झाल्या झाल्या लगनावेला (भाग २)

लेख क्र. २५

२९/६/२०२५

मागील भागात वारली लोकांची लग्न ठरविण्याची अनोखी पद्धत बघितली. लग्नाआधीची नैसर्गिक वस्तूंनी मांडव घालणे, नैसर्गिक देवतांना आवाहन करणे अशा विधी बघितल्या. आता या भागात लग्नाचा मुख्य दिवशी होणार्‍या विधी सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने त्यांची मंगलाष्टके, वरात, गृहप्रवेश या विधी आहेत. वारली लोकांच्या ह्या लग्नविधीतून शहरी माणसांनासुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे.

दुसरा दिवस – लग्नाचा मुहूर्त साधारणतः दुपारी तीन किंवा संध्याकाळी सातचा असतो. पण या वेळेचं बंधन तसं जाचक मानलेलं नसतं. लग्नसमारंभाच्या निमित्ताने सगळे लोक एकमेकांना भेटतात, गप्पा मारता-मारता, हसता-खिदळता वेळेचं भान फारसं कुणाला नसतं. लग्नाची सारी तयारी पूर्ण झाली की मुलीच्या घरासमोरच्या मंडपात लग्न लागते. ‘धवलेरी’ उत्तर-दक्षिण आंतरपाट धरतात, पूर्वेला नवरी आणि पश्चिमेला नवरदेवाला उभे करतात. नवरा-नवरी दोघांची एकत्रित ओंजळ करून ही ओंजळ तांदुळाने भरतात. त्यावर नागवेलीचं पान ठेवून वर बंदा रुपया व सुपारी ठेवतात. याला ‘ओजूर भरणे’ असे म्हणतात. संपूर्ण लग्न लागेपर्यंत बिच्चारे नवरा-नवरी असे उभे राहतात.

लग्न लावतांना धवलेरी जी गाणी म्हणतात ती बोली भाषेतीलच असतात, हे सुद्धा एक वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. या गाण्यात सर्व देवांना ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’ असं आमंत्रण असतं. एक साधं सुताचं ‘मंगलसूत’ नवरीच्या बाशिंगावर टाकतात. हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन धवलेरी उदक सोडतात आणि लग्न लागायला सुरुवात होते –

देवानं घेतल्या तिक्याच्या (पोलादी) कुर्‍हाडी, देव गेला कनघर (खडकाळ कडा) डोंगरा ………. देव गेला घरामाले, रिसले (उरलेले) अंगणी दिले टाकुनी॥

आंना आना गाईची शेनं, सारवन घाला। आना आना कंके (दगड) पेठा (पीठ/रांगोळी), चिमटी धरून चौक (नक्षीदार रांगोळी) काढा॥ त्यावर ठेवा चंदन पाटो॥

त्यावर ठेवा तिलचांदोल (तीळतांदूळ), त्यावर ठेवा रोकड दाम। सर्वासनी बोलवा आंजुली भराया, त्यावर ठेवा नागवेली पाना॥

त्यावर ठेवा शेकडं दाम, त्यात ठेवा तिकाच्या (पोलादी) सपऱ्या (सुपाऱ्या) वरतं टाका मंगलसूता।।

झाल्या झाल्या लगनावेला, नाहीर झाल्या लगनावेला, लगीन आला पंधरा घड्यांवर

यापुढली सारी कडवी वरच्याप्रमाणेच आहेत. त्यांची गाण्याची पद्धतही बरीच एकसुरी आहे. ‘धवलेरी’ सर्व देवांना बोलावतो आहे आणि देव ‘आम्ही लग्न लावत नाही’ असं सांगत आहेत. त्यानंतर धवलेरी देवांना आसनांवर बसायला सांगतो. या देवाच्या जंत्रीत जुगनाथदेव (जगन्नाथ), उगशरदेव (ढग), पावश्यादेव (पाऊस), वावधीवारा (वाद‌ळी वारा), चंदरसूर्य, सट्टाईमाऊली, वरमादेव (नदी), हिमाईदेवी, रामलक्षिमन, जनकीशीता, जर्‍ह्यादेव (झरा), सोलासरनी (पाट), बत्तीसपोह्या (तलाव), धुरपापत (धबधबा), पाची पांडव, लक्कचा रावन, मंडोधरी (मंदोदरी), चिडोणादेव (मुंज्या), गावचा काठ्या (कोतवाल), गावचा पाटील, सरपंच, गावचा भगत, गावची सुईण अशा सर्वांना ह्या पंधरा घड्यांपासून सुरुवात करून एक घडीवर लग्न येऊन ठेपेपर्यंत बोलावण्यात येतं. लग्न एक घडीवर आल्यावर मात्र धवलेरी सर्वांना ‘सावधान’ राहण्याची सूचना देतो.

लगीन आला येक घड्यांव, बंदाराहो (बंदूकवाले) शाबित रहा …. मेलकऱ्याहो शाबित रहा, येक घडी मोडावी, नवरा नवरी जोडावी॥

कोन देव बोलवा, पलुशा बामन बोलवा ……….. काली गाठी पांढरी पाती (दोरी), सुवा लग्न होंपने (शुभ लग्न होत आहे)!

असं शुभ लग्न सावधान होताच आधीच शाबित राहिलेले बाजावाले आणि नेमबाज कडकडाट सुरु करतात. अंतरपाट दूर होऊन नवरा-नवरींच्या जागेची अद‌लाबदल होते. इतका वेळ नवरा-नवरीने एकमेकांची ओंजळ धरलेली असते. ही ओंजूर सोडविण्यासाठी गावचा सरपंच, पाटील, कोतवाल यांना धवलेरी बोलवितो. ही ओंजळ सोडविल्यानंतर नवरा आणि नवरीला कडेवर घेऊन ताशाच्या तालात नाचवलं जात. सर्वप्रथम हा मान मामाचा असतो, मग होशी मित्र मैत्रिणींचा! नवरा-नवरीच्या कमी वयामुळे हे नाचवणं बहुधा कुणाला फारसं ‘जड’ जात नाही.

नाचवून झाल्यावर नवरीला घरात नेतात. तिची साडी बदलून नवी हिरवी साडी नेसवतात. तिला ओवाळून ती आरती घराच्या दारात ठेवतात. मग नवर्‍याचा गृहप्रवेश समारंभ असतो. नवरा उठून घराच्या दाराशी येतो. नवरी आणि तिच्या मैत्रिणी घरातलं उखळ दाराशी आडवं धरतात. नवरा जोराने ते उखळ घरात ढकलतो. या गृहप्रवेशानंतर नवऱ्याच्या टॉवेलची आणि नवरीच्या साडीची गाठ मारुन त्या गाठीला एक काळा मणी लावून दोघांनी उखळाभोवती पाच प्रदक्षिणा घालायच्या असतात. भात हेच प्रमुख अन्न असणाऱ्या वारल्यांच्या जीवनात उखळाला साहजिकच अनन्यसाधारण महत्त्व या समारंभात दिलं गेलं आहे. पंचपदी चालू असताना धवलेरी, नवरा आपल्या बायकोसाठी काय काय दागिने घडविणार आहे याचं वर्णन करतात.

लक्कंला जाऊन … सोना आनेला॥ तेहीग सोन्याचं … गोठ्यान घडेला॥ उरले सोन्याचं … मोतीना घडला॥

अशा रितीने मग ‘उरले सोन्याचं’, मुगड्या, तोडे, बांगड्या इ. घडवलं जातं. प्रत्यक्षात मात्र सोनं कुणाच्या नजरेला पडणही मुश्किल असत. दागिने घडविलेच तर ते पितळाचे असतात. वारली त्याला सोनपितळ म्हणतात.

उखळीच्या पंचप्रदक्षिणेनंतर नवरा आणि नवरीला उखळीत दोन मुसळं घालून भात कांडायला लावतात. याद्वारे सहजीवनाची सुरुवात त्यांना अप्रत्यक्ष रीतीने करून दिली जाते. हा कांडलेला भात एका पाटावर ओतून ती दोघेजण वाटून घेतात. या भातवाटणीनंतर नवरा-नवरी मंडपात येतात. पाटील, सरपंच, कोतवाल, मढवी, हिजडी इ. लोकांना मानाने पैसे दिले जातात. पूर्वी याचा खर्च साधारणत: २१ रु.२ आणे असा ठरलेला असे. आता ग्रामपंचायतीचे पंचही त्यात येत असल्याने हा खर्च थोडा जास्त येतो.

राम राम मंडळी – नंतर नवर्‍या मुलाच्या एका हातात दारुची बाटली आणि दुसऱ्या हातात नागवेलीचं पान दिलं जातं. जमिनीवर एक नागवेलीचं पान असतं. हातातल्या नागवेलीच्या पानांची पन्हळ करून ते उदक खालच्या पानावर सोडतात. नंतर नवरामुलगा सर्वांसमक्ष घोट घेतो आणि ‘सर्व मंडली रामराम’ असा रामराम साऱ्या गावकऱ्यांना घालतो. वारल्यांमध्ये ‘रामराम’ करण्याचा हक्क लग्नानंतरच प्राप्त होतो. वारल्यांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण अगदी सर्रास आहे. पण असं असलं तरी झिंगून कुठेतरी लोळत पडलेला कुणी सापडणं मुश्किल असतं.

सर्व मंडळींना राम-राम झाला की भगत, सुवासिनी, बंदार (नेमबाज), मेलकरी (बॅंडवाले) यांच्यासारख्या लग्नात उपयोगी पडलेल्या आणि सुईण सारख्या पुढे लवकरच उपयोगी पडणाऱ्या लोकांना मानाचा विडा दिला जातो. हा विडा म्हणजे नागवेलीचे पान, पैसे, सुवारी असा असतो. मग नवरा-नवरीचं जेवण होतं. आश्चर्य असं की या पंगतीला नवऱ्यामुलाचे आई-वडिलही नसतात. लग्न लागल्याबरोबर ते स्वतःच्या घरी निघून गेलेले असतात. नवदांपत्याच्या पंगतीला फक्त नवऱ्याचा एखादा भाऊ आणि करवल्या असतात. या सुटसुटीत जेवणामागेही आर्थिक कारण आहेच त्यामुळे अत्यावश्यक लोकांनाच जेवणाचा मान!

वरात – जेवणानंतर वरात काढतात. वरातीची सुरुवात गावचे पाटील नारळ फोडून करतात. बँड, ताशा वाजत गाजत बैलगाडीतून वरात निघते. गाडीवानापाठोपाठ नवरी आणि पाठीमागे नवरा तिचे खांदे धरून बसतो. वेशीपर्यंत गावकरी आणि पाटील मुलीला निरोप द्यायला येतात. मुलाच्या गावाबाहेर त्या गावचे पाटील व वारकरी स्वागतासाठी उभे असतात. वरात वाजत-गाजत घरी आली की नवर्‍याच्या घराच्या मांडवापाशी नवऱ्याची आई दोघांना ओवाळते. घराच्या पायरीवर थोडे तांदूळ टाकून त्यावरुन नवदांपत्य घरात शिरते. मग नव्या नवरीला घरातील सर्व माणसांची आणि इतर चीजवस्तूंची ओळख करून देण्यात येते. तेव्हा नवरामुलगा नवरीच्या गळ्याभोवती हात घालून ओंजळ करून नवरीला घरभर फिरवतो. यावेळी धवलेरी सांगतात – चालत लक्षुमी घरात आलं, काय गं लक्षुमी पाहिते। मी तर पायता वराची माता, वराची माता फार चांगली॥ घरातल्या सर्व माणसांची आणि कणगी-पेटार्‍यांची नव्या नवरीला करून देण्यात येणारी विधीपूर्वक ओळख हेही या लग्नसमारंभाचे वैशिष्ट्य आहे.

मग नवरीला घराबाहेरच्या मंडपात आणतात. तांदुळाच्या पिठाने रांगोळी काढून त्यावर पाट मांडून नवरा-नवरीला बसवितात आणि ओवाळतात. तेव्हा आपल्या बायकोचं (भर्जेचं) नवीन नाव काय ठेवायचं हे नवरा धवलेरीला सांगतो. दोघांभोवती ओवाळताना धवलेरी म्हणतो – लेक माझा पुनवेचा चांद, सून माझी मोगर्‍याची कली। नाव ठेवू ….. , खा प्या राज्य करा॥ सर्वसाधारणपणे वारली, आपल्या देवांची नावं कधी ठेवत नाहीत. त्यांच्यातल्या काही नावांना गुणविशेषक अर्थ असला तरी बरीच नावे निरर्थकही वाटतात. उदा. लहानपणी किरकिरणारी ती रडकी, सगळ्यांना आवडणारी लाडकी, या नावांना जरा तरी अर्थ आहे. पण जेठी, बिस्तूर, बरफ या नावांचा अर्थ लागणं मुश्किल होतं. नवीन नाव ठेवल्यानंतर लग्नसमारंभाची सांगता होते.

नव्या नवलाईचे पाच दिवस नवरी नवऱ्याघरी राहते. नंतर करवली किंवा तिचा भाऊ तिला पाच दिवसांच्या माहेरपणासाठी नेतो. पुन्हा नवरा व त्याचा भाऊ पाच दिवसांनी येऊन नवरी‌ला घरी घेऊन जातात. यामुळे दोन्ही घरांना नवीन नात्यांशी जुळवून घ्यायला बराच अवसर मिळावा हा हेतू आहे.

असे हे वारली लोकांचे निराळे लग्न निसर्ग, समाजातील घटकांना धरून आनंदाने पार पडते.

समाप्त