काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥ धृ ॥
भावभक्ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥१॥
दया, क्षमा, शांती हेचि वाळवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥२॥
ज्ञान, ध्यान, पूजा, विवेक, आनंद । हाचि वेणु नाद शोभतसे ॥३॥
दश इंद्रियांचा एक मेळा केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥४॥
देही देखिली पंढरी जनी वनी । एका जनार्दनी वारी करी ॥५॥
आत्मिक विकसनाच्या पहिल्या तीन पायऱ्या
महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात असताना १९७४ साली विद्याव्रताची उपासना पहिल्यांदा मनःपूर्वक ऐकली आणि म्हटली. त्यावेळी हा अभंगही पहिल्यांदा म्हटला. या अभंगाचा अर्थ हळूहळू उलगडत गेला. तीर्थक्षेत्रामधल्या मंदिराचे महत्त्व विशेष असते. कारण त्या मंदिरातील देव जागृत असतो अशी भक्तांची समजूत असते. देह देवाचे मंदिर असे म्हणत असले, तरी संतांना ते मंदिर ज्या तीर्थक्षेत्रात आहे ते सगळे गावच देवाचे निवासस्थान वाटते. त्यामुळे या अभंगात काया म्हणजे शरीर, मंदिर आहे असे म्हणण्याऐवजी ते पंढरपूर आहे असे म्हटले आहे. पंढरपूरचे महत्त्व तिथल्या विठ्ठलामुळे आहे. तसे शरीराचे महत्त्व त्यातल्या आत्म्यामुळे आहे. शरीर जर पंढरपूर आहे, तर आत्मा विठ्ठल असला पाहिजे. विठ्ठल म्हणजेच पांडुरंग. शरीरात पांडुरंग नांदतो आहे म्हणजे आपल्या शरीराचे सर्व व्यवहार त्यातील आत्म्याचा म्हणजे पांडुरंगाचा आनंदमय खेळ आहे.
पंढरपूरला भीमा नदी वाहते. शरीररूपी पंढरपुरातील भीमा नदी कोणती? ‘आत्मा हा विठ्ठल’ हा आपल्या अंतःकरणातील विश्वास म्हणजे भाव आणि आपले शरीर पंढरपूरला साजेसे पवित्र ठेवायची धडपड म्हणजे भक्ती. हा भाव आणि ही भक्ती जोपर्यंत ओसंडून व्यक्त होत आहे तोपर्यंत तो जणू शरीररूपी पंढरीतील भीमेचा प्रवाह आहे. भावभक्तिरूपी भीमेने चंद्रभागेने आत्मारूपी विठ्ठलाभोवती चंद्रकोरीसारखे वळण घेतल्याने तो विठ्ठल शोभून दिसतो आहे.
सगळ्याच नद्यांचे प्रवाह ऋतुकालानुसार कमी जास्ती होत असतात. तसे भाव आणि भक्ती सतत वाहत असली तरी त्यांनाही शरीरधर्मानुसार कधी दुथडी भरून वाहावेसे वाटते तर कधी तो प्रवाह आटल्यामुळे क्षीण होतो. नदी आटली की नदीचे पात्र उघडे पडते आणि नदीच्या दोन्ही काठांना वाळूची मैदाने किंवा वाळवंट दिसू लागते. भक्ताच्या मनातील भावभक्ती वेगवेगळ्या कारणांनी क्षीण झाली तरी आपल्या आतमध्ये पांडुरंग नांदतो आहे या जाणिवेमुळे त्याच्या वागण्यामध्ये दया, क्षमा, शांती हे दैवी संपत्तीचे गुण दिसत राहतात. त्या गुणांच्यामुळे त्याच्या भोवती त्याच्यासारखेच भक्त भाविक लोक जमा होतात. विठ्ठलाचे भक्त ते सर्व वैष्णव. आणि वैष्णवांचा थाट म्हणजे वैष्णवांचा मेळा. चंद्रभागेच्या किंवा भीमेच्या वाळवंटात जसे वारकरी जमा होतात तसे एका वैष्णवाच्या दया, क्षमा, शांती या गुणांमुळे त्याच्याभोवती समानधर्मी वैष्णव गोळा होतात. भाव भक्तीला भीमा असे म्हटले आहे. म्हणून त्यांचे भरते कमी झाल्यावर दिसणारे दया, क्षमा, शांती हे गुणधर्म भीमेच्या पात्रातील वाळवंट. तिथे जमलेल्या या वैष्णवांच्या मेळ्यातही पांडुरंग नांदत असतो.
आत्मिक विकसनाच्या पुढच्या दोन पायऱ्या
भजन कीर्तनाचा रंग देखील कधीतरी संपतो आणि वारकऱ्यांची पांगापांग होते. विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच एक रूप. श्रीकृष्ण जसा गोकुळात असताना कधी वनात एकटाच जाऊन मुरली वाजवत बसायचा, तसे शरीरातील आत्मारूपी विठ्ठलही वैष्णवांचा मेळा पांगल्यानंतर एकटाच मुरली वाजवतो आहे, अशी कल्पना तिसऱ्या कडव्यात केली आहे. त्याच्या मुरलीचे स्वर म्हणजे वेणुनाद, शरीरातील आत्म्याचा वेणुनाद शरीरातून कसा प्रकट होईल? तर तो भक्ताच्या ज्ञानार्जनाच्या क्रियेतून, ध्यानातून, पूजेच्या क्रियेतून, आजूबाजूच्या जगातील सार काय आणि असार काय, विठ्ठलाची भक्ती वाढवण्याला कशाची मदत होईल आणि कशाचा अडथळा होईल, याचा विवेक करण्यातून व्यक्त होईल. कृष्ण जसा स्वतःच्या आनंदासाठी मुरली वाजवायचा तसा शरीरातील आत्म्याला ज्ञानार्जन, ध्यान, पूजा आणि विवेक करणे या सर्वांतून जणू वेणूचे स्वर ऐकल्याचा आनंद मिळतो. वैष्णवांच्या मेळ्यात असो की एकांतात असो विठ्ठलाचा आनंदमय खेळ चालूच असतो.
मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाला देखील गुरे चरायला घेऊन जावे लागते. तसे ज्ञानार्जन, ध्यान, पूजा, विवेक करणे या आत्म्याच्या आनंद प्रकट करणाऱ्या क्रिया देखील कधीतरी थंडावल्या, तरी शरीरातील पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये यांच्या शरीर टिकवण्यासाठीच्या क्रिया मात्र चालू राहाव्या लागतात. इंद्रियांच्या क्रिया चालू असण्यानेच शरीरात चैतन्य खेळत असल्याचे कळते. कृष्णाच्या बरोबर गुरे चरायला घेऊन जाणाऱ्या सगळ्या गुराख्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून मग त्या खायच्या अशी पद्धत कृष्णाने सुरु केली होती. सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र कालवल्यावर जो पदार्थ तयार होईल तो गोपाळकाला. प्रत्येकाच्या शिदोरीची वेगवेगळी चव मिसळून जऊन गोपाळकाल्याची एकच वेगळी चव तयार होते. तसे दहाही इंद्रियांच्या स्वतंत्रपणे चालणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया एका दिशेने वळल्या, विठ्ठलाची उपासना ही एकच धून त्यांना लागली, की त्या इंद्रियांच्या क्रियांचाही गोपाळकाला होऊन जातो. मनामध्ये भावभक्ती असेल, दया, क्षमा, शांती हे गुण वसत असतील; ज्ञान, ध्यान, पूजा, विवेक या कामातच मन गुंतलेले असेल; तर सगळ्या इंद्रियांनाही तेच वळण लागते. ‘पडिले वळण इंद्रियां सकळा। भावा तो निराळा नाही दुजा॥’ अशी इंद्रियांची स्थिती होते. म्हणजेच इंद्रियांना विठ्ठलाचे एकच वळण लागल्यामुळे त्यांचा मेळा हाच गोपाळकाला झाला. सर्व इंद्रियांच्या व्यवहारातूनही मग विठ्ठलाचे आनंदस्वरूप व्यक्त होते.
आत्मिक विकसनाची शेवटची पायरी
या पहिल्या चार कडव्यांचा अर्थ फार कष्ट न पडता कळत गेला. शेवटच्या कडव्यातील शब्द सोपे असूनही त्यांचा अर्थ कळायला मात्र काही वर्षे जायला लगली. माझा वर्गमित्र अकरावीत असताना आप्पांच्या घरीच राहत होता. मागच्या वेळचा अभंग जसा आप्पांनी मला शिकवायचा प्रयत्न केला तसे विद्याव्रत पोथीतील श्लोक व अभंगाची चाल निश्चित करताना हा अभंग त्याला व त्याच्या बरोबरच्या दोन-चार जणांना शिकवला होता. त्यामुळे हा अभंग त्याच्या मनात पक्का बसला होता. त्याचे शिक्षण संपल्यानंतर काही वर्षे तो शेतकरी संघटनेचे काम पूर्ण वेळ करत होता. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे हा त्यांच्या सर्व आंदोलनांचा मुख्य मुद्दा असायचा. आंदोलनांसाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्यांचे जे मेळावे व्हायचे ते नेहमी पंढरपूर, शिर्डी, परळी अशा तीर्थक्षेत्रांजवळ व्हायचे. सभा संपल्यावर जरी नेते गेले नाहीत, तरी सगळे शेतकरी मात्र तिथल्या तिथल्या दैवताच्या दर्शनासाठी रांगा लावायचे. माझा मित्र म्हणाला की स्वतःमधला आत्मा म्हणजे विठ्ठल हे बुद्धीला कळले. पण या सगळ्या लाखो शेतकऱ्यांच्या देहामध्येही विठ्ठलच आहे, आणि ते सगळे जेव्हा एकत्र जमलेले दिसायचे तेव्हा त्यांच्या संघटित शक्तीतून देवच प्रकट होतो आहे, असे वाटायचे. स्वतःच्या देहाला पंढरी म्हटले तर या सगळ्यांच्या म्हणजे जनांच्या देहामध्ये सुद्धा पंढरी आहे, हे विराट जनसमुदाय पाहिल्यावर लक्षात येते.
हाच मित्र भटक्याही आहे. प्रबोधिनीत लागलेले डोंगर-दऱ्या भटकण्याचे वेड त्याने पुढेही जोपासले होते. गड-किल्ल्यांवरून भटकताना सर्व ऋतूंमध्ये बदलणारी निसर्गाची रूपेही त्याने पाहिली होती. अव्याहत चालणाऱ्या ऋतुचक्रातून देवाचीच शक्ती प्रकट होते आहे, हे त्याला सुचले. निसर्गामध्ये विशेषतः जंगलांमध्ये किंवा वनांमध्ये देखील विठ्ठलच आहे हे त्याला हळूहळू उमगत गेले. त्यामुळे आपला देह म्हणजे जशी पंढरी, सगळा जनसमुदाय म्हणजे जशी पंढरी, तशी डोंगर-दऱ्या, नदी-नाले, पशुपक्षी, झाडेवेली यांनी बनलेली वने ही देखील पंढरीच असे एक दिवस त्याने मला तासभर समजावून सांगितले. त्याचे ऐकत असताना मलाही मी घेतलेले गर्दीचे अनुभव आणि तुडवलेली रानेवने आठवत गेली. ‘देही देखिली पंढरी जनी वनी’ याचा अर्थ अनेक वर्षांनी आमच्या या गप्पांमुळे मला उलगडला. आधी स्वतःचे शरीर हे पंढरी, मग सर्वांची शरीरेही पंढरी आणि या सगळ्यांसकट हा निसर्गही पंढरीच.
देहामध्ये, जनांमध्ये आणि वनामध्ये सगळीकडे पंढरी दिसायला लागल्यावर तुम्ही कुठल्याही दिशेने चालायला लागलात तरी पंढरपूरच्या दिशेने चालणार. कुठल्याही दिशेने चाललात तरी तो पंढरपूरचाच रस्ता आणि त्या दिशेने चालणे ही पंढरपूरचीच वारी. आपण ‘काया ही पंढरी हा विठ्ठल’ असे स्वतःच्या मनाला समजावत राहायचे. आपल्या शरीरामध्ये ‘नांदतो केवळ पांडुरंग’ हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. इथपासून सगळे अनुभव घेत ज्यांनी आपल्या सगळ्या इंद्रियांचाही गोपाळकाला केला आहे असे जनार्दन-शिष्य एकनाथ महाराज म्हणू शकतात की देही देखिली पंढरी, जनी पण देखिली आणि वनी पण देखिली. तसं असल्यामुळे एकनाथ पैठणला असोत, काशीला असोत, रामेश्वरला जात असोत किंवा गिरनारला जात असोत. कुठल्याही दिशेने गेले तरी मी पंढरपूरचीच वारी करत आहे असे ते म्हणू शकतात. ‘काया ही पंढरी पासून… वारी करी’ इथपर्यंत या अभंगात मला एकेका कडव्यामध्ये आत्मिक विकासाचे पुढचे पुढचे टप्पे वाटतात. काया ही पंढरी हे कळणे, भाव-भक्तीचा आनंद घेणे, आपल्या भोवतीचे सगळे वैष्णवांचा मेळा वाटणे, ज्ञानार्जन ते विवेक करणे या क्रियांमध्ये आनंद अनुभवणे, इंद्रियांच्या सर्व क्रियाही विष्ठालासाठीच आहेत असे वाटणे, सर्व ठिकाणी जाणे ही वारीच वाटणे हे आत्मिक विकासाचे टप्पे आहेत.
गिरीश श्री. बापट