संत्रिका

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग २)

लेख क्र. ४३ १७/७/२०२५ डॉ. स. ह. देशपांडे यांच्या ‘धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था’ या विषयावरील प्रतिपादनातील प्रमुख मुद्दे – १) जगाच्या इतिहासात धार्मिक मूलतत्त्ववाद (Religious Fundamentalism माझ्या मते ‘पंथीय अभिनिवेश’) यामुळे सर्वाधिक प्रमाणात रक्तपात आणि हिंसाचार झाला असेल. यापुढील काळात त्याप्रकारच्या विचारसरणीला बळ मिळू नये यादृष्टीने भारताच्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी Secularism या तत्त्वाला घटनेत महत्त्वाचे स्थान दिले आहे. विविध पंथोपपंथ असणाऱ्या भारतासारख्या राष्ट्रात ते आवश्यक आहे. २) धर्म (Religion) हे संस्कृतीचे एक अंग आहे. संस्कृतीची इतरही अनेक इहवादी, भौतिक, नैतिक अंगोपांगे असतात, त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा आग्रह हा संस्कृतीच्या मूलाधारावरच आघात आहे असे समजण्याचे कारण नाही. ३) सध्याच्या विकसित राष्ट्रांपैकी अनेक राष्ट्रांनी आपली सांस्कृतिक आणि राष्ट्रीय वैशिष्ट्ये कायम ठेवूनसुद्धा धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्था यशस्वीपणे राबवली आहे. ४) धर्मनिरपेक्ष शासनव्यवस्थेचा आग्रह हा समाजातून धर्माचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न नाही तर धर्माचरण, धार्मिक श्रध्दा यांना केवळ व्यक्तिगत जीवनात मर्यादित स्थान देण्याचा प्रयत्न आहे. धार्मिक प्रचाराच्या माध्यमातून जरी त्याचे (धर्माचे) सामाजिकीकरण झाले तरी शासनाने कोणत्याही एका धर्माला (पंथाला) इतरांपेक्षा श्रेष्ठ न मानणे, धर्माच्या (पंथाच्या) आधारावर भेद‌भाव न करणे इ. तत्वे पाळणे म्हणजे शासन धर्मनिरपेक्ष असणे. ५) भारतासारख्या देशाला प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा असल्यामुळे येथील लोकजीवनात सांस्कृतिक प्रतीके, सण, उत्सव यांना महत्त्वाचे स्थान असणार हे नैसर्गिक, स्वाभाविक आहे. तथापि ही प्रतीके, सण, उत्सव यांच्याकडे धर्माच्या दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहण्याचे प्रशिक्षण धार्मिक अल्पसंख्याकांना द्यावे लागेल, उदा. संस्कृत ही विशिष्ट धर्माची भाषा; दीपप्रज्वलन/नारळ फोडणे ही विशिष्ट धर्मातील प्रतीके असे न पाहता त्यांच्याकडे सांस्कृतिक दृष्टीने पाहून त्यांचा स्वीकार करण्याचे प्रशिक्षण धार्मिक अल्पसंख्याकांना द्यायला हवे. प्रा. सुभाषराव देशपांडे यांच्या प्रतिसादातील प्रमुख मुद्दे – १) भारताचा प्राण त्याच्या सनातन धर्मात आहे, येथील लोकांना सर्व गोष्टी धर्माच्या माध्यमातून शिकण्याची व अंगीकारण्याची सवय प्रदीर्घ काळापासून आहे. २) ज्या प्रकारच्या विचारसरणींनी अन्य राष्ट्रांची प्रगती झाल्यासारखे वाटते त्या विचारसरणींचेही केवळ अंधानुकरण करण्याचा प्रयत्न आपण करू नये कारण ती प्रगती संस्कृतीच्या काही विशिष्ट अंगांपुरतीच मर्यादित आहे. ३) विकसित राष्ट्रांमधील विचारवंतांनाही त्यांच्या वाटचालीतील मर्यादांची जाणीव होऊ लागली असून ते नव्या दिशांच्या शोधात भारताच्या प्राचीन संस्कृतीकडे आदराने पाहू लागले आहेत, अश्या परिस्थितीत आपण मात्र आपल्या संस्कृतीतील काही महत्वाच्या संकल्पनांकडे व प्रयोगांकडे अवमूल्यनाच्या, अनादराच्या किंवा न्यूनगंडाच्या भावनेने पाहू नये. सप्टेंबर, ९७ च्या मासिक सभेत डॉ.स.ह. देशपांडे यांनी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक आधारभूत तत्त्व या स्वरूपात ‘धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था’ ही संकल्पना मांडली, त्यावर प्रा. सुभाषराव देशपांडे यांनी दि. २६/१०/९७ च्या बैठकीत त्यांचे विचार मांडले. त्यावर काही चर्चा झाली तथापि वेळ कमी पडल्यामुळे काही महत्त्वाच्या मुद्यांवरील चर्चा अपूर्ण झाली असे वाटल्यामुळे या विषयावर प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी लेखन केले आहे. याचे ध्वनिमुद्रण येथे पाठवत आहोत. भाग १ ची लिंक सोबत जोडली आहे.

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग २) Read More »

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग १)

लेख क्र. ४२ १६/७/२०२५ संत्रिकेच्या कामातील पौरोहित्य उपक्रम थेट समाजाला भिडणारा असल्याने त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे. पण याच्याच बरोबरीने विभागात सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता यावरही समांतर म्हणता येईल असे काम चालू होते. डॉ. स. ह. देशपांडे हे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, त्यांच्या पुढाकाराने राष्ट्रवाद अभ्यास मंडळ व्याख्यान मालेचा आरंभ झाला. प्रा. पु. ग. सहस्त्रबुद्धे या थोर विचारवंताच्या टिपण वह्या आजही विभागात आहेत. भारताचा राष्ट्रवाद असे एक महत्त्वाचे पुस्तक डॉ. स. ह. देशपांडे व श्री. यशवंतराव लेले यांच्या चिंतनातून तयार झाले, जे कॉन्टिनेन्टल व ज्ञान प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झाले.फेब्रुवारी १९८९ मध्ये भारतीय एकात्मता सहचिंतन या विषयावर चर्चासत्र झाली. तसेच १९९८ मध्ये आर्य प्रश्नावर परिसंवाद झाला. आजही कळीचा असलेला एकात्मतेचा विषय तेव्हाही या ज्येष्ठ अभ्यासकांसाठी महत्त्वाचा मुद्दा होता. या व्याख्यान व चर्चात्मक उपक्रमात अनेक विषय चर्चिले तर गेलेच पण विविध विचारसरणीचे लोक खुल्या मनाने इथे व्यक्त झाले. वक्त्यांच्या नावाची व विषयाची यादी जरी पाहिली तरी आपल्याला सामाजिक विषय व वक्ते यातील वैविध्यता समजते. उदाहरणादाखल राष्ट्रवाद अभ्यास मंडळातील काही व्याख्यात्यांची नावे व विषय येथे देत आहोत – रावसाहेब कसबे – दलित चळवळीच्या तत्वप्रणालीची बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मांडणी.सय्यदभाई – मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या हिंदुत्ववाद्यांकडून अपेक्षाब. ल. वष्ट – मुस्लिम प्रश्नाचे आंतर-राष्ट्रीय स्वरूपगिरीश प्रभुणे – भटके-विमुक्त यांचे जीवन अरविंद लेले – धर्मनिरपेक्षता किमान २/३ तास चालणाऱ्या या बैठकींमध्ये जोरदार चर्चा, वाद प्रतिवाद व्हायचे पण सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जायच्या नाहीत. अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्यांवर विचारमंथन झाले. श्री. अरविंद बाळ यांनी निमंत्रक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. २००८मध्ये या व्याख्यांनांची दिशा बदलली, व्याख्याने सर्वांसाठी खुली करताना, २००९ ला ‘जनतंत्र उद्बोधन मंच’ असे नामकरण झाले व राजीव साने निमंत्रक झाले.राजीव साने – व्यक्तिस्वराज्यवाद प्रदीप रावत – भारतापुढील आव्हाने, आर्थिक विकासातील राजकीय अडथळे राजश्री क्षीरसागर – चर्चा बहुसांस्कृतिकतेची, संस्कृती निरपेक्षमूल्यांची कॉ. विलास सोनावणे – जाति-अंताचे लढे : फुले विचार आणि आंबेडकर विचार यातील फरक (मुस्लिम आरक्षण प्रश्नाच्या संदर्भात) डॉ. असगर अली इंजिनअर – communal vilonce Bill- 2011 वर व्याख्यान व हिंदू मुस्लिम सदस्यांसह चर्चासत्र विविध विचारसरणींच्या वक्त्यांनी निर्भीडपणे आपल्या विषयाचे प्रतिपादन करणे ही परंपरा चालू राहिली. मात्र अशा नुसत्या व्याख्यानमाला घेण्यापेक्षा सखोल अभ्यास व्हावा, विषयातील आंतरसंबंध समजत जावेत, प्रबोधिनी मध्ये काम करणाऱ्या सदस्यांची देशप्रश्नाकडे पाहण्याची भूमिका तयार व्हायला हवी म्हणून ‘मासिक वैचारिक योजना‘ सुरू करण्यात आली. यात अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान, तत्त्वज्ञान यांच्याशी निगडीत व्याख्याने होत गेली.श्री. अजित कानिटकर – बदलता भारत (विशेषत: ग्रामीण भाग) मा. संचालक गिरीशराव बापट – राष्ट्रविचाराला छेद देणारे आधुनिक विचारप्रवाह, राष्ट्रकारणाची विविध अंगे, आध्यात्मिक राष्ट्रयोग ही तीन महत्त्वपूर्ण व्याख्याने झाली. सुरेंद्र ठाकुरदेसाई – एखाद्या भौगोलिक प्रदेशाचा विविध अंगांनी अभ्यास आशुतोष बारमुख – सामूहिक अस्मितेकडे सारे विचारप्रवाह कसे पाहतात? या सर्व वैचारिक चळवळीच्या निमित्ताने १७५ पेक्षा अधिक विषय व १५० हून अधिक वक्ते ज्ञान प्रबोधिनीच्या म्हणजेच संत्रिकेच्या व्यासपीठावर आले. प्रबोधिनीमध्ये खुलेपणाने विषय मांडता येतात हे पोहोचायला मदत झाली. राष्ट्रवाद अभ्यास मंडळापासून श्रोता व वक्ता म्हणून सहभागी असलेले मा. श्री. सुभाषराव देशपांडे यांनी १९९७ साली ‘धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था’ या डॉ. स. ह. देशपांडे यांच्या व्याख्यानवर दिलेला अभ्यासपूर्ण प्रतिसाद, देशप्रश्नावर काम करणाऱ्या प्रत्येकाने ऐकलाच पाहिजे असा आहे.

धर्मनिरपेक्ष पण संस्कृतिसापेक्ष शासनव्यवस्था – चर्चा (भाग १) Read More »

पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन

लेख क्र. ४१ १५/०७/२०२५ कटुता न ठेवता, राग लोभ दूर सारून पुरोहितांना संघटनाचे म्हणजेच जोडण्याचे काम करायला लागते. ‘पुरोहित’ या शब्दाचा अर्थच मुळी सर्वांच्या अग्रभागी राहून मार्गदर्शन करणारा असा असल्याने योग्य प्रसंगी स्वतःचा अधिकार वापरून काही गोष्टी करायला लागतात. जात-पात, प्रांत, पंथ-भेद बाजूला ठेवून प्रामाणिकपणे स्नेहसिंचन करीत पुरोहितांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. कधी लोकशिक्षक तर कधी समुपदेशक, केव्हा मित्र तर कधी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीची भूमिका घेऊन ‘गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’ असे म्हणावे लागते. आज अनेक कुटुंबांतून प्रबोधिनीबद्दलचा स्नेहभाव वर्धिष्णू होत आहे. प्रबोधिनीच्या प्रत्यक्ष कामात सहभागी होता आले नाही तरी प्रबोधिनीचे हितचिंतक बनून आपल्या दातृत्वाचा ओघ ही कुटुंबे प्रबोधिनीकडे वळवीत आहेत. नाट्य, कला, संगीत, चित्रपट, खेळ, उद्योग, संशोधन, शिक्षण, कायदा, लष्कर, इ. क्षेत्रांतील व्यक्तींपर्यंतही ज्ञान प्रबोधिनीच्या विचारांचा वसा प्रबोधिनीच्या पुरोहितांनी पोचविला आहे. लोकांच्या सुखदुःखात पुरोहित सहभागी होतात. त्यांच्या कथा-व्यथा काळजीपूर्वक ऐकतात. कुठे चुकत असेल तर अधिकारवाणीने समजावून सांगतात. अशिक्षितांना ऋण काढून सण साजरा करायचा नाही असे सांगतात, तर अतिश्रीमंत घरात देवाला डामडौल नको तर ‘पत्रं, पुष्पं, फलम् तोयम्’ सुद्धा चालते असे सांगून आपल्याकडील ज्ञानाने, धनाने दरिद्री नारायणाची पूजा करूया असे सुचवितात. माणसे जोडत जातात. माणसे जोडण्याची कला प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी. कोणी संस्कार प्रसंगी ज्ञान प्रबोधिनीचे रसाळ भावपूर्ण वर्णन करतील, कोणी प्रबोधिनीच्या कामाचे अनेक वैविध्यपूर्ण पैलू सांगतील. कोणी कुटुंबियांशी मनमोकळे बोलतील तर कोणी आपल्या संस्काराने आणि व्यक्तिमत्त्वाने, अभ्यासाने समोरच्याला जिंकतील. यजमानांच्या घरी गेल्यावर आस्थेने सगळ्यांची चौकशी करणे, लहान मुलांना खाऊ किंवा गोष्टीचे पुस्तक, ‘छात्र प्रबोधन’चा अंक भेट देणे, ज्येष्ठांच्या तब्येतीची विचारणा करणे यातून भावबंध जुळतात. आजकाल दूरभाषवर पटकन निरोप देता येतो. पण ही सुविधा फारशी प्रचलित नव्हती तेव्हा एक ज्येष्ठ पुरोहित यजमानांकडील कार्याविषयीची आठवण पोस्ट कार्ड पाठवून करून देत. नियोजित संस्काराच्या आठ दिवस आधी तुमच्याकडे त्यांचे पत्र येणारच. हरळी जशी चिवटपणे एकाला-एक करीत फुटते, वाढते तसे संस्कारांच्या माध्यमातून अनेक व्यक्ती, कुटुंबे जोडली जात आहेत. पौरोहित्याचा सामाजिक आशय – व्यक्तींइतक्याच संस्थाही महत्त्वाच्या! अनेक सामाजिक संस्था आज आस्थेने व अपेक्षेने प्रबोधिनीकडे पाहतात. नगर येथील स्नेहालयमधील अनाथ युवक-युवतींच्या विवाहाचे पौरोहित्य निरपेक्षपणे प्रबोधिनीचे पुरोहित करतात. अपंग कल्याणकारी संस्था, बुरुड, लिंगायत व परीट समाजामध्ये जाऊन पुरोहित व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधन करतात. हेतू एकच – छोट्या-छोट्या भेदाच्या रेषा मिटाव्यात व ऐक्यभावना वाढीस लागावी. माणसांमधील देवत्वाला आवाहन करावे लागते, हे प्रबोधिनीच्या पुरोहितांना शिकवले जाते. नवीन विचार रुजवायला जागा निर्माण करावी लागते. ज्ञान प्रबोधिनीचे पौरोहित्य शिकवताना वास्तविक स्वयं-पौरोहित्याचा आग्रह धरला जातो, पण ते समाजात रुजायला वेळ लागणार असे वाटते. आपल्या सुख-दुःखात सहभागी होणारा मार्गदर्शक पुरोहित लोकांना हवा असतो. कारण तो पोथीतील मंत्रातील दोन ओळींमधील भाव उलगडतो आणि ‘ये हृदयीचे त्या हृदयी’ पोहोचवतो. भारतभर कधी विमानाने तर कधी वातानुकूलित बसने अथवा रेल्वेने अनेक तासांचा प्रवास करीत पुरोहित जातात, तर कधी-कधी एका तासाच्या संस्कारासाठी छत्तीस तास प्रवास करताना ‘मी ज्ञान प्रबोधिनीचा कार्यकर्ता आहे’, हीच भावना मनात असते. कधी दोन बस बदलून भर उन्हात तर कधी धो-धो पावसात चालत जाऊन संस्कार केले जातात, व्यक्तिगणिक बदलणाऱ्या अस्मितांचा, आग्रहांचा चांगला वाईट अनुभव स्वीकारत पुढे जावे लागते ते मनात एक व्रत घेऊन! ‘आम्ही केलेल्या संस्कारातून धार्मिक क्षेत्रातील विषमता आणि अंधविश्वास दूर करण्याचा प्रयत्न करू. समाजमन भयमुक्त करण्यासाठी आमचे काम आहे. आम्ही केलेल्या संस्काराद्वारे व्यक्तिघडण व्हावी, दुर्बलतेतून सामर्थ्याकडे समाजाला नेण्याचा प्रयत्न केला तर अशा विकसित व्यक्तीच संघटित होऊन उपयोगी पडू शकतात.’ ज्ञान प्रबोधिनीच्या पुरोहितांवर ‘पौरोहित्य व्रत संस्कार’ होतो तेव्हा गांभीर्याने हे व्रत पुरोहित स्वीकारतात. व्यक्तीमध्ये गुणांचे संक्रमण करणे व तिच्यातील दोषांचे निरसन करणे या प्रक्रियेतून उत्तम व्यक्ती म्हणजे उत्तम कुटुंब, उत्तम कुटुंब म्हणजे प्रगल्भसमाज व असा प्रगल्भ समाज म्हणजे सुदृढ राष्ट्र ही साखळी निरंतर जोडत राहावी लागणार आहे. लहान बालकांपासून, वृद्धांपर्यंत सर्वच जण समाजसाखळीच्या कड्या आहेत. पुरोहित ह्या कड्या जोडण्याचे काम करतात. म्हणूनच मग जिन्याखाली राहणारी एक गरीब महिला विचारते, ‘माझ्या बाळाचं बारसं कराल का तुम्ही? माझा नवरा चांगला नाही पण मला माझ्या बाळाला मोठं करायचं आहे. तुम्ही त्याला आशीर्वाद द्या.’ जिन्याखालीच तुटपुंज्या सामग्रीत बारसे होते. ती महिला आनंदून जाते. वयाच्या नव्वदाव्या वर्षी एकसष्ट वर्षाच्या पुत्राच्या निधनाचे दुःख झेलावे लागणारे आजोबा शांतपणे श्राद्धविधी पाहत राहतात. विधी पूर्ण झाल्यावर ताईंचा हात हातात घेऊन म्हणतात, ‘ताई आता खूप शांत वाटतंय, आमचं मन समाधानी आहे’ तेव्हा अडीच तास सलग बोलणाऱ्या ताई निःशब्द होतात. रांचीवरून एक मुलगी स्वतःच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुरोहित ताईंना पुष्पगुच्छ पाठवते आणि त्याला जोडलेल्या छोट्याशा पत्रात म्हणते, ‘तुम्ही आमचे जीवन अर्थपूर्ण केलेत.’ सगळेच अनुभव उत्तम आहेत असे नाही. कटू अनुभवांनाही पुरोहितांना सामोरे जावे लागते, पण तुमच्यामुळे आमचा संस्कार परिपूर्ण झाला असे सांगणारे निश्चितच अधिक आहेत. हेच समाधान मनात बाळगून ज्ञान प्रबोधिनीचे पुरोहित पुन्हा-पुन्हा कामाला लागतात तेव्हा आपल्याला या विशाल समाजाला एकत्र बांधायचे आहे ही खूणगाठ त्यांच्या मनाशी पक्की बांधलेली असते.

पौरोहित्य : सामाजिक समुपदेशनाचे साधन Read More »

एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह…

लेख क्र. ४० १४/७/२०२५ संत्रिकेमध्ये निरंतर सुरू असलेले संस्कारसेवेचे काम विविध समाजगटात पोहोचविण्याचा प्रयत्न असतो. सुरुवातीच्या काळातील बुरुड समाजातील सामूहिक विवाह, सोमवंशीय क्षत्रिय समाजातील उपनयन, मातंगसमाजासाठी कलशारोहण, नागरवस्तीमध्ये जाऊन केलेले सत्यनारायण, ग्रामीण भागातील महिलांसाठी मार्गशीर्षातील गुरुवार, परीट समाजात मातृभूमिपूजन असे लहान-मोठे प्रयोग झाले आहेत. सध्या संत्रिकेचे जवळ-जवळ ५० पुरोहित देश-विदेशात विविध संस्कार करत आहेत. हे संस्कार करताना त्यांना खूप वेगवेगळे अनुभव येतात. गेल्या १५-२० वर्षात आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरदेशीय विवाहांचे प्रमाण वाढते आहे. अशा विवाहात दोन्ही बाजूंना समजून घेताना बराच प्रयास करायला लागतो. पण बाहेर सतत दुहीची भावना पेरणारे कार्यरत असताना भारतातील एकात्मतेचा प्रत्यय येईल असे सकारात्मक अनुभव प्रबोधिनीच्या विवाहसंस्काराच्या माध्यमातून मिळतात. त्यामागे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक अनेक कारणे असतील पण एकमेकांसाठी जुळवून घेण्याची भावना नक्की दिसते हे महत्वाचे आहे. असाच एक विवाह डॉ. मनीषा शेटे यांनी पंजाबामध्ये लग्न लावताना अनुभवला. त्याचे वर्णन त्यांच्याच शब्दात येथे देत आहोत. पौरोहित्य करायला लागले आणि विविध लोकांशी भेटण्याची संधी मिळाली. थोड बहुत हिंदी इंग्लिश येत असल्याने विवाहासारख्या संस्कारांकरिता भारतभर जाण्याची संधी मिळाली. माणसांची स्वभाव वैशिष्ट्य थोडी बहुत समजली पण आज लिहायचे आहे ते वेगळे आहे.. आपण भारतीय म्हणून कुठे आणि कसे एक असतो, एकमेकांना कसे सामावून घेत जातो आणि तेही सहजतेने. (थोडे बहुत इकडे तिकडे होत असणार ते अगदी घराघरात होतच असते) पण तरी स्वीकारशीलता जाणवेल इतकी मला तरी दिसली आहे. निमित्त एका विवाहाचे होते, मराठी मुलगा व पंजाबी (शीख) वधू यांचा विवाह लावण्याचा योग आला. अगदी पहाटे शीख पद्धतीने गुरू ग्रंथ साहिब यांना साक्षी ठेवून विवाह झाला. सुश्राव्य गायनाने गुरू नानकजी यांची पदे म्हणत विवाह सुरू झाला. वधूच्या वडिलांनी वर-वधूंच्या खांद्यावर शेला घातला. दोघांनी ते वस्त्र हातात धरून गुरू ग्रंथ साहिब यांना ४ फेरे घातले, वधु-वरांना अभंगातूनच मार्गदर्शन झाले. मराठी कुटुंबीय आनंदाने पूर्णवेळ बसून त्यामध्ये सहभागी झाले. त्यानंतर काही वेळातच मी व उर्मिलाताई बेटकर आम्ही प्रबोधिनी पद्धतीने विवाह संस्काराची सुरुवात केली. माहिती सांगताना डोक्यात घोळत होते संत नामदेव.. तेराव्या शतकात पंजाबमध्ये गेलेले नामदेव शिंपी समाजाचे.. सहज बोलताना म्हणले शिंपी वस्त्र जोडतो, नामदेवांनी दोन प्रांत जोडले.. घुमान आठवले.. लोकांनी टाळ्या वाजवल्या. विवाह उत्तम झाला असा चहूबाजूंनी प्रतिसाद मिळाला. पंजाबी कुटुंबातील काहीजणांनी तर प्रत्यक्ष भेटून प्रतिसाद दिलाच पण अनेकांनी पुन्हा पुन्हा भेटून सांगितले. दिल्लीतील एक ताई म्हणाल्या हिंदीतून शिकवणार असलात तर फार आवडेल मला शिकायला.. सर्व झाल्यावर विमानतळावर आलो आणि एका पंजाबी काकांच्या शेजारी बसलो.. मुलाची आजी आमच्याशी मराठीत बोलत होती ते ऐकून पंजाबी काका म्हणाले, “मराठी हो क्या?” आम्ही ‘हो’ म्हणाल्यावर ते म्हणाले “मी ४० वर्ष अहमदनगर येथे होतो. मराठी कळते आणि बोलता पण येते. थोडा वेळ छान गप्पा झाल्यावर गप्पांचा विषय कशावर संपवावा त्यांनी? तर ‘देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा’ या गाण्याच्या पहिल्या ओळीने…मला हे गाणे पूर्ण पाठ आहे असे ते म्हणाले. त्यांना विचारले कुठे निघाला आहात तर म्हणाले कोचीनला, कशासाठी? तर त्यांच्या मुलीने मल्याळी मुलाशी लग्न केले आहे तिला भेटायला. आम्ही त्यांना जेव्हा सांगितले आजच एका पंजाबी मुलीचा आणि मराठी मुलाचा विवाह आम्ही लावला तेव्हा त्यांना मस्त हसू आले. ते म्हणाले,”मी पंजाबी, निवृत्तीनंतर चंदीगढला आलो. आयुष्य मात्र महाराष्ट्रात गेले. पण मुलगी शिक्षणासाठी कोचीनला गेली तिथे तिला मल्याळी मुलगा भेटला. आता मी नातीला सांभाळण्यासाठी तिकडे जात आहे.” बांग्लादेशी मुस्लिम वधू व भारतीय हिंदू वर असे दोन विवाह संस्कार करण्याची संधी मिळाली. दोघी जणी विश्वासाने घर मागे टाकून आल्या होत्या. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी एका वधूला अश्रू अनावर झाले तेव्हा तिच्या बाजूने कन्यादानासाठी बसलेल्या वराच्या मामा-मामीने तिच्याशी इतक्या आपुलकीने संवाद साधला की उपस्थित सर्वच भारावून गेले. दुसर्‍या बंगाली वधूने आम्हा दोघी पुरोहितांना उद्देशून सुंदर पत्र लिहिले. “आम्ही एकत्र कसे येऊ याबद्दल माझ्या मनात निश्चित शंका होती कारण, दोघांचा धर्म व देश वेगळा आहे. जन्मापासून आम्ही वेगळ्या संस्कारांमध्ये मोठे झालो, आमच्या श्रद्धा निराळ्या होत्या. पण, आता मला समजले की माझ्या श्रद्धा जपत असतानाही मी आता अधिक मुक्त, आनंददायी, चैतन्यमय हिंदुधर्मसागरात पुढचे पाऊल टाकले आहे. या संस्मरणीय संक्रमणासाठी आम्ही दोघे नेहमी कृतज्ञ राहू. असे अनुभवल्यावर साहजिकच प्रश्न पडतो आपण एकमेकांशी कशाने जोडलेले आहोत? संस्कृतीने, विश्वासाने, आत्मियतेने, माणुसकीने? काहीतरी असे आहे जे बाहेरच्या जगात उलथापालथ चालू असतानाही जीवंत राहते ते म्हणजे या पलीकडचं काहितरी आहे.. या काहीतरीच नाव कोण सांगेल मला…

एकात्मतेचा अंतर्गत तरल प्रवाह… Read More »

स्त्री-उपनयन : एक संस्कार, एक परंपरा

लेख क्र. ३९ १३/०७/२०२५ मुलींचे उपनयन अगदी अल्पप्रमाणात का होईना पुन्हा एकदा समाजमान्य होऊ लागले आहे. वास्तविक पाहता उत्तम शिक्षण व संस्कार हा प्रत्येक बालकाचा अधिकारच आहे. पूर्वी उपनयन म्हणजे शिक्षणासाठीचे द्वार! या द्वारातून प्रवेश करून मुलांचे शिक्षण सुरु व्हायचे. त्यामुळेच प्राचीन काळातील स्त्रीसुद्धा विद्या विभूषित होती असे संदर्भ वेदांपासून पुढे अनेक ग्रंथांत सापडतात. मुलींचे उपनयन होत असे व त्या पौरोहित्यही करत असत याविषयी डॉ. आर्या जोशी यांनी शोधपर निबंध लिहिला आहे. डॉ. आर्या जोशी संत्रिकेत पौरोहित्य प्रशिक्षक व संशोधक म्हणून कार्यरत होत्या. हिंदू धर्मातील एक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना म्हणजे संस्कार! हे संस्कार मनुष्याच्या जन्माआधीच सुरु होतात आणि त्याला शेवटचा निरोपही संस्कारपूर्वक दिला जातो हे लक्षात घेण्यासारखे आहे. गर्भाधानापासून सुरु होणारा हा प्रवास अंत्येष्टी संस्कारापाशी येऊन थांबतो. हे सर्व संस्कार व्यक्तीचे व्यक्तित्व घडवितात, त्याला समृद्ध करतात, सक्षम करतात. आयुष्याच्या विविध टप्प्यांवरील महत्वाचे संस्कार म्हणजे नामकरण, उपनयन, विवाह हे होत. व्यक्तिमत्वाची पायाभरणी करणार्‍या वय वर्ष आठ ते बारा या काळात होणारा उपनयन संस्कार किंवा मुंज हा संस्कार अतिशय महत्वाचा आहे. उप म्हणजे जवळ आणि नी-नय म्हणजे नेणे. मुलाला ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंजवळ घेऊन जाणे याला उपनयन संस्कार असे म्हटले जाते. आपल्याला कल्पना नसते की वैदिक परंपरेत केवळ मुलाचे नाही तर मुलीचेही उपनयन होत असे. तिला मंत्रपठणाचा, ज्ञान मिळविण्याचा, पौरोहित्य करण्याचा अधिकारही भारतीय ज्ञान परंपरेने दिलेला आहे. चला समजून घेऊया थोडं सविस्तर याविषयी- ऋग्वेद हा भारतीय परंपरेचा आद्यग्रंथ!  ऋग्वेदात केवळ पुरुष ऋषींनी रचलेल्या सूक्तांचा समावेश नसून ऋषिका म्हणजे महिलांनी रचलेली २७ सूक्ते ऋग्वेदात समाविष्ट आहेत. शौनक रचित बृहद्देवता या ग्रंथात या महिलांची नामावली दिलेली आहे (२.८२.८४). कक्षिवान यांची पुत्री घोषा हिने आपल्या सूक्तात अश्विनीकुमारांची स्तुती केलेली आहे (ऋग्वेद १०.३९). विश्ववारा, जुहू, सरमा, सर्पराज्ञी अशा विविध ऋषिकांचे उल्लेख आपल्याला दिसून येतात. वैदिक काळात मुलींनाही शिक्षण मिळत होते. त्यांच्याही अभ्यासाची सुरुवात उपनयन संस्काराने होत असे. त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला जाई. कन्यांचे उपनयन झाल्यावर त्या गुरुगृही राहून त्या वेदाध्ययन करीत असत.  पुराकल्पे कुमारीणां मौंजीबंधनमिष्यते। अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा।।(वीरमित्रोदय,संस्कारप्रकाश ४०२-४०३) अध्ययन पूर्ण झाल्यानंतर समावर्तन संस्कार केला जाई. समावर्तन म्हणजे सोडमुंज. या विधीमधे ब्राह्मणीने सुगंधी द्रव्य आपल्या मुखाला लावावे, क्षत्रियाने खांद्याला लावावे, वैश्याने पोटाला लावावे आणि कन्यांनी ओटीपोटाला लावावे असे आश्वलायन गृह्यसूत्र (३.८.११) यामधे सांगितले गेले आहे हे नोंद घेण्याजोगे आहे. ब्रह्मचर्याचे पालन करून अध्ययन पूर्ण करणाऱ्या कन्येला सुयोग्य वराची प्राप्ती होते, असे अथर्ववेदात म्हटले आहे. ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतिम् । अ.वे.११.९.१६ ऋषिका जुहू ही बृहस्पतीची पत्नी होती. प्रमादामुळे त्याने पत्नीचा त्याग केला होता. तथापि वैदिक संहितांचे अध्ययन-अध्यापन करून तिने स्वतःचे उर्वरित जीवन व्यतीत केले. विश्वावरा आत्रेयी हिने स्वतःच यज्ञाचे पौरोहित्य केले व अन्य स्त्रियांनाही तसे करण्याचा उपदेश केला. अग्नीची पूजा करण्यास तत्पर आणि विद्वानांचे स्वागत करणाऱ्या विश्वावरेला यज्ञकर्ती म्हणून संबोधिले आहे. उपनयन संस्कार झाल्याखेरीज वैदिक काळात असे अधिकार प्राप्त होत नसत. वैदिक काळापासूनच स्त्रियांचे उपनयन होत असे. संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यामध्ये स्त्रियांच्या उपनयनाचे संदर्भ आढळतात. संस्कार रत्नमालेच्या उपनयन प्रकरणात हारीतस्मृतीतल्या वचनाला धरून स्त्रियांचे दोन प्रकार सांगितले आहेत. १. ब्रह्मवादिनी – ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ती ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करून तिला वेदाध्ययन करू द्यावे. २. सद्योवधू – संसाराची इच्छा बाळगणारी असेल ती सद्योवधू. तिचे उपनयन करून लगेच तिचा विवाह करावा, असे सांगितले आहे.  यज्ञ हा वैदिक धर्माचा मेरुदंड मानला जाई. कौशीतकी ब्राह्मणात पथ्यास्वस्ति ही स्त्री उत्तरेकडचा खडतर प्रवास करून अध्ययन करते व तिच्या पारंगततेबद्दल वाच् ही उच्च पदवी मिळविते असा संदर्भ आहे. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात तसेच पतंजलीच्या महाभाष्यातही काही स्त्रिया आचार्य या नात्याने अध्यापन करीत, असे उल्लेख आढळतात (अष्टाध्यायी ४.१.६३) (पातंजल महाभाष्य ४.१.७८). गार्गी व मैत्रेयी यांच्या कथा बृहदारण्यक उपनिषदांत आल्या आहेत. त्यांची नावे सामान्यपणे सर्वांना माहिती असतात (बृहदारण्यक २.४,४.५). कात्यायनी व मैत्रेयी या याज्ञवल्क्य ऋषींच्या दोघी पत्नी. कात्यायनीला प्रामुख्याने गृहकृत्याची आवड होती तर मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. याज्ञवल्क्यांनी संन्यास घेण्यापूर्वी मैत्रेयीला तिच्या इच्छेनुसार ब्रह्मज्ञान दिले. पृथ्वीवरील वैभवापेक्षाही अमरत्वाचे ज्ञान मैत्रेयीला अधिक महत्त्वाचे वाटले. विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला व आवाहन केले की सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने शिंगाना सोने बांधलेल्या एक हजार गाई न्याव्यात. याज्ञवल्क्य ऋषींनी पुढाकार घेतल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्यांच्याशी शास्त्रचर्चा केली परंतु याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांना निरुत्तर केले. त्यानंतर गार्गी वाचक्नवी पुढे आली आणि तिने याज्ञवल्क्य ऋषींशी शास्त्रचर्चा केली. गार्गी मर्यादेचे उल्लंघन करून प्रश्न विचारते आहे असे मानून याज्ञवल्क्य ऋषींनी तिला धमकी दिली की तुझे मस्तक गळून पडेल. पण गार्गीला त्याचे भय वाटले नाही. ज्याप्रमाणे पुरुष ब्रह्मचारी राहून तप, स्वाध्याय, योग इत्यादी द्वारे ब्रह्मपद प्राप्त करीत असत त्याप्रमाणे स्त्रियाही परमार्थाची वाटचाल करीत असत. रामायण काळातील स्त्रियांना धर्मशिक्षण दिले जात असे. सीता, कौसल्या, तारा, वेदवती, स्वयंप्रभा यांना वैदिक शिक्षण दिले होते. सीतेचे उपनयन झाले असून ती सायंसंध्या करीत असल्याचे उल्लेख सापडतात. संध्याकालमनाः श्यामा ध्रुवमेष्यति जानकी। नदीं चेमां शुभजलां संध्यार्थे वरवर्णिनी।। (वा.रा.५.१४.४९) श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी कौसल्येने त्यांचे स्वस्त्ययन केले (वा.रा.१.२२.२). वालीची पत्नी तारा ही मंत्रविद् म्हणून ओळखली जात असे. मतंग मुनीच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन करणारी शबरी सर्वांना परिचित आहे. महाभारतातील सुलभा-जनक संवाद प्रसिद्ध आहे. सुलभा ही एक कुमारी संन्यासिनी असून प्रधान नावाच्या राजाची कन्या होती. संन्यास आणि योगमार्गाचे आचरण करणाऱ्या विदुषी सुलभेने मिथिलेचा राजा जनक याच्याशी कर्मयोग, गृहस्थाश्रम यासारख्या विषयांवर शास्त्रचर्चा केली आहे (म.शां. ३०८). या सार्‍याचा अधिकार प्राप्त होण्यासाठी उपनयन झाल्यानंतर गुरुंजवळ राहून ज्ञानग्रहण करणे अनिवार्य होते. शिक्षणाच्या अधिकारामुळे स्वतःला ब्रह्मपदी नेण्याचा अधिकार असलेल्या स्त्रीच्या सामाजिक अधःपतनाला उत्तर वैदिक काळात सुरुवात झालेली दिसते. भारतातील भौतिक समृद्धीचा मोह पडून अनेक परकीय आक्रमकांचे आघात भारताला झेलावे लागले. त्यामुळे स्त्रियांच्या विशेषतः मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये मनूने नोंदविले आहे की विवाह हाच मुलीचा उपनयनसंज्ञक विधी मानावा. पतिसेवा हीच तिची गुरूसेवा आणि गृहकृत्ये हेच तिचे यज्ञकृत्य होय.  वैवाहिको विधिः स्रीणां संस्कारो वैदिकः स्मरतः। पतिसेवा गुरौ वासो गृहार्थे अग्निपरिक्रिया।। – मनुस्मृती २.६६-६७ वैदिक कालापासून स्त्रियांचे धार्मिक क्षेत्रातील स्थान हिंदू परंपरेने जोपासलेले दिसून येते. भारतावर झालेली आक्रमणे, चातुर्वर्ण्याची प्रसृत झालेली संकल्पना यामुळे स्त्रियांना शैक्षणिक अधिकार नाकारले गेले, त्यांचे धार्मिक क्षेत्रातील अधिकारही काढून घेतले गेले. तथापि  अनेक सुधारकांनी केलेल्या कार्यामुळे स्त्रियांना स्वतःचा विकास करण्याचे व शिक्षणाचे अधिकार मिळाले.  आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वस्ती यांनीही महिलांना धार्मिक कृत्यांमध्ये पौरोहित्य करण्याचे अधिकार दिलेले दिसतात. पुण्यामध्ये शंकर सेवा समिती आणि ज्ञान प्रबोधिनी या संस्थांमध्ये महिलांना पौरोहित्य शिकविले जाते व समाजात त्या सर्वदूर पौरोहित्य करतात. ज्ञान प्रबोधिनी संस्थेमधे सर्व समाजगटातील मुलींचे उपनयन करण्याची पद्धती पुनरूज्जीवित करण्यात आलेली आहे.शिर्डीजवळ साकुरी येथेही महिला पौरोहित्य प्रशिक्षण दिले जाते. असा हा महिलांना धार्मिक कार्याचा आणि व्यक्तिविकासाचा अधिकार देणारा उपनयन संस्कार आजच्या आधुनिक काळात सर्वसमावेशक होताना दिसतो आहे.मुलांच्या बरोबरीने देशाच्या रक्षणासाठी स्रियाही आता सरसावल्या आहेत.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथून महिलांची पहिली तुकडी नुकतीच प्रशिक्षण पूर्ण

स्त्री-उपनयन : एक संस्कार, एक परंपरा Read More »

खरा धर्म आणि आचारधर्म

लेख क्र. ३८ १२/०७/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले यांनी संस्कृती, संस्कार, धर्म या विषयांवर भरपूर अभ्यास केला आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सर्वांगीण अभ्यास करून त्यांनी केलेले विश्लेषण देत आहोत. धर्म म्हणजे हिंदू, शीख, ख्रिश्चन असे नसून आपले चांगले आचरण, तसेच समाजाची प्रगती होईल असे काम करणे होय. धर्माची ही व्याख्या यशवंतरावांनी सोप्या शब्दात पण परखडपणे सांगितली आहे. समाजप्रदूषण ! आपल्या दैनंदिन जीवनात सदाचारास उतरती कळा आलेली दिसते आहे. विधिमंडळाच्या सदस्याने भ्रष्टाचार करावा, गंभीर गुन्हे करावेत आणि त्यास शिक्षा झाली तरी त्याने उजळ माथ्याने लोकनेता म्हणून मिरवावे, लोकांनीही अशा गुन्हेगारास आपला प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे हे दृष्य आपण पाहतो आहोत. कार्यपालिकेतील अधिकाऱ्याने पैसे खाऊन गुन्हेगारास सोडून द्यावे आणि त्याला न्यायपालिकेची भीती नसावी, उलट पैशाच्या जोरावर न्यायाधीशासही खिशात टाकण्याचा विश्वास त्यास वाटावा हे दृष्य आज आपणास दिसते आहे ! सदाचाराने हे अवमूल्यन का झाले असावे? आपल्या तथाकथित निधर्मी जीवनपद्धतीशी तर त्याचा संबंध नाही ना? सदाचार, नीतिमत्ता, सदस‌द्विवेकबुद्धी या सर्व गोष्टींना एवढी अवकळा का आली असावी? धर्मलक्षण धर्मलक्षण सांगताना स्मृतिकार म्हणतो, वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः। एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ॥ अर्थ :- वेद, स्मृती, सदाचार आणि आपल्याला प्रिय गोष्ट ह्या गोष्टी चार गोष्टी म्हणजे धर्माचे प्रत्यक्ष लक्षण. ह्या धर्माच्या लक्षणात वेद म्हणजे ज्ञानास अग्रस्थान दिलेले दिसते. आपल्यावर कोणी अन्याय केला असता, आपणास केवढे दुःख होते! मग आपण असा अन्याय दुसऱ्यावर कधी करू नये हे ज्ञान अनुभवातून आपण मिळवणे अपेक्षित आहे. दुसऱ्याला आपण साहाय्य केल्याने त्याला जी प्रसन्नता येते तिचे स्मरण, तिची स्मृती, जेव्हा आपल्याला असते तेव्हा आपण असला परोपकार करण्यास पुनश्च प्रवृत्त होऊ शकतो. एखाद्या सज्जनाचं वागणं, कोणा संताचं जीवन, त्यांचं सदाचरण हे प्रत्यक्ष धर्माचं लक्षण असल्याचं स्मृतिकार म्हणतो आहे. पण जीवनातून म्हणजे समाजजीवनातून सदाचारास आपण हद्दपार केल्याचे दृष्य का बरे दिसते आहे? रस्त्यावरील गर्दीत तरुणीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळणाऱ्याचा हात धरण्यास भोवतालच्या गर्दीतून कोणीच पुढे कसा येत नाही? त्यात खरा धर्म समजणारा कोणीच कसा नसतो? ‘पुण्य पर-उपकार, पाप ते परपीडा’ हे धर्मवचन आमच्या निधर्मी जीवनास चालत नसावे, कारण पाप-पुण्यासारख्या अंधश्रद्धेच्या गोष्टी त्यात आहेत. या शिवाय प्रत्येकाच्या अंतर्मनाला जे काही प्रिय वाटतं, आदर्श वाटतं, अनुकरणीय वाटतं तेही धर्माचे लक्षण हे स्मृतिकारांचं मत आहे. शारीर सुखास पुरुषार्थ पदवी आमच्या सुखासाठी आम्ही तर रात्रंदिवस धडपडत असतोच ! त्यासाठीच उदंड पैसा मिळवत असतो. आपल्या परंपरेत पैसा मिळवणे यास ‘अर्थ’ पुरुषार्थ व सुखासाठी धडपडण्यास ‘काम’ पुरुषार्थ म्हणून गौरवले आहे. पण धर्म आणि मोक्ष पुरुषार्थांच्या नियंत्रणात ‘अर्थ-काम’ ही जोडी राहायला हवी अशी आपल्याकडील ‘जुनाट’ विचारसरणी आहे, म्हणून आत्ताच्या निधर्मी जीवनप्रणालीत अर्थ-काम पुरुषार्थांना कायद्याचं नियंत्रण अपेक्षित आहे पण कायद्याचं नियंत्रण हे आम्ही त्यातील पळवाटा शोधून सहजच उधळून देतो, आणि प्रसंगी कार्यपालिका भ्रष्ट होऊन आम्हास साहाय्यच करते. अशा प्रकारे कायद्याचा धाक वाटत नाही हे दिसते. आमच्या आत्म्याचा आवाज ऐकण्यास आम्हाला आमची सुखलोलुप इंद्रिये संधी देत नाहीत. त्यामुळे ‘आत्मनः प्रियम्’ काय तेच आम्हाला समजत नाही. पाप-पुण्याचा विचार करण्यास आम्ही काही अंधश्रद्ध नाही ! प्रवृत्तिप्रधान धर्म ‘यतः अभ्युदय-निःश्रेयससिद्धिः स धर्मः ।’ अशी धर्माची एक व्याख्या आहे. या जगातील आपापला उत्कर्ष म्हणजे ऐहिक प्रगती ! म्हणजेच अर्थकामांची प्राप्ती आणि अंतःकरणाला ज्यामुळे धन्यता वाटते, परमानंद होतो; आपण चांगलं असं काही केल्याची कृतार्थता वाटत राहते त्याला निःश्रेयस म्हणावे. त्यामुळे परलोक (असल्यास) देखील आपल्याला सुखदायक ठरेल असे वाटत राहते. म्हणजे या जगात प्रसन्नतेने, संपन्न संसार अनुभवावा व कृतकृत्यतेने हे जग सोडतानाही ओठावर हास्य विलसावे हे आपल्या परंपराप्राप्त धर्माचे लक्षण दिसते. मग असा हा धर्म आपल्या जीवनातून हद्दपार करून तरी आपण काय मिळवणार? कायद्याला धाब्यावर बसवून मुक्त जीवन जगण्याचा परवाना? त्यापेक्षा स्मृतीतील पुढील वचन व्यवहारात उतरवून वागण्याचे ठरवू तर आपले जीवन समाजालाही उपयोगी होईल. यत् कर्म कुर्वतोऽस्य स्यात् परितोषोऽन्तरात्मनः। तत् प्रयत्नेन कुर्वीत विपरीतं तु वर्जयेत् ॥ अर्थ :- जे काम करताना आपल्या अंतरात्म्यास खूप समाधान होईल ते प्रयत्नपूर्वक करूया आणि त्या विरुद्ध (म्हणजे अंतरात्म्यास चुटपुट लागून राहील, पश्चात्ताप होईल असे,) जे असेल ते टाळूया; प्रसन्नतेने जगूया, दीर्घायुष्य मिळवूया. तेजाची उपासना ऋषयो दीर्घसंध्यत्वात् दीर्घमायुरवाप्नुयुः ॥ प्रज्ञां यशश्च कीर्तिच ब्रह्मवर्चसमेव च ॥ (मोठमोठ्या) ऋषींनी दीर्घकाळ संध्यावंदन केले व प्रदीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले. या मोठ्या काळात त्यांना त्रिकालदर्शी अशी प्रज्ञा मिळाली. जीवनात ते यशस्वी झाले. त्यांना कीर्ती प्राप्त झाली. व अलौकिक तेजाने ते चमकून गेले. म्हणून आपणही अंधाराचा नाश करीत उदयाचली येणाऱ्या त्या तेजोगोलाची; त्या ऊर्जेच्या मूलस्त्रोताची उपासना करूया. ‘उपासना करूया’ याचा अर्थ क्षणभर त्या सूर्यबिंबाचे चिंतन करीत एकाग्र होऊया, आणि ‘आमच्या बुद्धीसही असे तेज प्राप्त व्हावे’ अशी इच्छा करूया. अन् रोजच्या रोज, वर्षानुवर्षे ही गायत्रीची उपासना चालू ठेवून अलौकिक कांतीने सारं विश्व ढवळून टाकू या. पृथ्वीवरील साऱ्या ऊर्जांचे जे उगमस्थान असे ते सूर्यबिंब आपल्या देहाप्रमाणे बुद्धीलाही तेजस्वी करून टाको ही प्रार्थना विज्ञाननिष्ठ आहे. येथे अंधश्रद्धेचा काही संबंधच नाही. संध्यावंदन करण्याचा अधिकार स्त्रीपुरुष सर्वांना आहे. गायत्री मंत्राचा द्रष्टा विश्वामित्र हा काही ब्राह्मण नव्हे, पण त्याने भारताला दिलेला हा महामंत्र सर्वांसाठीच उपलब्ध आहे. ज्यांना याची ओळख नाही त्यांनी त्यांनी ती करून घ्यावी. विद्याव्रत घ्यावे व देशाला विद्यावैभवाने नटवावे. जातिपंथनिरपेक्षपणे, आर्य समाजात हा मंत्र सर्व इच्छुकांना विधिपूर्वक दिला जातो, त्यास आता १३४ वर्षे झाली. ज्ञानप्रबोधिनीनेही महाराष्ट्रभर या विधीस नवे रूप देऊन शाळाशाळांतून त्याचा प्रसार सुरू केला; हा खरोखरी एक शैक्षणिक संस्कार आहे. त्यामुळे तो भारतभर प्रचलित होण्यासारखा आहे. केरळच्या उच्च न्यायालयाने गायत्री मंत्र हा निधर्मी असल्याचा निर्णय देऊन कैक दशके झाली. त्यामुळे निधर्मी राज्यात त्याला राजमान्यता मिळण्यातही अडचण येऊ नये. व्यक्तिविकसनासाठी हे विद्याव्रत अपेक्षित असल्याची ज्ञानप्रबोधिनीची भूमिका आहे व व्यक्तिविकसनातून समाजविकसनाचे ध्येय साध्य होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ‘व्यक्तिमत्त्व विकसन’ हा विषय प्रशालांमध्ये सुरू केलाच आहे. आता विद्याव्रतास शाळांमधून शासकीय मान्यता मिळण्यास फार काळ लागणार नाही. अर्थात् शासनमान्यता लाभो वा न लाभो, गायत्री उपासनेस लोकमान्यता मिळाली की समाजाचं हित झाल्यावाचून राहणार नाही. आपल्या प्रखर बुद्धीस सहजच सन्मार्ग दिसत राहील. तोच आपल्या वैयक्तिक आणि पर्यायाने सामूहिक उत्थानाचा महामंत्र ठरेल ! आपणा सर्वांना हे माहीत असणे आवश्यक आहे की दशसहस्त्र वर्षांपूर्वीचा हा आपला राष्ट्रीय महामंत्र माझी (एकट्याची) बुद्धी प्रखर व्हावी असे म्हणत नाही तर ‘आम्हा सर्वांच्या सर्व जाति-पंथ-स्त्री-पुरुष-श्रमजीवी-बुद्धिजीवी-यांच्या विचारशक्तीस तेजस्वी बनवो अशी कामना व्यक्त करतो आहे. ‘गायन्तं त्रायते’ म्हणजे म्हणणाऱ्या सर्वांना-सर्व समाजाला; देशाला-तारणारा मंत्र, म्हणून हा ‘गायत्री’ नावाने ओळखला जातो. देशात लक्ष लक्ष लोकांनी एका वेळी एका सुरात, अर्थावर लक्ष केंद्रित करत करत या मंत्राचा उच्चार केला पाहिजे. त्यातून समष्टीची शक्ती उत्पन्न होईल ! प्रतिभेची शक्ती तर त्याहून कितीतरी भव्य असेल. देशापुढील साऱ्या समस्यांना तिच्यामुळे उत्तरे मिळतील व भारत ही महाशक्ती बनेल. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् । या परब्रह्माच्या, देवाच्या, श्रेष्ठ तेजाचे ध्यान करितो, आमुच्या बुद्धीला तो प्रचोदना देवो.

खरा धर्म आणि आचारधर्म Read More »

प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम

लेख क्र. ३७ ११/७/२०२५ ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग, खंड ३ (१९८८) या ग्रंथात संस्कृत-संस्कृति-संशोधिका (संत्रिका) विभागाचे माजी विभागप्रमुख श्री. विश्वनाथ गुर्जर यांनी विभागात होणार्‍या संस्कार उपक्रमाबद्दल ‘संस्कार विभाग’ या लेखात माहिती दिली आहे. संस्कार का करावेत, कसे करावेत, संस्कारांसाठी कोणते साहित्य वापरावे, पौरोहित्य कोणी करावे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखात मिळतील. संत्रिका कोणकोणते संस्कार अथवा पूजा संपन्न करते तेही येथे सांगितले आहे. संस्कार विभाग – शिक्षण, संशोधन, ग्रामविकसन या क्षेत्रांतील उपक्रमांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय असेही अनेक उपक्रम प्रबोधिनीने अंगीकारलेले आहेत. संस्कार कार्यक्रम हा त्यांतील एक महत्त्वाचा भाग आहे. सामान्यपणे असे अनुभवास येते की बहुतेक नागरिकांना मग ते विज्ञानवादी असोत, बुद्धिवादी असोत, सुशिक्षित-अशिक्षित कसेही असोत, सर्वांना व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात धार्मिक संस्काराचा काही ना काही अवलंब करावा असे वाटत असते. मग देशाच्या काना-कोपऱ्यांत पसरलेल्या कोट्यवधी लोकांना अशा संस्कारांची गरज जाणवत असते हे निराळे सांगावयास नको. संस्कारांची पुनर्मांडणी – संस्कार हा संस्कृतीचा कृतिरूप उन्मेष आहे. बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये कौटुंबिक जीवनात अपत्यजन्म, विवाह आणि देहावसान या घटना काही संस्कारांनी बांधलेल्या दिसतात. अतिशय उदात्त आणि मनोरम असा आशय या संस्कारांतून व्यक्त केला जाऊ शकतो. व्यक्तीच्या जीवनाला असलेला सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संदर्भही संस्कारांमधून प्रकट होऊ शकतो. हिंदू जीवन पद्धतीत अशा सोळा अर्थपूर्ण संस्कारांची गुंफण पूर्वी केलेली होती. कालाच्या ओघात त्यांतील नामकरण, उपनयन, विवाह, षष्ट्यब्दी, अंत्येष्टी इत्यादी संस्कार टिकून राहिले. या संस्कारांचा मूळचा पवित्र, तेजस्वी आशयही काळाच्या ओघात हरवला आणि त्याबरोबर त्या संस्कारांमध्ये अनुस्यूत असलेली मूल्येही. तो आशय आणि ती मूल्ये या संस्कारांमधून पुनरपि प्रकट व्हावीत यासाठी त्यांच्या पुनर्मांडणीची आवश्यकता होती. विद्योपासना, सामाजिक दायित्व, कौटुंबिक दायित्व, प्रेम, त्याग-भावना, ईश्वरपरायणता ही सर्व धर्मसंस्थापनेला म्हणजेच समाजाच्या धारणेला पायाभूत असलेली मूल्ये आहेत. बहुतांश संस्कारांच्या मूळ स्वरूपात ती आहेतही. काहींच्यात त्यांचा नव्याने अंतर्भाव करावा लागला. ही पुनर्मांडणी ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक संचालक कै. आप्पाजी पेंडसे यांनी धर्मनिर्णय मंडळाचे कै. श्री. कोकजे शास्त्री यांच्या सहविचाराने केली. महत्त्वाच्या प्रचलित संस्कारांचे प्रयोग ज्ञान प्रबोधिनीमध्ये करून बघितले आणि ते समाजोपयोगी होत आहेत असे वाटल्यावरून विविध संस्कारांच्या पोथ्याही मुद्रित करून घेतल्या. या संस्कारांच्या पुनर्मांडणीतील काही विशेष खाली दिले आहेत. पौरोहित्य कोणी करावे? – संस्कारांचे पौरोहित्य कोणी करावे यासंबंधीही ज्ञान प्रबोधिनीची काही धारणा आहे. पौरोहित्य करणारी व्यक्ती जन्माने ब्राह्मण असावी अशी पुष्कळांची समजूत असते. तथापि प्रबोधिनीच्या धारणेप्रमाणे जी व्यक्ती शुचिर्भूत, सदाचारी, विद्याभ्यासी आहे अथवा स्वतः सुसंस्कारित आहे, अशा कोणाही स्त्री पुरुषाला पौरोहित्याचे अधिकार आहेत. प्रबोधिनीत अशा प्रकारे तथाकथित ब्राह्मणेतर व्यक्ती आणि स्त्रियाही संस्कार कार्यक्रम संपन्न करतात. स्त्रियांनी अंत्येष्टी अथवा श्राद्धासह कोणतेही संस्कार कार्यक्रम करण्यास प्रत्यवाय नाही. या संस्कार कार्यक्रमासाठी वास्तविक कोणा व्यावसायिक पुरोहितांचीच आवश्यकता आहे असे नाही. घरातील कुटुंब प्रमुख अथवा गृहिणी, पोथीवरून कोणताही संस्कार कार्यक्रम संपन्न करू शकतात. …पत्र पुष्प फळ…मिस केवळ – संस्कारांमधील उपचार, धूप-दीप, नैवेद्य, विड्याची पाने, सुपाऱ्या, खारका, बदाम, फळे, विशिष्ट प्रकारची फुले, पत्री, विशिष्ट रंगाची वस्त्रे हे सर्व मुख्यत्वे करून मानवी मनाच्या समाधानासाठी असतात. त्या त्या संस्काराच्या रीतीनुसार त्या शक्यतो उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करावा, तथापि त्यातील एक वा अधिक वस्तू उपलब्ध नसतील तर संस्कारात मोठे उणे राहिले, परमेश्वराचे समाधान होणार नाही, त्याची अवकृपा होईल असे यत्किंचितही वाटून घेऊ नये. त्या सर्वव्यापी शक्तीपुढे शरणतेची आणि नम्रतेची भावना, दोन हस्तक व तिसरे मस्तक एवढ्याने केलेली मानसपूजादेखील पुरेशी असते अशी प्रबोधिनीची धारणा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे – येर पत्र पुष्प फळ । भजावया मिस केवळ । वाचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ।। प्रबोधिनीच्या वतीने होणारे संस्कार कार्यक्रम नियोजित वेळी व्हावेत अशी विनंती आहे, त्यामुळे इतरांचीही सोय होते आणि चांगल्या प्रथा पडतात. यजमानांच्या अपेक्षेनुसार तिथी, वार, मुहूर्त, स्थल, काल, दिशा याबाबत पुरोहित मार्गदर्शन करतील. तथापि या बाबतीतही प्रबोधिनीची भूमिका लवचिक असते. ग्रहण आणि अमावास्येखेरीज अन्य दिवशी कार्यक्रम करण्याला प्रत्यवाय नसावा. दक्षिणा निरपेक्ष – प्रबोधिनीच्या वतीने संस्कार कार्यक्रमांची व्यवस्था अथवा दायित्व स्वीकारले जाते, ते समाजकार्याचा आणि समाज पुनर्रचनेचा एक भाग म्हणून. अतएव कोणत्याही समारंभासाठी अमुक इतकी दक्षिणा मिळावी अशी अपेक्षा नाही. केवळ शुभेच्छा अथवा नाममात्र रुपयापासून सहस्र अथवा अधिकही रुपयांचे योगदान ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात यजमान करू शकतात. त्याची रीतसर देणगीची पावती, आयकर मुक्तीचे पत्र कार्यालयात मिळू शकते. किती दक्षिणा द्यावी ? असे यजमान पुन्हा पुन्हा विचारतात. तथापि यासंबंधी कोणतीही अपेक्षा व्यक्त करू नये असे ज्ञान प्रबोधिनीचे धोरण आहे. व्यवसाय म्हणून, उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पौरोहित्य करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. जे पौरोहित्य करतात त्या पुरोहितांना साधेपणाचे परंतु कालमानाप्रमाणे आवश्यक त्या स्तराचे जीवन स्थिरपणे व्यतीत करता येईल यासाठी वास्तविक समाजाने काळजी घ्यावयास पाहिजे. त्यामुळे यजमानांना व पुरोहितांनाही संस्कारातील दक्षिणा व देणगी बाबत स्पष्टता असावी म्हणून विभागाची छापील माहितीपत्रके तयार केली आहेत. ज्यामुळे अयोग्य, मनाला न भावणारे व्यवहार दोन्ही बाजूंनी होऊ नयेत. संस्कार विभागासाठी प्रशिक्षकांची मानधनावर नियुक्ती केली जाते. त्यांचा योगक्षेम कोणत्याही प्रकारे संस्कार कार्यक्रमातून मिळणाऱ्या प्राप्तीवर अवलंबून नाही. आणखी काही आपणही या – संस्कार हा केवळ बाह्योपचार नव्हे. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांना शुद्ध करणारा, उदात्ताचे लेणे चढविणारा असा झाला म्हणजे तो खरा संस्कार होय. केवळ सामारंभिक थाटमाट, प्रीतीभोजने यांच्यातच मर्यादून न राहता अर्थाच्याही श्रीमंतीने शोभणारा, समाजाला एकत्र आणणारा, मूल्ये देणारा, ज्या व्यक्तींवर संस्कार केला जातो त्यांना व त्यांच्या आप्तांना भारतीय जीवनदृष्टीचे स्मरण देणारा असा संस्कार व्हावा ही आजची गरज आहे. त्यासाठी शत-सहस्र मुखांनी या संस्कारांचा प्रसार व्हायला हवा आहे. शाळा-शाळांमधून सामूहिक उपनयन संस्कार संपन्न व्हावयास हवे आहेत. सामुदायिक विवाहांचे प्रयोग जिथे होतात तिथेही मायबोलीतील हा विवाह संस्कार अर्थपूर्ण ठरेल असे वाटते. ज्ञान प्रबोधिनीप्रणीत संस्कार आपल्या घरी योजणाऱ्या सर्व सुहृदांना विनंती आहे की, त्यांच्या परिचयातील घरांमध्येही असे संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. धर्मचेतनेच्या पवित्र गंगेचे पाणी आपल्याही ओंजळीने चार रोपांच्या मुळाशी शिंपले जावे असे हार्दिक आव्हान आहे. या संस्काराचा प्रयोग अनुभवल्यानंतर काही जणांना असे वाटेल की आपणही पौरोहित्य करावे. अशा सुहृदांचे प्रबोधिनीत स्वागत आहे त्यांना येथे आवश्यक ते साहाय्य केले जाईल. यात अधिकाधिक स्त्री-पुरुष नागरिकांनी सहभागी व्हावे असेही आवाहन आहे.

प्रबोधिनीचा आगळा-वेगळा ‘पौरोहित्य’ उपक्रम Read More »

गुरुपौर्णिमेनिमित्त शब्दांजली…

लेख क्र. ३६ १०/०७/२०२५ कै. वाच. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे ज्यांना मा. रामभाऊ ‘आमचे परात्पर गुरू’ म्हणून संबोधतात त्यांना अभिवादन करून संत्रिकेच्या कामावरती थेट प्रभाव असलेले सर्वांचेच गुरुस्थान म्हणजे मा. श्री. यशवंतराव लेले, मा. प्रा. विश्वनाथ गुर्जर, संस्कृत व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, प्रा. रामभाऊ डिंबळे, ज्यांना प्रबोधिनीचे आद्य पुरोहित म्हणून ओळखले जाते, कै. वाच. स्वर्णलताताई भिशीकर ज्यांच्या सौम्य व कणखर व्यक्तिमत्वाचा प्रभाव सर्वांवर होता व असणार आहे, कै. वामनराव अभ्यंकर उर्फ भाऊ या सर्वांचा अल्प परिचय आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त येथे देत आहोत. येथे या सार्‍यांनी केलेले काम विलक्षण आहे. या सर्वांना मनःपूर्वक नमस्कार! मा. श्री. यशवंतराव लेले – मा. यशवंतराव १९६२ पासून ज्ञान प्रबोधिनीत वेगवेगळ्या कामांमध्ये सहभागी होते. त्यांनी प्रबोधिनीद्वारा आयोजित अनेक उपक्रम व दौर्‍यांमध्ये सहभाग घेतला व नेतृत्त्वही केले. काश्मिर, पूर्वांचल, बिहार या प्रदेशांमध्ये तिथल्या परिस्थितींमुळे दौरे करून मदतकार्य केले. त्यांनी सकवार या आदिवासींच्या गावाचे विकसन, देवदासी चळवळ, दारूबंदी आंदोलन अशा अनेक समाजसुधारणेच्या कामात भाग घेतला. प्रा. रामभाऊ डिंबळे, डॉ. भीमराव गस्ती अशा अनेकांना घडविण्यात, मार्ग दाखविण्यात यशवंंतरावांचा हात होता. १९८७-२००२ ते संत्रिकेचे विभागप्रमुख होते. तेव्हा त्यांनी देहदान, विवाहदिन, वानप्रस्थाश्रम दीक्षा इ. आशयघन पोथ्यांची निर्मिती केली व असंख्य संशोधन-प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन केले. संत्रिका विभागप्रमुख या पदावरून जरी ते निवृत्त झाले होते तरी ते कायम मार्गदर्शक म्हणून सगळ्यांसोबत कामात उभे असायचे आणि अजूनही असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व गंभीर, ध्येयवादी तरी मार्मिक आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक पोथ्यांच्या सुंदर व अर्थपूर्ण प्रस्तावना पुरोहितांनी व सगळ्यांनीच पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. प्रा. विश्वनाथ गुर्जर – ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी व तडफदार कार्यकर्ते, संस्कृतज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ. त्यांनी युवकविभागातील विविध जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. त्यांना खेळाचीही लहानपणापासून आवड होती. खो-खो, लंगडी, व्हॉलीबॉल हे त्यांचे आवडते खेळ होते. त्यांनी ईशान्य भारत, कोयनाभूकंप असे अनेक अभ्यास व आपत्तिनिवारण दौरे केले. ते शास्त्रीय संगीत शिकले आहेत, त्यामुळे ते प्रशालेत संगीत-शिक्षक म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी प्रबोधिनीतील १९७५ पासून संस्कृत अध्यापक, प्राचार्य, सहकार्यवाह, पौरोहित्य प्रशिक्षक, संत्रिका विभाग प्रमुख ही पदे सांभाळली. याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे संस्कृतचे अध्यापन केले. योगी अरविंद आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानाचे ते अभ्यासक आहेत. समग्र जीवन दर्शन, राष्ट्रवाद, आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे मार्गदर्शक. संस्कारांमागील अर्थपूर्णता, प्रतीकात्मकता समजून घेण्यासाठी पुरोहितांनी सातत्यपूर्ण अभ्यास करायलाच हवा असे सांगणारे विसुभाऊ! प्रा. रामभाऊ डिंबळे – मा. आप्पांचे मानसपुत्र व प्रबोधिनीचे आद्य पुरोहित. सिंहगडाच्या पायथ्याशी वसलेल्या कल्याण खेड्यातील पहिला साक्षर झालेला राम पुण्यात आप्पांच्या घरी राहून संस्कृतातील रामशास्त्री झाला असे त्यांचे वर्णन केले जाते. शाळेत संस्कृतची गोडी निर्माण झाल्यामुळे त्यांनी उच्च शिक्षणासाठी संस्कृत विषय निवडला व ते संस्कृतज्ज्ञ झाले. पुण्यातील आबासाहेब गरवारे व सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी काही काळ अध्यापनही केले. शिक्षणानंतर त्यांनी स्वतःच्या गावात संडास बांधणे, रस्ता व देऊळ दुरुस्ती करणे अशी कामे त्यांनी केली. पुढे प्रबोधिनीच्या ग्रामविकसनकार्याचे ते प्रमुख झाले. गुंजवणी खोर्‍यातील खांडसरी कारखान्याच्या बांधकामाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांनी दारूबंदीसाठी खूप परिश्रम घेतले आहेत, अनेक गावे व्यसनमुक्त केली. त्यांनी मा. कै. आप्पांवर ‘युवजननायक नमो’ ही कविता लिहिली आहे. ओघवती वक्तृत्त्वशैली व मिश्किल टिप्पणी करणारे रामभाऊ संत्रिकेतील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला असायलाच हवेत हा आमचा हट्ट ते नेहमीच पूर्ण करतात. त्यांनी स्वतः सर्व प्रकारचे संस्कार केले आहेत. संस्कारात नावीन्य कसे आणायचे, अभ्यासपूर्ण पण नेमके कसे बोलायचे ते त्यांच्याकडून शिकायचे. बहुजन समाजापर्यंत संस्कार पोहोचविण्यासाठी आपण त्यांच्यातील एक व्हायला पाहिजे अशी शिकवण ते नेहमी देतात. कै. वाच. स्वर्णलता भिशीकर – प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी एक. त्या मानसशास्त्रातील वाचस्पती पदवीधर होत्या. त्या गतिवाचन (Faster Reading) तज्ज्ञ होत्या. त्यावर त्यांनी वर्गही घेतले. त्या युवती विभागाच्या पहिल्या सचिव व समर्पणाने कार्य करणार्‍या होत्या. तृतीय प्रतिज्ञा घेऊन कार्याला सिद्ध झालेल्या त्या पहिल्या युवती. त्यांनी देश-विदेशात प्रवास केला. त्यांचे श्री. गो. नी. दांडेकरांसह झालेल्या अमेरिकादौर्‍याचे वर्णन विशेष आहे. त्यांना अध्यात्माची आवड होती, त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने, प्रवचने दिली. अनेक प्रबोधन पद्यांच्या त्या कवयित्री, तसेच त्या भरपूर लेखनही करत असत. प्रबोधिनीच्या अनेक संस्कार पोथ्यांंचे लेखन त्यांनी आप्पांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या समवेत केले. पुढे कै. आप्पा पेंडसे यांच्या चरित्राचेही त्यांनी लेखन केले. ज्ञान प्रबोधिनीच्या सोलापूर व हराळी केंद्राच्या उभारणीत त्यांंचा महत्वाचा वाटा होता. पौरोहित्यामध्ये भावात्मकता जपताना पुरोहिताने कणखरही असायला हवे हे त्यांनी आमच्यापर्यंत नेमके पोहोचविले. अभ्यासक, संशोधक, लेखिका, समुपदेशक असलेल्या लताताईंनी पुरोहितांना त्यांच्या प्रिय उपासनेबद्दल मार्गदर्शन केले. कै. वाच. वामन नारायण अभ्यंकर – १९६४ पासून ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे कामाला सुरुवात केली व पुढे अनेक जबाबदार्‍या सांभाळल्या. ज्ञान प्रबोधिनी, निगडी येथे ३५ वर्षांहून अधिक काळ केंद्रप्रमुख या नात्याने कार्यरत असलेले भाऊ म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्व, पंचकोशाधारित शिक्षणप्रणालीचे प्रणेते. ज्ञान प्रबोधिनीने तयार केलेल्या वेगवेगळ्या संस्कारंच्या पोथ्यांच्या संस्करणात सहभाग घेतला होता. चिंतनिका, विद्याव्रत संस्कार-पंचकोश विकसनाचा संकल्प अशी पुस्तके प्रसिद्ध. भागवत सप्ताहांमध्ये प्रवचने व असंख्य विषयांवर व्याख्याने त्यांनी दिली. माणसे जोडणं, त्यांना आपलेसे करणे व कार्यात आणणे हे त्यांच्याकडून शिकावे.

गुरुपौर्णिमेनिमित्त शब्दांजली… Read More »

सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत

लेख क्र. ३५ ९/७/२०२५ संत्रिकेच्या पौरोहित्य उपक्रमाबद्दल आपण मागच्या काही लेखांमध्ये बघितले. पोथ्यांचे प्रशिक्षण देऊन विभागाने अनेक पुरोहित घडवले. हे पुरोहित फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्र, भारत व परदेशीसुद्धा संस्कारांसाठी जातात. आता साधारण ५० पुरोहित संस्कारविधी करत आहेत. असे संस्कार जेव्हा सुरुवातीला होत होते तेव्हा त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, काही चांगल्या अन् काही वाईट. काहींना संस्कारपद्धत आवडली परंतु त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. १९८० सालाच्या सुमारास ज्यांनी हे संस्कार करून घेतले त्यांपैकी ज्यांनी विवाहसंस्कार करून घेतला त्यातील सौ. विद्या काटदरे यांचे मनोगत येथे दिले आहे. लहान मोठ्या आकाराच्या नि वयाच्या अनेक लोकांनी गजबजलेलं वातावरण- कपडे नि दागदागिन्यांची हलती प्रदर्शनं – “नारायण! केरसुणी कुठे आहे ?” इ. वार झेलणारा एक नारायण – त्या गोंगाटात सूर हरवून बसलेली केविलवाणी सनई नि धुराबिरानं रडकुंडीला आलेले अत्यंत बावळट दिसणारे (बिच्चारे!) वधूवर- हे सगळं कळायलाही लागण्याच्या आधीपासून पाहिलेलं. विचार करता येण्याचं वय झालं तेव्हा पुष्कळदा वाटायचं, “या सगळ्याला काही सार्थता नाही का आणता येणार ?”- इतके लग्नसमारंभ पाहूनही मला त्यातला संस्कार कळलेला नव्हता. समारंभ म्हणून पहावं तर ते हेतूही विरून गेलेले-उरलंय काय तर देण्याघेण्याचे आर्थिक हिशेब ! केव्हातरी सोळा संस्कारावरचं एक पुस्तक वाचनात आलं- जन्मतःच बालकाला ‘वेदोऽसि’ म्हणून आत्मतत्त्वाशी त्याचं नातं जोडणाऱ्या जातकर्म संस्कारापासून ते अंत्यसंस्कारापर्यंतचे सगळे संस्कार समजावून घेताना हिंदुसंस्कृतीच्या उदात्त दर्शनानं अक्षरशः भारावून जायला झालं. प्रत्यक्षात हे संस्कार कधी समजावून दिले जात नाहीत. समजावून घेतलेही जात नाहीत. मग “हाताला हात लावून मम म्हणा” एवढंच समजतं. प्रबोधिनीत वर्षान्त वर्षारंभ, उपनयन या संस्कारांचे अनुभव घेतले होते. प्रबोधिनीच्या पद्धतीने झालेले काही विवाह पाहिले होते. त्यामुळे स्वतःच्या विवाहाचा प्रश्न आला तेव्हा, आपण चाकोरीबाहेर पडून लग्न करायचं हा निश्चय पक्का झालेला होता! लग्नाचं ठरलं तेव्हा अशोक म्हणाला, “आपण नाही हं त्या भयंकर पारंपरिक पद्धतीनं लग्न करायचं. मला तर त्यात दोन कुटुंब जोडली जाण्यापेक्षा तोडलीच जातात असं वाटतं. आपण आपलं नोंदणीपद्धतीनं करूया.” ‘लग्न’ म्हणजे ‘समारंभ’ ही कल्पना त्याच्या मनात घट्ट रुजलेली होती. तो एक ‘संस्कार’ आहे ही कल्पनाच पुसली गेली होती. ‘संस्कार’ आणि ‘समारंभ’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात आणून दिल्यावर आम्ही ‘विवाहसंस्कार’ घेण्याचं ठरवलं. अर्थ समजावून घेऊन म्हणजे अर्थातच प्रबोधिनीच्या विवाहसंस्कार पोथीनुसार हे आलंच. दोघांनीही पोथी वाचली. नंतर पुन्हा आचार्यांकडून ती समजावून घेतली. सर्वजण एकत्र जमले आहेत. वधू-वरांनी गणेशाला आवाहन करून विवाहाची इच्छा प्रकट केलेली आहे. वरज्येष्ठ नि वधूज्येष्ठ यांनी विवाहाची तयारी केली आहे. आचार्यांचे आशीर्वाद सर्वांनी घेतले आहेत. वराकडील मंडळींचं मधुपर्कानं स्वागत झालं आहे. मग वधुपित्यानं कन्यादान केलं आहे. दोघांना सर्वांनी आशीर्वाद दिले आहेत. नंतर दोघांनी एकमेकांबद्दलच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एकनिष्ठतेची वचनं एकमेकांना दिली आहेत. त्याच्या खुणा म्हणून मंगळसूत्र, कंठी एकमेकांना दिल्या आहेत. नंतर अग्नीच्या साक्षीनं दोघांनी विवाहप्रतिज्ञा घेतली आहे. अग्नीकडून सामर्थ्य, संपत्ती, संतती आणि चांगल्या गृहस्थाश्रमाला आवश्यक असे आशीर्वाद घेतले आहेत. अग्नीला प्रदक्षिणा घालून नंतर सप्तपदीनं संसार प्रवासाला प्रारंभ केलेला आहे. आचार्य आणि आप्तेष्ट त्यांना आशीर्वाद देत आहेत. असा हा संस्कार. संस्कार घेताना मंत्रमुग्ध व्हायला झालं होतं. प्रत्येक शब्द आत कुठेतरी कोरला जात होता. याचं कारण प्रत्येक शब्दाचा, श्लोकाचा अर्थ सुंदर मराठीत दिलेला आहे. श्लोक आणि अर्थही आम्ही स्वतः आचार्यांच्या मागोमाग वाचत होतो. प्रत्येक गोष्ट का करायची तेही श्लोकावरून कळत होतं. अक्षतारोपणम्, प्रधानहोम आणि सप्तपदी हे तीन विधी मला विशेष आवडले. संपूर्ण समारंभात वधू-वरांना सारखेच श्रेष्ठ समजलं गेलं आहे- हेही खूप महत्त्वाचं वाटतं. “इमं अश्मानमारोह अश्मेव त्वं स्थिरा भव”- “या दगडावर आरूढ होऊन पाषाणखंडाप्रमाणे स्थिर हो” हे ऐकताना गृहस्थाश्रमाच्या जबाबदारीची वेगळीच जाणीव होत होती. सप्तपदीतले तर सर्वच श्लोक सुंदर आणि अर्थपूर्ण आहेत. अन्नासारख्या मूलभूत गोष्टीपासून, बल, धन, संपत्ती, ऐहिक आनंद आणि त्याही पलीकडचं चिरंतन सख्य – या सर्वांसाठी एकमेकांना अनुकूल पावलं पडली तरच गृहस्थाश्रम ‘धन्य’ होणार. त्यासाठी अग्निसाक्ष संकल्प करण्याची कल्पनाच केवढी उत्तुंग आहे ! हा विवाह माझ्या आयुष्यातला एक अनुपम्य अनुभव होता – एवढंच! थोडक्यात कारण उरलं ते सर्व शब्दातीत.

सार्थ, समंत्रक विवाहसंस्काराविषयी मनोगत Read More »

संस्कारांचे पुनरुज्जीवन

लेख क्र. ३४ ०८/०७/२०२५ प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी संस्कारांमागील तात्त्विक भूमिकेचा विचार मांडला. त्यानंतर महिला पुरोहितांचा धार्मिक कार्यातील सहभाग समजून घेतला. या लेखामध्ये आचार्य योगानंद उर्फ डॉ. श्री. वि. करंदीकर यांनी संस्कार व पुरोहितांची वृत्ती यावर प्रकाश टाकताना संस्कारांमागील अध्यात्मिक व मानसिक विचार मांडला आहे. वासनारूप देहावर संस्काराची आवश्यकता असते. सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीची वाढ सामान्य स्तरावर असते आणि अशा स्थितीतसुद्धा प्रगती साधण्यासाठी भारतीय संस्कृतीने ‘संस्कारांची’ योजना केली आहे. माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यावर सोळा संस्कार करण्याची योजना होती. त्यातील काही संस्कार काळाप्रमाणे नष्ट झाले. काहींमध्ये ज्ञान प्रबोधिनीने कालानुरूप बदल केले. विद्याव्रत, देहदान, साठीशांती अशा काही संस्कारांची भरही घातली. हा लेख ‘मी पुरोहित बोलतोय’ या पुस्तकात प्रस्तावना म्हणून प्रकाशित झाला आहे. सोबत ध्वनिमुद्रण जोडले आहे. वासनारूप सूक्ष्म देहावर संस्काराची आवश्यकता असते. हा देह ऊर्जास्वरूप आहे आणि संस्कारक्षम आहे. तसेच हा सर्वगामी आणि वैश्विक स्वरूपाचा आहे. यात सर्व पूर्वजन्माचे संस्कार उपस्थित असतात; पण सध्या ज्या योनीत जन्म झाला आहे त्या जन्मामुळे प्राप्त झालेल्या अवतीभवतीच्या परिस्थितीत शरीरात योग्य वर्तन करण्यास उपयोगी असे संस्कार उजळून उठतात आणि मन-बुद्धीच्या साहाय्याने भान आणि कर्म-इंद्रियांच्या माध्यमातून स्थूल शरीराचे व्यवहार पार पाडता येतात. सद्यः स्थितीत मानवी जन्म प्राप्त झाल्यामुळे इतर प्राण्यांपासून वेगळी परिस्थिती असते; त्यामुळे जाती, देश, कालसापेक्ष सुयोग्य संस्कार जागृत होतात. स्मृती आणि संस्कार एकरूप आहेत. अतृप्त इच्छा आणि पूर्वी केलेल्या क्रिया या स्मृतिरूपात नेहमीच असतात आणि योग्य भावनांना अनुरूप असे संस्कार आपोआपच बाहेर येऊन क्रिया घडते. मानवी योनी ही परमेश्वर-तत्त्वाची अनुभूती येण्यासाठी योग्य आहे. अशा अनुभूतीला ‘मोक्ष’ म्हणतात. ही अवस्था ‘निर्विकल्प’ आहे. विकल्प ही वृत्ती शब्दरूप आहे; पण ही अवस्था शब्दांच्या पलीकडे असल्याने ती निर्विकल्प आहे. असे जरी असले, तरी ती प्राप्त होण्यासाठी शरीराचे सर्वांत सूक्ष्म स्वरूप जे ‘आकाश’ ते आत्म्याचे प्रकटीकरण होण्यातील पहिली अवस्था आहे. आकाश या महाभूताच्या सर्वात सूक्ष्म स्वरूपाला ‘तन्मात्रा’ म्हणतात. ‘तत्’ म्हणजे परमेश्वर-तत्त्व आणि मात्रा म्हणजे ‘संज्ञा’. आकाशाची तन्मात्रा ‘शब्द’ ही असून भारतीय संस्कृतीत त्याचे रूपांतर भाषेत करून ते सूत्रबद्ध करून प्रकट केले. त्यांना ‘मंत्र’ म्हणतात, मंत्राची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, ‘मननात् त्रायते इति मंत्रः।’ मनन म्हणजे मनाच्या साहाय्याने अज्ञात वस्तूंचे ज्ञान होणे. असे ज्ञान झाल्यानंतर त्याचा उपयोग ‘जीव’ या ऊर्जेचे स्थान असलेल्या शरीरात स्थिर राहण्यासाठी ‘चिंतन’ म्हणजे पुनः पुनः त्याची उजळणी करणे, शरीराला ‘स्व’ म्हणतात आणि या ‘स्व’ ला हे ज्ञान अर्थपूर्ण होण्याला ‘स्वार्थ’ म्हणतात. म्हणूनच ‘चित्त’ या अंतःकरणाच्या पैलूची व्याख्या करताना ‘स्वार्थानुसंधानगुणेन चित्तम् ।’ अशी केली आहे आणि हे ज्ञान स्मृतिरूपात साठवून ठेवून त्याचा उपयोग करण्याची कला ‘बुद्धी’ या अंतःकरणाच्या पैलूत आहे. या बुद्धीला सदैव ध्येयाची आठवण ठेवण्यासाठी ‘निदिध्यास’ म्हणजे परिश्रम करावे लागतात. तात्पर्य, संस्कार होण्यासाठी मनन, चिंतन आणि निदिध्यास’ यांचे साहाय्याने अनुक्रमे मन, चित्त आणि बुद्धी या तीनही पैलूंच्या माध्यमातून अभ्यास करावा लागतो. मानव आणि इतर सजीव योनी यांचेमध्ये प्रमुख फरक असणाऱ्या पैलूंमध्ये मुख्यत्वाने शिक्षण, आरोग्य आणि विवाह या तीन संकल्पना आहेत. मानवाव्यतिरिक्त योनीमध्ये ‘शाळा’ नसतात. त्यामुळे त्यांची ‘स्मृती’ मर्यादित असते. दवाखाना, हॉस्पिटल याही संकल्पना मानवातच आरोग्यरक्षणासाठी आहेत. याचा अर्थ मानव योनीतच आरोग्याच्या स्थितीच्या अनुभूतीमधून व्याधिग्रस्त व्यक्तीविषयीच्या सहानुभूतीमधूनच ‘वैद्यक’ प्रगत झाले. ‘विवाह’ ही संकल्पना ‘मैथुन’ या प्रमुख स्तंभाशी संबंधित आहे. विवाहाच्या माध्यमातून पुढील पिढी मागील पिढीपेक्षा जास्त प्रगत होणे साधते. ‘शिक्षण’ ही संकल्पना संस्काराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची. याच्या सहाय्यानेच बुद्धीला प्रगल्भता येते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाव्यतिरिक्त ‘मानवता’ येण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. असे शिक्षण देण्यानेच बुद्धीचे प्रकर्षात्मक स्वरूप ‘प्रज्ञा’ जागृत होते व ही प्रज्ञा ऋतंभरा अवस्थेपर्यंत जाण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असणे हे योगशास्त्राचे अभ्यासाने शक्य होते; पण सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीची वाढ सर्वसामान्य स्तरावरच असते आणि अशा अवस्थेत सुद्धा प्रगती साधण्यासाठी भारतीय संस्कृतीने उपाय योजले आहेत. त्यांना ‘संस्कार’ म्हणतात. संस्काराचा उपयोग ‘स्मृति-जागृतीसाठी’ आहे. स्मृति-परिशुद्धीतून माणसाच्या हातून घडणारी कर्मे ही जास्त शुद्ध स्वरूपात होतील. हे संस्कार कालसापेक्ष आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत हे शिक्षण चालू राहावे, एवढेच नव्हे तर मृत्यूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपयोगही मानवी उत्क्रांतीसाठी करता येतो. वेदांपासून हे संस्कार समाजात रूढ आहेत. त्यांना रूढी म्हणतात. ते कसे करावे याची एक शिक्षणपद्धती आहे आणि ते शास्त्र मंत्रबद्ध केले आहे. हे मंत्र संस्कृत भाषेत असल्याने सर्वसाधारण माणसाला आकलन होत नाहीत. तसेच सध्याच्या वैज्ञानिक पार्श्वभूमीवर मानवाने केलेल्या प्रगतीच्या चष्म्यातून पाहिल्यास त्याचे महत्त्व कमी झाले आहे आणि हळुहळू भारतीय संस्कृतीमधून हे संस्कार नाहीसे होऊ लागले आहेत. यामुळे भारतात जन्म झालेल्या मानवाची उत्क्रांत अवस्था ढासळू लागली आहे. या संस्कारांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न ‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेने पुढाकार घेऊन केला आहे. भारतीय संस्कृतीत सोळा संस्कारांचे महत्त्व आहे. त्यापैकी नामकरण, विद्याव्रत, विवाह, साठीशांत, सहस्त्रचंद्रदर्शन हे संस्कार जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या आयुष्याशी जोडले आहेत, तर मृत्यूनंतर करावयाच्या संस्कारांना श्राद्ध म्हटले आहे. हे संस्कार मृत पार्थिव शरीरावर करण्याखेरीज मृताशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीवरही करावे लागतात. असे श्राद्ध-संस्कार मृत्युविधीनंतर अकरा दिवसांनी व त्यानंतर दरवर्षी येणारे श्राद्धसंस्कार मृत व्यक्तीच्या वारसांनी करायचे असतात. त्या संस्काराच्या माध्यमातून मृत व्यक्तीविषयी आदर, प्रेम इत्यादी आठवणींना उजाळा देता येतो आणि त्यातूनच स्मृतीमध्ये त्या व्यक्तीचे आदर्श ठेवण्याची प्रेरणा मिळते. या सर्व संस्कारांचे वर्णन ज्ञानप्रबोधिनी संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मराठी माध्यमातून लिखित स्वरूपात त्या साहित्याचे तीन विभाग पडतात. पहिला – मानवी आयुष्यात जिवंतपणी करण्याचे व मृत्यूनंतर करण्याचे असा आहे. दुसरा विभाग देवतापूजनासंबंधी आणि तिसरा वास्तूसंबंधी आहे. या संस्कारांचे प्रयोजन सांगण्यासाठी ‘पाराशर गृह्यमंत्रांचा’ आधार घेऊन संस्काराविषयी कविता दिली आहे. त्याला मानवी जीवनाला आकार देण्यासाठी विविध संस्कार आवश्यक असल्याचे म्हटले आहे. या संस्कारांमध्ये संस्कार ज्या व्यक्तीवर करावयाचे त्याची भूमिका आणि संस्कार करणारी व्यक्ती ज्यांना ‘पुरोहित’ म्हणतात, त्याची भूमिका अशा दोन भूमिका आहेत. ‘पुरोहित’ शब्दाचा अर्थ हितकारक, पुढचा मार्ग दाखवणारा असा करता येईल. याचे शिक्षणही ज्ञानप्रबोधिनी संस्थेने शिक्षणार्थी विद्यार्थी स्त्री-पुरुषांना दिले. या व्यक्ती या संस्कारांचे पौरोहित्य करतात. समाजात सध्या धार्मिक कृत्ये करणारे पुरोहित सहसा ‘श्राद्ध’ संस्कार करण्याचे अनेक कारणांमुळे टाळतात. परंतु ज्ञानप्रबोधिनी-पद्धतीने संस्कार करणारे पुरोहित स्वखुशीने व आनंदाने हे करतात. हे कार्य समाजाभिमुख कार्य आहे. हे करत असताना वेळोवेळी मानवी मनाच्या पैलूंचे दर्शन त्यांना घडले आणि त्यांची हृदये हेलावून गेली. तो अनुभव इतरांनाही कळावा यासाठी हे अनुभव शब्दांकन स्वरूपात या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. या अनुभवातून मानवी ‘मन’ या संकल्पनेचे अनेक ‘भाव’ प्रकट झाले आहेत. वाचकांना आपण ही परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवतो आहोत असे क्षणभर वाटावे असे आहेत. सर्व अनुभवांचे विश्लेषण केल्यास ‘श्राद्ध’ संस्काराविषयीच्या लेखांची संख्या जास्त आहे. त्या मानाने नामकरण, विद्याव्रत, विवाह, साठीशांत, सहस्त्रचंद्रदर्शन या संस्कारांचे अनुभव कमी आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये सामाजिक उत्क्रांती व्हायची असेल तर व्यक्तीच्या बुद्धीची उन्नती झालीच पाहिजे. यासाठी प्रयत्नपूर्वक वर दिलेले संस्कार जास्त होणे आवश्यक आहे. त्यातूनच व्यक्तीच्या बुद्धीची उन्नती होईल. उदा. नामकरण संस्कारात मध आणि तूप एकत्र खलून सोन्याच्या काडीने नवजात बालकाला चाटविणे हा संस्कार अति महत्त्वाचा आहे. यात नवजात बालकाला केवळ आईच्या दुधावर अवलंबून न राहता वनस्पतीचे सारभूत मध आणि

संस्कारांचे पुनरुज्जीवन Read More »