माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥
आतां आड उभा राहें नारायण । दयासिंधुपणा साच करी ॥
वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन झालों देवा ॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा॥
या निरूपणमालेतील पहिले दोन अभंग मी आठवीत असताना माझ्या परिचयाचे झाले. तिसरा अभंग मी अकरावी झाल्यानंतर मला ऐकायला मिळाला. आता आजच्या अभंगाची ओळख कशी झाली याविषयी आधी थोडेसे निवेदन. प्रबोधिनीत दर रविवारी रात्री युवकांची एक अभ्यासबैठक चालायची. दहावीच्या दुसऱ्या सत्रानंतर मी त्या बैठकीला जायला लागलो. बैठक झाल्यावर त्या रात्री प्रबोधिनीत म्हणजे आप्पांच्या निवासस्थानी मुक्काम असायचा. रात्री बैठक झाल्यावर आणि अनेक वेळा सकाळी उपासना झाल्यावर आप्पा कोणता तरी अभंग किंवा पद्य म्हणत असायचे. त्यात ऐकलेला हा अभंग. हा अभंग लक्षात राहायचे कारण म्हणजे त्या एक दोन वर्षांच्या काळात हा अभंग आप्पांनी मला त्यांच्या चालीत म्हणायला शिकवायचा प्रयत्न चार पाच वेळा केला होता. हा अभंग शिकण्याबाबत माझ्या मनात मात्र फार उत्साह नव्हता.
निरुत्साहाचे कारण
प्रबोधिनीत भजनाच्या वेळी अभंग म्हणणाऱ्याने त्याला समजलेला अभंगाचा अर्थ आधी थोडक्यात सांगायचा आणि मग अभंग म्हणायचा अशी पद्धत ठेवली आहे. हा अभंग म्हणणारा त्याचे थोडक्यात निरूपण असे करेल – ‘माझे अवगुण मज कळो येती. माझ्यातले दुर्गुण, उणिवा मला समजतात. पण काय करू? माझे मन मला आवरता येत नाही. ते पुन्हा पुन्हा चुकीच्या मार्गाने जाते. मन चुकीच्या मार्गाने जायला लागले की आता नारायणा तूच त्याच्या चुकीच्या रस्त्यावर त्याला आडवा जा आणि थांबव. तुझे दयेचा सागर हे नाव माझ्या मनाला अडवून तू खरे करून दाखव. मी संयमाच्या गोष्टी खूप बोलतो पण त्याप्रमाणे मला वागता येत नाही. माझे कान, डोळे, जीभ त्यांना आवडते त्या गोष्टींकडे बऱ्या-वाईट परिणामांचा विचार न करता धाव घेतात आणि मन त्यांच्या मागे फरफटत जाते. तुकाराम महाराज म्हणतात मी जसा आहे तसा माझ्या गुण-दोषांसकट नारायणा तुला शरण आलो आहे. तू माझी उपेक्षा करू नकोस. आई वडिलांसारखे तू ही मला सांभाळून घे’. पण हा अर्थ मला सुरुवातीला पचेना.
उत्तर भारतात सगळीकडे ‘ओम जय जगदीश हरे’ ही आरती प्रसिद्ध आहे. या आरतीतील ‘मैं मूरख खल कामी’ हे शब्द मला खटकायचे. ‘स्वतःला कमी लेखू नका’ ही प्रबोधिनीतील शिकवण होती. आणि असं सांगणारे आप्पा ‘मैं मूरख खल कामी’ असाच भाव असलेला अभंग स्वतः का म्हणतात? आणि मला का शिकवतात? हा प्रश्न मला पडायचा. परमेश्वराकडे दयेची भीक मागणारा अभंग मी का म्हणायचा? असा प्रश्न मला पडला होता. हळूहळू लक्षात येत गेलं की अभंगाचा अर्थ अभंग लिहिणाऱ्याच्या किंवा रचणाऱ्याच्या त्यावेळच्या मनःस्थितीवरून समजून घ्यायचा असतो.
गैरसमज दूर झाला
शंतनुराव किर्लोस्कर हे प्रबोधिनीचे जवळजवळ पंधरा वर्ष अध्यक्ष होते. ते अतिशय चिकित्सक आणि प्रयत्नवादी होते. आपल्या एका वर्षारंभ उपासनेला आल्यानंतर त्यांना घरी पोहोचवायला त्यांच्या बरोबर गेलेल्या कार्यकर्त्याला ते म्हणाले होते की तुमच्या प्रार्थनेमध्ये ‘हे घडू दे ना’, ‘असे होऊ दे’ अशी वाक्ये का आहेत? प्रार्थनेत सुद्धा ‘आम्ही करू’, ‘आम्ही घडवू’ असेच म्हटले पाहिजे. त्या कार्यकर्त्याकडून नंतर कधीतरी मला हा संवाद ऐकयला मिळाला. हे ऐकणाऱ्या माझ्या बरोबरीच्या युवक मित्रांना आपल्या मनातलेच शंतनुराव बोलले याचा आनंद झाला. सर्वांनी ‘शंतनुरावांचे म्हणणे बरोबर आहे. आपण वर्षारंभाच्या गद्य प्रार्थनेत बदल करूया’, असा शंतनुरावांच्या बोलण्याला दुजोरा दिला. त्यावर आप्पांनी केलेल्या खुलाशानंतर मला मात्र या अभंगाच्या अर्थाची किल्ली सापडली.
एखादे स्वच्छ कापड त्याच्याकडे भिंगातून पाहायला लागल्यावर इतके स्वच्छ नाही असे कळते. त्यावर धुळीचे आणि कचऱ्याचे बारीक बारीक कण चिकटलेले दिसायला लागतात. त्याप्रामाणेच ज्याची संवेदनशक्ती वाढलेली आहे त्याला आपल्या स्वभावातले बारीकसारीक दोषही भिंगातून पाहिल्यासारखे मोठे वाटायला लागतात. ज्याची जशी उपासनेत प्रगती होते तशी त्याची चित्तशुद्धी होत जाते. मग त्याला आपल्या चित्तातले बारीकसारीक दोषही खपत नाहीत. हे बारीकसारीक दोष गेल्याशिवाय आपली पूर्ण चित्तशुद्धी होणार नाही आणि त्याशिवाय आपल्याला परमेश्वरदर्शन होणार नाही अशा शंकेमुळे तो भक्त किंवा साधक व्याकुळ झालेला असतो.
कितीही प्रयत्न केले तरी जे दोष दूर होत नाहीत ते दोष मोठे वाटायला लागतात. आरतीमध्ये ‘मैं मूरख खल कामी’ म्हणणारा लोकांच्या दृष्टीने शहाणा, सज्जन आणि निःस्पृहच असतो. पण त्याला आपल्या आतले कुसळाएवढे दोष मुसळासारखे वाटतात. तो स्वतःला मूर्ख, दुष्ट, लोभी अशी विशेषणे लावून आत्मनिंदा करायला लागतो. ते उरलेले शेवटचे दोष माझ्याच्याने दूर होत नाहीत. म्हणून आता तूच ते दूर कर, अशी प्रार्थना त्याला करावीशी वाटते. शंतनुरावांच्या आक्षेपावर आप्पांनी आमच्याजवळ खुलासा केला. सगळे प्रयत्न झाल्यानंतर काहीतरी अचानक विघ्न येऊ नये, आपल्या नियंत्रणाबाहेरील घटकांनी आपल्या योजना विस्कटून टाकू नयेत, म्हणून शेवटी परमेश्वराला ‘हे होऊ दे’, ‘हे घडू दे ना’ अशी प्रार्थना करायची. आप्पांच्या खुलाशानंतर बहुतेक सगळ्या युवकांच्या मनातल्या शंका गेल्या. शंतनुरावांना उत्तर द्यायला कोणी गेले नाही. परंतु मला हा अभंग आवडू लागला.
खुलाशावर माझा विचार
आधुनिक व्यवस्थापन शास्त्रातसुद्धा शुद्धतेसाठी parts per million असे मोजमाप किंवा अचूकतेसाठी six sigma असे तंत्र वापरतात. दशलक्षात एखादी चूक एवढी अचूकता आली तरी दशलक्षामध्ये एखादी चूक राहू शकतेच. ती ही दूर करण्याचा प्रयत्न करत राहायचं. पण ती दूर करता येईपर्यंत काम थांबवता येत नाही. म्हणून नियंत्रणाबाहेरील घटक अनुकूल व्हावेत अशी प्रार्थना परमेश्वराला करायची. ‘यत्न तो देव जाणावा’ असे सांगणाऱ्या समर्थ रामदासांनीही असे म्हटले आहे,
म्हणून कर्म आरंभिले । काही एक सांग घडले
जेथे जेथे अंतर पडिले । तेथे हरिस्मरण करावे ।।
सांग म्हणजे सर्व बारीकसारीक गोष्टींचा विचार करून. सांग काम केले तरी कुठेतरी फट राहून जाते. हे अंतर भरून यावे त्याच्यासाठी हरिस्मरण करायचे. आपले सगळे प्रयत्न झाल्यावर आपण यशस्वी होऊ असा सकारात्मक विचार करायचा असतो. स्वतःवर विसंबून राहणाऱ्या लोकांना तेवढेच करता येते. स्वतःच्या नियंत्रणात नसलेली आपल्याहून मोठी शक्ती आहे असे मानणारे लोक केवळ सकारात्मक विचारापलीकडे त्याच्या पुढच्या कृतीची आणखी एक पायरी जाऊ शकतात. ती कृती म्हणजे देवाची प्रार्थना करणे.
प्रगत साधकाची प्रार्थना
तुकारामांनी परमेश्वरदर्शन होण्याच्या आधी परंतु साधनेच्या प्रगत अवस्थेत हा अभंग लिहिला असला पाहिजे. मला मनाला मागे खेचता येत नाही. परमेश्वरानेच मन आणि इंद्रियांच्या मध्ये आडवे उभे राहून मनाला विषयांकडे जाऊ देऊ नये आणि अशा रितीने आपण दयेचा सागर आहोत हे सिद्ध करावं अशी प्रार्थना या अभंगात केली आहे.
जुनी वाहने विकताना ती ‘as is where is’ तत्त्वावर विकायची आहेत अशी जाहिरात असते. तसे तुकाराम म्हणतात मी तुझा दास जसा आहे तसा गुणदोषांसकट त्याला आपला म्हण. उदास म्हणजे खूप उंचावरून तटस्थतेने निरीक्षण करणे. तसा तू उदास राहू नको. माझी उपेक्षा करू नकोस. मला आपलं म्हण. माझे मन बहिर्मुख होऊन इंद्रियांमागे धावत असते, त्याऐवजी ते अंतर्मुख होऊन तुझ्याकडे लागेल असे आता तूच कर.
एव्हरेस्ट शिखरावर जाणारे बहुतेक सर्व गिर्यारोहक शेवटचे २०-२५ फूट राहिल्यावर प्रयत्नांची शर्थ करत असताना आता ढग येऊ नयेत, वादळ होऊ नये, बर्फ घसरू नये आणि आपण शिखरावर पोहोचावे अशी प्रार्थना करू लागतात. हा अभंग त्या स्थितीत म्हणजे साधनेच्या शेवटच्या टप्प्यावर लिहिलेला असणार. एव्हरेस्टच्या तळावरच्या शिबिरामध्ये उभे राहून रचलेला किंवा म्हणायचा हा अभंग नाही. स्वतःच्या प्रयत्नाने आधी शिखरापर्यंत गेले पहिजे. मग परमेश्वराला प्रार्थना करावी. आपल्या कामामध्ये सांग प्रयत्न केल्यावरही काही व्यंग राहिले असेल तर ते दुरुस्त करायला बाहेरची मदत लागेल ती मागावी. शेवटपर्यंत मनाच्या कमकुवतपणाबाबत सावध रहिले पाहिजे हेही या अभंगातून कळते.
गिरीश श्री. बापट