९ जून २०२५
पर्यावरण परिरक्षणाची वटसावित्रीची पूजा

ज्ञान प्रबोधिनीच्या ‘संत्रिका’ विभागाने संस्कृतच्या प्रसारासाठी जसे प्रयत्न केले त्याचप्रमाणे धर्मनिर्णय मंडळाच्या व प्रबोधिनीच्या ‘कालानुकूल बदलांच्या परंपरेला’ साजेशा अनेक संस्कारांच्या सार्थ पोथ्या तयार केल्या आहेत. त्यायोगे केल्या जाणार्या संस्कारामागचा मूळ अर्थ, मूळ उद्देश सर्वसामान्यांच्या ध्यानात येईल. व्यक्तींनी कोणतीही पूजा अथवा संस्कार त्यामागचा उद्देश समजून करणे महत्त्वाचे असते. अशीच एक पूजा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेला येणारे वटसावित्री व्रत. उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेचे औचित्य साधून संत्रिकेच्या सुवर्ण-महोत्सवानिमित्त सादर होणार्या लेख मालिकेमधील आजच्या लेखामध्ये प्रबोधिनीचे ज्येष्ठ संस्थापक सदस्य, प्रशालेचे पहिले प्राचार्य व नंतर संत्रिकेचे प्रमुख व ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय प्रा. यशवंतराव लेले यांनी केलेल्या वटपौर्णिमेच्या पोथीची प्रस्तावना व वडाच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहे. सध्या या व्रताबद्दल निरनिराळे विचार मांडले जातात परंतु प्रस्तुत लेखातून या विचारांना निश्चितच योग्य दिशा मिळेल.
ज्येष्ठ पौर्णिमेला पतिव्रता सावित्रीने आपला पती सत्यवान याची यमराजाच्या हातून सुटका करून त्याचे प्राण परत मिळवले. हा प्रसंग वटवृक्षाखाली घडला. म्हणून ही पौर्णिमा ‘वटपौर्णिमा’ नावाने ओळखली जाते, तसेच या पौर्णिमेला केल्या जाणार्या व्रताला ‘वटसावित्री व्रत’ म्हणतात. परंपरेने चालत आलेल्या वटसावित्रीच्या पूजेत पाटावर वटवृक्ष, सावित्री, सत्यवान यांचे चित्र काढून त्याची यथासांग पूजा करण्यास सांगितले आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचीच पूजा करणे हे उत्तम ! थोडे दूर जावे लागले तरी प्रत्यक्ष वटवृक्षाची हवा घ्यावी. वडाच्या फांद्या तोडून त्या फांदीची पूजा करण्याची पद्धत कधी, कोणी सुरू केली ते माहीत नाही. पण आज अनेक शिक्षित महिलाही या पद्धतीने वडाच्या फांदीची पूजा करताना दिसतात. याचे कारण धर्माचे रहस्य हरवले आहे. सावित्री ही रत्नपारखी आहे. तिने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप अन् देवगुरू यांच्या सूचनांकडे लक्ष न देता माळ घातली. या तिच्या कृतीतून केवढा आत्मविश्वास व्यक्त होतो ! पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम ती आपल्या पर्यावरणाच्या ज्ञानाने, चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने करून दाखवते याचे विस्मरण होऊन षोडशोपचार पूजा यथासांग केली तरी त्या पूजेने काय साधेल? खरी पूजा म्हणजे काय ते आपण समजावून घेतले पाहिजे.
पूजा म्हणजे काय ? – ‘पूजा’ हा शब्द वेदात नाही. तो शब्द तमिळ असावा. ‘पू’ म्हणजे फूल व ‘जा’ हा प्रत्यय ‘कृती’ अशा अर्थाचा आहे. ‘फुलाने करावयाची कृती म्हणजे पूजा.’ ज्यांच्याबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात त्या फुलाच्या समर्पणाने व्यक्त करणे म्हणजे पूजा करणे.
ऋर्षांनी आपल्याला आज्ञा दिली आहे. ‘मातृदेवो भव ।’ आईला देव मानणारे असे व्हा. ‘पितृदेवो भव।’ वडिलांना देव मानणारे असे व्हा. ‘आचार्यदेवो भव ।’ गुरुला देव मानणारे असे व्हा. ‘राष्ट्रदेवो भव ।’ राष्ट्राला देव मानणारे असे व्हा. म्हणजेच या सर्वांची आदराने पूजा करा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागा. फक्त माणसांचीच नाही तर पशुपक्षांचीही आपल्याकडे पूजा केली जाते. तसेच निर्जीव वस्तूंचीदेखील आपण पूजा करतो. आपली रोजच्या वापरातील वाहने, यंत्रे या सर्वांची पूजा करतो. आपल्याला सेवा देणाऱ्या सर्व वस्तूंची, व्यक्तींची आपण काळजी घेणे, त्यांची स्वच्छता, शोभा, उपयुक्तता टिकेल, वाढेल अशी कृती करणे हाच पूजेचा खरा अर्थ आहे.
याबरोबरच ‘वृक्षदेवो भव’ असेही म्हणता येईल. म्हणजेच वृक्षाला देव मानणारे असे व्हा. जो आपल्या दिव्य गुणांचे व सामर्थ्याचे दान करतो तो देव. वृक्ष हे खरोखरीच सत्पुरुष वा देव आहेत असे एका सुभाषितात म्हटले आहे.
छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे । फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव ।।
जे स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्यांना सावली देतात. ज्यांची फळेदेखील दुसऱ्यांकरिता असतात असे वृक्ष म्हणजे सत्पुरुषाप्रमाणेच आहेत. वृक्षाचा हा दातृत्वाचा गुण आपण घेतला पाहिजे. तो आपल्या आयुष्यात उतरवला पाहिजे. म्हणूनच याच भावनेने आपण वडाची पूजा करावी. वडाला पाणी घालणे, प्रसंगी पार बांधून त्याचे रक्षण करणे, पोषण करणे म्हणजेच पूजा.

वडाचे महत्त्व
प्रतिवर्षी देशभर सर्व भगिनींनी एकेक वडाचं रोप लावून ते वाढवत राहण्याचे संकल्प केले तर हा देश संपन्न देश होईल यात संदेह नाही. कारण, वडाचे महत्त्वच तसे आहे. नीट ऐका ! कलकत्ता विद्यापीठातला डॉक्टर दास हा मोठा प्राध्यापक. त्यानं वडाचाच अभ्यास केला. कितीतरी वर्ष त्यानं खूप मोजदाद केली. बागेतल्या भल्यामोठ्या वडाचं वय ठरवलं, पन्नास! पन्नास वर्षात त्यानं किती पानं, फळं गाळली असतील त्याचं गणितही मांडलं. त्यामुळे खताचे रूपाने शेतीचा किती लाभ होतो ते पाहिलं. अहो ! अडीच लाखांचं खत त्या एकट्या वडानं आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात शेतीला दिल्याचं दिसलं.
दवाखान्यात रोग्याच्या नाकातोंडात नळ्या घातलेल्या आपण पाहातो. त्यातून प्राणवायू पुरवण्यात येतो. भारी पैशाचं काम असतं ते ! पण आपल्याला फुकटात प्राणवायू देणाऱ्या झाडाचं- वडाचं आपल्याला कुठे ज्ञान आहे ? वडापिंपळाची झाडं तर खूपच प्राणवायू देतात. त्या डॉक्टर दासांनी त्याचाही हिशोब केला आणि ते म्हणतात की पन्नास वर्षात एका वटवृक्षानं दिलेल्या प्राणवायूचं मोल भरतं अडीच लक्ष रुपये !
आपण प्राणवायू घेऊन नाकावाटे बाहेर टाकतो तो खराब झालेला वायू ! तो आसपासची हवा खराब करणारा प्राणिमात्रांनी सोडलेला वायू ही झाडं खातात अन् वाढत राहतात ! वातावरणाच्या स्वच्छतेचं हे केवढं काम वडासारखी झाडं करत असतात त्याचं तर आपल्याला भानच नसतं ! जिथं झाडं नाहीत आणि गाड्यामोटारीतून असाच खराब वायू सारखा बाहेर पडत राहतो तेथे तो माणसाच्या नाकावाटे त्याच्या छातीत जाऊन कर्करोगासारखे रोग होत आहेत आणि म्हणून काही माणसं नाकाला गाळणी लावून फिरताना दिसत आहेत. खेडेगावांत गिरण्या नाहीत, गाड्या नाहीत त्यामुळे तेथे बरे आहे. हवा ताजी आहे. शुद्ध आहे. पण ध्यानात ठेवा घराघरातून चुलींचा धूर येतो. प्राणिमात्रांनी वापरलेला खराब वायू त्यात मिसळतो. तरीही तेथली हवा ताजी राहते ती या वडासारख्या थोर वृक्षांमुळे ! वडाच्या या कामाचं मोल किती ? डॉक्टर दास यांच्या गणितानुसार पन्नास वर्षात पाच लाख रुपयांचं हवा शुद्धीचं काम एक वडच करू शकतो ! एका वटवृक्षाचे आपल्यावरील उपकार केवढे ! पन्नास वर्षात प्राणवायू, खत आणि हवेचे शुद्धीकरणाद्वारा त्यानं केलेल्या सेवेचं मोल झालं दशलक्ष रुपये ! १० लाख !
आकाशातून धावणाऱ्या ढगांमधील पाणी खेचून घेण्याचं कामही हे वृक्ष करत असतात. त्यायोगे पाऊस येतो याची किंमत किती ? फांद्या, पारंब्यांतून मिळणाऱ्या लाकूडफाट्याची किंमतही थोडी नाही. धूप थांबवून मातीचं रक्षण करण्याचं मोल काय ? उन्हाळ्यात हवेत आर्द्रता सोडून गारवा आणण्याच्या त्याच्या कर्तबगारीची किंमत किती? असं सारं काम जमेस धरलं तर एक वडाचं झाड पन्नास वर्षात आपली पंधरा लाख रुपयांची सेवा करतं ! असा लाख मोलाचा वृक्ष तोडायचा म्हणजे महापातक नव्हे का?
हे व्रत जरी स्त्रियांसाठी असले तरी सर्वांनीच वडाकडं पहावं ते वैद्य म्हणून! त्याची कोवळी पानं, खडीसाखर आणि पळसाचा डिंक, वेलदोडा नि वंशलोचनासह गाईच्या दुधातून घ्याल तर धूपणीचा त्रास जाईल! मूळव्याध असो की इसब! पिकलेली पानं जाळून, ती राख तेलातून लावल्यास गुण हमखास! पक्षांना आवडणारी याची लालबुंद फळं आपणही खाल्ली तर कफापित्ताचा निकाल ठरलेला! पारंब्यांचे अंकुर वाटून पोटात घेतले की जंताचा निकाल! जखमेवर चोळताना, दातदुखीवरही चीक चालतो. आणखी एक वडाचा गुण! त्याच्या पारंब्यांचे कोवळे कोवळे अंकुर वाटून तुपात खाल्ल्याने वंशाला अंकुर फुटतो असंही म्हणतात ! (कृपया जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.) गावागावातला हा फुकटचा वैद्य! त्याला जवळपासच, घरासमोर अंतरावर जागा द्यावी. छान पार बांधावा, याचा वारा घ्यावा, याच्या छायेत बसावं, पोरांनी याच्या अंगाखांद्यावर सूरपारंब्या खेळाव्यात, गुरावासरांनी याच्या गारव्याला बसावं ! हा यज्ञीय वृक्ष आहे. लग्न लावताना होमात याच्या काड्या अग्निदेवतेला अर्पण करायच्या असतात. त्यांना समिधा म्हणतात.
असं किती सांगावं वटमहात्म्य ! याची गरज कधी न सरो नि हा वैद्य कधी न मरो !
वटसावित्रीची पूजा पोथीची pdf फाईल सोबत जोडली आहे.