सर्वसमावेशक अध्यात्म

भारतात राहणाऱ्या ख्रिश्चन, ज्यू, पारशी आणि मुसलमानांचे धर्म हे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात का? ‘उपास्यानाम् अनियमः साधनानाम् अनेकता’, आणि प्रतीक व साधन यांच्या निवडीत प्रत्येकाचे व्यक्तिस्वातंत्र्य या भारतीय संस्कृतीच्या तीन गोष्टी त्यांनी स्वीकारल्या तर त्यांचे त्यांचे धर्म ही सनातन धर्माचा म्हणजे हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात. सप्तशतीमध्ये एक श्लोक आहे,

या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

त्यामुळे ‘आम्ही कोणताच धर्म मानत नाही, आम्ही आमच्या बुद्धीलाच प्रमाण मानतो. आधुनिक विज्ञान आणि तर्कशास्त्र सांगेल, त्याचप्रमाणे आम्ही वागणार’ असे म्हणणारे ही हिंदू धर्माचा भाग होऊ शकतात. कारण बुद्धी देखील सर्व विश्वाच्या पाठीमागे असणाऱ्या शक्तीचेच एक रूप आहे. आम्ही हिंदू धर्माचा भाग नाही, असे म्हणायचे स्वातंत्र्य त्यांना आहेच. तसेच ते मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू, पारसी यांनाही आहे. ते स्वतःला हिंदू धर्माचे म्हणवून घ्यायला तयार नसतील तर आपण आपले म्हणणे त्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगत राहिले पाहिजे. स्वतःच्या धर्ममताचा प्रचार करण्याचे स्वातंत्र्य त्यांनाही आहेच. पण कोणालाच सक्तीने किंवा प्रलोभन दाखवून इतरांचे धर्मांतर करण्याचा अधिकार नाही. असे धर्मांतर रोखणे किंवा असे धर्मांतर झालेल्यांची ‘घर वापसी’ करणे हे सर्वसमावेशक अध्यात्मात येते. म्हणूनच ते व्यवहार्य अध्यात्म आहे.

हिंदू राष्ट्र हे मुळात आध्यात्मिक आहे. याचा अर्थ अध्यात्म हा या राष्ट्राचा आदर्श आहे. हिंदू राष्ट्राचे रूप सांस्कृतिक आहे. याचा अर्थ स्वतःच्या जीवनदृष्टी व जीवनपद्धती बाबतीत ठाम आणि इतरांच्या बाबतीत स्वीकारशील अशी इथली संस्कृती आहे. हिंदू राष्ट्राची ओळख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशी प्रथम होते. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण हा हिंदू राष्ट्राचा पोशाख आहे. प्रत्येक पिढी आपल्या आवडीनुसार हा पोषाख बदलत जाईल.

हिंदू समाजाचा कायापालट

महाभारत काळात ‘आत्मार्थं पृथिवीं त्यजेत्’ म्हणजे स्वतःच्या हितासाठी सगळ्या जगाचा त्याग करावा, अशी घोषणा होती. पाच हजार वर्षांनी विवेकानंदांनी त्या घोषणेत सुधारणा केली. ‘आत्मनो मोक्षार्थं जगत् हिताय च’ अशी घोषणा त्यांनी केली. ‘स्वतः देवमाणूस बनण्यासाठी सगळ्या जगाचा त्याग करावा, या ऐवजी ‘स्वतः देवमाणूस बनावे आणि जगालाही देवमाणूस बनायला मदत करावी’, अशी नवीन घोषणा त्यांनी केली.

जेव्हा ‘आत्मार्थ पृथिवीं त्यजेत्’ ही घोषणा होती, तेव्हा भारतात चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. प्रत्येकाने आपआपल्या वर्णाचे काम करावे आणि स्वतःचे हित बघावे त्यातून समाजाचे हित आपोआप साधले जाईल, अशी तेव्हाची समजूत होती. तेव्हा ती पुरेशीही वाटत होती. पण विवेकानंदांनी मूळची घोषणा सुधारित केल्यावर सर्व समाजाची चारच गटांत विभागणी करण्याची कल्पनाही सोडून द्यावी लागेल. योगी अरबिंद हे सुद्धा विवेकानंदांसारखेच राष्ट्रद्रष्टे संत होते. म्हणजे राष्ट्राचा भविष्यकाळ पाहू शकणारे संत होते. भारताने सर्व जगाला देवमाणूस कसे बनायचे, हे स्वतःच्या उदाहरणाने दाखवून द्यायचे असेल, तर प्रत्येकाचा आयुष्यभर एकच वर्ण, ही कल्पना सोडून दिली पाहिजे असे योगी अरविंदांनी सांगितले.

श्रीकृष्ण लहानपणी गवळ्याचा पोर होता, गोपालन करायचा, म्हणजे तो वैश्य होता. त्याने अनेक दुष्टांचा संहार केला, म्हणून तो क्षत्रिय होता. त्याने भगवद्‌गीतेत ब्रह्मविद्या सांगितली म्हणून तो ब्राह्मण होता. कौरव-पांडवांच्या युद्धात त्याने अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांना खरारा केला आणि युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात जेवणाच्या पंगतीनंतरची आवराआवर केली म्हणून तो शूद्र होता. प्रत्येक व्यक्तीमध्ये चारही वर्णांची कामे करण्याची क्षमता कमी-अधिक प्रमाणांत असते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात त्याला वेगवेगळ्या वर्णांची कामे करावी लागतात. त्यामुळे ‘आत्मनो मोक्षार्थं जग‌द्विताय च’ या नव्या घोषणेचा काळात समाजाची चार वर्णांतील विभागणी चालणार नाही.

भारताला विश्वगुरू व्हायचे असेल तर चातुर्वर्ष्याच्या चौकटीतून बाहेर पडावे लागेल. चातुर्वर्ण्यच नको म्हटल्यावर जातींची उतरंडही तत्त्वतः आपोआपच गेली. व्यवहारात चातुर्वर्ण्य आणि जातिभेद या दोन्हीचा जाच आणि बोच जाण्यासाठी आणखी काही पिढ्या मुद्दाम प्रयत्न करायला लागतील.

स्त्रियांचे सामाजिक स्थान

वेदकाळापासून वेदांतील सूक्ते रचणाऱ्या स्त्रिया, ब्रह्माच्या स्वरूपासंबंधी चर्चा करणाऱ्या स्त्रिया, लढवय्या स्त्रिया, राजकारणी स्त्रिया होऊन गेल्या आहेत. स्त्री संतही अनेक होऊन गेल्या आहेत. स्त्रियांमध्ये व पुरुषांमध्ये एकच ईश्वरी शक्ती आहे, हे ही सर्वांनी मान्य केले आहे. कुटुंबामध्ये स्त्रियांना व पुरुषांना परस्परपूरक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. परंतु व्यक्तिशः व कुटुंबापलीकडच्या सामाजिक जीवनात स्त्रिया व पुरुष समान क्षमतेचे आहेत हे तत्त्वतः आपण मान्य केलेले आहे. काही वर्षांपूर्वी एकाच वेळी राष्ट्रपती, लोकसभेच्या सभापती आणि सत्ताधारी आघाडीच्या प्रमख स्त्रियाच होत्या. कायद्याने ग्रामपंचायतीत स्त्रियांना ५०% आरक्षण मिळाले आहे. विधानसभेत आणि लोकसभेत ३३% आरक्षण एक ना एक दिवस येणारच आहे. पण भारतीय जीवनदृष्टी कायद्यापेक्षा धर्माला जास्ती महत्त्व देणारी आहे. वेदांची सूक्ते रचणाऱ्या स्त्रिया झाल्या आहेत. पण नवीन स्मृती रचणाऱ्या किंवा नवीन घटनादुरुस्ती मांडणाऱ्या स्त्रिया जेव्हा पुढे येतील, तेव्हा हिंदू समाजाचा कायापालट पूर्ण होईल. समाजाचे व्यावहारिक जीवन पूर्वी स्मृतींनुसार चालायचे आणि आता घटनेनुसार चालते. चातुर्वर्ण्य आणि जातीव्यवस्था जाण्याइतकेच स्त्रिया स्मृतिकार किंवा घटनाकार होणे याची २१व्या शतकात गरज आहे. म्हणजे मनु, याज्ञवल्क्य, शंकराचार्यांसारख्या आचार्या किंवा बाबासाहेब आंबेडकरांसारख्या घटनाकार स्त्रियांची गरज आहे. त्यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार समाजाचे व्यवहार चालले पाहिजेत. असा विचार आपल्याला करता येतो, कारण हिंदू धर्म आपला गाभा कायम ठेवून काळानुसार आपले स्वरूप बदलत असतो. असे काळानुसार बदलता येण्यामुळेच हिंदू धर्माचा गाभा जे अध्यात्म ते व्यवहार्य आहे असे आपण म्हणतो.

हिंदू समाज, भारतीय संस्कृती आणि व्यवहार्य अध्यात्म हे तिन्ही मिळून हिंदू राष्ट्र होते हे आपण पाहिले. चातुर्वर्ण्य आणि नंतर त्यातून निर्माण झालेली जातिव्यवस्था ही हिंदू समाजातील एक व्यवस्था आहे. भारतीय संस्कृती किंवा व्यवहार्य अध्यात्माचा टाळता न येण्यासारखा असा भाग तो नाही. ‘नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए’ असे एक गीत आहे ‘आत्मनो मोक्षार्थं जग‌हिताय च’ या ध्येयासाठी काम करणे हे हिंदू राष्ट्राचे नवीन पर्व आहे. त्यासाठी जन्मावर आधारित चातुर्वर्ण्यत किंवा जातींमध्ये विभागलेला समाज हा अडथळाच होईल. ‘आपण सर्वच ईश्वराचे समान अंश आहोत,’ असे म्हणणाऱ्या भारतीयांचा संघटित समाज हा नव्या पर्वाचा नवीन प्राण आहे.

संघटित समाज हेच राष्ट्राचे शरीर

राष्ट्र म्हणजे परंपरेच्या मध्यवर्ती सूत्राभोवती आणि परस्पर आत्मीयतेच्या नात्याने संघटित झालेला समाज. राष्ट्राच्या आम्हीपणात व्यक्तीचे मौपण विरघळवून टाकायला शिकणे म्हणजे राष्ट्र घडवणे. राष्ट्रापुढे माणसाचा देवमाणूस बनविण्याचे ध्येय असले, असे देवमाणूस बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची परंपरा असली, तरी एखादा समाज जेव्हा आपली आजची स्थिती सुधारण्यासाठी संघटित होतो तेव्हाच त्या समाजाचे राष्ट्र बनते. आजचा हिंदू समाज भारतीय संस्कृतीच्या रूपाने इतिहासाशी जोडलेला आहे. व्यवहार्य अध्यात्माच्या रूपाने भविष्याशी जोडलेला आहे. पण संघटनेच्या रूपाने वर्तमानकाळाशी जोडलेला नाही. आम्ही राष्ट्र आहोत ही जाणीव सर्व स्त्री-पुरुषांमध्ये निर्माण करणे ही राष्ट्रघडणीची गरज आहे.

व्यवहार्य अध्यात्म हे आमच्या हिंदूपणाचे पहिले तत्त्व आहे, त्यातून सर्वांमध्ये ईश्वरी शक्ती पाहण्याची जीवनदृष्टी हे आमच्या हिंदूपणाचे दुसरे तत्त्व आहे. या जीवनदृष्टीतून तयार झालेली सर्व प्रकारची विविधता स्वीकारणारी जीवनपद्धती हे आमच्या हिंदूपणाचे तिसरे तत्त्व आहे. हे अध्यात्म, ही जीवनदृष्टी आणि ही जीवनपद्धती घडवणारी हजारो वर्षांची परंपरा हे आमच्या हिंदूपणाचे चौथे तत्त्व आहे. या सर्वांच्या बळावरच आजचा हिंदू समाज विस्कळीत असूनही त्याला मधून-मधून एक राष्ट्र असल्याची आठवण होते. ही आठवण मनात सदैव ताजी राहण्यासाठी समाज संघटित होणे हे हिंदूराष्ट्र घडविण्याचे पाचवे तत्त्व आहे. या संघटित समाजाने वर्तमानकाळातही समृद्ध, सबळ आणि ज्ञाननिर्मितीत अग्रेसर व्हावे हे राष्ट्रघडणीचे सहावे तत्त्व आहे.

प्रतिकूल परिस्थितीत काही कंद जमिनीखाली सुप्तावस्थेत राहतात आणि हवा-पाणी अनुकूल झाल्यावर त्यांचे अंकुर जमिनीबाहेर येऊन वेगाने वाढू लागतात. आजच्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वाची पहिली चारच तत्त्वे असल्यामुळे हे राष्ट्र जमिनीखालच्या कंदाप्रमाणे सुप्त अवस्थेत गेले आहे. संघटना आणि सर्व क्षेत्रातील विकास करून हा कंद अंकुरला पाहिजे म्हणजे आधुनिक अर्थाने राष्ट्र बनला पाहिजे.