विवेक गिरीधारी
दुष्काळाची परिस्थिती व तीव्र पाणी टंचाई असणाऱ्या अन्य गावांची परिस्थिती यात खरे तर फारसा फरक नसतो. उन्हाळा चालू झाला की पाणी टंचाईच्या झळा अनेक गावांमध्ये जाणवायला सुरुवात होते. उन्हाळ्यातल्या शेवटच्या एप्रिल व मे या दोन महिन्यांत तर पाणी टंचाईची भीषणता तीव्र असते. गावातील विहिरीत पाणी नसले तर शेजारच्या गावातून किंवा जवळपासच्या डोंगर-दऱ्यातील झऱ्यातून हंडाभर पाणी आणायला बाया-बापड्यांची भटकंती चालू होते. यात लहान मुले, वयोवृद्ध मंडळी यांचाही भरणा असला तरी घरात पाणी आणण्याची जबाबदारी मात्र महिलांचीच असते. आधुनिकीकरणाच्या काळात शहरी महिला घरातील कामे झटपट आवरून बाहेरची कामे, कार्यालयीन कामकाज समर्थपणे हाताळत आहेत, तर दुसरीकडे खेड्यातील महिलांची हंडाभर पाण्यासाठी चाललेली वणवण, भटकंती हे वास्तव पण विरोधाभासाचे विदारक चित्र आहे.
प्रबोधिनी गेली अनेक वर्षे या परिस्थितीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहे. भोर, वेल्हे आणि हवेली या तालुक्यात दरवर्षी तीव्र पाणी टंचाई जाणवणारी ठराविक गावे आहेत. यापैकी काही गावांना तर टँकरद्वारे पाणी पुरवठाही होत असतो. यापैकी काही निवडक गावांमध्ये प्रबोधिनीतर्फे विहीर खोल करणे (Well Deepening) आणि झरे विकास (Spring Development) अशा दोन स्वरूपाची कामे २००५ पासून हाती घेण्यात आली.
विहिरी खोल करण्याचा कार्यक्रम (Well Deepening):
वर्षागणिक वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे गावातील सार्वजनिक विहिरीतील पाणी गावासाठी अपुरे पडत आहे. त्यामुळे पूर्वी सर्व गावाला पुरून उरणारे पाणी आता मात्र झटपट संपते. यावर एकमात्र उपाय म्हणजे विहिरीची पाणी साठवण्याची क्षमता वाढविणे. ही क्षमता वाढविण्यासाठी विहिरीची खोली वाढविणे गरजेचे असते. भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणून त्यातून निघालेली दगड-माती यंत्राद्वारे वा मनुष्य शक्तीद्वारे विहिरीबाहेर काढणे असे या उपक्रमाचे स्वरूप असते.
विहीर खोदाई कार्यक्रमात पूर्ण झालेली कामे
अनु.क्र. | तालुका | गावे |
१ | हवेली | कल्याण |
२ | -ll- | सणसवाडी |
३ | -ll- | कोंढणपूर |
४ | -ll= | शिवापूर |
५ | भोर | ससेवाडी |
६ | -ll- | वस्त्रे (बु) |
७ | -ll- | कुसगाव |
८ | -ll- | कासुर्डी |
अशा स्वरूपाची कामे प्रबोधिनीने प्रथम शिवगंगा खोऱ्यातील कल्याण गावात १९६५ ते १९६९ मध्ये केली. त्यापाठोपाठ १९७२ च्या दुष्काळाच्या सुमारासही अन्य गावांमध्ये ही कामे केली. १९८८ मध्ये एकाच वर्षात ६ गावांमध्ये या स्वरूपाची कामे केली. यातील बहुतेक ठिकाणी ग्रामस्थांनी दगड-माती काढण्यास मदत केली. माल काढणाऱ्या यंत्रात (यारीत) दगड-माती भरण्यासाठी ग्रामस्थांनी आळीपाळीने श्रमदान केले. या गावांचा तपशील सोबत जोडला आहे
याशिवाय २०१३ मधील दुष्काळी परिस्थितीत कुसगाव (ता. भोर) येथील चोरमले वस्ती व वरोती (ता. वेल्हे) या दोन ठिकाणी टाटा मोटर्सच्या सुमंत मुळगावकर फाऊंडेशनच्या आर्थिक सहाय्यातून विहीर खोल करण्याचे काम हाती घेण्यात आले. चोरमले वस्तीतील धनगर समाजाला याचा विशेष लाभ झाला.
याशिवाय वरोती (ता. वेल्हे) येथे जुनी विहीर पाडून तिचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. वरोती बु. ।। येथील ग्रामस्थांनी विहिरीच्या कामासाठी उत्स्फूर्त श्रमदान केले. सतत चार दिवस गावातल्या ६० व्यक्तींनी श्रमदानाने विहिरीतील गाळ उपसून विहीर साफ केली. याशिवाय विहिरीपर्यंतचा रस्ता व गाळ काढण्यासाठी ग्रामस्थांनी स्वखर्चाने १५ तास जेसीबी यंत्र चालविले.
परिणाम :
या उपक्रमातून विहिरींचा व्यास सुमारे ३० फूट करून त्यांची खोली आहे त्यापेक्षा सरासरी किमान ६ ते १० फुटांपर्यंत नव्याने वाढली. यातून विहिरीत अधिक पाणीसाठा होण्यास मदत झाली. काही ठिकाणी नवे झरे मोकळे झाल्याने पाणी वाढले. याचा सकारात्मक परिणाम प्रामुख्याने तीव्र पाणीटंचाईच्या काळात म्हणजे एप्रिल व मे महिन्यात खऱ्या अर्थाने जाणवला. यातून माणसांसाठी व जनावरांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले.
झरे विकास कार्यक्रम (Spring Development) :
दुर्गम व डोंगराळ भागातल्या पाणीटंचाईची तीव्रता तर सर्वसामान्य गावापेक्षाही भयंकर असते. तीव्र चढामुळे व पक्क्या रस्त्याअभावी या वाड्या-वस्त्यांपर्यंत तर उन्हाळ्यात टँकरही पोहोचू शकत नाही. डोंगरभागातील अशा वस्त्यांना उन्हाळ्यात थेट डोंगर उतरून ओढ्यातून पाणी आणण्यासाठी जीवघेण्या खेपा मारायला लागतात. हंडाभर पाणी ओढ्यातून डोंगरावरील टेकाडावरील गावात घेऊन जाणे हे कमालीचे दमछाक करणारे व जिकिरीचे असते.
वेल्हे तालुक्यातील तोरणा व रायगड किल्ल्यांच्या परिसरातील डोंगराळ भागातील काही गावात आजही पाण्याबाबतची ही हलाखीची परिस्थिती आढळून येते. या गावांमध्ये पाणी प्रश्नाबाबत ग्रामस्थांसोबत चर्चा करताना असे लक्षात आले की काही गावांमध्ये पाण्याचे जिवंत झरे आहेत की जे पावसानंतर होळी अथवा अक्षय्यतृतीयेपर्यंत चालू राहतात. या झऱ्यांचे पाणी जर नीट साठविण्याचा प्रयत्न केला तर या छोट्या वाड्या-वस्त्यांचा पाणीप्रश्न निश्चितपणे सुटू शकतो. किमानपक्षी टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होते.
वेल्हे तालुक्यातील वरोती (खुर्द) या गावात २००६ मध्ये प्रबोधिनीने अशा स्वरूपाचे काम प्रायोगिक स्वरूपात प्रथम केले व त्यातून पाणीप्रश्न हमखास सुटू शकतो हे लक्षात आले. पुढे या गावापाठोपाठ ग्रामस्थांच्या मागणीवरून अन्य सहा गावांमध्ये यशस्वीरित्या हा उपक्रम घेण्यात आला. या प्रत्येक गावात भूसुरुंगाच्या स्फोटानंतर निघालेली दगड-माती स्थानिक ग्रामस्थांनी पूर्णतः श्रमदानातून काढली हे विशेष! इतक्या दुर्गम भागात भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणणारा ट्रॅक्टर मिळविणे हेसुद्धा जिकीरीचे काम होते. गेळगाण्यासारख्या गावात तर चक्क हातसुरुंगाद्वारे काम करण्यात आले. प्रबोधिनीने फक्त सुरुंगाच्या स्फोटासाठीच्या खर्चाची तरतूद विविध देणगीदारांच्या मदतीतून ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली. आर्थिक देणग्यांमध्ये प्रबोधिनीच्या १९९९ च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग सातत्यपूर्ण आहे. झरे विकासाच्या एका कामातील भूसुरुंगाच्या स्फोटाचा खर्च पन्नास हजारापर्यंत येतो.
श्रमदानाने आमच्या गावाचा पाणी प्रश्न आम्ही स्वतः एकत्र येऊन शासनाच्या मदतीशिवाय अथवा पुढाऱ्याच्या मदतीशिवाय आमचा आम्हीच सोडवला, याचे गावाला वाटणारे अप्रूपही मोठे असते हे या निमित्ताने लक्षात आले. या सर्व कामात पुढाकार घेण्यात व प्रत्यक्ष श्रमदानात महिलांचा वाटा लक्षणीय असतो.
अनु.क्र. | गावे |
तालुका – वेल्हे | |
१ | गेळगाणे |
२ | वरोती खुर्द |
३ | केळद – मधली वाडी |
४ | वरोती बु. |
५ | डोपेखिंड (पासली) |
६ | धुमाळ वस्ती (पासली) |
७ | माजगाव (पासली) |
८ | कोंढाळकर वस्ती |
९ | निवी |
१० | कोळवडी तालुका – भोर |
११ | कुसगाव |
परिणाम :
प्रत्येक गावातील झऱ्यापाशी सुमारे १० ते १५ फूट खोलीचे व साधारण २५ फूट व्यास असलेले साठवण टाके झऱ्याचे पाणी साठवण्यासाठी या उपक्रमातून तयार झाले आहे. या टाक्याची क्षमता किमान ५० हजार ते ७५ हजार लिटर इतकी आहे. यातून उन्हाळ्यात बायकांची होणारी वणवण भटकंती काही गावात पूर्णतः थांबली आहे.
संघटित प्रयत्नांनी आपला पाणी-प्रश्न आपण सोडवू शकलो हा आत्मविश्वास या छोट्या वाड्या-वस्त्यांमध्ये निर्माण झाला हे सामाजिक भानही प्रासंगिक असले तरी महत्त्वाचे आहे.
******************************************************************************************************************