कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा करण्यात आला. प्रत्येक व्यक्तीचा पंचनामा करून त्या त्या गावचे पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी यांचे सही शिक्के झाल्यावर ११ मार्च २०२५ या दिवशी मेळावा घेऊन या मेळाव्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील आदिवासी विकास निरीक्षक यांच्याकडून जात पडताळणी करण्यात आली.

या मेळाव्याला जात पडताळणीसाठी आलेले १४९ लोक + आदिवासी विकास निरीक्षक, प्रांत अधिकारी, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, साहाय्यक गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी असे १९ अधिकारी + ज्ञान प्रबोधिनी कार्यकर्ते ११ असे एकूण १७९ जण कार्यक्रमाला उपस्थित होते.

एकूण १३९ जणांचे जात पडताळणीचे काम पूर्ण करण्यात आले.    

तसेच या मेळाव्यात PM-KISAN योजनेचे ११८ जणांचे फॉर्म भरून घेण्यात आले. व ५ जणांचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक करून घेण्यात आले.

कमवा शिका योजना  :

एप्रिल ते जून २०२४ अशा दोन महिने झालेल्या कमवा शिका योजनेत ज्ञान प्रबोधिनी जास्वंद गिरीकन्या  निवासात शिकत असणारी  मालवली वस्तीवरील प्रतिक्षा वाघमारे पहिल्यांदाच सहभागी झाली होती. वेगवेगळ्या प्रकल्पाचे सर्व्हे, प्रशिक्षण, उन्हाळकाम उत्पादन व विक्री, व्यवस्थापन अशी वेगवेगळी कामे यात करण्यात आली. यानिमित्ताने ११,२१० /- रुपये स्कॉलरशिप म्हणून प्रतिक्षाला देण्यात आली. 

आर्थिक मदतीसाठी
ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन या नावाने धनादेश द्यावा किंवा
ऑनलाईन ट्रान्सफर करणार असल्यास खालील बँक खात्यावर देणगी पाठवावी. ही विनंती.
Bank Name: Bank of Baroda
Branch Name: Sadashiv peth
Account Name: Jnana Prabodhini Stri Shakti Prabodhan
A/C No.:  89740100001048
IFSC Code: BARB0VJSADP (5TH character is zero)
MICR Code: 411012073
संपर्क : प्रतिभा स्वामी – ९७६७८३२४३६

*********************************************************************************************************