एक तत्त्व नाम दृढ धरी मना – अभंग क्रमांक – ३

एक तत्त्व नाम दृढ धरी मना

एक तत्त्व नाम दृढ धरी मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥ ध्रु ॥
ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥ २ ॥
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणी ॥३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥ ४ ॥

वारकरी पद्धतीच्या भजनाची सुरुवात पंचपदीने होते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हा श्लोक, जय जय राम कृष्ण हर हा नाम गजर, रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग आणि जय जय विठ्ठल रखुमाई हा नाम गजर अशी पंचपदीची साधारण रचन नसते. आधी विठ्ठलाचे रूप दिसते. शेवटी विठ्ठलाचे ध्यान लागले पाहिजे. रूपाकडून ध्यानाकडे जाताना मध्ये नामाचा आधार घ्यावा लागतो. या अभंगात नामाच्या आधाराने ध्यानापर्यंत जाण्यासाठी काय करावे लागते हे सांगितले आहे. ज्ञानदेवांच्या हरिपाठात अठ्ठावीस अभंग आहेत. त्यातला हा सव्वीसावा अभंग.

एक तत्त्व नाम दृढ धरी मना

तत् म्हणजे ते. त्व म्हणजे पणा. तत्त्व म्हणजे ते पण. कोणत्याही गोष्टीचा सार भाग. ज्याच्यामुळे एखाद्या गोष्टीची ओळख पटते ते तत्त्व. विश्वाचे तत्त्व कोणते ? याचा शोध अनेक जणांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्रज्ञांनी आपल्या पद्धतीने शोध घेतला आणि साऱ्या विश्वाचे तत्त्व म्हणजे एक वैश्विक ऊर्जा असे निश्चित केले. अनेक संतांनी आणि ऋषी मुनींनी आपल्या पद्धतीने शोध घेतला आणि साऱ्या विश्वाचे तत्त्व म्हणजेच जिच्यामध्ये जाणीव शक्ती आहे आणि जी आनंदस्वरूप आहे अशी वैश्विक ऊर्जा असे निश्चित केले. हा अभंग ज्या काळात प्रबोधिनीत मला ऐकायला मिळाला त्याच वर्षी कधीतरी एका कीर्तनकारांनी प्रबोधिनीत केलेल्या कीर्तनात एकनाथांच्या अभंगातली एक छान ओळ कीर्तनाच्या ओघात सांगितली – ” आधी कोठेचि नव्हते काही। चंद्र सूर्य तारा नाही । अवघे शून्यचि होते पाही । कान्होबा ते रे ते रे ते ” एका ओळीत संतांनी ते तत्त्व कोणते ते सांगून टाकले आहे. जेव्हा काहीच निर्माण झाले नव्हते तेव्हा जे तत्त्व अस्तित्वात होते ते साऱ्या विश्वातले एकमेव मूळ तत्व. या तत्त्वाला ‘ते रे ते रे ते’ असे प्रत्येक वेळी कुठे म्हणणार ? म्हणून त्याला काहीतरी नाव दिले पाहिजे. त्या तत्त्वाला सर्वसामान्य लोक रोजच्या भाषेत देव म्हणतात आणि त्या देवाचे नाव म्हणजे नाम. ते तत्त्व कोणते आहे? कसे आहे ? हे कळेपर्यंत त्याचे नावच आपल्या आवाक्यातले आहे. म्हणून ते घट्ट धरून ठेव असं ज्ञानदेव पहिल्या चरणात आपल्या मनालाच सांगतात.

हरीसी करुणा येईल तुझी

आपल्याला आधी आनंदाची जाणीव होते आणि मग विचारांची जाणीव होते. आपल्यापेक्षा कोणामध्ये आनंद कमी असला तर त्याचीही जाणीव होते आणि त्याच्यामधली आनंदाची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला विचार करायच्या आधीच धावून जावेसे वाटते. ते वाटणे आणि धावणे म्हणजे करुणा. सर्वसाधारण लोक करुणा म्हणजे दया असे म्हणतात. पण मी करुणेचा विचार करत असतो तेव्हा मला करुणेची अनेक रूपे दिसतात. करुणा म्हणजे काय ? करुणा म्हणजे सामाजिक जाणीव. करुणा म्हणजे आपल्या वाटचे इतरांसाठी सोडणे. करुणा म्हणजे संवेदनशीलता. करुणा म्हणजे इतरांसाठीची धडपड. करुणा म्हणजे इतरांचे प्रश्न पाहून स्वतः ते सोडवायला धावणे. करुणा म्हणजे भवतालचे दारिद्य, अज्ञान, दुर्बलता, असहायता पाहून आपण ते दूर करायला पुढे होणे. करुणा म्हणजे रांगेच्या शेवटी जाऊन थांबण्याची तयारी असणे. करुणा म्हणजे स्वतः उभे राहून इतरांना बसायला देणे. करुणा म्हणजे रुग्णाची सेवा. करुणा म्हणजे जे भीतीने बोलत नाहीत त्यांच्या मनातले ओळखणे.

करुणा म्हणजे हातातले काम सोडून मदतीला धावणे. करुणा म्हणजे अन्यायाला वाचा फोडणे. करुणा म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध उभे राहणे. करुणा म्हणजे इतरांच्या हितसुखामध्ये स्वतःचे हितसुख पाहणे. जगाचे मूळ तत्त्व जाणीवयुक्त आणि आनंद स्वरूप आहे असे संतांनी शोधून काढले आहे. ज्याने नाम दृढ धरून ठेवले आहे आणि त्याच्या मदतीने जो त्या तत्त्वापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे त्याला अर्थातच ते तत्त्व अजून सापडायचे आहे. म्हणजे त्याला खरा आनंद अजुन सापडायचा आहे. पाणी जसं उंचावरून खाली वाहत जाते तसा आनंद-स्वरुप हरि आनंदस्वरुप तत्त्वाचा शोध घेणाऱ्या व्यक्तीकडे त्याच्यामधला आनंदाचा खळगा खणून काढण्यासाठी सहज जाईल असे ज्ञानदेव या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात.

ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥

त्या एका तत्वाचे नाव इतके सोपे आहे की त्याला हाक मारतो आहे एवढे समजले तरी पुरे. त्याचा कसाही उच्चार झालेला चालेल. त्यामुळे हरी ऐवजी राम, कृष्ण, गोविंद काहीही म्हटले तरी चालेल. नाव कोणते आहे यापेक्षा ते नाव त्या एका मूळ तत्त्वाला उद्देशून आहे एवढे असले म्हणजे झाले. नामाच्या साहाय्याने तत्त्वापर्यंत पोहोचण्याची सर्व तळमळ तुम्ही हे नाव कसं उच्चारता यातून व्यक्त मात्र झाली पाहिजे. सद्गद म्हणजे तुमच्या जिभेबरोबर सगळं शरीरच ते नाव घ्यायला लागले. याला शरीरामध्ये सत्त्विक भाव जागृत होणे असं म्हणतात. नामाचा उच्चार किंवा जप करता करता कपाळावरती घामाचे थेंब तयार होणे, अंगावरचे केस उभे राहणे, डोळे अश्रृंनी भरून जाणे, गळा भरून येऊन आवाज बदलणे, शरीराला कंप सुटणे अशी लक्षणे जप करताना अंगावरती दिसणे म्हणजे सद्गद होऊन जप करणे. हरिदर्शनाची ओढ वाढली, त्यामुळे व्याकुळता आली की वाणी सद्गद होते.

नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा

विश्वाच्या मुळाशी असलेले एक तत्त्व कोणते आहे याचा फार विचार न करता ते नामच तत्त्व आहे असं मानणे म्हणजे नामापरते तत्त्व नाही असा दृढ निश्चय करणे. हे नामच मला त्या तत्त्वापर्यंत घेऊन जाईल असा विश्वास असला की मग शोधाशोध थांबते. त्यामुळे त्या तत्त्वापर्यंत पोहोचण्याचा नामजप करण्याशिवाय आणखी कोणता मार्ग आहे याची चौकशीही करू नकोस असं ज्ञानदेव सांगतात. वाया म्हणजे विनाकारण. जाशी झणी म्हणजे जाऊ नकोस. अन्यथा तत्त्व म्हणजे दुसरे किंवा वेगळे तत्त्व. नामापरते अन्यथा तत्त्व नाही रे आणिक पंथा वाया जाशी झणी अशी या दोन चरणांची दोन सरळ वाक्ये होतात.

श्रीहरिच जप करेल

चौथ्या कडव्यातील दोन चरणांचा साधा सरळ अर्थच सर्व लोकांनी सांगितला आहे. सुरुवातीला मोठ्याने उच्चार करत, सद्गद होऊन जप करणारे ज्ञानदेव हळूहळू फक्त स्वतःला ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात जप करू लागले आणि शेवटी ओठाची, जिभेची हालचाल पूर्ण थांबली. बाहेरून ज्ञानदेवांचे पूर्ण मौन आहे असे दिसू लागले. परंतु मनातल्या मनात जणू काही जपमाळ हातात घेऊन ज्ञानदेवांचा हरि नामाचा जप सतत चालू आहे. नामाचा जप एक तत्त्व सापडेपर्यंत केला पाहिजे. त्यामुळे बाहेरून मौन असले तरी तो जप  सतत चालू राहूदे असं ज्ञानदेव स्वतःचे उदाहरण देऊन सांगतात.

हा अर्थ योग्यच आहे. परंतु मला त्याच्या पुढचा आणखी एक अर्थ सुचतो. तो मला अजून कुठे वाचायला मिळालेला नाही.  जगाच्या मुळाशी एकच तत्त्व असेल तर वेगळे ज्ञानदेव कुठून असणार? आणि ज्ञानदेवांना जर ते तत्त्व सापडलं असेल तर ज्ञानदेव जप कोठून करणार? म्हणून ज्ञानदेव मौन झाले. पण ते मूळ तत्त्व अत्यंत ऊर्जास्वरूप असल्यामुळे ती ऊर्जा सतत स्पंदन करत असणार. त्याचे वर्णन कसे करणार? तर  ज्ञानदेव मौन आहेत आणि त्यांच्या आतमध्ये ते तत्त्व म्हणजे श्रीहरी जणू काही जपामाळ हातात घेऊन स्वतःच स्वतःच्या नावाचा जप करत आहे. ज्ञानदेव त्या तत्त्वामध्ये मिसळून गेले आहेत अशी स्थिती जेव्हा येईल तेव्हाच ज्ञानदेवांना तत्त्व सापडले आणि तेव्हा ‘श्रीहरी जपे सदा‘ आणि ‘ज्ञानदेव मौन‘ अशीच स्थिती असेल. ही नुसती कल्पना झाली. तसे आहे का? किंवा होईल का? हे आपण आपल्या मनाला ‘एक तत्त्व नाम दृढ धरी‘ हे बजावले तरच कळेल.

गिरीश श्री. बापट