लेख क्र. ९
१३/६/२०२५

मागील दोन लेखात आपण बघितले की धर्म-परिवर्तनासाठी १९३८ सालापासून ‘धर्मनिर्णय मंडळ’ या संस्थेने अनेक कामे केली. १९३९ पासून पं. रघुनाथशास्त्री कोकजे संस्थेचे कार्यवाह होते. या महान धर्म-सुधारकाचा, विद्वानाचा मृत्यू १४ फेब्रुवारी १९७६ रोजी झाला. ‘देवर्षि-प्रकाश’ या त्रैमासिकाच्या मे १९७६ च्या अंकात ‘संपादकीय’मध्ये मो. वा. निमकर यांनी ‘पं. रघुनाथशास्त्री कोकजे’ यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याविषयी, विद्वत्तेविषयी लिहिले होते, तसेच पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांचे घनिष्ठ मित्र प्रा. नी. शं. नवरे यांनी रचलेले काव्यसुद्धा छापले होते. संत्रिका विभागाच्या सुवर्ण-महोत्सवानिमित्त परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या पं. रघुनाथशास्त्री कोकजे या द्रष्ट्या समाज-सुधारकाच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख येथे सादर करीत आहोत.

लोणावळे येथील धर्मनिर्णय मंडळाचे संस्थापक, सुधारक व हिंदुधर्मशास्त्राचे गाढे विद्वान पं. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांचे शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी १९७६ रोजी सायंकाळी लोणावळे येथे आकस्मिक हृदय विकाराने देहावसान झाले, हे कळविण्यास आम्हांस अत्यंत दुःख होत आहे. मरण समयी त्यांचे वय ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे हिंदुसमाजावर आधुनिकतेचे संस्कार व्हावेत व समाजामध्ये एकात्मता वाढीस लागावी यासाठी गेले अर्धशतक अव्याहत प्रयत्न करीत असलेला एक तळमळीचा धर्म सुधारक नाहीसा झाला आहे. आपल्या समाजातील ज्या व्यक्ती इतर समाजांतही ललामभूत झाल्या आहेत त्यांत कोकजे शास्त्री हे अग्रेसर होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने समाजाचेही फार नुकसान झाले आहे.
त्यांचा जन्म १० मार्च १९०४ भोके (जि. रत्नागिरी) येथे झाला. धर्मशास्त्र व तत्त्वज्ञान यांची शास्त्रीबुवांना लहानपणापासूनच आवड होती. त्यामुळे रत्नागिरी व चिपळूण येथे मराठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इंग्रजी शाळेत नाव दाखल करण्याऐवजी वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत प्रवेश केला व स्वामी केवलानंद सरस्वती यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर काही वर्षे काशी येथे जाऊन त्यांनी धर्मशास्त्राचे अध्ययन केले व त्यामुळेच ते कलकत्ता संस्कृत असोसिएशनच्या तर्कतीर्थ आणि सांख्यतीर्थ ह्या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले. तर्कतीर्थ ह्या परीक्षेत त्यांनी पहिला नंबर मिळवला होता, ह्यावरून त्यांची बुद्धिमत्ता किती कुशाग्र होती हे दिसून येते. ह्या काळात त्यांनी संस्कृताप्रमाणे इंग्रजीच्या अभ्यासाकडेही लक्ष्य पुरविले.
वाई आणि काशी येथील अध्ययन पुरे केल्यानंतर लोणावळे येथील ‘कैवल्यधाम’ मध्ये दर्शनाध्यापक म्हणून काम करू लागले, पण बदललेले कालमान लक्षात घेऊन जुने तत्त्वज्ञान आणि आधुनिक आचार यांचा मिलाफ कसा घडवून आणता येईल याचा ते विचार करू लागले व ह्या विचारमंथनातूनच ‘धर्मनिर्णय मंडळा’चा जन्म झाला व हेच त्यांचे प्रमुख आणि समाजोपयोगी कार्यक्षेत्र झाले. हिंदुसमाजाने जुन्या अनिष्ट रूढीचा त्याग केला पाहिजे व विज्ञाननिष्ठ आचारधर्म आत्मसात केला पाहिजे या पुरोगामी सामाजिक जाणीवेतूनच कोकजे शास्त्री ह्यांनी ‘धर्म स्वरूप निर्णय’, ‘हिंदूच्या अवनतीची मीमांसा’, ‘नवा आचारधर्म’ आदि ग्रंथ लिहिले. शिवाय त्यांनी धार्मिक कृत्ये व आचार ह्यांवर पुष्कळ ग्रंथ लिहिले आहेत. ते धर्मनिर्णय मंडळातर्फे पंचांगही दरवर्षी छापत असत. विवाहविधी सुटसुटीत व्हावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना त्यांना खूपच यश आले. जाती-जातीत विभागलेला हिंदुसमाज एकसंधी झाला पाहिजे यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या समाजरचनेत कालोचित बदल व्हावा म्हणून तयार करण्यात आलेल्या हिंदुकोड बिलालाही त्यांनी पाठिंबा दिला. गावोगावी प्रचार सभेत, परंपरा जतन करताना तिच्यात शिरलेल्या घातक प्रवृत्ती सोडून द्यायला हव्यात व त्याच बरोबर परिवर्तनाचे स्वागत करावयाची तयारी असली पाहिजे हेच शास्त्रीबुवांच्या भाषणांतील मुख्य प्रतिपाद्य विषय असत. पुरातन धर्मशास्त्राकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणारा प्रगतीशील धर्मसुधारक म्हणून पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांनी केलेल्या कार्याचे मोल आपण ओळखले पाहिजे. मुंबई व पुणे विद्यापीठाच्या एम्. ए. च्या विद्यार्थ्यांचे संस्कृत विषयातील परीक्षक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले होते. समाजातील वाईट प्रथा व रुढी बंद व्हाव्यात, त्याचप्रमाणे धर्माच्या नावावर वाटेल ते खपविले जाऊ नये ह्यावर त्यांचा कटाक्ष असे. विवाह विधीत होम, सप्तपदी प्रथम आणि मंगलाष्टके नंतर ही प्रथा त्यांनी सुरू केली; मुंजीच्या वेळी होणारे मातृभोजन हा धार्मिक विधीचा भाग नाही, म्हणून त्याला फाटा द्यावा असे त्यांचे मत होते. रोज सकाळ-संध्याकाळ आसने आणि संध्या त्यांनी कधीही चुकविली नाही. धूत वस्त्र हे सर्वोत्तम सोवळे असे त्यांचे मत होते. त्यांचे वागणे व आहार फार नियमित असे. त्यांना पोटाचा विकार होता, त्याची ते नेहमीच काळजी घेत असत. ते बहुतेक कधीही आजारी नसत. १४ फेब्रुवारी १९७६ ला ते सायंकाळी बाहेर पडले, चालताना एकदम रस्त्यावर कोसळले व त्यांनी कायमचा या जगाचा निरोप घेतला. बरोबर त्यांच्या पत्नी होत्या, पण कोणासच काहीही करता आले नाही. आयुष्यांत त्यांनी कुणाकडून सेवा करून घेतली नाही आणि स्वतःची मते दुसऱ्यावर लादली नाहीत. त्यांच्या मागे पत्नी, दोन कर्ते मुलगे. तीन विवाहीत मुली, जावई, नातू, बंधू, पुतणे, असा परिवार आहे. आम्हीच नव्हे तर अखिल समाज बांधव त्यांच्या दुःखात सहभागी आहे परमेश्वर त्यांचे आत्म्यास नक्कीच सद्गती देईल अशी आमची खात्री आहे.
पुणे, वाई, मुंबई, लोणावळे येथे त्यांच्या निधनानिमित्त शोक सभा झाल्या. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी ह्या संस्थेत सभा भरून पं. रघुनाथशास्त्री कोकजे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी अर्पण केली. अध्यक्षस्थानी हिंदुमहासभेचे पुण्यातील जुने कार्यकर्ते श्री. मामाराव दाते होते. संस्कृतज्ञ प्राचार्य नीलकंठ शंकर नवरे यांनी व अनेक वक्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मनिर्णय मंडळाचा प्रमुख आधारस्तंभ व दुर्दम्य उत्साहाचा विद्वान कार्यकर्ता अचानक नाहीसा झाला याचा सर्वांना खेद झाला. पुण्यास आले की ते प्रा. नी. शं. नवरे ह्यांना प्रथम भेटत असत. त्यांचा व प्रा. नवरे यांचा गाढा स्नेह होता. मृत्युपूर्वी ८-१० दिवस ते श्री. नवरे ह्यांना भेटून गेले, पण ते विशेष उत्साही दिसले नाहीत. पण ह्या गंभीर आजाराची त्यावेळी कोणासच कल्पना आली नाही. श्री. नवरे ह्यांनी पं. कोकजेशास्त्रींवर एक छोटेसे संस्कृत काव्य केले आहे. आमच्याकडे त्यांनी पाठविले आहे, ते आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.
कोकजे, धन्यो धन्योऽसि। (४ मार्च ७६)
सुधारको र. गो. कोकजे, हन्त! कालवशं गतः ॥
वृत्तमेतत् समाकर्ण्य दूयते मानसं मम ॥ १ ॥
अहो! अनाथं सज्जातम् धर्मनिर्णय-मण्डलम् ।।
प्रवर्तकः चालकोऽपि एकलः एव कोकजे ॥ २ ॥
सार्थोपाधिः तर्कतीर्थः धृत्युत्साह-समन्वितः ॥
क्रियावान् पण्डितश्चासीत् सर्वेषाम् आदरास्पदम् ॥ ३ ॥
केवलानन्द-सच्छिष्यः सर्वानन्द-प्रदायकः ॥
यत् गृहीतं व्रतं तेन आमृत्यु परिपालितम् ॥ ४ ॥
-नी. शं. नवरे

१० मार्च २००५ रोजी पुणे येथे ज्ञान प्रबोधिनी संस्थेने पं. रघुनाथशास्त्री कोकजे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ साजरा केला. पं. कोकजे यांच्या छायाचित्रासोबत डावीकडून श्री. विश्वनाथ गुर्जर, मा. संचालक वाच. गिरीशराव बापट, प्रा. यशवंतराव लेले, प्रा. विवेक पोंक्षे, श्री. सुभाष देशपांडे