संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग १)

लेख क्र. २१

२५/६/२०२५

डॉ. सुरुची पांडे यांनी केवळ संस्कृत अभ्यासक नाही तर सामान्य वाचकाला नजरेसमोर ठेवून ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ हा प्रकल्प संत्रिकेमध्ये हाती घेतला. त्यासाठी त्यांना मा. श्री. यशवंतराव लेलेमा. डॉ. प्रमोद लाळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्कृत साहित्याचा इतिहास या विषयाचा आवाका अतिशय मोठा आहे. त्यामुळे हा प्रकल्प ७ भागांमध्ये केला गेला व पुढे त्या ७ भागांच्या स्वतंत्र पुस्तिका संत्रिकेमधून प्रकाशित झाल्या. अशा ह्या विस्तृत प्रकल्पाची दोन टप्प्यांमध्ये थोडक्यात ओळख करून देत आहोत.

डॉ. सुरुची पांडे यांनी पहिल्या भागाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की इतिहास म्हणजे काही नीतिधर्माचे नियम प्रस्थापित करणे नाही. घटना एवढीशी असली तरी तिची वाढ होण्यामागे सत्य तत्त्व काय, तिचा उदय, विकास परिणतीचा क्रम याबद्दल माणसाला जिज्ञासा असते. त्याची पूर्ती इतिहासातून होत असते. ‘इति ह आस’ असे घडले म्हणजे इतिहास, भारतीय संस्कृती आणि संस्कृत साहित्याचा इतिहास या दोन्ही गोष्टी एकमेकीत चपखलपणे मिसळल्या आहेत. त्यांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न वेद व वेदांगे या भागात करत आहोत.

वेद व वेदांगे (भाग १)

वेद -आपल्या संस्कृतीचे, आध्यात्मिक जीवनक्रमाचे मूळ वैदिक वाङ्मयात सापडते. वेद म्हणताच आपल्या डोळ्यासमारे चार वेदांची नावे येतात. पण वैदिक वाड्मयात तीन प्रकारचे ग्रंथ समाविष्ट होतात. प्रत्येक वर्गात स्वतंत्र आणि अनेक ग्रंथ अंतर्भूत असतात. आज त्यांपैकी फार थोडे ग्रंथ उपलब्ध आहेत. ते तीन विभागात आहेत. त्यातील ‘संहिता’ भाग पहिल्या पुस्तिकेत येतो तर ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे हे ग्रंथ दुसर्‍या पुस्तिकेत सविस्तर येतात. १) संहिता – संहिता म्हणजे अर्थसंग्रह. याचा अर्थ पदप्रकृतिः असाही केला जातो. यात स्तोत्रे, काही प्रार्थना, आशीर्वादात्मक सूक्ते, मंत्रांचे प्रयोग, यज्ञयागांबद्दलचे मंत्र, संकट निवारण होण्याबद्दलचे मंत्र व प्रार्थना, देवतांची स्तुती असे घटक येतात. आज प्रामुख्याने चार संहिता उपलब्ध आहेत त्या पुढीलप्रमाणे – अ) ऋग्वेद संहिता – ऋग्वेद म्हणजे ऋचांचे ज्ञान. अनेक ऋचांचे सूक्त आणि अनेक सूक्तांचे मंडल बनते. ऋग्वेदात अनेक विषयांवर सूक्ते आहेत जसे, देवता सूक्ते, कथा सूक्ते, तत्त्वज्ञान सूक्ते, संवाद सूक्ते इत्यादी. ब) यजुर्वेद संहिता – यजुर्वेदात यज्ञयागासंबंधी अनेक मंत्र एकत्रित केलेले आहेत. यज्ञातील विशिष्ट पुरोहितांसाठी उपयोगी पडतील अशा ऋचा यजुर्वेदात आहेत. या संहितेचे दोन पाठ पहायला मिळतात, कृष्ण यजुर्वेद संहिता आणि शुक्ल यजुर्वेद संहिता. क) सामवेद संहिता – साम म्हणजे विशिष्ट सुरांत केलेले गायन. सामवेदातील गाने भारतीय संगीतशास्त्राचा इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. यज्ञसंस्थेतील सामगान मुख्यत्वे ऋत्विजांकडून होई. उद्गाता, प्रस्तोता व प्रतिहर्ता अशा संज्ञा त्यांना होत्या. सामगायन सप्तस्वरांचे असे. आरंभीच्या काळात त्या स्वरांना यम अशी संज्ञा होती. ड) अथर्ववेद – अथर्ववेद म्हणजे विविध मंत्र व तंत्रांचे प्रयोग. यात सुखप्राप्तीची इच्छा करणारे आणि शापदायक अशा दोन्ही प्रकारचे मंत्र आहेत. सर्वसामान्य जीवनाचे प्रतिबिंब यात पडलेले आढळते.

वेदांगे – वेदांचा अर्थ जास्तीत जास्त स्पष्ट करून दाखविण्यासाठी वेदांचा विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला. शब्दांची व्युत्पत्ती, उच्चार, व्याकरण, कर्मकांडांचा अर्थ लावणे अशा अनेक पैलूंनी अभ्यास झाला. त्यातून जी शास्त्रे तयार झाली त्यांंना वेदांगे असे म्हणतात. ती एकूण सहा आहेत – शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष.

ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे  (भाग २)

ब्राह्मण ग्रंथ – ‘ब्रह्म’ हा शब्द वेद किंवा मंत्र अशा अर्थाने वापरलेला दिसतो. या वेदाचे किंवा ब्रह्माचे ज्ञान ज्यामुळे होते ते ग्रंथ म्हणजे ब्राह्मणे होत. वेगवेगळ्या यज्ञांचे कर्मकांड सांगणे हा ब्राह्मणग्रंथाचा मुख्य उद्देश आहे. कोणत्या मंत्राने कोणते कर्म करायचे, त्या विशिष्ट मंत्राचा कर्माशी संबंध काय हे ब्राह्मणग्रंथात प्रायः स्पष्ट केलेले असते. म्हणून ब्राह्मणग्रंथांना विनियोगाचे शास्त्र असेही म्हटले जाते. ब्राह्मण ग्रंथ हे मोठे व गद्य स्वरूपातील ग्रंथ आहेत. पाश्चात्य विचारवंतानी म्हटल्याप्रमाणे ब्राह्मणग्रंथ ही नीरस बडबड नव्हे तर वेदांचा, कर्मकांडाचा अर्थ लावण्याचा तो एक प्रयत्न आहे. देवतांबद्दलच्या विविध कथा सांगणे, विविध प्रकारच्या यज्ञयाग व कर्मकांडामागची कारणे स्पष्ट करणे, कथांच्या निमित्ताने शब्दांची व्युत्पत्ती शोधणे अशी ब्राह्मण ग्रंथांची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  आरण्यके – आरण्यके हा ब्राह्मण ग्रंथाच्या पुढचा टप्पा आहे. कर्मकांडापलीकडे जाऊन अरण्यांतील एकांतात राहून केलेली ज्ञानाची साधना म्हणजे आरण्यके. मनुष्य, जग, ईश्वर यासारख्या विषयांबद्दल आरण्यकांमध्ये विचार मांडलेले आढळून येतात. ब्राह्मणग्रंथांमध्ये चमकून जाणारे ब्रह्मतत्त्वाबद्दलचे विचार थोडे ठळक रूप घेऊन आरण्यकांमध्ये प्रकट होतात. यज्ञ-यागाचा क्रियांमध्ये दडलेला अध्यात्मिक अर्थ उकलण्याचे काम या ग्रंथांनी केले आहे. काहीप्रमाणात कर्मकांडविषयक चर्चा आरण्यकांत दिसून येते परंतु एकंदर चर्चेचा काळ बदलेला जाणवतो. या बदलाकडे यज्ञसंस्कृतीच्या कर्मठपणाला कंटाळून झालेली प्रतिक्रिया अशा दृष्टिकोनातून पाहता येईल. या काळात कर्मकांडापासून विचार अधिक सूक्ष्म, परिपक्व आणि उदात्त होऊ लागले. उपनिषदे – उपनिषद् म्हणजे उप, नि, सद् म्हणजे गुरुच्या जवळ बसून घेतलेले ज्ञान. ब्राह्मणग्रंथ व आरण्यके यानंतर तत्त्वज्ञानविषयक विचारांनी अधिक समृद्ध बनलेला टप्पा म्हणजे उपनिषद् वाङ्मय. भौतिक समृद्धीपेक्षा आत्मिक उन्नतीचे महत्त्व माणसाला जाणवू लागले याचेच पूर्ण स्वरूप उपनिषद वाङ्मयात उमटले. ब्रह्म व आत्मा यांचे ऐक्य हा उपनिषदांचा मुख्य व प्रतिपाद्य विषय आहे.

रामायण, महाभारत आणि पुराणे (भाग ३)          

भारताच्या संस्कृतीबद्दल बोलताना रामायण व महाभारत या महाकाव्यांबद्दल बोलणे अपरिहार्य ठरते. वाल्मीकी रामायणात एकूण सात कांड (भाग) आहेत. त्यातील बालकांडात रामाची कुलपरंपरा दिली आहे. मूळ वाल्मीकी रामायणाबरोबरच अध्यात्म रामायण, आनंद रामायण, अद्भुत रामायण ही रामायणेही प्रसिद्ध आहेत. काही गोष्टी समाजात इतक्या रुजून गेल्या आहेत की त्या मूळ वाल्मिकी रामायणातच आहेत असा समज होतो. त्यामुळे या विविध रामायणांच्या कथांचे वेगळेपण रामायणविषयक भागात मांडले आहे.

राष्ट्रात एकात्मता आणि साहित्याबद्दलची आपुलकी निर्माण करण्यात महाभारताचा कमालीचा वाटा आहे. महाभारतातील श्लोक हे सर्वांना माहित नसले तरी त्यातील अनेक कथा सर्वश्रुत आहेत. या भागात महाभारताविषयी महाभारताची काव्य म्हणून माहिती आणि इतिहास म्हणून महती सांगितली आहे. यात कौरव-पांडवांची कुलपरंपरा, महाभारताचा प्रत्येक पर्वानुसार लिहिलेला सारांश, महाभारतातील पात्र परिचय यांचा समावेश आहे.

रामायण, महाभारताबरोबरच या भागात पुराणांवरदेखील प्रकाश टाकलेला आहे. वेदांबद्दल फारशी माहिती नसली तरी पुराणातल्या गोष्टी मात्र नक्कीच कानावर पडलेल्या असतात. पुराणे ही केवळ धार्मिक कारणांसाठीच महत्त्वाची नसतात तर त्यांच्यात वंशावळी, विविध राजे व त्यांचे पराक्रम अशी ऐतिहासिक सामग्रीही मिळते. अनेक शास्त्रांचे ज्ञानही आपल्याला पुराणांद्वारे होते. अशाच महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, भागवत, नारदीय, मार्कंडेय, अग्नि, भविष्य, ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड अशा १८ महापुराणांची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या भागात येते.

क्रमशः