बाह्य सृष्टीवर प्रेमाने विजय

हिंदू संस्कृतीचे असे वैशिष्ट्य आहे, की भारतीयांना कधीच महासत्ता व्हावेसे वाटले नाही. पूर्वीच्या काळीही नाही, आणि आजही नाही. भारतीय समाजाने स्वप्न पाहिले, ते विश्वगुरू होण्याचे. सामान्य मनुष्यापासून देवमाणूस कसे बनायचे हे सगळ्या जगाला शिकवावे, अशी भारतीयांची इच्छा होती. जगाला शिकवणे म्हटल्याने किंवा विश्वगुरू म्हटल्यानेही आपण इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे वाटू शकते. तशी श्रेष्ठत्वाची भावनाही भारतीयांनी कधी दाखवली नाही.

भारतीयांचे म्हणणे असे आहे की, ‘बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे यातच सर्व काही नाही हे आम्हांला सर्वांच्या आधी कळले. त्यामुळे प्रत्येकाच्या आतमधील शक्तीचा स्रोत शोधायला सर्वांच्या आधी आम्ही सुरुवात केली आणि प्रत्येकाच्या आतील हे शक्तिकेंद्र सापडल्यावर माणसाचा देवमाणूस होतो हे आमच्यातील काही जणांना कळले. ते इथले ऋषी, मुनी, आणि योगी व संत होते. काही जणांना जे कळले ते सगळ्या भारतीयांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. विश्वगुरू बनणे म्हणजे आमच्या देशात सर्व समाजातून देवमाणसांचा संघ आम्ही कसा करतो आहोत, हे इतर देशांतल्या लोकांनी बघावे आणि स्वतःही तसेच बनण्याचा प्रयत्न करावा.’ ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही जशी म्हण आहे, तसे ‘पुढच्याची प्रगती पाहून मागचा शहाणा’ अशी ही विश्वगुरू बनण्याची कल्पना आहे.

निसर्गातील शक्तींवर विजय मिळविताना किंवा जगाला शिकवताना, सर्वांना प्रेमाने जिंकावे ही भारतीयांची दृष्टी राहिली आहे. कुठल्या वनस्पतीचा औषधी उपयोग कसा करता येईल, हे शोधून काढणे म्हणजे निसर्गावरती विजय मिळवणे. पण हा विजय प्रेमाने मिळवायचा म्हणजे एखाद्या वनस्पतीचा भाग औषध म्हणून वापरायचा असेल, तर त्या वनस्पतीची प्रार्थना करून तिची परवानगी घेऊन मग ती वनस्पती तोडावी, असे आपली संस्कृती सांगते. शुद्ध आयुर्वेदानुसार वैद्यकी करणारे अनेक वैद्य आजही ही पद्धत पाळतात. तसेच आदिवासीही याच पद्धतीने प्रार्थना करून मग वनस्पतींचा उपयोग करतात.