जीवनपद्धती : इतरांसाठी जगणे

आपण बारकाईने निरीक्षण करत गेलो, तर सर्वसामान्य लोकांच्या साध्या-साध्या कृतीतून ही जीवनदृष्टी व्यक्त होत जाते. एखाद्या समाजाची ओळख त्याच्या जीवनदृष्टी वरूनच होते. जीवनाकडे बघायचा भारतीय दृष्टिकोन सांगण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका फुलाचे उदाहरण घेऊन म्हटले आहे,

अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती ।
कोणी त्यांची महती गणती केली असे ।
परी जे गजेंद्रशुंडेने उपटिले, श्रीहरीचरणीं ठेविले ।

कमलपुष्प ते अमर झाले मोक्षदायी पावन ।।

प्रसिद्ध हिंदी कवी माखनलाल चतुर्वेदी यांनी सावरकरांच्या ही पुढे जाऊन देवाच्या चरणी बाहिले जाण्यापेक्षा मातृभूमीसाठी बलीदान करणाऱ्यांच्या पायाखाली तुडवले जाणे अधिक भाग्याचे असे असे एका कवितेत म्हटले आहे. कवी म्हणतो,

चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गूँथा जाऊँ ।
चाह नही प्रेमी माला में बिंध प्यारी को ललचाऊँ ।

चाह नहीं सम्राटों के शव पर हे हरि! डाला जाऊँ ।

चाह नहीं तेरी मूरतपर चढूँ भाग्य पर इठलाऊँ ।

मुझे तोड लेना वनमाली उस पथ पर देना तुम फेंक ।
मातृभूमि पर शीष चढ़ाने जिस पथ जावे वीर अनेक ।

दोन्ही कवितांमध्ये फुलांच्या रूपाने स्वतःच्या जीवनपुष्पाच्या समर्पणाचीच भावना व्यक्त होते. पहिल्या कवितेत, सुकून निर्माल्य व्हायचेच आहे, तर देवाला वाहिले जाऊन निर्माल्य होण्यात कृतार्थता मानली आहे. तर दुसऱ्या कवितेत फूल, आपल्याला झाडावरून तोडून मातृभूमीसाठी बलिदान करणाऱ्यांच्या पायाखाली तुडविले जाण्यासाठी त्यांच्या फाशीच्या तक्त्याकडे जायच्या वाटेवर टाकायला देवालाच सांगते आहे. इतरांसाठी जगण्यातच आनंद मानणे ही आमची आयुष्य जगायची पद्धत आहे. तिलाच जीवनपद्धती म्हणतात. प्रत्येक घरात कुटुंबासाठी जगण्यात आनंद मानणारी आई भारतीय जीवनपद्धती प्रमाणे जगण्याचे मूर्त उदाहरण असते.