एक अभिनव शैक्षणिक प्रयोग
खंड ४, भाग – ३
प्रस्तावना
‘ज्ञान प्रबोधिनी : एक अभिनव शैक्षणिक प्रयोग’ या नावाचे तीन खंड अनुक्रमे १९७२, १९८० व १९८८ मध्ये प्रकाशित झाले. ग्रामीण जीवन परिवर्तनाचे काम शेती, पाणी, पशुधन, दळणवळण, रोजगार, इत्यादी विषयांमध्ये चालते. यातून ज्यांच्या जीवनात भौतिक परिवर्तन घडते त्यांचे अनुभवशिक्षण होते. त्याचप्रमाणे परिवर्तन घडवून आणणाऱ्या साहाय्यकर्त्यांचेही शिक्षण होते. त्यामुळे ग्रामविकसनाचे काम ज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीने समाजशिक्षणाचे व कार्यकर्ते-प्रशिक्षणाचे काम आहे. ज्ञान प्रबोधिनीद्वारे चालणाऱ्या मनुष्यघडणीच्या अभिनव शैक्षणिक प्रयोगाचे ते अविभाज्य अंग आहे. भौतिक परिवर्तनाचे काम करता करता व्यसनमुक्ती, नीतिमंत श्रीमंती, स्वाभिमान वाढवणारे तंत्रशिक्षण, व्यवस्थापन-कौशल्ये, सचोटीचे राजकारण; व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनातील जबाबदारपणा, जातिनिरपेक्ष गटकार्य, इत्यादी गुणही ग्रामीण किशोर-किशोरींनी, युवक-युवतींनी व गावकीच्या कामात पुढाकार घेणाऱ्या स्त्री-पुरुषांनी स्वतःमध्ये बाणवावेत, असा प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो.
खंड-१ मध्ये एका गावाऐवजी खोरे-विकसनाची योजना व शेतीसंबंधित काही प्रकल्पांची मांडणी केली होती. खंड-२ मध्ये तंत्रशिक्षण, यंत्रोद्योग, औद्योगिक संस्कृती रुजविण्याचे प्रयोग, पाणी प्रश्नावरील काम व सामाजिक अभिसरणाचे प्रकल्प यांची मांडणी केली होती. खंड ३ मध्ये ग्रामीण शिक्षण व ग्रामीण आरोग्यासाठी प्रबोधिनीने चालवलेल्या कामाची मांडणी केली होती. त्यानंतर २५ वर्षांनी हा खंड-४ प्रकाशित करताना ग्रामविकसानाचा भाग स्वतंत्र पुस्तकरूपाने प्रकाशित करत आहोत.
एका नदीचे खोरे म्हणजे एक मोठे पाणलोटक्षेत्रच असते. सुट्या सुट्या विहिरी आणि कूपनलिका, सुटे सुटे छोटे-मोठे बंधारे असा विचार न करता लहान-मोठ्या पाणलोटक्षेत्रांच्या विकासाचे नियोजन करणे, हा गेल्या २५ वर्षांतला मोठा बदल आहे. त्या दृष्टीने केलेल्या कामावरील लेख एका स्वतंत्र विभागात या पुस्तकामध्ये आहेत. ऊर्जा प्रश्न सोडवण्यासाठी ऊर्जेच्या पारंपरिक स्रोतांपलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, ही जाणीव गेल्या २५-३० वर्षांत वाढली आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोतांसंबंधी कामावरील लेखांचाही एक स्वतंत्र विभाग या खंडात आहे. आरोग्य क्षेत्रात कुष्ठरोग निर्मूलनाच्या कामापासून प्रबोधिनीने सुरुवात केली. उपचाराबरोबर आरोग्य-शिक्षण, प्रतिबंधक उपाययोजना, रुग्ण सेवा अशा कामांची गरज जाणवत गेली तशी त्या त्या कामांची भर पडली. त्यावरील लेखांचाही एक स्वतंत्र विभाग केला आहे.
शेती आणि तंत्रज्ञान व उद्योजकता प्रशिक्षणातील अनेक प्रयोग व प्रकल्पांसंबंधीचे लेख दोन स्वतंत्र विभागात दिले आहेत. गेल्या २५ वर्षांत किशोरी, युवती व महिलांचे व्यक्तिमत्त्व विकसनाचे आणि संघटनाचे काम प्रबोधिनीने मोठ्या प्रमाणावर चालवले आहे. स्त्री-शक्ती-प्रबोधन ही प्रबोधिनीच्या कामाची एक स्वतंत्र दिशा ठरवल्यावर हा विस्तार झाला आहे. त्या संबंधीचे लेखही पुन्हा दोन स्वतंत्र विभागांमध्ये दिले आहेत.
ज्ञान प्रबोधिनीचे काम पहिल्या २५ वर्षांमध्ये पुणे जिल्ह्याच्या हवेली, भोर, वेल्हा या तीन तालुक्यांमधल्या शिवगंगा व गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यांमध्येच चालू होते. पण ‘रूप पालटू देशाचे’ हे प्रबोधिनीचे ध्येय असल्याने ‘तामिळनाडूतील हातपंप बसवण्याचे काम’ असे एक निवेदन १९८० च्या दुसऱ्या खंडात होते. गेल्या २५ वर्षांमध्ये जम्मू व अरुणाचल प्रदेशात बचत गट प्रशिक्षणाचे काम झाले. कच्छमधील भूकंपानंतर तिथे एका गावात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम झाले. देशभर जाऊन काम करायचे आहे, ही दृष्टी ठेवून हरियाणा, गुजरात, कर्नाटक इ. राज्यांत हंगामी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रकल्प साखरकारखाने व वीट भट्ट्यांच्या परिसरात चालले. छत्तीसगड व झारखंडमध्ये ग्रामीण शिक्षक प्रशिक्षणाचे काम झाले. यावरील लेख या पुस्तकात नाहीत. पण महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्याबाहेर नंदुरबार, बीड, रत्नागिरी, वाशिम, हिंगोली, उस्मानाबाद व सातारा जिल्ह्यात जाणीवपूर्वक प्रबोधिनीने आपल्या ग्रामीण कामाचा विस्तार करायचा प्रयत्न केला. त्यासंबंधी लेख एका स्वतंत्र विभागात आणि तंत्रशिक्षण, कृषी, आरोग्य या विषयांवरील विभागांमध्येही आले आहेत.
ग्रामीण जीवनाची नियोजित पूर्वमांडणी करणे हे राष्ट्रघडणीच्या कामाचे प्राथमिक व एक महत्त्वाचे अंग आहे असे ज्ञान प्रबोधिनी मानते. यातील भौतिक परिवर्तनाची कामे करता करताच व्यवस्था-परिवर्तन होते. ग्रामीण व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व विकसन, ग्रामीण कार्यकर्त्यांचे प्रेरणाजागरण व कौशल्यविकसन आणि या कार्यकर्त्यांचे नेतृत्वगुण विकसन हे भौतिक व व्यवस्था-परिवर्तनाच्या बरोबरीनेच होईल, असे ज्ञान प्रबोधिनीचे गृहितक होते. गेल्या ५० वर्षांत तसा अनुभवही ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना आला आहे. मनुष्यघडणीच्या निरंतर चाललेल्या अभिनव शैक्षणिक प्रयोगाचे एक प्रयोगक्षेत्र म्हणूनच ज्ञान प्रबोधिनी ग्रामविकसनाच्या कामाकडे पाहते.
या पुस्तकात ग्रामीण युवक-युवतींचे नेतृत्वगुणविकसन यासाठी चाललेल्या प्रकल्पांवरील लेखांचा समावेश व्हायला पाहिजे होता. हे काम अजून प्रयोगावस्थेत आहे. पुढील खंडात त्यावरील कामाचेही निवेदन करता येईल असा विश्वास वाटतो. त्यामुळे ग्रामविकसनाच्या मांडणीला अधिक पूर्णता येईल.
गिरीश श्री. बापट
सौर माघ २६, शके १९३४
दि. १५ फेब्रुवारी २०१३