संत्रिका

स्त्री-पौरोहित्य : एक परिवर्तन

लेख क्र. ३३ ०७/०७/२०२५ मागील लेखात आपण ज्ञान प्रबोधिनीच्या धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका समजून घेतली, पौरोहित्य उपक्रमातील सार्थता, सामूहिकता, शिस्तबद्धता ही तीन सूत्रे समजून घेतली. परंतु, या उपक्रमातील आणखी एक विशेष म्हणजे स्त्री-पौरोहित्य. समाजात आजही अनेकांना स्त्रियांनी पौरोहित्य करणे, यज्ञात सहभागी होणे निषिद्ध वाटते. परंतु, प्राचीन काळी स्त्रिया यज्ञात सहभागी होत होत्या व आता ज्ञान प्रबोधिनीच्या पौरोहित्य उपक्रमामुळे पुनश्च स्त्रिया पौरोहित्य करू लागल्या आहेत. हा बदल संत्रिकेत यापूर्वी कार्यरत असलेल्या संशोधिका, पौरोहित्य वर्ग प्रशिक्षिका डॉ. आर्या जोशी यांनी लेखरूपात मांडला होता. त्यांचा हा लेख निश्चितच बदलाला प्रेरित करणारा आहे. तसेच, या बदलात सहभागी झालेल्या काही स्त्री-पुरोहितांचे अनुभवही येथे देत आहोत. सध्याच्या चालू काळात आपले मा. राष्ट्रपती ‘व्हिजन २०२०’ चे स्वप्न पाहत असतानादेखील धार्मिक क्षेत्रात ‘पुरोहित’ या रूपात स्त्रीचा स्वीकार संपूर्णपणे केला जात नाही. ‘स्त्री’चे पौरोहित्य नाकारून पुरुष पुरोहितांचाच आग्रह अजूनही धरला जातो. घरातील स्त्रिया ह्याच मोठ्या प्रमाणावर ‘स्त्री’चे पौरोहित्य स्पष्टपणे नाकारतात व ‘घरातील ज्येष्ठांची मानसिकता’ अशी सबबदेखील आपल्या मताच्या पुष्टीसाठी देतात ! आश्चर्य आहे! मंत्रपठनाचा अधिकार – संहिताकाळ हा स्त्रियांच्या एकूणच स्थानाबद्दल गौरवासाठीच प्रसिद्ध आहे. यज्ञाचे पौरोहित्य करणारी विश्ववारा आपल्याला ऋग्वेदात भेटते. घोषा, रोमशा, विश्ववारा, अपाला इ. एकूण २७ स्त्रियांना वैदिक रचनेत सहभागी होता आले व त्यांची मते काव्यरूपाने संहितांमध्ये नोंदली गेली ही अत्यंत लक्षणीय गोष्ट आहे. या २७ स्त्रियांनी रचलेल्या सूक्तांचा समावेश ऋग्वेदामध्ये आढळतो. जुहु ही वेदकालीन ब्रह्मवादिनी असून वैदिक संहितांचे अध्ययन अध्यापन करून तिने स्वतःचे जीवन व्यतीत केले. संहिताकाळात मुलींचे उपनयन करून त्यांना वेदाध्ययनाचा व गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार होता. पुराकल्पे कुमारीणां मौञ्जीबन्धनमिष्यते । अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा ।। (वीरमित्रोदय, संस्कारप्रकाश). ब्राह्मण-काळात यज्ञामध्ये पत्नीचा सहभाग अपरिहार्य मानला जाई. विदुषी म्हणून विख्यात अशा गार्गी मैत्रेयी यांनी उपनिषदांचा काळ गाजविलेला दिसतो. सूत्रकालखंडातील स्त्रिया आचार्यपद भूषवून मीमांसा, व्याकरण इ. विषयांचे अध्यापन पुरुषांसाठीदेखील करीत असत. श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी त्यांचे मंत्रसहित स्वस्त्ययन करणारी कौसल्या आपल्याला रामायणात भेटते. राम व लक्ष्मण यांसह सीता नित्य संध्या करीत असे. तात्पर्य, प्राचीन काळी स्त्रियांना मंत्रपठणाचा अधिकार होता हे यावरून स्पष्ट होते. यज्ञात सहभाग – विश्ववारा हिने संहिता काळात स्वतः यज्ञाचे पौरोहित्य केले व तसे करण्यास इतर स्त्रियांनाही उपदेश केला. तत्कालीन स्त्रियांना यज्ञसंस्थेच्या प्रत्येक अंगाची पूर्ण माहिती होती. यज्ञीय वेदीच्या निर्मितीमध्ये कुशल स्त्री ऋग्वेदात आढळते. स्कंदपुराणातील प्रभासखंडात सावित्रीचे जे चरित्र आले आहे तेथेही ती मंत्रपूर्वक अग्नीला आहुती देत आहे. स्त्रीचे धार्मिक क्षेत्रातील स्थान व महत्त्व अजोड आहे हे या उदाहरणांवरून स्पष्ट होईलच. मासिक धर्म – स्त्रीचा मासिक धर्म ही पौरोहित्याची अडचण ठरू शकते. पण गृह्यसूत्रात सांगून ठेवले आहे – स्नाता रजस्वला या तु चतुर्थे अहनि शुध्यति । कुर्याद् रजोनिवृत्तौ तु देवं पित्र्यादि कर्म च ।। रजस्वला काळाचे ३ दिवस अशौच पाळून चौथ्या दिवशी स्नान करून स्त्री देवकार्य, पितृयज्ञ इ. करू शकते. आयुर्वेदाच्या अभ्यासकांच्या मतेही रजस्स्राव थांबल्यानंतर स्त्रीने धार्मिक कृत्य करण्यास हरकत नाही. सुरक्षितता व प्रतिष्ठा – वैदिकोत्तर काळात शक, कुशाण, बर्बर इ. च्या आक्रमणांनी सारे आर्यावर्त ढवळून निघाले स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने स्त्री बंदिस्त झाली. स्मृतिकारांनी देखील स्त्रीला शूद्राइतकेच गौण स्थान दिले व स्त्रीची प्रतिष्ठा कमी होत गेली. सुपरिवर्तनाचा प्रारंभ – आधुनिक काळात स्वामी दयानंद सरस्वतींनी स्त्रियांना पौरोहित्याची दीक्षा दिली, साकुरी येथील श्री. उपासनी महाराज यांनी स्त्री पौरोहित्याची परंपरा नव्याने सुरू केली. कै. शंकरमामा थत्ते यांनी स्त्रियांना पारंपरिक पौरोहित्याचे प्रशिक्षण दिले. या भगिनी आज समाजात प्रतिष्ठेने पौरोहित्य करतात. १९९० पासून ज्ञानप्रबोधिनीनेही पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही पौरोहित्याचे प्रशिक्षण दिले व या स्त्रिया अन्त्येष्टीसह सर्व संस्कार उत्तमपणे करतात. काही महिला पुरोहितांचे अनुभव सारांशरूपात विशद करतो. सौ. सुनंदा जोशी यांनी त्यांची पौरोहित्याची सुरुवात हिंदूकरण विधीने केली. एका मुलीने मुसलमान मुलाशी प्रेमविवाह केला आणि ती मुस्लिम झाली. पण काही काळाने तिला समजले की तिची फसवणूक झाली आहे. तेव्हा त्या त्रासातून सुटून तिला पुन्हा हिंदू व्हायचे होते, तिची आईसुद्धा तिच्या पाठीशी उभी होती. तेव्हा सौ. सुनंदा जोशी यांनी श्री. म्हसकर गुरुजींच्या मदतीने हा विधी पार पाडला आणि त्या मुलीला घुसमटीतून मुक्त केले. या विधीनंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि बजाजी निंबाळकर यांची आठवण झाली. शिवरायांनी बजाजी निंबाळकरांना पुन्हा हिंदू धर्मात आणून आपली कन्याचा निंबाळकर घराण्यात विवाह लावून दिला. सुनंदा ताईंनी हिंदूकरण विधी करून नवीन पायंडा पाडला. सौ. सीमा दहिवतकर यांचा अनुभवही रोमांचक व समाजाला वेगळी दिशा देणारा आहे. या पुरोहिता श्री. कुलकर्णी गुरुजींसह एका गृहस्थाच्या मातोश्रींचा एकोद्दिष्ट विधी करायला गेले होते. नंतर काही महिन्यातच त्या गृहस्थाच्या पत्नीच्याही एकोद्दिष्ट विधीसाठी त्यांना जावे लागले. आधीच्या विधीच्या वेळी दोघांनी गृहस्थाच्या सूनेला मंगळसूत्र व कुंकवात बघितले होते. पत्नीचे विधी करायची मानसिकता गृहस्थात नव्हती. तेव्हा विधी कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा त्यांना समजले की यजमानांच्या मुलाचेही आधीच निधन झाले आहे. यावर त्यांच्या सुनेने स्पष्टीकरण दिले त्यातून सगळ्यांनाच शिकवण मिळेल. ती म्हणाली,”माझ्या सासर्‍यांनीच कुंकू लावण्याची परवानगी दिली आहे. तसेच, कोणाला सहज दिसणार नाही अशा पद्धतीने मी मंगळसूत्रही घालते.” तिचे हे उत्तर ऐकून पुरोहित यजमानांना म्हणाले,”धर्माला एक नवीन अधिष्ठान देणारी, आम्हां पुरोहितांनाही शिकवणारी तुमची सून तुमच्या सवाष्ण पत्नीचं एकोद्दिष्ट श्राद्ध करणार आहे.” स्त्री पुरोहित व यजमानही स्त्री असे अपरिचित चित्र आता समाजात स्वीकारले गेले आहे. असे अनेक अनुभव महिला पुरोहितांनी त्यांच्या मनात संग्रहित केले आहेत. आजच्या काळात अगदी दाहकर्मसुद्धा महिला पुरोहित करतात. ह्याला कारण निश्चितच ज्ञान प्रबोधिनी आहे. १९९० साली पौरोहित्य उपक्रम सुरु झाला तेव्हा महिलांची संख्या जेमतेम ५ आणि पुरुषांची संख्या ३० च्या वर होती. आता हीच परिस्थिती बदलली आहे. महिला पुरोहितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी विभागात दूरभाष आला की पुरुष पुरोहित आहेत का असे स्पष्ट विचारले जाई. तर आता महिला पुरोहित मिळतील का असे आवर्जून विचारले जाते. परिवर्तनाचा मार्ग बोलण्यापेक्षा कृतीतून अधिक वेगाने होतो हेच खरे!

स्त्री-पौरोहित्य : एक परिवर्तन Read More »

ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका

लेख क्र. ३२ ६/७/२०२५ ‘संत्रिका’ विभागात जसे संस्कृत संवर्धन व संशोधनावर काम चालू होते, त्यालाच समांतर ‘धर्मनिर्णय मंडळ, लोणावळा’ यांच्या परिवर्तनशील पौरोहित्य उपक्रमाचा प्रसार पण चालू होता.तुरळक प्रमाणात या नव्या पद्धतीने समाजात संस्कार होत होते. प्रा. रामभाऊ डिंबळे हे असे संस्कार करणार्‍यातले अग्रगण्य नाव. या उपक्रमाचा प्रसार व्हावा म्हणून १९९०-९१ पासून पौरोहित्य वर्गाचे सर्व समाजासाठी आयोजन होऊ लागले. ज्ञान प्रबोधिनीचा ‘संत्रिका’ विभाग अविरत जोमाने हा उपक्रम पुढे नेत आहे, लोकांना तो भावत आहे. आजपर्यंत भारतभरात एक लक्षापेक्षा अधिक संस्कार या पद्धतीने झाले आहेत. ज्ञान प्रबोधिनीची संस्कार पद्धत म्हणून वेगळ्या नावाने ती ओळखली जाते. ह्या पौरोहित्य उपक्रमात काय वेगळेपण आहे, ते कोणत्या तत्त्वांंमधून दिसत हे समजणं आवश्यक आहे. त्यासाठी संत्रिकेचे मार्गदर्शक मा. श्री. विश्वनाथ गुर्जर यांनी लिहिलेला ‘ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका’ हा लेख समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचा लेख मानसीताई जोशी-कसबेकर यांच्या आवाजात प्रसारित करीत आहोत.

ज्ञानप्रबोधिनी-प्रणीत धार्मिक विधींमागील तात्त्विक भूमिका Read More »

श्री संत तुकाराम महाराज गाथेतील विविध विषय

लेख क्र. ३१ ०५/०७/२०२५ संत तुकाराम महाराज (जन्म-इ.स.१५९८, मृत्यू-इ.स.१६४९) त्यांच्या मधाळ व भक्तिरसाने भरलेल्या अभंगांमुळे सर्वांनाच परिचित आहेत. हे अभंग ‘संत तुकाराम गाथा’ यात संग्रहित आहेत. ह्या अभंगांचा सामाजिक दृष्ट्या अभ्यास केल्यावर डॉ. मनीषा शेटे यांना अध्यात्माशिवाय अनेक सामाजिक घटना, विविध विषय यांचीही माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी हा माहितीपर व अभ्यासपूर्ण लेख लिहिला. याच मालिकेत प्राचीन कवी मुकुंदराज यांचा ‘विवेकसिंधू’, महानुभाव पंथी चक्रधरस्वामी यांचे ‘लीळाचरित्र’ यांचाही अभ्यास झाला. उद्या असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा लेख पाठवत आहे. अध्यात्माव्यतिरिक्त श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगात आढळणाऱ्या अनेकविध विषयांचा अभ्यास व्हावा या हेतूने गाथेचे वाचन करण्यात आले. तेव्हा त्यांत सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, भौगोलिक, कृषी, औषधी वनस्पती, मानसशास्त्र, भाषा इ. विषयी संदर्भ सापडले. तुकारामांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याची तळमळ व स्पष्टवक्तेपणा यांतून १६ व्या शतकातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचे चित्र आपल्या समोर उभे रहाते. तुकारामांनी लिहिलेले वह्यांचे कागद देवाने उदकी तारिले असे खुद्द त्यांनीच म्हटले. त्या वह्यांचे पुढे काय झाले ते सांगणे कठीण आहे, मात्र ‘कोरड्या वह्या निघाल्या उदकी। त्या तरी लुटूनी नेल्या भावीकी। प्रख्यात लोकी व्हावया॥’ असे भक्तलीलामृत अ. ३५, ओवी १६७ मध्ये महीपतीने नोंदवले आहे. अभ्यासकांनी प्रयत्नपूर्वक अभंगांचे एकत्रीकरण केले. तुकारामांच्या टाळकर्‍यांत दोन लेखक होते, एक कडूसचा ब्राह्मण मवाळ व दुसरा चाकणचा संताजी जगनाडे. महीपतीने या दोघांचा उल्लेख केला आहे. इ. स. १८४४ मध्ये ‘अभंग पत्रिकेचे तुकोबाचे’ प्रसिद्ध झाले. नंतरही थोडे थोडे अभंग प्रसिद्ध होत गेले. पहिली समग्र गाथा ३३२९ अभंगांसह १८६२ साली प्रकाशित झाली. याचे एकूण पाच भाग होते. तत्कालीन इंग्रजी मिशनर्‍यांचे व सुसंंकृत इंग्रजी अधिकार्‍यांचे लक्ष तुकारामांकडे गेले. लोकांना तुकाराम निर्मित सेतूवरूनी ख्रिस्तचरणी नेता येईल असा पुढे रे. नारायण वामन टिळकांप्रमाणे त्याकाळीही मिशनर्‍यांचा समज झाला होता. मरे मिचेल या महाराष्ट्रात मुरलेल्या मिशनर्‍याने महीपतीच्या तुकारामचरित्राचा इंग्रजी गोषवारा १८४९ साली मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नल मध्ये छापला. या मिशनर्‍याचा तुकारामाचा व्यासंग इतका गाढ होता की त्याला स्वतःला मराठीत अभंग रचता येऊ लागले. गाथेची पारायणे व अभ्यास करणारे अनेक जण आहेत, काही अभंगांचा इंग्रजीतून अनुवादही झाला आहे. भक्तिमार्गातील प्रवासात सर्वांना सामावून घेत असताना तुकोबांनी केलेले डोळस निरीक्षण त्यांच्या अभंगात उतरले आहे. आजच्या काळात ज्याला विज्ञान म्हणतात असे विज्ञान त्याकाळी परिचयाचे नसले तरीही त्याच्या जवळ जाणारा आशय अनेक अभंगांतून व्यक्त झाला आहे. अणुविज्ञान- अणु हे सर्व विश्व व्यापुन राहिला आहे. जसा सूर्यप्रकाश सर्वत्र भरलेला असतो, अग्नि लाकडांत असतो पण लाकूड पेटविल्याशिवाय तो जागृत होत नाही. तसेच हे अणू-रेणु अतिशय सूक्ष्म आहेत ते डोळ्यांनी दिसत नाहीत (अ.क्र.७८६, १७१८, २०६६, ३८९६). सूर्य व त्याची किरणे वेगळी दिसतात तरी ती एकच असतात हे सांगणारी एक पंक्ती आहे. शिसे, तांबे , कासे, पितळ, परिस, लोखंड, चुंबक, सोने, माणिक-मोती, चिंतामणि नावाचा इच्छापूर्ती करणारा खडा, पृथ्वीच्या पोटात सापडणारे धातू इ.चे उल्लेख केलेले दिसतात. मोहरा नावाचा द‌गड दोर्‍याला लावला असता दोरा जळत नाही अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण उल्लेख मिळतो (अ.क्र.१९३, ६८७, ७१४, ७२८, १११६, २४६५, २५५८). अग्नीमधे धातु टाकल्यानंतरच तो शुद्ध होतो, सोने तापविल्यानंतरच दागिना तयार होतो (अ.क्र.१४४०,१४५३). पोटदुखी, ताप, वमन, कोड, जंत, नारू, नवज्वर, पडसे-खोकला, सन्निपात, कामिन, मूळव्याध, खरुज, क्षयरोग, डोळ्यातील वडस ई. रोगांचा उल्लेख सापडतो. अंगात ताप असता मिष्टान्नसुद्धा बेचव लागतात हे त्यांनी एका अभंगाच्या पंक्तीत सांगितले आहे (ज्वरिलियापुढे वाढिली मिष्टान्ने। काय चवी तेणे घ्यावी त्याची॥ – अ.क्र.१४८.३) तसेच, रोगांवरच्या कडूनिंबाचा पाला, जिरे, सुरण, राई यांचा एकत्रित पाक, बिबा, चंदन या औषधांचाही उल्लेख संंत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केला आहे (अ.क्र.८३, २३९२, २४९०, २५२५, २६०६, २७१९, ३०८८, ३२६३). सहस्र, ऐंशी सहस्र, १४ चौकडयांचे राज्य, ४ वर्ष, १ युग, ४ युगांची एक चौकडी (१६ वर्षे) अशा १४ चौकड्या, सत्तर टक्के बाकी उरणे, लंके मधील घरे सप्तलाख हे सर्व आकड्यांचे संदर्भ आपल्याला गाथेत दिसतात. एका ठिकाणी १० मधील शून्य काढुन टाकल्यास १ च शिल्लक राहतो पण ० महत्वाचे आहे हे दाखविणारा दाखला दिलेला आहे (पापपुण्य कैसे भांजिले अंक। दशकाचा एक उरविला॥ जाणोनिया काय होतोसी नेणता। शून्या ठाव रिता नाही नाही॥-अ.क्र.१४१३). उद्धव, अक्रूर व्यास, अंबऋषी, रुक्मांगद, प्रल्हाद, जनक, विदुर, पांडव, द्रौपदी, अजामेळ, विश्वामित्र, वसिष्ठ, नारद, वाल्हा, उपमन्यू, परिक्षित राजा या पौराणिक व्यक्तींचा उल्लेख सापडतो. इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करताना समकालीन संत व त्यांच्या आधी होऊन गेलेले संत यांचीही नावे समजतात. नामदेव, नरसी मेहता, धनाजी जाट, मीराबाई, दामाजीपंत, कबीर, गोरा कुंभार, पुंडलिक, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, चांगदेव नागो, जनमित्र, रोहिदास, परसा भागवत, सूरदास, सांवतामाळी, चोखामेळा, एकनाथ, जनार्दन, पाठक कन्हैय्या, महानु‌भाव मुनि, वैश्य तुळाधार, मोमीन, लतीफ मुसलमान, खोदु पिंजारी, बंका, जनाबाई, सजन कसाई, भानुदास, चिंतामणी देव, रामदास (मुक्ताबाईंचे नावं नाही हे विशेष.). तत्कालीन विविध समाजगटांचे दर्शनही त्यांच्या या उल्लेखांमधून होते. गोदावरी, गंगा, सिंधू, मनकर्णिका, चंद्रभागा, भीमा या नद्या व वाराणसी, द्वारका, गया, गोपाळपूर, प्रयाग, नीरा नरसिंगपूर, पंढरपूर ही तीर्थस्थळांची नावे अभंगांमध्ये येतात. पृथ्वी समुद्रवलयांकित आहे असाही उल्लेख येतो. त्यांचे काही अभंग मराठीप्रमाणे हिंदीमध्ये सुद्धा आहेत (अ.क्र.३४३५). गौळणी, विरहिण्या, अभंग, ओवी या रचनांमध्ये ललित, रूपके इ. भाषेला अलंकृत करणाऱ्या अलंकरणांचा सहज सुंदर उपयोग केला आहे. क्वचित काही ठिकाणी दमयमकाचा उपयोग करून रचना केली आहे. सरळ सोप्या बोलीभाषेत त्यांनी सर्व रचना केल्या आहेत. कानडींचा उल्लेख एका अभंगात आला आहे (कानडीने केला मर्‍हाटा भ्रतार – अ‍.क्र.८४७) शेतीविषयक माहिती देणारे तीन अभंग (अ.क्र.३८२५ – ३८२७) गाथेत आहेत. त्यात नांगरणी, कुळवणी ,तिफणी, पेरणी ही शेतीसाठी आवश्यक कामे कधी व कशी करावी ते सांगितले आहे. तसेच उभ्या पिकाचे काळजीपूर्वक गोफणगुंड्याच्या सहाय्याने जतन केले पाहिजे. रात्रीच्या वेळी शेतावर आग पेटवून राहावे व शेताचे रक्षण करावे असेही सांगितले आहे. शेतीमधील अनिश्चिचितता त्यांना चांगलीच परिचयाची होती. त्यामुळे त्यांनी कलियुगात ओढवणाऋर्‍या बिकट अवस्थेतून नामस्मरणच तारू शकेल हा विश्वास व्यक्त केला होता (अ. क्र.२२०३ ते २२०७). कलियुगामुळे पाउस पडणार नाही व शेतांची दुर्दशा होईल असं भविष्यही वर्तविलेले दिसते. तसेच, दुष्काळ , सुकाळ , पुर (उपमा देण्यासाठी हा शब्द वापरला असावा) इ. पावसाशी संबंधित असलेल्या परिस्थितींचे वर्णन केले आहे (अ.क्र.१८८५). रोजच्या जगण्यातील विषय उपमा देण्यासाठी सहज वापरलेले आहेत. उदा. सांगडी म्हणजे दोन होड्या किंवा नावा एकत्र बांधून केलेले जलयान. जर फुटकी सांगडी पाण्यात घातली तर ती निश्चितच बुडणार असे वर्णन आहे. शिडाच्या नावेचा उल्लेखही दोन-तीनदा (अ.क्र.१७५४, १८८७) येतो. तेव्हा होन हे नाणे प्रचारात होते. तसेच, मुलांसाठी मातीचे होन बनत होते असा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे नाणी बनविणाऱ्या टांकसाळीचा उल्लेखही (खरे टांकसाळी नाणे।- अ.क्र.२९२०) अभंगात आहे. हुमरी ,कोल्हाट्यांचा खेळ, विटीदांडू, चेंडू-फळी, वाघोडी, लगोरी, हमामा, सेलडोरा, दोरा, निसरभोवंडी, बालघोंड(बालगुंडा), चेंडू चौगुणा, फुगडी, टिपरी, मृदुंगपाट्या, हाल इ. खेळांचे वर्णन केले आहे (अ.क्र.२५११,२७१७, ३३३६, ३४७०-३४८५). तोरड्या, वाकी, तोडे ताईत, साखळी, गळ्यातील दुल्लडी, बाजूबंद, हातसर वेणीचे नग अश्या दागिन्यांचे उल्लेख येतात. नट, नट्यांचा उल्लेख, डंका व तंबोरा इ. वाद्ये नावे येतात.रजक, धोबी, तेलीण, गारोडी,वाणी इ. (अ.क्र.१९६१, २३७१, २८११ इ ) व्यावसायिकांचा तसेच ऋण,

श्री संत तुकाराम महाराज गाथेतील विविध विषय Read More »

हिंदू जीवनदृष्टी

लेख क्र. २९ ०३/०७/२०२५ मागच्या लेखात ‘सिंधु अथवा सरस्वती संस्कृती हिच हिंदू संस्कृती’ हा विषय वाचला. आता हिंदू संस्कृती म्हणजे काय? तर जीवनाकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन! हाच विषय ‘समतोल’च्या ‘तत्त्वसप्तक’ विशेषांकात मा. श्री. यशवंतराव लेले यांनी मांडला आहे. ज्ञान प्रबोधिनीची धर्म संस्थापना, जनी जनार्दन ऐसा भाव, हिंदू जीवनदृष्टी, विकास, संघटन,उत्तमता आणि विज्ञानाभिमुखता ही सात तत्त्वे आहेत. त्यातील तिसरे तत्त्व – हिंदू जीवनदृष्टी बद्दल यशवंतरावांनी थोडक्यात पण सोप्या भाषेत समजावले आहे. “सर्व जगातून आमच्याकडे उत्तमोत्तम विचार यावेत” अशी शुभकामना करणारी आपली परंपरा आहे. विचारसंपन्न होण्याचा हा ध्यास वेदकाळापासूनचा आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात ह्या आशयाचा मंत्र येतो. “आ नो भद्राः क्रतवः यन्तु विश्वतः” असा तो छोटासा मंत्र आहे. आपल्या जीवनात मंगल घटना घडाव्यात अशीच सर्वांची इच्छा असते. मानवमात्राच्या मनातील ही आस पुढील शब्दांत व्यक्त झाली आहे. ‘आम्ही कानांनी कल्याणकारक तेच ऐकू, डोळ्यांनी मांगल्यमय ते ते पाहू; भरभक्कम देहाने आणि तेजस्वी अशा आमच्या इंद्रियांनी आनंद घेत हे जीवन उत्तम प्रकारे संपन्न करू.” ही सदिच्छा कोणत्या ऋचेत व्यक्त होते ? – भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरङ्‌गैस्तुष्टुवांसस् तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥ या मंत्रातील ‘आम्ही’ म्हणजे कोण ? हे समजावून घेण्यासाठी यजुर्वेद बरा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र इत्यादी सर्व समाजघटकांनी युक्त अशा समाजाची ही अभीप्सा आहे. मानवी समाजहितासाठी आम्ही ती व्यक्त करतो आहोत. आरोग्यसंपन्न देहाने जीवनातील सुखानुभव घेत घेत शतवर्षपर्यंत कृतार्थ होऊन राहावे हीच तर प्राचीन ऋषीमुनींची इच्छा आहे. ते म्हणत, ‘नन्दाम शरदः शतम्’ शंभर संवत्सरे आम्हाला आपापली कर्तव्यकर्म करीत करीत जीवन व्यतीत करावयाचे आहे. ‘कुर्वन् एव हि कर्माणि जिजीविषेत् शतं समाः ।‘ आश्रमकर्मे करत करत आनंदाने जगण्याची वासना ठेवायची आहे. ‘सारे जग दुःखमय आहे’ असे मानणारी व त्यायोगे नैराश्यपूर्ण आणि निवृत्तीची प्रेरणा देणारी ही भारतीय परंपरा नाही. या जगातील उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहून; त्याहीपेक्षा उच्च दर्जाचा आनंद मिळवून देणारी; आत्मिक अनुभवाची वाट दाखवणारी अशी भावात्मक श्रेष्ठ जीवनदृष्टी आहे हिंदू जीवनदृष्टी !’ ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस’ अशा दोन शब्दांनी ती व्यक्त झालेली आहे. “यतः अभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्म इति निश्चयः ॥” ऐहिक उन्नती आणि परमानंद प्राप्त करून घेणे ज्यापासून शक्य होते तो धर्म हे निश्चित. अशा या धर्मात पूजापद्धती, देवदेवता, जपजाप्य इ. कशाचाच उल्लेख नाही. कारण धर्म म्हणजे रिलिजन नव्हे. काही कोश रिलिजन म्हणजे आस्तिक्यबुद्धी एवढाच अर्थ देतात तर वेबस्टरने ‘पूजापद्धती’ असा अर्थ दिलेला आहे. हिंदू जीवनदृष्टीप्रमाणे मूर्ती न मानणारासुद्धा मूर्तिपूजकाच्यासह अभ्युदयाचा आणि निःश्रेयसाचा मार्ग स्वीकारून धार्मिक ठरू शकतो. आत्मा, ब्रह्म, सिद्ध, बुद्ध, राम, कृष्ण, ख्रिस्त, खंडोबा, महंमद अथवा म्हसोबा यांची प्रार्थना, उपासना अथवा पूजा करणारा म्हणजे आस्तिक असे मानण्यात येत असले तरी स्वामी विवेकानंद म्हणतात,”देवावर विश्वास असो वा नसो पण स्वतःवर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही नास्तिक आहात! म्हणून स्वतःवर, आपल्या आत्म्यावर विश्वास असेल तर तुम्ही आस्तिक आहात.” आता वर्णभेद नाममात्र अस्तित्वात आहेत. लिंगभेद कमी होत चालले आहेत. सर्व जातिपंथांच्या स्त्रीपुरुषांनी एकत्र येऊन एका सुरात गायत्री मंत्राचा अर्थासह जप करावा. ‘आमच्या बुद्धीला, सर्व प्रकारच्या ऊर्जांचे एकमेव उगमस्थान असणाऱ्या, भगवान् सूर्यनारायणाने तेजसंपन्न करावे’ अशा आशयाचा हा बहुवचनी मंत्र लक्षलक्ष लोकांनी हृदयपूर्वक म्हणावा हीच आवश्यकता आहे. चार पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी चार आश्रमांची व्यवस्था करून ठेवणारा पुरुषार्थी समाज सुदृढ होऊन त्याचे सातत्य टिकावे यासाठी तसेच व्यक्तिगत उन्नती साधून समाजउन्नती व्हावी यासाठी आपली धर्माची व्याख्या करताना द्रष्ट्यांनी ‘यः स्यात् धारणसंयुक्तः सः धर्मः इति निश्चयः।’ असेही म्हणून ठेवले आहे. म्हणजेच व्यक्ती व समाज सुदृढ होऊन त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे यासाठीची मूल्यसंहिता म्हणजेच ‘धर्म’ असे म्हटले आहे. आधुनिक विचारांच्या समाजाने स्वीकार करून जिचे पालन करावे अशी ही मूल्यसंहिता म्हणजेच हिंदू जीवनदृष्टी असे अवश्य समजावे.

हिंदू जीवनदृष्टी Read More »

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती?

लेख क्र. २८ ०२/०७/२०२५ कालच्या लेखात आपण वेदकालीन ‘राष्ट्र’ संकल्पना बघितली. राष्ट्र आले की संस्कृतीसुद्धा आलीच. जसे ‘भारत’ राष्ट्र प्राचीन काळापासून एकसंध व एकात्म होते तशीच भारतीय संस्कृती प्राचीन, सर्वसमावेशक होती. या प्राचीन संस्कृतीला मुख्यत्वे सिंधू संस्कृती म्हटले जाते. पण, मा. श्री. यशवंतराव लेले यांनी नक्की या संस्कृतीला काय म्हणायचे या प्रश्नावर अभ्यास करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. असा हा अभ्यासपूर्ण लेख ‘यज्ञ’ या दिवाळी अंकात २००८ रोजी छापून आला व आता येथे पुन्हा प्रकाशित करीत आहोत. आम्ही कोण? – एकराष्ट्रीयतेच्या आड येणारे अनेक अपसिद्धान्त भारतीय इतिहासामध्ये अनेक वर्षे पद्धतशीरपणे घुसडण्यात घेऊन समाजातील अनेक पिढयांना त्यांनी आपापसात झुंजत ठेवले आहे. आर्य हे मध्य आशियातून या देशात आले हा त्यातला एक सिद्धान्त. वास्तविक ‘आर्य’ शब्द सभ्य, प्रतिहित अशा अर्थाने संस्कृत भाषेत आलेला आहे पण तो इंग्रज शासकांनी वंश या अर्थाने वापरला व आम्ही तो त्यांच्याकडून जसाच्या तसा स्वीकारला. मग आक्रमक आर्यांनी सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केल्याचा दुसरा सिद्धान्त व्हिलरने मांडला. हाही अनेक भारतीय पिढ्यांनी शिकून घेतला. या पार्श्वभूमीवर के. डी. सेठना यांचे ‘हडप्पन संस्कृति ही वैदिक संस्कृती होती’ हे वाक्य महत्वाचे वाटते. सिंधूनेच सामावून घेतले – सिंधू संस्कृतीत मिळालेल्या मानवी सांगाड्यांच्या अभ्यासातून दिसून आले की त्यांच्यावर कोणत्याही शस्त्राघाताची काहीही खुण नाही, मग सिंधू नदीच्या महापुराने  त्या माणसांचा मृत्यू झाला असल्याचा नवा तर्क लढवला गेला. पाठ्यपुस्तकातून हळूच आर्यांनी सिंधू संस्कृती नष्ट केल्याचे विधान गाळण्यात आले तरी आर्य हे परकीय आक्रमक हे घोकणे चालूच राहिले. सिंधूसंस्कृतीचा सर्वाधिक विस्तार ! – देश स्वतंत्र झाल्यानंतर मोहेंजोदडो व हडप्पा इत्यादी सिंधू संस्कृतीची स्थाने पाकिस्तानात गेली. सिंधू नदी ही प्रायः पाकमधेच वाहात राहिली. पण गतकाळात पंजाबमध्ये रुपड येथे (जि. अंबाला) मोहेंजोदडो पेक्षाही मोठे नगर शोधले गेले. उत्तर प्रदेशातील अलमगीरपूर येथे उत्खनन झाले, राजस्थानात कालीबंगा सारखी कितीतरी उत्खनने झाली, सौराष्ट्रात लोथल, रोजडी, सरापूर, सोमनाथ अशी तथाकथित सिंधू संस्कृतीची स्थाने उजेडात आली. थोडक्यात सांगायचे तर हिमाचल प्रदेश, हरियाना, राजस्थान, गुजराथ या राज्यांमधून एकूण ४०० च्या आसपास उत्खनने झाली व ती सारी सिंधू संस्कृतीची नगरे असल्याचे ठरले. अगदी महाराष्टातील दायमाबादपासून गंगेच्या खोऱ्यापर्यंत तर पश्चिमेस पाकिस्तानापलीकडील प्रदेशातही उत्खनने झाली आहेत. सरस्वतीचा शोध – १९८५ मध्ये डॉ. वि. श्री. वाकणकर यांनी सरस्वती नदीच्या लूप्त-गुप्त झालेल्या पात्राचे संशोधन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले. डिसेंबर ८५ मध्ये एका पथकाने सुमारे ४० दिवसात ४ हजार किलोमीटरची शोधयात्रा काढून असे निरीक्षण नोंदवले की नासा संस्थेने राजस्थानातून वाहणाऱ्या भूगर्भातील नदीपात्राचा जो आराखडा चित्रित केला आहे तो महाभारतकालीन बलरामाने केलेल्या तीर्थयात्रेच्या मार्गाशी मिळता जुळता आहे. हा मार्ग महाभारतात म्हटल्याप्रमाणे तत्कालीन सरस्वती नदीच्या पात्राचा आहे हे तिच्या काठच्या तीर्थस्थानांच्या नावांवरून सिद्ध होते आहे. त्याकाळी म्हणजे ३ हजार वर्षांपूर्वी  महाभारतीय युद्धात सहभागी न होता बलरामाने तीर्थयात्रा करणे पसंत केले. नकाशाप्रमाणे या सरस्वतीच्या लुप्त पात्राच्या अनुषंगाने कुपनलिका खोदल्या गेल्या. आसपास उपलब्ध पाणी खारट असले तरी भूगर्भातील नदीपात्रातून मात्र कूपनलिकांना गोड पाणी उपलब्ध झाल्याने भारतीयांना सहस्रावधी वर्षे केवळ त्यांच्या स्मृतीपथावर अवशिष्ट राहिलेली व ‘गंगा सिंधु सरस्वती चः यमुना गोदावरीः नर्मदा। कुर्वन्तु वै मंगलम्।’ अशा प्रकारे मंगल कामनेच्या निमित्ताने आमच्या वाणीवर वर्षानुवर्षे विराजमान झालेली ती मातृतमा अन् देवितमा म्हणून गौरवान्वित झालेली महानदी आम्हाला सापडली. लुप्त सरस्वती, लुप्त वैदिक नदी पुनश्च आम्हाला सापडली आहे. आता तिला प्रवाहित करण्याचे प्रयासही चालू आहेत. गुजराथ सरकारने तर नर्मदेचे जल सरस्वतीच्या त्या पावन पुरातन मार्गापर्यंत पोचवून या कार्याचा शुभारंभही केलेला आहे. सिंधू संस्कृती ही येथील भूमीपुत्रांची तर ‘सरस्वती संस्कृती’ ही आक्रमक, परकीय आर्याची आहे की काय हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात रेंगाळत असणे शक्य आहे. त्या दृष्टीने थोडे निरीक्षण करणे हे उपयुक्त ठरेल, काहींना तर ‘ही सरस्वतीच कशावरून?’ असा प्रश्न पडला आहे! अशा घटनांनी शंकित होणारी, चिंतित होणारी काही माणसे असतात. त्या बुद्धिवादी मंडळींना सत्याचा स्वीकार करण्यास पुरेसा वेळ द्यावा लागतो. सिंधू संस्कृती आहे तरी काय? – सिंधू संस्कृतीत अनेक मातीची भांडी, असंख्य शिक्के, चांगली घरे, सरळ रस्ते, जलनिस्सारणासाठी चांगली बांधलेली गटारे, सामूहिक स्नानगृहे, विहिरी इतकेच नव्हे तर प्रेतदहन होत असे त्या स्थळाचा पुरावा मिळाला आहे. सिंधू संस्कृतीची लिपी आहे पण तिचे कोडे सुटेपर्यंत न थांबता अनेकांनी अन्य मार्गाने अभ्यास चालूच ठेवलेला आहे यावरून काय ज्ञान होते ते पाहूया. नित्य स्नान हे या देशातील लोकांचे, उष्ण हवामानामुळे, स्वच्छतेचे महत्वाचे साधन तर आहेच पण या संस्कृतीची शुचिर्भूततेची, पावित्र्याची कल्पनाही त्यात अंतर्भूत असते. त्यामुळे स्नानगृहे ही विशेषता आपल्याला दिसते. सामूहिक स्नानगृहांची येथील कल्पना मात्र हिंदुस्थानात अन्य कोठे न आढळणारी प्रादेशिक विशेषता म्हणावी लागेल, कदाचित पुष्कर सारखी ही तीर्थक्षेत्रे असावीत. सुस्नात होऊन सुंदर वस्त्रे परिधान करून हे लोक पशुपतीची उपासना करत असत असे दिसते. पशुपतीची मूर्ती तर उत्खननात मिळाली आहेच पण त्याला आवडणाऱ्या त्रिदलाची पाने अनेक‌ मृद्-भाड्यांवर रंगवलेली आढळतात. ही बिल्वपत्रे व नाना पशूंच्यामध्ये योगोक्त आसनात (मूळबंध) वसलेला तो शिवशंकर! हे सारे पाहून यांचा कोणी पुरोहित असणार असे मनात येते. त्या पुरोहिताचा पुतळाही उपलब्ध झाला आहे. पुतळ्याचे अर्धोन्मीलित नेत्र हे योगात सांगितल्याप्रमाणेच आहेत. उत्तरीय डाव्या खांद्यावर घेऊन उजव्या काखेत मागे अडकवलेले आहे. जानवे असेच परिधान केले जाते व ते उत्तरीयाचे प्रतीकच असते, हे उत्तरीय म्हणजे चांगली रंगीबेरंगी फुलांची चित्रे असणारी शाल वाटते. त्या फुलांचा रंग तांबडा आहे हे पुतळ्याच्या नीट निरीक्षणानंतर खाचा खोबणीमधून स्पष्ट दिसून येते. पाकिस्तानात कराचीच्या संग्रहालयात १० सेंटीमीटर उंचीचा हा पुतळा आहे. पुतळ्याच्या उत्तरीयाचे स्वरूप आपस्तंब श्रौतसूत्रानुसार (२२-१६-३) असल्याचे अस्को परपोला (हेलसिंकी विश्वविद्यालयात आग्नेय आशियन संस्कृतीचे प्राध्यापक) याने म्हंटले आहे. की वस्त्रावरील उठावानुसार ही फुले वस्त्रावर नंतर भरली असावीत असा अंदाज आहे. पिंपळ वृक्षाचे अस्तित्व सिंधू संस्कृतीमधील मृद्‌भांडयावर आहे. शिक्क्यांवर आहे. अलंकारांमध्ये स्वर्णालंकार, चांदीच्या बांगडया तसेच नील वैदूर्य ही रत्ने आहेत. नर्तिकेच्या मूर्तीकडे पाहिल्यास तिच्या एका हातात अनेक बांगडया आहेत. या प्रकारे डाव्या हातात अशा अनेक बांगड्या घालण्यायाची प्रथा आजही भारतात व पाकिस्तानातील थरच्या भागात पाहावयास मिळते हे विशेष. गळ्यातील अलंकारही आज पाहायला मिळतात तसेच आहेत. अनेक प्रकारची खेळणी मूर्ती अशा अनेक गोष्टी आढळल्या असून त्या विविध संग्रहालयातून सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या साऱ्या प्रतीकांना परकीय म्हणणार? – एका पट्टिकेवर एक महायोगी चौरंगा सारख्या आसनावर बसलेला असून त्याच्या दोन्ही बाजूस दोन नाग उभे दिसतात. एक भक्त काही भेट घेऊन खाली बसलेला दिसतो. नमस्कार मुद्राही मोहेंजोदडो हडप्पात दिसते. एक लांबट पट्टी अशी आहे की तिच्यावर सहा स्वस्तिके दिसतात. महाराष्टातील दायमाबाद येथे ब्रॉंझ धातूचा रथ व त्याला जोडलेले दोन बैल व मागे उभा सारथी असे खेळणे सापडले आहे. मोहेंजोदडोत मातीची म्हैस, गेंडा, हत्ती अन् उंदीर इ. खेळणी आढळली आहेत. राजस्थानमध्ये कालीबंगन येथील उत्खननात व अन्यत्रही अनेक स्थानी यज्ञकुंडे सापडली असून तिकडे सौराष्ट्रात लोथळ मधेही यज्ञकुंडे आढळतात. त्याचप्रमाणे घरांच्या विशेषांमध्येही यज्ञकुंडे सापडली आहेत. पाकिस्तानी पुरातत्वशास्त्री डॉ. अहमंद दाणी यांनी काली बंगन पैथील यज्ञशाळा पाहून ही सारी सरस्वती संस्कृती, वैदिक संस्कृती मानली व

सिंधू की सरस्वती, की हिंदू संस्कृती? Read More »

योगशास्त्राचा इतिहास व विकास

लेख क्र. २६ ३०/६/२०२५ मानवाच्या दीर्घायुषी व निरोगी जीवनासाठी ‘योग’ महत्त्वाचा आहे. नुकताच २१ जूनला आंतरराष्ट्र्रीय योग दिवस जगभर साजरा झाला. परंतु हा योग फक्त एकच दिवस नाही तर आयुष्यभर आत्मसात करणे गरजेचे आहे. म्हणूनच योगशास्त्राची माहिती असणेही आवश्यक आहे. त्या संदर्भातला हा लेख आहे डॉ. भाग्यश्री हर्षे ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या त्यांनी लिहिला आहे. १९८७ साली रामायणावर आधारित संशोधन करून त्यांनी ‘वाचस्पती’ पदवी प्राप्त केली व नंतर काही काळ त्यांनी संत्रिकेसाठी काम केले. प्रा. अर्जुनवाडकर व डॉ. स. ह. देशपांडे यांच्या बरोबर अगदी वेगळ्या अशा विषयांवर काम केलेल्या भाग्यश्रीताईंचा हा लेख आपल्याला योगशास्त्राची परिपूर्ण माहिती देतो. ज्याकाळात संत्रिकेचे काम काहीसे मंदावले होते तेव्हा केलेले हे महत्वाचे संशोधन आहे. योगाचे महत्त्व आणि स्थान ‘योग’ ही भारताने अखिल विश्वाला दिलेली देणगी आहे. भारतीय तत्त्वाज्ञानात आणि जीवनातही योगाला अनन्यसाधारण स्थान आहे. कारण भारतातील बहुतांशी सर्व तत्त्वज्ञानांचे ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे पूर्णत्व प्राप्त करून घेऊन आत्म्याची मुक्ती साधणे. ही मोक्षप्राप्ती साधण्यासाठी ‘योग’ हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. ‘योग’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, परंतु जीवनातील अंतिम सत्य प्राप्त करून घेण्याची जी शास्त्रशुद्ध प्रणाली तिलाच ‘योगशास्त्र’ म्हटले जाते. केवळ पारमार्थिक आणि तात्त्विक हेतूनेच नाही तर भौतिक प्रगती व लौकिक अभ्युदय यासाठीही योग आवश्यक आहे. त्यामुळेच सर्वांगीण समृद्ध जीवनासाठी भारतीयांनी योगशास्त्राला जीवनात महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते. अनेक तत्त्वज्ञांनी याच शास्त्राच्या अध्ययनाने प्रत्यक्ष अनुभूतीच्या आधारे असे अनेक यौगिक सिद्धांत मांडले जे जीवनातील उच्चतम क्षेत्रापासून साधारणतम क्षेत्रापर्यंत सर्वत्र उपयुक्त आहेत. ‘योग’ शब्दाचे विविध अर्थ – वेदान्त्यांनी जीवात्मा व परमात्मा यांच्यातील संयोगाला योग म्हटले आहे. ‘देवतानुसंधानं योगः।’ असे रामानुजांनी सांगितले; तर वैद्यकात ‘भेषजं योगः|’ अशी व्याख्या आहे. व्यवहारशास्त्रज्ञांनी ‘छलम्’ म्हणजे युक्तीलाच योग असे नाव दिले. ज्योतिषज्ञांनी योगाचा संबंध रविचन्द्रादी ग्रहांशी जोडला, तर मौहूर्तिकांनी तिथिवार नक्षत्रांशी जोडला. अशा प्रकारे विभिन्न अर्थांनी योगशब्दाचा प्रयोग झालेला दिसतो. परंतु योगशास्त्राला अभिप्रेत असणारा योग शब्द युञ्ज्-समाधौ या धातूपासून निष्पन्न होतो. त्याचा व्युत्पत्ति-लभ्य अर्थ ‘समाधी’ असा आहे. या समाधिरूप योगाची व्याख्या पतंजलींनी ‘योगश्चित्तवृत्तिनिरोधः।’ अशी केली आहे. ‘चित्तवृत्तींचा उपशम करणे म्हणजे योग’ याच मताचे प्रतिपादन योगमताने केले. योगशास्त्रसंकल्पना – योग ही एक साधना आहे. यात चित्ताच्या एकाग्रतेवर सर्वाधिक भर दिलेला आहे. किंबहुना योगाचा विशाल दुर्ग या चित्तवृत्तींवरच अधिष्ठित आहे. या चित्तवृत्ती शुद्ध करून त्यांचा शुद्ध आत्मतत्त्वात लय घडविण्यासाठी जो मार्ग आचरला जातो त्याचे यथोचित वर्णन करणारे, त्याची शास्त्रशुद्ध आणि सूत्रबद्ध मांडणी करणारे शास्त्र म्हणजेच हे योगशास्त्र. केवळ ज्ञानानेच मुक्ती मिळते असे मानणाऱ्यांनाही चित्तातील अशुद्धी दूर होऊन त्यात शुद्ध ज्ञानाचा अविष्कार कसा होईल याचा विचार करावा लागतो. भक्तीने मुक्तीची वाट चोखाळणाऱ्यांनाही शुद्ध अंतःकरणाशिवाय ईश्वरप्राप्तीचा आनंद अनुभवास येत नाही. त्यामुळे योगाचे महत्त्व सर्वांनी एकमुखाने मान्य केलेले आहे. योगशास्त्राची प्राचीनता – वैदिक वाङ्मय हे मानवी इतिहासातील सर्वात प्राचीनतम व समृद्ध वाङ्मय आहे. वेदांमध्ये ‘योग’ हा शब्द मुख्यतः युज् म्हणजे जोडणे या अर्थाने आलेला दिसतो. उदा. पहिल्या मंडलातील ३४ वे सूक्त. काही ठिकाणी योगाभ्यास सूचक उल्लेखही आढळतात. जसे हृदा पश्यन्ति मनसा विपश्चितः । (ऋ. १०.१७७.१) उपनिषदांत एक दर्शन म्हणून आणि क्रियात्मक साधन म्हणून दोन्ही अर्थांनी योग शब्द प्रयुक्त आहे. कठोपनिषदात ‘तां योगमिति मन्यन्ते स्थिरामिन्द्रियधारणाम् ।’ (२.६.११) अशी योगाची व्याख्या केलेली आहे. योगसूत्रातील जीवात्मा व विश्वात्मा ही कल्पना मुंडकोपनिषदात आलेली आहे (मु.३.१.१); सर्व उपनिषदांतील योगविषयक विचार पाहता श्वेताश्वतर उपनिषदातील विचार अधिक परिणत दिसतात. यात क्रियात्मक योगाचे वर्णन असून (श्वे. २.८.९) योगसाधनेचे फळही सांगितले आहे. वेदान्त्यांनी योगाला ज्ञानप्राप्तीचे अन्तर्गत साधन मानले आहे (ब्र.सू. ४.१.७-११). भगवद्गीता हे तर परिपूर्ण असे योगशास्त्रच आहे. जीवाला परमात्म्याची प्राप्ती घडविणे हेच गीतेचे अंतिम लक्ष्य आहे. दुसऱ्या अध्यायात योगाची प्रारंभिक साधना सुरू होते ती उत्तरोत्तर विकसित होत जाते. सहाव्या अध्यायापर्यंत या क्रियात्मक योगाचे विवेचन आहे. योगसिद्ध पुरुषाचे वर्णनही गीतेत आहे. बौद्ध व जैन या दर्शनांतही योगाचे विस्तृत वर्णन मिळते. धर्मचक्रप्रवर्तनसूत्रात सांगितलेला आर्यअट्ठंगिक मार्ग अष्टांगयोगाप्रमाणेच आहे. बौद्धांचे स्वतंत्र योगशास्त्र आहे. त्यांनी राजयोग व हठयोग या उभयविध योगाची साधना केली. योगसाधनेला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. बौद्धांनी षडंगयोग मानला. हरिभद्रसूरिकृत ‘योगबिंदू’ तसेच यशोविजयकृत ‘अध्यात्मसार’ या जैन ग्रंथांनी पातंजलयोगाचाच पुरस्कार केला आहे. जैनांनी सम्यक् चारित्र्यासाठी यम, नियम व ध्यान यांना सर्वाधिक महत्त्व दिले (कल्पसूत्र ४४-४५). तंत्रमार्गात नाथपंथियांचा हठयोग प्रसिद्ध आहे. महाभारत, भागवत, विष्णुपुराण, याज्ञवल्क्यस्मृती यासारख्या पौराणिक ग्रंथांतूनही योगविषयक संदर्भ मिळतात. अहिर्बुध्न्य संहितेत हैरण्यगर्भ योगाचे विवरण आढळते. या सर्व ग्रंथांवरील योगसूत्रांचा प्रभाव पाहता योगशास्त्राची प्राचीनता व व्यापकता स्पष्ट होते. योगशास्त्राचा प्रवर्तक व कर्ता आज बहुधा सर्वत्र योगाचे आद्यप्रवर्तक म्हणून योगसूत्रकार पतंजलींचेच नाव घेतले जाते किंवा योगसूत्रे हीच प्रमाणग्रंथ मानून त्यांच्यापासूनच योगाभ्यासाला प्रारंभ केला जातो. परंतु पतंजलीच्या पूर्वी हिरण्यगर्भाचा योग प्रचलित होता असाही एक मतप्रवाह आज अस्तित्वात आहे. शंकरादी अनेक विद्वानांनी स्वरचित ग्रंथांमध्ये हैरण्यगर्भयोगाच्या वचनांचे स्मरण केले आहे. महाभारतातील ‘हिरण्यगर्भो योगस्य वक्ता नान्यः पुरातनः ।’ या प्रसिद्ध वचनाने या मतास पुष्टी मिळते. काही विद्वानांच्या मते कपिल मुनी हेच हिरण्यगर्भ होत. महाभारतातील शान्तिपर्वातील ‘यमाहुः कपिलं सांख्याः परमर्षिः प्रजापतिम्। हिरण्यगर्भा भगवानेषच्छम्दसि सुष्टुतः।।‘ या उक्तीमुळे विद्वानांच्या म्हणण्याला पुष्टी मिळते. विद्वानांच्या मते सृष्टीच्या प्रारंभी हिरण्यगर्भ ब्रह्म्याने स्वाध्यायशील ऋषींना योगविद्येचा उपदेश दिला होता. किंबहुना त्यांच्याच प्रेरणेने स्वाध्यायी ऋषींना नैसर्गिक संस्कार प्रतिभेने योगविद्या प्राप्त झाली. म्हणूनच योगशास्त्रात आलेले ‘स्वाध्यायादिष्टदेवतासंप्रयोगः।’ (यो.सू.२.४४) हे सूत्र सार्थ आहे. हिरण्यगर्भाकडून लौकिक ज्ञान अप्राप्य असल्याने ऋषींनी योगज ज्ञानच प्राप्त केले. सारांश, योगविद्येचे प्रथम प्रवर्तक हिरण्यगर्भ आहेत हे मान्य केले तरी त्याकाळात योगविद्या ही सूत्रबद्ध नव्हती हे निश्चित, गुरु-शिष्य परंपरेद्वाराच तिचे ग्रहण-धारण आणि पठण-पाठण होत होते. मानवसमाजात योगविद्येचे सोपपत्तिक प्रवर्तन कपिल मुनींनी केले असावे. प्रथम जी विद्या ऋषिपरंपरेने प्रसृत झाली त्याच विद्येच्या आधारे काही योगीजनांनी हैरण्यगर्भ योगविद्येवर ग्रंथ लिहिले. पुढे ज्यावेळी अनेक संवादादींतून योगविद्या अत्यंत विस्तृत व जटिल झाली; त्या वेळी त्या विद्येच्या रक्षणाच्या उद्देशाने भगवान पतंजलींनी ती सूत्रबद्ध केली आणि त्यांची योगसूत्रे प्रमाण मानली जाऊ लागली. योगसूत्रकार पतंजली व त्यांचा काळ विद्वानांच्या मते योगसूत्रकार पतंजलींचा काळ इ. स. पू. २०० च्या आसपासचा आहे. श्री. उमेशचंद्र मिश्र, सतीशचंद्र चट्टोपाध्याय, धीरेंद्रमोहन दत्त या विद्वानांनी ‘पतंजली हेच योगाचे आद्य प्रवर्तक असून ‘पातंजल योगसूत्रे’ हाच योगाचा आद्य ग्रंथ आहे’ असे मत मांडलेले आहे. पतंजलींनी योगसूत्रांची रचना केली म्हणून त्यांना आद्य प्रवर्तक म्हणता येणार नाही. कारण पातंजल योगसूत्रांचा आधार हैरण्यगर्भयोग आहे. परंतु हैरण्यगर्भयोग आज उपलब्ध नाही त्यामुळे ते योगशास्त्र सूत्रबद्धच होते याविषयी काही प्रमाण मिळत नाही. ते श्लोकबद्ध असावे. म्हणून माधवादी विद्वानांच्या मते योगविषयक उपलब्ध ग्रंथांमध्ये पतंजलींची ‘योगसूत्रे’ हीच प्राचीन व प्रमाण मानावीत. योगशास्त्राचा विकास – प्राचीन काळापासून या योगविद्येमध्ये वृद्धीच होत गेलेली दिसते. मंत्रयोग, हठयोग, लययोग व राजयोग या चार प्रकारांनी योग विकसित झाला. मंत्रयोगामध्ये साधकाच्या अंतरातली शक्ती मंत्रामुळे जागृत होऊन साधकाला महाभाव समाधीचा अनुभव येतो. हठयोगामध्ये देहशुद्धीला महत्त्व आहे. षट्‌कर्मांच्याद्वारे ही शुद्धी केली जाते व कुंडलिनीच्या जागृतीने साधक महाबोध समाधीत जातो.

योगशास्त्राचा इतिहास व विकास Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २)

लेख क्र. २५ २९/६/२०२५ मागील भागात वारली लोकांची लग्न ठरविण्याची अनोखी पद्धत बघितली. लग्नाआधीची नैसर्गिक वस्तूंनी मांडव घालणे, नैसर्गिक देवतांना आवाहन करणे अशा विधी बघितल्या. आता या भागात लग्नाचा मुख्य दिवशी होणार्‍या विधी सांगितल्या आहेत. त्यात प्रामुख्याने त्यांची मंगलाष्टके, वरात, गृहप्रवेश या विधी आहेत. वारली लोकांच्या ह्या लग्नविधीतून शहरी माणसांनासुद्धा खूप काही शिकण्यासारखे आहे. दुसरा दिवस – लग्नाचा मुहूर्त साधारणतः दुपारी तीन किंवा संध्याकाळी सातचा असतो. पण या वेळेचं बंधन तसं जाचक मानलेलं नसतं. लग्नसमारंभाच्या निमित्ताने सगळे लोक एकमेकांना भेटतात, गप्पा मारता-मारता, हसता-खिदळता वेळेचं भान फारसं कुणाला नसतं. लग्नाची सारी तयारी पूर्ण झाली की मुलीच्या घरासमोरच्या मंडपात लग्न लागते. ‘धवलेरी’ उत्तर-दक्षिण आंतरपाट धरतात, पूर्वेला नवरी आणि पश्चिमेला नवरदेवाला उभे करतात. नवरा-नवरी दोघांची एकत्रित ओंजळ करून ही ओंजळ तांदुळाने भरतात. त्यावर नागवेलीचं पान ठेवून वर बंदा रुपया व सुपारी ठेवतात. याला ‘ओजूर भरणे’ असे म्हणतात. संपूर्ण लग्न लागेपर्यंत बिच्चारे नवरा-नवरी असे उभे राहतात. लग्न लावतांना धवलेरी जी गाणी म्हणतात ती बोली भाषेतीलच असतात, हे सुद्धा एक वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे. या गाण्यात सर्व देवांना ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’ असं आमंत्रण असतं. एक साधं सुताचं ‘मंगलसूत’ नवरीच्या बाशिंगावर टाकतात. हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन धवलेरी उदक सोडतात आणि लग्न लागायला सुरुवात होते – देवानं घेतल्या तिक्याच्या (पोलादी) कुर्‍हाडी, देव गेला कनघर (खडकाळ कडा) डोंगरा ………. देव गेला घरामाले, रिसले (उरलेले) अंगणी दिले टाकुनी॥ आंना आना गाईची शेनं, सारवन घाला। आना आना कंके (दगड) पेठा (पीठ/रांगोळी), चिमटी धरून चौक (नक्षीदार रांगोळी) काढा॥ त्यावर ठेवा चंदन पाटो॥ त्यावर ठेवा तिलचांदोल (तीळतांदूळ), त्यावर ठेवा रोकड दाम। सर्वासनी बोलवा आंजुली भराया, त्यावर ठेवा नागवेली पाना॥ त्यावर ठेवा शेकडं दाम, त्यात ठेवा तिकाच्या (पोलादी) सपऱ्या (सुपाऱ्या) वरतं टाका मंगलसूता।। झाल्या झाल्या लगनावेला, नाहीर झाल्या लगनावेला, लगीन आला पंधरा घड्यांवर॥ यापुढली सारी कडवी वरच्याप्रमाणेच आहेत. त्यांची गाण्याची पद्धतही बरीच एकसुरी आहे. ‘धवलेरी’ सर्व देवांना बोलावतो आहे आणि देव ‘आम्ही लग्न लावत नाही’ असं सांगत आहेत. त्यानंतर धवलेरी देवांना आसनांवर बसायला सांगतो. या देवाच्या जंत्रीत जुगनाथदेव (जगन्नाथ), उगशरदेव (ढग), पावश्यादेव (पाऊस), वावधीवारा (वाद‌ळी वारा), चंदरसूर्य, सट्टाईमाऊली, वरमादेव (नदी), हिमाईदेवी, रामलक्षिमन, जनकीशीता, जर्‍ह्यादेव (झरा), सोलासरनी (पाट), बत्तीसपोह्या (तलाव), धुरपापत (धबधबा), पाची पांडव, लक्कचा रावन, मंडोधरी (मंदोदरी), चिडोणादेव (मुंज्या), गावचा काठ्या (कोतवाल), गावचा पाटील, सरपंच, गावचा भगत, गावची सुईण अशा सर्वांना ह्या पंधरा घड्यांपासून सुरुवात करून एक घडीवर लग्न येऊन ठेपेपर्यंत बोलावण्यात येतं. लग्न एक घडीवर आल्यावर मात्र धवलेरी सर्वांना ‘सावधान’ राहण्याची सूचना देतो. लगीन आला येक घड्यांव, बंदाराहो (बंदूकवाले) शाबित रहा …. मेलकऱ्याहो शाबित रहा, येक घडी मोडावी, नवरा नवरी जोडावी॥ कोन देव बोलवा, पलुशा बामन बोलवा ……….. काली गाठी पांढरी पाती (दोरी), सुवा लग्न होंपने (शुभ लग्न होत आहे)! असं शुभ लग्न सावधान होताच आधीच शाबित राहिलेले बाजावाले आणि नेमबाज कडकडाट सुरु करतात. अंतरपाट दूर होऊन नवरा-नवरींच्या जागेची अद‌लाबदल होते. इतका वेळ नवरा-नवरीने एकमेकांची ओंजळ धरलेली असते. ही ओंजूर सोडविण्यासाठी गावचा सरपंच, पाटील, कोतवाल यांना धवलेरी बोलवितो. ही ओंजळ सोडविल्यानंतर नवरा आणि नवरीला कडेवर घेऊन ताशाच्या तालात नाचवलं जात. सर्वप्रथम हा मान मामाचा असतो, मग होशी मित्र मैत्रिणींचा! नवरा-नवरीच्या कमी वयामुळे हे नाचवणं बहुधा कुणाला फारसं ‘जड’ जात नाही. नाचवून झाल्यावर नवरीला घरात नेतात. तिची साडी बदलून नवी हिरवी साडी नेसवतात. तिला ओवाळून ती आरती घराच्या दारात ठेवतात. मग नवर्‍याचा गृहप्रवेश समारंभ असतो. नवरा उठून घराच्या दाराशी येतो. नवरी आणि तिच्या मैत्रिणी घरातलं उखळ दाराशी आडवं धरतात. नवरा जोराने ते उखळ घरात ढकलतो. या गृहप्रवेशानंतर नवऱ्याच्या टॉवेलची आणि नवरीच्या साडीची गाठ मारुन त्या गाठीला एक काळा मणी लावून दोघांनी उखळाभोवती पाच प्रदक्षिणा घालायच्या असतात. भात हेच प्रमुख अन्न असणाऱ्या वारल्यांच्या जीवनात उखळाला साहजिकच अनन्यसाधारण महत्त्व या समारंभात दिलं गेलं आहे. पंचपदी चालू असताना धवलेरी, नवरा आपल्या बायकोसाठी काय काय दागिने घडविणार आहे याचं वर्णन करतात. लक्कंला जाऊन … सोना आनेला॥ तेहीग सोन्याचं … गोठ्यान घडेला॥ उरले सोन्याचं … मोतीना घडला॥ अशा रितीने मग ‘उरले सोन्याचं’, मुगड्या, तोडे, बांगड्या इ. घडवलं जातं. प्रत्यक्षात मात्र सोनं कुणाच्या नजरेला पडणही मुश्किल असत. दागिने घडविलेच तर ते पितळाचे असतात. वारली त्याला सोनपितळ म्हणतात. उखळीच्या पंचप्रदक्षिणेनंतर नवरा आणि नवरीला उखळीत दोन मुसळं घालून भात कांडायला लावतात. याद्वारे सहजीवनाची सुरुवात त्यांना अप्रत्यक्ष रीतीने करून दिली जाते. हा कांडलेला भात एका पाटावर ओतून ती दोघेजण वाटून घेतात. या भातवाटणीनंतर नवरा-नवरी मंडपात येतात. पाटील, सरपंच, कोतवाल, मढवी, हिजडी इ. लोकांना मानाने पैसे दिले जातात. पूर्वी याचा खर्च साधारणत: २१ रु.२ आणे असा ठरलेला असे. आता ग्रामपंचायतीचे पंचही त्यात येत असल्याने हा खर्च थोडा जास्त येतो. राम राम मंडळी – नंतर नवर्‍या मुलाच्या एका हातात दारुची बाटली आणि दुसऱ्या हातात नागवेलीचं पान दिलं जातं. जमिनीवर एक नागवेलीचं पान असतं. हातातल्या नागवेलीच्या पानांची पन्हळ करून ते उदक खालच्या पानावर सोडतात. नंतर नवरामुलगा सर्वांसमक्ष घोट घेतो आणि ‘सर्व मंडली रामराम’ असा रामराम साऱ्या गावकऱ्यांना घालतो. वारल्यांमध्ये ‘रामराम’ करण्याचा हक्क लग्नानंतरच प्राप्त होतो. वारल्यांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण अगदी सर्रास आहे. पण असं असलं तरी झिंगून कुठेतरी लोळत पडलेला कुणी सापडणं मुश्किल असतं. सर्व मंडळींना राम-राम झाला की भगत, सुवासिनी, बंदार (नेमबाज), मेलकरी (बॅंडवाले) यांच्यासारख्या लग्नात उपयोगी पडलेल्या आणि सुईण सारख्या पुढे लवकरच उपयोगी पडणाऱ्या लोकांना मानाचा विडा दिला जातो. हा विडा म्हणजे नागवेलीचे पान, पैसे, सुवारी असा असतो. मग नवरा-नवरीचं जेवण होतं. आश्चर्य असं की या पंगतीला नवऱ्यामुलाचे आई-वडिलही नसतात. लग्न लागल्याबरोबर ते स्वतःच्या घरी निघून गेलेले असतात. नवदांपत्याच्या पंगतीला फक्त नवऱ्याचा एखादा भाऊ आणि करवल्या असतात. या सुटसुटीत जेवणामागेही आर्थिक कारण आहेच त्यामुळे अत्यावश्यक लोकांनाच जेवणाचा मान! वरात – जेवणानंतर वरात काढतात. वरातीची सुरुवात गावचे पाटील नारळ फोडून करतात. बँड, ताशा वाजत गाजत बैलगाडीतून वरात निघते. गाडीवानापाठोपाठ नवरी आणि पाठीमागे नवरा तिचे खांदे धरून बसतो. वेशीपर्यंत गावकरी आणि पाटील मुलीला निरोप द्यायला येतात. मुलाच्या गावाबाहेर त्या गावचे पाटील व वारकरी स्वागतासाठी उभे असतात. वरात वाजत-गाजत घरी आली की नवर्‍याच्या घराच्या मांडवापाशी नवऱ्याची आई दोघांना ओवाळते. घराच्या पायरीवर थोडे तांदूळ टाकून त्यावरुन नवदांपत्य घरात शिरते. मग नव्या नवरीला घरातील सर्व माणसांची आणि इतर चीजवस्तूंची ओळख करून देण्यात येते. तेव्हा नवरामुलगा नवरीच्या गळ्याभोवती हात घालून ओंजळ करून नवरीला घरभर फिरवतो. यावेळी धवलेरी सांगतात – चालत लक्षुमी घरात आलं, काय गं लक्षुमी पाहिते। मी तर पायता वराची माता, वराची माता फार चांगली॥ घरातल्या सर्व माणसांची आणि कणगी-पेटार्‍यांची नव्या नवरीला करून देण्यात येणारी विधीपूर्वक ओळख हेही या लग्नसमारंभाचे वैशिष्ट्य आहे. मग नवरीला घराबाहेरच्या मंडपात आणतात. तांदुळाच्या पिठाने रांगोळी काढून त्यावर पाट मांडून नवरा-नवरीला बसवितात आणि ओवाळतात. तेव्हा आपल्या बायकोचं (भर्जेचं) नवीन नाव काय ठेवायचं हे नवरा धवलेरीला सांगतो. दोघांभोवती ओवाळताना धवलेरी म्हणतो – लेक

झाल्या झाल्या लगनावेला (भाग २) Read More »

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १)

लेख क्र. २४ २८/०६/२०२५ मा. श्री. यशवंतराव लेले वसई गावापासून 23 कि.मी. अंतरावर असलेल्या सकवार या वारली लोकांच्या पाड्यावर ‘रामकृष्ण आश्रम’वतीने चालणार्‍या ग्रामविकासाच्या उपक्रमात १९८१ पासून सहभागी होत होते. तेथे त्यांनी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवल्या. मुंबई-अहमदाबाद‌सारख्या सतत वाहत्या राष्ट्रीय महामार्गाच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेलं असूनही ते अतिशय मागासलेलं राहिलं. असं असलं तरी तिथल्या जीवनातील सहज- सुंदरता, छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनानंद निखळपणे लुटण्याची प्रवृत्ती आणि निसर्गसान्निध्यात राहिल्यामुळे असलेला गोडवा मा. श्री. यशवंतरावांना दिसला. त्यातील एक विशेष म्हणजे वारली लोकांचे लग्न. हा अनुभव डॉ. आर्या जोशी यांनी शब्दबद्ध केला व त्यावर विचार मांडले, तसेच नंतर एक शोधनिबंध सुद्धा लिहिला. वारलींच्या लग्नाचे हे वर्णन दोन भागात केले आहेत. या पहिल्या भागामध्ये वारलींंचे लग्न कसे होते, वधु-वर यांची निवड, लग्नाच्या आधीचा दिवस इत्यादींचे वर्णन केले आहे. लग्न ठरविण्याची पद्धत – लग्नसमारंभाची खरी सुरुवात तसं म्हटलं तर ‘तारप्याच्या नाचा’पासून होते. ‘तारपे’ हे वाद्य पूर्ण पिकलेल्या दुधीभोपळ्याच्या आतील बिया काढून त्यात बांबूच्या नळ्या घालून तयार करतात. हे वाद्य पुंगीसारखं दिसतं. आश्विन महिन्यात नवी पिकं डोलू लागलेली असतात. हिरवीगार वनश्री दिवाळीच्या आगमनाची वर्दी देत असतात. घाटावर दुम् दुम् पटदुम् च्या तालात लेझीम झिंगत असते तेव्हा वारली वस्त्यांमध्ये या तारप्याची सुरावट रंगत असते. दिवाळीच्या सणाच्यावेळी या तारप्याच्या नाचासाठी आजूबाजूच्या गावातून आणि पाड्यांमधून अनेक तरुण-तरुणी जमतात. लग्नाळूंसाठी ही एक सुवर्णसंधीच असते. बहुतांशी या नाचाच्या वेळी तरुण मुलं आपली सहचारिणी शोधतात. आवडलेल्या मुलीची माहिती मुलगा आपल्या आई-वडिलांना सांगतो. मग आई-वडिल त्या मुलीच्या घरी एखाद्या मध्यस्थामार्फत जातात. मुलाच्या पित्याला काही संपत्ती मुलीच्या पित्याला द्यावी लागते. परंतु ही ‘देज’ ठरलेली असते (काही मण भात आणि पैसे). लग्नाचा सर्व खर्चही मुलाकडूनच केला जातो. जर पुढे काही कारणांनी लग्न मोडलं आणि ‘बायको पळाली माहेरी’ असा प्रकार घडला तर ‘देज’ आणि खर्च मुलीच्या वडिलांना द्यावा लागलो. यामुळे वारल्यांमधील लग्नात मुलाची आणि त्याचबरोबर मुलीचीही संमती घेतली जाते. लग्नाचा सर्वसाधारण खर्च साधारणपणे १५०० रु. पर्यंत येतो. यात प्रामुख्याने देज आणि दारु यासाठीच जास्त खर्च येतो. मुलगी देताना मुलीचा पिता आपल्या भावी जावयाच्या परिस्थितीची चौकशी करतो. शेळ्या, गाई, बैल, जमीन, घरची माणसं याची चौकशी केली जाते. गाई किंवा शेळ्या ही एक संपत्तीच मानली जाते. करवंद, बोरं, जांभळं, मधाचं अख्खं पोळं अशा चैनींच्या गोष्टी जवळच्या जंगलात असताना वासराला तोडून गाईचं दूध काढणं हे वारल्यांना पटत नाही आणि दूध उत्पादन हा एक जोडधंदा होऊ शकतो याचं त्यांना आकर्षण नाही. दागिन्यांचा सोसही कुणालाच परवडण्यासारखा नसतो. लग्नाला दोन्ही बाजूंची संमती असेल आणि मुलाच्या हाती पैसे तयार असतील तर आठ दिवसातच लग्नसोहळा पार पडतो. सर्वांच्या सोयीने एखादी तारीख ठरल्यानंतर गावच्या सर्वांना लग्नाची सुपारी दिली जाते. हल्ली लग्नाच्या छापील निमंत्रणपत्रिकाही मिळतात. त्यातल्या गाळलेल्या जागा भरून ती पत्रिका समक्ष देऊनही बोलावणं करतात. या लग्नपत्रिकेला कोकंत्री म्हणतात. वारल्यांच्या धार्मिक समारंभांचा आणखी एक विशेष म्हणजे कुठल्याच पारंपरिक विधीसाठी त्यांना ब्राह्मण लागत नाही. वारल्यातीलच एखाद्या बाईला ही विद्या येत असते. काहीवेळा पुरुषही हे पौरोहित्य करतात. लग्नाच्या पौरोहित्याबद्दल या स्त्री किंवा पुरुषाला म्हणजेच धवलेरींना रु. द्यावे लागतात. मांडव – आजच्या काळात हा लग्नसमारंभ दोनच दिवसांचा असतो. आदल्या दिवशी मांडव घालतात. घरासमोर स्वच्छ सारवून नऊ मेढ्याचा हा मांडव घालतात. त्यासाठी जंगलातून तोडून आणलेल्या उंबराच्या आणि जांभळाच्या झाडांच्या फांद्या आणि आंब्याचा व जांभळाचा पाला वापरतात. त्यामुळे याचाही खर्च नसतो. हा मांडव देवानेच घातला असून त्यासाठी देवाला किती कष्ट घ्यायला लागले हे सांगताना धवलेरी सांगतात – देवानं घेतल्या तिवर्‍याची (पोलादी) कुर्‍हाडी, देव गेला कलघर (खडकाळ कडा) डोंगरा । नाही मिलत उंबराची जांभुलची झाडं, शेवटी गेले खंगारे (डोंगरमाथा) डोंगरा॥तिथे हायेत उंबराची, जांभुलची झाडं, आवट्या (लाकूड कापणे) पाडून धरणी पाडली न् भारा बांधला। निघून आलं मंडपाच्या दारी देवानं काढल्या सोन्याच्या पाहरी॥ ….. मांडव घालून झाल्यावर दुपारी बाराच्या सुमारास बाशिंग बांधण्याचा कार्यक्रम होतो. बाशिंग बांधायला चला म्हणून सांगत अख्ख्या गावातून वाजत-गाजत मिरवणूक निघते आणि सगळ्यांना गोळा करून लग्नघरी येते. लग्नात लावली जाणारी हळद नवरा-नवरीबरोबरच त्यांच्या मामा आणि मामीलाही लावली जाते. लग्नघरी भेटायला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच्या पायावर मुला-मुलीचे आई वडिल डोकं ठेऊन नमस्कार करतात. त्यावेळी लग्नाचा आहेर केला जातो. देवादेवी – पहिल्या दिवशी संध्याकाळी’ देव करणे’ हा विधी असतो. यासाठी मात्र वारल्यांना गावच्या भगताची आवश्यकता भासते. एका स्वच्छ पाटावर तांदुळाच्या पिठाने उभ्या-आडव्या रेघा मारून चौकोन पाडले जातात. प्रत्येक चौकोनात थोडे-थोडे तांदूळ घालून त्यावर सुपारी ठेवून देवाची स्थापना केली जाते. सर्वच भागातल्या वारल्यांमध्ये हिरवा, नारन्‌देव, बरहमादेव, वाघोबा, चिडोबा हे देव असतात. सकवार भागातील वारल्यांमध्ये झोटिंग, एकशिऱ्या, कानव, वालव, हरजी भगत, बामन, चित्ता यांचीही पूजा करतात. वारल्यांच्या देवविषयक कल्पना अतिशय प्राथमिक अवस्थेतील आहेत, ज्याचा कोप झाला असता अनर्थ कोसळतो तो देव अशी देवाची सोपी व्याख्या केल्यामुळे देवाला संतुष्ट राखणं एवढंच धार्मिक कार्य पुढे ठेवलेलं असतं. त्यामुळे सर्व निसर्गदेवता, प्राणी देव मानले आहेत. पाटावर देवांची प्रतिष्ठापना झाल्यावर प्रत्येक देवापुढे विडा आणि सुपारी ठेवतात. देवांना वाहण्यासाठी झेंडूची फुले, कुंकू, हळद, गुलाल ठेवलेलं असतं. मग भगत ज्यांच्या अंगात येतं अशा पाच लोकांना बोलावतो. प्रत्येकाला तो देवाचं नाव ठरवून देतो आणि प्रत्येकाच्या हातात मूठभर तांदूळ देतो. तांदूळ एका हाताने दुसऱ्या हातात करीत ताशाच्या कडकडाटाबरोबर हे पाचजण झुलू लागतात. अंगात देव येताना तो माणूस पायापासून थरथरू लागतो. मग उठून उभं राहून घुमू लागतो. हे ‘देवादेवी खेलनं’ इतर गावकरी पहात असतात. देवादेवी खेळल्यानंतर नवरा-नवरींना कोंबडीचं आणि बरोबरीनं पुरणपोळीचं जेवण दिलं जातं. जेवणानंतर नाचाचा कार्यक्रम असतो. गावातील तरुण-तरुणी आणि गावकरी या नाचात भाग घेतात. लग्नाची गाणीही बायका बराच वेळ म्हणतात. क्रमशः

झाल्या झाल्या लगनावेला (भाग १) Read More »

परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी

लेख क्र. २३ २७/६/२०२५ गरुड पुराणातील आयुर्विज्ञान, भूकंप, संस्कृत साहित्याचा इतिहास असे मोठे प्रकल्प संत्रिकेत २००२ च्या आसपास झाले. प्रकल्पांशिवाय संत्रिकेतून वाचस्पती पदवीसाठी (Ph.D.) अभ्यास करणारी पहिली परदेशी विद्यार्थिनी ‘Tan Kah Siew’ होती. त्यांनी २००२ मध्ये संत्रिकेत संशोधनास सुरुवात केली. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘The Path to Liberation : (Nirvana/Nibbana) Yoga in Bhagavadgeeta vis-as-vis Vipasaanaa in Early Buddhism’ होता. डॉ. ज. रा. जोशी त्यांचे मार्गदर्शक होते. तीन वर्षे ‘Tan Kah Siew’ यांनी संत्रिकेतून अभ्यास केला. तेव्हा त्यांनी ईश, केन, कठ इ. दश उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, पातञ्जलयोगसूत्राणि आदी संस्कृत ग्रंथांचा तर दीघनिकाय, धम्मपद इ. बौद्ध ग्रंथांचा तसेच अनेक भाष्यग्रंथ व साहाय्यक ग्रंथांचा, निबंधांचा अभ्यास करून संदर्भ गोळा केले. साधारण २००७ च्या सुमारास डॉ. ज. रा. जोशी यांची प्रकृती बिघडल्यामुळे Tan Kah Siew यांनी पुणे विद्यापीठाच्या पाली विभागातील डॉ. महेश अ. देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पुढे नेले. असे एक पत्र संत्रिकेत आहे. Tan Kah Siew यांच्या नाईलाजास्तव झालेल्या स्थित्यंतरामुळे मात्र संत्रिकेतून होणारा एक वाचस्पती पदवी प्राप्त अभ्यासक कमी झाला. ही जरी खेदकारक घटना असली तरी संत्रिकेत त्यादरम्यान (२००२-२००७) अनेक शोधप्रकल्प चालूच होते. प्रकल्पांची माहिती खालीलप्रमाणे –

परदेशी विद्यार्थिनीची ‘वाचस्पती’ पदवी Read More »

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २)

लेख क्र. २२ २६/६/२०२५ मागील भागात आपण डॉ. सुरुची पांडे यांच्या प्रकल्पातील वेद व वेदांगे, ब्राह्मण-आरण्यक-उपनिषदे, रामायण-महाभारत-पुराण हे तीन भाग बघितले. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच महाकवी कालिदास दिन. कवी कालिदास अभिजात संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे कवी. आजच्या निमित्ताने अभिजात साहित्यातील काव्ये, नाटके, तसेच तत्त्वज्ञान व भारतीय विद्या या ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ प्रकल्पातील चार भागांची थोडक्यात माहिती घेऊया. हे चारही भाग ‘संत्रिकेत’ पुस्तकरूपात प्रकाशित झाले आहेत. संस्कृत काव्य (भाग ४) काव्यं यशसेऽर्थकृते व्यवहारविदे शिवेतरक्षतये | सद्य:परनिर्वृतयेकान्तासम्मिततयोपदेशयुजे || याचा थोडक्यात अर्थ – काव्य यश मिळविण्यासाठी, धनप्राप्तीसाठी, पत्नीप्रमाणे उपदेश करणारे असते. असे व्यापक प्रयोजन असणाऱ्या काव्याचा परिचय या भागात करून दिला आहे. काव्याची सर्व प्रकारची माहिती देणारे साहित्यशास्त्र प्राधान्याने इ.स. ९०० नंतर तयार झाले. संस्कृत काव्याचे क्षेत्र एवढे व्यापक आहे की ऋग्वेद कालापासून सतराव्या शतकातील महाकवी जगन्नाथ यांच्यानंतरही काव्याचा ओघ वाहतो आहे. संस्कृत काव्ये, महाकाव्ये हे संस्कृत प्रासादाचे एक संपन्न दालन आहे. संस्कृतातील काव्यांची संख्या अगणित आहेच परंतु या काव्यांचे विषयही विविध प्रकारचे आहेत. प्रस्तुत पुस्तकात महाकाव्याची लक्षणे, पंचमहाकाव्ये सारांश आणि लक्षणांसहित सांगितली आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक महाकाव्य, भक्ती, शृंगाराचा समावेश असणारी मुक्तक-काव्य, काव्य प्रकारात येणारी सुभाषिते, श्लेष काव्य, गद्य काव्य, चंपूकाव्य, कथा काव्य, शिलालेखीय काव्य, दक्षिणभारतातील महत्त्वाची संस्कृत काव्य रचना आणि विशेष म्हणजे बौद्ध व जैन संस्कृत काव्य यावरही प्रकाश टाकला आहे. वरील काव्य प्रकारांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे – दश रूपके (भाग ५) नाट्यं भिन्नरुचेर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम् | ‘भिन्नरुचि’ लोकांना आवडेल असा एकमेव साहित्यप्रकार म्हणजे नाटक. साहित्यशास्त्रात सर्वच वाङ्मयप्रकाराला काव्य म्हणतात. बहुतेक सगळी काव्य ही ऐकायची किंवा वाचायची असतात. पण नाटक हे ऐकायचं असतं तसंच पहायचही असतं म्हणूनच त्याला ‘दृश्यकाव्य’ असं म्हटलं आहे. या दृश्यकाव्याचे सर्वसाधारणपणे दहा प्रकार संस्कृत साहित्यशास्त्रात विशद केले आहेत. त्यांना ‘रूपक’ असं अन्वर्थक नाव दिलेलं आहे. प्रस्तुत पुस्तकात दशरूपके म्हणजे काय आणि ती कोणती हे सांगितले आहे. नाटक, प्रकरण, अंक, व्यायोग, भाण, समवकार, वीथी, प्रहसन, डिम, ईहामृग या दश रूपकांबरोबरच १८ उपरूपके आणि त्यातील नाटिका या प्रकाराचे उदाहरण ‘रत्नावली’ यांचीही माहिती दिली आहे. कवी ‘भास’रचित तेरा रूपके प्रसिद्ध आहेत. ही रूपके मुख्यत्वेकरून रामायण व महाभारतावर आधारित आहेत. या तेरा रूपकांना ‘भासनाटकचक्र’ असेही म्हटले जाते. कालिदासाने एकूण तीन नाटके लिहिली, त्यांपैकी ‘अभिज्ञानशाकुंतल’ हे नाटक विश्वप्रसिद्ध आहे. याशिवाय भवभूति, विशाखदत्त हे सुद्धा प्रसिद्ध नाटककार आहेत. शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ हे प्रकरण (नाटक प्रकार) विशेष आहे. भरत मुनींचे नाट्यशास्त्र आणि धनंजयाचे दशरूपकम् यांच्या अभ्यासावर आधारित ह्या भागाची मांडणी केलेली आहे. भारतीय तत्त्वज्ञान (भाग ६) तत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी दर्शनांची आवश्यकता भासते. जीवन आणि दर्शन यांच्यात अतूट संबंध आहे. ‘श्रेयस’ म्हणजे काय, ‘जीवनाचे खरे ध्येय काय आहे’ असे प्रश्न ज्याला पडतात, त्याला दर्शनांचे महत्त्व कळते. ‘दुःख’ या गोष्टीने त्रासलेला माणूस दुःखापासून दूर जायचा प्रयत्न करतो. दुःखाची कारणे तो शोधू लागतो. त्याच्या शोध प्रवासाला निश्चित असा एक दृष्टिकोण द्यायचे काम दर्शनांमुळे होते. ‘दर्शन’ या शब्दाचा वाच्यार्थ ‘चक्षु’ या इंद्रियाशी निगडित आहे. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ‘चक्षु’ चे महत्त्व असाधारण आहे. जे डोळ्याने दिसते, त्यावर निश्चितपणे विश्वास ठेवला जातो. म्हणून अंतिम सत्य काय असते हे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शास्त्राला ‘दर्शन’ हा शब्द लावला गेला. जगत्, जीव, ईश्वर व मोक्ष हे दर्शनांमधील चिंतनाचे प्रमुख विषय होत. भारतीय दर्शनशास्त्रात वेदांचे प्रामाण्य मानणारे (आस्तिक) व न मानणारे (नास्तिक) असे दोन विभाग केले जातात. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा (वेदान्त) ही आस्तिक दर्शने आणि जैन, बौद्ध, चार्वाक ही नास्तिक दर्शने अशी विभागणी केली जाते. न्यायसूत्र, वैशेषिकसूत्र, मीमांसापरिभाषा, आगमग्रंथ, त्रिपिटक इ. महत्त्वाचे दर्शनग्रंथ आहेत. दर्शने केवळ अध्यात्मच सांगत नाहीत तर व्यवहारी जीवनात मार्गदर्शन करतात, नैतिक मूल्ये शिकवतात. अशी ही दर्शने या भागात सविस्तर सांगितली आहेत. प्राचीन भारतीय विद्या (भाग ७) या भागामध्ये कला, साहित्य, वैद्यक शास्त्र, उपयोजित शास्त्र, मनोरंजन, युद्धविषयक शास्त्र, आणि आचरणविषयक विचार अशी प्रकरणे आली आहेत. ‘कला’ प्रकरणात नाट्यशास्त्र, संगीतशास्त्र, अलंकार (दागिने), रांगोळी इ. विषय आहेत. ‘साहित्य’ प्रकरणात साहित्यशास्त्र, कोषरचनाशास्त्र आणि व्याकरणशास्त्र हे विषय आले आहेत. वैद्यकशास्त्रात आयुर्वेद तर आहेच शिवाय वृक्षायुर्वेद, गजायुर्वेद अशी शास्त्रेसुद्धा आहेत. उपयोजितशास्त्रात दैनंदिन जीवनाशी निगडित शास्त्रे येतात, उदा. पाकशास्त्र, कृषिविद्या, गणितशास्त्र, वास्तुविद्या इ. युद्धविषयक शास्त्रात साहजिकच शस्त्र, अस्त्र, विमान यांची माहिती दिली आहे. आचरण विषयक विचार या प्रकरणात नीतिशास्त्र, मानसशास्त्र, व अर्थशास्त्र हे विषय आले आहेत. मनोरंजन या प्रकरणात क्रीडा, जादू विद्या व शकुन विद्या हे दोन विषय आले आहेत. आधुनिक जगात असलेले सर्वच शास्त्र प्राचीन भारतात होते, हा अट्टाहास उपयोगाचा नाही. पण जे विषय होते, त्या त्या विषयांचा उल्लेख या भागात केला आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीची संपन्नता, विषयांची विविधता कळते. ‘संस्कृत’ भाषा फक्त वेद, उपनिषदे, पुराणे, पूजापाठ, व्याकरण, काव्ये एवढ्यापुरती सीमित नाही असे हा भाग सांगतो. म्हणून हा भाग विशेष वाचनीय वाटतो. ह्या चार भागात डॉ. सुरुची पांडे यांनी संस्कृत काव्य, नाटक तसेच तत्त्वज्ञान सुद्धा सविस्तर आणि सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले आहे.

संस्कृत साहित्याचा इतिहास (भाग २) Read More »