बाह्यसृष्टीवर विजय मिळवणे हे उद्दिष्ट समोर ठेवून हिंदू समाजाने प्राचीन काळात विज्ञान संशोधनामध्ये मोठी आघाडी मारली होती. गणितातील दशमान पद्धती आणि शून्याची कल्पना, खगोलशास्त्रातील पृथ्वीला गती आहे, पण ती स्थिर भासते हा सिद्धांत, रसायनशास्त्र, वैद्यक आणि शल्यचिकित्सा या सगळ्यांमध्येच हिंदू समाजाने आघाडी घेतलेली होती. अगदी पेशवाईच्या काळापर्यंत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान हिंदू समाजाने सांभाळले. इंग्लंडमध्ये न पाहिलेली प्लॅस्टिक सर्जरी आणि लसीकरण इंग्रजांना भारतात पहायला मिळाले होते. विज्ञानात गती असूनही पारतंत्र्य आल्यावर तेराव्या शतकाच्या सुमारास हिंदुस्थानातल्या विज्ञानाचा विकास थांबला. हिंदू समाजाने संस्कृत आणि प्राकृत भाषांमध्ये कथा, काव्य, नाट्य यात बरेच प्रयोग केले होते. संगीताचेही शास्त्र बनविले होते. त्याचबरोबर नीतीशास्त्र, शिल्पकला, योगविद्या, स्थापत्य यांतही प्रगती केलेली होती. व्याकरण आणि भाषाशास्त्र, उद्यानविद्या, हत्ती आणि घोड्यांचे आयुर्वेद ही सर्वच शास्त्रे विकसित झाली होती. हे सर्व निर्माण करू शकणारा समाज बाह्यसृष्टीवर विजय मिळविण्याची इच्छा असणाराच असतो.
काही शतकांच्या खंडानंतर हिंदू समाजाने या बाह्य विषयांकडे पुन्हा लक्ष वळविले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली १९९५ साली ‘व्हिजन २०२०’ ही योजना तयार झाली. त्यामध्ये एकूण वीस प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये भारत जगातल्या पहिल्या पाच राष्ट्रांमध्ये यावा, अशी विकासाची योजना मांडली होती. त्यात मांडलेली जवळ जवळ सर्व उद्दिष्टे २०२० पर्यंत पूर्ण होतील, अशी चिन्हे आहेत. त्या योजनेमध्ये कुठेही भारत महासत्ता व्हावा किंवा superpower व्हावा, असे म्हटले नव्हते. वीस तंत्रज्ञानांत प्रगती झाल्याबर भारत महासत्ता होईल ही प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली हवा आहे.