सौर कालदर्शिकेचा प्रवास

लेख क्र. १४

१८/६/२०२५

कालदर्शिका निर्मिती व नंतर ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्थेला खूप खटाटोप करावे लागत. त्यासाठी विविध क्षेत्रातील विद्वान कालदर्शिका समितीमध्ये कार्यरत होते ज्यामध्ये पं. गोरेशास्त्री, श्री. मा. भ. पंत, श्री. वि. वि. मोडक, डॉ. अ. मा. साठ्ये, प्रा. अ. ग. पटवर्धन, प्रा. नी. र. पटवर्धन, प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर यांची नावे येतात.

प्रत्यक्ष कालदर्शिका (पंचांग) छापणे हा पुढचा उद्योग! ‘देसाई पटेल’ यांच्याकडून २११ रुपयांना पंचांगासाठी कागद खरेदी केली. ‘कलाभुवन’मधून ८३ रु. देऊन पंचांगातील कुंडल्यांची चौकट करून घेतली. पुढे प्रती वाढविण्यासाठी अर्थसाहाय्याची गरज भासत होती. जाहिरातीमार्फत अर्थसाहाय्य मिळविण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी एक आवाहन पत्र प्रसारित केले. तेव्हाच्या जाहिरातदारांमध्ये ‘पूना गेस्ट हाऊस, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, जनता सहकारी बॅंक लि., जनसेवा दुग्धमंदिर, युनायटेड वेस्टर्न बॅंक, ब्रिमा शुगर लि., किर्लोस्कर ऑईल इंजिन, उद्यान कार्यालय इत्यादींची नावे सापडतात. कालदर्शिका तयार झाल्यावर त्या वितरीत करणे यासाठी दुकानदारांना कालदर्शिका विक्रीस ठेवण्यासाठी निवेदन करणे, शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेत वापरावी म्हणून विनंती करणे व त्यासाठी कालदर्शिका कशी वाचावी त्यावर प्रशिक्षण देणे, ही प्रक्रिया अनेक वर्षे अशीच चालू होती. १९७८ मध्ये या कालदर्शिकेचे मूल्य होते अवघे १ रु. ६० पै. पुन्हा त्यावर १५% कमिशन द्यावे लागे.

सुरुवातीला वेळेत कालदर्शिका तयार करणे अनेक कारणांनी जिकिरीचे झाले असे जुन्या पत्रांतून कळते. पण पुणे, सातारा, मुंबई, कोकण, हुबळी इ. गावांतून कालदर्शिका मागविल्या जात. ज्यांनी ज्यांनी सौर कालदर्शिका बघितली किंवा वापरली त्यांनी त्याबद्दलची स्वतःची मतेही पत्र लिहून प्रबोधिनीला पाठवली आहेत. आता ती वाचताना रमणीय वाटू शकतात पण तेव्हा ही कालदर्शिका किती काटेकोरपणे पाहिली जायची हे त्या पत्रांवरून कळते.

त्यातल्या काही पत्रांचा सारांश पाहा. एक अभिप्राय असा – सातार्‍याच्या श्री. माटे यांनी नोंदविले आहे, “कालदर्शिका सर्व प्रकारच्या माहितीने पूर्णपणे भरलेली आहे. ती निव्वळ काळ दाखवीत नाही तर जीवन उज्ज्वल कसे करावे ते दाखवते. तिच्यात वैद्यक आहे, ज्योतिष आहे, धर्म आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, जीवनात लागणार्‍या सर्व गोष्टी आहेत. म्हणून ती अत्यंंत उपयुक्त झाली आहे. पण तिचा आकार मात्र फार मोठा व बोजड झाला आहे. त्यामुळे हाताळण्याला जरा कठीण जाते. काही शंका व सूचना – १) संत फ्रांसिस झेव्हिअरचा सोहळा (३ डिसेंबर) हा गोव्यातीलच ना? त्याचा सोहळा हिंदुपंचांगात काय म्हणून? त्याने केलेले प्रताप आपणास माहित नाही काय? उद्या औरंगजेबाची पुण्यतिथीही हिंदुपंचांगात येणार काय? ख्रिश्चन सणांना वाजवीपेक्षा जास्त महत्व दिलेले दिसते. २) वधूने वराला सुहृद म्हणणे जरा चमत्कारीक वाटते. मूळ मंत्रातीलच हा शब्द घेतला आहे काय कोण जाणे? नाटकातील ‘आर्य’ कसा वाटतो? ३)सावरकर, ज्ञानेश्वर महाराज दिसले नाहीत. लालबहादूर शास्त्रीपर्यंत म्हणजे फारच खाली आलात असे वाटते.” अशा सूचना, शंका सांगून झाल्यावर ते म्हणतात,”कालदर्शिका विद्वान, तज्ञ माणसांनी काळजीपूर्वक केलेली असल्यामुळे तिच्यात चुका असणे शक्य नाही. पण मला एका सामान्य माणसाला ती पाहून काय वाटले ते लिहिले आहे. ते बरोबरच असेल असे नाही.” त्यांच्या ह्या पत्राला योग्य उत्तर दिले गेले त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे.

असे काही अपवाद असले तरी बर्‍याच जणांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला व चांगल्या सूचनाही दिल्या आहेत. उदा. श्री. नी. स. गोखले, पुणे यांनी १९७७ साली कालदर्शिका मिळाल्याचे आभार पत्र लिहिले, त्यात त्यांनी समाज-सुधारणेविषयी मत दिले – ‘सत्य व शास्त्र न सोडता परिवर्तनशीलता मात्र सतत स्वीकारायची व तिचा प्रसार करायचा हे तर मंडळाचे ध्येय व धोरण आहे. कालदर्शिकेच्या संपादक मंडळात एक सुविद्य महिला व मागास समजला जाणार्‍या वर्गातील प्राध्यापक अगर विद्वान घ्यावा या मताचा मी आहे. कोणतीही सुधारणा अगर परिवर्तन समाजातील सर्व थरांतील लोकांना बरोबर घेऊन करणे जरूरीचे असते.’ गोखले यांचे हे वाक्य ज्ञान प्रबोधिनीच्या व संत्रिकेच्या कामाविषयीचा विश्वास दर्शविणारे आहे.

तेव्हाच्या कालदर्शिकेचे चित्र सोबत जोडले आहे.