संत्रिका

जाति पंथ खुलवती संस्कृती भेदा नाही वाव | परस्परांना पूरक होईल एकत्वाचा भाव ||

मातृभूमी ही जगति साऱ्या वंदनीय ‌करण्या |संस्कृत संस्कृती संशोधनपर व्यासाची स्थापना ||


वाचस्पती विनायक विश्वनाथ पेंडसे तथा आदरणीय आप्पा पेंडसे यांनी पुण्यात ज्ञान प्रबोधिनीची स्थापना इ. स. १९६२ साली केली.  ती. आप्पांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दूरदृष्टीतून हळुहळू प्रबोधिनीचे रोपटे घट्ट रुजले, त्याला एकेक फांदी फुटत गेली व ते आता उत्तम बहरले आहे. प्रबोधिनीच्या स्थापनेनंतर  २२ जुलै १९७५ या दिवशी ‘संस्कृत संस्कृति संशोधिका’ म्हणजेच ‘संत्रिका’ या नावाने एका नव्या विभागाची स्थापना झाली. पुण्यातील काही मोजक्या ज्येष्ठ संस्कृत विद्वानांच्या उपस्थितीत, प्रसिद्धी व संशोधन अशा दोन्ही स्तरांवर संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीचा विकास व्हावा; त्याद्वारे समाजात संवाद सेतू बांधले जाऊन सामाजिक एकात्मता साधता यावी यासाठी विभागाची निर्मिती झाली.  या नव्याने उदयास आलेल्या विभागाचे संगोपन तिच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यातून करण्याचे काम प्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर,जे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्याप्रमाणे प्रा. महाशब्दे, डॉ. सुनितीताई दुबळे यांनी केले. १९९० पासून पुढे ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य प्रा. यशवंतराव लेले व नंतर संस्कृत व अरविंदांचे अभ्यासक प्रा. विश्वनाथ गुर्जर यांनी हे कार्य बहुआयामी केले, विविधांगी कामाच्या कल्पना फुलवल्या. विभागाच्या नावात तीन ‘सं’ येतात म्हणून ‘संत्रिका’ असे लघु नाव झाले.

हिंदू समाजातील अनेकांना विविध निमित्तांनी घरात अथवा संस्थेत काही धार्मिक संस्कार करवून घेण्याची गरज वाटत असते. हे संस्कार त्यातील अर्थ समजून घेऊन व्हावेत, नवशिक्षितांना संस्कारामधील उदात्त आशय कळावा, जे लोक कर्मकांडास कंटाळले आहेत त्यांना आधुनिक काळाला योग्य असे महत्त्वाचे पण सुटसुटीत विधी  करता यावेत या हेतूंनी  ज्ञानप्रबोधिनीने ‘धर्मनिर्णय मंड़ळ, लोणावळा’ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध संस्कारांच्या (मंत्र आणि अर्थ यांनी युक्त अशा) पोथ्यांची रचना केली आहे.

ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने पौरोहित्य करू इच्छिणार्‍या अथवा केवळ ही पद्धत समजून घेण्याची इच्छा असणार्‍या स्त्री-पुरूषांसाठी ज्ञानप्रबोधिनीत १९९०  सालापासून पौरोहित्य प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत. या वर्गांमधून  प्रशिक्षित झालेल्या महिला आणि पुरूष-पुरोहितांचा एक संच ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने संस्कारविधी करण्याचे कार्य करीत आहे. त्या शिवाय या वर्गामधून प्रशिक्षित झालेले अनेक स्त्री-पुरूष स्वयंपुरोहित म्हणून स्वत:च्या घरातील संस्कार स्वत:च ज्ञानप्रबोधिनीच्या पोथ्यांच्या आधारे करीत आहेत.