लेख क्र. २२

२६/६/२०२५
मागील भागात आपण डॉ. सुरुची पांडे यांच्या प्रकल्पातील वेद व वेदांगे, ब्राह्मण-आरण्यक-उपनिषदे, रामायण-महाभारत-पुराण हे तीन भाग बघितले. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन. कवी कालिदास अभिजात संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे कवी. आजच्या निमित्ताने अभिजात साहित्यातील काव्ये, नाटके, तसेच तत्त्वज्ञान व भारतीय विद्या या ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ प्रकल्पातील चार भागांची थोडक्यात माहिती घेऊया. हे चारही भाग ‘संत्रिकेत’ पुस्तकरूपात प्रकाशित झाले आहेत.
संस्कृत काव्य (भाग ४)

काव्यं यशसेऽर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये | सद्य:परनिर्वृतयेकान्तासम्मिततयोपदेशयुजे ||
याचा थोडक्यात अर्थ – काव्य यश मिळविण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, पत्नीप्रमाणे उपदेश करणारे असते. असे व्यापक प्रयोजन असणाऱ्या काव्याचा परिचय या भागात करून दिला आहे. काव्याची सर्व प्रकारची माहिती देणारे साहित्यशास्त्र प्राधान्याने इ.स. ९०० नंतर तयार झाले. संस्कृत काव्याचे क्षेत्र एवढे व्यापक आहे की ऋग्वेद कालापासून सतराव्या शतकातील महाकवी जगन्नाथ यांच्यानंतरही काव्याचा ओघ वाहतो आहे. संस्कृत काव्ये, महाकाव्ये हे संस्कृत प्रासादाचे एक संपन्न दालन आहे. संस्कृतातील काव्यांची संख्या अगणित आहेच परंतु या काव्यांचे विषयही विविध प्रकारचे आहेत. प्रस्तुत पुस्तकात महाकाव्याची लक्षणे, पंचमहाकाव्ये सारांश आणि लक्षणांसहित सांगितली आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक महाकाव्य, भक्ती, शृंगाराचा समावेश असणारी मुक्तक-काव्य, काव्य प्रकारात येणारी सुभाषिते, श्लेष काव्य, गद्य काव्य, चंपूकाव्य, कथा काव्य, शिलालेखीय काव्य, दक्षिणभारतातील महत्त्वाची संस्कृत काव्य रचना आणि विशेष म्हणजे बौद्ध व जैन संस्कृत काव्य यावरही प्रकाश टाकला आहे. वरील काव्य प्रकारांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे –
- पंचमहाकाव्ये – कालिदासाचे रघुवंश, श्रीहर्षाचे नैषधीयचरित इ.
- ऐतिहासिक काव्ये – राजतरंगिणी
- मुक्तक काव्ये – गीतगोविंद
- श्लेष काव्ये – राघवपाण्डवीयम् , रामकृष्णविलोमकाव्यम्
- गद्य काव्ये – बाणभट्टलिखित हर्षचरित
- चम्पू काव्ये – गद्य व पद्य मिश्रित काव्य. उदा. रामायणचम्पू
- कथा काव्ये – पंचतंत्र
- दक्षिणभारतीय संस्कृत काव्ये – नीलकंठ दीक्षित यांचे ‘गंगावतरण’ महाकाव्य
- शिलालेखीय काव्ये – यात प्रामुख्याने राजाची अथवा त्याने केलेल्या कामाची स्तुती असते. उदा. जुनागडचा सुदर्शन तलावाच्या दुरुस्तीचा शिलालेख
- बौद्ध व जैन काव्ये – अश्वघोषाचे बुद्धचरित
दश रूपके (भाग ५)

नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम् | ‘भिन्नरुचि’ लोकांना आवडेल असा एकमेव साहित्यप्रकार म्हणजे नाटक. साहित्यशास्त्रात सर्वच वाङ्मयप्रकाराला काव्य म्हणतात. बहुतेक सगळी काव्य ही ऐकायची किंवा वाचायची असतात. पण नाटक हे ऐकायचं असतं तसंच पहायचही असतं म्हणूनच त्याला ‘दृश्यकाव्य’ असं म्हटलं आहे. या दृश्यकाव्याचे सर्वसाधारणपणे दहा प्रकार संस्कृत साहित्यशास्त्रात विशद केले आहेत. त्यांना ‘रूपक’ असं अन्वर्थक नाव दिलेलं आहे. प्रस्तुत पुस्तकात दशरूपके म्हणजे काय आणि ती कोणती हे सांगितले आहे. नाटक, प्रकरण, अंक, व्यायोग, भाण, समवकार, वीथी, प्रहसन, डिम, ईहामृग या दश रूपकांबरोबरच १८ उपरूपके आणि त्यातील नाटिका या प्रकाराचे उदाहरण ‘रत्नावली’ यांचीही माहिती दिली आहे. कवी ‘भास’रचित तेरा रूपके प्रसिद्ध आहेत. ही रूपके मुख्यत्वेकरून रामायण व महाभारतावर आधारित आहेत. या तेरा रूपकांना ‘भासनाटकचक्र’ असेही म्हटले जाते. कालिदासाने एकूण तीन नाटके लिहिली, त्यांपैकी ‘अभिज्ञानशाकुंतल’ हे नाटक विश्वप्रसिद्ध आहे. याशिवाय भवभूति, विशाखदत्त हे सुद्धा प्रसिद्ध नाटककार आहेत. शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ हे प्रकरण (नाटक प्रकार) विशेष आहे. भरत मुनींचे नाट्यशास्त्र आणि धनंजयाचे दशरूपकम् यांच्या अभ्यासावर आधारित ह्या भागाची मांडणी केलेली आहे.
भारतीय तत्त्वज्ञान (भाग ६)

तत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी दर्शनांची आवश्यकता भासते. जीवन आणि दर्शन यांच्यात अतूट संबंध आहे. ‘श्रेयस’ म्हणजे काय, ‘जीवनाचे खरे ध्येय काय आहे’ असे प्रश्न ज्याला पडतात, त्याला दर्शनांचे महत्त्व कळते. ‘दुःख’ या गोष्टीने त्रासलेला माणूस दुःखापासून दूर जायचा प्रयत्न करतो. दुःखाची कारणे तो शोधू लागतो. त्याच्या शोध प्रवासाला निश्चित असा एक दृष्टिकोण द्यायचे काम दर्शनांमुळे होते. ‘दर्शन’ या शब्दाचा वाच्यार्थ ‘चक्षु’ या इंद्रियाशी निगडित आहे. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ‘चक्षु’ चे महत्त्व असाधारण आहे. जे डोळ्याने दिसते, त्यावर निश्चितपणे विश्वास ठेवला जातो. म्हणून अंतिम सत्य काय असते हे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शास्त्राला ‘दर्शन’ हा शब्द लावला गेला. जगत्, जीव, ईश्वर व मोक्ष हे दर्शनांमधील चिंतनाचे प्रमुख विषय होत. भारतीय दर्शनशास्त्रात वेदांचे प्रामाण्य मानणारे (आस्तिक) व न मानणारे (नास्तिक) असे दोन विभाग केले जातात. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा (वेदान्त) ही आस्तिक दर्शने आणि जैन, बौद्ध, चार्वाक ही नास्तिक दर्शने अशी विभागणी केली जाते. न्यायसूत्र, वैशेषिकसूत्र, मीमांसापरिभाषा, आगमग्रंथ, त्रिपिटक इ. महत्त्वाचे दर्शनग्रंथ आहेत. दर्शने केवळ अध्यात्मच सांगत नाहीत तर व्यवहारी जीवनात मार्गदर्शन करतात, नैतिक मूल्ये शिकवतात. अशी ही दर्शने या भागात सविस्तर सांगितली आहेत.
प्राचीन भारतीय विद्या (भाग ७)

या भागामध्ये कला, साहित्य, वैद्यक शास्त्र, उपयोजित शास्त्र, मनोरंजन, युद्धविषयक शास्त्र, आणि आचरणविषयक विचार अशी प्रकरणे आली आहेत. ‘कला’ प्रकरणात नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र, अलंकार (दागिने), रांगोळी इ. विषय आहेत. ‘साहित्य’ प्रकरणात साहित्यशास्त्र, कोषरचनाशास्त्र आणि व्याकरणशास्त्र हे विषय आले आहेत. वैद्यकशास्त्रात आयुर्वेद तर आहेच शिवाय वृक्षायुर्वेद, गजायुर्वेद अशी शास्त्रेसुद्धा आहेत. उपयोजितशास्त्रात दैनंदिन जीवनाशी निगडित शास्त्रे येतात, उदा. पाकशास्त्र, कृषिविद्या, गणितशास्त्र, वास्तुविद्या इ. युद्धविषयक शास्त्रात साहजिकच शस्त्र, अस्त्र, विमान यांची माहिती दिली आहे. आचरण विषयक विचार या प्रकरणात नीतिशास्त्र, मानसशास्त्र, व अर्थशास्त्र हे विषय आले आहेत. मनोरंजन या प्रकरणात क्रीडा, जादू विद्या व शकुन विद्या हे दोन विषय आले आहेत. आधुनिक जगात असलेले सर्वच शास्त्र प्राचीन भारतात होते, हा अट्टाहास उपयोगाचा नाही. पण जे विषय होते, त्या त्या विषयांचा उल्लेख या भागात केला आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीची संपन्नता, विषयांची विविधता कळते. ‘संस्कृत’ भाषा फक्त वेद, उपनिषदे, पुराणे, पूजापाठ, व्याकरण, काव्ये एवढ्यापुरती सीमित नाही असे हा भाग सांगतो. म्हणून हा भाग विशेष वाचनीय वाटतो.
ह्या चार भागात डॉ. सुरुची पांडे यांनी संस्कृत काव्य, नाटक तसेच तत्त्वज्ञान सुद्धा सविस्तर आणि सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे.